Skip to main content

वाटणी

लेखक सत्य धर्म यांनी मंगळवार, 19/02/2019 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
रामू आणि शेवंताला आजची रात्र सरत नव्हती. म्हातार्‍याच्या दहाव्या बरोबरच पै पाहुण्यांमध्ये अर्जुनाचे लग्न आणि वाटणीचा विषय छेडला गेला होता त्यामुळे दोघेही अस्वस्थ झाले होते. दहा एकर बागायती शेतीत सोन पिकत होतं त्यातून आलेल्या सुबत्तेमुळे नवरा बायको सुखी होते त्यात वंशवेल वाढुन आनंदात भरच पडली होती धाकटा अर्जुन शेवंताच्या डोळ्यात खुपत होता त्याचा हिस्सा कुठेच असू नये असं तिला मनोमन वाटत होतं. म्हाताऱ्याचा अर्जुनवर असणारा जीव पुऱ्या गावाला माहीत होता. आईविना वाढलेलं धाकट पोर असल्यामुळे त्याला बापानं जरा जास्तच लळा लावला होता. वाटणीच्या विचाराने शेवंता तळमळत होती, पाशवी विचार तिला झोप लागू देत नव्हते. तळमळत तिनं मान वळवली आणि म्हणाली "ऐकलं का" "बोल" "मला आज झोपच येत नाही, म्हाताऱ्याच्या माघारी अर्जुनचे लग्न झालं तर आपल्या वाटण्या होतील ना? आपली निम्मी जमीन आणि घर त्याच्या वाट्याला जाइल का?." दोघांच्याही मनात एकच विचार येत होते. दोघांची ही नजरा नजर झाली काय करायचे हे डोळ्यांनीच ताडल. "हो" रामू म्हणाला. पण "जर अर्जुनच नाही राहिला तर वाटणीचा प्रश्नच येणार नाही" अस म्हणून रामू तडक पडवीत गेला, पडवीत थोडी चुळबुळ झाली आणि अर्जुन चा निष्प्राण देह तुळविला टांगला गेला. सकाळी गावभर बोभाटा झाला बाप मेल्याच्या दुःखावेगाने अर्जुनने जीव दिला. रामुच सांत्वन करण्यासाठी परत एकदा पै पाहुण्यांची आणि गाववाल्यांची रीघ लागली. खोटया अश्रूमागे रामू आणि शेवंता आपला पाशवी आणि क्रूर चेहरा दडवत होते. आज रामू आणि शेवंताला गाढ झोप लागणार होती त्यांच्या वाटणीचा दावेदार संपला होता. दहा एकराची मालकी दोघांनापण समोर दिसत होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3619
प्रतिक्रिया 4

प्रतिक्रिया