बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा.

Jayant Naik जनातलं, मनातलं
बालभारतीचे बारावी साठी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक ….मानसिक गुलामगिरीची परिसीमा. भारताला स्वातंत्र्य १९४७ साली मिळाले. ब्रिटीश आपल्या भूमीत चालते झाले . पण त्यांनी आपल्या शिक्षणात आणि त्या अनुषंगाने आपल्या विद्वानांमध्ये जी भारतीय संस्कृती बद्दल हीनत्वाच्या भावनांची बीजे पेरून ठेवली आहेत ती नष्ट होण्याची गोष्ट तर सोडाच पण आता त्याचा समृद्ध वृक्ष झाला आहे कि काय अशी शंका अनेक कारणामुळे येते. त्याचेच एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणजे बालभारतीचे हे बारावीसाठी तयार केलेले मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक . हे पुस्तक वाचल्यावर सकृतदर्शनी असे वाटते कि हे एखाद्या इंग्रजी पुस्तकाचे भाषांतर असावे.शिक्षण मंडळाने आणि त्यांच्या संपादक मंडळाने काही निश्चित विचार करून आणि प्रयत्न करून हे पाठ्यपुस्तक लिहिले असावे असे अजिबात वाटत नाही . गोऱ्यालोकांचे सर्व काही बरोबर आणि भारतीय संस्कृतीचे सर्व काही चुकीचे अशी भावना आपल्या मनात निर्माण करण्याचे महत कार्य जे मेकौले (Thomas Macaulay)पासून सुरु झाले आहे ते आज सुद्धा तेवढ्याच जोमाने आपलेच बंधुभगिनी करीत आहेत याचा संताप प्रत्येक सुबुद्ध नागरिकाला येणे अतिशय गरजेचे आहे ...आणि त्या साठीच हा लेख. मानसिक गुलामगिरीची हि परिसीमाच म्हणावी लागेल कि आपलेच विद्वान आमच्या बारावी सारख्या संवेदनशील वयातील मुलांना अश्या गोष्टी मानसशास्त्राचे पाठ्यपुस्तक या माध्यमातून शिकवतात मी असे का म्हणतो ? १.० या पूर्ण पुस्तकात मानसशास्त्रावर काम केलेल्या एकाही भारतीयाचे नाव नाही ! मानसशास्त्र या विषयावर काम केलेल्या एकाही भारतीयाचे नाव या पाठ्यपुस्तकात का नसावे ? बाहेरच्या जगाबद्दल माहिती करून देणाऱ्या शास्त्रांना विज्ञान आणि आपल्या मनातील आणि अंतर्मनातील विश्वाचे रहस्य उलगडून दाखवणारे ते ज्ञान हे आपले पूर्वज सांगत होते ते काय फक्त झोपेत सांगत होते काय ? आपल्या लोकांनी यावर काहीच विचार केला नाही ? खरे तर मनाचा शोध अगदी प्राचीन काळापासून सुरु आहे. उपनिषदे ,भगवद गीता आणि वेद या मध्ये मानवी विचारांचा आणि भावनांचा सखोल विचार आढळतो . वेद , पातंजली पासून ते चार्वाक ,गौतम बुद्ध, रामदास स्वामी , ज्ञानेश्वर ,विवेकानंद ,टिळक यांनी मना बद्दल किती गहन विचार मांडले आहेत . 'योग: चित्तवृत्ती निरोध:' असे योगाची व्याख्या करतात यातील हे चित्तवृत्ती काय आहे ? चरक संहितेत मनोव्याधी वर खूप खोलवर विचार केला गेलेला आहे ...याचा निर्देश या पाठ्यपुस्तकात का नसावा ? का आपले ऋषी हे शास्त्रज्ञ नव्हते असे या पाठयपुस्तक लिहिणाऱ्या विद्वानांचे म्हणणे आहे ? २.० शिथिलीकरण प्रतिक्रिया ..(चौकट ३.४.१.) बेन्सन यांनी दिलेली.ध्यानाबद्दल माहिती . मानसिक ताण व्यवस्थापन या प्रकरणात तर मानसिक गुलामगिरीचा कळस गाठला आहे . यात बेन्सन यांनी दिलेली शिथिलीकरण प्रतिक्रिया एका चौकटीत दिली आहे. यात श्वासावर लक्ष केंद्रित करून शिथिलीकरण कसे करावे हे सांगितले आहे . योग समजणाऱ्या कुणालाही कळेल कि ही प्रतिक्रिया म्हणजे बुद्धाने सांगितलेली विप्पषना क्रिया आहे. म्हणजे हा बेन्सन खरा … आणि बुद्ध खोटा ? बुद्धाचे नाव घ्यायला हे पुस्तक लिहिणाऱ्या विद्वान मंडळीना लाज वाटली कि काय ? ३.४.२ ध्यानाच्या पद्धती . ध्यान हि संकल्पना पूर्णतः भारतीय आहे या बद्दल तरी कुणाचे दुमत असू नये. पण इथेसुद्धा मंडळाला पातंजली किवा बुद्ध यांचे नाव घ्यावे असे का वाटले नाही ? ३.० हे पाठयपुस्तक भारतीय ….ते शिकणारे भारतीय पण यातील उदाहरणादाखल दिलेली चित्रे गोऱ्या समाजाची ? ही काही उदाहरणे पहा ! चौकट १.३ …. बुद्धीगुणांकात सुधारणा. ….यात सर्व मुले कुठल्यातरी युरोपिअन किवा अमेरिकन शाळेतील दाखवली आहेत . आकृती ३.१.१ व्यक्तीचा ताणाचा अनुभव पुलावरून जाणाऱ्या ट्रक शी करता येईल … यात पुलावरून जाणारा ट्रक सुद्धा परदेशी दाखवला आहे …. भारतात देशी बनावटीचे ट्रक सुद्धा नाहीत कि काय ? आकृती ३.५.२. मित्रांकडून मिळणारा सामाजिक आधार ...ही सर्व चित्रे गोऱ्या लोकांची आहेत ...आपल्या कडे काय मित्र नाहीत ? आकृती ७.२.१ गोंगाट . यात काही लोक गोंगाटापासून वाचण्यासाठी कानावर हात ठेवलेली दाखवली आहेत ….आता हि सुद्धा गोरी का ? आपल्या कडे का गोंगाटसुद्धा नाही ? ही सर्व उदाहरणे मी फक्त प्रातिनिधिक म्हणून घेतली आहेत . बाकीची सर्व चित्रे अशीच परकीय आहेत . मुद्दा हा कि यांना उदाहरणे सुद्धा भारतीय देता येऊ नयेत ? मला माझी मी पहिल्यांदा सांगितलेली शंका खरी वाटते ...कुठल्यातरी इंग्रजी पुस्तकाची पूर्ण नक्कल केली आहे ! ४.० भारतीय शास्त्रज्ञ जरूर आहेत . अगदी वेदकाळात किवा बुद्धकाळात जायचे नाही असे ठरवले तरी थोडासा गुगल शोध घेतला तरी आजच्या काळातील भारतीय मानसशास्त्रज्ञ सापडतात. श्री नरेंद्रनाथ सेन गुप्ता ,श्री गुनामुद्दीन डेव्हिड ,श्री संजय कक्कर आणि अगदी आजच्या काळातील श्री आनंद नाडकर्णी आणि असेच बरेच ...यांनी या क्षेत्रात खूप काम केले आहे ...यांना अगदी उल्लेख ही का नसावा ? म्हणून माझे असे मत झाले आहे कि या सर्व विद्वान मंडळीना ज्यांनी हे पाठ्यपुस्तक लिहिले आणि या पुस्तकाला मान्यता देणाऱ्या मंडळाला या मानसिक गुलामगिरीतून कुणीतरी बाहेर काढायची गरज आहे. हे असे शिक्षण घेतल्यानंतर आपल्या तरूण तरुणींना भारताचा आणि आपल्या संस्कृतीचा काय अभिमान वाटणार ? मग ही अशी मंडळी परदेशी जाऊन स्थाईक झाली आणि त्याच संस्कृतीचा अभिमान बाळगायला शिकली तर त्यात त्यांचा काय दोष ? आपण फक्त इतकेच म्हणू शकतो कि लॉर्ड मेकौले ने जे ध्येय आपल्या डोळ्यासमोर ठेवले होते ते साध्य झाले. “ …...आपण एक असा वर्ग निर्माण करायला पाहिजे कि जो रक्ताने आणि रंगाने तर भारतीय असेल पण त्याची आवड निवड ,मते ,संस्कार आणि बुद्धिमत्ता इंग्रजी लोकांसारखी असेल …...आणि जे बाकीच्या सर्व लोकांपर्यंत पाशिमात्य ज्ञान पोचवतील ….” (We must at present do our best to form a class who may be interpreters between us and the millions whom we govern, --a class of persons Indian in blood and colour, but English in tastes, in opinions, in morals and in intellect. To that class we may leave it to refine the vernacular dialects of the country, to enrich those dialects with terms of science borrowed from the Western nomenclature, and to render them by degrees fit vehicles for conveying knowledge to the great mass of the population.- Lord Thomos Macaulay in 1835. ) भारताला स्वातंत्र्य मिळून इतक्या वर्षानंतर सुद्धा आपण मानसिक दृष्ट्या स्वतंत्र झालो नाही आणि आपण अजूनही इंग्रजांच्या चमच्याने दुध पितो आहोत हीच खरी शोकांतिका आहे. जयंत नाईक .
वर्गीकरण
लेखनप्रकार

27 टिप्पण्या 9,654 दृश्ये

Comments

टवाळ कार्टा नवीन

कुठल्यातरी इंग्रजी पुस्तकाची पूर्ण नक्कल केली आहे !
पुस्तकातील माहिती काय असावी ते ज्याने ठरवले तो इंजीनीअर आहे का ते बघा एकदा =))

जयन्त बा शिम्पि नवीन

" विप्पषना क्रिया " हा शब्द सुद्धा चुकीचा लिहिला गेला आहे. प्रत्यक्षात " विपश्यना " असा हवा. शिवाय विपश्यना म्हणजे कोणतीही 'क्रिया' नसून ती एक ध्यानाची पध्दती आहे. शिथिलिकरणासाठी ह्या पध्दतीचा उपयोग होत नसून, त्यासाठी " योग निद्रा " ह्या योग मार्गाच्या अन्तर्गत पध्दतीचा उपयोग केला जातो. बाकी लेखातील मतांशी सहमत.

जयन्त बा शिम्पि नवीन

" विप्पषना क्रिया " हा शब्द सुद्धा चुकीचा लिहिला गेला आहे. प्रत्यक्षात " विपश्यना " असा हवा. शिवाय विपश्यना म्हणजे कोणतीही 'क्रिया' नसून ती एक ध्यानाची पध्दती आहे. शिथिलिकरणासाठी ह्या पध्दतीचा उपयोग होत नसून, त्यासाठी " योग निद्रा " ह्या योग मार्गाच्या अन्तर्गत पध्दतीचा उपयोग केला जातो. बाकी लेखातील मतांशी सहमत.

Jayant Naik नवीन

In reply to by सरळमार्गी

संस्कृत शब्द विपश्यन असा आहे. विपस्सना असा पाली शब्द आहे. ओशो म्हणतो ते किती बरोबर आहे . मी तुम्हाला चंद्र दाखवतो आहे तर तुम्ही म्हणताय त्या कडे निर्देश करणारे बोट वाकडे आहे. अरे जे दाखवतो आहे ते बघा ना ? या पाठ्यपुस्तकात भारतीय संस्कृती पूर्ण पणे वगळली आहे हे मी सांगतोय .....तिकडे पहा ...

माहितगार नवीन

In reply to by Jayant Naik

...ओशो म्हणतो ते किती बरोबर आहे . मी तुम्हाला चंद्र दाखवतो आहे तर तुम्ही म्हणताय त्या कडे निर्देश करणारे बोट वाकडे आहे.
वाक्य आवडण्यात आले आहे. आपला कॉपीराईटचा आधिकार नसेलतर भविष्यात माझ्या सर्व धागा लेखात वापरावे म्हणतोय.

माहितगार नवीन

लेखातली मते सर्वसाधापापणे पटली आहेत. बालभारतीने सर्व इयत्ताची पुस्तके ऑनलाईन का ऊपलब्ध करु नयेत ? अगदी पाठ्य पुस्तक बनवण्याची प्रक्रीयाचालू असतानाही मजकूर सुचनाम्साठी ओपन असावयास हवा असे वाटते.

गामा पैलवान नवीन

In reply to by Jayant Naik

जयंतराव, हाहाहा ! आता कळलं ना ओपन का केली नाहीत ते !! मेकॉलेबाबाकी जय बोला !!! आ.न., -गा.पै.

टवाळ कार्टा नवीन

In reply to by गामा पैलवान

तुम्ही त्याच मेकॉलेने ठरवून दिलेल्या शिक्षणपद्दतीतून शिकून मेकॉलेच्याच देशात जाउन मेकॉलेच्याच देशबांधवांची चाकरी करता ना....ते सुद्धा स्वखुशीने

गामा पैलवान नवीन

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, अहो, कित्येकदा सांगितलंय ना की मी हिंदू धर्म किती महान आहे हे ठसवण्यासाठी इंग्लंडमध्ये आलोय म्हणून. परत आपलं तेच तेच. अर्थात मला कंटाळा येऊन चालणार नाही ही बाब वेगळी. इथे येऊन मी इंग्रजांसमोर एक आदर्श उत्पन्न करतोय. तेसुद्धा मेकॉलेने ठरवून दिलेल्या शिक्षणपद्दतीतून शिकून मेकॉलेच्याच देशात जाउन मेकॉलेच्याच देशबांधवांची चाकरी करता करता. एव्हढ्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत मी येथवर आलोय. मी म्हणजे खरोखरंच आदर्श आहे. आ.न., -गा.पै.

टवाळ कार्टा नवीन

In reply to by गामा पैलवान

मी हिंदू धर्म किती महान आहे हे ठसवण्यासाठी इंग्लंडमध्ये आलोय म्हणून. परत आपलं तेच तेच. अर्थात मला कंटाळा येऊन चालणार नाही ही बाब वेगळी. इथे येऊन मी इंग्रजांसमोर एक आदर्श उत्पन्न करतोय.
नक्की काय आदर्श उत्पन्न करत आहात? आदर्श उत्पन्न करायला काय काय करावे लागते? मिपाकरांनासुद्धा समजूदे

गामा पैलवान नवीन

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, अहो, काय सांगायचं आता ! तुम्ही तर प्रश्नापूर्वीच उत्तर देऊन ठेवलंय की !! हे बघा :
तुम्ही त्याच मेकॉलेने ठरवून दिलेल्या शिक्षणपद्दतीतून शिकून मेकॉलेच्याच देशात जाउन मेकॉलेच्याच देशबांधवांची चाकरी करता ना....ते सुद्धा स्वखुशीने
एव्हढ्या प्रतिकूल परिस्थितीशी सामना करीत मी येथवर आलोय. म्हणूनंच मी म्हणजे खरोखरंच आदर्श आहे. मेकॉलेछाप शिक्षणपद्धतीचे तोटे इंग्रजांना समजावून सांगणे हा नवीन आदर्श उत्पन्न केला आहे. हा आदर्श उत्पन्न करतांना मला माझ्या प्राणप्रिय हिंदू धर्माचं सहाय्य झालं आहे. अशा रीतीने मला हिंदू धर्म किती महान आहे हे ठसवण्याची संधी प्राप्त झाली. आ.न., -गा.पै.

मराठी कथालेखक नवीन

चित्रांबद्दलचा मुद्दा अधिक पटला. बाकी शास्त्रज्ञांच्या उल्लेखाबद्दल मी काही सांगू शकत नाही. जर एखाद्या विशिष्ट संकल्पनेबद्दल भारतीय शास्त्रज्ञाने महत्वाचे संशोधन केले असेल तर त्याचे नाव टाळता येणार नाहीच. उदा: गॉड पार्टिकल वा हिग्ज बोसॉन बद्दल लिहिताना कुणी शास्त्रज्ञ सत्येंद्रनाथ बोस यांचा उल्लेख टाळू शकणार नाही. बाकी
मग ही अशी मंडळी परदेशी जाऊन स्थाईक झाली आणि त्याच संस्कृतीचा अभिमान बाळगायला शिकली तर त्यात त्यांचा काय दोष ?
मानसशास्त्र शिकणार्‍यातले कुणी परदेशी जावून स्थाईक होईल (स्वबळावर - जोडीदारासोबत नव्हे) अशी शक्यता फार कमी वाटते.

सतिश गावडे नवीन

लेखाच्या गाभ्याशी सहमत असलो तरी येता-जाता Thomas Macaulay शिव्या घालणे काही पटत नाही. आपली "शिक्षण व्यवस्था" आणि त्यातून मिळणारे "शिक्षण" हे ज्यासाठी घेतले जाते ते सारे म्हणजे आयायटी एडमिशन, प्याकेज, नोकरी, 2-3-4 बिचके, ऑनसाइट, डॉलर, पौंड, एसयूव्ही, फारीन टूर या साऱ्याचा पाया मेकॉलेची शिक्षणपद्धती आहे. जर मेकॉलेची शिक्षण पद्धती नाकारायची ठरवली तर हा सारा डोलाराच कोसळेल, जे खरे तर हितावह

गामा पैलवान नवीन

In reply to by सतिश गावडे

सतिश गावडे, लेखकानं मेकॉलेस शिव्या घातलेल्या नाहीत. त्याने त्याच्या भाईबंदांना अनुकूल ठरेलसं धोरण राबवलं. आपण आपल्या भाईबंदांना अनुकूल ठरेलसं धोरण आजूनही राबवीत नाही, याचं दु:ख आहे. आ.न., -गा.पै.

टवाळ कार्टा नवीन

In reply to by गामा पैलवान

आपण आपल्या भाईबंदांना अनुकूल ठरेलसं धोरण आजूनही राबवीत नाही
म्हणजे नक्की काय करायला हवे?

गामा पैलवान नवीन

In reply to by टवाळ कार्टा

टवाळ कार्टा, इथे तुमच्या प्रश्नाचं उत्तर आहे : https://www.misalpav.com/node/42933 तुम्ही वाचलेलं दिसंत नाही. काही हरकत नाही. सवडीनं वाचून घ्या. आ.न., -गा.पै.

पुंबा नवीन

मानसविज्ञानातील पाश्चात्य मानसशात्रज्ञांचं योगदान मोठं आहे हे मान्य न करण्यात काहीच हाशील नाही मात्र भारतीय तत्वज्ञानात, आयुर्वेदात, योगशास्त्रात मन या संकल्पनेचा विचार कसा केला आहे हे अभ्यासक्रमात मुळीच नसणे अत्यंत वाईट आहे. गीतेत मानवाच्या मनाबद्दल, विकारांच्या निर्मीतीबद्दल किती ओरिजिनल विवेचन आहे. तसेच उपनिषदांचे देखिल. हे टाळणे मला देखिल लेखकाप्रमाणे न्युनगंडातून आणि शैक्षणिक क्षेत्रातील कॉपीबाज लफंग्यांच्या 'चलता है' वृत्तीतून आले असावे.