मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मौन!

Bhakti · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मन हल्ली अळूमळू झालंय असं उगाच भासतयं .समजतच नाही अस का काटे कोरांटीच्या फुलांशी खेळायला त्याला जमत नाही .एक ओरखडा जरी त्याच्यावर पडला तरी चर्र् आवाज येतो तो देखील सहन होत नाही. भाषेतल्या अक्षर भवर्यात जीव देण्याऐवजी ते अंतरच वाढवत धावतं. संभाषणातला अंतरच मनाचे तीव्र मौन धारण करतात.अंतर्मुखाच्या तळाशी विहारतांना चमचमता ह्या मौनाचा मोती शिंपल्यातून मिळवला जातो. मिटलेल्या गुलाबी ओठांआड,घशात अडकलेल्या शब्दांना कोरड पडते ते मौनाच्या मधात विरघळून जातात. सकाळ- संध्याकाळ मंदिरात होणाऱ्या घंटांचे गुंजराव प्रत्येक नादाला मनाला स्थिर करतात. ही पाखरं ब्रम्ह मुहूर्तावर नवीन दिवसाचं निसर्गाकडून आवतन देतात. अजूनही कोकिळा कुठेतरी संध्याकाळी सुद्धा गाते तेव्हा उगाच मरगळ झटकून संध्येचा घट प्यायला लावते. प्राणायाम मधल्या त्या प्रत्येक श्वासातून एक नवीन नवीन क्षण जन्म घेत राहतो. उन्हाळाची उष्ण हवा ह्रदयावर कंपण तरंग टाकत राहते,थंडीतली हुडहुडी हाडांचा रक्तांचा संवाद घडवते,पावसाच्या सरींनी कर्णमार्गे मेंदूला तृप्ततेत भिजवते. मौनाचा कृष्णविवरं अनंत शक्यतांचे दालन खुले करतो. -भक्ती

वाचने 12349 वाचनखूण प्रतिक्रिया 62

कर्नलतपस्वी Sun, 05/12/2024 - 20:12
मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल दुबळ्या गळक्या झोळीत हा सूर्य कसा झेलावा ? चेहरा-मोहरा ह्याचा कुणि कधी पाहिला नाही धनि अस्तित्वाचा तरिही ह्याच्याविण दुसरा नाही -सुधीर मोघे

In reply to by कर्नलतपस्वी

गवि Sun, 05/12/2024 - 20:54
मन काळोखाची गुंफा मन तेजाचे राऊळ मन सैतानाचा हात मन देवाचे पाऊल. ... या वरच्या दोन ओळी पूर्णत्वासाठी आवश्यक. जरी बाकी कविता मोठी असली तरी.

चित्रगुप्त Mon, 05/13/2024 - 15:44
मौनाचा कृष्णविवर अनंत शक्यतांचे दालन खुले करतो.
-- जबरदस्त. खूपच गहिरं लिखाण आहे भक्तीताई. केवढा मोठा आवाका आहे या लहानश्या मुक्तकाचा. लिहीत रहा. ( तुम्ही जीएंचे साहित्य वाचता का ?)

In reply to by चित्रगुप्त

Bhakti Mon, 05/13/2024 - 19:04
तुम्ही जीएंचे साहित्य वाचता का ?
नाही वाचत, अजून वाचली नाहीत.
मौनाचा कृष्णविवर अनंत शक्यतांचे दालन खुले करतो.
चला सांगतेच आता यांची प्रेरणा.. हा इंटलस्टेलर सिनेमाचा नायक जेव्हा कृष्णविवरात पोहचतो.तेव्हा त्याला जग वाचवायचा उपाय सुचेल असं वाटतं.पण अमर्यादित क्षण दालनं असतात तिथे आणि केवळ एकच धागा त्याची मुलगी,त्याला समजते की मुलीचं त्याचं प्रेमाचं नातं काळाच्या पलीकडे आहे ते कृष्णविवरं त्यांच्यासाठी खुले होतं.

In reply to by Bhakti

गवि Mon, 05/13/2024 - 21:03
पण अमर्यादित क्षण दालनं असतात तिथे आणि केवळ एकच धागा त्याची मुलगी,त्याला समजते की मुलीचं त्याचं प्रेमाचं नातं काळाच्या पलीकडे आहे ते कृष्णविवरं त्यांच्यासाठी खुले होतं.
हे रम...!! S-)

In reply to by प्रचेतस

Bhakti Mon, 05/13/2024 - 21:18
नोलन जेव्हा जेव्हा आठवतो, तेव्हा तेव्हा मी अशीच गुंतागुंतीची वाक्यरचना करते,मान्यवरांनो जस्ट इग्नोर me... ;)

चित्रगुप्त Mon, 05/13/2024 - 19:33
'रमलखुणा' मधे फक्त दोनच कथा आहेत. 'प्रवासी' (५९ पृष्ठे) आणि 'इस्किलार' (९९ पृष्ठे) वेगळ्याच जगात घेऊन जातात या कथा. .

कर्नलतपस्वी Mon, 05/13/2024 - 21:49
चित्रगुप्तांचे काही ऐकू नका. खुप खर्च करवतात. मला पिंगळावेळ वाचायला सांगीतले,आज मला, हिरवे रावे रक्तचंदन काजळमाया रमलखुणा एव्हढी पुस्तके घ्यावी लागली.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Mon, 05/13/2024 - 22:21
खुप खर्च करवतात
हा हा... खर्चाने बरं आठवलं.माझ्या मावशीचे मिस्टर म्हणजे काका लेखक आहेत.त्यांच्याकडे जीएंची सगळी पुस्तकं असणारं.त्यांच्याकडूनच घेते वाचायला.

In reply to by चित्रगुप्त

अहिरावण Tue, 05/14/2024 - 10:07
किंचित सुधारणा - पुस्त्कांबर केलेला खर्च कधीच अनाठायी वाटत नाही. एखादे पुस्तक नाही पटले/आवडले/भावले तर ते पटणारा/आवडणारा/भावणारा दुसरा कुणीतरी असतोच, त्याला देऊन टाकावे.

In reply to by कर्नलतपस्वी

चौकस२१२ Tue, 05/14/2024 - 04:48
जी ए, खानोलकर , श्री ना, दळवी , संत ( कमी पुस्तके) , श ना नवरे यापठडीतील अलीकडचे गेल्या १० वर्षातील कोण लेखक आणि वरील यादीतील अजून कोणी असतील तर ते हि सुचवा

In reply to by चौकस२१२

कर्नलतपस्वी Tue, 05/14/2024 - 06:24
काळ बदललाय त्यामुळे विषय, चव,लेखनशैलीत बराचसा बदल झालेला दिसतोय. रामचंद्र, प्रचेतस, गवी सारखे बहुश्रुत सदस्य सांगू शकतील. मला पण हवी आहेत. सध्या भैरप्पा यांच्या पुस्तकांचे अनुवाद वाचतोय 'आवरण', ओघवती भाषात्यमुळे अनुवादवाटतनाही. ग्रेस वाचतोय पण समजत नाही पण कुठेतरी रजिस्टर होतात. नुकतेच ॲटलस श्रग्ड,अनुवाद मुग्धा कर्णिक भेट मिळालयं,सुरूवात नाही केली. पक्षीदर्शन चालूच आहे ,मुळ निळावंती कुठे मिळेल, माहीत असल्यास जरूर कळवणे.

In reply to by कर्नलतपस्वी

प्रचेतस Tue, 05/14/2024 - 06:47
मी बहुश्रुत नाही मात्र मी वाचलेल्यांत अलीकडच्या काळातील उत्तम लेखक म्हणजे महाबळेश्वर सैल, हृषीकेश गुप्ते, मिलिंद बोकील, शरदचंद्र वाळिंबे. भैरप्पा जवळपास सर्वच पुस्तके संग्रही आहेत. मुग्धा कर्णिक यांचा अनुवाद सुमार दर्जाचा असतो.

In reply to by प्रचेतस

गवि Tue, 05/14/2024 - 08:56
मीही नाही बहुश्रुत किंवा कसलेला वाचक. आणखी एक गंमत आहे. तरुण आणि चालू वाहती ताजी लेखणी असणारे लेखक मराठीत ओसरले असावेत. आता ते आंतरजाला पुरते उरले असतील कदाचित. ते प्रसिद्ध नवीन लेखक असा नामोल्लेख होईपर्यंत साठ वर्षांचे होऊन जातात. वर उल्लेख केलेले मिलिंद बोकील, गुप्ते, खाली उल्लेख आलेल्या सानिया हे भारीच आहेत, इतरही उत्कृष्ट असतील.. पण हे सर्व हल्लीचे म्हणून लिस्ट केले जाणारे लेखक लेखिका देखील किमान पन्नाशी ओलांडलेले आहेत. खरे तर साठ सत्तर वयाचे देखील. मराठीतले गाजलेले एवर ग्रीन लेखक आता ९९ टक्के स्वर्गवासी झालेत.

In reply to by प्रचेतस

अहिरावण Tue, 05/14/2024 - 09:46
>>मुग्धा कर्णिक यांचा अनुवाद सुमार दर्जाचा असतो. जशी व्यक्ती तसे लेखन, अनुवाद. पण अटलासश्रग्ड अनुवाद बराच बरा केला आहे. फाऊंटन हेड मुळात लेखनच भुक्कड त्यामुळे अनुवाद सुमाराहूनसुमार होणार होता. वीस पाने वाचून फेकून दिलं

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण Tue, 05/14/2024 - 10:05
>>>सध्या भैरप्पा यांच्या पुस्तकांचे अनुवाद वाचतोय 'आवरण', डावे या कादंबरीवर फार आगपाखड करत असतात. तसे भैरप्पा ब-याचदा डाव्यांचे टार्गेट असतात.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Tue, 05/14/2024 - 11:24
सध्या योगी कथामृत -परमाहंस योगानंद वाचायला घेतलं आहे.दोन वर्षांपूर्वी मला भेट म्हणून मिळालं होतं.पण पुनर्जन्म वगैरे म्हणून ठेऊन दिलं होतं.खरडफळ्यावर पण सांगितले होतं की म्हातारी झाल्यावर वाचते हे पुस्तक ;) गीता वाचून उमगायला घेतल्यामुळे या पुस्तकाशी आता ट्युनिंग जुळलय.चमत्कार कथा सोडता मन निग्रह मिळवण्यासाठी मस्तच आहे हे पुस्तक!

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Tue, 05/14/2024 - 12:36
वरोबरची गीता आजुन उमजली नाही तर कागदावरची कधी समजणार म्हणून या जन्मी तरी म्हातारा होण्याचा प्लॅन कॅन्सल तेव्हां पुढच्या जन्मात बघू.

In reply to by कर्नलतपस्वी

Bhakti Tue, 05/14/2024 - 14:07
चांगलय पण.. माझा हा मनुष्य म्हणून शेवटचा जन्म असावा ,पुढे मोक्ष! त्यामुळे माझ्यासाठी ह्याच जन्मी समजली पाहिजे.

In reply to by कर्नलतपस्वी

अहिरावण Tue, 05/14/2024 - 14:11
ओ एकदा काय ते ठरवा पुनर्जन्म आहे की नाही ते... https://www.misalpav.com/comment/1176778#comment-1176778 तिथे वेगळे इथे वेगळे असे कसे तुम्ही वागळे... आपलं आगळे..

In reply to by अहिरावण

कर्नलतपस्वी Tue, 05/14/2024 - 19:59
अहिरावण प्रतिसाद आणी परीक्षेचा पेपर यात फरक करा. पहले रचा प्रारब्ध पीछे रचा शरीर, तुलसी चिन्ता क्यों करे भज ले श्री रघुवीर. बाकीच्यांना मिळाला तर मलाही मिळावा.

In reply to by Bhakti

वडगावकर Tue, 05/14/2024 - 18:51
ताई , तुम्ही ते पुस्तक वाचायला निवडलं नाही , त्या पुस्तकाने तुम्हाला निवडलंय. हजारो जणांची आयुष्य बदलुन टाकणारं अप्रतिम पुस्तक, महावतार बाबाजींचा कृपाशिर्वाद

In reply to by अहिरावण

अहिरावण Wed, 05/15/2024 - 10:45
हे वाचल्यानंतर उत्सुकता वाढली तर हे पुस्तक वाचा अध्यात्मिक मार्गावर आपली वाटचाल होणार असेल तर तळमळ वाढेल आणि गुरु तुम्हाला स्वतः शोधेल. उगा कुणालाही गुरु करु नका. आणि तळमळ नाही लागली, तरी निदान एक माहिती म्हणून उपयोग होईल... पुढील जन्मात !!

In reply to by अहिरावण

चित्रगुप्त गुरुवार, 05/16/2024 - 20:13
सुमारे चाळीस वर्षांपूर्वी दिल्लीच्या महाराष्ट्र सूचना केंद्राच्या लायब्ररीतून आणून कोल्हटकरांचे पातंजल योगदर्शन वाचायला घेतले, त्यात पहिल्याच 'अथ योगानुशासनम' या सूत्राचा कोल्हटकरांनी लावलेला अर्थ ( वेदांचे अनुकरण वगैरे ) मला फारसा पटला नव्हता, मात्र त्यामुळे या विषयात खूप रुचि निर्माण होऊन अन्य लेखकांचीही बरीच पुस्तके वाचली.(पैकी एक म्हणजे मंगळावर सूक्ष्मदेहाने जाऊन आलेले 'पाश्चात्त्य विद्याविभूषित' स्वयंघोषित 'ब्रम्हर्षी' - आता त्यांचे नाव विसरलो) त्यापैकी मला सर्वात जास्त अय्यंगारांचे पुस्तक आणि ओशोंची याविषयीची प्रवचने फार भावली. अवघ्या १९६ (की १९७ ?) सूत्रात गगनाला गवसणी घालणारा हा अद्वितीय ग्रंथ आहे. या विषयातचे जेवढे मनन करावे आणि खोलात शिरावे, तेवढे नवनवीन आर्थ उलगडत जातात.

In reply to by अहिरावण

Bhakti Wed, 05/15/2024 - 10:50
ठीक आहे.मी योगी, अध्यात्म महिमा मानते पण... भारतीय संन्यस्त्व निष्क्रिय आहे..(आजच्या युगात तरी) सदर वाक्य मी खुपदा वाचले आहे,वाचत आहे.माझा अर्जुन इथेच अडकला आहे.तेव्हा ह्या अर्जुनाचा विषाद जेव्हा संपेल तेव्हा इतर पुस्तके आनंद देतील असं वाटतं.

In reply to by Bhakti

कर्नलतपस्वी Wed, 05/15/2024 - 12:59
नेमकं काय म्हणायचंय कळले नाही . हल्ली भोंदू,ढोंगी,भगव्या वस्त्रातील अध्यात्माचे दुकानदार खुप आहेत. सक्रीय सन्यस्त व खरा गुरू भेटणे दुरापास्त . म्हणून गुरू न शोधता मार्गक्रमण करत रहावे. मला दोन खरे संन्यासी माहीत आहेत. एक आमचे आजोबा मामा देशपांडे ,दत्तसंप्रदाय मधील शक्तीपात शाखेतले अनुग्रह झालेले व दुसरे पावसाचे स्वामी मकरंदनाथ(श्री मकरंद माधव वझे) लहानपणी वझे कुटुंब आमच्या गल्लीत रहावयास होते. स्वामींना अगदी लहान बघीतले, कदाचित आम्हीं एकत्र खेळलो सुद्धा असेल. असो, वर म्हणल्या प्रमाणे मी गुरू शोधत नाही कारण तेव्हढी माझी क्षमता नाही. आमचे आजोबा जरी अनुग्रहित होते तरी ते माझ्या वाट्याला गेले नाहीत व मी ही कधी त्यांच्या वाट्याला गेलो नाही. भेट मात्र नेहमी व्हायची. मामा देशपांडे म्हणू गुगल केलेत तर सर्व माहीती मिळेल.

कॉमी Mon, 05/13/2024 - 22:09
जी. ए. वाचणार असाल तर चखणा म्हणून प्रफुल्लित करणारे काहीतरी जवळ ठेवा :) अतिशय नैराश्य आणणाऱ्या गोष्टी. त्यातल्या शुद्ध काल्पनिक गोष्टी त्यातल्या त्यात सुसह्य, पण खरया आयुष्यातल्या गोष्टी म्हणजे लैच डेंजर.

In reply to by कॉमी

Bhakti Mon, 05/13/2024 - 22:18
मी फिक्शनल पुस्तकांपासून दूर पळते... कटाक्षाने टाळतं राहते
पण खरया आयुष्यातल्या गोष्टी म्हणजे लैच डेंजर.
या वाक्याने धडकी भरली की ओ ;)

In reply to by कॉमी

चौथा कोनाडा Tue, 05/14/2024 - 12:12
कॉमी, जीएंच्या काही कथा प्रचंड भावल्या तर आणि रंग हाताशी आहे म्हणून फारटे मार, ओतत बस, ओघळ पसरव असे करणारे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्ट मिरवणारे रंगकार यांच्या सारखेच उपमांचा अतिरेक, शब्दांची अनाठायी आतिषबाजी आणि गुढ वर्णने ओतणारे असे जीए मला भासतात ... मग तुम्ही म्हणता तंस चखणा जवळ ठेवावाच लागतो !

In reply to by चौथा कोनाडा

चौकस२१२ Tue, 05/14/2024 - 12:29
चौथा कोनाडा बऱयापैकी सहमत... जी ए कधी कधी क्लिष्ट वाटतात मानवी दुःख / हताशपणा/ किळसवाने स्वभाव / कारुण्य हे दळवीनच्या आणि खानोलकरांच्या लेखांत हि आहे आणि ते समजायला जास्त सुलभ वाटते म्हणून जास्त भावते आणि म्हणूनच कदाचित त्याला जास्त प्रसिद्धी मिळाली जनमाणसातून ,विशेषतः दळवी , खानोलकर अजून जगते तर अजून लिहिणे झाले असते !

चित्रगुप्त Mon, 05/13/2024 - 23:30
जीए वाचाल तेंव्हा कळेल की आजवर जे वाचले, ते किती *** होते ते. * च्या जागी तुम्हाला काय वाटले ते वाचल्यावर सांगा. ('रमलखुणा'तील दोन्ही कथा पूर्ण काल्पनिक आहेत)

मला वाचायला काही पुस्तके सुचवा. जीवनाचे सार, दावनीय, किंवा कथा अस काहीही नको. माहितीपर पुस्तके हवीत, मिडल इस्ट, तिथला इतिहास, इजिप्त, , संशोधन, इस्लामिक सत्ता, उमैय्यद खिलाफत, अब्बासीद खिलाफत, तिथल्या लढाया, वगैरे असे.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

प्रचेतस Tue, 05/14/2024 - 13:13
मिडल इस्ट संदर्भात गिरिश कुबेरांची एका तेलियाने, हा तेल नावाचा इतिहास आहे, अधर्मयुद्ध ही तीन पुस्तके वाचनीय आहेत. तर इस्लामचा इतिहास आणि त्या नंतरचे पहिल्या चार खलिफांचा इतिहास वाचण्यासाठी शेषराव मोरे यांचे मुस्लिम मनाचा शोध आणि चार आदर्श खलिफा ह्यांसारखी उत्कृष्ट, अस्सल आणि माहितीपूर्ण अशी दुसरी पुस्तके नाहीत.

In reply to by अमरेंद्र बाहुबली

Bhakti Tue, 05/14/2024 - 14:03
इरावती कर्वे यांचे समाजशास्त्राची पुस्तके उत्तम आहे,मी तर म्हणते वय १६-१८ मध्येच वाचायला पाहिजे. https://epustakalay.com/book/186065-maraathii-lokaanchii-sanskriti-by-iravati-karve/ इथे मराठी लोकांची संस्कृती पुस्तक पीडीएफ आहे. बाकी ओनलाइन वाचता येत नसल्याने विकत घेण्याचा मानस आहे.

In reply to by श्वेता व्यास

हो. हुप्प्या ह्यांच. आणखी कुठे लेखमाला आहे का? माबो मीपा ऐसी? किंवा प्रवासवर्णनात उल्लेख? जसे बिपीन कार्यकर्ते ह्यांचे मेज़ खोबार?

In reply to by अमरेंद्र बाहुबली

कंजूस Tue, 05/14/2024 - 18:52
अशी पुस्तके वाचनालयात बरीच आहेत.
मिडल इस्ट, तिथला इतिहास, इजिप्त, , संशोधन, इस्लामिक सत्ता, उमैय्यद खिलाफत, अब्बासीद खिलाफत, तिथल्या लढाया, वगैरे असे.
पण ती मी घेत नाही. तोचतोचपणा आला आहे. त्यांचा गोषवारा पाच दहा ओळीत सांगता येईल. ' Aljazeera world' documentary पाहा.

In reply to by कंजूस

मागे निळूदामले ह्यांचे सीरिया सगळे विरुद्ध सगळे वाचले. त्यामुळे इंट्रेस्ट वाढलाय.