मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काय वाट्टेल ते....!

झेल्या · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
रेसेशन...? तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. कारण आपल्याकडे रेसेशन वर एकदम जालिम उपाय आहे. रामबाण. काय करायचं, एक दीर्घ श्वास घेऊन सोडून द्यायचा. आता तुम्ही म्हणाल याने काय होईल! तुम्ही दीर्घ श्वास घेऊन सोडलात की तुमचं मन स्थिरावेल. मन स्थिरावलं की संसद का सत्सद काय म्हणतात ती विवेकबुद्धी जागॄत होइल. ती विवेकबुद्धी जागॄत झाली की तुम्ही सारासार विचार करू लागाल. या विचारांतून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला रेसेशन वर विचार करायची काहीच गरज नाही. त्याचं असं आहे की नको तेवढं आणि बर्‍याचदा नको तिथं डोकं चालवून थोडंसं डोकं पिकलंय...(डोकं थोडंसं पिकलंय!). तेव्हा मनात असा विचार आला की विचार न करता काहीतरी लिहावं. आता तुम्ही विचाराल की 'का लिहावं असं विचार न करता?'. अहो मग फरक काय राहिला माझ्यात आणि इतर लेखकांत? हा एक अभिनव उपक्रम (उपद्व्याप) आहे. टिळ्कांनी इंग्रज सरकारबद्दल विचारलेला प्रश्न सध्या तुमच्या मनातही माझ्याबद्दल डोकावत असेल. ('हा प्रश्न कोणता?' असा प्रश्न ज्यांना पडला असेल त्यांच्यासाठी: 'सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?'). आहे. माझे डोके ठिकाणावर आहे. काळंजी नसावी. फक्तं ते ठिकाण कुठं सापडंत नाहीये. असो. नाही नाही. हा लेख असा अर्धवट वाचून सोडून देण्याचा विचार तुमच्या मनाला स्पर्शूही देऊ नका. फारंच वैतागला असाल तर एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या. (श्वास बरंका.....लेख वाचणं नाही). मुद्द्याचं बोलायचं झालं तर बोलण्याचा मुद्दा काय असावा! कशाला हवाय तो मुद्देसूदपणा! कशाला हवाय एका वाक्याचा दुसर्‍या वाक्याशी संबंध! कशाला हवेत ते अक्षरा-अक्षरामधील, शब्दा-शब्दामधील, आवाजा-आवाजांमधील ते परस्पर ग्राह्य संबंध! थोडा वेळ सगळं बाजूला ठेवा. पाटी स्वच्छ पुसून कोरी करा. आता या पाटीवर आपल्याला एक चित्र काढायचं आहे. कशाचं? पोकळीचं. (पोफळीचं नाही हो...). पोकळीचं. निर्वात पोकळीचं. कसं काढाल? सोप्पंय! काही काढायची गरजंच नाहीये. याचा काय अर्थ? अं हं....विचार करायचा नाही....अजिबात विचार करू नका. वाचंत रहा. (थोडंसंच राहिलंय!). जगात कोणी ना कोणी काही ना काही करंत असतो. जगात कोणी ना कोणी काही च्या काही करंत असतो. मीही ठरंवलंय की जीवनाचं ध्येय ठरंवायचं. 'काहीही' करून 'काहीही' होत नसतं तर 'काहीतरी' होण्यासाठी 'काहीतरी' करावं लागतं- हे मला आता कळून चुकलंय...(अं हं..चुकून कळ्लंय!). काय म्हणजे काय असतं, कोण म्हणजे कोण असतं याची प्रत्येकाला पारख हवी. 'जे आहे ते का आहे' आणि 'जे नाही ते का नाही' हे कळ्ल्याशिवाय 'जे आहे ते नसते तर...' आणि 'जे नाही ते असते तर...' याचा अंदाज कसा येणार! जसेजसे आपण पुढे जातो, आपण तसेतसे का जातो आणि आपण तसेतसेच का जातो याचा अभ्यास करायला हवा. 'आपल्याला इतके प्रश्न क पडतात?' विचारलात कधी हा प्रश्न स्वत:ला? समजलेल्या गोष्टी समजून घेण्याची समज आपणांत होती म्हणून त्या समजल्या. पण न समजलेल्या गोष्टी का समजत नाहीत हे समजून घेतले तर समजदारीचे कृत्य होईल ही समजूत चूक की बरोबर हे समजले पाहिजे. 'काय लिहीलंय हे?', 'का लिहीलंय हे?' वाटलं ना असं? वाटू द्या. काय वाट्टेल ते वाटू द्या. काय वाटावं हे आपल्या हातात नसतं. पण काय 'वाटून' घ्यावं हे मात्र आपल्या हातात असतं. वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळं वाटत असतं. कुणाला बरं वाटत असतं तर कुणाला वाईट वाटत असतं. कुणाला हसावं- नाचावं-बागडावं वाटत असतं तर कुणाला रडावं वाटत असतं; तर कुणाला पहावं...करावं...करून पहावं..पाहून करावं...वाजवावं...खाजवावं.............. प्रत्येकाला वेगवेगळं वाटत असतं कारण प्रत्येकाची वाट वेगळी असते. आयुष्यात पुढे पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला वाट लागंत असते....आणि आयुष्यात पुढे पुढे जाताना प्रत्येकाची वाट लागंत असते...! हुश्श! एवढं लिहीलं...मन हलकं झालं...तुम्हाला वाटंत असेल की या लेखकाला 'मन' नाही तर 'पोट' हलकं करण्याची गरज आहे. वाटूद्या...मी त्याबद्द्ल काही वाटून घेणार नाही. तुम्ही इथपर्यंत वाचंत आलात त्याबद्द्ल तुमचं मनापासून कौतुक. कांडी संपत आलीये...नाहीतर अजून लिहीलं असतं. ....आलो....आलो...कोणीतरी बोलावतंय....जायला हवं....बरंय तर मग्.....तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि सोडून द्या..! कळावे.....लोभ असावा....(खरं तर माणसाला लोभ नसावा....!). प्रेम असावे........ -झेल्या.

वाचने 6313 वाचनखूण प्रतिक्रिया 22

अनिल हटेला 23/12/2008 - 17:05
आयचा घो !! झक मारली आणी सारं वाचलं !! X-( X-( X-( बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

In reply to by अनिल हटेला

झेल्या 23/12/2008 - 17:52
एक नंबर प्रतिक्रिया.... :) झणझणीत ...प्रक्षोभक...आणि....प्रत्स्फूर्त.... आभार...! मी आपल्या भावना समजू शकतो. :) -झेल्या

मॅंगलोरला जायचा प्ल्यान आहे. माहितेय तुला काही? -- माझी प्रियसखी ऐश्वर्या राय मँगलोरची आहे, पण ती आता बच्चन झाल्यामुळे डान्या उर्फ जुन्या मॉनिटरनी तिच्यावर बहिष्कार टाकला आहे. डान्याचं खरं नाव डान्या नाही, पण मला त्याचं खरं नाव माहित नाही. मलाही खरं नाव आहे, पण मी खोटं नावच जास्त वापरते. पण कोणीतरी म्हटलंच आहे, "नावात काय आहे?". तसं कशातच काहीही नसतं आणि दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. फसवणूक हा भारतीय दंडसंविधानानुसार गुन्हा आहे. आणि गुन्ह्याला शिक्षा होतेच. हिंदीमध्ये शिक्षा म्हणजे शिक्षण आणि मी खूप शिकलेली आहे असं लोक म्हणतात. पण लोक तर काहीही म्हणतात आपण त्यांच्याकडे दुर्लक्ष करायचं असं माझे "तिसरी ड" चे पळशीकर मास्तर आम्हाला सांगायचे असं देशमुख आता म्हणतो. पण तो तेव्हा काय म्हणायचा ते तो आता म्हणत नाही. तसं तेव्हा काय म्हणायचे ते कोणीच आता पुन्हा म्हणत नाही. म्हणून तुम्हा सर्वांना माझ्या, माझ्या प्रियसखीच्या, आणि शनि-मंगळ युतीच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा! (आता बास) -- अदितीताई अवखळकर पाटील.

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

झेल्या 24/12/2008 - 10:58
हे (तुमचं) लिखाण थोडंसं वेगळ्या वळणाचं आहे... मी जे लिहिलं आहे त्याला संवेदनांच्या अंतःप्रवाहांची अभिव्यक्ती म्हणता येईल... :) -झेल्या

शंकरराव 23/12/2008 - 17:28
रे तूझ्या ..... 'पोट' हलकं करण्याची गरज एक एरंडेल ची बाट्ली रिकामी कर नाहीतर गोठया त जाउन शेन काढ म्हशी धू '#^@^*&&%^@'

In reply to by शंकरराव

झेल्या 23/12/2008 - 18:01
आपल्या 'स्पेशल' प्रतिक्रियेबद्दल आभार... हा लेख आपल्याला इतका आवडला की आपल्याला प्रतिक्रियेसाठी बाराखडीही कमी पडली.. :) आपण म्हशींचे एजंट्/विक्रेते आहात का? -झेल्या

आम्हाघरीधन 23/12/2008 - 17:30
नव्हे 'असे लिखाण केल्यानेच रेसेशनला बळी पडावे लागले असावे'
दिसणे आणि असने यात एकच अन्तर आहे, 'मनाचा भाव'.

तुम्ही एक दीर्घ श्वास घ्या आणि लेख वाचुन आलेला राग सोडून द्या...... किंवा १ ते १० आकडे मनात मोजा...बरं वाटेल... (१ ते १०० आकडे मोजावे लागलेली) स्मिता श्रीपाद

In reply to by विनायक प्रभू

झेल्या 24/12/2008 - 10:46
काम, काळ, वेग यांचं जर गणित जमलं, तर आयुष्यात मजाच नाही येणार...! -झेल्या

प्राजु 24/12/2008 - 05:17
अगदी समर्पक शिर्षक..!!! - (सर्वव्यापी)प्राजु http://praaju.blogspot.com/

विसुनाना 24/12/2008 - 11:20
'झेल्या' हे नामाभिधान धारण करून हा लेख प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णांनीच येथे अवतीर्ण केलेला दिसतो. जेहत्ते कालाचे ठायी हा लेख म्हणजे प्रत्यक्ष भगवानांच्या वचनांची मौक्तिकमालाच (की वैजयंती माला?) आहे. या वचनांचे अर्थ समजावून घेतल्यास अनन्यशरण भक्ताची नैय्या पार होईल असा विश्वास वाटतो. - १.ती विवेकबुद्धी जागॄत झाली की तुम्ही सारासार विचार करू लागाल. २.पाटी स्वच्छ पुसून कोरी करा. आता या पाटीवर आपल्याला एक चित्र काढायचं आहे. ३.जसेजसे आपण पुढे जातो, आपण तसेतसे का जातो आणि आपण तसेतसेच का जातो याचा अभ्यास करायला हवा. ४.समजलेल्या गोष्टी समजून घेण्याची समज आपणांत होती म्हणून त्या समजल्या. पण न समजलेल्या गोष्टी का समजत नाहीत हे समजून घेतले तर समजदारीचे कृत्य होईल ही समजूत चूक की बरोबर हे समजले पाहिजे. (टीप : कृष्ण भगवानही कालौघात समज, समजूत, समजदारी असे फारसी- उर्दु शब्द वापरू लागले आहेत हे समजून घ्या. शिवाय रेसेशनसारखे यावनी शब्दही त्यांना सहज वापरता येतात. पृथ्वीचा पालनकर्ताच तो. त्याला काय अशक्य आहे?) ५.प्रत्येकाला वेगवेगळं वाटत असतं कारण प्रत्येकाची वाट वेगळी असते. आयुष्यात पुढे पुढे जाण्यासाठी प्रत्येकाला वाट लागंत असते....आणि आयुष्यात पुढे पुढे जाताना प्रत्येकाची वाट लागंत असते...! डोळे मिटून दीर्घ श्वास घेऊन भगवंतांचं नामस्मरण करू या ... श्री हरी... श्री हरी...

वृषाली 24/12/2008 - 12:14
कसं जमतं बुवा तुम्हाला असं लिहायला....... अगदी डोकं बाजुला ठेवुन वाचलं हो..... If u can't be a pencil to write anyone's happiness, then try atleast to be a nice rubber to erase everyone's sorrows!

वेताळ 24/12/2008 - 12:30
डोक्याने वाचु नये वाचल्यानंतर आपले डोके धरण्यासाठी ते शोधावे लागते. म्हणुन प्रथम डोके बाजुला ठेवा व वाचा. =)) वेताळ