Skip to main content

आज जडी-बूटी दिवस

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 04/08/2018 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षाऋतुत आकाशातून अमृत धारा बरसतात. धरतीच्या कोखातून जीवनदायनी वनस्पती प्रगट होतात. भारतात १८,००० च्या वर औषधी वनस्पती आहेत. पण दुर्भाग्य या घटकेला फक्त ११०० वनस्पतींचा उपयोग आयुर्वैदिक औषधीत वापर होतो. याचा विपरीत चीन मध्ये तिथल्या १३००० वनस्पतींचा उपयोग चीनी हर्बल मेडीसीन मध्ये होतो. आज आयुर्वैदिक औषधींना जागतिक मान्यता नाही. कारण आधुनिक विज्ञानाच्या कसौटीवर औषधी वनस्पतींना पारखण्याचा प्रयत्न झाला नाही. जास्तीस्जास्त फूड सप्लीमेंट रुपात आयुर्वेदिक औषधी निर्यात होतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले. त्याचे मुख्य कारण आंग्ल भाषेत कार्य करणाऱ्या कार्यपालिकेची गुलाम मानसिकता. विदेशी औषधी कंपन्यांचा दबाव आणि राजनेत्यांची अनिच्छा (आज हि जीएसटी एलोपेथी औषधींंवर ४ टक्के आणि भारतात निर्मित आयुर्वैदिक औषधींवर १८ टक्के) विचित्रच आहे ना. एकीकडे आयुर्वेदिक कंपन्यांंची अनुसंधानवर अब्जावधी रुपये खर्च करण्याची क्षमता नाही, दुसरीकडे सरकारस्तरावर कुठलीही अपेक्षा ठेवणे व्यर्थ. हि आजची परिस्थिती. आपले सौभाग्य आजच्या दिवशी आचार्य बाळकृष्ण प्रगट झाले. (महान लोक प्रगट होतात). केवळ कागदी शिक्षण नव्हे तर गंगोत्री ते आसाम पर्यंतच हिमालय, उत्तर ते दक्षिण भारतातील जंगले, आपल्या पायदळी तुटवली. स्थानीयस्तरावर वापरल्या जाणार्या अनेक वनस्पती औषधींचे ज्ञान प्राप्त केले. आजच्या दिवशी त्यांनी आयुर्वेदिक अनुसंधान केंद्र उभारण्याचा संकल्प केला होता. आज पतंजलि रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये ३००च्या वर वैज्ञानिक आयुर्वेदात प्रयोग होणार्या वनस्पती आणि इतर घटक द्रव्यांवर अनुसंधान कार्य करीत आहे. ३००० जवळ वनस्पतींवर सध्या प्रयोग सुरु आहे. पतंजलि फूड पार्क मध्ये होणार्या नफ्याचा एक भला मोठा हिस्सा यावर खर्च होतो. एलोपेथी औषधीत प्रयोग होणारे घटक पदार्थ मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, त्यांचे चांगले व वाईट परिणाम, औषध घेणार्याला माहित असते. त्याच प्रमाणे आयुर्वेदिक औषधांत वनस्पती मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, हे कळल्यावर उत्तम दर्जाच्या औषधींंचे निर्माण शक्य होईल. लोकांचा आयुर्वेदावर विश्वास वाढेल. कमी खर्चात रोगराई दूर होईल. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळेल. भारताचा औषधी निर्यात हि मोठ्या प्रमाणावर वाढेल. आचार्य बाळकृष्ण यांनी आयुर्वेदावर तथा औषधी वनस्पतींवर अनेक पुस्तके तर लिहली आहेच. त्यांच्या पुस्तकांचे अनेक विदेशी भाषांत अनुवाद हि झालेले आहे. या शिवाय त्यांच्या नेतृत्वाखाली ५०,००० पेक्षा जास्त जुन्या संस्कृत आणि आयुर्वेदावर असलेल्या ग्रंथांचे डीजीटलाइजेशन झाले आहे, अजूनही कार्य सुरु आहे. अनेक जुन्या पांडुलिपींचे प्रकाशन झाले आहेत. त्यांच्याच नेतृत्वाखाली World Herbal Encyclopedia ज्यात जगातल्या ६०,००० हून औषधी वनस्पतींचे वर्णन असेल, जगातील सर्वात मोठा ग्रंथ (जवळपास १०० खंड) प्रकाशाचे कार्य सुरु आहे. पहिला खंड प्रधानमंत्रीच्याहस्ते काही महिन्यांपूर्वी प्रकाशित झाला होता. भारतातील औषधीय वनस्पतींच्या क्षेत्रात आचार्य बाळकृष्णच्या योगदानाच्या प्रीथर्थ त्यांचा जन्मदिवस जडी-बुटी दिवस म्हणून साजरा करणे सुरु केले आहे. आजच्या दिवशी पतंजलिचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात औषधी वनस्पती वितरीत करतात. आज सामान्य जनतेच्या घरातल्या गमल्यांत गिलोय, एलोविरा पोहचली आहे. आचार्य बाळकृष्ण यांच्या वाढदिवस निमित्त सर्वांना जडी-बूटी दिवसाच्या शुभेच्छा.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 16151
प्रतिक्रिया 46

प्रतिक्रिया

इति रेवाखंडे भक्तीपुराणे ठीक आहे काका, काही प्रश्न आहेत जमली तर उत्तरे द्याल १. आयुर्वेदिक औषधांचे राष्ट्रीय पातळीवर स्टॅन्डरडायजेशन करण्याबाबत पतंजली/आचार्यजी/३०० वैज्ञानिक वगैरेंनी काय प्रगती केली आहे? नवीन पेटंट/प्रोटोकॉल रजिस्ट्रेशन बाबत काय प्रगती आहे ? २. आयुर्वेदिक औषधांत हेवी मेटल पोयझनिंगची शक्यता सर्वाधिक असते, ते कमी करून उपयोगी रासायनिक गुणधर्म वाढवायला पतंजली/आचार्यजी/३०० वैज्ञानिक वगैरेंनी काय पावले उचलली आहेत? ३. बाकी हिमालया ड्रग कंपनीच्या काही प्रॉडक्टला खुद्द यूएसएफडीए अप्रुव्हल आहेच (लिव्ह ५२ वगैरे) पण ते यूए मध्ये फूड सप्लिमेंट म्हणून विकत असल्यास मला कल्पना नाही. त्यामुळे तूर्तास त्यावर नो कॉमेंट ४. सरकारी अनास्था वगैरे काय ठीकच आहे! लेखात वाक्य भरायला यशस्वी खेळाडूसारखं, त्यावर आचार्यजींनी काय उपाय केला ते वाचायला आवडलं असतं, बाकी ठीकच, मी पण निवृत्त झाल्यावर माझ्या कंपनीला (तेव्हाच्या) शिव्या घालेनच म्हणतो

To विवेक पटाईत तुम्ही तर पतंजलीची जाहीरात करताय़ आणि राहीला सवाल आयु:वेदाचा तर.. AYUSH मंत्रालय सम्रथ आहे. पतंजलीने आणि प्रकट बाबांनी patents किंवा किती real international publications kelet. ते बोला

आपले सौभाग्य आजच्या दिवशी आचार्य बाळकृष्ण प्रगट झाले. (महान लोक प्रगट होतात) अगंगंगं, लैच खतरनाक. माझं सौभाग्य्, असलं कैतरी वाचायला मिळालं. कंसातलं वाक्य वाचून खात्री पटली. त्या भुरट्या युनिलिव्हरला का असे लोक सापडले नाहीत कोण जाणे.

आयुर्वेदिक औषधांत वनस्पती मानवी शरीरात कश्या रीतीने कार्य करतात, हे कळल्यावर उत्तम दर्जाच्या औषधींंचे निर्माण शक्य होईल. लोकांचा आयुर्वेदावर विश्वास वाढेल. कमी खर्चात रोगराई दूर होईल. आयुर्वेदाला जागतिक मान्यता मिळेल. भारताचा औषधी निर्यात हि मोठ्या प्रमाणावर वाढेल. हे सर्व आंतरराष्ट्रिय स्तरावर मान्य असलेली आधुनिक शास्त्रिय व प्रशासकिय (मानके, तपासण्या, पेटंट्स, इ) प्रक्रिया वापरून करण्याची फार मोठी गरज आहे. सद्या आयुर्वेदाचे बहुतेक व्यावसायिक ( वैद्य व कंपन्या), "हे मी किंवा आयुर्वेदात सांगितले आहे म्हणून विश्वास ठेवा" याच पुराव्यावर चालत आहेत ते बंद झाले पाहिजे. यामुळे, खरोखरच उत्तम असू शकतील अशी आयुर्वेदिक औषधेही, "वैद्यांचे किंवा रुग्णांचे केवळ तोंडी दावे" याच श्रेणीत सामील झालेली आहेत. ही परिस्थिती बदलायला हवी, अन्यथा, आयुर्वेदाला जसे दावे केले जातात असे स्थान मिळण्याची शक्यता नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्सना आधुनिक निदान सोयी, पक्षी सीटी स्कॅन , एमआरआय, एक्स रे वगैरे वापरायला परवानगी असावी का नसावी, ह्यावर एक डॉक्टर आणि आंतरराष्ट्रीय मेडिको-फर्माको-लीगल ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काम केलेले विशेषज्ञ म्हणून तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. बाकी, आयुर्वेदाचा आव आणत तापाच्या काढ्यात पॅरासिटामॉल खलून घालणाऱ्या जनतेला पोकळ बांबूचे फटके विविक्षित ठिकाणी द्यायला हवेत असे आमचे ठेवणीतले मत ह्यानिमित्ताने सार्वजनिक करतो.
सद्या आयुर्वेदाचे बहुतेक व्यावसायिक ( वैद्य व कंपन्या), "हे मी किंवा आयुर्वेदात सांगितले आहे म्हणून विश्वास ठेवा" याच पुराव्यावर चालत आहेत ते बंद झाले पाहिजे.
+१०,०००, ह्यात अजून एक जोडायला लागेल, प्रचलित वैद्यकशास्त्राला शिव्या घालणे हे पण एक बेसिस वापरतात आयुर्वेदिक वैद्य , सर्रास ऐकायला येणारे डायलॉग म्हणजे "ऍलोपॅथीक औषधं 'गरम' करतात, साईड इफेक्टने दुसरेच नवे रोग सुरू होतात" इत्यादी पतंजलीच्याच "आवळा ज्यूस"चं उदाहरण घेतलं तर त्यात सोडियम बेन्झोएट वापरलेलं असतं प्रिझर्व्हेटिव्ह म्हणून (बाटलीवर तसं स्पष्ट नमूद असतं) आता आयुर्वेदाच्या अनुपानानुसार ही प्रिझर्व्हेटिव्ह भेसळ (?) मंजूर असते का? असली तर त्याने त्या रसाच्या औषधी गुणधर्मांवर काहीही फरक पडत नाही असे सांगणारा काही रिसर्च पतंजलीने केलाय का? असल्यास तो कुठे वाचायला मिळेल? असे बरेच प्रश्न पडायला सुरुवात होते.

In reply to by जेम्स वांड

आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्सना आधुनिक निदान सोयी, पक्षी सीटी स्कॅन , एमआरआय, एक्स रे वगैरे वापरायला परवानगी असावी का नसावी हा प्रश्न वर वर साधा सोपा वाटला तरी त्याच्या उत्तराचे परिणाम खूप दुरगामी असतील. आयुर्वेद अभ्यासक्रमाबद्दल मला पुरेशी माहिती नाही, अर्थातच, त्या प्रश्नाचे माझे उत्तर, "हो किंवा नाही" असे असू शकत नाही. पण, त्याचे उत्तर शोधण्याची निर्णयप्रक्रिया साधारणपणे खालीलप्रमाणे असायला हवी हे मी खात्रीने सांगू शकेन : (अ) कोणत्या आजारांत कोणत्या तपासण्या उपयोगी असतात ? त्या का उपयोगी असतात ? (आ) त्या केव्हा कराव्या केव्हा करू नयेत ? (इ) केल्या तर त्यांचा कोणता रिपोर्ट अपेक्षित आहे ? (ई) रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तर किंवा निगेटिव्ह आला तर, त्या प्रत्येक वेळी उपचारासंबंधी काय निर्णय योग्य असतो ? (उ) रुग्णाच्या उपचारांमध्ये त्या निर्णयांचे नक्की काय महत्व असते ? (ऊ) त्या तपासण्या 'केल्या तर' किंवा 'नाही केल्या तर' होऊ शकणारे (रोगाच्या उपचारासंबंधी आणि अर्थिक ) 'फायदे/तोटे यांची गुणोत्तरे' काय आहे ?, इत्यादींना आयुर्वेद अभ्यासक्रमांत कितीसे आणि किती महत्वाचे स्थान आहे यावर आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्सना या तपासण्या करायला परवानगी असावी की नसावी हे ठरवले तरच ते केवळ शास्त्रियदृष्ट्याच नव्हे तर व्यावहारिकदृष्ट्याही बरोबर असेल. कारण, एखादी प्रगत सुविधा/साधन वापरण्याअगोदर तिच्याबद्दल पुरेशी माहिती नसेल तर तिच्यापासून फायद्यापेक्षा तोटा होण्याचीच जास्त शक्यता असते. पुरेसे प्रशिक्षण नसताना कोणतीही महत्वाची (प्रगत किंवा जुनी) सुविधा/साधने वापरण्याची परवानगी दिल्यास, ती एक प्रकारे, रुग्णाच्या शरिराशी, जीवाशी आणि पैशाशी खेळ करण्यासाठी दिलेली परवानगी होईल, असे म्हटले तर ते चूक होईल का ? रस्त्यावर गाडी चालवण्यासाठीही प्रशिक्षण-परिक्षा-परवाना इत्यादी सोपस्कार पार पाडणे आवश्यक असते, त्यामागे... (अ) गाडी चालविण्याचे ज्ञान/पात्रता नसणार्‍याने ती चालवू नये, (आ) गाडी चालवण्याने चालवणार्‍याचे व इतरांचे शक्यतो फायदेच व्हावे, (इ) तोटे झालेच तर ते शक्य तितके कमी व फायद्यांच्या प्रमाणात स्विकार्य असतील इतके कमी असावे, इत्यादी उद्येश असतात, नाही का ? तसेच काहीसे हे आहे. तुमच्या प्रतिसादातले बाकीचे प्रकार, "गैर आणि/किंवा बेकायदेशीर व्यवहार" आहेत, तेव्हा त्याबद्दल टिप्पणी करण्याची गरज नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मी असे ऐकून आहे की... पतंजलीने आधुनिक तंत्रे व पद्धती वापरून आयुर्वेदिक औषधे व उपचारप्रणाल्यांचा अभ्यास करणे सुरू केले आहे, त्यासाठी, त्यांच्या औषध संशोधन व निर्माण संस्थेत आवश्यक ती संसाधने उपलब्ध केलेली आहेत व ती संसाधने वापरण्यासाठी आवश्यक असलेले प्रशिक्षण असलेले मानवसंसाधन (उदा : आधुनिक तपासण्यांसाठी आधुनिक वैद्यकीय शिक्षण व अनुभव असलेले तज्ज्ञ, इ) उपलब्ध आहे. पतंजली संबंधात माझे ज्ञान ऐकीव व माध्यमात वाचण्याइतकेच मर्यादित आहे. तेव्हा, त्यासंबंधी काही मतप्रदर्शन करण्याऐवजी, औषध-शोध-शास्त्रासंबंधिची काही ढोबळ माहिती खाली देत आहे. आधुनिक शास्त्रीय पद्धती वापरून औषध बाजारात आणणे हे अत्यंत किचकट, वेळखाऊ आणि महागडे काम आहे, हे अत्यंत न्यूनोक्ति (एक्स्ट्रीम अंडरस्टेटमेंट) करणारे विधान आहे! कारण, कोणत्याही संस्थेतूनही विश्वासू संशोधन बाहेर येण्यास बराच कालावधी (अनेक वर्षे ते दशके) लागतो. या विषयांतल्या तज्ज्ञांच्या संघांच्या मुख्य संशोधकाच्या (लीड रिसर्चर), इतर संशोधकांच्या व मदतनिसांच्या पाठीशी अनेक वर्षांचा अभ्यासक्रम, संशोधन करण्याचे प्रशिक्षण आणि अनेक दशकांचा अनुभव असतो. याशिवाय, संशोधनासाठी अत्यंत सुधारित आधुनिक साधने उपलब्ध करून द्यावी लागतात. हे सर्व जमवणे, अत्यंत किचकट, वेळखाऊ आणि महागडे असणे स्वाभाविक आहे. एक नवीन औषध बाजारात आणण्यासाठी सरासरी १ बिलियन डॉलर (रु६,९०० कोटी) खर्च येतो, असे औषधसंशोधन करणार्‍या कंपन्यांच्या गेल्या काही दशकांच्या अनुभवांवरून सांगता येईल. मानवांत वापरायची औषधे शोधण्यात वापरल्या जाणार्‍या पायर्‍यांचे ढोबळ वर्णन असे आहे... १. शोध मोहीम (Discovery) : मानवात वापरण्याच्या औषधांचे व इतर प्रणालींचे संशोधन प्रथम प्रयोगशाळेत शास्त्रीयरीत्या सिद्ध केले जाते... त्यातून ते औषध/प्रणाली उपयोगी होण्यासाठी आवश्यक असलेले पुरेसे सैद्धांतिक (थियरेटिकल) पुरावे/संशय (रीझनेबल एव्हिडन्स/डाऊट) मिळवले जातात. त्याकरिता, आतापर्यंत जागतिक स्तरावर मिळवलेल्या सर्व औषधशास्त्र, रसायनशास्त्र व इतर शास्त्रांच्या ज्ञानाच्या साठ्यांचा वापर केला जातो. यासाठी संगणक प्रणाल्या व मानवी तज्ज्ञांची मदत घेतली जाते. कधी कधी एखाद्या वापरात असलेल्या औषधाचा अपेक्षित नसलेल्या उपयोगी परिणाम एखाद्या वैद्यक व्यावसायिकाच्या ध्यानात येतो आणि त्याच्या बळावर पुढची शोधमोहीम सुरू होते ! उदाहरणादाखल, यासंबंधी इथे एका संगणक प्रणालीची माहिती मिळेल... https://www.ibm.com/products/watson-drug-discovery. अश्या अनेक शास्त्रीय पद्धतीने प्रमाणित असलेल्या संगणकीय व असंगणकिय प्रणाल्या व पद्धती आहेत. आधुनिक वैद्यकात, या पद्धतीने ५,००० ते १०,००० औषधे होऊ शकणारे उमेदवार अणू (कँडिडेट मोलिक्युल) तपासल्यावर एखादा अणू औषध होण्यास उपयोगी असल्याचे निदर्शनास येते व त्याचा पुढच्या पायरीसाठी विचार करणे सुरू होतो. आयुर्वेदिक औषधांत तर एकच अणू नसून जडी-बुटी असा प्रकार असल्याने असंख्य अणूंचा समुदाय असतो, त्यामुळे ते काम अधिक कठीण बनते. त्याचबरोबर, एखादी जडी-बुटी वापरण्याचा अनेक शतकांचा अनुभव मागे असल्याने त्यांची पुढील पायरीसाठी निवड करणे सोपे होते. उदा : हळद, लसूण, इत्यादी. मात्र, एखाद्या विशिष्ट रोगावर विशिष्ट उपचार म्हणून निवडण्याच्या जडी-बूटीबाबतचा निर्णय इतका सोपा नसेल, हे सांगायला नकोच. ही किचकट, वेळखाऊ व खर्चिक प्रथम पायरी अत्यंत आवश्यक असते. याचे मुख्य कारण असे की, या पुढच्या पायर्‍या तिच्यापेक्षा कित्येक (शेकडो-हजारो) पटींनी किचकट, वेळखाऊ व खर्चिक असतात. २. Product Characterization (वैशिष्ट्य सिद्धता) : पहिल्या पायरीत आशादायक ठरलेला अणूची कार्यक्षमता, विषारीपणा किंवा दुष्परिणाम, जैविक कार्य आणि शरीरात गेल्यावर हव्या त्या परिणामासाठी मिळणारा अंश (function, toxicity, bioactivity, bioavailability, ect. ) यांचा अभ्यास केला जातो. ३. Formulation, Delivery, Packaging Development (मात्रा; औषध देण्याची पद्धत आणि साठवण्याची पद्धत) : औषध बनवण्यापासून ते पेशंटच्या शरीरात जाईपर्यंत, ते अपेक्षित अवस्थेत सुरक्षित रहावे व त्याने रुग्णावर अपेक्षित परिणाम करावा, यासाठी ही सर्व प्रणाली परिणामकारक असणे जरूर असते. ४. Pharmacokinetics and Drug Disposition (शरीरात औषधाचे होणारे चलनवलन, रासायनिक/शरीरविज्ञानशास्त्रिय परिणाम व बदल) : औषध वापरल्यावर मिळणारे फायदा-नुकसान गुणोत्तर रुग्णाच्या फायद्याचे होईल की नाही याचे अंदाज बांधणे किती आवश्यक असते हे सांगायला नकोच. या पायरीपासून पुढे, माणसात ज्या कारणासाठी औषध वापरले जाणार आहे त्यासाठी योग्य त्या प्राण्याची निवड करून त्याच्यावर परीक्षणे केली जातात. या पायरीसाठी प्राणी वापरताना, त्यांच्या निवड, त्यांच्या राहण्यासाठी केलेली व्यवस्था आणि त्यांना परीक्षणात वापरण्यासाठी वापरण्यात आलेल्या प्रयोगशाळांमधील सुविधा व संशोधनपद्धतींसाठी कडक शास्त्रीय व संवैधानिक कायदे आहेत. त्यांचे उल्लंघन केल्यास सर्व देशांत शिक्षा तर आहेतच, पण तसे केलेले संशोधन शास्त्रीय अमान्य केले जाते. या पायरीवरच्या संशोधनाला मान्यता देण्यासाठी आणि त्यावर नजर ठेवण्यासाठी स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक स्तरावर गठन केलेल्या संवैधानिक व शास्त्रीय संस्था/मंडळे/समिती असतात. ५. Preclinical Toxicology Testing and Investigative New Drug (IND) Application (मानवी-चांचणीपूर्व वीषचिकित्सा व नवीन औषधाच्या मानवी चांचणीसाठी अर्ज तयार करणे) : या पायरीवर, (अ) औषधाच्या प्राणी शरीरावर होणार्‍या बर्‍या-वाईट परिणामांची कसून तपासणी केली जाते. उदाहरणादाखल यातील काही तपासण्या अश्या आहेत : Repeated Dose Studies, Genertic Toxicity Studies, Reproductive Toxicity Studies, Carcinogenicity Studies, Toxicokinetic Studies, इत्यादी. (आ) औषध आणि त्याची मानवामधील परीक्षांसाठी असलेल्या सर्व स्थानिक व जागतिक संवैधानिक व शास्त्रीय नियम-कायद्यांमध्ये यापुढील सर्व कार्यप्रणाली बसेल याची पुन्हा पुन्हा खात्री केली जाते... व त्यांचे पुरावे व लिखित वचने सामील दिलेला मानवांवरील संशोधनाचा अर्ज केला जातो. हे अर्ज पडताळून परवानगी देण्या/नाकारण्यासाठी संस्था, राष्ट्रीय व्यावसायिक प्रशासन, जागतिक व्यावसायिक प्रशासन, अश्या अनेक स्तरावरच्या वैधानिक संस्था/मंडळे/समिती असतात. त्या संस्था प्रथम अर्जाची छाननी करून नंतर संशोधकांच्या बरोबरील प्रत्यक्ष बैठकीत सर्व शंकानिरसन करून घेतात. या कार्यपद्धतीत (प्रोसीजर) मध्ये अनेक फेर्‍या होतात व त्यांच्या निष्कर्षानुसार अर्जामध्ये अनेक बदल करावे लागू शकतात. या पायरीच्या शेवटी अर्जावरचा निर्णय खालीलपैकी कोणताही असू शकतो... * जशी मागितली तशी परवानगी मिळणे. * अर्जामध्ये काही बदल करून परवानगी मिळणे. * काही वैधानिक कारणांनी परवानगी अनिश्चित काळासाठी तहकूब होणे. * परवानगी नाकारणे. वैधानिक संस्था/मंडळे/समितीचे हे निर्णय अंतिम असतात. यापुढचे सर्व संशोधन परवानगी दिलेल्या संस्था/मंडळे/समितीच्या निरीक्षणाखाली होते व संशोधकांना अर्जात मान्य केलेल्या पायर्‍या/कालखंडांप्रमाणे प्रगतीअहवाल द्यावे लागतात. यात कामचुकारपणा झाल्यास परवानगी स्थगित अथवा रद्द होऊ शकते. ही परवानगी मिळणे हा सुद्धा, संशोधक संघासाठी (रिसर्च टीम), संशोधनकामातील एक मैलाचा दगड असतो व तो तसाच साजराही केला जातो! ६. Bioanalytical Testing (जैव-विश्लेषणात्मक परिक्षण) : मानवी परीक्षणे करण्याअगोदरची ही कळीची पायरी आहे. या अत्यंत किचकट व अनेक पैलू असलेल्या पायरीत औषध जीवामध्ये कमीतकमी प्रतिकूल परिणाम व जास्तीत जास्त अनुकूल परिणाम कसा करेल हे ठरवले जाते... आणि औषधाचे फायदा/धोका गुणोत्तर सर्वोत्तम कसे होईल हे पाहिले जाते. ७. Clinical Trials (मानवामधील परिक्षण) : वरचे सगळे सोपस्कार झाल्यावर (हुश्श! ) मगच औषधाचे मानवामध्ये परिक्षण करता येते. तेही काही कमी किचकट व निर्धोक नसते. आधी कधीच वापरात (आणि म्हणून अनुभव) नसलेले औषध मानवाला (रुग्णांना) देतानाचा आणि त्याचे निरीक्षण करतानाचा शारीरिक व मानसिक ताण, एखाद्या उच्च मानवी संशोधनात भाग घेतल्याशिवाय कळणे अशक्य आहे! ही सर्वात महत्त्वाची आणि बहुदा सर्वात जास्त कालखंड लागणारी पायरी आहे. उदा : रक्तदाब, मेदवृद्धी, मधुमेह, इत्यादी आजारातील परीक्षणे (संख्याशास्त्राच्या दृष्टीने योग्य होण्यासाठी व व्यवहारात उपयोगी ठरण्यासाठी) संशोधनात सहभागी होणार्‍या मानवांची संख्या काही हजारांत असणे आणि परीक्षणाचा कालखंड ५-१०-१५-२० किंवा जास्त वर्षे असू शकतो. हे काय कमी म्हणावे तर त्यात भर घालायला, ही मोठी पायरी चढून जाण्यासाठी तिच्या तीन उपपायर्‍या पार कराव्या लागतात! त्या अश्या... ७. (अ) Phase I Clinical Development (Human Pharmacology) उर्फ मानवी औषधशास्त्रिय चांचणी: या पायरीत एक लहान (small-scale Phase) चांचणी घेऊन (अ) वर अपेक्षिलेले सर्व परिणाम मानवी व्यवहारात खरे ठरतात की नाही व (आ) काही अनपेक्षित प्रतिकूल परिणाम होत तर नाहीत ना, यांची प्राथमिक खात्री केली जाते. या चांचणीत, धोकादायकता कमी करण्यासाठी, बहुदा निरोगी माणसांची निवड केली जाते व त्यांच्यावर औषधाची एक मात्रा, वाढीव मात्रा, अनेक मात्रा, इत्यादींच्या परिणामांची, तज्ज्ञांच्या कडक नजरेखाली चांचणी केली जाते. ७. (आ) Phase II Clinical Development (Therapeutic Exploratory) उर्फ मानवी उपचारात्मक शोधमोहीम : या पायरीत छोट्या संख्येच्या रुग्णगटांवर तज्ज्ञांच्या कडक नजरेखाली औषधाची चांचणी केली जाते. यावेळी, निरोगी नसल्यामुळे होऊ शकणार्‍या औषधाच्या दुष्परिणामांकडे (जे Phase I मध्ये दिसू शकत नाहीत) खास लक्ष दिले जाते. ७. (इ) Phase III Clinical Development (Therapeutic Confirmatory) उर्फ मानवी उपचारात्मक खात्रीमोहीम : याअगोदरच्या सर्व पायर्‍यांमध्ये सकारात्मक पुरावे मिळाल्यास, त्यांच्या बळावर ही पायरी सुरू केली जाते. या पायरीत, मोठ्या संखेच्या रुग्णसंखेवर पूर्ण आराखड्याप्रमाणे संशोधनात्मक काम सुरू केले जाते. ही पायरी सुरू असताना, ठराविक काळानंतर, संशोधन व्यवहारात आणण्यासाठी (पक्षी : बाजारात आणून पैसे कमावण्यासाठी) करावे लागणारे Biologics License Application (BLA) आणि/अथवा New Drug Application (NDA) यासारखे पुढील सोपस्कार सुरू करावे लागतात. हुश्श! ही रूपरेषा वाचतानाच बर्‍याच जणांना दम लागला असेल तर हे काम करण्यार्‍यांची काय अवस्था होत असेल? मुख्य म्हणजे, हे नवीन संशोधन असल्याने, त्याच्या कोणत्याही पायरीवर कोणता अडथळा पुढे उभा राहील याचा नेम नसतो, सर्वात शेवटी संशोधन यशस्वी होईल याचीही खात्री नसते ! हे सर्व इतके विस्ताराने सांगण्याचे कारण असे... एका औषधाला बाजारात आणण्यासाठी, औषधसंशोधनासाठी अनेक दशके जागतिक स्तरावर प्रस्थापित असलेल्या कंपन्यांना (अ) एक दशक किंवा जास्त वेळ, (आ) सुमारे रु७,००० कोटी गुंतवणूक आणि (इ) अत्यंत आधुनिक (स्टेट ऑफ आर्ट) मानवी व अमानवी संसाधने, हे सर्व कामी आणावे लागते. आणि इतके करूनही १००% यशाची खात्री कधीच नसते. फार काळापासून आवश्यक असलेल्या आणि अगोदर कोणीच केले नाही अश्या "आयुर्वेदिक औषधासंबंधीच्या आधुनिक संशोधन" कामाला पतंजलीने हात घातला आहे. वर सांगितल्याप्रमाणे, केवळ एक अणू असलेली आधुनिक औषधे आणि असंख्य वैविध्यपूर्ण अणूचे मिश्रण असलेली आयुर्वेदिक औषधे यांच्या संशोधनात काही महत्त्वाचे मूलभूत फरक आहेत. ते जाणून पतंजलीला आपली काहीशी स्वतंत्र पण तरीही आधुनिक विज्ञानाच्या चौकटीत बसणारी संशोधनपद्धती निर्माण करावी लागेल. यामुळे, पतंजलीसारख्या आताच मैदानात उतरलेल्या नवीन कंपनीला, प्रस्थापितांना पार कराव्या लागणार्‍या अडथळ्यांच्या बरोबरच, अधिक काही वेगळे/अनपेक्षित अडथळे पार करावे लागतील. याचा अजिबात अर्थ असा नाही की, पतंजली उत्तम संशोधन कार्य करत आहे याची मी खात्री देत आहे. मात्र, अजून ५ ते १० वर्षांवरची प्रगती पाहून व शास्त्रीय जगतातले आणि बाजारातले यश पाहूनच, पतंजलीने संशोधनासंबंधीचे केलेले दावे खरे आहेत की नाही, याबद्दल मतप्रदर्शन करणे योग्य होईल. अन्यथा, भारतीय औषधशास्त्राच्या विषयात काही नवीन करू पाहणार्‍या भारतीय कंपनीचे, आपणच भारतीयांनीच, पाय ओढल्यासारखे होईल (जे, बाजारातला आपला हिस्सा कमी होण्याच्या भितीने, अनेक बहुराष्ट्रीय कंपन्या सद्या करत आहेतच !). जाता जाता अजून एक महत्वाचा मुद्दा असा की, आपले संशोधन शेवटच्या क्षणापर्यंत (पक्षी : पेटंट नावावर नोंदविले जाईपर्यंत) गुप्त न ठेवणे याचा सरळ सरळ अर्थ, "आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीपुढे आपली गुपिते उघडी करून आपल्या पायावर कुर्‍हाड मारून घेणे", असा असतो. तेव्हा, पतंजलीच काय पण इतर कोणतीही कंपनी आपले पत्ते पूर्ण प्रक्रिया पुरी झाल्याशिवाय उघड करणे केवळ अशक्य आहे. थोडक्यात, या संबंधात, "चांगल्या वाटणार्‍या कामात मदत करता आली नाही तर हरकत नाही, पण निदान खोडा तरी घालू नये", हे तत्व बाळगून मी, "Masterly inactivity and watchful expectancy"चे पालन करत आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुम्हाला "एक्स्पर्ट" का म्हणालो ह्याचं मला वाटतं ह्या प्रतिसादापेक्षा संयुक्तिक दुसरं एक्सप्लेनेशन नसेल. खूप खूप आभार, फार काळापासून आवश्यक असलेल्या आणि अगोदर कोणीच केले नाही अश्या "आयुर्वेदिक औषधासंबंधीच्या आधुनिक संशोधन" कामाला पतंजलीने हात घातला आहे. हे मला वाटतं द हिमालया ड्रग कंपनी खूप सुरवातीपासून करायला झटत असावी(परत तुम्ही म्हणता तसं ऐकीव माहिती, तरीही बाजारपेठेत उपलब्ध उत्पादने अन त्यांचा दर्जा पाहून हिमालयाला त्यात माफक गती असावी असा निष्कर्ष काढू धजावतोय, अर्थात त्यांनी तसे प्रयत्न केलेतच असा माझा ठाम दावा नाहीच), कारण कुठल्याही ड्रग, सप्लिमेंट्री फूडला यूएसएफडीएचे अपृव्हल मिळणे मोठं मानलं जातं. हल्लीच गुजरात मधील एका प्रथितयश जुन्या फार्मास्युटीकल कंपनीच्या दोन प्रोडक्शन लाईन्स वर असलेले निर्बंध यूएसएफडीए ऑडिट नंतर उठवले गेल्याने बाजारात त्यांच्या शेयर ज्या प्रमाणे वधारला ते पाहून तरी ह्या सर्टिफिकेशनची किंमत कळावी. असो!, हिमालायचं कौतुक ह्यासाठी की डाबर, सांडू ब्रदर्स, डॉक्टर मोरपेन वगैरे बड्या नावांनीही जिथे कडक प्रोसिजर्स अन ऑडिटला कंटाळून पूर्ण बिझनेस थ्रस्ट "सप्लिमेंट्री फूड्स अँड वेलनेस प्रॉडक्ट्स" वर टाकला तिथे हिमालया चिवटपणे टिकून आहे (अन हो सप्लिमेंट्री, वेलनेस मधेही जम बसवून आहे). बाकी, अजून ५ ते १० वर्षांवरची प्रगती पाहून व शास्त्रीय जगतातले आणि बाजारातले यश पाहूनच, पतंजलीने संशोधनासंबंधीचे केलेले दावे खरे आहेत की नाही, याबद्दल मतप्रदर्शन करणे योग्य होईल. अन्यथा, भारतीय औषधशास्त्राच्या विषयात काही नवीन करू पाहणार्‍या भारतीय कंपनीचे, आपणच भारतीयांनीच, पाय ओढल्यासारखे होईल केवळ ह्याच कारणासाठी मला पतंजलीच्या बिझनेस सक्सेसला आत्ताच सेलिब्रेट करून फार मोठी क्रांती झाल्याचे प्रीमॅच्युवर सेलिब्रेशन करायला आक्षेप आहेत, आधीच तांत्रिक - वैज्ञानिक दृष्ट्या क्लिष्ट क्षेत्र त्यात एफएमसीजी ते प्रोसेस्ड फूड सगळ्या क्षेत्रात एकदम उघडलेल्या आघाड्या, म्हणून जिथे राष्ट्रीय सत्व पणाला लागले आहे तिथे नीट बयाजवार सगळं झाल्यावरच सेलिब्रेशन करायला (मला तरी) बरे वाटेल. थोडक्यात, या संबंधात, "चांगल्या वाटणार्‍या कामात मदत करता आली नाही तर हरकत नाही, पण निदान खोडा तरी घालू नये", हे तत्व बाळगून मी, "Masterly inactivity and watchful expectancy"चे पालन करत आहे. (हे विधान माझ्या प्रतिक्रियेच्या प्रतिसादात आले आहे, तरी ते मला उद्देशून नसावे, एक सर्वसाधारण विधान असावे. पण काही गैरसमजास्तव जर ते मला उद्देशून असलेच तर खालील भाग वाचावा, नसले तर खालील भाग वगळला तरी चालेल, नव्हे तशी विनंतीच आहे हक्काची) "Masterly inactivity and watchful expectancy" तुमचा चॉईस आहे अन अतिशय आदरयोग्य आहे, पण प्रोसेसची चौकशी करणे अन ती फॉलो होईपर्यंत सेलिब्रेटरी मूडला थोडा आवर घालायची भलामण करणे हे मला तरी "खोडा घालण्यासारखे" वाटत नाही तर देशाच्या नावाला कमीपणा येईल अश्या नाजूक विषयात पुढे कमीपणा येऊ नये म्हणून आधीच पूर्ण प्रोसेस माहिती करून घेऊन ती फॉलो होईपर्यंत "जास्त उड्या मारू नयेत" हा आवर स्वतःला घालून घेणे वाटते, शेवटी इथून तिथुन आमचीही थोडी चाकरमानी देशभक्तीच की ही पण! तुमचे आदरणीय व्हर्जन तुम्हाला आमचे आम्हाला.

In reply to by जेम्स वांड

१. केवळ ह्याच कारणासाठी मला पतंजलीच्या बिझनेस सक्सेसला आत्ताच सेलिब्रेट करून फार मोठी क्रांती झाल्याचे प्रीमॅच्युवर सेलिब्रेशन करायला आक्षेप आहेत याबाबत मी असे म्हणेन, (अ) भारतात व्यापारी यश मिळवणे आणि (आ) आधुनिक शास्त्रीय संशोधनाच्या बळावर जगभर मान्य पेटंट्स मिळविणे, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. (अ) भारतातील व्यापारी यश : हे सद्या हाती असलेल्या आकड्यांच्या बळावर खात्रीने सांगता येते... व ते पतंजलीने यश मिळवले आहे, यात संशय नाही. जोपर्यंत, पतंजली ते यश सद्य भारतीय वैधानिक (कायदे, नियम, मानके, इ) चौकटीत राहून मिळवत आहे तोपर्यंत त्याचा प्रत्येक भारतीयाला आनंद व्हायला विरोध का असावा ? किंबहुना, एखादी "नवीन भारतीय कंपनी", "वैध मार्ग वापरून", "अनेक दशके जगभरात दादा मानल्या गेलेल्या प्रबळ बहुराष्ट्रीय कंपन्यांशी" ... (अ) स्पर्धा करण्याचे धाडस करते, तेव्हा ते मला कौतुकास्पद वाटते. (आ) यशस्वी टक्कर देते, तेव्हा मला साधार आनंद होतो. (ई) आधी दादा असलेल्या बहुराष्ट्रीय कंपन्यांचा मोठा व्यापारी हिस्सा (मार्केट शेअर) आपल्याकडे वळवून घेते, तेव्हा मला, एक भारतीय, म्हणून नक्कीच अभिमान वाटतो. हे मुक्त व्यापारी व्यवस्थेतील, बहुतेक सर्व महत्त्वाकांक्षी कंपन्यांच्या उत्कर्षातील, मैलाचे दगड आहेत. सद्या आणि भूतकालातही जागतिक स्तरावर व्यापारी नेतेपदी मानल्या गेलेल्या सगळ्या महाकंपन्यांची वाटचाल अशीच झालेली आहे. पतंजलीने हे टप्पे भारतात, वाटेतले खाचखळगे आणि ठेचा पचवत, भारतीय संवैधानिक चौकटीत राहून, पुरे केलेले आहेत आणि ते करताना, आतापर्यंत भारतीय व्यापाराला आपले राखीव कुरण समजणार्‍या अनेक भारतीय व बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या गोटात खळखबळ माजवली आहे, हे पतंजलीला व्यापारीदृष्ट्या अभिमानास्पदच आहे आणि त्याबद्दल तिचे कौतूक करायलाच हवे. परदेशातून येऊन, इथे बाजार काबीज करणार्‍या, नव्या-जुन्या कंपन्या, त्यांच्या स्वतःच्या देशांत, याच प्रक्रियेतून गेलेल्या आहेत. परदेशी कंपन्यांच्या इतिहासांना एमबीए च्या अभ्यासक्रमांत स्थान मिळत असतानाच, पतंजलीच्या तिच्या यशाचे हवे तेवढे महत्व मिळत नाही याची माझ्या मते काही खास भारतीय कारणपरंपरा आहे. त्यातील मुख्य कारणे अशी आहेत... * भारतीय लोक भारतीय त्यातही विशेषतः भारतीय परंपरेशी निगडित असलेल्या गोष्टींबाबत अभिमान दाखवण्यात नेहमीच हात राखून असतात. हे परदेशी गोष्टींबाबत दिसत नाही, किंबहुना, पाश्चिमात्य गोष्टी भारतात सहजपणे "अपमार्केट" बनतात. बर्‍याच शिक्षित भारतीयांमध्ये, भारतीय गोष्टींबद्दल उघडपणे ममत्व दाखवणे "डाऊनमार्केट" समजले जाते. मात्र, तीच गोष्ट पश्चिमेत नाव कमावून परत भारतात आली तर ते मत लगेच १८० अंशांने बदलते. याची अनेक उदाहरणे सांगता येतील. एकोणीसशेसत्तरीच्या दशकापर्यंत मागासलेपणाचे लक्षण समजला जाणारा "योग" जेव्हा पश्चिमेतून "योगा" बनून आला तेव्हा तो "अपमार्केट" झाला. पूर्वी, मिठाने तुमच्या दातांना चरे पडतात (पक्षी : अडाणी भारतीय पद्धत) अशी भारतीय दंतमंजनांची जाहिरातीत चेष्टा करणार्‍या कंपन्या हल्ली त्यांच्या जाहिरातींत, "तुमच्या दंतमंजन/पेस्टमध्ये मीठ आहे का ?" असे प्रश्न विचारू लागली आहेत आणि त्यांच्या जाहिरातीतल्या स्त्रिया, "हा आयुर्वेद आणि... यांचा बॅलन्स खास आहे" अश्या प्रकारे जनतेचे 'ज्ञानवर्धन' करू लागल्या आहेत ! मुख्य म्हणजे, त्या जाहिरातींमुळे, आवळा, मीठ, "हनी", कोळसा, अ‍ॅलो वेरा (कोरफड हो !) इत्यादी गोष्टी हल्ली "अपमार्केट" झाल्या आहेत ! * आपल्या मक्तेदारीत (पक्षी : आर्थिक फायद्यात) कोणा नवख्याने (आणि तेही भारतासारख्या "विकसनशील" देशातील नव्या कंपनीने) हिस्सा मिळवणे हे बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या मानसिक व आर्थिक स्वास्थ्यासाठी परवडण्यासारखे नसते. नीतिमत्ता व वैध कारभाराचे वर वर कितीही गोडवे गात असल्या तरी, अश्या मोठ्या कंपन्या साम-दाम-दंड-भेद वापरून आपल्या नवख्या प्रतिस्पर्ध्याला नामोहरम करण्याचे प्रयत्न करतात, हे काही गुपित नाही. आपले नाव गुप्त ठेवून हे करवण्यासाठी, भारतातले तथाकथित उदारमतवादी व त्यांचा प्रभाव असलेली माध्यमे, बाजारात मिळतात, हे काही गुपित नाही... हे पूर्णपणे थांबवणे कोणत्याही मुक्त व्यवस्थेत शक्य असते, तेव्हा त्याबद्दल फारशी तक्रार नाही. दु:ख असे की, तथाकथित भारतीय शिक्षित मंडळी अश्या कंपनांच्या आणि लोकांच्या अपप्रचाराचे बळी होण्यात गैर मानत नाहीत. त्याऐवजी, त्यांच्याकडून, मिळणार्‍या सर्व माहितीचा सारासारविवेकबुद्धीने विचार करून मगच मत बनविण्याची अपेक्षा, चुकीची होईल का ? मात्र, सद्यातरी पाश्चिमात्य पूर्वग्रह दूर ठेवणे त्यांना जमत नाही, हे खरे आहे. :( **** (आ) आधुनिक शास्त्रीय संशोधनाच्या बळावर जगभर मान्य पेटंट्स मिळविणे : याबाबतीत, पतंजली बाल्यावस्थेत आहे आणि तिला बरीच मजल गाठायची आहे. या प्रक्रियेसाठी लागणारा वेळ वर्ष दोनवर्षांमध्ये मोजला जात नाही. कारण, यासंबंधीचे मानवी, धोरणात्मक व इतर संसाधन (इन्फ्रास्ट्रक्चर) उभे करण्यातच पाच-सहा वर्षे निघून जातात. तेव्हा आताच पतंजलीच्या याबाबतीतल्या कुवतीवर प्रश्नचिन्हे उभे करणे अन्यायाचे होईल. पतंजलीने, यापुढे ५ वर्षांनंतर प्राथमिक स्तरावरचीही काहीच चमक दाखवली नाही आणि १०-१५ वर्षांनंतरही आयुर्वेदीक औषधे/प्रक्रियांसंबंधी आंतररास्ट्रीय स्तरावरची महत्वाची पेटंट्स मिळवली नाहीत, तर मात्र तशी प्रश्नचिन्हे उभे करणे योग्य असू शकेल. =============== २. थोडक्यात, या संबंधात, "चांगल्या वाटणार्‍या कामात मदत करता आली नाही तर हरकत नाही, पण निदान खोडा तरी घालू नये", हे तत्त्व बाळगून मी, "Masterly inactivity and watchful expectancy"चे पालन करत आहे. हे कोणा एका गोष्टीसंबंधात किंवा एका व्यक्तीसंबंधात लिहिलेले नाही. "ठाम मतप्रदर्शन किंवा कृती करण्याअगोदर, अधिक माहिती मिळण्याची आणि/अथवा अधिक वेळ देण्याची गरज आहे", अश्या सर्व गोष्टींबद्दल हे तत्त्व मी पाळतो. तांत्रिक भाषेत, "पुराव्यांवर आधारीत निर्णयप्रक्रिया (एव्हिडन्स-बेस्ड डिसीजन मेकिंग)" असे ओळखले जाणारे हे तत्त्व समतोल विचारास आवश्यक असते व ते माझ्या खास आवडीचे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याबाबत मी असे म्हणेन, (अ) भारतात व्यापारी यश मिळवणे आणि (आ) आधुनिक शास्त्रीय संशोधनाच्या बळावर जगभर मान्य पेटंट्स मिळविणे, या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. ह्याला कोण मना करेल? (धागालेखकांना एकदा विचारून घ्या तितकं). पतंजलीने ने मार्केट मध्ये त्यातही एफएमसीजी मध्ये मारलेल्या मुसंडीवरून ते लक्षात येतेच, हे मी अगोदरही नमूद केले आहेच. एका कंपनीमुळे जर युनिलीवरला खास 'लिव्हर आयुष" डिव्हिजन काढावा लागत असेल तर त्याचा आनंद आहेच. माझे शब्द फिरून मांडतो, बिझनेस सक्सेस प्रीमॅच्युअरली सेलिब्रेट करणे म्हणजे तुम्ही उल्लेखलेल्या वरील यशाच्या जोरावर तुम्हीच उल्लेखलेल्या 'अजून दूर आहे' अश्या टप्प्याबद्दल सेलिब्रेशन करणे. असो! आम्ही फार काहीतरी "व्हाईट मॅन्स बर्डन थेअरी" पाळणारे काळे नेटिव्ह वगैरे आहोत हे आडून आडून ऐकूनही संवाद साधावा वाटला तो फक्त तुमच्याप्रति असलेला आदर अन तुमचे प्रगाढ ज्ञान ह्या विषयातले ह्यामुळेच, भरपूर शिकायला मिळाले. तरीही पतंजलीला जस्ट अनदर कंपनी म्हणून ट्रीट केले तर माझी देशभक्ती परत परत प्रश्नांकित होऊ नये इतक्या विश्फुल थिंकिंग सहित थांबतो. तांत्रिक भाषेत, "पुराव्यांवर आधारीत निर्णयप्रक्रिया (एव्हिडन्स-बेस्ड डिसीजन मेकिंग)" असे ओळखले जाणारे हे तत्त्व समतोल विचारास आवश्यक असते व ते माझ्या खास आवडीचे आहे. उत्तमच तत्व आहे! अन तुम्ही ते २४/७ पाळता हे वाचून खरंच खूप आनंद झाला. :)

In reply to by जेम्स वांड

तरीही पतंजलीला जस्ट अनदर कंपनी म्हणून ट्रीट केले तर माझी देशभक्ती परत परत प्रश्नांकित होऊ नये इतक्या विश्फुल थिंकिंग सहित थांबतो. :) हल्ली अस्मितांची गळवे फारच हुळ्हुळी झालेली आहेत यात शंका नाही ! =)) (हे सर्वसाधारण निरिक्षण आहे, खास तुम्हाला नाही, तरीही, हघ्याहेवेसांन) माझ्या प्रतिसादातील सर्व मजकूर कोणा एका व्यक्तिला नसून सर्वसामान्य भारतीय मानसिकतेसाठी आहे, हे सहज समजावे इतपत स्पष्ट लिहूनही, तुम्ही काही गोष्टी स्वतःवर का ओढून घेत आहात, हे मला अगम्य आहे ! अश्या परिस्थितीत प्रामाणिक परखड चर्चा कशी शक्य होईल ? आजच्या प्रस्थापित बहुराष्ट्रीय कंपन्यांना त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांच्या स्वदेशात जितके महत्व मिळाले, तितकेच पतंजलीच्या यशाचे विश्लेषण करताना मी भारतात मिळावे असे म्हटले आहे... ना कमी ना जास्त. आणि भारतीय माणसाची/संस्थेची योग्य तेवढीही स्तुती करण्यात आपण भारतीय नेहमीच हात आखडता घेतो (यांच्यात फुका खुशामत करणारे पकडलेले नाहीत), हे मी भारतात व परदेशात नेहमीच पाहिले आहे. पतंजलीही या बाबतीत अपवाद नाही. याशिवाय पतंजलीचे प्रवर्तक (promoters) भाजपच्या बाजूने झुकलेले असल्याचे दिसत असल्याने, बर्‍याच जणांचा हात केवळ आखडलेला राहत नाही तर उगारला जातो, हे काही गुपित नाही. समतोल विश्लेषण करताना असे करणे सत्याचा विपर्यास होईल. पतंजलीच्या प्रवर्तकांचा झुकाव कोणत्याही इतर राजकीय पक्षाच्या बाजूला असला तरी त्याने माझे मत आज आहे तेच असते... राजकिय झुकाव या विश्ष्लेषणात अस्थायी (इम्म्टेरियल) आहे. कोणताही झेंडा खांद्यावर नसल्याने, "आज पतंजलीला तिच्या व्यापारी यशाचे पूर्ण श्रेय देणे" आणि "१५ वर्षांनी, जर तिच्या नावावर पुरेशी आयुर्वेदीक पेटंट्स व आधुनिक कसोट्यांवर उतरलेली रुग्णोपयोगी औषधे/उपचारपद्धती दिसल्या नाहीत तर, तिचा नावावर अपयशाचे खापर फोडणे", यात दोन्हीत मला किंचितही खंत/शरम वाटणार नाही... मात्र, तसे अपयशाचे खापर फोडताना, एक भारतिय कंपनी यशस्वी झाली नाही याची खंत जरूर वाटेल. हे सर्व माझे प्रामाणिक व्यक्तिगत मत आहे, कोणा एकाला उद्देशून नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

पतंजलीचा नफा कुणाला वाटल्या जात नाही आणि न हि पुढे धंदा वाढविण्यासाठी. त्या मुळे नफा कमविणारी संस्था नाही. ८० टक्के रिसर्च व शिक्षणावर खर्च होतो. १५० कोटी रुपये प्रतिवर्ष खर्च करणे त्यांना सहज शक्य आहे. ३०० विशेषज्ञ व शिवाय देशातील प्रतिष्ठित संस्थेतील निवृत्त विशेषज्ञ विना मूल्य योगदान देत आहेच. आयुर्वेदात औषधीत वापरणारे तत्व परंपरेतून आधीच माहित आहे. बाकी एलोपेथी म्हणाल तर सध्या सर्दीचे औषध नाही. २५ वर्षांपासून सर्दीचे व १५ वर्षांपासून हृद्यरोगाचे औषध घेतो आहे. हे घेत असतानाही stent हि लागले आणि नंतर सर्जरी हि करावी लाग्लील. औषधी मरे पर्यंत घ्यावा लागतील. रोग बरा करण्याची क्षमता एलोपेथीत नाही हे कळून चुकले आहे. पण शरीर या औषधांच्या आहारी गेल्या मुळे हि औषधी सोडली नाही पाहिजे असे विद्वान डॉक्टरांचे मत. जर रोग बरे करणारी औषधींचे निर्माण झाले तर देशाला त्याचा फायदा होणारच.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मिठाने तुमच्या दातांना चार पडतात असा दावा कोलगेट या कंपनीने कधी केला नाही. जो दावा केला गेला तो खरखरीत दंतमंजनामुळे दातांचा इनॅमलचा थर निघून जाऊ शकतो तसेच हिरड्या सोलून निघू शकतात असा होता. पूर्वी मिळणारे बिटको किंवा माकड छाप दांत मंजन यामध्ये श्वासाची दुर्गंधी घालविण्यासाठी चारकोलच्या पावडरचा वापर होत असे आणि त्यामुळे कोलगेटची टूथ पावडर (पेस्ट नव्हे) वापरा असा कंपनीचा आपले उत्पादन खपविण्यासाठीचा दावा होता. कोलगेटची टूथ पावडर तुलनेने महाग असूनही तिला चांगला खप होता याचे कारण दंत मंजन खरोखरच खूप खरखरीत आणि उग्र वासाचे आणि चवीचे असायचे. चांगल्या जेवणात खडा लागल्यावर जसा विरस होतो तसा विरस करणारा उल्लेख वरील प्रतिसादात होता म्हणून हा प्रपंच.

In reply to by सर टोबी

गैरसमज दूर व्हावे यासाठी खालील जुन्या व नव्या जाहिराती पहाव्या.  (जालावरून साभार) १. इनॅमल म्हणजे दाताच्या पृष्ठभागावरचे सर्वात वरचे आवरण... अर्थातच, इनॅमल हा दातांचा अंगभूत भाग आहे, हे सांगायला नकोच. या भागात मज्जातंतू नसतात. या भागाला चरे पडून अथवा इतर कोणत्या प्रकारे इजा झाली की त्याच्या खालचा डेंटिन नावाचा भाग उघडा पडतो आणि दाताला संवेदना (दातदुखी) होऊ लागतात. २. (हिन्दीत) खुरदुरे म्हणजे (मराठीत) भरड किंवा खरखरीत. असे पदार्थ दातांवर घासले (जी क्रिया दात घासताना केली जाते) की त्यांच्या पृष्ठभागाला इजा होते (असा कोलगेटचा दावा होता)... या इजेला सर्वसाधारण मराठीत चरे पडणे असे म्हणतात. चरे पडण्याची प्रक्रिया, अर्थातच, सर्वप्रथम सर्वात बाहेरच्या आवरणावर, म्हणजेच इनॅमलवर होणार, हे सुद्धा सांगायला नकोच.. ३. जुन्या व नव्या जाहिरातींचे फोटो समोर आहेतच, तेव्हा (अ) जुने दावे आणि (आ) नविन दावे यातला फरक सांगायची गरज नसावी. चांगल्या जेवणात योग्य तितका मिठाचा खडा टाकल्याने ते जसे चवदार होते, तितकाच (आणि केवळ तितकाच) त्याचा वास्तविक उल्लेख माझ्या वरील प्रतिसादात होता. गैरसमज होऊ नये म्हणूनच केवळ हा प्रपंच. :) (मात्र, इतके इस्काटून सांगावे लागेल असे वाटले नव्हते.)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मस्त प्रतिसाद एक्काकाका, एकूणच समतोल पध्दतीने विचार करता आपले म्हणणे पटते पण काय होते की आमच्या आधी कुणीच नव्हते आणि आता आम्ही आलो आहोत तर विरोध का करता हा अ‍ॅटिट्युड असला की डोके फिरायला होते. शिवाय डायरेक्ट अ‍ॅडव्हर्टायझिंगपेक्षा भक्तांनी केलेले दावे आणि आरत्या पाहून जगात आम्हाला जगण्यासाठी जिओ आणि पतंजली इतके असले की बस्स झाले असेच वाटू लागले आहे.

In reply to by अभ्या..

१. असे दावे खुद्द कंपनीने केले तर त्यासाठी कंपनी जबाबदार असेल. मात्र, कंपनीच्या "स्वघोषित अनधिकृत पाठीराख्यांनी" तसे केल्यास, त्यासाठी कंपनीला जबाबदार ठरवून दोषी ठरविणे, योग्य होणार नाही. २. स्वघोषित अनधिकृत पाठीराख्यांचा जाच आणि प्रतिस्पर्ध्यांनी तिचा फायदा घेणे ही मानवी स्वभावाने निर्माण होणारी समस्या आहे. हे राजकीय, सामाजिक, आर्थिक, व्यापारी, इत्यादी सर्वच मानवी व्यवहारांत नेहमी होते. अश्या परिस्थितीत, खरे पुरावे शोधत, नीरक्षीर विवेक करणे, म्हणजेच समतोल विचार करणे होय... मुख्य म्हणजे, असे करताना, मतप्रदर्शन ही प्रतिक्षिप्त क्रिया (नी जर्क रिअ‍ॅक्शन) होण्याचे टाळणे, हे फार महत्वाचे असते. नाहीतर, स्वघोषित अनधिकृत पाठीराखे आणि आपल्यात काहीच फरक राहणार नाही, नाही का ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

रच्याकने, पाश्चिमात्य कंपन्यांच्या उत्पादनांची (किंवा पश्चिमेकडून येणार्‍या कोणत्याही गोष्टीची) तोंड फाटेपर्यंत स्तुती करणारे संखेने जास्त आहेत असे निरिक्षण आहे... त्यांचे म्हणणे डोळे झाकून खरे मानणारे त्यांचाही पेक्षा अनेक पटींनी आहेत ! या लोकांबद्दल कधी कोणाला फारसा विरोध करताना पाहिले नाही... असे परदेशगमन करून पाश्चिमात्यांबरोबर काम करायला लागण्यापूर्वी माझेही साधारण तसेच वागणे होते ! मात्र, त्यांच्याबरोबर काम करताना आणि त्या कंपन्याच्या कारवायांची जवळून ओळख झाल्यावर, ही मंडळींचेही पाय मातीचेच आहेत हे दिसले. त्याचबरोबर, वसाहतवादामुळे कमावलेल्या राजकिय-आर्थिक ताकदीचा आणि त्याचमुळे झालेल्या अधिक विकासाचा प्रमाणापेक्षा जास्त गैरफायदा ते घेत आहेत, हे सुद्धा दिसले. तसतसे (पक्षी : डोळे मिटून छापून येते त्याप्रमाणेच) मत बनवणे आपोआप बंद झाले आणि मग (पूर्व, पश्चिम, उत्तर, दक्षिण) कोणत्याही दिशेने आलेल्या माहितीबद्दलचे पुरावे शोधून मत बनवणे सहाजिक झाले. :) गंमत म्हणजे, आंतरराष्ट्रिय स्तरावर आपण करतो आहो ते अन्यायपूर्ण आहे हे त्यांना पूर्णपणे माहित असते. पण, वर वर सभ्यतेचा बुरखा पांघरून व मोठमोठे शब्दप्रयोग वापरून, जे दडपून करता येईल ते करून आपला फायदा साधावा, ही नीति पाळण्यात त्यांना गैर वाटत नाही. याला काही सन्माननिय अपवाद आहेत, नाही असे नाही... पण ते केवळ अपवादच असतात. त्याचबरोबर, आपल्या बोलीची किंमत मिळाल्यावर, नीति-अनीतिचा विचार न करता, कोणालाही हवी तशी मदत करणार्‍या स्थानिक राजकारणी, व्यापारी, (तथाकथित) विचारवंत, इ लोकांची विकसनशील देशांत कमी नाही, हे एक दुर्दैवी सत्य आहे. पाश्चिमात्य देशांनी आणि संस्थांनी त्याचा फायदा उठवला नाही तरच आश्चर्य होते, नाही का ? मात्र, ते स्वतःच्या देशांत असा दुहेरी भंपकपणा करत नाही... कारण, तो चालणार नाही ! हा एक प्रकारचा वसाहतवादच झाला ना... की स्वतःच्या देशात न्यायपूर्ण व्यवहार आणि ज्या परदेशात जमून जाईल तिथे, स्वार्थासाठी जमेल ते आणि तेवढे काहीपण ! हल्लीच्या काळात, हे कळायला परदेशातच जायला अवे असे नाही. सुदैवाने, अनिर्बंधपणे उपलब्ध असलेल्या जालावर थोडासा अभ्यास केला तर अनेक उदाहरणे सापडतील... १. पाश्चिमात्य देशांत काही वर्षे किंवा दशके बॅन झालेली पण विकसनशील देशांत सुलभपणे विक्रिसाठी उपलब्ध असलेली औषधे / रसायने. २. पाश्चिमात्य देशांत काही वर्षे किंवा दशके बॅन झालेली पण विकसनशील देशांत राजरोसपणे उत्पादित व वितरीत होणारी उत्पादने. ३. विकसनशील देशांतल्या आपत्तींचा (उदा : पूर, भूकंप, इ) फायदा घेऊन पाश्चिमात्य देशांत अनेक दशलक्ष डॉलर्समध्ये पैसे जमा केले जातात. एकदा पैसे दिले की ते कसे खर्च झाले याचा पाठपुरावा (झाला तर) क्वचितच होतो. अश्या पैशांचा हिशेब बहुदा न दिला जातो, न मागितला जातो. यातली फार थोडी रक्कम आपत्तीच्या तत्काळ निवारणासाठी वापरली जाते व इतर सर्व रक्कम प्रशासकिय (ओळखा पाहू ?!) खर्च आणि धर्मप्रसारासाठी (Proselytisation) वापरला जातो, ही वस्तूस्थिती आहे. अनेक विकसनशील देश, परदेशी संस्थांची मदत नाकारतात व परदेशी कार्यकर्त्यांना आपल्या देशात आपत्तीकाळात स्वतंत्रपणे काम करायची परवानगी नाकारतात, यामागे हे खरे कारण आहे. आणि बरेच काही... पण आळीमिळी गुपचिळी... गुपचिळी मोडेल त्याच्यावर धावून जायला अनेक देशी-परदेशी, विक्री झालेल्या किंवा ब्रेनवॉश झालेल्या राजकारणी, व्यापारी, (तथाकथित) विचारवंत, इत्यादींचा ताफा तयार असतोच... आखिर, ये गंदा है, लेकीन धंदा है ! :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

भारतियांना पाश्चिमात्यांनी दिलेला डोस जास्त स्विकार्य, परिणामकारक आणि आनंदादायी वाटतो अशी वस्तूस्थिती आहे. म्हणून, भारतात काम केलेल्या फ्रेंच वकिलाचे (अँबॅसॅडर) हे म्हणणे (पक्षी : कान उपटणे) ऐकणे स्विकार्य व ज्ञानवर्धक ठरावे...

"कमी खर्चात रोगराई दूर होईल" हे काही पटले नाही. साध्या सर्दीतापावरची, फ्ल्यू मलेरियावरची औषधे सध्या त्या मानाने स्वस्तच आहेत कारण कदाचित त्यांचे प्रथमनिर्माण होऊन प्रदीर्घकाळ लोटल्यामुळे कंपन्यांनी केलेला सुरुवातीचा प्रचंड खर्च या काळात भरून निघाला असेल. वर डॉ. म्हात्रे यांनी सांगितलेल्या संशोधनप्रक्रियेतून जर आयुर्वेदिक औषधे जाणार असतील तर तीही सुरुवातीला महागच असतील. गुळवेलीतून वेगळ्या केलेल्या औषधी द्रव्याच्या गोळ्या, (गुडूची किंवा गिलोय), हळदपुडीतून वेगळी केलेली कर्क्युमिन पूड, खोबरेलातून वेगळे केलेले एम सी टी द्रव्य अशा गोष्टी सध्या प्रचंड महाग आहेत. कोरफड/कांटेकुंवर/ कुमारी/ कंटककुमारी ही वनस्पती ८०% ग्रामीण भारतामध्ये माहितीची आणि वापरातली असते. कुमारी आसव आणि अनेक औषधे यापासूनच बनतात. ॲलोवेरा हे नाव फक्त शहरी लोकांनाच एक्झॉटिक वाटू शकते. शिवाय ॲलोवेरायुक्त मलमे, क्रीम्ज, ऑइंट्मेंट्स, मॉय्शचराय्झर्स आधुनिक काळातही वेगवेगळ्या कंपन्यांकडून अनेक वर्षांपासून बाजारात आहेत.

In reply to by राही

वर डॉ. म्हात्रे यांनी सांगितलेल्या संशोधनप्रक्रियेतून जर आयुर्वेदिक औषधे जाणार असतील तर तीही सुरुवातीला महागच असतील. १. हे शक्य आहे. मात्र, आधुनिक मानकांवर प्रमाणित केलेल्या औषधांच्या मात्रा व परिणामांचे खात्रीलायक नियमन करता येईल. आता, वेगवेगळ्या कंपन्यांच्याच नव्हे तर एकाच कंपनीच्या मात्रे-मात्रेतील औषधाच्या प्रमाणात आणि त्यांच्या परिणामात फरक असणारच नाही याची ग्वाही देता येत नाही... हे रुग्णाच्या उपचाराच्या बाबतीत तितकेसे निर्धोक आणि/किंवा उपकारक नाही. २. सद्याच्या व प्रमाणित औषधांच्या किमतीतला फरक किती असेल हे उत्पादक कंपनी, अनेक कंपन्यांमधिल स्पर्धा आणि सरकारी धोरण यावर अवलंबून असेल. मात्र, आयुर्वेदीक औषधे, नवीन औषधे नसून, केवळ आधुनिक शास्रिय पद्धतिने सिद्ध व प्रमाणित केलेली तीच जुनी औषधे असल्याने; त्यांना मानकबद्ध पद्धतिने बाजारात आणण्यासाठी लागणारा खर्च, "पूर्णपणे नवीन आधुनिक औषधी अणू" बाजारात आणण्यासाठी लागणार्‍या खर्चापेक्षा, खूप कमी असेल. जसजसा या नवीन स्वरूपात आलेल्या औषधांच्या पात्रतेवर वैद्यकिय व्यावसायिकांचा आणि रुग्णांचा विश्वास बसत जाईल आणि त्यांचा खप वाढत जाईल, तसतसे, "इकॉनॉमिज ऑफ स्केल" या तत्वाने त्यांच्या किमती उतरत जातील. गुळवेलीतून वेगळ्या केलेल्या औषधी द्रव्याच्या गोळ्या, (गुडूची किंवा गिलोय), हळदपुडीतून वेगळी केलेली कर्क्युमिन पूड, खोबरेलातून वेगळे केलेले एम सी टी द्रव्य अशा गोष्टी सध्या प्रचंड महाग आहेत. आयुर्वेदीक औषधांतला मुख्य औषधी अणू वेगळा करून त्याला सर्वेसर्वा औषध म्हणून बाजारात आणणे, हा आयुर्वेदीक औषधपद्धतीसंबंधात अज्ञानी असलेल्या व केवळ पाश्चिमात्य पद्धतीने विचार करणार्‍या कंपन्या व संशोधकांचा दोष आहे. पाश्चिमात्य औषधे, अणू-स्तरावर संशोधली आणि बनवली जातात. त्या मुख्य अणूचे प्रतिकूल परिणाम रोखण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी इतर एखाद्या अणूचा औषधाच्या मात्रेत समावेष केला जातो... पण ते नियमाने नव्हे तर अपवादाने होते. किंबहुना, काही अपवाद बदलता, एकाच मात्रेत दोन औषधे एकमेकात मिसळणे, आधुनिक वैद्यकात निषिद्ध समजले जाते. त्याविरुद्ध, कोणतेच आयुर्वेदीक औषध केवळ एकाच प्रकारच्या अणूने बनत नाही. बहुतेक आयुर्वेदीक औषधे निसर्गात सापडणार्‍या वनस्पतीजन्य आणि प्राणिजन्य कच्च्या मालापासून प्रक्रिया करून किंवा प्रक्रियेशिवायही बनलेली असतात. अर्थातच, एकाच औषधात, असंख्य अणू असतात. बहुतेक आयुर्वेदीक औषधांचे विशेष वेगळेपण असे की, ती अश्या अनेक अणूंचा समूह असतात की, जे... (अ) निसर्गात एकमेकाच्या बरोबरीने निर्माण होतात, (आ) ते अणूसमूह, ते आस्तित्वात असलेल्या वनस्पती/प्राण्यामध्ये, 'केवळ प्रतिकूल परिस्थिती निर्माण करत नाहीत असेच नव्हे' तर त्यांच्यात 'एकत्रितपणे, एखाद्या रोगाच्या विरोधात काम करणाचे गुणधर्म असतात'. अश्या समूहातून केवळ एक मुख्य कार्य करणारा अणू वेगळा करण्याने, इतर अणूंमुळे होणारा फायदा नाहीसा होतो. इतर अणूंपासून मिळणारा फायदा अनेक प्रकारचा असू शकतो... (अ) मुख्य अणूला त्याच्या कामात मदत करणे आणि/किंवा त्याची कार्यक्षमता वाढविण्यास मदत करणे (अ‍ॅडिटिव्ह इफेक्ट), (आ) मुख्य अणूमुळे रुग्णावर होणार्‍या प्रतिकूल परिणामांचे परिमार्जन करणे किंवा त्या परिणामांची तीव्रता कमी करणे (नलिफिकेशन ऑर रिडक्शन ऑफ अ‍ॅडव्हर्स रिअ‍ॅक्शन्स), (इ) मुख्य अणूसारखा आजारावर तडक परिणाम न करता, रुग्णाच्या सर्वसाधारण आरोग्याला मदत करणे (हेल्थ प्रमोशन इफेक्ट), इत्यादी. वरील परिणाम साधणारे आयुर्वेदीक औषधांतले अणूसमुह, निसर्गामध्ये सहस्त्रो वर्षांच्या चाचणी-त्रुटी (trial and error) पद्धतीने निर्माण झालेले आहेत. आयुर्वेदीक औषधांचे विश्लेषण करणे जरूर आहे यात वाद नाही. त्याकरिता, आधुनिक वैज्ञानिक उपकरणे, नियम, धोरणे व कार्यपद्धती (equipment, norms, policies and procedures) आधीच तयार आहेत. पण, केवळ पाश्चिमात्य एकेरी विचारपद्धती वापरून चिरफाड करून, त्यातला केवळ एक मुख्य अणू वेगळा करून त्यालाच औषध म्हणून वापरणे, आयुर्वेदपद्धतिच्या मूळावरच घाव घातल्यासारखे होईल. हा कळीचा मुद्दा ध्यानात ठेवून आपली नवीन आधुनिक संशोधनपद्धती विकसित करणे, हेच पतंजलीसारख्या आधुनिक संशोधनक्षेत्रात हिरीरीने उतरलेल्या आयुर्वेदीक औषधीकंपन्यांसमोरचे, मुख्य आव्हान आहे.

आयु्रवेदिक औषध हे final formulation असते. जसे की वटी गुटिका, फंट,परपटी, भस्म, आसवे. List बरीच मोठी आहे. पण herbal medicine च्या अभ्यासात मध्ये केवळ एकाच drug पूण्रत: अभ्यास होतो. पाश्च्यात वनस्पतींचा तसा व्यवस्थीत अभ्यास झालाय. आणि भारतीय वनस्पतींचाही काही प्रमाणात झालाय.eg Vasaka.. Vasicine.. Leads to invention of bromhexine HCl ही list ही मोठ्ठी आहे. आयु्रवेदात formulation बनवतांना excipients वापरतात. त्यात कधी mercury sulphur zinc gold heavy metals मुद्दाम घालतात. अश्या वेळी QC fail होईल की. जरा अवांतर.. मी pharmacognosy ह्या विषयाची प्राध्यापिका आहे आणि मला मिपा वर हरबल मेडीसीन च्या संशोधनाच्या सुरस कथा सांगायच्या आहेत. लवकरच मी त्या प्रसिध्ध करीन.

In reply to by वाघमारेरोहिनी

मी pharmacognosy ह्या विषयाची प्राध्यापिका आहे आणि मला मिपा वर हरबल मेडीसीन च्या संशोधनाच्या सुरस कथा सांगायच्या आहेत. लवकरच मी त्या प्रसिध्ध करीन. जरूर प्रसिद्ध करा. "व्यवहारात आयुर्वेदिक औषधे या नावाखाली दिली जाणारी औषधे व केले जाणारे उपचार आणि आयुर्वेदाच्या संहितेत असलेली औषधे/उपचार यांच्यात किती दरी आहे (किंवा नाही) हे, शक्यतो त्या वस्तूस्थितीच्या कारणांसह, तुमच्यासारख्या त्या विषयात तज्ज्ञ असलेल्या व्यक्तिकडून लिहिलेले वाचायला नक्कीच आवडेल.

या विषयावर वेगळा धागा कुणी काढा. पटाइतसाहेबांचा जल्लोष धागा तसाच राहू देऊया. डॅा, जेम्स वांड, राही सर्वांचे प्रतिसाद वाचले. माझ्यामते अमुक संहिताप्रमाणे सिद्ध केलेले 'अभयारिष्ट, कुटजारिष्ट, त्रिफळा, त्रिकटु इत्यादि औषधांना कोणत्याही नवीन कसोट्या लावून तपासण्याची गरज नाही. ज्या काही हळद, कुटकी, दारुहळद, बावचि, रोहितक,कुमारि, केशर, वेखंड इत्यादि जडिबुटी आहेत त्या वैद्याच्या सल्ल्यानुसारच प्रमाणाने घ्यायच्या असतात. ((एक परदेशातील भारतीय व्यक्ती इथे येऊन बरीच 'अतिविषकळी *१ घेऊन जाते, त्याचा वापर दुसऱ्या कुणास मारण्यासाठी करते मग ही मूळीच मिळणे बंद होते. झोपेच्या गोळ्यांचाही गैरवापर होतोच. बरीच विषे अल्प प्रमाणात औषधेच आहेत.!)) *१- एकोनाइट हे बाळाच्या ताप आणि जुलाबावर उत्तम औषध आहे.

In reply to by कंजूस

माझ्यामते अमुक संहिताप्रमाणे सिद्ध केलेले 'अभयारिष्ट, कुटजारिष्ट, त्रिफळा, त्रिकटु इत्यादि औषधांना कोणत्याही नवीन कसोट्या लावून तपासण्याची गरज नाही. तसे पाहिले तर कोणतीच गोष्ट तपासायची गरज नसते. पण मग, तशी आधुनिक मानके व पद्धतीने सिद्धता न केलेल्या औषधांचे उपयोग हे "केवळ दावे / समजूत" याच स्तरावर राहतील आणि त्यांना आंतरराष्ट्रीय मान्यता मिळणार नाही, हे पण नक्की. त्याविरुद्ध, आधुनिक मानके व पद्धतीने सिद्धता करून शक्य तेवढ्या आयुर्वेदिक औषधांची/प्रक्रियांची पेटंट्स भारतीय कंपन्यांनी घ्यावी व भारताच्या परंपरागत ठेव्यांचा, जगाच्या नाकावर टिच्चून, नैतिक व अधिकृत फायदा घ्यावा, असे मला वाटते. याचा अजून एक फार महत्वाचा फायदा म्हणजे, अश्या सिद्धतेच्या प्रक्रियेत, धोकादायक असलेली आणि/किंवा परिणामकारक नसलेली औषधे/प्रक्रिया आपोआपच निवडून वेगळ्या केल्या जातील व आयुर्वेदाच्या आडून केले जाणारे गैरप्रकार बंद होतील... असे होणे रुग्णांच्या दृष्टीने तर वरदानच असेल. तसे न केल्याने झालेल्या/होऊ शकणार्‍या तोट्यांची काही ठळक उदाहरणे खाली देत आहे... १. योगाकडे असेच दुर्लक्ष केल्यामुळे ते ज्ञान आज प्रताधिकारमुक्त झाले आहे आणि पाश्चिमात्य जगात अनेकांनी योगाचे नाव वापरून त्याच्या खूप बर्‍या-वाईट आवृत्यांची (versions) दुकाने काढून खिसे भरले आहेत, भरणे अजून चालू आहे. २. काही दिवसांपूर्वी अमेरिकन कंपन्यांनी तर चक्क हळदीचे व बासमती तांदळाचे पेटंट घेतले होते. भारत सरकार व इतर व्यक्तींनी तो प्रयत्न अमेरिकेत खटला चालवून वेळेवर हाणून पाडला नसता तर, आज भारतियांना हळद आणि बासमती तांदूळ पिकविणे व विकणे यासाठी (त्या पेटंट्सचा वापर होतो म्हणून) अमेरिकन कंपन्यांना शुल्क द्यावे लागले असते !

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

काही दिवसांपूर्वी अमेरिकन कंपन्यांनी तर चक्क हळदीचे व बासमती तांदळाचे पेटंट घेतले होते. भारत सरकार व इतर व्यक्तींनी तो प्रयत्न अमेरिकेत खटला चालवून वेळेवर हाणून पाडला नसता तर, आज भारतियांना हळद आणि बासमती तांदूळ पिकविणे व विकणे यासाठी (त्या पेटंट्सचा वापर होतो म्हणून) अमेरिकन कंपन्यांना शुल्क द्यावे लागले असते शंभर टक्के सहमत काका, मला वाटतं, डॉक्टर रघुनाथ माशेलकर, सीएसआयआर ह्या संस्थांनी वगैरे खूप मेहनत घेतली होती. कडुलिंब पण होतं न त्यात?

In reply to by जेम्स वांड

कडुनिंबाचा प्रकार तर विनोदी वाटावा इतका विचित्र आहे! W.R. Grace and the Department of Agriculture, USA* has first filed a patent in European Patent Office. The patent is a method of controlling fungi on plants comprising of contacting the fungi with a neem oil formulation. A legal opposition has been filed by India against the grant of the patent. (* : The United States Department of Agriculture, also known as the Agriculture Department, is the U.S. federal executive department responsible for developing and executing federal laws related to farming, forestry, and food.) संदर्भ : A Detailed Study of Patent System for Protection of Inventions आपण कडुनिंबाच्या पारंपारिक उपयोगांबद्दल नुसत्या गप्पा मारत असतो आणि तिथे चक्क अमेरिकेचे शेती मंत्रालय (Department of Agriculture, USA) नीम तेलाच्या वनस्पतींवरील फंगसविरोधी औषधाचे पेटंट केवळ अमेरिकेतच नाही तर युरोपियन पेटंट ऑफिसमध्येही घ्यायचा प्रयत्न करते... म्हणजे, आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि तिला तायजीची परवानगी ! हे जर भारताच्या नजरेआड होऊन यशस्वी झाले असते तर, आज जगातल्या सर्व कडुनिंबावर आधारीत औषधे/शेतीप्रक्रिया करणार्‍या सर्व शेतकर्‍यांना आणि कंपन्यांना (त्यात भारतिय शेतकरी, संस्था व कंपन्याही येतात) तसे करण्यासाठी, आज अमेरिकेच्या शेती मंत्रालयाला पेटंट फी द्यावी लागली असती !!! आयुर्वेदीक आणि पारंपारिक औषध/पदार्थ/प्रक्रिया यांची संख्या काही लाखांत जाईल. त्यांची चोरी होऊ नये यासाठी त्या प्रत्येक गोष्टीवर जगभर सतत लक्ष ठेवणे केवळ अशक्य आहे. त्याबाबतीत सद्याची गलथान अवस्था चालू राहीली तर पुढच्या एकदोन दशकांत त्यातल्या अनेक महत्वांच्या गोष्टींची पेटंट्स परकियांच्या हाती पक्की (कन्फर्म्ड) होतील आणि भारतियांना केवळ हात चोळत बसावे लागेल... योगासारखेच ! योगासंबंधी निदान भारताचे नाव तरी घेतले जाते... इतर गोष्टींबाबत तेही होईल की नाही ते सांगता येत नाही. बासमतीच्या बाबतीतही, तेच भारतीय पारंपारिक वाण वापरून, पण त्याचा भारतीय उगम लपवण्यासाठी, "टेक्समती" या नावाने पिकवले होते... चोर आपण समजतो त्यापेक्षा खूप हुशार आणि बुद्धीमान आहेत ! तेव्हा, "चोरांना चोरी करू द्या, मग जमले तर आपण त्याविरुद्ध कारवाई करू" अशी नकारात्मक कारवाई करून, खूप महाग प्रतिक्षिप्त कृती (नी-जर्क रिअ‍ॅक्शन) करत राहणे वेडेपणाचे होईल. त्याऐवजी, स्वयंप्रेरित (proactive) सकारात्मक कृतीने आपल्या ज्ञानाची शक्य तेवढी पेटंट्स आपल्या पदरात पाडून घेणे व दिमाखाने त्यासंबंधीचा मानसन्मान आणि आर्थिक फायदा करून घेणे, जास्त योग्य आहे, असे माझे ठाम मत आहे. ...आणि ही संपूर्ण भारताच्या फायद्याची कृती केवळ पतंजली आणि/किंवा इतर खाजगी संस्थाच्या भरवश्यावर न सोडता, भारत सरकारच्या सकारात्मक प्रशासकिय कृतीने व्हायला हवी... आणि या संपूर्ण भारताच्या फायद्याच्या गोष्टीत कोणीही राजकारण आणणे निषिद्ध असायला हवे.

"खासगी कंपन्या आयुर्वेदाच्या नावाखाली खिसे भरत आहेत" त्यास "प्रप्राइटरी मेडसन" हे संबोधन दिलेले असते. 'महामंजिष्टादि क्वाथ' हे एक संहितेमध्ये सांगितलेले औषध आहे. वेद्य ते रुग्णास देऊ शकतो. किंवा प्रप्राइटरी 'रक्तदोषांतक.' यामध्ये वरील औषधातल्या जडीबुटींचे प्रमाण थोडे वेगळे घातलेले असते. आता या वनस्पतींही त्याच्या गुणदोषांसह रोगनिदानासाठी आयुर्वेदात दिलेल्या असल्याने त्यावर आक्षेप घेता येत नाही.

In reply to by कंजूस

सद्या अशी परिस्थिती आहे यात संशय नाही. मात्र, आधुनिक मानके व पद्धतीने सिद्धता करून घेतलेल्या औषधांत त्यांच्या सच्चेपणाची व परिणामांची खात्री तर राहीलच, पण तुम्ही सांगितलेल्या आणि इतर अनेक गैरव्यवहारांवर अंकुश ठेवणे शक्य होईल.

असला पाचकळ आरतीबाज, बाळकृष्णस्तुतीचा धागा म्हात्रे काका, राही, वांड यांच्यातल्या संवादामुळे माहितीपूर्ण बनला आहे. धन्यवाद. रोहिणीजी, आपल्या लेखाची प्रतीक्षा आहे.

ही संपूर्ण भारताच्या फायद्याची कृती केवळ पतंजली आणि/किंवा इतर खाजगी संस्थाच्या भरवश्यावर न सोडता, भारत सरकारच्या सकारात्मक प्रशासकिय कृतीने व्हायला हवी... आणि या संपूर्ण भारताच्या फायद्याच्या गोष्टीत कोणीही राजकारण आणणे निषिद्ध असायला हवे.
हे म्हात्रेकाकांनी लिहिलेले सार प्रचंड आवडले आणि हेच व्हावे अशी प्रचंड इच्छा आहे.

काही चांगले आणि काही फालतुचे प्रतिसाद वाचले. अधिकांश लोकांना पतंजली बाबत माहित नाही. सरकार दरबारात विदेशी कंपन्यांचे समर्थक जास्त असल्यामुळे आयुर्वेद असो किंवा कुठल्या हि ज्ञानावर संशोधन करण्यावर खर्च केला गेला नाही. आयुष मंत्रालय हि २०१४ नंतर बनले. शोधनिधी अत्यंत कमी आहे. आज CSIR, इत्यादी संस्थेतील अनेक निवृत्त सरकारी अधिकारी बिना मूल्य आपली सेवा तिथे देत आहे , याच्या अर्थ तिथे काही चांगले निश्चित सुरु असेल. शोधासाठी पतंजलीच्या सर्वच लेब अत्याधुनिक आहेत. धीर धारा चांगले परिणाम लवकरच मिळतील. बाकी आचार्य बाळकृष्ण या घटकेला सर्वश्रेष्ठ वैद्य आहेत, हे निश्चितच आहे. बाकी अधिक माहिती साठी http://www.acharyabalkrishna.com/research/

In reply to by विवेकपटाईत

रामदेव बाबा अन बाळकृष्ण महाराज काय तुम्हाला विचारून सगळे निर्णय घेतात काय? आंधळे अन जातीयवादी असायची एक हद्द असते पटाईत, सरकारी निवृत्त अधिकारी पेन्शन देऊन पोसतोय आम्ही करदाते त्यामुळे त्यांना पतंजलीत फुकट राबायला काय जातंय? आम्ही आहोतच पोसायला त्यांना.

In reply to by जेम्स वांड

बाकी सगळे प्रेम, निषेध आणि विरोध त्यांच्या जागी ठीक असू शकतात. पण, (मी किंवा जवळच्या नातेवाईकांपैकी कोणीही पेन्शनर नसतानाही) खालील प्रतिसादाचे प्रयोजन कळले नाही... सरकारी निवृत्त अधिकारी पेन्शन देऊन पोसतोय आम्ही करदाते त्यामुळे त्यांना पतंजलीत फुकट राबायला काय जातंय? आम्ही आहोतच पोसायला त्यांना. जे काही कायदेशीरपणे मिळत आहे ते मिळवून, त्याबरोबरच कायद्याच्या चौकटीत राहून कोणी त्याच्या विचाराने काही काम करत असेल तर, त्या कृतीबद्दल विखारी टीका करण्याइतपत आक्षेप/विषाद/चीड/इ यावी ?! पेन्शनर लोक पतंजली सोडून, तुमच्या पसंतीच्या एखाद्या संस्थेत काम करत असते, तर ते ठीक झाले असते का ? तुमच्याकडून इतका एकेरी (तुलनेने मवाळ विशेषण ;) ) प्रतिसाद पाहून आश्चर्य वाटले, म्हणून केवळ हा प्रतिसाद :(

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

तुमचे तुमच्याजवळ पण तुमच्या पसंतीच्या एखाद्या संस्थेत काम करत असते, तर ते ठीक झाले असते का ? हा जो तूम्हाला प्रश्न पडलाय ह्यातच सगळं आलं, मी अमुक बाजूचा नाही म्हणल्यावर मी तमुक बाजूलाच असेन हे जे गृहीतक तुमच्या प्रश्नातून झळकते आहे ते शब्दशः अश्लाघ्य आहे, पण ठिके त्यातून किमान तुमचे बायस नागवे होऊन पुढे येतायत हे नसे थोडके. कायद्याच्या चौकटीत राहून कोणी त्याच्या विचाराने काही काम करत असेल तर, त्या कृतीबद्दल विखारी टीका करण्याइतपत आक्षेप/विषाद/चीड/इ यावी ?! सीसीएस रुल्स एकदा वाचून पाहावं इतकं सुचवतो

सरकारचा पगार खाताना खासगी संघटना कंपन्या इत्यादींचे "काम" करण्यावर कायदा काय म्हणतो ते ही दिल्ली रायसीना स्थित सरकारी नोकरांसाठी

हे एकदा वाचून पहा

In reply to by जेम्स वांड

की पटाईत भयानक बायस्ड आहेत, पतंजलीचे नागवे समर्थन त्यांचा एजंडा असूही शकेल, अन असला तरी मला हरकत नाहीये पण गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा तो एजंडा नाहाये, सीसीएस रुल्स त्याला स्पष्ट प्रोहीबिट करते त्यामुळे तुमचे वेस्टेड इंटरेस्ट/ आयडिओलॉजीकल इंटरेस्ट काय हे एक नवलच वाटते

In reply to by जेम्स वांड

सरकारचा पगार खाताना खासगी संघटना कंपन्या इत्यादींचे "काम" करण्यावर कायदा काय म्हणतो ते ही दिल्ली रायसीना स्थित सरकारी नोकरांसाठी तुमचा काहीतरी मोठा घोळ होत आहे. धागालेखक व्यक्तिगतरित्या काय करतात किंवा त्यांचा काही अजेंडा असो/नसो, याबद्दल माझ्या प्रतिसादात काहीच नव्हते. माझे म्हणणे सर्वसाधारण निवृत्त लोकांनी काय केले / करावे याबद्दल होते. नोकरीत असलेले लोक पगार घेतात व निवृत्त लोक पेन्शन घेतात. कोणताही पेन्शनर त्याने केलेल्या नोकरीच्या नियमानुसार कायदेशीर पेंन्शन नावाचा मोबदला घेत असतो. त्याला "पोसणे" म्हणणे किती चुकीचा व अपमानकारक शेरा आहे हे तुमच्यासारख्या हुशार माणसाला सांगायला नकोच. असो. निवृत्त (किंवा इतर कोणत्याही) लोकांनी कायद्याच्या परिघात राहून कोणतेही काम केले तर त्यावर कोणाचा आक्षेप का असावा ? तसे करणे हा त्यांच्या "मुक्त निवड करण्याच्या (फ्री चॉईस)" हक्कावर आघात होत नाही का ? जर कोठे, "कायद्याचा भंग होत आहे किंवा कायद्याला बगल दिली जात आहे", असे ध्यानात आले तर त्याबद्दल योग्य त्या सक्षम अधिकारी/संस्थेकडे तक्रार करण्याचे मार्ग सर्वांनाच उपलब्ध आहेत. हल्ली आंतरजालावरील संबंधीत संस्थळांमुळे असे करणे खूप सोपे झाले आहे, हे सांगायला नकोच. काही गोष्टी बळजबरीने स्वतःवर ओढून व इतर कारणांनी मारलेले शेरे, त्वेषाच्या भरात केलेले लेखन समजून, दृष्टीआड केलेले आहेत. :) असो. चर्चेचा वितंडवाद होऊ लागल्याने व माझ्यातर्फे वरच्या विषयावर, सद्यातरी, अजून जास्त लिहिण्यासारखे काही नसल्याने, रामराम.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

ऐतखाऊ कामचुकार सरकारी यंत्रणेबद्दल कायदेशीर काही असलं म्हणून ते पवित्र होत नाही, अन पेन्शन काय सरकार हवेतून देत नाही, ती तुमच्या आमच्या कराच्या पैश्यातूनच दिली जाते. तरी असोच.

In reply to by जेम्स वांड

वांड साहेब सरकारी नोकर असले तरी त्यांनाहि आपल्या उत्पन्नावर आयकर भरावाच लागतो आणि ते पण वरच्या स्लॅब असले तर त्यांना पण आपल्या उत्पन्नाच्या ३०% आयकर भरावा लागतो तेंव्हा तुमच्या आमच्या बरोबर त्यांच्या कराच्या उत्पन्नातून हे पण त्यात लिहावे लागेल.आणि त्यांना मिळणाऱ्या निवृत्तीवेतनावर सुद्धा त्यांना कर भरावाच लागतो. सरकारी नोकरी करत असताना आमचा एक "हुशार डॉक्टर मित्र" असेच टोमणे मारत असे. तेंव्हा मी भरत असलेल्या आयकराची रक्कम त्याला सांगून एवढेच म्हणालो कि तुमच्या आणि आमच्या नव्हे तर माझ्यापण कराच्या पैशातून आमचा पगार मिळतो. आणि मी हेही सुनावले कि मी भरत असलेल्या करातून एका कारकुनाचा पगार निघतो. त्याचे उत्पन्न माझ्या दुप्पट असूनही तो माझ्या निम्माच आयकर भरत होता. यांनतर गेल्या २० वर्षात त्याने हा विषय कधीही काढला नाही. जाता जाता-- मला कोणतेही निवृत्तीवेतन नाही परंतु सरकारी नोकराना मिळणारे निवृत्ती वेतन हे म्हणजे त्यांना फुकट पोसणे हे म्हणणे अजिबात पटणारे नाही.

In reply to by सुबोध खरे

सरकारी नोकराना मिळणारे निवृत्ती वेतन हे म्हणजे त्यांना फुकट पोसणे हे म्हणणे अजिबात पटणारे नाही. +१०० तसे म्हणायचे झाले तर मग, एखाद्या खाजगी कंपनीचे समभाग (शेअर्स) विकत घेणार्‍यांनीही, "आम्ही त्या कंपनीच्या कर्मचार्‍यांना पोसतो", असे म्हणण्यास हरकत नसेल ! ;) :)

In reply to by जेम्स वांड

मी कुठल्याही सरकारी नियमांचा भंग केला नाही आहे. ज्या संस्थेत जे चांगले कार्य खरोखर होत आहे त्या बाबत लिहिले आहे. आयुर्वेदात वापरणार्या वनस्पतींवर तिथे खरोखर कार्य होते आहे. त्या बाबत लिहिणे म्हणजे मी कुणाचा agent इत्यादी होत नाही. विषयावर प्रतिसाद द्या. म्हणा पंटाईत साहेबांचा लेख फालतू आहे, त्यात काही तथ्य नाही चालेल. . उगाच सरकारी कर्मचार्यांवर/ निवृत्त कर्मचार्यांवर राग काढू नका.

नोकरीत असलेले लोक पगार घेतात व निवृत्त लोक पेन्शन घेतात. कोणताही पेन्शनर त्याने केलेल्या नोकरीच्या नियमानुसार कायदेशीर पेंन्शन नावाचा मोबदला घेत असतो. त्याला "पोसणे" म्हणणे किती चुकीचा व अपमानकारक शेरा आहे हे तुमच्यासारख्या हुशार माणसाला सांगायला नकोच -हुशार? इथं उद्दाम लिहायचे होते ना?

वांड भौ उद्या म्हणेल सरकारच नको. मग सरकारी नोकर राहणार नाहीत व त्यायला पेंशन दियाला लागणार नाय. कीव येते यांच्या विचारांची (अकलेची).

माहिती देण्यात "पटाईत" होताना तटस्थ "विवेक" हवाच नाहितर जाहीरात होते आणि लोक जाहिरातीला गम्भीरतेने घेत नाहीत.