मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तुझं माझं जमेना...

दिनेश५७ · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
गेल्या पाच वर्षांत भाजपसोबत सत्तेत असूनही शिवसेनेने भाजपला खूप त्रासच दिला हे खरे आहे. लोकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर सरकारला जाब विचारतच राहू असे म्हणत ठाकरे व त्यांच्या सेनेने अनेक मुद्द्यांवर सरकारची आणि भाजपची कोंडीच केली. सेनेच्या या आक्रमकपणामुळेच सरकारला आपले काही धोरणात्मक निर्णयही मागे घेणे किंवा रद्द करणे भाग पडले होते, तेव्हा शिवसेना विजयी वीराच्या आवेशांत सरकारवर अंकुश चालवत होती हे वास्तवच आहे. पण तरीही भाजपने किंवा फडणवीस सरकारने शिवसेनेचे आभारच मानले पाहिजेत. ते दोन गोष्टींसाठी... एक म्हणजे, विरोधक असूनही भाजपसोबत सत्तेत राहून सरकारच्या स्थैर्याला सेनेने धक्का लागू दिला नाही. म्हणूनच फडणवीस यांना अल्पमतातील असूनही एकहाती सरकार चालविता आले, आणि दुसरे महत्वाचे म्हणजे, सत्तेत राहूनही विरोधकाची भूमिका कठोरपणे निभावल्यामुळेच राज्यातील विरोधकांच्या स्पेसवर शिवसेनेने कब्जा मिळविला. राज्यातील खरे विरोधक असलेल्या काॅंग्रेस राष्ट्रवादीला नामोहरम करण्यात आज भाजपला जे यश आले आहे, त्याचा मोठा वाटा शिवसेनेचाही आहे. आज परिस्थिती पालटली आहे, तो शिवसेनेने गेल्या पाच वर्षांत भाजपसोबत बजावलेल्या विरोधकाच्या भूमिकेचा परिणाम असू शकतो. सेना-भाजपचे सूर सरकार म्हणून जुळलेच नाहीत असे वाटण्यासारखी परिस्थिती गेल्या पाच वर्षांत वारंवार दिसत राहिली. विरोधकांची स्पेस कब्जात घेण्यासाठी सेना-भाजपने जाणीवपूर्वकच हे राजकारण जपले असावे असे सुरुवातीला वाटले, पण केंद्र सरकारबाबतही सेना आक्रमक विरोधकाच्या भूमिकेत गेली. सरकारचे नाक दाबण्याची कोणतीही संधी जणू सोडायची नाही, असाच सेनेचा पवित्रा राहिला. कालचे पंतप्रधानांचे खोचक टोमणे आणि आजचा सेनेचा बचावात्मक पवित्रा पाहता, आता बाजी पालटली असून नाक दाबण्याची खेळी आता भाजपकडे आली आहे, हे स्पष्ट दिसते. म्हणजे, पाच वर्षांतील परिस्थितीचा व सेनेच्या विरोधकाच्या भूमिकेचाही, भाजपने पुरेपूर वापर करून घेतला, असेच चित्र आहे. आता मिळेल ते घेऊ पण भाजपसोबत राहू अशी हतबलता सेनेच्या सुरात दिसते, हा त्याचाच परिणाम आहे!

वाचने 3191 वाचनखूण प्रतिक्रिया 4

रमेश आठवले 22/09/2019 - 07:29
प्रबोधनकार ठाकरे हे शिवसेनेचे स्थापक. त्यानन्तर ३ पिढ्या ठाकरे मंडळी या पक्षाचे हुकूमशहा असल्या सारखे वागत आहेत. म्हणजे अगदी नेहरू-गांधी घराण्या सारखे. आता युवराज आदित्य यांना कोणताही अनुभव नसताना भावी मुख्य मंत्री म्हणून पुढे केले जात आहे. हा मुलगा बोलायला लागला की बाळासाहेबांच्या वाघा ऐवजी मिकी मौस ची आठवण होते. मराठी मतदाराला ही मंडळी इतका मूर्ख कसे समजतात ?

In reply to by रमेश आठवले

सामान्यनागरिक 09/10/2019 - 08:19
तुम्ही काहीही म्हणा. शिवसेना काय वाटेल ते करुन आदित्य ठा. ला निवडून आणेल. गम्मत म्हणजे मतदारांना काही फरक पडत नाही उमेदवार कसा आहे. म्हणून रागा निवडुन येतात कुठुनही. तसेच आठा पण निवडून येतील.

भीमराव 22/09/2019 - 13:59
दरम्यान एक ऐंशी वर्षे वयाचा म्हातारा पहिलवान लंगोट लाऊन कुस्ती च्या मैदानात उतरला आहे.निम्मे अधिक निवडुन येण्याजोगे लोक भविष्याचा निर्णय घेते झाले आहेत. कित्येक ठिकाणी लढायला माणूस मिळेल का नाही सांगता येत नाही. हरणार नक्कीच हे माहीत आहे, पण लढायला उतरला हे नक्की कौतुक पात्र.