मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत : भारतीय मानसिकतेतला फंडामेंटल घोळ !

संजय क्षीरसागर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही एकमेकात गुंफलेल्या, फंडामेंटली चुकीच्या मानसिक धारणा आहेत. कर्मसिद्धांत मानणं म्हणजे आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेण्याऐवजी, ते आपल्या पूर्वसंचिताचं फळ समजून गप्प बसणं, किंवा (आता इलाजच नाही म्हटल्यावर), दुसर्‍याला माफ करणं, किंवा प्रसंग निस्तरण्याशिवाय पर्यायच नसेल तर, अत्यंत पडेल मनोवृत्तीनं, जमेल तसा प्रसंग रेटणं ! शिवाय ही थिअरी मानणार्‍याला, पूर्वसंचितात आपली नक्की किती लफडी आहेत याचा पत्ता नसतो, त्यामुळे आला बिकट प्रसंग की लाव थिअरी असं करत; तो स्वतःचा सारासार विचार कायमचा गमावून बसतो. त्रासदायक आठवणींपासुन सुटका कशी करुन घ्यावी? या लेखावरचे प्रतिसाद, जनमानसात ही भावना किती डीप गेलीये ते दर्शवतात. त्यामुळे, पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या दोन्ही धारणांच निस्सरण झाल्याखेरिज, आलेल्या आपत्तीचं वस्तुनिष्ठ विश्लेषण करुन योग्य निर्णय घेता येणार नाही. यास्तव ही पोस्ट. _____________________________________ या धरणा अनेक ग्रंथात आणि अनेक अध्यात्मिक दिग्गजांनी दिमाखात मांडल्या आहेत, त्या ग्रंथांच्या किंवा दिग्गजांच्या अवमानाचा कोणताही हेतू नाही. तस्मात, सदस्यांनी त्यांच्या श्रद्धा वगैरे मधे न आणता फक्त विषयाला धरुन प्रतिसाद दिल्यास विधायक चर्चा होईल. तर्कशास्त्रानुसार : An Asserter Has to Prove His Claim थोडक्यात `पूर्वसंचित किंवा कर्मसिद्धांत आहे' असा दावा करणार्‍यांनी तो सिद्ध करायचा आहे. _______________________________ या सिद्धांतांप्रमाणे व्यक्ती आता जे काय भोगते आहे ते त्याच्या पूर्वकर्माचं फळ आहे : मना त्वांची रे पूर्वसंचित केले । तया सारखे भोगणे प्राप्त झाले ॥ १. हा सिद्धांत मांडणार्‍यांचा मानसशास्त्राचा अभ्यास फारसा नव्हता. स्मृती ही केवळ त्या व्यक्तीच्या मेंदूत असते आणि अस्तित्वात इतरत्र तो डेटा साठवण्याची कोणतीही सोय नाही याची त्यांना कल्पना नव्हती. २. शिवाय मृत्यूत, देहासमेत मेंदूही विघटीत होऊन, एका व्यक्तीची संपूर्ण जीवन कहाणी तिथेच संपते. त्यामुळे मेंदूतली स्मृती पुढे सरकायची कोणतीही शक्यताच उरत नाही, इतकी उघड गोष्ट संतांच्या लक्षात आली नाही. ३. कर्मफलाच्या अंमलबजावणीला प्रत्येक व्यक्तीचा अनेक जन्मांचा डेटा स्टोअर करुन तो प्रत्येक व्यक्तीचं ‘कर्मफल रिअल टाईम बेसिसवर’, मॅनेज करु शकेल अशी प्रणाली अस्तित्वात हवी. अर्थात, संतमंडळींच्या वेळी अशा काही सिस्टम्सच नसल्यामुळे त्यांना आपल्या कल्पनेतला फोलपणा लक्षात आला नाही. ४. शिवाय डेटा नीती-अनीती किंवा पाप-पुण्याच्या कल्पनांवर सॉर्ट करण्यासाठी लिहावा लागणारा अल्गरिदम कुणाही देवाच्या देवाला सुद्धा, लिहिता येणं अशक्य आहे. कारण त्या कल्पनाच मुळात मानवी आहेत. समाज व्यवस्थेसाठी त्या उपयोगी असल्या तरी अस्तित्वात असा कोणताही मॉरल कोड नाही. ५. मुळात अस्तित्वात वेळ नाही त्यामुळे पूर्वसंचित ही कल्पना जे कालविभाजन गृहित धरते ते निराधार आणि कपोलकल्पित आहे. व्यक्तीच्या दृष्टीनं काल ही उपयोगीता आहे पण ती प्रक्रिया मापनासाठी माणसानं शोधलेली कल्पना आहे. अस्तित्वात फक्त एकच काळ कायम चालू आहे, तो म्हणजे वर्तमान काळ ! अशाप्रकारे पूर्वसंचित आणि कर्मसिद्धांत या बोगस कल्पना आहेत. ______________________________ तस्मात, आपण कुणाचा गैरफायदा न घेणं आणि कुणाला आपला गैरफायदा न घेऊ देणं इतक्या साध्या तत्वानी व्यक्ती मुक्त, स्वच्छंद आणि अपराध शून्य जीवन जगू शकते. कोणतंही पूर्वसंचित नाही आणि अत्यंत पारदर्शक वागणुकीमुळे कोणताही कर्मविपाक नाही; ही खरी आणि वास्तविक मुक्त चित्तदशा आहे. ह्या धाग्यावर पुरेशी चर्चा झाली असून आता केवळ व्यक्तिगत टीका चालू असल्याने हा धागा वाचनमात्र करत आहोत. --मिपा व्यवस्थापन.

वाचन 69911 प्रतिक्रिया 0