मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

<मीच एकटा सर्वज्ञ कसा ?>

प्रसाद गोडबोले · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मीच एकटा सर्वज्ञ कसा ? या एका प्रश्नासरशी अहंमन्यतेच्या सार्‍या संकल्पनेचा डोलारा कोसळतो. तुमचं जीवन विनम्र होतं; सुरुवातीला थोड चुकल्याचुकल्यासारखं वाटते, पण अहंकार हाच अहंमन्यतेचा आधार आहे, एकदा निराहंकारी झालो की सगळा माज संपला ! कुठला वाद-विवाद नाही; कसलं भांडण नाही, कोणलाही काहीही पटवुन देण्याचा अभिनिवेशष नाही. कुठल्याही विरुध्दमताला खोडुन काढण्याचा अट्टहास नाही, कोणताही गर्व नाही, की निर्बुद्ध मीपणाचे प्रदर्शन नाही. कोणतीही टोकाचा आग्रह नाही, "स्वतःचे ते सोवळं- अन दुसर्‍याचे ते ओवळं" असलं अज्ञान नाही, कुठे डोकं आपटायला नको, की शेवटी प्रत्येक धाग्यावर होणारी स्वतःची फजीती नाही. कुठे अकलेचे दिवे लावायला नको, की अनाकलनीय भाषेत तारे तोडायला नको. कोणाशीही काहीही बोलायला नको की बोललोच तर "माझेच कसे योग्य" हे पटवायला नको, कोणत्याही प्रतिकुल मतावर "बरं बाबा, तू म्हणाशील तसं. तुझे अनुभव, त्या वरुन बनलेली तुझी मते तुला लखलाभ" असं अगदी सहज पणे बोलुन हसत हसत पुढे जायला आपण सज्ज. घरातल्या भिंतींवर लोकांना आवडतील ती चित्रे लाऊ दे अन कोपर्‍यात आवडतात ती शिल्पे ठेऊ दे बुकशेल्फ मध्ये ज्यातुन आनंद मिळतो ती वाट्टेल ती पुस्तके ठेऊ दे, आपल्याला काय गरज आहे कोणाच्या घरात डोकाऊन पहायची अन फुकटचे सल्ले द्यायची? , ते ही मागितले नसताना ! सगळे वादच थांबल्यावर स्वतःला रमायला, स्वतःचा विकास साधायला, व्यासंग आणि छंद जोपासायला, भरपूर मोकळा वेळ आणि आणि स्वतःच्या निर्बुद्धपणाने लोकांना त्यांचे कष्टाचे पैसे कसे खर्च करावेत हे सल्ले देण्याचे वाचलेले कष्ट ! आणखी काय हवं मिपावर आणि जगातही सुखासमाधानानं वावरायला ? _____________________________________ मीच एकटाच सर्वज्ञ कसा ? इतका साधा, सोपा, वरकरणी बाळबोध वाटणारा पण लक्ष्याचा नेमका वेध घेणारा तीर ! प्रश्न सुद्धा फक्त एकदाच विचारायचा, तोही स्वतःला; आणि मग हसून सगळ्यातून मोकळं व्हायचं ! कुठल्या लेखावर जायला नको, 'माझीच कशी लाल' असं जिथं तिथं दाखवुन, स्वतःचे हसु करुन घ्यायची गरज नाही, आणि चेहेर्‍यावर कायम "जितं मया" चा मास्क घालुन वेडगळपणा करायचा नाही. ज्याला जी साधना करायची ती करु दे, त्यातुन जी अवस्था प्राप्त व्हायची ती होऊ दे नाहीच झाली तरी त्याचं त्याला उत्तर शोधु दे मला काही अख्ख्या जगाला शहाणे करुन सोडायचा ठेका दिलेला नाही. जो तो आपापल्या अनुभवानुसार, आपापल्या बौध्दिक क्षमतेनुसार आपापल्या गंतव्याप्रत पोहचेल , किंव्वा पोहचणारही नाही , मला काय पडंलयं त्याचं ? एका विचारात काम तमाम ! _____________________________ एक गोष्ट मात्र नक्की, लोकांशी वावविवाद घालत बसायचं नाही ! इतकी वर्ष काय मी झक मारत होतो का ? या मनाच्या उपहासाला, एकदाच हसून`हो !' म्हटलं की झालं. मिपाकर मोठ्ठ्या मनाचे आहेत , ते नक्कीच माफ करतील ;) ! मग साधेभोळे भाविक तुमचा पिच्छा सोडतील, एखाद्या श्रध्दाळुची भोळीभाबडी मते दिसल्यावर तुम्ही लालरंगाचा डबा घेऊन धावण्याऐवजी शांत बसुन गालातल्या गालात हसाल अन उजव्या कोपर्‍यातील ते फुलीचे बटन दाबाल, सगळ्याच लोकांची बौध्दिक , मानसिक , आध्यात्मिक पातळी एक नसते हे लक्षात आल्यावर ज्याला त्याला झेपेल अशी साधना करुन स्वतःपुरती मनःशांती प्राप्त करुन घेण्यात आपल्याला काहीच हरकत नाही हे तुमच्या लक्षात येईल. अगाध तर्कशास्त्राचे दिवे पेटवणार्‍यांऐवजी, विजपुरवठा असो कि नसो , सर्वावस्थेत समभाव कसा ठेवावा हे शिकवणार्‍या साधुसंतांच्या विषयी तुमचा मैत्रभाव जागेल. "सगळी साधु, संत, साधक आणि अन्यलोकंही निर्बुध्द आहेत , मीच काय तो एक शहाणा आहे " हा नाहक मनात खोल गेलेला विचार लयाला गेला की फुकटचा निरुपयोगी अहंगंड संपेल. एक सामान्य, वस्तुनिष्ठ, इतरांच्या मतभिन्नतेचा आदर करणारा, विनम्र, सुखसंवादप्रिय, संतुलित मनाचा आणि अगदी सहजपणे "ठिक आहे बाबा" म्हणुन वादविवादांवर पाणी सोडणारा, अस्तित्वाप्रती आणि त्याच्या अनेक भिन्न लोकांना येणार्‍या भिन्न अनुभुतीं, जसे की निर्गुण , परमात्मा, आत्माराम , वस्तु , सच्चिदानंद, पांडुरंग , शिव, राम कृष्ण हरी अशा अनेक भिन्न नावांनी भिन्न रुपांनी नटलेल्या निर्विकल्प सत्याप्रती कायम कृतज्ञ असलेला, साधा, सरळ आणि इतरांच्या अगदी सारखा सामान्य माणूस म्हणून तुम्ही निर्भ्रांत जगायला लागाल ! ज्याक्षणी "मीच काय तो एकटा सर्वज्ञ" हा अहंकार सोडाल त्या क्षणापासुन ! _______________________________________________________ _______________________________________________________ईत्यलम ||

वाचन 13014 प्रतिक्रिया 0