मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

भाषण

मंगेश पंचाक्षरी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
- मंगेश पंचाक्षरी, नासिक. (मुक्तचिंतन) "मला भाषण करण्याची बिलकुल सवय नाहीये " असं बोलून जो माणूस भाषणास सुरुवात करतो त्याच्या इतका धोकादायक दुसरा कोणीच नाही. आधी तो गर्दी बघून जरा घाबरलेला असतो. पण एकदा त्याने भाषण सुरु केले की मग तो थांबायचे नावच घेत नाही. एक एक मुद्दा आठवून आठवून त्याचं रटाळ भाषण चाललेलं असते. हळूहळू लोक बोअर होण्यास सुरुवात होते. लहान मुले जांभया द्यायला लागतात. मोठी माणसं मोबाईलमध्ये डोकं खुपसून टाइमपास करत राहतात. बायका एकमेकींशी हळू आवाजात गप्पा मारायला सुरुवात करतात. अगदी मंचाच्या समोरच बसलेल्या लोकांचा नाईलाज असल्याने ते बराच वेळ तसेच बसून राहतात. तरीही याचं भाषण संपायचं चिन्ह दिसत नाही. आता संपेल, मग संपेल असं करता करता भाषण लांबतच रहातं. मग पुढच्या रांगेतली पुरुष मंडळी बळेच मोबाईल कानाला लाऊन कोणाचा तरी अर्जंट कॉल आला आहे असं भासवत बाहेर जातात आणि सिगरेट शिलगावतात. इकडे वक्त्याला 'चेव' चढलेला असतो कारण मंचावर बसलेली मान्यवर मंडळी उठू शकत नसतात. त्यांना ते भाषण ऐकणे (?) भाग असतं. अखेर सभागृहातील निम्मी अधिक मंडळी यानिमित्ताने (जायचे असो वा नसो ) स्वच्छता गृहाचा द्दौरा करून येतात. तरीही वक्ता जोशातच असतो. जगाच्या अंतापर्यंत हे असेच चालू रहाणार असं फील येत असताना केव्हातरी ते रटाळ भाषण संपते. लोकं जोरदार टाळ्या वाजवतात. या टाळ्या भाषण एकदाचं संपले म्हणून असतात. पण वक्त्याला वाटते आपले मौलिक विचार ऐकून श्रोते प्रभावित झालेले आहेत. तो पुनः "एक सांगायचं राहिलंच" असं म्हणून कोणाचीतरी चमचेगिरी करणारी वाक्य फेकतो. हेतू हा कि पुनः पुढच्यावेळी त्याने बोलण्याची संधी द्यावी. "हा आता परत कितीवेळ खाणार" या विचाराने लोकांच्या पोटात गोळा येतो. याला नक्की कोणी भाषणाचा आग्रह केला होता याचा शोध सुरु होतो. सगळे पदाधिकारी ' तो मी नव्हेच' हा पवित्रा घेतात. इकडे 'जगावर सूड उगवणारी' चार दोन माणसे प्रत्येक ठिकाणी असतातच. ती 'त्या' वक्त्या(?)ला "भाषण छान झालं" असं सांगून उपस्थितांच्या जखमेवर मीठ चोळतात. महिनाभर अथक परिश्रम करून आणि पैसा खर्च करूनही पडद्यामागेच रहाणाऱ्या आणि प्रयत्नपूर्वक देखणा कार्यक्रम करणाऱ्या आयोजकांच्या मेहनतीवर उपस्थितांच्या चेहऱ्यावरच्या 'कार्यक्रम रटाळ झाला' या अदृश भावनेने पाणी फिरते याच्याशी 'त्या' भाषण (!) करणारास काहीच देणेघेणे नसते. 'वक्ता दशसहस्त्रेषु' म्हणजे काय हे या अर्धवटरावांच्या गावीही नसते. भाषण करताना केव्हा थांबावे हे ज्याला कळते तोच खरा वक्ता असतो! -मंगेश पंचाक्षरी , नासिक.

वाचने 4876 वाचनखूण प्रतिक्रिया 18

हेमंतकुमार 21/08/2017 - 17:38
ज्ञानेश्वरांचे हे वाक्य मला फार आवडते: " ही लेखन सीमा शोभते." यातील 'लेखन' च्या जागी इतर शब्द घातले तरीही वाक्य अर्थपूर्ण च राहते !

In reply to by मोदक

मंगेश पंचाक्षरी 22/08/2017 - 10:10
धन्यवाद!माझ्या लेखावरून कॉपी करणाऱ्यास उष्ट्, खरकट खायची सवय असावी. पण निदान खरकटी तरी नीट खावे ना, त्यासोबत शेण खायची त्यांना सवय दिसतेय.. असो.. रोज त्यांना एक ओरिजिनल लेख देत राहू, त्यावर गुजराण करेल तो बिचारा.

In reply to by मंगेश पंचाक्षरी

माम्लेदारचा पन्खा 22/08/2017 - 11:00
"गर्व धरील त्या पुरुषासी ऐसेच मी गांजेन" असे म्हटले आहे. तुमचा माज धाडकन जमिनीवर आपटवून तुमची लायकी दाखवणारा हा काळ असतो. त्यामुळे विनम्रता हा सर्वोत्तम उपाय आहे.