Skip to main content

शिव त्रिगाथा

लेखक अभिजित भिडे यांनी शनिवार, 03/08/2019 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान शंकर..रुद्र .शिव.. नीलकंठ.मूळ त्रिदेवांपैकी एक .. जनक ब्रह्मा , पालक विष्णू आणि संहारक महेश..सृष्टीचा समतोल राखणारा शिव. देव आहे का नाही हे मला माहित नाही पण देवत्वाच्या समीप जाणारी जर एखादी शक्ती असेल तर ती आपल्या कायेमध्ये चेतना फुंकणारी आणि आंतरिक प्रेरणा देणारी शक्ती होय. अशाच आंतरिक प्रेरणेने एक I.I.M उच्च विद्याविभूषित , बड्या वित्त कंपनीत उच्चपदावरील अधिकारी शिवभक्त अमिश त्रिपाठी सगळं हातचं सोडून भगवान शंकरावर पुस्तक लिहितो काय आणि rest is the history...शिव त्रिगाथा ही भारतीय साहित्यविश्वात अल्पाधि वेळात सर्वाधिक खपाची पुस्तके ठरतात.. हे सगळेच विलक्षण व अचंबित करणारे .. भगवान शंकराला 4000 वर्षांपूर्वीच्या तिबेट मधील एका भटक्या टोळीचा प्रमुख म्हणून मांडताना भारतीय संस्कृती व हिंदूच्या ह्या देवतेबद्दलच्या श्रद्धेला जराही छेद जाऊ न देण्याचे 'शिवधनुष्य' अमिश यांनी विलक्षण बुद्धिमत्ता , अफाट कल्पनाशक्ती व सुसंगत तर्कशुद्ध मांडणीच्या बळावर लीलया पेलले आहे. Immortals of Meluha, Secrets of the Nagas आणि Oath of the Vayuputras ह्या तीन पुस्तकांच्या संचात भटक्या शिव ते नीलकंठ महादेवापर्यंतचा प्रवास अतिशय ओघवत्या भाषेत व कमालीच्या बारकाव्यांसकट मांडला आहे . पौराणिक पात्रे(दक्ष , सती , नंदी , गणपती , कार्तिकेय इत्यादी ) भौगोलिक स्थळे (अयोध्या , मगध , काशी ) समकालीन संस्कृती (इजिप्त , इराक )यांचा अचूक संदर्भ तसेच समुद्र मंथनातून अमृत निर्मिती , देवासूर युद्ध गणपतीचा जन्म , सरस्वती नदीचे लुप्त होणे , निळकंठाचे रहस्य आदी पौराणिक चमत्कृतीना दिलेली तार्किक जोड आपल्याला शिव कमालीचा विश्वसनीय बनवतात. तसेच अमृतामधील (इथे सोमरस )संभाव्य अँटिऑक्सिडंट गुणधर्म , तिसरा डोळा (कुंडलिनी चक्र ), बिनतारी परस्पर संवाद ,अण्वस्त्रे , मेंदूत विचारांमुळे होणारी कंपने ह्या व अशा अनेक वैज्ञानिक स्पष्टीकरणांमुळे हि त्रिगाथा केवळ fiction न राहता आपल्याला नविन दृष्टिकोन देते. अमिश त्रिपाठी त्यांच्याह्या त्रिगाथेतून पौराणिक आशयाआधारे अतिशय सखोल विचार मांडतात. सुष्ट व दुष्ट ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत व ह्या दोन्ही प्रवृत्ती पूर्णपणे कधीच नष्ट होऊ शकत नाहीत फक्त समीकरणातून समतोल राखण्यापुरते बाहेर काढाव्या लागतात इत्यादी. अजूनही बरेच काही लिहिण्या सांगण्यासारखे आहे पण प्रत्यक्ष गोष्ट सांगून वाचनातील मजा कमी करण्याचा प्रमाद मी करू इच्छित नाही व तसे करणे योग्यही नाही... हर हर महादेव ....
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3904
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अमिश ची पुस्तके लहान काय मोठ्यांनीही वाचू नयेत सीता भयानक गुंतागुंत आहे ती रामापेक्षा मोठी असते, रावणाची मुलगी असते, वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यात चढाओढ असते आणि एक जण रामाला आणि एक जण सीतेला आपापले उमेदवार म्हणून पूढे करत असतात, त्यांच्यात स्पर्धा असते, वनवासात जातात तेव्हाही रामाच्या नकळत सीतेने तिचे लोक अवतीभवती ठेवलेले असतात तुम्ही राम वाचला का त्याचा ते तर अजून डेंजर प्रकरण आहे त्यात दशरथ आणि रामात वितुष्ट असतं, तो त्याला अपशकुनी मानत असतो मंथरा ही धनाढ्य सावकार असते आणि तिच्या मुलीवर बलात्कार आणि खून होतो, सेम निर्भया हत्याकांड त्यात एक अल्पवयीन असतो तो सुटतो कारण राम म्हणतो नियमानुसार त्याला शिक्षा देता येत नाही मग ही रामावर खुन्नस खाऊन त्याला वनवासाला पाठवते वगैरे पुराणाच्या नावाखाली काहीही छापतो आणि आजकालची फास्टफूड टेक्नोसॅव्ही पिढी तेच खरं आणि भारी मानून चालते

In reply to by महासंग्राम

शिवा ट्रिलॉजी अत्यन्त फसवं प्रकरण आहे. एव्हडीच जर का कल्पनाशक्ती आहे तर दैवी पात्र बाजूला करून हवं त्या फँटसी लिही ना बाळा अमिश असेच म्हणावेसे वाटते. नक्की कौतुक करू.

ज्याच्या त्याच्या टेस्टवर अवलंबुन आहे. काय वाचायचे काय नाही! चांगले वाईट ठरवणारे आपण कोण!

In reply to by जालिम लोशन

असाच नाही काही. फँटसी च्या नावाखाली तुम्हाला इतिहास आणि श्रद्धांची मोडतोड करण्याचा अधिकार मिळत नाही. नैतिक अधिकार म्हणतोय मी. एकदा कायदेशीर अधिकार म्हटलं तर एम एफ हुसेन पण पुरोगामीच ठरतो, पण मी तरी तितका प्रतिगामी नाही. सध्या मराठी वाहिन्यांच्यावर इतिहास आणि पुराणांच्या नावाने जो नंगानाच चालू आहे त्या पार्श्वभूमीवर हे जास्त अधोरेखित होते आहे.

In reply to by आनन्दा

अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की हे सगळे काही पैश्यावर अवलंबून असते. आपण पुस्तके विकत घेणे थांबवले / मालिका बघणे थांबवले तर मग असले उद्योग करायचा काहीच मोटिव्ह राहत नाही. त्यामुळे आता आर्थिक नाकाबंदी हाच एकमेव उपाय आहे या निष्कर्षावर मी आलो आहे.

अत्यंत पकाऊ पुस्तके आहेत ही. मराठीत जरातरी बरी वाटली वाचायला. इंग्रजीत वाचताना उगाचच पहिली दुसरीतल्या मुलांचे प्रौढ साक्षरता वर्गाचे पुस्तके वाटली