Skip to main content

दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १५: मंडपम- तोंडी ८४ किमी

लेखक मार्गी यांनी शनिवार, 30/05/2026 15:23 या दिवशी प्रकाशित केले.

✪ पूर्व किनारी मार्गाने प्रवास 

✪ मध्य तमिळ नाडूमधील गावं 

✪ १५ दिवसांमध्ये १३८० किमी झाले 

✪ त्सुनामीच्या वेळच्या गावांची आठवण 

✪ तमिळ नाडूमध्ये प्रजासत्ताक दिवसाचं वेगळं स्वरूप 

✪ मनाला वर्तमानामध्ये ठेवणं! 

नमस्कार. २६ जानेवारीची सकाळ! काल मंडपममध्ये सेवा भारती दक्षिण तमिळ नाडूचे श्री. मुनियासामीसुद्धा भेटले होते. त्यांच्या ओळखीने आज तोंडी गावामध्ये थांबणार आहे. काल बघितलेला धनुषकोडीचा परिसर अजून आठवतोय. तो पंबन ब्रिज! काल रात्रीच्या ठिकाणी चांगला आराम झाला. बरोबर सव्वासहाला कथिरगमाजीसुद्धा आले. ज्यांच्याकडे थांबलो होतो त्यांच्याशी चहासोबत थोड्या गप्पा झाल्या. नंतर कथिरगमाजींनी परत त्यांच्या आवडीच्या हॉटेलमध्ये नेऊन चहा पाजला. रोडपर्यंत ते मला निरोप द्यायला सायकलवर आले. त्यांनी दोन दिवसांच्या मंडपमच्या वास्तव्यामध्ये मला छान सोबत केली. 

(माझा ब्लॉग इंग्रजीत इथे वाचता येईल. सायकल प्रवासातले फोटो बघता येतील‌ व सर्व लेख एकत्र वाचता येतील. त्याशिवाय विज्ञान प्रयोग, गणितातील गमती, ट्रेकिंग, ध्यान, आकाश दर्शन, फिटनेसबद्दलचे लेख तिथे वाचता येतील.)  .  .  .  .   

सायकल प्रवासाचा १५ वा दिवस! प्रजासत्ताक दिन. इथे विशेष उत्साहाचं वातावरण दिसत नाहीय. तिरंगा असलेले फलक किंवा फुल दिसत नाही आहेत. शाळांमध्येही काही कार्यक्रम सुरू आहेत असं वाटत नाहीय. किंचितसं पावसाळी हवामान आहे. आज परत उलटा वारा लागतोय. परिसर कोणताही असो, निसर्ग त्याची‌ रंगांची उधळण काही थांबवत नाही! वेगवेगळी झाडं दिसत आहेत. बराचसा तळ्यांचा परिसर आहे. रामनाथपूरम बायपासच्या आधी नाश्ता केला. काही काही लोकांशी छान बोलणं होतंय. वाटेत एका ठिकाणी नौदलाचं एक केंद्रही दिसलं. 

रामनाथपूरम बायपासवरून उजवीकडे वळालो. हे शहर त्यामुळे बघता आलं नाही. अंतराच्या पाट्यांमध्ये आता चेन्नै आणि तिरूचिरापल्लीबरोबर पुंपूहार, नागापट्टीणम अशी गावंही येत आहेत. २१ वर्षांपूर्वी जानेवारी २००५ मध्ये त्सुनामीनंतरच्या मदत कार्यासाठी ह्या गावांमध्ये आलो होतो. आठ दिवस किनारपट्टीलगत नागापट्टीणम, तरंगमबाडी, पुंपूहार, कराईकल अशा काही गावांमध्ये मदत कार्यात सहभाग घेतला होता. तो परिसर हळु हळु जवळ येतोय. खूप वेगळ्या अशा त्या आठवणी आहेत. मदत कार्यामध्ये मिलिटरीच्या लोकांसोबत केलेलं काम, सगळं उध्वस्त होऊनही‌ हळु हळु मुला- मुलींना काम करताना बघून सावरणारे लोक. खूप वेगळा तो अनुभव होता. त्या परिसरातून पुढच्या काही दिवसांमध्ये सायकल चालवेन. 

आजचं तोंडी गाव तसं लहानसं आहे. कोणाकडे थांबायचं हे खूप उशीरापर्यंत ठरलं नव्हतं. नंतर तिथल्या एका कार्यकर्त्यांचा नंबर मिळाला आणि त्यांच्याशी बोलणं केलं. पण त्यांना इंग्रजी काहीच येत नाहीय! एका एका शब्दाने बोलणं झालं. त्यांनी मला तिथल्या बस स्टँडला यायला सांगितलंय. बघू कसं होतं. 

८४ किलोमीटरचं अंतर तीन टप्प्यांमध्ये मनाने विभागलं आणि एक एक टप्पा असा विचार करत जात राहिलो. साधारण ५५ किलोमीटरवर दुसरा ब्रेक घेतला. आजचा रस्ता बराचसा गावांमधूनच जातोय. मोठं शहर असं नाहीच लागलं. पण हा रस्ताही महत्त्वाचा असावा. कारण दूरवरून आलेल्या ट्रॅवल्स आणि सरकारी बसेस खूप लागत आहेत. नंतरही प्रजासत्ताक दिवसाचं काही वातावरण जाणवलं नाही. अगदीच नाही म्हणायला एक महिला तिरंग्याच्या रंगाचा पोशाख केलेली दिसली तितकीच. शाळासुद्धा कमी लागल्या किंवा कदाचित शाळांना सुट्टी असेल. 

आकाशात ढगाळ वातावरण असल्यामुळे दुपारीसुद्धा ऊन्हाचा त्रास होत नाहीय. गंमत म्हणजे वारे आहेत, त्यामुळे वेळ जास्त लागतोय पण थकवा तितका होत नाहीय. वारे असल्यामुळे गरम जास्त होत नाहीय. आरामात जात राहिलो. तोंडीमधले शक्तीवेलजींशी परत बोललो. पण बहुतेक ते जास्त मोबाईल वापरत नसावेत. त्यामुळे त्यांना लाईव्ह लोकेशन वगैरे कळत नसावं. शेवटी मीच त्यांनी सांगितलेल्या ठिकाणी विचारत विचारत जाईन असं ठरवलं. 

तोंडीमध्ये पोहचलो तेव्हा दुपारचा एक वाजतोय. लोकांना विचारून गावात बस स्टँडकडे गेलो. तिथे थोड्या वेळाने शक्तीवेलजी आले. त्यांचं वय ६५ च्या पुढे असेल! त्यांना इंग्रजी काहीच येत नाहीय. हिंदीचा तर विषयच नाही. त्यामुळे थोडा वेळ गोंधळ झाला. मला मुक्कामाच्या जागी जाऊन फ्रेश व्हायचं आहे हे त्यांना कळत नव्हतं. मी त्यांनी एका माणसासोबत जिथे जायला सांगितलं तिथे मी गेलो तर ते मंदिर होतं. पण राहण्याची सोय नव्हती. नंतर त्यांच्याच हॉटेलमध्ये जेवण केलं. थोडा आराम करता आला पाहिजे, अशी रूम पाहिजे हे त्यांना दुसर्‍यांच्या मदतीने सांगितलं. पण तशी जागा त्यांच्याकडे नाहीय. त्यांनी बस स्टँडजवळचे लॉज शोधले, पण ते बंद होते. मग मला दुसर्‍याच एका ठिकाणी ते घेऊन गेले. पण तिथेही ठीक वाटलं नाही. बराच वेळ थांबून बघितलं. पण अखेर आराम होणं गरजेचं असल्यामुळे इमर्जन्सीमध्ये श्री. विजय राजमोहनजींना विचारलं. त्यांनी थोडी माहिती घेऊन मला जवळचंच एक दुसरं चांगलं हॉटेल सुचवलं. सायकलीवरून काढलेलं सामान घेऊन मी तिकडे गेलो. तिथे प्रॉपर रूम होती. मग तिकडेच थांबलो. असा एकूण गोंधळ! पण ठीक आहे. अशा पद्धतीच्या प्रवासात ह्या गोष्टी होतातच!

  .  .  .  .  .   

प्रवासाचा १५ वा दिवस पूर्ण झाला. आणि १३८० किलोमीटर झाले. आता फक्त ५ दिवस बाकी! चेन्नै फक्त ५५० किलोमीटर दूर आहे! आधी अगदी हळु हळु जाणारे दिवस आता खूप वेगाने जात आहेत! उद्या मल्लिपट्टिणम, परवा तंजावूर, नंतर श्रीमुशनाम आणि मग पाँडेचेरी! पण नाही. मनाला वर्तमानामध्ये ठेवलं पाहिजे. आज फक्त १५ च दिवस झाले आहेत. आणि उरलेले अजून बाकी आहेत! 

पुढील भाग: दक्षिण भारतातील सायकल प्रवासाचे अनुभव १६: तोंडी- मल्लिपट्टिणम ७४ किमी 

वाचल्याबद्दल धन्यवाद. माझ्या ब्लॉगवर ट्रेकिंग, आकाश दर्शन, विज्ञान प्रयोग, ध्यान, फिटनेस, सायकलिंग इ. बद्दलचे लेख उपलब्ध. -निरंजन वेलणकर 09422108376. लिहीण्याचा दिनांक- 30 मे 2026.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 47
प्रतिक्रिया 0

प्रतिक्रिया