Skip to main content

धर्म म्हणजे काय?

Published on गुरुवार, 11/04/2019
(धर्म या शब्दाचा मूळ अर्थ : मूळ : धरणे किंवा बांधून राहणे व सवयीनुसार काळजीपूर्वक पालन करणे. धर्म हा संघटितरीत्या मान्य झालेल्या, एकत्रित जुळत असलेल्या सर्व सामाजिक व वितर्कीय कल्पनांचा संग्रह असतो. धर्माचा निसर्गात अस्तित्वात असलेल्या व्यक्ती, वस्तू, विश्व, इत्यादी गोष्टींशी निगडित असण्याचा दावा असतो. महाभारतानुसार 'ध्रियते लोकोनेनेति धर्मः| धारणाद् धर्ममित्याहुऱ् धर्मो धारयते प्रजाः||' अर्थात 'समाज व प्रजा धारण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठायी आहे तो धर्म.' धर्म नावाची ही अशी एक संकल्पना आहे की जिने आजपावेतो जगातील कोट्यवधी लोकांना सुख, शांतता व समाधान दिले. त्यासोबतच धर्मानेच आजपर्यंतची सर्वात मोठी मनुष्यहानी केली आहे. धर्म या शब्दास अन्य कोणत्याही पाश्चात्त्य भाषेत समानार्थी शब्द नाही. Basic Instinct हा धर्म या शब्दाच्या जवळचा अर्थ असणारा इंग्रजी शब्द आहे. .तरीही हा इंग्रजी शब्द धर्म या भारतीय शब्दाची व्यापकता वर्णू शकत नाही. रिलिजन हा धर्म या शब्दाचा समानार्थी शब्द नाही. सर्व धर्म समान असतात ही एक खुळचट समजूत आहे. वेगवेगळ्या भारतीय दर्शनांमध्ये प्रसंगपरत्वे धर्म या शब्दाचा अर्थ मांडण्यात आलेला आहे. तो तो अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये योग्य आहे, म्हणजेच ते सर्व अर्थ योग्य आहेत असा सरळ तर्क लावता येईल. धृ म्हणजे धारण करणे असा या संस्कृत धातूचा आधार घेतला, तर ज्या विशिष्ट गुण विशेषामुळे एखाद्या वस्तूला, सजीवास त्याचे वेगळेपण प्राप्त झाले असते, त्या गुणविशेषास धर्म असे म्हणता येईल. धर्म या शब्दाचा भाषा, संस्कृती, इतिहास, सभ्यता, समाज इत्यादीशी संबंध जोडला तर त्याचा अर्थ त्या त्या प्रक्षेपामध्ये बदलतो. पण तरीही धर्म या शब्दाचा मूळ ‘अर्थ धारण करावा तो धर्म’ हाच आहे. धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती. धर्म म्हणजे अंगभूत गुणविशेष. व अशी सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती, अंगभूत गुणविशेष हे बाहेरुन आणता येत नाहीत. हे मुळचेच असतात. उदाहरणार्थ - निर्जीव वस्तूंची उदाहरणे उदा १ - पाणी व या वस्तूचा अंगभुत गुण - शीतलता उदा २ - हवा व या वस्स्तूचा अंगभूत गुण - चंचलता उदा ३ - अग्नि या वस्तूचा अंगभूत गुण - दाहकता उदा ४ - पाषाण वस्तूचा अंगभूत गुण - जडता ==सजीवांची काही उदाहरणे==' उदा १ - वाघ - भूक लागली असता आणि प्रतिस्पर्धी वाघ अथवा प्राण्यापासून संभाव्य धोका टाळण्यासाठी हिंसा करणे. (अस्तित्व टिकवण्यासाठी हिंसा करणे) उदा २ - वाघ - कितीही भूक लागली असेल व व शिकार मिळाली नसेल व मिळणार नाही असे समजले असेल जरी असेल तरीही वाघ गवत खात नाही. (अखाद्य न खाणे) उदा ३ - गाय-वासरू - वात्सल्य उदा ४ - गरुड - आकाशात विहार करणे उदा ५ - मासा - पाण्यामध्ये झोप घेणे मनुष्याशी निगडित काही उदाहरणे उदा १ - स्त्री - ममत्व, वात्सल्य. ही एक अजब वृत्ती आहे. कुमारिकेमध्ये कदाचित हा गुण सुप्तावस्थेत असू शकेल, पण एकदा का ती कुमारिका प्रसूता झाली की तिला ममतेचा पान्हा फुटतो. हा गुणविशेष भावनिक व शारीरिक अशा दोन्ही पातळ्यांवर व्यक्त होतो. ममत्व, मातृत्व ही स्त्रीमधील उपजत सहज अंगभूत वृत्ती आहे. ही वृत्ती कुणी नष्ट करण्याचा प्रयत्‍न करेल तरीही ती होणार नाही. व प्रसंगी स्त्री बाळासाठी निकराने स्वतच्या जीवाशी देखील खेळते. स्वतचा जीव संकटात टाकुन बाळाला वाचवणा-या माता आपल्याला अनेक माहीत आहेत. यास मातृ-धर्म असे म्हणतात. थोडक्यात स्वतच्या बाळासाठी जे जे योग्य आहे ते ते करण्याच उत्‍स्फूर्त प्रेरणा म्हणजे मातृ-धर्म होय. उदा २ - पिता - पितृ-धर्म. एखाद्या तरुणास, अपत्य झाल्यावर), त्याच्या भावविश्वामध्ये जे काही बदल होतात, त्यानुसार त्या तरुणास स्वतच्या अपत्याविषयी जी ओढ लागते. त्यास व त्या अनुषंगाने त्या अपत्याच्या पालनपोषणासाठी व संस्कारांसाठी तो स्वतःच्या दिनचर्येत, तसेच सामाजिक वर्तणुकीत बदल करतो त्यास पितृ-धर्म असे म्हणतात. ही मूलभूत प्रवृत्ती आहे. योग्य वेळ आली की आपोआप आविष्कृत होत असते. म्हणजे आणखी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर एखाद्या पित्याच्या स्वतच्या अपत्यासाठी होणारी उत्स्फूर्त प्रेरणा व त्याद्वारे त्यास होणारा कर्तव्यबोधत्यास पितृधर्म असे म्हणतात. उदा ३ - पुत्र - पुत्रधर्म उदा ४- मित्र - मित्र-धर्म उदा ५ - राजा, राज्य - राजधर्म वरील उदाहरणे मनुष्याशी निगडिडीत आहेत. यात एकच मनुष्य वेळोवेळी अनेक प्रकारच्या धर्मांचे आचरण करू शकतो. तो मनुष्य कोणत्या भूमिकेमध्ये आहे यावर त्याचा धर्म ठरतो. उदाहरणादाखल नुकताच प्रदर्शित झालेला बाहुबली २ हा सिनेमा व त्यातील पात्र शिवगामी देवीला एक शासक म्हणून राजधर्म पाळायचा होता व त्याचवेळी भल्लालची आई या नात्याने तिला मातृधर्म पाळायचा होता. आंधळ्या पुत्रप्रेमापोटी निष्पाप बाहुबलीस प्राण गमवावे लागले व याचाच अर्थ तिच्याकडून राजधर्माचे पालन झाले नाही. इथे कोणत्या धर्माचे पालन करावयास हवे होते, ते तिने योग्यरीत्या ठवायला हवे होते. कोणत्या ही पूर्वग्रहाशिवाय तिने एक शासक या नात्याने, बाहुबली व त्याची पत्‍नी यांस त्यांचे मत मांडण्याची संधी द्यायला हवी होती. तर मुद्दा असा आहे की जर जे करणे नीती व न्यायास अनुसरून आहे, ते करणे म्हणजे त्या त्या परिस्थितील धर्म होय. धर्म म्हणजे रिलिजन नाही. धर्म व रिलिजन, अगदीच काय तर संप्रदाय यांचा दूरदूरचाही संबंध नाही.. धर्म म्हणजे उपजत वृत्ती, धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, धर्म म्हणजे अंगभूत गुण, धर्म म्हणजे योग्य. धर्म म्हणजे सत्य. धर्म म्हणजे सदोदित सत्य. धर्म म्हणजे नित्य. धर्म म्हणजे अंतःप्रेरणा, धर्म म्हणजे नीती, धर्म म्हणजे न्याय.
लेखनविषय:
लेखनप्रकार

याद्या 13920
प्रतिक्रिया 37

प्रतिक्रिया

निसर्ग हा एकच धर्म असून बाकी तथाकथित धर्म आहेत !

सर्वतोपरी मनुष्यास अधिक प्रघल्भ बनवितो तो धर्म

In reply to by रोमना

अगदी योग्य शब्दात थोडक्यात सांगितले आपण

In reply to by विजुभाऊ

मुद्दा हा आहे की धर्म शब्दाचा अर्थ काय आहे हे समजावे. आपल्याच देशातील हा शब्द आज सर्रास चुकीच्या अर्थाने वापरला जातोय. व ते असे... हिंदु धर्म, मुसलमान धर्म, ख्रिश्चन धर्म, बौध्द धर्म, इत्यादी यातील एकही धर्म नाहीये. हिंदु संस्कृती आहे तर बाकीचे सांप्रदाय आहेत.

धर्म म्हणजे काहीही असो, "शरीरमाद्यं खलु धर्मसाधनम्" हे लक्षात घेऊन जन्मभर आपले शरीर संपूर्णपणे निरोगी ठेवता आले, तरी पुष्कळ. समाज, संपत्ती, कुटुंब, मित्र, नावलौकीक, स्मृती ... कधीही आपल्याला सोडून जाऊ शकते, पण आयुष्याच्या अगदी शेवटपर्यंत रहाते फक्त आपले शरीरच. अष्टांग-योगाद्वारे शरीर शेवटपर्यंत स्वस्थ राहू शकते, म्हणूनच की काय, श्रीकृष्णाने सांगितले : "योगी भव अर्जुन"

काहीतरी गडबड वाटतेय.. जर धर्म नैसर्गिक गुणधर्म असाच अर्थ असेल तर पितृधर्म, राजधर्म शिकवावा का लागेल? आणि तो नीट पाळला नाही असे कसे म्हणायचे? तो त्या व्यक्तीचा गुणधर्मच म्हणावे लागेल. आणि कुणी पाळला तर त्यात कौतुक कसले?

In reply to by अन्या बुद्धे

गडबड अशा साठी आहे तुम्ही जे बोलताय ते विपर्यस्त आहे. मतृधर्म शिकवावा लागत नाही, पितृधर्म शिकवावा लागत नाही. ती जबाबदारी निसर्गतः अंगावर आली की तो तो घटक, उपजत वृत्तीने त्या त्या जबाबदारीचे निर्वहन करीत असतो. धर्म पाळण्याची गोष्ट नाहीच मुळी. आपल्या एकंदरीत दर्शनांमध्ये धर्म हा शब्द कुठेही सांप्रदाय या अर्थाने वापरलेला नाहीये. हिंदु धर्म नावाची एकही गोष्ट तत्वतः अस्तित्वात नाही. हिंदु ही संस्कृती आहे. संस्कृती अनुभवांच्या संकलनातुन, यश-अपयशातुन घडत असते, प्रगल्भ होत असते. आणि हो, निसर्गातील सारेच घटक त्यांचा त्यांचा धर्म पाळतातच. भुक लागली असेल तर शिकार करणारे प्राणी आहेत व नसेल लागली तर शांत बसणारे ही तेच असतात. निसर्गाचे संतुलन राखण्यात सर्वच घटक आपापल्या जबाबदारीचे पालन करतात. त्यात कौतुक करण्यासारखे खरच काही नाही. याउपर वर्तमानात, मनुष्य जीवनात उपजत धर्माचे पालन होताना दिसत नाही. क्वचित कुणी निष्काम कर्म करणारा दिसला (की जो त्याच्या धर्माचे) की आपसुकच त्याचे कौतुक होणारच कारण धर्म-पालन दुर्मिळ झालेली गोष्ट आहे. आणि हो, जे धर्माधिष्टित जीवनयापन करतात त्यांना कुणी त्यांचे कौतुक करावे अशी आवश्यकता मुळीच नसते. ज्यांना धर्म-पालन नावाची द्राक्षे उंच आहेत त्यांच्यासाठीच ती कौतुकाचा विषय व आंबट होतात.

In reply to by हेमंत ववले

This मातृधर्म शिकवावा लागत नाही, पितृधर्म शिकवावा लागत नाही. ती जबाबदारी निसर्गतः अंगावर आली की तो तो घटक, उपजत वृत्तीने त्या त्या जबाबदारीचे निर्वहन करीत असतो. पण राजधर्म कुठूनतरी / कुणाकडून तरी शिकल्याशिवाय येतो का ? आई आणि वडीलांमध्ये निर्माण होणाऱ्या या बेसिक इन्स्टीन्क्ट्स झाल्या.. बाकी आणखी 2 - 4 जवळची नाती सोडली तर बाकीच्या सर्व गोष्टी उदा . राजधर्म ... या नॅचरली येत नाही .. बाहेरून आत्मसात कराव्या लागतात ... मग सगळ्यांना सरसकट धर्म हे विशेषण लावणं योग्य आहे का .... नॅचरल इन्स्टिन्क्टच जर बळकावून घेणे / बळजबरी करणे ही असेल तर ती अधिक प्रभावी ठरणं नैसर्गिक नाही का ... बाकी पुत्रधर्म - मातृधर्म जर नैसर्गिकरित्या उपजत नसतील तर ते नुसते लादलेल्या अपेक्षा बनत नाहीत का ... म्हणजे त्या व्यक्तीत जर ती भावना नैसर्गिकरित्या उपजलीच नाही तर तो तिचा धर्म कसा काय झाला ? की बहुसंख्य लोकांमध्ये ती भावना उपजते तेव्हा ती सगळ्यांमध्ये उपजलीच पाहिजे असा आग्रह आहे ? मग सदर व्यक्तीला अधर्मी म्हणता येतं का ... राजधर्माची नॅचरल इन्स्टिक्ट प्रजेचं कल्याण ही असती तर इतके अत्याचारी राजे झालेच नसते इतिहासात ... कर्तव्याकडे पाठ फिरवून मनमानी वागणं हेच नैसर्गिक असं माझं अजिबात म्हणणं नाही ... फक्त धर्म म्हणजे सहज प्रवृत्ती, उपजत वृत्ती ही तुमची धर्माची व्याख्या पटली नाही . धर्म ही नॅचरल इन्स्टिक्ट नाही .. मातृधर्म , पितृधर्म वगैरे वेगळे .... इतर धर्म असं नाव दिलेल्या गोष्टी या शिकवूनच / अनुकरणाने निर्माण होतात ...

In reply to by हेमंत ववले

निष्काम कर्म हा मानवाचा धर्म आहे हा निष्कर्ष तुम्ही नक्की कशावरून काढला ? माणूस शिकार करत , गुहांमध्ये राहत होता तेव्हापासून त्याने झोपड्या - घरं बांधून शेती सुरू केली तेव्हापासून ते आजवर त्याचं नक्की कुठलं वर्तन तुम्हाला - मानवाचा उपजत स्वभाव हा निष्काम कर्म करणारा आहे असं दर्शवतं ? आदर्शवाद आणि धर्म याची तुम्ही गल्लत करत आहात .. धर्म ही बेसिक इन्स्टिक्ट या विधानाचा आणि निष्काम कर्म करणारा माणूसच खरं धर्मपालन करत असतो या विधानांचा काही ताळमेळ दिसत नाही .

In reply to by हेमंत ववले

भूक लागली की शिकार करणे ही प्राण्यांची बेसिक इन्स्टिक्ट आहे ... तोच धर्म माणसाचा असावा ही काय अपेक्षा आहे ? भूक लागली की शिकार करायला किंवा फळं तोडायला माणूस गेला असता तर आज आपण इथे नसतो ... भविष्याचा विचार करून उद्याची सोय करून ठेवणं ही प्राण्यांची इन्स्टिक्ट नाही .. निदान बहुतेक प्राण्यांची ... नैसर्गिक उर्मींंचं पालन करूनही ते माणसापेक्षा अल्पजीवी असण्याचं कारण काय ? निसर्गाच्या लहरीवर त्यांची आयुष्यं अवलंबून असतात ... माणसाचंही .. पण त्यांच्याएवढं पराधीन नाही . कारण माणूस त्या त्या क्षणात जगत नाही , पुढचा विचार करण्याची क्षमता त्याच्यात असते ... म्हणजे ती त्याची इन्स्टिक्टच झाली ... निष्काम कर्म ही मानवाचीच काय निसर्गातल्या दुसऱ्या कुठल्याही प्राण्याची सुद्धा बेसिक इन्स्टिक्ट / धर्म नाही . कुठला प्राणी शिकार करतो आणि दुसऱ्या प्राण्याला ती खाऊ देतो , की बाबा तू खा ... स्वतःला खायला मिळणार या अपेक्षेनेच तो शिकार करतो , तेव्हा त्याला तरी निष्काम कसं म्हणता येईल ? किंवा आपण राहणार या विचारानेच पक्षी घरटं बांधतात .. तेव्हा ते तर निष्काम कसं ? निष्काम ही इन्स्टिक्ट नाही ... तो भाव एखाद्यात यावा वाटत असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही ... नुसतं शिकवून उपयोग नाही तर त्या व्यक्तीच्या मनाने तो गुण स्वीकारला पाहिजे ... तेव्हा कुठे तो गुण अंगी येतो ... त्याला धर्म वगैरे नाव देण्याचा प्रपंच कशाला ...

In reply to by nishapari

निशापरी , सध्या समाजामध्ये सर्रास सांप्रदाय या शब्दाऐवजी धर्म हा शब्द वापरला जातो. मुळात तसा तो न वापरता, सांप्रदाय म्हणजे पारलौकिक प्राप्ती साठी तयार केला गेलेला एखाद्या विशेष विचारधारेला, विशेष पुजा पध्दतीला मानणारा व स्वीकारणारा समुह, याच अर्थाने तो वापरला जावा. भारतात सध्या जी अवस्था आहे ती खुपच गोंधळाची आहे. अख्ख्या भारताची काळजी वाहणारा मी कुणी काळजीवाहु वगैरे नाही. व धर्म व सांप्रदाय या शब्दांतील भेद समजला तर पंथ-सांप्रादायिक कलह कमी होतील, असे मला वाटते. यासाठी या लिंक वरील हे विचार वाचल्यास मला काय म्हणायचे आहे ते अधिक स्पष्ट पणे समजेल. https://hemantvavale.blogspot.com/2016/11/blog-post_11.html जसा एखाद्या प्राण्याचा त्या त्या प्राप्त परिस्थीमध्ये धर्म म्हणजे निहित कर्म वेगवेगळे असु शकते, व ते त्या त्या परिस्थितीला अनुसरुनच असते. तसेच मनुष्याच्या बाबतीत देखील आहे. एकच व्यक्ति वेगवेगळ्या भुमिकांमध्ये वेगवेगळ्या पध्दतीने आचरण करतो. हे आचरण त्या त्या प्राप्त परिस्थीतीवर अवलंबुन असते. नेतृत्व हा देखील निसर्गदत्त उपजत गुण आहे. आज तंत्रज्ञान विकासामुळे , माझे हे म्हणणे पटण्यासाठी, एखाद्या जंगलात जाण्याची गरज नाहीये. जंगलातील एखाद्या सिंहाच्या कुटुंबातील सगळेच्या सगळेच, त्या कुटूंबाचे नेते नसतात. कुणीतरी एकच असतो. आणि नेतृत्व गुण म्हणजे तरी नक्की काय आहे, तर जिथे फक्त स्वतःच्याच अपत्याची काळजी घ्यायची त्या ऐवजी अनेकांची, अनेक सहचरांची असेही की जे आपले अपत्य नाहीये, काळजी घ्यायची. त्यामुळे काळजी घेणे, वाहणे हे देखील शिकवण्याची गोष्ट नाहीये. आपल्या कम्युनिटीचे रक्षण, त्यांचे पालनपोषण, उदरभरण यांवर लक्ष ठेवणे ही देखील बेसिक इंस्टींक्ट मध्ये येणारीच प्रवृत्ती आहे. हत्ती, वाघ, सिंह, मर्कटे, अशा अनेक कळपांनी राहणा-या प्राण्यांमध्ये आपण हे गुणविशेष पाहु शकतो. यामध्ये नेत्याकडुन जे कर्म होत असते, त्यामध्ये त्या नेत्याचा स्वतःचा म्हणजे स्व चा, कसलाही भौतिक लाभ नसतो. त्याला जे काही मिळते ते कदाचित, आपल्या आईवडीलांना, आपणास शिकवुन, मोठे करुन जे भावनिक समाधान मिळते, ते आहे. संज्ञा काहीही असो. मुलभुत प्रवृत्ती म्हणा अगर धर्म म्हणा, पण हा आहे निसर्ग.

In reply to by हेमंत ववले

धर्म व सांप्रदाय या शब्दांतील भेद समजला तर पंथ-सांप्रादायिक कलह कमी होतील ? तुमच्या मते जो सांप्रदाय आहे त्याच्याशी लोकांचं नातं घट्ट जुळलेलं आहे .. शब्दातला किंवा अर्थातला फरक दाखवून दिल्यामुळे काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाही . कल्पना करा तुम्ही एका गावात काही दिवसाकरता वास्तव्यास गेला आहात .. तिथे आंब्याला जांभूळ हे नाव आहे आणि जांभूळ हे फळ तिथे कोणी कधी पाहिलेलंही नाही .. तुम्ही आंबा हे नाव सांगण्याचा प्रयत्न केला तर ते नाव त्यांना विनोदी / निरर्थक वाटेल . तिथे असेपर्यंत आंबे खरेदी करायचे असल्यास तुम्हाला 2 डझन जांभळं द्या म्हणूनच खरेदी करावे लागतील . तेव्हा बहुसंख्य लोक जो अर्थ मानतात तो अर्थ .. पुराणातला किंवा डिक्शनरी वाईज अर्थ काय कामाचा ... भारताची बहुसंख्य लोकसंख्या धर्म म्हणजे तुम्ही जो अर्थ संप्रदायाचा सांगितला आहे तोच मानते ... ते खोल आतपर्यंत लिहिलेलं सॉफ्टवेअर आहे .. जन्माने , ज्या कुटुंबात , ज्या समाजात वाढ झाली त्यांच्या अनुकरणाने लिहिलं जाणारं .. 500 लोकसंख्येच्या विशिष्ट संप्रदायाच्या , तो संप्रदाय म्हणजेच आपला धर्म मानणाऱ्या लोकांच्या गावात जन्माला आलेलं आणि वाढलेलं मूल तोच संप्रदाय आपला धर्म मानणार .. एके दिवशी अचानक धर्म म्हणजे वेगळंच काहीतरी ही व्याख्या तो उडवून लावणार नाही का .... चर्चेपुरती लोक ती किमान विचारात तरी घेतील , हो - हो , बरोबर आहे करतील ... पण जेव्हा प्रत्यक्ष आयुष्यात एखाद्या गोष्टीला रिऍक्ट व्हायची वेळ येते तेव्हा ते जुन्या ज्ञानाला धरूनच निर्णय घेतात ... अमुक संप्रदायाचे लोक शेवटी अधिक जवळचे वाटतात , दुसऱ्या संप्रदायाचे परके वाटतात .. हे बहुसंख्य लोकांच्या बाबतीत बोलत आहे ... सांप्रदायांची नावं घेत नाही , तुमचा ब्लॉग पाहिला ... संस्कृती , सांप्रदाय , धर्म काहीही नावं दिली , तरी वृत्ती ही टोळी करून राहणाऱ्या आदिमानवाचीच आहे ... ज्याला गटामध्ये सुरक्षित वाटतं , बाकी विशिष्ट प्रथा - परंपरा हे त्या गटाला एकत्वाच्या भावनेने बांधून ठेवण्यासाठी निर्माण केलेल्या गोष्टी आहेत - कल्चर , उच्च संस्कृती वगैरे सगळंच ... संस्कृती जपणे , संस्कृतीवरचे हल्ले परतवण्यासाठी एकत्र येणे .. हे सगळं त्या आदिमानवाच्या टोळीने आपली टोळी कमकुवत होऊ नये यासाठी केलेल्या धडपडीच्याच लेव्हलचं आहे .... मोठी मोठी नावं दिल्यामुळे ते काहीतरी महान कार्य आहे अशी त्या त्या गटातल्या लोकांची समजूत करून दिली जाते फक्त ... गटामध्ये त्याला सेफ वाटतं आणि बाकीचे गट / संप्रदाय हे परके वाटतात ... हे आपल्या देशातल्या मुख्य दोन्ही संप्रदायांच्या बाबतीत सत्य आहे . सांप्रदाय न मानणारे किंवा त्याच्या फार प्रभावाखाली न गेलेले लोक, तेच फक्त निर्मळ दृष्टीने समाजाकडे , समाजातले विविध वर्ग , घटना यांकडे पाहू शकतात ... त्यांना समाजात सेफ वाटण्यासाठी कुठल्यातरी गटाशी स्वतःची निष्ठा घोषित करण्याची / त्या गटाचं - टोळीचं सदस्यत्व स्वीकारण्याची गरज वाटत नाही ... माणूस दुसरे गट परके वाटत नाहीत .. सगळी माणसं हाच एक गट वाटतो .... आपला जन्म झाला तो गट आणि त्याचा प्रतिस्पर्धी / वैरी समजला जाणारा गट यातल्या शत्रुत्वाशी त्यांना देणंघेणं नसतं , कोणाचीही बाजू घ्यायची नसते .. कारण त्यांच्या दृष्टीतून फक्त एकच गट असतो - तो म्हणजे माणूस - मनुष्यप्राणी ... आणि एकच गट आपसात वैरभाव घेऊन असलेला पाहून त्यांना दुःख होतं / गटबाजी करणारे लोक मूर्ख वाटतात आणि त्यांच्या गटबाजीच्या खेळात सामील होण्यास ते अनुत्सुक असतात . त्यावेळी गट - गट करून राहणाऱ्या लोकांना हे पचनी पडत नाही ... आणि अशा लोकांना सेक्युलर म्हणजे काहीतरी वाईट ह्या अर्थाने हिणवलं जातं . जे देश हे गट - गट खेळण्यात , संस्कृती जपण्यात , ती बळकट करण्यात अडकून पडलेले नाहीत त्यांनी आपल्यापेक्षा भरपूर प्रगती केली आहे ...

In reply to by जॉनविक्क

तसं नाही. थोडं वेगळ्या पद्धतीनं मांडलं पाहिजे. जेव्हा धर्म ही संकल्पना अस्तित्वात नव्हती तेव्हा कसं वातावरण असणार? मग ही संकल्पना आली कुठून? म्हणजे या संकल्पनेचं प्रयोजन काय? ज्यांनी ती मांडली आणि त्यांच्या अनुषंगानं पूर्ण समाज ती संकल्पना आत्मसात करता झाला त्यांचा हेतू काय होता? या प्रश्नांच्या उत्तरातून संदर्भ लक्षात येईल. त्या संदर्भातून या संकल्पनेचा अर्थ लागेल आणि झालेला विपर्यासही लक्षात येईल. उदा: माऊली म्हणतात - "जो जे वांछील तो ते लाहो.." याचा अर्थ काय? एखाद्याची कामना वाईट असली तर तीही त्याची पूर्ण व्हावी असं ते मागताहेत काय? त्यासाठी ज्ञानेश्वर महाराजांची ईच्छा काय ते समजून घ्यायला हवे. ज्या हेतूने त्यांनी असे म्हटले ते समजून घ्यायला हवे. त्यांची ईच्छा काय असणार? सगळ्यांना भगवंताच्या प्रेमाचा अनुभव व्हावा, सगळ्यांचं भलं व्हावं असंच. त्या अनुषंगानंच या वाक्याकडे बघायला हवं. राघव

In reply to by राघव

माऊली म्हणतात - "जो जे वांछील तो ते लाहो.."
जगाच्या ज्ञात अज्ञात इतिहासात पुराणात आणि भविष्यातही ही गोष्ट कधी घडली असा प्रश्न मनी आला तर हे कधी भविष्यातही होणार नाही हे आपोआप स्पष्ट होत नाहीत काय ? बाकी इतर मुद्देही चर्चेला घेता येतीलच

जेव्हा धर्म ही संकल्पना अस्तित्वात नव्हती तेव्हा कसं वातावरण असणार? काळजीने भरलेले, सर्व्हायवलच्या.

In reply to by माकडतोंड्या

हीच तर गम्मत आहे, सर्व मूळ गुण / दोष आपल्यातच आहेत आणि आपण मात्र त्याच्यासाठी विविध बाह्यकारणे हुडकून त्याचे निमित्त बनवून पुन्हा त्यातच रमून जातो आणि खापर स्वतःवर कधीच फोडत नाही. हा आपला भितेपणाच तथाकथित पाप पुण्य आणि शष्प स्पष्टीकरण नसलेल्या बनावट धर्माच्या मुळाशी आहेत :) पुन्हा लोकांना बियर मारून टांगा पलटी होण्यात फार रस असल्याने गोष्टी अजून धुरकट बनतात.

In reply to by जॉनविक्क

तुम्ही ज्या विषयी बोलत आहात ते साप्रदाय आहेत. या दोन शब्दांमधील गफलत दुर व्हावी असाच हेतु आहे. नुकतीच निशापरि यांना दिलेला प्रतिसाद आपण देखील वाचावा , त्यात मी अधिक प्रयत्न केला आहे या विषयात स्पष्टपणा आणण्याचा.

अती कर्मकांडात रमलेले, अनेक प्रकार तुम्हाला दिसतील पण सिव्हीलाईजड समाजासाठी काही नियमांची आवश्यकता आहे, हे काही लोकांना पटणार नाही, स्वतः काम करत असलेल्या संंस्थामधील नियम मुकाट्याने पाळतील पण समाजासाठी असलेल्या नियमांना नावे ठेवतील. तुम्ही जे सांगीतले त्यात दम आहे.

Fear, Anger, Pain, Pleasure, Sex, Sorrow , Hope या आपल्या मूलभूत भावना आहेत आणि आपले मन सतत यापैकी एका भावनेचा काही काळ अनुभव करून दुसऱ्या भावनेकडे प्रवास सुरु करते. हे प्रवासचक्र सतत चालूच राहते (आपल्या मृत्यूपर्यंत आणि त्या नंतरही). जगात जे काही घडते ते मनाच्या हया प्रवृत्तीमुळेच. अगदी चाकाच्या शोधापासून मिपाच्या स्थापनेपर्यंत अथवा महायुद्धापासून तुम्ही आणि मी पाडत असलेल्या जिल्ब्याना कारणीभूत फक्त मनाची वरील प्रवृत्तीच कारणीभूत आहे. मी एखादा सुरेख प्रतिसाद दिला पण तो संतापात लिहलेला असू शकतो, तुम्ही रोज नामस्मरण करत असाल पण कधी ते भीतीने, कधी आशेने कधी आनंदाने होत असते म्हणजे सांगायचा मुद्दा हा कि आपली कोणतीही कृती कमी जास्त इंटेसिटीच्या Fear, Anger, Pain, Pleasure, Sex, Sorrow , Hope या भावनांच्या आधीष्ठानाशिवाय घडूच शकत नाही, हे पटतंय का ? उदा. सेक्स हि भावना घ्या सेक्स म्हणजे इंटरकोर्सेमधे असणे पण जर कमी इंटेनसीटीची सेक्स भावना असेल तर तुम्ही कत्रीनाचे गाणे बघाल व पुन्हा आपल्या कामात व्यस्त व्हालच (कारण काम झाले पाहिजे ही फिअर भावना आहे अथवा कामाच्या रिवार्डचे प्लेजर अथवा होप हया भावनेत मन एव्हाना सेक्स मधून बाहेर पडून प्रवाहित झालेले आहे) अजून एक बाब pleasure म्हणजे पंचेंद्रियाना सुखद वाटणारी अनुभूती आणि इगो. इगो सुद्धा आनंदचा भाग याचसाठी आहे की तो तुमची सर्व्हायविंग क्षमता जास्त असल्याचे अधोरेखित करतो म्हणून अहंकारही आनंदाचा कारक आहे. उदा. एखादी गोष्ट मला येते तुम्हाला नाही म्हणजेच माझे सर्व्हायविंगचे चान्सेस जास्त आहेत आणि मुळात टिकून राहिलो तरच बाकीचे सर्व शक्य. जान है तो जहान हय म्हणून इगो मनाला सर्वात जवळचा वाटतो अथवा वाटणे हि नैसर्गिक व विज्ञानिक बाब आहे. हे मुद्दे समजत असतील तर सर्व मानवी अडचणींची उकल सुरुवात सहज होऊ शकते आणि वरील सर्व गोष्टी नैसर्गिक आहेत म्हणून त्याचे दमन तर सर्वात नुकसानदायक. आता याचा धर्माशी संबंध काय ? आहे पण...

धर्म म्हणजे काय माहीत नाही . पण एकच भाषा ,एकच रीतिरिवाज, ईश्वराची एकच व्याख्या ह्याला धर्म म्हणता येईल . भाषा ,रीतिरिवाज,संस्कृती वेगळी असेल तर धर्म ह्या एकाच बंधनात तो समाज बांधला जावू शकत नाही

आपल्याला पाहिजे तशी टिका, समर्थन, हक्काने दुगाण्या झाडण्याचा, वडाची साल पिंपळालाच लावता येईल अशी तर्क कर्कश्श बादरायणी सोय,मूठभर लोकांच्या लोभी,लालसी ढोंगी आणि अप्पलपोटेपणामुळे अखिल समूहास जबाबदार धरता येईल अशी जालिय,जालिम विचारवंताची सोय. धर्म नसता तर सुधारकांना खरोखरच समाज सेवा करावी लागली असती. परंपरा, धर्म, धार्मिक आणि सश्रद्ध यात सरमिसळ करुन गल्लत न करणारा वाचकांची पत्रेवाला नाखु बिनसुपारीवाला

In reply to by नाखु

एक नंबर व्याख्या/इंटरप्रिटेशन :D

धर्म म्हणजे धारणा (मान्यता/सदगुण) ज्या समुहातील प्रत्येकाला योग्य अयोग्य काय हे सांगून सत्याकडे ( सर्वांचे कल्याण करणारी कृती) जाण्याचा मार्ग दाखवितात. लेखकाने सांगितल्याप्रमाणे- राजधर्म :- प्रजेचे कल्याण होईल अशी कामे करणे, शत्रूपासून संरक्षण देणे. न्यायाने व नितीने राज्यकारभार करणे. थोडक्यात कर्तव्य आणि जबाबदारी समाजातील स्थानाप्रमाणे आनंदाने पार पाडणे.