मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

युगांतर - आरंभ अंताचा भाग १६

मृणालिनी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
हस्तिनापुर महाल. पुर्वदिशेला सुर्यदेवांचे आगमन झाले तसे महालाच्या खिडकीतून किरणांनी कक्षेत प्रवेश केला. अंबिकेला वरच्या कक्षात जाण्याची आज्ञा राजमातांनी दिली आणि तिने कक्षात प्रवेश केला. तो कक्ष एका दिव्य प्रकाशाने व्यापलेला होता. तिव्र प्रकाश असह्य होऊन तिने डोळे गच्च मिटले. सत्यवती आतुरतेने येरझाऱ्या घालत होती. "माते" महर्षी व्यासांचा आवाज ऐकून सत्यवती त्यांच्या जवळ आली. "पुत्र व्यास.... अंबिकेला....." "पुत्र होईल, माते. परंतु...." "परंतु काय?" सत्यवती मनातून घाबरली. "तो अंध असेल." सत्यवती हातपाय गळल्या सारखी व्यासांकडे बघत राहिली. "मी दिव्यशक्तीला आवाहन केले होते, माते. त्या शक्तीपुढे तिने डोळे मिटून घेतले. तिच्या उदरात असणारा जीव, त्या क्षणाची तिचीच प्रतिमा असणार आहे." सत्यवती स्वतःला सावरत म्हणाली, "व्यास, अंध व्यक्ती राजा नाही बनू शकत. हस्तिनापुरची राजगादी एका सुदृढ व्यक्तीच्याच हाती असायला हवी." "परंतु माते, हा नियतीचे निर्णय आहे. तो बदलण्याचा प्रयत्न म्हणजे काळाचे चक्र उलट्या दिशेने फिरवण्याची व्यर्थ कल्पना आहे." "व्यास, तू पुन्हा शक्तीला आवाहन कर.... अंबालिकेसाठी." "जशी आपली आज्ञा!" सत्यवतीने अंबालिकेला आज्ञा पठवली. तिने कक्षेत प्रवेश केला तेव्हा व्यासांच्या सभोवती तेजोवलय निर्माण झाले होते. अंबालिका घाबरली. अमानवी शक्ती! भितीने तिचे हातपाय गार पडले. व्यासांनी खिन्न मनाने सत्यवतीला कळवले. होणाऱ्या पुत्राचे स्वास्थ्य ठिक राहणार नाही हे कळाल्यावर सत्यवती खिन्न झाली. व्यासांना पुन्हा आज्ञा देणे तिच्या जीवावर आले होते. पण हस्तिनापूरची राजगादी....! "अजून एक संधी दे!... अंतिम संधी!" अंबिकेला पुन्हा आज्ञा मिळाली. " अंबालिके, तु जा. " "तिथे काहीतरी भयंकर आहे. तो प्रकाश, ती प्रखरता..... मी नाही जाऊ शकत. मला भिती वाटते." "हो? पण मग मी तुला दिलेल्या आज्ञेचे काय?" "पण आज्ञा तर तुम्हाला मिळाली होती." "ती च मी तुला दिली ना.... आता तुला ती पूर्ण कशी करायची ते तू ठरवं!" "असे? मग तुम्ही ही आज्ञा एखाद्या दासीला का देत नाही?" अंबिकेला ही कल्पना आवडली. लगेच त्याची अंमलबजावणी करत दासीला कक्षात जाण्याची आज्ञा दिली गेली. दासी कक्षात गेली. दिव्य शक्तीच्या तेजकिरणांमध्ये उजळून निघालेल्या व्यासांकडे पाहून तिने आदरपुर्वक नमस्कार केला. "माते, होणारा पुत्र धर्म आणि न्याय जाणणारा असेल. ज्ञानी बनेल." व्यास सत्यवती च्या कक्षात प्रवेश करत म्हणाले आणि सत्यवतीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. व्यासांकडे बघून ती काही बोलणार, इतक्यात ते म्हणाले, " परंतु माते, त्या पुत्राची माता दासी असणार आहे." "दासी?" सत्यवतीला मोठ्ठा धक्का बसला. "हो माते! कक्षात मी दिव्य शक्तीचे आवाहन केले तेव्हा एका दासीने प्रवेश केला." कोसळल्यासारखी ती आसनावर बसली. राण्यांचे पुत्र अंध, स्वास्थ्यहिन.... आणि दासीचा बुद्धीमान? काय लिहिले आहे हस्तिनापुरच्या राजगादीच्या नशिबी? "परंतु माते, दासीला होणारा पुत्र हस्तिनापूरच्या राजगादीशी निष्ठावान राहील. न्यायबुद्धी, धर्माचरणात कोणी त्याच्याशी स्पर्धा करू शकणार नाही." सत्यवती ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती आसवं गाळत बसून राहिली. काही वेळ व्यासही शांत उभे राहिले. "आज्ञा आहे, माते?" व्यासांनी हात जोडून निघण्याची परवानगी घेतली. सत्यवतीने दु:खी नजरेने त्यांच्याकडे पाहिले. "तु तुझे योग साधनेचे पुण्य या राजघराण्याच्या पदरी अर्पण केलेस, व्यास! कसे आभार मानू तुझे?" "माते, वृक्षाचे बिज कधी वृक्षाच्या सावलीकरता त्याचे आभार मानते का? आज्ञा असावी." सत्यवतीने मान होकारार्थी हलवली. #युगांतर_आरंभ_अंताचा ©मधुरा

वाचने 4529 वाचनखूण प्रतिक्रिया 16

nishapari 31/07/2019 - 15:48
The queens were raped . सत्याला धरून लिहिणं कठीण वाटलं म्हणून दिव्य शक्तीला आवाहन वगैरे शुगर कोटिंग केल्यासारखं झालं आहे हे ... तुम्ही कुठलं महाभारत संदर्भ म्हणून घेता आहात माहीत नाही ... पण आजवर जेवढी पुस्तकं वाचली आहेत त्यात नियोग म्हणजे दिव्य शक्तीला आवाहन असं कुठेही वाचलेलं नाही ... मूळ अर्थच कमीतकमी कटू शब्दात मांडला आहे सर्व लेखकांनी ... अंबिकेने डोळे मिटून घेतले आणि अंबालिका भीतीने बेशुद्ध पडली ... त्याच अवस्थेत व्यासांनी कार्यभाग उरकला ... सत्य महाभारत खूप कटू आहे

In reply to by nishapari

The queens were raped .
अहो, कसं शक्य आहे ? आपण किती प्रगत होतो , जेनेटिक बायोटेक्नो वगैरे वगैरे वगैरे... दिव्य शक्ती म्हणजेच ऍडव्हान्स सायन्स हे पण तुम्हाला माहीत नाही ? आणि शास्त्र आलं म्हणजे गुंतागुंतीच्या किचकट वैद्यकीय प्रक्रियाही आल्याचं कि... कीतीतरी वेळा रुग्ण दगावतो, बेशुद्ध होतो, घाबरतो, हे सर्व व्यक्तिपरत्वे, त्यांचे आरोग्य व मानसिक स्थैर्य कसे आहे त्यावर डिपेंड असतं उगा आमच्या अतिप्रगत वैज्ञानिक संस्कृतीला बट्टा लावणारे समज आपण असे कसे काय पाळू शकता ?

In reply to by nishapari

नेत्रेश 01/08/2019 - 07:11
रेप होताना डोळे मिटले तर आंधळे मुल जन्माला येते का? रेप होताना स्त्री घाबरली तर रोगी मुल जन्माला येते का? रेप मुकाट्याने सहन केला तर बुद्धीमान व न्यायी मुल जन्माला येते का? सामान्य माणसाला ३ रँडम स्त्रीयांवर एकाच दीवसात प्रत्येकी एकदा रेप करुन त्या तीघीनांही प्रेग्नंट करणे व तीघीनांही मुलगेच होणार याची गॅरेंटी देणे शक्या आहे काय?

In reply to by नेत्रेश

मृणालिनी 04/08/2019 - 20:55
अगदी मुद्द्याचे लिहिलेत. धन्यवाद! तुमचा प्रतिसाद वाचून बरं वाटलं. निदान कोणीतरी तर्कशील आणि बुद्धीवादी प्रतिक्रिया देते आहे हे पाहून आनंद झाला.

In reply to by मृणालिनी

मृणालिनी 04/08/2019 - 20:56
नेत्रेश जी!

श्वेता२४ 31/07/2019 - 17:50
प्रत्येक लेखात आधीच्या लिखाणाची लिंक देता आली तर पहा. शोधण्याचा त्रास वाचेल व सर्व भाग एकत्र वाचायला मिळतील.

In reply to by मुक्त विहारि

अभ्या.. 31/07/2019 - 23:17
पर्वत म्हणाले की दऱ्या आल्याच, कंगोरे म्हणाले की खोली आलीच. अशा खोलीत न शिरता कंगोऱ्याच्या टोकावर अलगद विसावलेले मुविकाका क्षणभर मुकेश खन्नागत सॉरी सॉरी पितामह भीष्मांगतच भासले जणू. हलकी घ्या हो शरशय्या मुवि. ;)

In reply to by अभ्या..

हे असे साहित्य मला तरी आवडते. शिवाय महाभारत ही अलौकिक कलाकृती आहे. तो इतिहास नाही. त्यामुळे आमचे पूर्वज अण्वस्त्रे बनवायची, अशा गोष्टींवर विश्वास नाही.... हॅरी पॉटर मधले जग जितके वास्तव आहे तितकेच महाभारत...

In reply to by मुक्त विहारि

प्रचेतस 01/08/2019 - 08:34
कुठल्याही साहित्यकृतीत तत्कालीन सामाजिक जीवनातील चालीरितींची बीजे रुजलेली असतातच. नियोग हा त्यापैकीच एक. चिं. वि. वैद्य लिखित महाभारत-उपसंहार ह्या बृहद्खंडातील नियोगविषयक प्रकरण मूळातूनच वाचण्यासारखे आहे. महाभारत ही ज्याप्रमाणे सत्यकथा मानता येणार नाही तद्वतच तिला पूर्णपणे असत्यदेखील मानता येणार नाही. खरंच ही एक अलौकिक साहित्यकृती आहे.