Skip to main content

ॐभवति! डोसां देहि!

ॐभवति! डोसां देहि!

Published on 16/03/2021 - 11:44 प्रकाशित मुखपृष्ठ
भुकेवरुन आणखी एक गंमत आठवली. एम.ए.नंतर मला जर्नालिझम करायचं होतं. त्याकाळी प्रत्येक घरात फोन नसायचा. आमच्याही घरी नव्हता. माझं वर्षापूर्वीच लग्न झालं होतं. त्यामुळे मैत्रीणींचाही संपर्क राहिला नव्हता. मला जर्नालिझमची माहिती काढायची होती. प्रवेशाची प्रोसिजर समजावून घ्यायची होती. पण कशी घेणार? त्यावेळी मोबाईल, गुगल वगैरे काही नव्हतं. व्होकेशनल गायडन्सचे कोर्सेस कधी सुरू व्हायचे, कधी संपायचे कळायचं नाही. मी एका निमशहरातून पुण्यासारख्या शहरात एखाद वर्षापूर्वी आले होते. अजूनही घराबाहेर पडलं की बावचळल्यासारखं व्हायचं. जर्नालिझमची इन्स्टिट्यूट कुठं आहे हे माहीत होतं. एप्रिल महिना. मी एकेदिवशी नवऱ्याला म्हटलं,"मी आज जाते, चौकशी करते. "तो म्हणाला,"जा.तिथं जवळच वैशालीत स्पेशल डोसा मिळतो. तो खाऊन ये. मी पण कामावर जातो. आज डबा नको. मी वाटेतच खाईन. तू पळ आता. आल्यावर भेटूच." माझ्या हातच्या जेवणापासून सुटका झाल्याचा आनंद त्याच्या स्वरात जाणवत होता. तेव्हा नऊ वाजले होते. मी बसनं डेक्कनला गेले. इन्स्टिट्यूटजवळ पोचले. भूक लागली होती. म्हटलं, डोसा खाऊन मग इन्स्टिट्यूटमधे आत जाऊ. पण मनात आलं, नको,आधी चौकशी करु आणि मग आरामात डोसा खाऊ. मग इन्स्टिट्यूटला गेले. तिथं कळलं की आजच प्रवेश देणार आहेत. आजच रिटन आहे. इंटरव्ह्यूज आहेत. तिथला क्लार्क मला म्हणाला,"हा अर्ज पटकन भरा. मी सबमिट करुन घेतो. तुमची सर्टिफिकेटस् दाखवा." मी बरोबर नेलेली सर्टिफिकेटस् दाखवली. अर्ज सबमिट केला. अर्ध्या तासात रिटन होती. मी तिथले काही न्यूजपेपर्स वाचले. रोजचा पेपर मी वाचायचीच. रेडिओ वरच्या बातम्या ऐकायचीच. त्यामुळे चालू घटनांचं ज्ञान मला होतं. अर्थात तेव्हा आमच्याकडे टीव्ही नव्हता. एकूण टीव्ही फारसा प्रचलितही नव्हता. मी रिटनला बसले. पोटात भुकेचा आगडोंब उसळला होता. मी सहज चौकशी करायला आले होते. मला काय माहीत की आजच प्रवेश देणार आहेत. मी रिटन दिली. रिटन चांगली झाली. रिटन संपल्यावर काही खावं म्हटलं तर तिथल्या सुपरवायझरनं सांगितले की, लगेचच पेपर तपासून ,पास झालेल्यांचे इंटरव्ह्यूज घेणार आहेत. मी वाट पाहत बसले. मनावर ताण आला होता. तिथं आलेल्यांपैकी एक-दोन जणींशी ओळख झाली. काय विचारतील यावर गप्पा मारत बसलो. भुकेनं चक्कर येणार असं वाटलं. "आरामात" डोसा खाण्याची शक्यता आणखी डळमळीत झाली होती. बरोबर नेलेलं पाणी प्यायले. पर्समध्ये एक वितळून मऊ पडलेलं चाॅकलेट होतं. ते तोंडात ठेवलं. तेवढ्यात गलका झाला,"लिस्ट लागली. लिस्ट लागली." मी नोटीस बोर्डसमोरच्या गर्दीत सामील झाले. मी रिटनमध्ये पास झाले होते. इंटरव्ह्यूजच्या यादीत माझं नाव होतं. मला आनंद झाला. भुकेची उफाळून येणारी जाणीव दाबून ठेवत मी लायनीत बसून राहिले. कल्पनेतला वैशाली डोसा पुन्हा पुन्हा आठवत होता. आता गर्दी कमी झाली होती. रिटनमध्ये नापास झालेले घरी निघून गेले होते. लायनीतल्या प्रत्येकाला पंधरा ते वीस मिनिटे लागत होती. दुपारचे तीन वाजले होते. भुकेनं मी व्याकुळ झाले होते. बरोबर नेलेल्या बाटलीतलं पाणीही संपलं होतं. मनातला कुरकुरीत डोसा मऊ पडला होता. सांबार थंड झालं होतं. किमान कुठंतरी पटकन पाणी शोधायला जावं म्हटलं तरी वाटत होतं, तेवढ्यात आपलं नाव पुकारले तर! कोणत्याही उमेदवाराची सनातन भीती असते ती. मी तशीच सुकलेल्या ओठांवरुन जीभ फिरवत बसून राहिले. माझा नंबर आला. मी आत गेले. चेहरा घामेजलेला, सुकलेला, घाबरलेला. मी इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर्ड होते की नव्हते? कळेना. मला आत्मविश्वास नव्हता. इंटरव्ह्यू एकदाचा झाला. चक्क समाधानकारक झाला. मी माझ्यामते नीट उत्तरं दिली. तत्कालीन राजकीय घडामोडींचं मला माझ्यामते अचूक ज्ञान होतं. सगळं काम फास्ट चालू होतं. मी इंटरव्ह्यूतही पास झाले. वीस मिनिटात सिलेक्टेड कॅंडीडेटसची लिस्ट लागली. तीत माझं नाव होतं. मला परमानंद झाला. आठ दिवसांत ॲडमिशनचे पैसे भरायचे होते. मी बाहेर आले. संध्याकाळचे साडेपाच वाजले होते. वैशाली समोरच होतं. ..... ..पण मी डोसा खायला गेले नाही. घरातून सकाळी बाहेर पडलेली मी अजूनही घरी आले नाही म्हणून नवरा काळजी करत असेल या विचाराने रिक्षानं तडक घरी गेले. ..हात्तेच्या.. घराला कुलूप होतं. नवरा अजून आलाच नव्हता. मी कुलूप काढलं . आणि गेले. आतडं पिळवटून टाकणारी भूक पोटात घेऊन काॅटवर पडले. पोटात एकाच वेळी भूक आणि एसिड झालं होतं. पण मला खूप आनंदही झाला होता. मला ॲडमिशन मिळाली होती. माझं स्वप्न पुरं होणार होतं. मी पत्रकार होणार होते. पुढे चहा आणि वडापाववर दिवसरात्र बाह्यध्वनिमुद्रण, रेकॉर्डिंग, डबिंग, रिपोर्टिंग करावं लागणार असल्याची ती चुणूक होती. त्या संध्याकाळी घरात दूध, गूळ, पोहे कालवून खाताना मी माझ्या करियरचीच स्वप्नं रंगवत होते...

याद्या 22870
प्रतिक्रिया 63

In reply to by प्रचेतस

काय हि भिकार लक्षणं. मस्त वैशाली ला जायचे, येणारे जाणारे हिरवे गालिचे अनुभवायचे, फर्ग्यूसन रोड वर पाखरे बघत उभे रहायचे... कोणत्याही वेळा कोणताही दिवस गुलाबीच... मास्टर्स पुण्यातून केले तरी त्या आधी डिग्री पुण्याबाहेरून केलेली होती. पण असाच क्लास टिळक रोड ला लावला होता. तो झाला कि रोज चालत वैशालीत, मग काय कॉफी.. मित्र.. गप्पा टाईमपास... कधी मैत्रिणी सोबत फिरणे.. कधी हिरवळीत सामावून जाणे.. वा काय दिवस होते.. ते जाऊदे, आता गेल्या रविवारीच फर्ग्यूसन रोड ला गेलो होतो. वाडेश्वर ला पण गेलेलो. लहान पणीचा मित्र आलेला. त्याला माहोल बघुन मी म्हणालो.. आपल्या कॉलेजचे दिवस चांगले होते, पण आपण १०-१५ वर्ष उशिराने जन्मलो असतो तर भारी झाले असते, आपल्या कॉलेजच्या वेळेस असे बिनधास्त राहने मुलींना अवघड जात असे.. आपल्याला हि निर्लज्ज असलो तरी संकोच होताच..मोबाईल नव्हते कोणाकडे.. फोटो तर लांबची गोष्ट.. . . आणि तू काय मी अजून गेलो नाही हे मिरवतोय? आपण आता लवकरच तिकडे जावू..

In reply to by गणेशा

वैशाली म्हणजे, पांढरपेशा रोमियोंचे ठिकाण.... हे म्हणजे दाखवायला डोसा आणि मनांत मदालसा... इतकी पदरमोड करण्यापेक्षा, डोंबोलीच्या, फडके रोड आणि मानपाडा रोड वर, चक्कर मारणेच उत्तम.... आता, आमची मुले पण तेच करतात...

In reply to by मुक्त विहारि

प्रत्येकाचे वेगळे असते.. माझे एकच म्हणने आहे माणसाने रंगेल नसले तरी चालेल , पण त्याचे आयुष्य रंगीतच पाहिजे.. नाहीतर ब्लॅक अँड व्हाईट आयुष्याला काडीचा अर्थ नाही.. - गणेशा

In reply to by मुक्त विहारि

हे तुम्हाला वाटते.. आम्हाला तेथे नेत्रसुख घेता घेता मित्रांसोबत गप्पा ही मारता येतात, डोसा.. कॉफी खाता पिता येतो .. आणि यात ताकाला जाऊन, भांडे लपवणे कुठे आले..? सरळ तर आहे, मुली, हिरवळ पहायची म्हणुन तेथे मस्त कॉफी पीत वेळ घालवायचा.. यात कसले कोणी काय लपवले ? काय तुम्ही कुठला मुद्दा कुठे न्हेताय ? प्लीज काही गोष्टी मज्जा म्हणुन घ्या.. कोणी असे स्पष्ट बोलले की लगेच ताकाला जावुन फलाना ची गरज काय ? आणी तसे नसेल तर ... मग तुम्ही सांगितलेल्या डोंबीवली मधील त्या रोड वर काय बुधवार पेठ वसली आहे काय ? की तेथे फक्त त्यासाठीच जातात लोकं .. काय पण उगाच.. हा धागा वेगळा आहे, त्यामुळे थांबतो येथेच ...

In reply to by गणेशा

कारण काय देतात तर, वैशालीत म्हणे उत्तम, साॅरी जगांत भारी डोसा मिळतो.... तुम्ही अजून फडके रोडवरची चक्कर टाकलेली दिसत नाही...कारण, फडके रोड, निव्वळ तरुणाईचा रोड आहे.... वासनांध माणसांसाठी नाही...त्यामुळे, फडके रोडची आणि बुधवार पेठेची तुलना होउच शकत नाही...

In reply to by मुक्त विहारि

फडके रोड, निव्वळ तरुणाईचा रोड आहे
तुम्ही Comparison का करताय मग. म्हणजे तुमच्या येथे स्वस्त आणि तरुणाई बघत खाता येते तर ते नाही का ताकाला जावुन भांडे लपवणे ? म्हणजे आम्ही लिहिले की पांढरपेशी रोमिओ ? अहो जरा विचार चांगला करा.. जगात भारी डोसा कोण म्हणत असेल तर त्याची वयक्तीक चव असेलही.. मला तुम्ही बोलताय तेंव्हा मी कुठे तसे बोललो ते सांगता का ? पहिल्या पासुन स्पष्ट लिहिले आहे.. खालीच आता तुम्ही वल्लीला लिहिले की त्या पेक्शा तुम्ही डोंबिवलीला या.. असेल ते ही भारी.. पण पुण्याहुन डोंबिवलीला डोसा खायला यायला स्वस्त कसे पडेल ?.. की उगाच आपली डोंबिवली ची री ओढायची ... तुम्ही मी वल्ल्लीला प्रेमपुर्वक मैत्रीच्या नात्याने लिहिलेले कुठल्या कुठे ओढत न्हेले आहे.. प्रत्येक गोष्ट डोंबिवली ..असेल ती भारी मी का नावे ठेवु .. पण जरा दुसर्‍याचे काय म्हणने होते ते तरी पहा ..की उगाच डोंबिवली डाँबिवली ...

In reply to by मुक्त विहारि

तुम्ही जगाचे ऐकून मला का सांगताय.. या धाग्यात मी आणि सुबोध खरे यांनी वैशाली बद्दल लिहिलेले आहे, दोन्ही मध्ये सेम विचार मांडलेत..त्यात कुठे काय लपवले आहे? आणि कुठे आढे वेढे घेतलेत? मग पांढर पेशी रोमियो आलेच कुठून? यात तुम्ही काय राव उगाच ताक, भांडे, मखलाशी (शी.. कसला घाण शब्द आहे ), असले लावले आहे? आणि एखाद्याला खरेच डोसा किंवा कॉफी तेथील भारी वाटत असेल तर ते त्याचे मत असेल, तुम्हाला आवडते तेच आणि तिथेच त्याला आवडले पाहिजे असे काही नाही.. असो...

In reply to by प्रचेतस

डोंबिवली येथे, फडके रोडवर चक्कर मारू या... स्वस्त आणि उत्तम, अप्पम खाताखाता, हिरवळ बघू शकता... बाय द वे, डोंबिवलीत सर्वोत्तम अप्पम, आता मिळत नाहीत, अन्नपूर्णा बंद झाले...

In reply to by मुक्त विहारि

बोडस मंगल कार्यालाजवळच मावसबहीण राहते त्यामुळे फडके रोड माहिती आहेच, एवढासा टीचभर लांबीचा रस्ता तो, त्याचे काय कौतुक, आमचे पुणेच बरे आम्हास :)

In reply to by प्रचेतस

या एकदा .... (आता, या लेण्याद्री व्यक्तीला, दर्पणसुंदरीतच रस असेल तर? कठीण आहे....) ताक..... आपण वेरुळलाच जाऊ....

In reply to by गणेशा

गणेशा 2 वर्षे मॉडर्न कॉलेजमध्ये असल्याने जंगली महाराज,फर्ग्युसन रस्ता, डेक्कन इकडे पडीक असायचो. नेत्रसुख भरपूर मिळायचे पण बोलणे शुन्य. कधी एखाद्या मुलीने अमुक तमुक बस गेली का, केमिस्ट्री जर्नल न्यायचे आहे का इतके जरी विचारले तरी दिवसभर मनावर मोरपीस फिरत राहायचे. पॉकेटमनी हा प्रकार नसल्याने जोशी, सद्गुरू वडापाव, ममता समोसा / कचोरी हे 1 ते 5 रुपयांमध्ये मिळणारे पदार्थच खायचो. चैनीची परमावधी म्हणजे संभाजी बागेत भेळ, रगडा पॅटिस खाणे (ते पण मित्रांबरोबरच, हाय रे माझ्या कर्मा) नंतर पैसे मिळवायला लागल्यावर सुरभी, सुभद्रा, शिवसागर, मथुरा, खैबर, पांचाली, अपाचे, हॉर्न ओके, याना सिझलर्स, गुडलक, वाडेश्वर ते बार्बेक्यू नेशन सगळे झाले पण वैशाली, रुपाली राहिले ते राहिलेच.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

आजी, कृपया तुमच्या धाग्यावर अश्या वेगळ्याच प्रतिक्रिया नको असे वाटले होते, पण ओघाने बोलणे येतेच तर समजुन घ्यावे. नाहि आवडले तर मिपा प्रशासनाला उडवायला सांगु.. अवांतर : सौदाळा , (तुमचे वय माहित नाही, तरी लिहितो). तो काळ तसाच होता, कोणी तरी आवडीच्या मुलीने फक्त वही मागितली किंवा दिली तरी मनात मोरपिस फिरत रहावे असेच.. त्या त्या काळातील घटनांना आत्ताचे अस्तर लावताच येणे शक्य नाही.. वडापाव खाताना ही होणार्‍या चर्चा यात स्वर्गीय आनंद होता.. मी तर डिग्री ला भटाच्या कँटीन ला पडीक असे. वैशाली, रुपाली हि फक्त प्रतिके आहेत , तासन तास गप्पा मारत बसणॅ हे खरे सुख... आणि एक साण्गतो, पैसे आलेत ना, तेंव्हा बिंधास्त जगा.. पहिल्या गोष्टी राहिल्या असतील तर त्या करा.. या सारखा आनद नाही..जा वैशाली ला .. रस्त्यावरती उनाड फिरा .. कोणी अडवलेले नसतेच ..आपणाच मन मारत जगतो बर्याचदा मी बायको बरोबर वैशाली ला गेलो तरी इतर पोरीच पाहतो :-) यात ही मज्जा असते.. माणसाने दिलखुलास असावे आणि बिंधास्त रहावे.. आनंद आपोआप मिळतो.. (जास्त लिहिता येत नाहीये.. मी माझ्या शब्द मोती वर घेतो लिहायला लवकरच हे सारे ... )

In reply to by गणेशा

मी बायको बरोबर वैशाली ला गेलो तरी इतर पोरीच पाहतो :-)
माझ्याबाबतीत तर मी व बायको आम्ही दोघेही पोरी पाहतो. ;) ह्यावरुनच मी तेव्हा तू मला फार फार आवडतेस ह्या मालिकेतल्या कविता सुचल्या होत्या.

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

जोशी, ममता, सदगुरु एकदम भारीच होते जंगली महाराज रस्त्यावर, पण समोसा, कचोरी सर्वोत्कृष्ट मिळत ते आप्पा बळवंत चौकातल्या रतन मिठाईवाल्याकडे. रतन बंद होऊन जवळपास १५ वर्ष उलटली असावीत, आता त्याच्या थोड्याफार जवळ जाणारी चव शिवाजीनगर एसटी स्टँडसमोर असलेल्या स्वागतमध्ये मिळते, पण रतन ते रतनच.

In reply to by प्रचेतस

आता त्याच्या थोड्याफार जवळ जाणारी चव शिवाजीनगर एसटी स्टँडसमोर असलेल्या स्वागतमध्ये मिळते हो पुण्यात आल्यावर भुकेचा तडाखा इथेच शांत व्हायचा बराच वेळी.. मस्तच आहे चव!!

व्वा, भारी लिहिलंय आजी. +१ वाचताना शेवटी शेवटी आमच्या ही पोटात आग पडायला सुरुवात झाली. आमचे पुणे कोर्टातील एक एफिडेव्हीट प्रकरण आठवले. संध्याकाळी ६ सहा पर्यंत असाच तंगलो होतो, तो दिवस विसरू शकत नाही !

माझे 2-3 इंटरव्यू असेच झाले होते.... -------------- खरं तर, वैशालीतला डोसा खाल्ला नाहीत, म्हणून तर प्रवेश मिळाला.... मी पुण्यातल्या माणसांना, आधी एक प्रश्र्न विचारतो, तुम्हाला, "वैशालीतला डोसा आवडतो का?" होकारार्थी उत्तर आले की, त्या घरांत पाऊल टाकत नाही.

मस्त लेख, याचाच पुढचा भाग पण लिहा ही विनंती. बाह्यध्वनिमुद्रण, रेकॉर्डिंग, डबिंग, रिपोर्टिंग याबद्दल पण जरूर लिहा.

वैशाली वैशाली कीर्ती ऐकून खास गेलो बघायला एकदा. पण ते वेटिंग, रांगा आणि आपल्याला कशीबशी जागा मिळाल्यावर मागे वाट पाहत असलेल्या लोकांच्या नजरा टाळत डोसा आणि एस्बीडिपी गिळणे यामुळे ती जागा एन्जॉय करता आली नाही, आणि चव पाहता त्या गाजावाजाच्या मानाने जागा ओव्हररेटेड वाटली. कदाचित अनेकांच्या जुन्या मेमरीजमुळे त्यांना ती अधिक आवडत असेल. भले भले लोकही पूर्वी तिथे कट्टा जमवत असे ऐकले आहे. मिपा कट्टा मात्र झाला नसावा (चुभूद्याघ्या).

In reply to by गवि

पण ते वेटिंग, रांगा आणि आपल्याला कशीबशी जागा मिळाल्यावर मागे वाट पाहत असलेल्या लोकांच्या नजरा टाळत डोसा आणि एस्बीडिपी गिळणे आणि मिपा कट्टा या दोन विरुद्धार्थी गोष्टी आहेत! वैशाली/रुपाली/वाडेश्वरात मिपा कट्टा होणे शक्य नाही!

In reply to by तुषार काळभोर

वैशाली/रुपाली/वाडेश्वरात मिपा कट्टा होणे शक्य नाही!
अगदी अगदी. गंधर्व, पांचाली, दिल्ली किचन अशा ठिकाणी मात्र बरेच झालेत.

In reply to by गवि

चव उत्तम असेल तर, बाकी गोष्टी Adjust करतोच की पण, श्रीखंडाच्या पाण्याला, पियुष, कसे काय म्हणतात?

In reply to by तुषार काळभोर

हा पुरूषांनी खायचा पदार्थ नाही... माझ्या एका जीवलग मित्राने हा पदार्थ, मागवला आणि बरोबर चिंचेची चटणी.... त्या दिवसा नंतर मैत्री तोडली... कुणी काय खावे, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्र्न आहे... पण असे पदार्थ खाणारा, आमच्या बरोबर मैत्री करू शकत नाही...

In reply to by गवि

गवि वैशाली हे कधीच तेथे मिळणाऱ्या खाद्यपदार्थांच्या चवी साठी प्रसिद्ध नव्हतं तर तेथे फुलणाऱ्या ताटव्या साठी प्रसिद्ध होतं. वैशालीच्या बागेत बसून येणाऱ्या जाणाऱ्या फुलपाखरांना न्याहाळणं हे उद्योग आम्ही एम बी बी एस ला असताना फार केले आहेत. राष्ट्रपती अंगरक्षक दलात असलेला एक आमचा मित्र मेजर नंदकुमार हा एन डी ए मध्ये प्रशिक्षक होता. संध्याकाळी सहा पासून रात्री वैशाली बंद होई पर्यंत आम्ही तेथे बसून असायचो. वेटर येऊन अजून काय हवं आहे विचारलं कि अजून कोणत्यातरी पदार्थाची ऑर्डर देत असू आणि तो सम्पेपर्यंत बसून गप्पा मारत फुलपाखरांना न्याहाळणं हा उद्योग चाले. यात मग आमचे इतर मुंबईहून आलेले मित्र येऊन बसत आणि उठून जात असत. मेजर नंदकुमार लग्न न झालेला होता आणि आम्ही तर मेडिकल कॉलेजातच होतो. अर्थात आम्हाला मुलींचं एवढं आकर्षण नव्हतं कारण आमच्या कॉलेजात भरपूर सुंदर मुली होत्याच. पण नंदू बिचारा एन डी ए मध्ये होता आणि कागदोपत्री पुण्यात असून मिलिटरी कट मारलेल्या एन डी ए च्या कॅडेट बरोबर दिवस काढायचा. वय वर्षे २७ असताना अगोदर बारामुल्ला येथे आणि नंतर एन डी ए सारख्या वाळवंटात त्यामुळे तो बिचारा वैशाली बंद होईपर्यंत आम्हाला तेथे आग्रहाने बसवून ठेवायचा आणि त्याचा मोबदला म्हणून आमचे बिल हि भरायचा. अर्थात तो सव्वा सहा फूट उंच आणि गोरापान देखणा होता त्यामुळे तो आमच्या दुप्पट खात असे शिवाय तो कमावत असे (आणि आम्ही बापाच्या पैशावर मजा करायचो) त्यामुळे अर्थात बिल भरणे लषकरी रितीरिवाजाप्रमाणे त्याची जबाबदारी होती. (तो आम्हाला चुकून सुद्धा बिल भरु देत नसे) हिवाळ्यात थंडीचे गरम गरम जॅम क्लब सँडविच पासून हॉट बोर्नव्हिटा सारखे आपण चुकून घेणार नाही असले पदार्थ त्याच्या कृपेने आम्ही वैशालीत खाल्ले आहेत. एस बी डी पी (शेव बटाटा दही पुरी सारखे शुद्ध मराठी ऐवजी आजकाल याचे धेडगुजरी अर्ध आंग्ल नाव एस पी डी पी --सेव पोटॅटो दही पुरी ऐकून कान बधिर होतात) तर आमच्या टेबलवर चटणी सारखी ठेवलेलीच असायची. कोणीही येणारा जाणारा एक पुरी तोंडात ठेवून पुढे जायचा आमच्या मैत्रिणीसुद्धा येऊन हाय करून जायच्या. आम्ही मुद्दाम नंदूची ओळख करून देत असु. आर्मीत मेजर आहे, राष्ट्रपती अंगरक्षक ( President's Bodyguard (PBG)) रेजिमेंटमध्ये आहे आणि आताच बारामुल्ला काश्मीर हुन आलाय ई ई. मैत्रिणी सुद्धा दोन क्षण तेथे रेंगाळून दृष्टीसुख घ्यायच्या. आणि जाताना त्याला सुद्धा बाय म्हणून जायच्या. तेवढ्याने सुद्धा त्या पोळलेल्या जीवाला शांती मिळत असे. म्हणून तो आग्रहाने आम्हाला अगदी वैशाली बंद होईपर्यंत बसवून घ्यायचा. १९८५ मध्ये रात्री अकरा साडे अकरा वाजता तो येझदी वरून एन डी ए ला परत जात असे आणि आम्ही M ५० वरून ए एफ एम सी ला. तेंव्हा त्या वेळेस रस्त्यावर वाहने तुरळक असत ते हि नो दिवसो गत:

In reply to by सुबोध खरे

मस्तच आठवणी अजून थोडी भर घालून स्वतंत्र लेख म्हणूनच प्रसिद्ध करा.

In reply to by सुबोध खरे

डॉक्टर तुम्ही ए एफ एम सी मध्ये असल्यामुळे बाकी मेडिकल काळजात हिरवळ पाहायला जायला तरी मिळत असेल हो (काहीतरी एक्सचेंग स्टुडंट वैगरे काम काढून ) तुमच्या एनडीए मित्राचा नशीब मात्र पुण्यात राहून वाळवंट ! कमवायला लागल्यावर पुण्यात राह्यला मिळालं असता तर ... ( त्यात एक दुचाकी हवी ) हाय दैवा ...पण नशिबात नवहते - भरपूर हिरवळ - खाण्याची चंगळ - पावसाळ्यात आणि थंडीतील चांगली हवा - नाटक चित्रपट , गाणे - मुंबई जवळ ( कोल्हापुरी भाषेत "चैन्या करायला" - कुठे हि जायचं तर पटकन .. मग गावापासून ते जवळ पास डोंगर दऱ्या भटकायला )

In reply to by गवि

पुण्याबाहेरच्या लोकांना दगडूशेठ गणपतीचे नाव जितक ऐकू जातं आणि त्याची महती वाटते ,त्याच हिशोबात वैशाली हॉटेल डोसा आणि तिथली कौतुक घ्यावीत. यापलीकडे त्याला काही विशेष किंमत नाही.

In reply to by अत्रुप्त आत्मा

"डोंबिवली , एक मराठी सांस्कृतिक केंद्र", असे डोंबिवलीबाहेरच्या लोकांना जितक ऐकू जातं आणि डोंबिवलीबाहेरच्या लोकांना त्याची जितकी महती वाटते, त्याच हिशोबात वैशाली हॉटेल आणि तिथली कौतुक घ्यावीत. यापलीकडे त्याला काही विशेष किंमत नाही.

In reply to by आंद्रे वडापाव

फक्त मराठी सांस्कृतिक केंद्रापुरतीच, डोंबोली फेमस नाही ..... आमच्या डोंबोलीत, हाॅटेल्स फेमस होतात ती खाण्यामुळे, गिर्हाइकांमुळे नाही...

In reply to by मुक्त विहारि

डोंबिवली तर गलिच्छ असण्यामुळे पण फेमस आहे म्हणे, खुद्द नितीन गडकरी तसे म्हणाले होते, तर कुणी डोंबिवलीला सुशिक्षितांचे बकाल शहर असेही म्हणतात ;)

In reply to by प्रचेतस

अर्थात, इतरही शहरे तशीच आहेत.... एका टुमदार खेड्याचे, बकाल शहरांत, रुपांतर कसे होते? हे डोंबिवली पासून, शिकण्यासारखे आहे... पण, इतर शहरे, ह्या बाबतीत, डोंबोलीलाच आदर्श मानतात...

खारे शेंगदाणे घेतले, खायला मिळाले नाही... डोसा खायचा संकल्प होता, पण पूर्ण झाला नाही... आजी, तुमचे म्हणजे, त्या गोष्टीतल्या भिल्ल व्याधा सारखं आहे... बेलाच्या झाडावर उपाशीपोटी बसून राहायचं... साईड बाय साईड, टाइम पास म्हणून बेल पत्रे तोडून , न बघता खाली टाकायची... झाली तुमची महाशिवरात्री...

In reply to by आंद्रे वडापाव

खाण्याच्या बाबतीत असे नशीब असेल तर पांडु खाडे पण काही नाही करू शकत. कृपया हलके घ्या ;)

मस्त लिहिलेय.
घरातून सकाळी बाहेर पडलेली मी अजूनही घरी आले नाही म्हणून नवरा काळजी करत असेल या विचाराने रिक्षानं तडक घरी गेले.
जगदंब. 🙏

डोसा.. मस्तच लिहिलंय..मागेपण तुमच्या लेखात शेंगदाणेही कसे असून खाता आले नाही,हे वाचताना आवडलं..यात डोसाही नाही मिळाला... मस्त अलवार लिहिता.. मार्मिक भाव!! अजून लिहा.वाचत आहे.

आपल्या मागच्या ' दातही होते, दाणेही होते...' या लेखातही असेच भुकेने व्याकुळ होण्याच्या अनुभवाचे वर्णन आहे. हा ही लेख आवडला.

आजी, लेख आवडला... पण मागच्या हि लेखात भुकेने दाणे खाता नाही आलेला अनुभव, या हि लेखात तसेच..पोटाचे खुप हाल केलेत तुम्ही.. हे लेख लिहिताना पोटभर खावून मग लिहिले आहेत असे मानतो..:-) लिहीत रहा... वाचत आहे...

एखाद्या ठिकाणी एक पदार्थ चांगला मिळतो, म्हणून रांगेत थांबून तो पदार्थ खाल्ल्यावर, त्या पदार्थाच्या चवीमुळे रांगेत थांबणे, गर्दी इत्यादी गोष्टी अगदी क्वचित जस्टीफाय होतात असे मत बनले आहे.

In reply to by शा वि कु

एखाद्या ठिकाणी एक पदार्थ चांगला मिळतो, म्हणून रांगेत थांबून तो पदार्थ खाल्ल्यावर, त्या पदार्थाच्या चवीमुळे रांगेत थांबणे, गर्दी इत्यादी गोष्टी अगदी क्वचित जस्टीफाय होतात असे मत बनले आहे.
शाविकु जी, तुम्ही वर लिहिल्याप्रमाणे, तंतोतंत पण काल्पनिक काही पहायचे का ??? साइनफिल्ड , यांचा सिजन ७ एपिसोड 6 "द सुप नाझी" हा नक्की पहा...

अरे कुठे नेऊन ठेवलाय आजींचा धागा? त्यांचे घागे भरकाटायला लागले आणि त्यामुळे आजींनी लिहीणेच बंद केले तर? संपादक मंडळ हो, असे झाले तर तुम्हीच जबाबदार!!!!!! 🙏

In reply to by शाम भागवत

हो धागा भरकटला गेला त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो. माझा उद्देश तसा नव्हता... मी वल्ली मित्राला माझ्या चेष्टेत तसे बोललो, यात काही कोणाला इतर दुखवण्याचा किंवा धागा भरकटावण्याचा उद्देश मुळीच नव्हता.. जे पुढे झाले ते.. झाले गेले.. पुढील वेळेस त्याबद्दल दक्षता घेतली जाईल.. कळावे.. मिपा प्रशासनाने माझे सर्व रिप्लाय येथून डिलीट करावे हि विनंती.

प्रचेतस-"मस्त, खुसखुशीत."अभिप्रायाबद्दल आभारी. सौंदाळा-धन्यवाद. गणेशा,मुक्तविहारी, अधुनमधून प्रचेतस आणि सौंदाळा यांनी एकमेकांना उद्देशून भरपूर लिहलंय. मी त्यात गुंतत नाही. चौथा कोनाडा-तुम्हांलाही माझ्यासारखाच अनुभव आला वाटतं. द्या टाळी. मुक्तविहारी-मलाही आत्ताच्या वैशाली तला डोसा आवडत नाही. रंगीला रतन-"भारी लिहिलंय."धन्यवाद. सौंदाळा-रिपोर्टिंग, रेकॉर्डिंग बद्दल लिहू म्हणता? नक्की लिहेन. गवि-मलाही आत्ताचं वैशाली आवडत नाही. "गेले ते दिवस"असं म्हणायची वेळ प्रत्येकावर कधी ना कधी येतेच. तुषार काळभोर-तुमच्याशी सहमत. वैशालीत नकोच.'मिपा कट्टा. आंद्रे वडापाव-तुलना आवडली. ॲबसेंट माइंडेड- हलकेच घेतलाय तुमचा अभिप्राय. धन्यवाद. शाविकु-अभिप्रायाबद्दल धन्यवाद. शाम भागवत, Bhakti, टर्मिनेटर -आभारी आहे. थॅंक्यू. रमेश आठवले, सिरुसेरी -बरं वाटलं. समाधान वाटलं. गणेशा- लिहिते आहे. वाचत राहा. शेंगदाणे आणि डोसा, इच्छा असूनही खाणे टळणे हे दोन्ही प्रसंग आधी एकाच लेखात लिहिले गेले होते. पण खूप मोठा लेख होईल म्हणून दोन भागात प्रकाशित केले. त्यामुळे विषयाची पुनरावृत्ती वाटू शकली असेल. पुष्कळ प्रतिसाद आल्याने चुकून एखाद्या प्रतिसादाची नोंद घेणे राहून गेले असल्यास दिलगिरी. सर्व वाचकांना धन्यवाद.