टी.सी.
अपडाऊनच्या दिवसांतली गोष्ट आहे. मुंबईहून बोईसरला जाण्यासाठी त्यावेळी फक्त लांब पल्ल्याच्या गाड्याच उपलब्ध असत. त्यामधे रोज प्रवास करणार्या, माझ्यासारख्यांना, बसायला मिळणे मुष्किल असायचे. त्यावर पर्याय म्हणजे, विरारपर्यंत लोकलने जाऊन तिथून सुटणारी शटल सर्व्हिस पकडणे. आमच्यासारखे, वेळाचे फारसे बंधन नसलेले, हा पर्याय स्वीकारीत. हे शटल प्रकरण फार गंमतीदार होते. रेल्वेच्या लांबच्या प्रवासासाठी अयोग्य झालेल्या जुन्या पुराण्या बोग्या, स्क्रॅप यार्डात पाठवण्याआधी, या शटल साठी वापरत. सहाजिकच मग, प्रथम वर्गातही सीटस्,पंखे,बर्थ, ट्रे, आरसे इत्यादि गोष्टी मोडकळीला आलेल्या असत. जुन्या पद्धतीचा कूपे टाईप डबा प्रथम वर्गासाठी असे. गर्दीही बेताचीच असल्याने बसायला सहज जागा मिळे. आमचा सकाळचा ग्रुप नेहमी एकाच कूपेमधे बसत असे. स्टेशन येईपर्यंत, अगदी राजकारणापासून महाभारतापर्यंत सर्व विषयांवर सांगोपांग चर्चा होत असत्.आमच्यातलेच काही मेंबर खवैय्ये असल्यामुळे, खाण्यापिण्याचीही चंगळ असे. यांत कधीही, चुकूनही, रेग्युलर टीसी येत नसे. तर असेच एकदा, आमच्या चर्चा रंगात आलेल्या असताना, विरारलाच, एकदम एका म्हातार्या टीसीने कूपे मधे प्रवेश केला. त्याने टीसीचा युनिफॉर्म घातला असला तरी तो रिटायर्ड आहे, हे सहज कळत होते. आल्या आल्याच त्याने खिशातली शिट्टी काढून फुंकली. कूपेच्या बाहेरच्या चिंचोळ्या पॅसेजमधे काही कातकरी बायका, अंग चोरुन बसल्या होत्या. त्यांना तो दरडावून आंत सीटवर बसायला सांगत होता. अर्थातच, संकोचाने त्या बायका तोंडाला पदर लावून हंसत होत्या. त्यानंतर मधले सफाळा स्टेशन येईपर्यंत त्याची अगम्य टकळी चालू होती. अचानक तो तिथे उतरुन गेला. तो गेल्यावर माझ्या बाजूच्या एका प्रवाशाने आम्हाला त्याची स्टोरी सांगितली.
तो रेल्वेतच टीसी म्हणून नोकरीस होता. पण कुटुंबात मोठी ट्रॅजेडी झाल्याने त्याच्या डोक्यावर परिणाम झाला. परिणामी त्याची नोकरी संपुष्टात आली. त्याला रेल्वेचा सर्व स्टाफ चांगला ओळखत होता.ते सर्व, त्याच्याशी आपुलकीने पण थोडे चेष्टेने बोलत्. हा सकाळी उठून नोकरीसाठी असल्यासारखा तयार होऊन, टीसीचा काळा कोट घालून शटलने कधी सुरत पर्यंत जाई, कधी मगेच उतरुन अप्-डाऊन करत बसे आणि संध्याकाळी घरी मुक्कामाला पोचत असे. त्याला रेल्वेत तसा मुक्त संचार होता, कुणीही टीसी, कधी त्याला ट्रेनमधून उतरवत नसत. स्टेशनवरचे स्टॉलवाले त्याला चहा, नाष्ता तसाच देत असावेत. त्याची नक्की काय ट्रॅजेडी झाली हे जाणून घेण्याची बरेच दिवस उत्सुकता होती. पण नक्की कुणालाच माहित नसावे, कारण त्याबाबत वेगवेगळ्या गप्पा ऐकल्या होत्या. बरेचसे झंटलमेन लोक्स त्याला घाबरुन असत. अनोळखी माणसांच्या शेजारी हा कधी बसला तर ते उठून जात असत् किंवा सीट तरी बदलत असत. आठवड्यातून दोन्-तीनदा तरी तो दिसत असे. त्याची खरी स्टोरी अशीच एकदा अकल्पितपणे मला त्याच्याच तोंडून ऐकायला मिळाली आणि मनाला चटका लावून गेली.
एक दिवस, मी लांब पल्ल्याची गाडी पकडली. सिग्नल नसल्यामुळे ती विरार स्टेशनमधे थांबली होती. चेअर कारमधे आज बर्याच सीट्स रिकाम्या होत्या. सर्वजण आळसावून पहुडले होते. अचानक, दरवाजा उघडून आमचा शटलवाला टीसी आंत चढला. आंत आल्या आल्या त्याने जोरांत शिट्टी वाजवल्याने बहुतेकांची झोपमोड झाली होती. दरवाज्याजवळच उभे राहून तो कोणातरी कल्पित व्यक्तिला जोरजोरात दम देत होता. त्यानंतर त्याने बसण्यासाठी योग्य जागा शोधणे चालू केले. त्याच्या अवतारावरुन लोक त्याला टाळायचे. तो जवळ आला की लोक दुसर्या दिशेला मान फिरवत होते. पुढे येत तो माझ्याजवळ येऊन उभा राहिला. शटलमुळे माझा चेहेरा त्याला ओळखीचा वाटत असावा किंवा मीही त्याला त्याच्यासारखाच वाटलो असेन. मी त्याच्याकडे बघून हंसलो. लगेच तो डोक्यावरची टोपी समोरच्या ट्रेवर ठेवून माझ्या शेजारीच बसला. थोडा वेळ शांततेत गेला. अचानक तो माझ्याशी बोलू लागला. तो बोलत होता बरेच असंबद्ध, पण त्यातून मी गोळा केलेलाअर्थ असा.
'साहेब, मी तुम्हाला येडा वाटत असेन, पण मी रेल्वेत टीसी होतो. माझ्या मुलीचे लग्न होईपर्यंत सगळं काही ठीक होतं. पण नंतर माझी बायको आजारी पडली. घरी बघायला कोणी नाही. शेजारचे मदत करायचे.मुलीच्या सासरचे तिला माहेरी येऊ द्यायचे नाहीत. ती कधीमधी निरोप पाठवायची. सासरी तिचा छळ करायचे, पण माझे हात बांधलेले होते. बायकोच्या आजारपणात पगार खर्च व्हायचा. मुलीला माहेरी आणली तर पोसू कसा ? दिवस तसेच ढकलत होतो. रजा पण जास्त मिळायची नाही. एक दिवशी बातमी आली. मुलगी भाजल्यामुळे हॉस्पिटलमधे होती. मी जाईपर्यंत ती गेली. माझी खात्री आहे, त्यांनीच तिला जाळली. पण मी एकटा काय करणार ? थोड्या दिवसांनी बायको पण गेली. मी ड्युटी करत होतो. पण तरी, कोणीतरी माझ्याविरुद्ध कंप्लेंट केली.मला बॉसने बोलावून सांगितलं, आता घरी बसायचं. जो काही पगार मिळेल तो घ्यायचा. घरी बसून मी कंटाळलो. तो बोलायचा थांबला होता. मी त्याचे बोलणे ऐकून अस्वस्थ झालो होतो. थोडा वेळ असाच शांततेत गेला. मग तो अचानक म्हणाला,
" तू चांगला मुलगा आहेस. म्हणून मी बोललो."
माझीही भीड आता थोडी चेपली होती.मी विचारले,"कशावरुन ?"
" तू माझ्या डोळ्यांत बघितलंस. बाकीचे माझ्या डोळ्यांत बघत नाहीत."
मला तो आता एकदमच शहाणा वाटायला लागला. अचानक त्याने खिडकीबाहेर बोट दाखवले. "ते बघ, कसे हत्ती चरताहेत."
मी बाहेर बघितलं. बाहेर शेतांत, मोठ्या मोठ्या म्हशी, शेपट्या उडवत चरत होत्या. मी काहीच बोललो नाही, फक्त मान डोलावली.
पुन्हा काहीकाळ अस्वस्थ शांततेत गेला. पुढचे स्टेशन आले होते. अचानक टोपी उचलत तो उठला आणि दाराजवळच्या उभ्या प्रवाशांना दरडावत उतरुन गेला.
तो उतरल्यावर आमच्या ग्रुपमधले दोघे तिघे आश्चर्याने माझ्या जवळ आले आणि म्हणाले," कमाल आहे यार, तू त्याच्याशी एवढा वेळ काय बोलत होतास ?"
मी म्हणालो, तो आमचा खाजगी 'टॉक' होता.
मित्रांच्या चेहेर्यावर अजून एक विकेट पडल्याचे भाव होते!
वाचने
6450
वाचनखूण
प्रतिक्रिया
16
मनाला चटका लावणारी कथा...
मी सुद्धा एकेकाळी(१९९८-२००१) मुंबई - वापी - सुरत असा सारखा प्रवास करायचो..पण हा टीसी काही कधी भेटला नाही...
कुठंतरी काहीतरी लक्खकन दुखून गेलं देवाहो! जबरदस्त हातोटी, तुम्ही व्यक्तिचित्रण लेखनावर अजून लक्ष द्या ना प्लीज, फर्मास लिहाल तुम्ही!.
चटका लावणारी कथा.
आज हॉटेलात मिरची भजेही लावलीत। पहिल्या घासातच चटका बसला।
अन्यथा खूप त्रास होतो.
कणव वाटली त्या म्हाताऱ्याबद्दल. प्रभावी लिहिलं आहे!
मनाला चटका लावून गेली व्यक्तिरेखा .
अणि आहे तसं, तिमा चर्र चर्र आवाज करणारं लेखन
नित वाचक नाखु पांढरपेशा मिपाकर
हा मन विदीर्ण करणार्या कहाणीचा अखेरचा भाग असतो!
चटका लावुनगेला टि. सी. जबरदस्त लिहीलयं. शक्य झाल्यास अजून व्यक्तीरेखा येउ देत.
इथं वेडं असण्याचे
अनेक फायदे आहेत
शहाण्यांसाठी जगण्याचे
काटेकोर कायदे आहेत
-- चंद्रशेखर गोखले
कथा आवडली. व्यक्तिचित्र छान उभे केलेय.
अतिशय हृद्य अनुभव.
मस्त...
अनुभव वाचून मन खिन्न झाले. कधीपर्यंत समाजात हुंडाबळी पडत राहतील काय माहित...
अरे रे वाचून वाईट वाटले, असे जीवन कोणाच्याही वाट्याला येवू नये.
पैजारबुवा,
छान...