Skip to main content

एका 'डोळस' प्रेमाची गोष्ट

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 27/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ही आपल्या आयुष्यातील एक महत्वाची घटना असते. त्यासाठी सुयोग्य जोडीदार निवडणे हा वाटतो तितका सोपा प्रश्न नसतो. ‘बघून’ करावयाच्या लग्नांमध्ये जोडीदार-निवडीचे अनेक निकष (फूटपट्ट्या) लावले जातात. असे निकष कोणते असावेत आणि कशाला किती महत्व द्यायचे हे ज्याच्या त्याच्या विचारांवर अवलंबून आहे. त्यात काही गैर नाही. या लेखाच्या अनुषंगाने मला फक्त एका निकषाकडे लक्ष वेधायचे आहे. तो म्हणजे एखाद्या व्यक्तीतील शारीरिक व्यंग. विवाहेच्छू तरुण-तरुणींकडे जर आपण एक नजर टाकली तर काय दिसते? जी व्यक्ती शरीराने धडधाकट आहे ती आपला जोडीदार निवडताना त्याच्यात कुठलेही ठळक व्यंग नको हे जरूर पाहते. ते अगदी नैसर्गिक आहे. एखाद्या धडधाकट व्यक्तीने जाणीवपूर्वक दिव्यांग जोडीदार निवडल्याची उदाहरणे अपवाद असतात. असेच एका मुलीचे उदाहरण माझ्या पाहण्यात आहे. ती मुलगी उच्चशिक्षित असून तिला चांगल्या पगाराची सुरक्षित नोकरी होती. लग्न करताना तिने तिच्यापेक्षा अधिक कमावणारा मुलगा बघावा अशी तिच्या पालकांची पारंपरिक अपेक्षा. पण घडायचे होते वेगळेच. ती छंद म्हणून संगीत शिकण्यासाठी एका अंध तरुणाकडे जात असे. त्या सहवासात त्यांच्या मैत्रीचे धागे जुळले. ती त्याच्या कलेवर बेहद्द खूश होती तर तो तिच्या सहृदय अंतःकरणावर. कळत नकळत मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. जन्मांध असलेल्या त्या तरुणाला स्वतःच्या आई-वडिलांबद्दल काही माहिती नव्हती. तो अनाथालयात वाढलेला होता. पण जिद्दीने त्याने संगीतात प्रावीण्य मिळवले होते. स्वतःच्या हिमतीवर धडपड करीत तो कनिष्ठ मध्यमवर्गीय परीस्थितीत पोचला होता. एके दिवशी तो तिला म्हणाला, “तू मला खूप प्रेम दिलेस. पण आता लवकरच तुझे पालक तुझे लग्न ठरवतील व आपली ताटातूट होईल. मग माझ्यापाशी उरतील त्या फक्त आपल्या निखळ प्रेमाच्या आठवणी. त्यांच्या आधारावर मी माझे आयुष्य काढेन”. हे ऐकल्यावर तिला गलबलून आले. पूर्ण २४ तास तिने खूप विचार केला. तिच्या मनाची खूप चलबिचल झाली. तिने जर सर्वसामान्य मुलींप्रमाणेच ठराविक निकष लावून लग्न जुळवले असते तर तिला चाकोरीबद्ध सुखासीन जीवन मिळाले असते. ते नाकारून या तरुणाशी लग्न करण्याचा विचार हा खूपच धाडशी होता. पण अखेर तिने त्याच्याशीच लग्न करण्याचा निर्णय घेतला . प्रथम त्यानेही तिला वेड्यात काढले. “आपली भेट हा एक अपघात होता असे समजू, पण माझ्याशी लग्न करून तू तुझ्या सुंदर आयुष्याची माती करू नकोस,” त्याने तिला विनविले. परंतु, आपल्या निर्णयामुळे तो मनोमन सुखावला आहे आहे हे तिने ताडले. जेव्हा तिने हा निर्णय घरी सांगितला तेव्हा अर्थातच तिला तीव्र विरोध झाला. कुटुंबीयांनी विनवणीपासून ते धमकावणीपर्यंत सर्व प्रकारांनी तिला परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. पण या मुलीने विरोधाला न जुमानता तिचा निर्णय अमलात आणला. पांढऱ्या काठीच्या आधाराने धडपडणाऱ्या जिद्दी तरुणाला तिने आपलाच भक्कम आधार कायमचा दिला. आंतरिक प्रेमाचे याहून चांगले उदाहरण माझ्यातरी पाहण्यात नाही. धडधाकट, निरोगी, उच्चशिक्षित व कमावत्या या तरुणीने एका अंधाला आपला जीवनसाथी केल्याची घटना माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. सदर जोडपे हे आमचे कुटुंबं-मित्र आहे. त्याना एक छानशी मुलगी असून ती एक उत्तम गायिका झालेली आहे. नुकताच तिच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला. त्यानिमित्ताने या गतस्मृतींना उजाळा मिळाला. *************************************
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 26117
प्रतिक्रिया 50

प्रतिक्रिया

पण अत्यन्त कौतुक आणि अभिमान वाटतो, सामान्य व्यक्तीमधील नायकत्व असे समोर आलेले दिसताना.

वा! असा निर्णय घेण्यासाठी खूप खंबीरपणा लागतो. मी जर त्या जागी असलो असतो तर... असा विचार मनात आला आणि खरं सांगायचं तर उत्तर नकारार्थीच आलं.

अशी चार पाच ऊदाहरणे आहेत, समाधानी संसारासाठी मानसिक शांती महत्वाची, बाकी आर्थिक परिस्धिती आणी तब्येत बदलत असते.

अत्यंत दुर्मिळ घडणारी घटना आहे . पण त्या मुलीचा निर्णय खरेच कौतुकास्पद आहे .

दुर्मिळ म्हणजे अतिशय दुर्मिळ .. संग्रहालयीन प्रेम म्हणायचं .. नशीबवान आहेत दोघेही .. एक मनावर फिदा तर दुसरी कलेवर .. दोन्ही अभिजात प्रेमाच्या बाजू .. तोड नाही ,,, एकदम फेविकॉल प्रेम .. मानलं

आयुष्याचे चार टप्पे ढोबळ मानाने असतात . लहानपण ,mature होण्याच्या सीमारेषेवर असलेलं वय आणि पूर्ण परिपक्वता आलेलं वय ह्या मधील आयुष्य ह्याला जवानी म्हणुया आणि म्हातारपण . प्रेमाची व्याख्या आणि ओढ प्रत्येक टप्प्यात वेगळी असते . जवानी च्या सुरवातीला ज्याला प्रेम समजल जाते ते परिपक्व वयात ती व्याख्या खोटी ठरते आणि म्हातारपणी प्रेम आणि उपकार ह्या मधील फरक समजत नाही

In reply to by Rajesh188

मनुष्य उत्क्रांत होत असता त्याला अजूनही बऱ्याच बाबतीत नेमकेपणा सापडला नसल्याने तो बऱ्याच गुंतागुंतिला सोप्या व्याख्या बनवून मोकळा होतो. प्रेम हा शब्द त्यातीलच एक :) जसे प्रत्येकाचे बायबल वेगळं असतं तसेच प्रत्येक भावनेतून प्रेमाची एक वेगळी व्याख्या रचता येते

प्रेम म्हणजे फक्त तेच नाही ओ .. खरं प्रेम अभिजात असतं , अमर असतं ,, अर्थात मला कुठल्याही मुलीवर अभिजात प्रेम झालेले नाही आहे ,, पण मी माझ्या आईवर अतोनात प्रेम केले आणि माझ्या मुलांवर तर आहेच .. पण एक मात्र नक्की ,, कि मला अभिजात प्रेम मिळालेले आहे आणि मिळतही आहे .. याचा मला सार्थ अभिमान आहे ..

खिलजी तुम्ही भाग्यवान आहात खरे प्रेमाची अनुभती लाखात एकाला होते आणि ते शब्दात सांगता येत नाही . त्या मुळे प्रेमाची ती व्याख्या सर्रास सर्व प्रेम प्रकरणात वापरता येणार नाही . अपवाद म्हणुया आपण त्याला . कुमार sir chya उदाहरण हे अपवाद आहे सर्रास असे घडत नाही . बाकी लोकांच्या बाबतीत वया नुसार प्रेमाची व्याख्या बदलते आणि भौतिक जीवन कल्पित प्रेम भावनेवर विजय मिलवावतात आणि समाजात सर्रास अशा घटना दिसतात

व्याहवारिक निकष बाजूला सारुन निस्वार्थी प्रेम करणारी मुलगी अगदी दुर्मिळच.. धन्यवाद अशा एका स्त्रीची कथा इथे लिहिल्याबद्दल

१ ) ऐहिकसुखे पायाशी लोळन घेत असताना मन दुभंगलेली असल्यामुळे विभक्त होऊन स्वतःचे आणि मुलांचे आयुष्य अंधकारमय करणारे , २ ) रूढीपरंपरा पाळण्यासाठी अनिच्छेने शेवट पर्यंत एकमेकांची साथ देत जीवन जगणारे , 3 ) मुलांच्या भविष्याचा विचार न करता स्वैराचारला प्राधान्य देऊन लग्न / घटस्फोट या जंजाळात अडकणारे , रडतकढत जगणाऱ्याचें असे अजून कित्तेक प्रकार वर्णन करता येतील पण कुमार साहेबांनी सांगितलेल्या त्या महिलेला साक्षात दंडवत /\

In reply to by ट्रम्प

सहमत सहमत ट्रम्पबुवा. आक्ख्ख्या प्रतिसादाला आणि दंडवतालाही सहमत.
धडधाकट, निरोगी, उच्चशिक्षित व कमावत्या या तरुणीने एका अंधाला आपला जीवनसाथी केल्याची घटना माझ्या मनावर कायमची कोरली गेली आहे. सदर जोडपे हे आमचे कुटुंबं-मित्र आहे. त्याना एक छानशी मुलगी असून ती एक उत्तम गायिका झालेली आहे. नुकताच तिच्या सुश्राव्य गायनाचा कार्यक्रम ऐकण्याचा योग आला.
आणि हे किती भारी, मस्त वाटलं वाचून सुध्दा. माझ्या वर्गात एक मुलगा होता, मूकबधीर जन्मजात. हे एवढेच व्यंग म्हणता येईल असे. प्रचंड देखणा, आर्थिकदृष्ट्या सुस्थापित घरातला. हातात कला, हरहुन्नरी, चांगल्या स्वभावाचा, तसे ते व्यंगही नाहीच कारण लिपरिडिंगने तो इतर बोलत असताना समजून घ्यायचा. कानातले मशीन वापरुन कार चालवायचा. एका सहाध्यायी मुलीवर त्याचे प्रेम होते. आम्हाला माहीत होते. सर्व कॉलेजला माहीत होते ती मुलगी सोडून. शेवटी तिला कळल्यावर तिने स्पष्ट शब्दात नकार दिला. कारण एकच. आमच्या संवाद होऊ शकणार नाही चांगल्या पध्दतीने हे कारण. तिला बर्‍याच मैत्रिणींनी समजावले बरेच. ती ह्या मुद्द्यावर ठाम होती. कॉलेज संपल्यावर काही वर्षांनी तो मुलगा दुसर्‍या एका सुस्वरुप आणि सुजाण मुलीसोबत विवाहबध्द झाला आणि दोघांचाही संसार अत्यंत सुखाने चाललेला आहे. त्या पहिल्या मुलीचाही. ;)

In reply to by अभ्या..

अभ्या, तुमच्या प्रतिसादावरून एक आठवण झाली. पाश्चिमात्य जगातील एका गाजलेल्या कलाकाराला त्याच्या मुलाखतीत हा प्रश्न विचारला गेला होता, “ समजा, तुमच्या दुर्दैवाने तुम्हाला एक महत्वाचे व्यंग असते तर तुम्ही अंधत्व पसंत कराल की बहिरेपणा ?” दोन मिनिटे विचार करून त्याने उत्तर दिले होते, “ मला एक वेळ अंधत्व चालेल पण ऐकायला आलेच पाहिजे. संगीत ऐकल्याविना जीवनाची मी कल्पनाही करू शकत नाही”. … यासंदर्भात प्रत्येकाचे विचार भिन्न असणार. पण या प्रश्नाचे उत्तर देणे तितके सोपे नाही खरे.

In reply to by हेमंतकुमार

आप जँगल मेजाव, आवाजे तो व्हीपेभी आयेगी,तो मन भटकेगा - मा.मु* योगी आदित्यनाथ. मा.मु* = माननीय मुख्यमंत्री.

In reply to by हेमंतकुमार

, “ समजा, तुमच्या दुर्दैवाने तुम्हाला एक महत्वाचे व्यंग असते तर तुम्ही अंधत्व पसंत कराल की बहिरेपणा ?”
मी आनंदाने बहिरेपणा स्वीकारला असता अशी वेळ आल्यावर. रंग आणि रूप अनुभवण्यासाठी मी संगीत त्यागू शकेन. सध्याही बऱ्याचदा कान नसते तर बरं असं वाटते खरे. ;)

आभार आणि सहमती.
रडतकढत जगणाऱ्याचें असे अजून कित्तेक प्रकार वर्णन करता येतील
>>> खरे आहे. म्हणूनच लेखातील जोडप्याबद्दल आदर वाटतो.

निभावून नेले हे महत्वाचे! अन्यथा भावनेच्या भरात निर्णय घेतला अन पहा मग काय झाल ते! अशा प्रतिक्रिया तिला ऐकायला मिळाल्या असत्या.

अत्यंत हृदयस्पर्शी. पण यात बहुसंख्य वेळा एक शक्यता उरते. भले चोवीस तास नीट विचार केलाही असेल, पण हा निर्णय दया, सिम्पथी यातून निश्चित आलेला नाही असं आत्ताच म्हणणं कठीण. प्रत्यक्ष आयुष्य अनेक दशकं अनेक थपडा देतं, तेव्हा दोन्ही बाजूंनी खंबीर आधार बनणं गरजेचं असतं. भविष्यात त्या अंध व्यक्तीला काही प्रसंगाच्या आवेगात, भरात धडधाकट जोडीदाराकडून उपकाराची भावना ऐकवली गेली, मोजणी केली गेली तर फार वेदनादायी असेल. दोघांसाठी. तसं नसावं अशी सदिच्छा.

प्रकाश, सहमत. त्यांनी ३० वर्षे संसार अगदी छान निभावला आहे ! गवि , तसे बिलकूल झालेले नाही. याचा नक्कीच आनंद वाटतो.

जन्मजात आंधळे पण असेल तर होणारे मुल नॉर्मल असण्याची शक्यता १००,percent असेल तर ठीक आहे . पण तशी जर शक्यता नसेल आणि मुला मध्ये सुद्धा व्यंग येणार असेल (आंधळेपणा,) तर मात्र त्या दोघांच्या उदात्त प्रेमाला उदात्त म्हणता येणार नाही माझ्या मते . त्या दोघांचा निर्णय त्या दोघांच्या मर्यादे पर्यंत उच्च दर्जाचा आहे पण ?

यात करुणा नाही हे वाचून आणखी बरे वाटले. छान लेखाबद्दल धन्यवाद.

मार्केट यार्ड ,पुण्यातील माझ्या माहितीचे एक मारवाडी गृहस्थ आहेत . गडगंज संपत्ती , एकच मुलगा तो ही जन्मापासून मूक बधीर . याने त्याला लहानपणीच वारंवार अमेरिकेत नेऊन उच्च दर्जाचे उपचार / ऑपरेशन करवून घेतले व कानापाशी एक छोटे मशीन बसवून घेतले , त्या मशीन च्या वायर्स डोक्याच्या आतील भागात कुठेतरी लावलेल्या दिसतात . त्या मशीन मुळे मुलाला व्यवस्थित ऐकू येते व स्पष्ट उच्चार नाही पण बऱ्यापैकी बोलतो . डिप्लोमा आणि डिग्री पूर्ण करून बापाच्या व्यवसायात हातभार लावत आहे . तर लग्ना साठी मुली बघताना बापाची घालमेल चालली होती . चांगली व्यवस्थित स्थळे येत नव्हती , आणि मुलाला पसंती देणाऱ्या मुलींचा आपल्या संपत्ती वर डोळा असल्याचा संशय बापाच्या मनात घर करून बसलेला . शेवटी एका गरीब स्थळ जमले , लग्न झाले , मुलीने कोर्टात केस टाकली व बऱ्यापैकी रक्कम देऊन घटस्फोट घेतला गेला . त्या नंतर पुन्हा स्थळे पाहणे सुरू झाली व आता श्रीमंत पण थोड्याशा अपंग मुली बरोबर संसार सुखाचा चालला आहे . म्हणून च कुमार साहेबांनी सांगितलेल्या त्या महिले बद्दल खूप आदर वाटतो .

सर्व नवीन प्रतीसादकांचे आभार. सुधीर, तुमचा मुद्दा बरोबर. ट्रम्प, तुम्ही लिहिलेला पहिला अनुभव कटू आहे खरे. लेखातील दाम्पत्याशी आमचा संपर्क असल्याने अंधांच्या जीवनातील काही विशेष गोष्टी समजल्या. १. त्या गृहस्थांचे हातात जे मनगटी घड्याळ असते त्याची किल्ली दाबली की ‘किती वाजलेत’ ते आवाजात सांगितले जाते. २. त्यांच्या घरच्या स्वयंपाकात मिरच्या कटाक्षाने टाळल्या जातात; तिखटाची पावडरच वापरतात. कारण ‘त्यांना’ जेवताना मिरची समजली नाही तर ठसका लागू शकतो. ३. केवळ आवाजावरून घरात आलेली (परिचयातील) व्यक्ती ते अचूक ओळखतात.

In reply to by हेमंतकुमार

आणि अंध व्यक्तींंमध्ये इश्वराने आणखी काही वरदाने दिलेली असतात. त्यांचे घाणेन्द्रिय (वास घेणे व ओळखण्याची क्षमता) डोळस लोकांपेक्षा जास्त संवेदनाशील असते. स्पर्शावरून देखिल त्यांना डोळस माणसांपेक्षा जास्त गोष्टी लक्षात येतात. माझा एक नातेवाईक जो अंध असून डॉक्टरेट झालेला आहे, एका राष्ट्रीय आरोग्य संस्थेचा समिती सभासद आहे, त्याची कार्यक्षमता आपणा सारख्यांना अचंबित करणारी आहे. त्याने वयाच्या ५१ व्या वर्षी डॉ प्रकाश बाबा आमटे यांच्या लोकबिरादरीतील स्त्री शी लग्न केले आहे.

आवडली गोष्ट, असा निर्णय घ्यायला आणि तो आयुष्यभर निभवायला खरोखरच धाडस लागते. रच्याकने :- कुमार सरांचा नवा लेख बहूतेक "डोळ्यांच्या आरोग्यावर" असेल अशा अपेक्षेने धागा उघडला आणि डोळ्यात झणझणीत अंजन पडले. पैजारबुवा.

@ ज्ञा पै, अधूनमधून आरोग्यलेखनाला विश्रांती देतो ! (स्मित) धन्यवाद.

सुंदर उदाहरण आहे. त्या माउलींच कौतुक तर आहेच. सहज एक विचार आला की जसं जेवणारं इतर कोणी नसेल तर गृहिणी काही तरी थातुर मातुर बनवून वेळ मारून नेते तसं नवरा आपल्याला बघू शकत नाहीये म्हटल्यावर तिच्या राहणीमानावर, नटण्यावर कालांतराने फरक पडू शकतो का ? कारण आपल्या जीवाभावाच्या माणसाने आपल्याला 'बघावं' ही भावना तर असतेच ना

चंद्रशेखर, तुम्ही म्हणता तशी शक्यता असू शकेल. संसारात अन्य काही अडचणीही येत असतील. आपण फक्त कल्पना करू शकतो.

ज्यांची मन घट्ट जुळलेली असतात त्या प्रेमाचे नाते खूप वेगळे असते त्याची कल्पना बाकी लोकांना येणे शक्य नाही . जसे साधू संत ,योगी ईश्र्वराशी एकरूप होतात आणि त्या ईश्वराचे अस्तित्व अनुभवता तसा काहीसा प्रकार आहे . शब्दात सांगता येणार नाही

भावनेच्या भरात असे निर्णय घेऊन नंतर पश्चाताप होऊन विभक्त झाल्याची उदाहरणे अनेक आहेत, पण तुमच्या लेखातील ह्या जोडीचे उदाहरण खरोखर कौतुकास्पद आहे. आत्तापर्यंतचा त्यांच्या यशस्वी संसार बघता त्यांचे आणि त्यांच्या मुलीचे भविष्यही उज्वल असणार ह्याची खात्री आहेच, रादर ते तसे असावेच अशा मनःपूर्वक शुभेच्छा!

कुमारेक, त्या बाईंच्या हिंमतीची दाद द्यावीशी वाटते. माझ्या घरच्यांच्या ओळखीतल्या एका सुंदर व शालीन मुलीने पंगु मनुष्याशी लग्न केलं होतं ते आठवलं. ठाण्याला तलावपाळीवर दोघे फिरायला यायचे. ती त्याचा गाडा ढकलायची. पुढे काय झालं माहित नाही. तिला काहीतरी सापडलं असावं त्याच्यात, जे इतर कोणीही देऊ ( की दाखवू ? ) शकंत नव्हतं. आ.न., -गा.पै.

गा पै , सहमत.
तिला काहीतरी सापडलं असावं त्याच्यात, जे इतर कोणीही देऊ ( की दाखवू ? ) शकंत नव्हतं.
त्याच्या स्वभावातील नम्रता किंवा अन्य काही गुण असू शकतील.

In reply to by हेमंतकुमार

प्रेम म्हणजे पुढील ३ गोश्टींचा कमीजास्त प्रमाणातील मिलाफ होय... १) कंफर्ट २) सेक्योरीटी ३) स्कार्सीटी आपण प्रेमात पडतो अशा व्यक्तीच्या जी आपल्याला १) कंफर्ट कंफर्ट (झोन) देते, काळजी घेते. उदा. आइ... लहानपणापासुन तिने आपले सर्व हवं नको ते बघितलं आहे... लाड केले आहेत, काळजी घेतली आहे, तिच्या मायेची उब आपल्याला तिच्या का प्रेमात पाडणार नाही ? २) सेक्योरीटी आर्थिक, मानसीक, शारीरीक, सामाजीक... ३) स्कार्सीटी लिमीटेड एडिशन. त्याचा तिचा स्वभाव, शिक्षण, पैसा, समजुतदारपणा, रुप, हुद्दा अथवा इतर कोणताही गुण जो आपल्याला लिमिटेड एडिशन वाटतो... व दुसरा असा सहजी मिळणार नाही हा भाव प्रकट वा अप्रकट मनात तयार होतो... वरील तिन बाबींचा कमीजास्त मिलाफ आपल्या आर्थिक, मानसीक, शारीरीक, सामाजीक गरजेनुसार आपल्याला ज्या व्यक्तीत दिसतो तिच्याकडे आपण नैसर्गीकपणे आकृश्ट होतो.

In reply to by गॉडजिला

वरील तिन बाबींचा कमीजास्त मिलाफ
>> सहमत !

In reply to by चामुंडराय

Pheromones are substances which are secreted to the outside by an individual and received by a second individual of the same species. Many examples exist in animals but their role in humans remains uncertain since adults have no functioning vomeronasal organ, which processes pheromone signals in animals. - जालावरुन सभार

In reply to by कॉमी

गॉजि, Pheromones हा रोचक विषय आहे खरा. परंतु त्यासंदर्भातील मानवी संशोधन अद्याप अपुरे आहे. .. कॉमी, छान :))

In reply to by कॉमी

एखाद्याला आपण मनातुन (आणि क्रुतितुन) स्वेछ्चेने (द्वेशभावने न्हवे) जे अटेंशन देतो ते प्रेम होय... मग हे अटेंशन अगदी देवाला दिलेले असो कि पाळिवप्राण्याने त्याच्या मालकाला दिलेले असो अथवा एका व्यक्तिने दुसर्‍या व्यक्तिला मैत्री भावनेने दिलेले असो... की एखाद्या व्यक्तीने विशीष्ठ विचारसरणीला दिलेले असो.... वगैरे वगैरे वगैरे. पण हे अटेंशन निर्माण होण्याचे मुलभुत तिन नियम जे मी वर लिहले तेच आहेतच... ते नियम भौतीक जगात तरी कधीच मोडले जात नाहीत. हे नियम अर्थातच कोण्या ग्रंथातुन न्हवे तर तठस्त ओब्जरवेशन मधुन माझ्या प्रमाणे कोणालाही उमजुन येउ शकतात

या धाग्याचा विषय असलेला मराठी चित्रपट 'असेही एकदा व्हावे' आत्ताच पाहिला. युट्युबवर आहे. चांगला आहे. उमेश कामत, तेजश्री प्रधान, कविता लाड, अजित भुरे. ज्यांना भावनाप्रधान चित्रपट आवडतात त्यांनी जरूर पहावा.