Skip to main content

हंबीरराव,बहिर्जी आणि बहादूरखान कोकलताश

हंबीरराव,बहिर्जी आणि बहादूरखान कोकलताश

Published on 04/06/2018 - 16:22 प्रकाशित मुखपृष्ठ
हंबीरराव,बहिर्जी आणि बहादूरखान कोकलताश नुकताच राज्याभिषेक सोहळा पडला होता...सहयाद्री आणि रायगड आनंदाच्या वर्षावात न्हाहून गेले...स्वराज्य अवतरले होते...रायगड आता सर्व सहयाद्री आणि किल्ल्याच्या राजा झाला होता...अनेक शूर-वीर योद्धे..देशोदेशीचे वकील..साधू संत...लहान थोर... सर्व संतुष्ट झाले होते...सर्व आसमंतात राजांचे आणि रायगडाचे नाव दुमदुमत होते...आता कोणाचीही वाकडी नजर होणार नव्हती स्वराज्याकडे...राजे निश्चिन्त आणि संतुष्ट मनाने..लिंगाणा, राजगड, तोरणा; मकरंदगड, प्रतापगड, वासोटा आणि सभोवताली पसरलेल्या स्वराज्याची पाहणी करत होते...हवेत गारवा पसरला होता...राजांनी अंगाभोवती लपेटलेली शाल अजूनच लपेटून घेतली...आणि टकमक टोकावरून जगदीश्वर मंदिराच्या दिशेने चालू लागले... जगदीश्वराच्या मंदिरात प्रसन्न शांतता पसरली होती...आता लावलेल्या कापूर आणि धुपाचा वास वातावरणात भरून राहिला होता...आत गाभाऱ्यात पुजारी मंत्रो-उच्चार करत होते...आवाज आतल्या आत घुमत होता...एक दैवी अनुभूती येत होती...एव्हाना राजांनी आपल्या नेहमीच्या पूजेला सुरुवात केली होती...त्या मंत्रो-उच्चाराच्या गजरात राजे थोडावेळ ध्यानस्थ बसले...आणि डोळे उघडून पुजाऱ्याच्या दिशेने नजर रोखुन बोलले...बोला बहिर्जी बोला...आज काय खास बातमी आहे... ते ऐकून बहिर्जीच्या चेहर्‍यावर प्रसन्न हसू पसरले...राजांनाही त्यांच्या वेगवेगळ्या रूपांची सवय झाली होती... राजे पक्की खबर आहे २४ पुण्यापासून कोसांवर भीमेच्या काठी औरंगजेब बादशहाचा दूधभाऊ बहादूरखान कोकलताश जफरजंग बहादूरगडावर वस्तीला आहे...बादशहाला २०० जातिवंत अरबी घोडे आणि एक कोटींचा खजिना घेऊन चालला आहे...पण भीमेचे पाणी पावसाने वाढल्यामुळे..मुक्काम अजून ५ ते ७ दिवस होईल...सैन्य पण २००० ते ३००० आहेत...चांगली संधी आहे..हे ऐकून राज्यांच्या डोळ्यांत चमक आली...राजांनी लगोलग हंबीरराव मोहित्यानां सांगावा धाडला... हंबीरराव पण धावत धावत मंदिरात आले...गाभाऱ्यात फक्त राजे आणि पुजारी बघुन गोंधळून गेले...राजांनी सदरेत न बोलवता इथे का बोलविले ते समजेना...राजांनी बहिर्जीनी आणलेली खास बातमी सांगितली...राजांचे बोलून झाल्यावर तो पुजारी हंबीरराव मोहित्याच्या पाय पडायला पुढे झाला...ते बघून ते अजूनच गोंधळून गेले आणि नकॊ नको म्हणत अजून पाठी झाले...राजे ते बघून अजून हसायला लागले...हंबीररावांना काही कळेचना तेव्हा त्या पुजार्‍याने आपली दाढी काढली...तेव्हा हंबीरराव मोहित्यानां कळले..हे दुसरे तिसरे कोणी नसून बहिर्जी आहेत... राजे,बहिर्जी आणि हंबीरराव मोहित्यांनी डावपेच ऐकले...९००० हजारांची फौज घेऊन बहादूरगडाच्या दिशेने बहिर्जी आणि हंबीरराव निघाले...पण आता फक्त २००० हजारांची फौज बहादूरगडाच्या दिशेने दौडत होती आणि त्याचे नेतृत्व बहिर्जी करत होते ?? मग सात हजारांची फौज आणि हंबीरराव गेले कुठे ??... असो ..ती २००० हजारांची फौज बहादूरगडाच्या दिशेने वाऱ्याच्या वेगाने दौडत निघाली...मराठी फौज छावणीवर चालून येत आहे, असे समजताच बहादूरखानने आपल्या फौजेला सिद्ध होण्याचा हुकूम सोडला...आणि फक्त २०० ते ३०० सैनिक किल्ल्यात ठेवून गडाचे दरवाजे उघडून मराठ्यांच्या दिशेने निघाली आणि काय आश्चर्य !!! मुघल फौज येत आहे, हे पाहिल्यावर मराठे रणांगण सोडून चक्क पळत सुटले... ते बघून बहादूरखान आणि मोगली सैनिकांना अजून चेव चढला...ते दुप्पट वेगात मराठ्यांच्या पाठलाग करू लागले...मराठे वाट मिळेल तिकडे सैरावैरा धावत सुटले...कोणीच हाती आले नाही.. शेवटी कंटाळून बहादूरखान आणि मोगली सैनिक पाठी फिरले...गडाजवळ येऊन बघतात तर काय ??? जिकडे तिकडे आग लागलेली...तबेल्यात एकही घोडा नाही..करोडोंचा खजिना पण जागेवर नव्हता...बहादूरखान कोकलताश जफरजंग वेडा झाला.. २०० ते ३०० सैनिक काही जखमी झाले..काही बांधून ठेवले होते.. आता बादशहाला काय तोंड दाखवणार ?? काय नजराणा पेश करणार?? मराठे आहेत कि भुतं आहेत?? आपणचं त्याना पळवून लावले?? मग झाले काय ?? बहादूरखानाला एका सैनिकाने झालेला प्रकार सांगितला तेव्हा त्याने फक्त आपले डोके गच्चं धरून हताश होऊन बसला... झाले असे बहादूरखान खान फार दूरवर गेला आहे समजताच बहादूरगडाच्या आसपास लपलेली ७००० हजारांची फौज आणि हंबीरराव मोहिते...बहादूरगडावर चालून आली..तिथल्या मूठभर मुघलांना ही धडक सोसवलीच नाही... एक कोटीचा खजिना आणि २०० अरबी घोडे अलगद हाती आले...मराठयांनी मोगली छावणी पेटवून दिली आणि आल्या पावली माघारी फिरले.. सर्व लूट रायगडाच्या पायथ्याशी सुखरूप पोहचती झाली... आणि राज्याभिषेकाचा पूर्ण खर्च भरून निघाला
लेखनप्रकार

याद्या 3413
प्रतिक्रिया 12

खतरी.... या अश्या छोट्या छोट्या गोष्टींच्या कथुकल्या तयार केल्या पाहिजेत.... वेब सीरिज सारख्या

अश्या कथा लिहीताना थोडा अभ्यास करायला हवा ईतकेच सुचवेन. वास्तविक बहादुरखान हे या मोगली सरदाराचे मुळचे नाव, कोकलताश, जाफरजंग या त्याला मिळाळेल्या पदव्या. या बहादुरखानाने भीमेच्या काठी पांडे पेडगावला भुईकोट उभारला आणि त्याला स्वताचे नाव दिले, "बहादुरगड". विशेष म्हणजे मोगलांनी उभारलेला किल्ला असुनही आतील मंदिरे बर्‍यापैकी अवस्थेत आहेत. इथेच संभाजीराजांचा छळ झाला. हा बहादुरखान शुर असला तरी बुध्दीने मंद होता. दक्षिण दिग्विजयाच्या वेळी शिवाजी महाराजांनी त्याला शरणागतीची हुल देउन अक्षरशः मामा बनवले. महाराज त्याला "पेंडीचे गुरु" म्हणत. वरील कथेत हंबीरराव मोहितेंचा उल्लेख आहे, मात्र प्रत्यक्षात कोणत्या सरदाराने हि मोहिम पार पाडली ते अजून तरी अज्ञात आहे.

In reply to by दुर्गविहारी

त्ये पुजाऱ्याच्या दाढीवर बी प्रकाश टाका. बहिर्जी दाढी लावून पुजारी कसे होऊ घातले होते? दाढीधारी फक्त धारकरी पंथातली रामदासी मंडळी असत न? सामान्य पुजारी (पक्षी ब्राह्मण) डोई अन दाढी दोन्ही हजामती निगुतीने सफाचाट ठेवत असे होते न!? बाकी तुम्ही लिवल्यावर अजून काय लिवायची गरज नाय, परीक्षण गोतमुखाने झाले इतकेच म्हणतो.

In reply to by जेम्स वांड

नमस्कार दादा...येवढा विचार किंवा अभ्यास मी कधीच केला नव्हता... या पुढे मात्र मी जे काही लिहीन ते जाणीवपूर्वक लिहीन... तरी मार्गदर्शन बद्दल धन्यवाद..

In reply to by दुर्गविहारी

दुर्गविहारी, औरंग्याच्या एका सरदाराने मोठी बढाई मारली की शिवाजीला नेस्तनाबूत करेन. तो दख्खनेत आल्यावर महाराजांनी घाबरल्याचं नाटक केलं व मोगलांशी तह केला.तहास कारण की औरंग्या दिल्लीत नसून दूर पंजाबात होता. त्यामुळे तहावर स्वाक्षरी होऊन कागद परत येण्यासाठी निदान तीन महिने तरी लागणार होते. मराठ्यांनी तहाच्या आडोश्याने दोनेक महिन्यांत आदिलशाही मुलूख फस्त केला. या कामगिरीबद्दल औरंग्याने तहाला मंजुरी देऊन सरदाराला एक हत्तीदेखील पाठवला. तहाचं फर्मान आल्याची बातमी सरदाराने दिल्यावर महाराजांनी काखा वर करून त्याला झटकून टाकला. हा तो बहादूरखानच का? आ.न., -गा.पै.

In reply to by गामा पैलवान

बरोबर. वर मी जो दक्षिण दिग्विजयाचा उल्लेख केला आहे, तो याच संदर्भातील. या दुसऱ्या प्रसंगानंतर या बहादूरखानाची फारच मानहानी झाली.

In reply to by दुर्गविहारी

धन्यवाद दुर्गविहारी! मानहानी होणारंच. दोनदा फसला म्हणजे काय ! म्हणतात ना, पहिल्यांदा फसवलं तर तुम्ही नालायक आणि दुसऱ्यांदा फसवलं तर मी नालायक. आ.न., -गा.पै.

In reply to by दुर्गविहारी

धन्यवाद तुम्हां सर्वांच्या सूचनेबद्दल धन्यवाद...पुढील कथा लिहिताना मी आपल्या सर्वांच्या सूचनेचा नक्की विचार करीन... आणि माझा इतिहासाचा अभ्यास हि नक्की वाढवीन...तुम्हा सर्वांचे सहकार्य लाभावे हीच अपेक्षा

छान लिहलंय. शेवटचा परिच्छेद टाकला नसता तरी चालला असता, जेव्हा मराठा सैनिक रणांगण सोडून पळू लागले, एव्हाना बाकी समजलंच होतं.