मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विस्मरणात गेलेले कारागीर

कर्नलतपस्वी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
कशाला आलं हे आपल्याला शहाणपण???? हरवलं त्यात ते सुंदर बालपण....... हा लेख आयुष्यातील विसाव्याच्या क्षणी जुना काळ आठवत मित्र आणी नातवंडां बरोबर वाटण्याचा प्रयत्न आहे.पुन्हा एकदा ते सोनेरी निरागस बालपण आठवणीत जगण्याचा प्रयत्न आहे. आजच्या जाती पाती वरुन होणार्‍या राजकारणाच व सामाजिक उद्रेकाचा याच्याशी या लेखाचा बादरायण संबध जोडू नये. इथे कोणालाही दुखावणे अथवा अपमानीत करण्याचा उद्देश नाही. हल्ली कुणी कुणाची जात काढायची नाही, जातीला उद्देशून काही बोलायचं नाही. केस कापायला जायचे तर म्हणायचं "केश कर्तनालयात चाललो आहे.तसचं शू मार्ट कींवा किराणामालाच्या दुकानात चाललोय म्हणायचं.आता ही शब्दावली आणखीन बदलली आहे. जसं की मेन्स ब्युटी पार्लर, माँल , ग्रोसरी शाँप वगैरे. आमच्या लहानपणी आसं काही नव्हते. कुठल्याही गावात जा, आगदी पुण्यात सुद्धा, गल्ली- बोळांची नावं सरसकट जातीं वर आसायची. ब्राम्हण आळी, तेली आळी, शिंपी आळी, माळी आळी, मोमीन आळी, भटांचा बोळ वगैरे. त्याच्या वर कुणाला आँबजेक्शन पण नसायचे. कुठं चालाला रे विचारलं , कि म्हणणार मोमीन आळीला, आज पावण येणार तवा "नळीचा" कार्यक्रम हाय. शालेय पाठ्यपुस्तकात पण पिढीजात उद्योग धंदा व जातींच्या वर धडे, कवीता पण आसायच्या.आशाच दोन कवीता माझ्या आठवणीतल्या. पहीली बा सी मर्ढैकरांची " गणपत वाणी " संपूर्ण कवीता बघण्यासाठी येथे क्लिक करा http://ek-kavita.blogspot.com/2007/04/blog-post_05.html?m=1 " गणपत वाणी बिडी पिताना चावायाचा नुसतीच काडी; म्हणायचा अन मनाशीच की या जागेवर बांधिन माडी; " वाण्याच्या दुकानाच लहानपणी एक विषेश आकर्षण असायचं.गोळ्या बिस्किट ते पापडखार पर्यंत जिवनोपयोगी सर्व सामान त्याच्या कडे मिळायचे. दिवसातून एकदा तरी जावे लागायचे. आर्थिक संपन्नता बहुतेक घरातून नदारद असल्याने व आजच्या सारखे फ्रीज वगैरे नसल्याने महिन्याचे सामान वगैरे भानगड नव्हती. पण तस बघायला गेलं तर हे सांगायला कारण, मुख्य कारण आम्ही मुलं. आज सामान भरलं की दाणे, गुळ, खोबरं आशा गोष्टी उद्या मिळतील याची खात्री आमच्या आयानां नसायची. आयांची लपवा लपवीची Strategy आणी मुलांचे शोधा शोधीचे Operation याचा लपंडाव सुरू आसायचा. कदाचीत त्यामुळे आपल्या पिढीची बुद्धी तल्लख व प्रकृती धडधाकट आहे. आसो, वाण्याच्या इतिहासात न जाता ,इतर शास्त्रां बद्दल बोलू. वास्तुशास्त्रा प्रमाणे वाण्याच्या दुकानाचे एक वेगळेच अजब वास्तुशास्त्र असायचे. दुकानाची रचना म्हणजे वाण्याची बसायची जागा मध्यभागी,शेजारी पैशांचा गल्ला समोर तराजू, जास्त विक्री होणार्‍या वस्तू , म्हणजे आजच्या भाषेत FMCG, उजव्या डाव्या हाताच्या बाजूच्या अंतरावर, दाणे,गुळ,चनाडाळ ,हरबारे, मटकी सारख्या गोष्टी साधारण ग्राहकाच्या सहजा सहजी हाताला न लगतील पण त्याला घ्यायला सोईस्कर आशा ठिकाणी. चौकोनी ट्रे मधे गोडंतेलाचा डबा व त्याला अडकवलेली जर्मनची मापं. घासलेट चा ड्रम व नरसाळं( Funnel) व एक लिटर, अर्धा लिटरची मापं दुकाना बाहेर. धान्याची पोती, मीठ, तांबडी मीर्ची, शिककई आशा ग्राहकांच्या पासुन धोका नसलेल्या गोष्टी दुकाना बाहेर. बदाम, खारीक, काजू, किसमीस सारख्या सटीसहामाशी लागणाऱ्या गोष्टी कुठे आहेत ते फक्त वाण्यालाच माहीती. पिवळा हत्ती, गणेश बिडी, गायछाप,काड्यापेटी आशा गोष्टी त्याच्या पाठीमागच्या लाकडी फडताळात. या गोष्टींची फडताळातली जागा जेव्हढी पक्की तेवढीच वाण्याच्या डोक्यात सुद्धा. न बघताच देणार. जसा एखादा वास्तुविशारद प्लॉट चा आकार बघून घराचे डिझाईन तयार करतो तसेच वाण्याच्या दुकानाचे सुद्धा. कंदील, चिमणीच्या उजेडात सुद्धा कुठले सामान कुठे आहे हे त्याला सुर्यप्रकाशा इतके स्वच्छ दिसायचे. कुठली गोष्ट आहे नाही, त्याचा भाव कीती, आजच्या भाषेत त्याची Reorder level काय? या सारख्या सर्व गोष्टी वाण्याच्या डोक्यात आसत. कॉम्प्युटर नाही का कँलक्युलेटर नाही पण हिशोब मात्र चोख. प्रत्येक गोष्ट सुटी, तोलून मापून द्यायला लागायची. तो वजनाचा इतका पक्का की तराजू व वजनं त्याच्या मुठीत असावीत. एक छोटा नावाचा बोर्ड असला तर आसला. सगळा हिशोब कागदावर. बाळंतीणीला डिंकाच्या लाडू करता लागणारा डिंक, अळिव किवा या सारख्या विषेश गोष्टी, शिंगाडे किंवा शिंगाड्याच पिठ या सारख्या कधीतरी लागणार्‍या गोष्टी एखाद्याच वाण्याकडे मिळायच्या. पुड्या बांधणे हि एक वेगळी कला होती. वर्तमान पत्र, जुन्या वह्या पुस्तके पुड्या बांधायला वापरायचे. कगदाचा तुकडा आणी वस्तुचे वजन याचं एक विषेश गणीत, वाण्याच्या डोक्यावर देवळातल्या घंटे सारखं जाड दोऱ्याचं लटकलेला गुंडा आणी त्याचा एक टोक मुंडावळ्या सारखं डोक्यावर. न बघता टोक पकडून पुडीला दोरा गुंडाळून बोटांनी तोडण्याची कला वाण्यालाच माहिती. आज वाण्याच्या दुकानाची जागा माँल व ग्रोसरी स्टोअर ने घेतली आहे. दीमातीला कॉम्प्युटर, कँलक्युलेटर,बिलींग मशीन, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा आशा कितीतरी गोष्टी. चुकायचं,विसरायची शक्यता आजिबात नाही.याचं वास्तूशास्त्र पण वेगळ, सेल्फ सर्व्हिस, फ्लो प्रोसेस आसेच नविन तंत्र का काय म्हणतात. आज आधुनिक वाण्याचे दुकान , एक विषेश शास्त्र आहे त्याच्यात मोठठे पदवीधर तयार होउन, डि मार्ट व बिग बझार सारखी मोठी साखळी चालवतात. जाहिराती, पोस्टर, होर्डिंग्ज आशा सारखी प्रसिद्धी साधनं. आता सर्वच गोष्टी ब्रांडेड व प्री पँक्ड त्यामुळे वजन काटा नाही का तेलाची मापं नाहित. आजच्या परिस्थितीत काळाच्या पडद्याआड जाणारा अशिक्षित, कमी शिकलेला वाणी वस्तुतः कीती बुद्धीमान आसावा याची कल्पना करा. जे शास्त्र आज मॅनेजमेंट काँलेजात जाऊन, भलेमोठे पैसे व वेळ खर्च करून शिकतात ते सर्व शास्त्र वाणी नावाचा प्राणी आपल्या डोक्यात घेऊन फिरत आसे. माझ्या आठवणीतली दुसरी कवीता पण याचा कवी कोण आठवत नाही. कवीने या कलाकाराचे साग्रसंगीत वर्णन केले असल्यामुळे वेगळे लीहायचे प्रयोजन उचित नाही. चांभार झाडाखाली बघुनी सावली बसतो चांभार | ठाऊक मजला आहे त्याचा सर्व कारभार || आरी घेऊन देई शिवुनी जोडे तुटलेले | टाच सांधणे नाल जोडणे सर्वकाळ चाले || रापी याची लखलख करीत चराचरा चाले | धूर विडीचा मधून केव्हा खुशालीत बोले || वेळ मिळीतो शिवीत राही  नवा बूट काही | विकेल तेव्हा मिळेल पैसा मनात हर्ष आहे|| पोचे येउन जुने झाले डबके पाण्याचे | तेच परंतू सोबत करते प्रामाणिक कसे || केस पांढरे जरी जाहले हाथ चालतात | तुटलेले पायतान कोणाचे नेत्र शोधतात || धंदा याचा पायतानाचा जरी | नवे पायतान कधी न घातले याने पायात || आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात आणी वापरा आणि फेका या माणसांच्या प्रवृत्ती मुळे हा कलाकार हा कलाकार काहीसा दुर्मिळ झालाय. मीत्रानों कला तीच कलाकार तेच पण कालमाना प्रमाणे त्यांच्या स्वरूपात बदल झालाय. आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने त्याच्या कलेत जास्त उठाव व भरभराट झाली आहे.

वाचने 7116 वाचनखूण प्रतिक्रिया 16

नेत्रेश 04/03/2021 - 00:49
"पुड्या बांधणे हि एक वेगळी कला होती" अगदी बरोबर. अर्धा किलो मसुरडाळीची पुडी वर्तमानपत्राच्या १/४ तुकड्यात बांधता आली की शिकाउ उमेदवार ग्रॅज्युएट व्हायचा :)

कंजूस 04/03/2021 - 06:03
वाण्याच्या दुकानाचा रंग निळाच असायचा. तो साधारणपणे दिवाळीत काढायचा स्वस्तात. एक निळीची पुडी चुन्याच्या पाण्यात टाकली की झाला निळा रंग। तो भिंतींपासून लाकडाच्या फळकुटांच्या दारांनाही लावला जायचा. गुजरातकडचे वाणी असले तर मिठाचं एक छोटं पोतं दुकानाबाहेर ठेवणारच. दुकान बंद झाल्यावरही जर कुणी गरीब मिठाकरता दुकानावर आला तर त्याच्यासाठी.

गणेशा 04/03/2021 - 08:10
आठवणी वाचताना ते चित्र पुरेपूर डोळ्यासमोर उभे राहते.. अतिशय चित्रदर्शी लिखान.. आवडले.. गाव.. बालपण.. निसर्ग यांच्यात इतकी जादू असते कि माणुसकी हृदयात कोरली जाते.. जात.. पात.. गरीब.. श्रीमंत.. शेतकरी असो वा बारा बलुतेदार वा नोकरदार सगळे एकाच कष्टाच्या चस्म्यातून पाहिले जात आणि माणुसकीच्या आरसपाणी आरस्या मध्ये त्याचे रूप उमटत असे.. काळ बदलला.. व्यवसायाचे रूप बदलले.. पण माणुसकी? ती का बदलली ह्याचे उत्तर कदाचित त्या स्वतंत्र असलेल्या वातावरणात झालेल्या बदलामुळे तर नाही ना हे नक्कीच शोधावे लागेल.. कि ती कोरलेली माणुसकी अजूनही दबली गेलीये आपल्या आत खोलवर? असा प्रश्न काहीवेळेस नक्कीच पडत असेल..

ज्ञानोबाचे पैजार 04/03/2021 - 08:40
चांभार ही कविता पहिल्यांदाच वाचायला मिळाली, फारच आवडली, छोट्या छोट्या बारकाव्यांसकट एकदम तपशिलवार वर्णन केले आहे कवीने चांभाराचे, माझ्या लहानपणी दरवर्षी नवे जोडे ही पध्दत नव्हती, तुटला की चांभारकडे जाउन शिवून घ्यायचे आणि वापरायचे हल्ली ही जमात पण दुर्मिळ व्हायला लागली आहे. वाण्याच्या दुकानातले तपशिल पण आवडले, अशी दुकानेही आता मोजकीच उरली आहेत. शिंपी, सायकल दुरुस्ती करणारे, कुल्फीवाले आजकाल कमी दिसतात. पैजारबुवा,

अनन्त्_यात्री 04/03/2021 - 11:38
चांभार कविता मस्तच. लहानपणी वार्षिक परीक्षा संपली की तडक लाल डब्यात बसून मुंबैवरून आजोळी कोकणाल्या खेड्यात जायचो. तिथे मामाच्या वाणसामानाच्या दुकानाबाहेर एक "पादत्राण कारागीर" बसायचा. त्याच्याकडून वर्षभर टिकणारी जाड चामडी सोल असलेली वहाण बनवून घ्यायची असा अलिखित करार असायचा. ते सर्व आठवलं. वाण्याच्या दुकानाचं वास्तुशास्त्रही चपखल!

ॲबसेंट माइंडेड… 04/03/2021 - 21:46
सूक्ष्म निरीक्षण व कसदार लेखनशैली आवडली हो कर्नलतपस्वी साहेब.

चौथा कोनाडा 05/03/2021 - 18:01
सुंदर आहे लेख. आमच्या शाळेबाहेर बसणार्‍या पंढरी चांभाराच्या आठवणी जाग्या झाल्या.
झाडाखाली बघुनी सावली बसतो चांभार | ठाऊक मजला आहे त्याचा सर्व कारभार || आरी घेऊन देई शिवुनी जोडे तुटलेले | टाच सांधणे नाल जोडणे सर्वकाळ चाले || रापी याची लखलख करीत चराचरा चाले | धूर विडीचा मधून केव्हा खुशालीत बोले || वेळ मिळीतो शिवीत राही नवा बूट काही | विकेल तेव्हा मिळेल पैसा मनात हर्ष आहे|| पोचे येउन जुने झाले डबके पाण्याचे | तेच परंतू सोबत करते प्रामाणिक कसे || केस पांढरे जरी जाहले हाथ चालतात | तुटलेले पायतान कोणाचे नेत्र शोधतात || धंदा याचा पायतानाचा जरी | नवे पायतान कधी न घातले याने पायात ||
ही कविता तर सुंदरच !