मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

लोकशाही ‘शाई’ पुरती!

डॉ. सुधीर राजाराम देवरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
- डॉ. सुधीर रा. देवरे भारताचे तमाम लोक हे नागरिक नाहीत. फक्त मतदार आहेत. भारताचे लोक स्वत:ला ‘जागरूक नागरिक’ समजतात. आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे असं समजून मतदान करतात. वीस- पंचवीस उमेदवारांपैकी मतदारांना एकही पसंत नसतो, पण निवड न करता कसं चालेल, म्हणून तो कोणाला तरी मतदान करतो. NOTA पर्यायही स्वीकारतो. (नोटा पर्याय निवडणं म्हणजे बोटाला शाई लावण्यापुरतं मतदान करणं.) इतक्यांपैकी नागरिकांना एकही उमेदवार योग्य वाटू नये, हे खरं तर उमेदवारांनाच लज्जास्पद वाटलं पाहिजे. दिवसेंदिवस नोटावरचं मतदान वाढतंय, याचं चिंतन मतदारांनी नव्हे, तर उमेदवारांनी- पक्षांनी केलं पाहिजे. (अनेक गुन्हेगार प्रवृत्तीचे लोकही निवडणुकी लढवतात. या लोकसभा निवडणुकीत भाजपचे 124 तर काँग्रेसचे 107 उमेदवार गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. इतर पक्षातही अशीच परिस्थिती आहे. या शिवाय अनेक उमेदवारांची शैक्षणिक पात्रता दहावीच्या आत आहे. हे सगळे लोक संसदेत आपले प्रतिनिधीत्व करत कायदे पास करणार.) काहीही कारण नसताना अनेक मतदारांनी कोणत्या तरी पक्षाला बळजबरी जोडून घेतलेलं दिसतं. विशेषत: तरूण मतदार. कोणताही सखोल अभ्यास नसताना असे लोक एखाद्या पक्षाची वा नेत्याची सोशल मीडियावरून खुशामत करू लागतात. वर वर चमकणार्याा कामाला हा वर्ग भाळतो. भाषणबाजीला बळी पडतो. तथाकथित अस्मितेच्या आहारी जातो. (ज्या अस्मितेचा त्याने कधी अभ्यास केलेला नसतो.) स्वत:ला मोठ्या प्रमाणात प्रचार कार्यात गुंतवून घेतो. मतदान करून बोटाची शाई दाखवत मीडियावर झळकतो. (निदान शाई लावलेल्या बोटाचा फोटो अपलोड करता यावा, यासाठीही आता मतदान होऊ लागलं.) असं असलं तरी हरकत नाही, पण आपल्या आवडत्या नेत्याविरूध्द वा पक्षाविरूध्द कोणी काही बोललं तर हा वर्ग बोलण्यात हिंस्त्र होतो. अशोभनिय ट्रोल करतो. गरीबीमुळे काही लोक केवळ शे- दोनशे रूपयात कोणालाही मतदान करतात. कोणी दारू वा पार्टीच्या बदल्यात मतदान करतो. (हजार, लाखो वा कोटीच्या बदल्यातही असं मतदान व्हायला नको. पैशांच्या बदल्यात मतदान होतं, असं म्हणायला आपल्याकडे कोणताही पुरावा नाही. पण निवडणुकीच्या धामधुमीत सर्वदूर जे पैसे सापडू लागतात ते कशासाठी असतात? पैसे, दारू वा पार्टी घेऊन मतदान केल्याचं काही लोक खाजगीत कबूल करतात.) आणि काही लोक आपलं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडतात. (मात्र निवडून येणारे लोक आपल्याला पाच वर्ष झुलवत ठेवतात. काम करण्याऐवजी आपल्याकडूनच मान घेत राहतात.) निवडणूक काळात नागरिक आपले मूळ प्रश्न विसरतात. उदाहरणार्थ, निवडणुकीच्या राष्ट्रीय धावपळीत एखाद्या नागरिकाने स्थानिक पाणी प्रश्न उपस्थित केला तर तो नागरिक पोटार्थी ठरू शकतो. (अथवा विरोधी पक्षाचा हस्तक.) निवडणुकीसारख्या इतक्या मोठ्या पवित्र कार्यात केवळ पिण्यासाठी पाणी मिळावं, अशी क्षुद्र मागणी करणं हा मूर्खपणा आहे, असं उमेदवारच नाही तर ‘जागरूक नागरिक’ही म्हणू शकतो. आपण एखादा जनहिताचा प्रश्न मांडतो. उदाहरणार्थ, मोकाट कुत्रे – डुकरांचा बंदोबस्त व्हावा. काही लोक आपल्याला पाठींबा देतात. वर्तमानपत्रात बातम्या झळकतात. लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत अजिबात प्रतिसाद देत नाहीत. पुन्हा प्रश्न उपस्थित करावा. तरी दुर्लक्ष. विषय जुना झाला म्हणून इतर नागरिकही या विषयावर बोलणं बंद करतात. वृत्तपत्रवाले म्हणतात, अशी बातमी आम्ही जानेवारीत दिली होती, मग पुन्हा एप्रिल मध्ये कशाला? प्रश्न उपस्थित करणार्यातलाही हळूहळू जाणवू लागतं : ज्या अर्थी लोकप्रतिनिधी या प्रश्नाकडे कानाडोळा करतात. नागरिकही प्रतिसाद देत नाहीत. त्याअर्थी हा प्रश्न, प्रश्नच नसावा. आपणच मुर्ख आहोत. म्हणून आपल्याला ही समस्या वाटते. प्रश्न उपस्थित करणारा या व्यवस्थेला नव्हे, तर स्वत:लाच दोष देत गप्प बसतो. व्यवस्थेविरूध्द जाऊन कसं चालेल? पाणी समस्येची गोष्ट तर या आधी सांगितलीच आहे. (कोणता लोकप्रतिनिधी कोणत्या समस्या सोडवू शकतो? कोणत्या लोकप्रतिनिधीच्या कक्षेत कोणत्या समस्या येतात? वगैरे मुद्दयांची इथं चिकित्सा करू नये. मुख्यमंत्री असो, खासदार असो, आमदार असो वा नगरसेवक; हे उदाहरण प्रातिनिधीक समजावं.) तुम्ही पाणी मागणार, सरकार तुमची अस्मिता जागृत करेल. तुम्ही स्वस्ताई मागणार, सरकार स्मारक देईल. तुम्ही शिक्षण मागणार, सरकार दररोज 2 जीबी फ्री इंटरनेट देईल. तुम्ही आरोग्य मागणार, सरकार जगातील सगळ्यात उंच पुतळा देईल. तुम्ही हमी भाव मागणार, सरकार पीक विमा कंपन्यांना कोट्याधीश करील. तुम्ही रोजगार मागणार, सरकार सरकारी कंपन्यांना टाळे लावणार. तुम्ही काम मागणार, सरकार तुमच्यावर भाषणांच्या फैरी झाडेल. तुम्ही टीका करणार, सरकार तुम्हाला अराष्ट्रवादी ठरवेल! आपल्याला वाटतं अमूक एक नेता अमूक एका पक्षाशी एकनिष्ठ आहे. पण तिकीट मिळालं नाही की रातोरात नेत्याची निष्ठा बदलते आणि तो आपल्या तत्वात न बसणार्या पक्षात प्रवेश करतो. तत्व फक्त सामान्य माणसासाठी आहेत. नेत्यांचं तिकीट हेच तत्व. सत्ता मिळत असेल तर आपल्या तत्वाशी हे लोक पावलोपावली तडजोडी करतात. तरीही असे लोक केवळ सत्ताप्रेमी कसे असणार? ते देशप्रेमीच असणार. देशावर भरभरून प्रेम करता यावं म्हणून तर ते नेहमी सत्तेच्या सिंहासनाखाली बसतात. असो. आता लवकरच निकाल जाहीर होईल. खासदार निवडून येताच त्यांचा सत्कार केला पाहिजे. तेवढंच आपल्याला जमतं. निवडून देणार आपण आणि त्यांचा सत्कारही आपणच करायचा. तुमची महत्वाची समस्या लांबवत नेमकी निवडणुकीच्या तोंडावर मंजूर करून आणायची. आचारसंहिता लागताच ती बासनात गुंडाळून ठेवायची आणि मंजूर केलेल्या योजनेचा प्रचार करायचा. नंतर येणारं सरकार तुमची समस्या पुन्हा नव्याने अभ्यासणार. (प्रत्येक मतदारसंघात दरवर्षी काही रक्कम खर्ची घालावी लागते. जिथं या रकमेवर भरपूर मार्जिन मिळेल, तिथं ती खर्ची घालायची. मार्जिन नसेल तर विकास कामाचा पैसा परत जाऊ द्यायचा. पण काम करायचं नाही.) लोकशाही ही लोक’शाई’पुरती उरली. (बोटाला शाई लावून सरकार निवडून देण्यापुरती.) आपण फक्तह लोकप्रतिनिधी निवडून देतो. त्याने पाच वर्षात काय करायचं, हे आपण म्हणजे मतदार ठरवू शकत नाही. मतदान केल्यानंतर असं विचारण्याचा मतदाराला अधिकारच काय? लोकांचा लोकप्रतिनिधीवर वचक नाही. लोकांना लोकप्रतिनिधी बदलायचा हक्क आहेच, पण तो पाच वर्ष पूर्ण झाल्याशिवाय नाही. (दिनांक 8-5-2019 च्या ‘अक्षरनामा’त प्रकाशित झालेला लेख. या लेखाचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह ब्लॉगचा संदर्भ द्यावा ही विनंती.) – डॉ. सुधीर रा. देवरे ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/

वाचने 12891 वाचनखूण प्रतिक्रिया 39
आपण फक्तह लोकप्रतिनिधी निवडून देतो. त्याने पाच वर्षात काय करायचं, हे आपण म्हणजे मतदार ठरवू शकत नाही. मतदान केल्यानंतर असं विचारण्याचा मतदाराला अधिकारच काय? लोकांचा लोकप्रतिनिधीवर वचक नाही. लोकांना लोकप्रतिनिधी बदलायचा हक्क आहेच, पण तो पाच वर्ष पूर्ण झाल्याशिवाय नाही +१००

श्री गावसेना प्रमुख 17/05/2019 - 10:19
(तुम्ही पाणी मागणार, सरकार तुमची अस्मिता जागृत करेल. तुम्ही स्वस्ताई मागणार, सरकार स्मारक देईल. तुम्ही शिक्षण मागणार, सरकार दररोज 2 जीबी फ्री इंटरनेट देईल. तुम्ही आरोग्य मागणार, सरकार जगातील सगळ्यात उंच पुतळा देईल. तुम्ही हमी भाव मागणार, सरकार पीक विमा कंपन्यांना कोट्याधीश करील. तुम्ही रोजगार मागणार, सरकार सरकारी कंपन्यांना टाळे लावणार. तुम्ही काम मागणार, सरकार तुमच्यावर भाषणांच्या फैरी झाडेल. तुम्ही टीका करणार, सरकार तुम्हाला अराष्ट्रवादी ठरवेल!) मी पण खांदेशात राहतो तुमची मानसिकता समजु शकतो.खांदेशात अजुन म्हातार्‍या लोकांवर काँग्रेस चा पगडा बर्‍यापैकी आहे.

In reply to by श्री गावसेना प्रमुख

डॉ. सुधीर राजा… 17/05/2019 - 17:38
तुम्हाला नक्की काय म्हणायचं आहे समजलं नाही. असो. आपण भाजपचे दिसता. मी फक्त नागरिक आहे. काँग्रेेसचा नाही

सुबोध खरे 17/05/2019 - 12:32
हे सर्व प्रश्न तुम्ही मांडले आहेत याची उत्तरे कुठे आहेत? DO YOU WANT TO BE PART OF PROBLEM OR PART OF SOLUTION? असा प्रश्न लष्करात नेहमी विचारला जातो. याचा अर्थ असा आहे आहे त्या तुटपूंज्या साधन संपत्तीत तुम्हाला काम करायचा आहे कि केवळ रडारड?

डॉ. सुधीर राजा… 17/05/2019 - 17:40
लष्करची गोष्ट वेगळी आपण नागरिक आहोत. म्हणून नुसत्या मतदारांना जागं करून पाहू. व्यवस्था हलवून पाहू

In reply to by डॉ. सुधीर राजा…

सुबोध खरे 18/05/2019 - 11:51
व्यवस्था हलवून पाहू गावच्या तलाठ्याच्या टेबलावरील कागद ढीम हलत नाही आणि तुम्ही व्यवस्था हलवायला निघालात? व्यवस्था समजली तरी आहे का तुम्हाला?

In reply to by डॉ. सुधीर राजा…

सुबोध खरे 21/05/2019 - 09:31
व्यवस्था समजून घेणे हे काय चहाच्या कपाबरोबर मारलेल्या शिळोप्याच्या गप्पा आहेत? एक साधी गोष्ट करून पहा. आपल्याला सरकारी कोट्यातून जमीन मिळावी याचा अर्ज करून पहा. त्यासाठी असलेले नियम, ते कुणी बनवलेले आहेत, कुठे मिळतील त्यात आपण बसतो का? नसेल तर का नाही आणि असेल तर त्याची प्रक्रिया काय हे प्रथम संपूर्णपणे समजून घ्या. हा

केवळ एक कागद

मंत्रालयापर्यंत सामान्य प्रक्रियेने हलवून पहा मग व्यवस्था हलवायच्या गोष्टींबद्दल चर्चा करू.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

सोन्या बागलाणकर 20/05/2019 - 05:17
देवरे साहेब, भावनिकदृष्ट्या आपलं म्हणणं बरोबर असलं लोकशाहीचा अर्थच हा आहे कि उपलब्ध पर्यायांपैकी जो पर्याय तुलनात्मकदृष्ट्या बरा आहे त्याला मत द्यावे. शेवटी कोणीच धुतल्या तांदळासारखे नाहीये, मत मागणारे किंवा मत देणारे, नाही का? का तुम्हाला कम्युनिस्ट राजवट मान्य आहे ज्यात बळी तो कान पिळी? शिवाय तुम्हाला व्यवस्था हलवायची आहे म्हणजे नक्की काय करायचे आहे? नाही म्हणजे समजा सध्याचे सरकार नको आहे तर कोण चांगला पर्याय आहे आणि कसा? तुम्हाला जर व्यवस्था हलवायचीच असेल तर जनजागृती करून काही होणार नाही. त्यापेक्षा तुम्ही एखादा पक्ष काढा आणि स्वतः व्यवस्था बदलून दाखवा अन्यथा आहे त्यात समाधानी राहा. लोक जर बाटली किंवा पैश्यांच्या लालसेला बळी पडून मत देत असतील तर त्यांनी रामराज्याची अपेक्षा करूच नये. कारण तुम्हीच म्हणालात त्याप्रमाणे जनतेला तिच्या लायकीप्रमाणेच सरकार मिळते.

जानु 17/05/2019 - 21:46
तुम्ही म्हणता त्या नुसार (तुम्ही पाणी मागणार, सरकार तुमची अस्मिता जागृत करेल. तुम्ही स्वस्ताई मागणार, सरकार स्मारक देईल. तुम्ही शिक्षण मागणार, सरकार दररोज 2 जीबी फ्री इंटरनेट देईल. तुम्ही आरोग्य मागणार, सरकार जगातील सगळ्यात उंच पुतळा देईल. तुम्ही हमी भाव मागणार, सरकार पीक विमा कंपन्यांना कोट्याधीश करील. तुम्ही रोजगार मागणार, सरकार सरकारी कंपन्यांना टाळे लावणार. तुम्ही काम मागणार, सरकार तुमच्यावर भाषणांच्या फैरी झाडेल. तुम्ही टीका करणार, सरकार तुम्हाला अराष्ट्रवादी ठरवेल) असे झाल्यावर सुध्दा जनतेने जर सद्य सरकारला निवडुन दिले तर तुम्ही काय समजणार ते सांगितले तर बरे होईल.

In reply to by जानु

नाखु 17/05/2019 - 23:20
ब्लॉग-माझा आणि माझे लिखाण या परीभ्रमण कक्षेतून बाहेर आले नसल्याने कुठल्याही प्रकारच्या उत्तर उपाययोजना यांस बांधील नाहीत. सबब प्रश्न विचारणे हेच विचार मंथन आणि प्रबोधन आहे यावर अविचल निष्ठा आहे

In reply to by नाखु

डॉ. सुधीर राजा… 18/05/2019 - 17:03
इथे सरकारवर नागरिकांच्या दृष्टीकोनातून काही लिहिले तरी बर्‍याच लोकांना मिर्ची लागते. कारण काही समजत नाही. दुसर्‍या विचारांचे लोक मिपावर आहेत की नाही?

In reply to by डॉ. सुधीर राजा…

सरकारच्या विरोधी लिहणे चुक नाही. आक्षेप यावर आहे की पैसे घेउन मतदान करणे, अस्मिता पेटविणे हे काही आज सुरु झाले नाही तसेच या सरकारने सुरु केले नाही. जनतेला आणि नेत्यांना हा जवळचा मार्ग आता सर्वमान्य राजमार्ग झालेला नाही का? आपल्या लेखातुन आणि स्पष्टीकरणातुन हे प्रकार आताच सुरु झालेले आहेत असे जाणवते. मान्य की या सरकारने बदल केला पाहिजे पण तो कश्या आणि कोणत्या प्रकारचा यावर आपल्यासारखे मौन बाळगतात. घेतलेल्या कोणत्याही निर्णयावर पुर्वीच्या सरकारच्या मानसिकतेने आक्षेप घेतात. मला असे एक उदाहरण सांगा की ज्यात विरोधी पक्षाने समर्पक अंमलबजावणी सांगितली आहे.

In reply to by जानु

डॉ. सुधीर राजा… 19/05/2019 - 16:24
आधीपासूनच आहे. पण याचे प्रमाण आज खूप वाढले आहे. उघड उघड ध्रुवीकरण करण्याचे राजकारण सुरू आहे. याला अनेक लोक जबाबदार आहेत. ओवेसी सारखे लोकही अशा कामाला मदत करत आहेत. आपण नागरिक म्हणून अशा गोष्टींवर किमान बोललं तरी पाहिजे. का मतांसाठी हे सुरू ठेवायचं?

In reply to by डॉ. सुधीर राजा…

नाखु 19/05/2019 - 16:31
आजार प्राथमिक लक्षणे असताना आटोक्यात आणायचा असतो का त्याने उग्र स्वरूप धारण केले की?? आपल्या परमपूज्य सरकारांनी गेली पन्नास वर्षे कधीच अल्पसंख्याक तुष्टीकरण केले नाही.आपलेच आदरयुक्त हो तेही आपल्यासारखे डॉ साहेब आहेत ते म्हणाले"या भूमीवरील सर्व नैसर्गिक साधनसंपत्ती वर पहिला हक्क हा याच मुस्लिमांचा आहे"' तेंव्हा आपण संवेदनशील पणा दाखवून असा प्रश्न उपस्थित केला असणारच, फक्त त्या लेखाची लिंक दिली तर बरं होईल. आपला अज्ञ बालक वाचकांची पत्रेवाला नाखु

In reply to by डॉ. सुधीर राजा…

नाखु 20/05/2019 - 20:27
शहाबानो प्रकरणात कोर्टाने दिलेला निर्णय फिरवणे,तीन तलाक कायदाच रखडवणे आणि मुस्लिमांचा पहिला हक्क आहे असं म्हणणं म्हणजे संभाळणे होय, आम्ही क्षुद्र जीवजंतू याला लांगूलचालन आणि लाड करणे समजायचो बरोबर आहे तुम्ही इतकी माहितीची सत्यता पडताळून लिहीता त्यामुळे तुम्ही म्हणताय म्हणजेच आत्ता असहिष्णुता वाढली असणार आहे. बाकी असा गुप्त प्रचार फक्त काॅन्ग्रेसचा करता का आप आणि वंचित विकास आघाडी सुद्धा चालू आहे

In reply to by डॉ. सुधीर राजा…

आता उघड आणि मोठ्या प्रमाणावर होत आहे हेच मुळात चुक आहे. आजवर कधी गांधी परिवाराला हिंदु समाज असल्याची जाणीव झाली होती का? त्यांना काही धार्मिक भावना आणि मत आहे याचा विचार करणे सोडा त्यांचा अनादर करु नये इतपर तरी जाणीव असल्याचे एक उदाहरण दाखवा. आता कितीही मंदीर मंदीर फिरा, तो विश्वास बसणे शक्यच नाही. जरा हिंदुंनी एकी दाखवली तरी तुम्हाला त्यात ध्रुवीकरण दिसते. मायावती, केजरीवाल, कमलनाथ, ममता,काय करतात ते जनता पाहत नाही असे तुम्ही आजही म्हणत असाल तर माझी काहीच हरकत नाही.

In reply to by जानु

डँबिस००७ 20/05/2019 - 17:48
हिंदु समाजाच सोडाच ह्या पुरोगाम्यांना राष्ट्रवादा बद्दलही पुर्व ग्रह आहे. २०१९ ही पहीली निवडणुक होती जिथे राष्ट्रवाद हा मुद्दा होता. ह्या मुद्द्या विरुद्द पुरोगाम्यांनी, डाव्यांनी व काँग्रेसीनी बरेच प्रयत्न केले पण जनता एकच राहीली.

In reply to by डँबिस००७

भंकस बाबा 20/05/2019 - 17:59
अल्पसंख्यकाचे लांगूलचालन आता कमी होईल अशी आशा बाळगायला हरकत नसावी. तरीही जाताजाता केजरिवालने दिल्लीत कोंग्रेसमुळे मुस्लिमाची मते फुटल्याचा आरोप केला आहे. केजरीवाल हा माणूस कसाहि असो ,पण तो राजकीय भविष्य अचूक जाणतो. अगदी अण्णा हजारेंचे आंदोलन हैक करण्यापासून ते कोंग्रेसचे तळवे चाटण्यापर्यंत त्याची दूरदृष्टि दिसून येते

In reply to by जानु

डॉ. सुधीर राजा… 20/05/2019 - 18:11
राजीव गांधींनी शिलान्यास केल्यानंतर मंदिर मुद्दा गाजला. आणि म्हणून भाजप 2 जागांवरून सत्तेत आला. धर्माचा वापर करणे हे फक्त सत्तेसाठी आहे. प्रेम नव्हे

In reply to by डॉ. सुधीर राजा…

भंकस बाबा 20/05/2019 - 19:00
राजीव गांधीना देणार? शहाबानो केसमध्ये तोंड फोडून घेतल्यावर भड़कलेल्या हिंदुना चुचकारण्यासाठी मंदिराचे दरवाजे उघड़े केले होते राजीव गांधीनी! तुमची क़ाय कल्पना आहे की देशातील चाळीस टक्के जनता मूर्ख आहे जिला अल्पसंख्यक तुष्टिकरण समजत नाही? जर भाजपा धर्माची आड़ घेऊन राजकारणात उतरेल तर राहुलबांबाला गळ्यातले जानवे काढून त्याचाच गळफास घ्यावा लागेल. काहीतरी सुसबद्ध उत्तरे द्याल क़ाय?

In reply to by डॉ. सुधीर राजा…

गड्डा झब्बू 19/05/2019 - 22:42
इथे पहिल्या, दुसऱ्या आणी 'तिसऱ्या' विचारांचे लोकहि आहेत. पहिल्या विचारांचे लोक्स डोळे उघडे ठेवून आजूबाजूला काय चालू आहे ते बघतात व त्यावरून आपल मत बनवतात. दुसऱ्या विचारांचे लोक्स त्यांना प्रभावित करू शकतील अशा जमिनीवरील व्यक्तींचे विचार ऐकून वाचून आपले मत बनवतात. आणी 'तिसऱ्या'विचारांचे लोक्स आपण बुद्धीमंत असल्याच्या समजुतीतून काहीही लिहितात. सध्याच्या सरकारने खिरापती वाटणे बंद केल्याने आपल्या अजब आभासी दुनियेत रममाण होऊन कोणालाही उघड्या डोळ्यांनी न दिसणाऱ्या गोष्टी बद्दल लिहून मोकळे होतात. पण त्या आधी सुरु असलेल्या अनिष्ट गोष्टींकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. आता तुम्हीच ठरवा कि तुम्ही या तीन पैकी कुठल्या प्रकारच्या लोकांमध्ये फिट बसता?

डँबिस००७ 19/05/2019 - 17:44
कन्हैया कुमार ला ओळखत नाही ? अहो तोच तो ज्याच्या समोर जे एन यु मध्ये भारत तेरे तुकडे होंगे ईंन्शा अल्ला ! अ श्या घोषणा दिल्या गेल्या , ह्यावर जेंव्हा गदारोळ झाला त्यावेळेला तुमचे लाडके युवराज धावत धावत ह्या तुकडे गँगची बाजु घ्यायला जे एन यु मध्ये गेले होते !

In reply to by डँबिस००७

भंकस बाबा 19/05/2019 - 18:07
खरोखरच ओळखत नसतील कन्हैयाकुमारला! आणि तुम्ही पण असे प्रश्न विचारुन त्यांना अडचणीत आणू नका. जेव्हा चर्चा त्यांच्या विरोधात जाते तेव्हा ते गायब होतात धागा बेवारस सोडून. आणि आम्ही बसतो दळण दळत!

In reply to by डँबिस००७

भंकस बाबा 19/05/2019 - 18:16
कन्हैयाकुमारच्या समोर घोषणा दिल्या नव्हत्या. त्या घोषणा त्याने पण दिल्या होत्या. आणि फक्त कोंग्रेसचे राजकुमार नाही तर डाव्यानी, आपल्या चित्रपटसृष्टीतील पाकिस्तानच्या चमच्यानी, अवॉर्ड वापसी गैंगने देखील पाठिंबा दिला होता. अफझल हम शरमिंदा है तेरे कातिल जिंदा है। अशा अनेक घोषणा दिल्या गेल्या होत्या. आता राजार साहेब अंतर्धान पावतील, आणि नवीन धागा घेऊन उगवतील. माफ करा राजार साहेब! डायरेक्ट तुमच्या कासोट्याला हात घातला.

In reply to by भंकस बाबा

नाखु 19/05/2019 - 19:48
ब्लाॅग ची जाहिरात करायला गेले असल्याने,आणि ते मनमोहनसिंग यांना ओळखत नाहीत तर कन्हैया किस खेत की मुली. एकतर ते कधीच चूकून सुद्धा इतर धाग्यावर येत नाहीत,आता असं करायला ते कवीगण नाहीत पण ते त्यांच्या अलौकिक आणि उच्च विचारामध्ये बसत नसावे.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

भंकस बाबा 20/05/2019 - 19:06
हा साक्षात्कार कधी झाला तुम्हाला? कमीत कमी आपल्या धाग्याच्या शीर्षकाला तरी जागा! लोकसभेसाठी उभा राहिला आहे तो! आणि त्याला जावेद अख्तर, शबाना आजमी , स्वरा भास्करसारखे भारतीयांनी डोक्यावर घेतलेले कलाकार पाठिंबा देत आहेत. का तुम्ही तुम्हाला सोइस्कर असलेल्या मुद्द्यावर लिहिणार? आणि विषयाच्या अनुषंगाने काही आले तर फाट्यावर मारणार?

In reply to by भंकस बाबा

नाखु 20/05/2019 - 20:39
फक्त दुसर्याला मिरच्या लागल्या म्हणूनच हिंडतात खरे तर त्याना सर्व ठिकाणी तेवीस मे रोजी मिरच्या लागणार आहेत,चुणूक नेमकी कालच्या कलचाचणी ने दाखवली आहे म्हणून हा थयथयाट सुरू आहे. आणि एक योगायोग,इशरतप्रेमी आव्हाडसुद्धा डॉ आहेत आणि हे सुद्धा फक्त त्यांच्यात उघडपणे दाढ्या कुरवाळीत, सावरकरांना शिव्या देण्याची कुवत आहे. यांना मिपावर लिखाण टाकून पळायची. हा एकमेव धागा आहे जिथे आपले मुद्दे खोडले की तोल जाऊन प्रतिसाद द्यायला तरी परतले आहेत. मिरची सकट मिपा आव्हाडवंशीयाना कांडपात कुटणारा वाचकांची पत्रेवाला नाखु