मराठी आणि महाराष्ट्राशी तेलुगूचा संबंध
मराठीत संस्कृतनंतर सर्वाधिक शब्द कन्नडमधून आले आहेत. 'मराठीने केला कानडी भ्रतार' अशा म्हणी यातून मराठी भाषेचा कन्नडशी घनिष्ठ संबंध असल्याचे दिसले आहेच पण महाराष्ट्राला लागून तेलुगूभाषिक तेलंगण राज्यसुद्धा आहे. कर्नाटकाप्रमाणेच तेलंगणचाही मोठा सीमावर्ती भाग महाराष्ट्राला चिकटून आहे.
तेलुगूचा प्रभाव आज जरी मराठीवर तितकासा नसला तरी राजस्थान,गुजरातमधून महाराष्ट्रात १५/१६ व्या शतकात मोठ्या प्रमाणात स्थलांतर होण्यापूर्वी तेलुगूचा प्रभाव बर्यापैकी असावा. तेलुगू भाषा ही उकारान्त शब्दांची आहे. ही पद्धत मराठीतही पूर्वी होती. अगदी उदाहरणच हवे असेल तर संत ज्ञानेश्वरांच्या काही रचना पाहू शकता. दिनु , घनु ,वेलु असे उकारान्त शब्द भरपूर आहेत. काही वेळा क्रियापदेदेखील उकारान्त आली आहेत. आपण बर्याचदा बोली मराठीला लिखित स्वरुपात दर्शवताना क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरावर जोर दर्शवण्यासाठी त्यावर टिंब देतो(अनुस्वार नव्हे) उदा. होते~होतं , घडते~घडतं इ. ही टिंब दिलेली अक्षरे मुळची उकारान्त आहेत. म्हणजे होतु , घडतु अशी. हा तेलुगूचा प्रभाव. नंतर हा उकार गळून फक्त जोर राहिला.
तेलुगूमधले एक संबोधन 'गारु' जसे की अण्णय्यागारु , सीतारामय्यागारु इ. हे मराठीत पूर्वी ग्रामीण भागात प्रचलित होते. जसे की 'काय गा काय म्हंतोस?' 'कुटं गा निगालास?' यातला गा हा गारुचा प्रभाव आहे.
नाल , टाळे , तूप , गदारोळ , जाडी , शिकेकाई , अनारसा , गजगा , ताळा हे शब्द तेलुगूमधून मराठीत आले आहेत.
इ.स. १३०० मधे तेलुगू भाषेत 'पंडिताराध्य चरित्र' या नावाचा ग्रंथ लिहिलेला आढळतो. या ग्रंथात काही मराठी गाणी आहेत.
पेशव्यांच्या काळात बरेचसे ब्राह्मण हे सैन्य , राज्यकारभार इथे कामी आले. त्यामुळे मंदिरांतील पुजाअर्चा, होमहवन,पौरोहित्यासाठी ब्राह्मण कमी पडू लागले. त्यामुळे तेलंगणमधून बरेचसे ब्राह्मण महाराष्ट्रात आणावे लागले किंवा आले. तेलंग , वर्तक अशा आडनावांचे ब्राह्मण मुळचे तेलुगूभाषिक पण महाराष्ट्रात आल्यानंतर ते मराठी देशस्थ ब्राह्मणांमधे सामावून गेले. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचे मुख्य पुजारी मुनीश्वर हे सुद्धा मुळचे तेलंगणातीलच. साधारण ७०० वर्षांपूर्वी ते महाराष्ट्रात आले.
सोलापूर हा महाराष्ट्रातील तेलुगू लोक भरपूर संख्येने असणारा जिल्हा. तेलुगूभाषिक विणकर पद्मशाली समाज महाराष्ट्रात परिचित आहे. हे लोक घरात तेलुगू तर बाहेर मराठीत बोलतात.
जाताजाता सोलापूरबद्दलचे एक तेलुगू सिनेगीत.
https://youtu.be/jda6tZ1dl-k
वाचने
7353
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
जसे, दादा, राव, भाऊ, सर यात नात्यापेक्षा आदर दर्शवणे यासाठी वापर होतो तसेच गारु हा शब्द आदरदायक असल्याने
कुटं गा निगालास? याच्याशी मेळ खात नाही.
बाकी अनेक मराठी शब्द व तेलगू शब्द समान वाटतात/आहेत याच्याशी सहमत
In reply to गारु हा शब्द सम्मानजनक आहे by गॉडजिला
तो आदरयुक्त आहे. महाराष्ट्रात समवयस्क मित्राशी बोलतानाचे संबोधन बनले.
In reply to तेलंगण किंवा आंध्रात by उपयोजक
गारु हा शब्द वयाच्या पलीकडे आदरयुक्त आहे तो समवयस्क व्यक्तीही हि वापरतात हा शब्द मी तेलगू फिल्मफेअरच्या व्यासपिठावर प्रथम ऐकला.
तेलंगण किंवा आंध्रात तो आदरयुक्त आहे. महाराष्ट्रात समवयस्क मित्राशी बोलतानाचे संबोधन बनलेहे माहीत न्हवते
पंढरपुराचं मूळ नाव तेलगूतून आलेलं पंड्रिकपूर आहे ना? आणि दर्शनासाठी कानडी आणि तेलगू लोक खूप असतात.
या विषयावर भरपूर प्रकाश टाकू शकणारा आइडी म्हणजे 'अभ्या'( लघुकथाकार आणि ब्यानरकार). पण तो सध्या फिरकत नाही.
लेख आवडला, उपयोजक.
सविस्तर नंतर, सध्या रूमाऽलु टाकून ठेवतो!
एका भाषेतून दुसऱ्या भाषेत शब्द जाणे ही एक निरंतर व हळूहळू होणारी प्रक्रिया आहे अस वाटते. त्यामुळे भाषेचा अभिमान वगैरे गोष्टी तितक्याशा आपिलिंग नाही वाटत. 300 वर्षांपूर्वीचं मराठी आपण सहजपणे वाचूपण शकणार नाही असं वाटते. सेम 300 वर्षांनंतरच्या बाबतीतही होईल असं वाटतंय.
बाकी लेख आवडला.
छोटेखानी साम्यदर्शन आवडले हो.
भाषा हा जोडणारा दुवा तर आहेच - भोजनसुद्धा आहे. विशेषतः मराठवाडा - विदर्भातल्या तेलंगणाला जोडून असलेल्या भागात.
स्वगत - सगळा जीव खाण्यात :-)
माहितीपुर्ण धागा !
👍
क्रियापदाच्या शेवटच्या अक्षरावर जोर दर्शवण्यासाठी त्यावर टिंब देतो(अनुस्वार नव्हे) उदा. होते~होतं , घडते~घडतं इ. ही टिंब दिलेली अक्षरे मुळची उकारान्त आहेत. म्हणजे होतु , घडतु अशी. हा तेलुगूचा प्रभाव.
हे पहिल्यांदाच वाचण्यात आलं. फार पटलं नाही. कारण पटल आणि पटलं मध्ये "पटलं" च्या ल वर अनुस्वार असल्यासारखा उच्चार करतो आपण.
ही टिंब दिलेली अक्षरे मुळची उकारान्त आहेत. म्हणजे होतु , घडतु अशी.
हा उकारान्त तेथील प्रादेशिक उच्चारविशेष आहे, जसा कन्नडमध्ये आकारान्त (उदा. रामनगर चे रामनगरा) माहितीपुर्ण लेख . हैदराबादमधील कोटी परिसरात मराठी भाषिकांचे अस्तित्व जाणवते . हैदराबादजवळील नारायणपेट या गावामधेही बरेच मराठी भाषिक आहेत .
In reply to माहितीपुर्ण लेख . by सिरुसेरि
एक आठवण
१९३१ सालचं अखिल भारतीय साहित्य संमेलन हैद्राबाद येथे श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या अध्यक्षतेखाली झालं होतं.
मला तेलूगू भाषा शिकायची आहे.तेव्हा मी भरपूर ग्रुपला जोडलेली आहे.आणि ह्या माझ्या ओनलाइन गूरू डॉ.दीपा गुप्ता गारु https://youtu.be/Gt12OWIJ2KY
https://youtu.be/p-RfJefHYzY
ह्या गाण्यामुळे सगळे तेलगु मित्र सोलापूर चप्पल बद्दल बोलतात आणि त्यांना सांगावे लागते कोल्हापुरी चप्पल प्रसिद्ध आहे.
रच्याकने मस्त लेख.
तेलगू लोकात प्रसिद्ध असलेली गंगुरा (मराठीत अंबाडी) भाजी महाराष्ट्रात तेवढी प्रिय नाही.
In reply to रच्याकने मस्त लेख. by राघवेंद्र
कोणे एके काळी सोलापूर चप्पल देखील खुप प्रसिद्ध असणार. जुन्या जाणत्या लोकांना विचारायला हवे.
( अभ्याशेठ सोलापूरकर याची माहिती काढू शकतील)
पंढरपूरचा तंबाखू, तपाकिर आणि उदबत्ती व्यवसाय कोणे एके काळी संपूर्ण देशभर प्रसिद्ध होता.
छान . मी हैदराबादला असताना , तेथील घरमालकाने मला आठवणीने सोलापुरची शेंगदाणा चटणी आणण्याची फर्माईश केली होती .
माझे काही सहकारी तेलुगू भाषिक होते, त्यांच्या आपापसातल्या बोलण्यात 'चेपेन्डी' हा शब्द वारंवार यायचा. त्याचा अर्थ बहुतेक "बोल" असा होत असावा असा अंदाज आहे. ज्ञानी गारूंनी ह्यावर प्रकाश पाडावा.
गारु हा शब्द सम्मानजनक आहे