Skip to main content

मौन धारण करू या!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/09/2017 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे संत साक्षात परमेश्वर रामरहीम बाबांना साक्षात्काराने आधीच समजून चुकलं होतं की कोर्ट आपल्याला दोषी ठरवणार. आपल्या दैवी लिला कितीही परमार्थिक- अध्यात्मिक असल्या तरी तथाकथित मानवी कायद्यातील तरतुदींनुसार आपल्या लिलांकडे विकृत दृष्टीने पाहिलं जाईल आणि नको ती शिक्षा कोर्टाकडून आपल्याला ठोठावली जाईल, हे बाबा दिव्य दृष्टीने पाहू शकत होते. म्हणूनच अशा पामरांकडून होणारे हे पाप टाळण्यासाठी बाबांनी आधीच खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या कोट्यावधी शिष्यांपैकी फक्‍त दीड लाख भक्‍तांना सिरसाहून पंचकुलाकडे पदयात्रा करत रवाना केलं. आपल्या अध्यात्मिक भाषेचा या कायदेशीर नास्तिक लोकांच्या ठायी कवडी इतकाही उपयोग होणार नाही, हे ओळखून बाबांनी इहवाद्यांना समजेल अशा आपल्या खाजगी भाषेत अनुयायांना बोलायला भाग पाडलं. पोपट भाषेतून शिष्य चॅनल्सना खुलेआम सांगत होते, ‘बाबांना हात लावाल तर रक्‍ताच्या नद्या वाहतील. प्रेतांचा खच पडेल. संपूर्ण देश आगीच्या भक्षस्थानी पडेल. खबरदार!’ आणि भक्‍तांसोबत असलेल्या लाठ्या, काठ्या, पेट्रोल बाटल्या याची साक्ष देत होत्या. या भक्‍तांत सुशिक्षित समजली जाणारी तरूणाईही दिसत होती. म्हणजे या अध्यात्मिक साधनेत आजचे आधुनिक तरूणही आपले कामधंदे सोडून सामील आहेत हे या देशाचे थोर भाग्य. साक्षात संत परमेश्वरावर आलेलं संकट आणि त्यांच्या परम भक्‍तांनी उच्चारलेले श्याप यात राजा हवालदिल झाला. स्वत:च बाबांच्या दीक्षेने पावन झालेले आणि आपल्या डोक्यावरच्या राजमुकुटासाठी खारीचा नव्हे, हत्तीचा वाटा उचललेल्या संतांच्याच विरूध्द जाणे म्हणजे गुरूद्रोहच. प्रजेच्या बाजूने उभं राहवं का गुरूच्या? राजा‍ विचारात पडला. ‘आपलेच’ महत्वाचे असतात शेवटी. सिंहासनाच्या शपथेप्रमाणे वागलो आणि सिंहासनच खेचलं गेलं तर! राजाने ठरवलं, आपण धृतराष्ट्र होऊ या. अंध होऊन थोडा वेळ गंमत पाहू या. गुरूद्रोह करण्यापेक्षा नंतरची सारवासारव करणं सोपं. दोन ओळींचं एक ट्वीट केलं की नव्वद टक्के कर्तव्य संपतं. उरला प्रश्न ठार झालेल्या, जखमी झालेल्या लोकांचा आणि जाळपोळ- तोडफोडीतल्या नुकसानीचा. प्रजेकडून घेतलेल्या पैशातूनच अशा वेळी प्रजेला काही भाग परत करता येतो. मग बाकी काही उरतच नाही. निर्णय पक्का झाला. कायद्याच्या बाजूने, संत परमेश्वराच्या बाजूने, राजाच्या बाजूने ज्याने त्याने ठरल्याप्रमाणे आपापल्या भूमिका बरोबर निभावल्या. दोष प्रजेचा होता. जो कर्तव्यासाठी कामावर गेला तो मेला. जो प्रपंचासाठी बाहेर पडला तो जखमी झाला. ज्यांच्या गाड्या जाळल्या गेल्या त्यांनीच लाठ्या खाल्या. संत कृपेने सव्वाशे कोटींपैकी फक्‍त सदतीस लोक मेले आणि तिनेकशे जखमी झाले. संत परमेश्वराला घ्यायला विमान आलं. या सर्व घटनांमागील कार्यकारणभाव भाबड्या लोकांना आणि कायद्याला कळत नाही म्हणून निरूपण करण्यासाठी शेवटी साक्षात महाराजांना अवतरावं लागलं. साक्षात महाराज हे उच्च दर्जाचे अध्यात्मिक गुरू असले तरी त्यांनी आता कायद्याचीही शपथ घेतली आहे. पण निरूपण करताना त्यांनी थोर अध्यात्मिक सत्यच सांगितलं. ‘कायद्यापेक्षा कोट्यावधी लोकांच्या भावना श्रेष्ठ आहेत. त्या लक्षात घेऊन अजूनही संत परमेश्वरांना निरपराध घोषित करता येऊ शकतं!’ आता आपण मौन धारण करू या! दुसरं आपल्याला काय करता येतं? खरं तर हा विषय संपून आजच सात दिवस झालेत. आणि आपल्याला तर रोज नवीन विषय हवा. कालचा विसरून. नवा बाबा उजेडात आला की हा बाबा पुन्हा थोडा फार आठवेल. (या ब्लॉगचा इतरत्र वापर करताना लेखकाच्या नावासह या ब्लॉगचा सविस्तर संदर्भ द्यावा ही विनंती.) – डॉ. सुधीर रा. देवरे इंटरनेट ब्लॉगचा पत्ता: http://sudhirdeore29.blogspot.in/
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2978
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

डॉ. सुधीर राजाराम देवरे,
दोष प्रजेचा होता. जो कर्तव्यासाठी कामावर गेला तो मेला. जो प्रपंचासाठी बाहेर पडला तो जखमी झाला.
हे खरंय का? माझ्या मते फक्त दंगेखोरांवर गोळीबार करण्यांत आला आहे. जे मेलेत ते दंगेखोर आहेत. निरपराध नव्हेत. आ.न., -गा.पै.

मला यक कळत नै उत्तर भारतात अनी दक्षिण भारतात च जीवंत माणसाला देव समजनारे गूढघा मेंदू वाले का हायेत ? आमच्या राज्यात कदिच अशा बाबा लोका साठी दंगली का व्हत नाय ?

In reply to by सोमनाथ खांदवे

सोमनाथ खांदवे, महाराष्ट्रातही जिवंत देवांना मानण्याची परंपरा आहे. इथे जिवंत देवांनी सांगितलेलं ऐकून आचरणांत आणायची पद्धत आहे. म्हणूनंच असे देव परलोकवासी झाल्यावर दंगली होत नसतात. अशा जिवंत देवांना महाराष्ट्रात संत म्हणतात. आ.न., -गा.पै.

पंजाब आणि हरयाणाच्या उच्च न्यायालयाने मनुष्य जीवित आणि मालमत्ता हानीसाठी हरयाणा आणि केंद्र सरकारवर ताशेरे झाडले आहेत. पण अशीही बातमी वाचली की हरयाणा सरकारने सम्बधित न्यायाधीशाला पंचकुल च्या ऐवजी सिर्सा येथे जाऊन तेथे आरोपी दोषी की नाही या बाबत निर्णय सुनवण्यास ५ दिवस आधि विनन्ति केली होती . ती मान्य करण्यात आली नाही. पण नन्तर दन्गा झाल्यावर शहाणे होऊन शिक्षा सुनावण्यासाठी रोहतक ला जाण्यासाठी उच्च न्यायाधिशानी त्याच न्यायाधीशाला सांगितले. म्हणजे झाल्या नुकसानीला न्यायालयांचे प्रशासन जबाबदर नाही का ?

In reply to by रमेश आठवले

चुकीचा पायंडा पडला असता. शिक्षा सांगायला न्यायाधिश तुरूंगात गेले होते. त्यांच्या आश्रमात नव्हे. धन्यवाद सर.

In reply to by डॉ. सुधीर राजा…

मी आश्रमात जावे असे म्हटले नाही. सिर्सा मध्ये हरयाणा सरकारने सुचवलेल्या जागी हे करू शकले असते . म्हणजे बाबाचा ताफा सिर्सा हून पंचकुल ला येण्याचे आणि त्याच्या पाठोपाठ अनुयायांची झुंबड पंचकुल मध्ये येण्याचे टाळता आले असते. जर हरयाणा सरकारला सिर्सा हि जागा कायदा आणि सुरक्षेच्या दृष्टीने जास्त सोयीस्कर वाटत होती तर न्यायालयाला त्याच्याशी सहकार करण्यात काही अडचण नसावी. त्यांनी नतंर शिक्षा सांगताना रोहटक ला जाऊन हे केलेच.

फार लिहवत नाही परंतू प्लास्टिकच्या पन्नास लिटर्सच्या मोठ्या झाकणाच्या ड्रमना मागणी का असते ते ओळखा. बकय्राला त्या दिवशी ओढताना एक वेगळाच जोर समजतो आणि खिन्न होतो. गेल्या पाचसहा महिन्यात एवढे बदाम वगैरे का देत होते ते कळते. जर्मनित गायीला पिस्तुलाची गोळी मारतात