मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मनुस्मृति भाग २

शरद · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मनुस्मृति भाग २ (७) अध्याय ७ (श्लोक २२६) सृष्टीच्या रक्षणासाठी ईश्वराने राजाची निर्मिती केली आहे. कार्यशक्ती, देश आणि काल यानुरूप राजाला वेगवेगळे रूप धारण कराए लागते. त्याच्या प्रसन्नतेत लक्ष्मी, पराक्रमात जय आणि क्रोधात मृत्यू वास करतो. दण्ड देण्याबाबत राजाने कठोर असले पहिजे. दण्ड (शासन-शिक्षा) हाच राजा, नेता, शास्ता च चारही आश्रमांना धारण करणारा आहे. दण्डाने नियमित झालेले लोकच सन्मार्गाने चालतात. वेदत्रयी व धर्मशास्त्र जाणणार्‍य़ा ब्राह्मणाबरोबर राजाने संवाद करावा व त्याप्रंमाणे शासन करावे. तीन वेद, सनातन दण्डनीती, वेदान्त, व्यवहारज्ञान यांचा राजाने विवेकपूर्ण अभ्यास करावा. कामापासून उत्पन्न होणारी दहा व क्रोधापासून उत्पन्न होणारी आठ व्यसने राजाने पूर्णपणे त्यागावित. व्यसन व मृत्यू दोनही नाश करणारे असले तरी व्यसनाधीन माणसाला रोज मृत्यूच येत असतो. कोशवृद्धीसाठी समयानुसार चालणारा, द्रव्यार्जनाच्या युक्ती जाणणारा, बुद्धिमान, चतुर, कुलीन, हिशेबात पक्का, निर्लोभी असा मंत्रिगण राजाने निवडावा. प्रजा आपले अपत्य आहे, या भाव्नेने वागावे. साम-दाम-दंड-भेद यांचा समयानुसार उपयोग करावा. राज्यवृद्धीसाठी साम-दंड यांचा जास्त फायदा होतो. प्रजेला सुखी ठेवण्यासाठी एक, दहा,शंभर, सहस्र असे गावांचे गट करून योग्य अधिकार्‍यांची नियुक्ती करावी. प्रजेचे रक्षण राजाने आपल्या औरस पुत्राप्रमाणे करावे. सर्व कर्म दैवाधीन व मानवाधीन आहे. दोन्हीत दैव अचिन्त्य आहे कारण ते आपल्या अधीन नाही. हे जाणून राजाने अखंड यत्न करावा धर्मज्ञ, कृत्रज्ञ, प्रसन्नचित्त, प्रीती करणारा, स्थिर व निश्चित बुद्धीचा मित्र जोडावा. (८) अध्याय ८ (श्लोक ४२०) न्यायालयात राजाने स्वत: न्याय द्यावा किंवा विद्वान ब्राह्मणांना न्यायाधिश म्हणून नेमावे. सामान्यत: खटले १८ प्रकारात मोडतात. न्यायालयात खोटे बोलणारा वा अशावेळी तिकडे दुर्लक्ष करणारा न्यायधिश दोघेही पाप करतात. नष्ट झालेला धर्म आपलाही नाश करतो रक्षण केलेला आपलेही रक्षण करतो; म्हणून धर्माचा नाश करू नये. निकाल अन्यायी असेल तर त्याचे १/४ पाप गुन्हा करणार्‍याला, १/४ खोटी साक्ष देणार्‍याला, १/४ न्यायाधिशाला व १/४ राजाला लागते. शूद्राला न्यायाधिश करू नये. शूद्र न्यायाधिश असलेले राज्य चिखलात अडकलेल्या गायीप्रमाणे बुडते. यानंतर बरेच श्लोक न्यायाबद्दल आहेत. जे ब्राह्मण गुरे पाळतात, व्यापार करतात, कारू (कामगार) आहेत, नट किंवा गायक आहेत त्यांना शूद्र समजावे. खोटे बोलण्याने कोणाचे प्राण वाचणार असतील तर खोटे बोलण्यास हरकत नाही. व्याज किती घ्यावे याचाही निर्देश दिला आहे. पतिव्रता, विधवा, रुग्ण स्त्रीच्या धनाचे राजाने जागरूकपणे रक्षण करावे. गहाण किंवा ठेव म्हणून ठवलेल्या धनावरचा हक्क काल गेला म्हणून नाहिसा होत नाही. ठरवून दिलेल्या व्याजापेक्षा जास्त व्याज केव्हाही घेता येणार नाही. बळजबरीने केलेला व्यवहार बेकायदेशीर आहे. ठेव म्हणून घेतलेले पैसे सावकार जिवंत असतांना त्याच्या नातेवाईकांना देऊ नयेत. एक मजेदार निर्णय जर एक मुलगी दाखवून, लग्नाच्या वेळी दुसरीच मुलगी उभी केली तर खर्च केलेल्या पैशात नवरा दोघींशीही कग्न करू शकतो. (एकीशी लग्न करा, दुसरी मोफ़त) या नंतर शूद्रांनी केलेल्या अपराधांबद्दलच्या शिक्षा सांगितल्या आहेत. त्या तिस्रर्‍या भागात बघू. राजाने प्रजेचे योग्य रीतीने रक्षण केले तर त्याला प्रजेच्या पुण्याचा सहावा भाग मिळतो पण त्याने तसे केले नाही तर त्याला प्रजेच्या पापाचा सहावा भाग मिळतो. प्रजेचे रीतसर रक्षण न करता राजा जर कर, दंड, देणग्या घेत असेल तर तो नरकात जाईल. अपराधाची जाणीव असतांना केलेल्या गुन्ह्याबद्दल शूद्राला ८ पट, वैश्याला १६ पट, क्षत्रियाला ३२ पट आणि ब्राह्मणाला ६४ पट किंवा त्याच्या दुप्पट पाप लागेल जर करार, चालू कायद्यांचे उल्लंघन करत असेल तर, तो न्यायालयात सिद्ध झाला त्ररी त्याला कायद्याची मान्यता असणार नाही ( आजही हौसिंग सोसायटांना हाच निर्णय मानावा लागतो ). उपयुक्त वनस्पतीला-वृक्षाला ईजा पोचविणार्‍याला दंड करावा. दु:ख व्हावे या उद्देशाने कोणी माणसाला वा पशूला मारले तर ज्या प्रमाणात दु:ख पोचले असेल त्या प्रमाणात न्यायाधिशाने दंड करावा. जो दुसर्‍याच्या वस्तूला जाणता-अजाणता नुकसान पोचवेल त्याला मालकाला नुकसानभरपायी देण्यास लावावे व तेव्हढाच दंड त्याने राजालाही भरावा. आत्मरक्षणाकरिता आतताईच्या वधालाही परवांगी दिली आहे. व्यभिचाराबद्दल मनुचे विचार ( व त्यामुळे दंड) फारच कठोर आहेत. त्याने या विषयात २५ पेक्षा जास्त श्लोक लिहले आहेत. व्यभिचाराची इतकी दखल घेण्याचे कारण वर्णसंकर व त्यामुले निर्माण होणार्‍या निरनिराळ्या जाती. हा प्रकार समाजाच्या मुळावरच घाव घालणारा होतो. यामुळे त्यानी व्यभिचाराची व्याख्या करतांना अयोग्य ठिकाणी ( गाल, स्थन, जंघा इ.) स्पर्श करणे, एका मंचकावर बसणे एकांतात परस्त्रीशी बोलणे, इत्यादीलाही व्यभिचार असे संबोधिले असून त्याकरिता आर्थिक दंड, कान-नाक कापणे ते वध अशा निरनिराळ्या शिक्षा सांगितल्या आहेत. केवळ पुरुषांनाच नव्हेत तर स्त्रीयांनाही दंड आहे.. पुढे नवव्या अध्यायातही " न स्त्री स्वातंत्र्यमर्हति " ही द्विरुक्ति आली आहे म्हणून येथे माहिती म्हणून त्या काळातील चालीरीती विषयी थोडे सांगत आहे. महाभारतातील गोष्ट आहे. पांडव वनवासात असतांना , ते सर्व शिकारीकरिता आश्रमाबाहेर गेले होते. द्रौपदी एकटी होती. त्यावेळी जयद्रथ तेथे आला व तिला एकटीला पाहून तिला आपल्या रथात बसवून पळवून नेऊ लागला. त्या वेळी आश्रमात असलेले धौम्य ऋषी त्याला म्हणतात "हे अनुचित आहे, तिला न्यावयाचे असेल तर पांडवांशी युद्ध करून, त्यांना जिंकून मग तू द्रौपदीला ने". लक्षात घ्या, पतीला जिंकून, विवाहित स्त्रीला पळवून नेण्यास हरकत नव्हती. मनूला अशा काळात ह्या प्रथांना दूर करून समाज घडी बसवण्याकरिता कायदे करावयाचे होते. शक्य आहे की म्हणून त्याने व्यभिचाराला कडक शिक्षा ठेवल्या व स्त्री स्वातंत्र्यावर बंधने घातली. मी मनुस्मृतीची भलावण करत नाही. त्या काळ्ची परिस्थिती काय होती त्याची माहिती देऊन एक शक्यता वर्तवत आहे. अन्ध, जडबुद्धी, पंगु, सत्तरीपेक्षा वृद्ध, श्रोत्रीयांना मदत करणारा यांपासून राजाने कर घेऊ नयेत. निर्यातीला बंदी असलेली गोष्ट कोणी व्यापारी निर्यात करेल तर त्याची सर्व सपत्ती जप्त करावी. पांच किंवा पंधरा दिवसांनी राजाने वस्तूंचे दर निश्चित करावेत. वजन-मापांवर योग्य रीतीने थसे उमटावेत व दर सहा महिन्यांनी त्याची पुनर्तपासणी करावी. . ९) अध्याय ९ (श्लोक ३३६) विवाहयोग्य वयात कन्यादान न करणारा पिता, ऋतुकाली स्त्री समागम न करणारा पति, आणि पित्याच्या मृत्यूनंतर आपल्या मातेचे रक्षण न करणारा मुलगा तिघेही निंद्यच होत. धनसंचय, खर्च, शुचिता, धार्मिक बाबी, स्वयंपाक, घरच्या वस्तूंची देखभाल या गोष्टी स्त्रीयांवर सोपवाव्यात. मद्यपान, दुर्जनसंगत, पतीपासून वेगळे रहाणे, अकारण फिरणे, अकाली झोपणे व दुसर्‍याच्या घरी मुक्काम करणे हे सहा स्त्रीयांचे दोष होत. उत्तम संततीला जन्म देणे, कन्या-पुत्रांचे पालन करणे, भोजनादी अतिथि-सत्कार, इत्यादींचा पूर्णाधार गृहिणीच आहे. स्त्री क्षेत्ररूप असून पुरुष बीजरूप आहे. हे दोन्ही शुद्ध व चांगली असले की उत्तम संतती निर्माण होते. विवाह एकदाच होतो, कन्यादान एकदाच होते आणि वचन एकदाच दिले जाते. दीराला थोरली वहिनी गुरूपत्नीसारखी पूज्य असते आणि धाकटी वहिनी सुनेप्रमाणे असते; हे नाते पवित्र आहे. विवाहित स्त्री-पुरुषानी सदैव एकत्र रहाण्याचा व एकरूप होण्याचा प्रयत्न नित्य करावा. औरस, क्षेत्रज, दत्तक, कृत्रिम, गूढोत्पन्न, अपविद्ध हे सहा पुत्र पित्याच्या धनाचे उत्तराधिकारी असतात., कानीन, सहोत्र, क्रीत, पौनर्भव, स्वयंदत्त आणि शौद्र हे सहा बांधव होत. धनावर त्यांचा अधिकार नाही. औरस -- विवाहसंस्कारातून झालेला. क्षेत्रज --- नियोगविधीतून झालेला, कृत्रिम --- समान जातीत्रला, संस्कार करून आणलेला, गूढोत्पन्न --- घरात जन्मलेला, पण कोणाचा हे ज्ञात नसलेला,, अपविद्ध --- माता-पित्यांपैकी एकाने टाकलेला पण दुसर्‍याने ग्रहण केलेला, कानीन ---कुमारीने जन्म दिलेला, सहोढ ---गर्भवती स्त्रीशी लग्न करून नंतर जन्मास आलेला, क्रीतक (क्रीत) ---वंश पुढे चालावा म्हणून पैसे देऊन आणलेला, पौनर्भव --- पतीने टाकलेली किंवा स्वेच्छेचे दुसर्‍याची भार्या झालेली विधवा यांच्या पोटी जन्मलेला, स्वयंदत्त--- आपला कोणताही अपराध नसतांना माता-पित्यांनी टाकलेला व ज्याने स्वत्राला दुसर्‍या माता-पित्यांना देऊ केले असा, , शौद्र --- ब्राह्मणापासून शूद्र स्त्रीच्या पोटी जन्मलेला. स्त्रीला सहा प्रकारे धन प्राप्त होते विवाहसमयी अग्नीसाक्ष मिळालेले, प्रसंगविशेषी आप्तेष्टांकदून मिळालेले, पित्याकडून मिळालेले, मातेकडून मेळालेले, बांधवांकडून आलेले. प्रीतीभावनेने पतीने दिलेले --हे सर्वश्रेष्ठ होय. लहान भावांना पित्याच्या धनातील योग्य भाग न देणारा मोठा भाऊ राजाकडून दंडनीय आहे. जुगार, मद्यपान वेश्यागमान आदी अकर्मे करणार्‍या पुत्राला पित्याच्या धनातील भाग मागावयाचा अधिकार नाही. एकत्र कुटुंबात राहून सर्व भाऊ धनार्जनात भाग घेत असतील तर पिता आपल्या (लाडक्या) मुलाला जास्त भाग देऊ शकत नाही. सोनार जर वजनात किंवा हलके धातू सोन्यात मिसळून ग्राहकांना फसवत असेल त्रर राजाने त्याला चोर समजून कडक शिक्षा करावी. जुगारी, नर्तक, पाखंडी, अधार्मिक इत्यादींना राजाने देशाबाहेर हाकलून द्यावे. अपत्यहीन पुत्राचे मरणानंतर त्याचे धन त्याच्या आईला मिळावे ती नसेल त्रर आजीला (वडिलांच्या आईला) मिळावे. नवव्या अध्यायात चारही वर्णांची कर्तव्ये सांगितली आहेत. उदाहरणार्थ वैश्य वर्ण पहा. त्याचे मुख्य काम शेती, पशुपालन व व्यापार. शेत्त कामाची, उदा. बियांण्याची निवड, पेरणीची वेळ. योग्य माहिती पाहिजे. व्यापार करतांना मोती, धातू, कापड वगैरेंची रास्त किंमत त्याला कळली पाहिजे. त्याला निरनिराळ्या भाषा यावयास पाहिजेत. कोणती वस्तु कोठे व केंव्हा खरेदी करावी हे कळले पाहिजे नोकराचे योग्य वेतन ठरविणे हेही महत्वाचे.+ (१०) अध्याय १० (श्लोक १३१) अहिंसा, सत्य, अस्तेय (दुसर्‍याचे धन अन्यायाने न घेणे),आणि इंद्रियनिग्रह हा चारही वर्णांचा समानधर्म आहे यजन, याजन, अध्ययन, अध्यापन, दान देणे व दान घेणे ही ब्राह्मणाची कर्तव्ये आहेत. यज्ञ करणे, अध्यापन आणि दान घेणे ही त्याच्या उपजएविकेची कर्मे होत. अध्ययन, दान देणे व यज्ञ करणे ही क्षत्रियाची कर्तव्ये आहेत. प्रधान कर्तव्य म्हणजे शस्त्र-अस्त्र धारण करून प्रजेचे रक्षण करणे. व्यापार, गोरक्षा, शेती ही वैश्याची आवश्यक कर्मे होत. त्रिवर्णाची सेवा हे शूद्राचे काम. पुढील बरेच श्लोक हे प्रतिलोम-अनुलोम विवाहामुळे निर्माण होणार्‍या जाती संबंचित आहेत. विद्या, कारागिरी, नोकरी, सेवा, पशुरक्षा, दुकानदारी, शेती, संतोष , भिक्षा आणि व्याज हे दहा उदरनिर्वाह करण्याचे जीवनहेतू आहेत. वैश्याकडून राजाने आठ टक्के कर घ्यावा. शूद्राची सेवा हाच कर असल्याने त्याच्याकछून केणताही कर घेऊ नये. आपल्याकडे सेवा करणार्‍या शूद्राचा चांगला निर्वाह होईल अशी व्यवस्था करणे ब्राह्मणाचे कर्तव्य आहे. (११) अध्याय ११ (श्लोक २६५) एक लग्न झालेल्या ब्राह्मणाने दुसरे लग्न करण्यासाठी कोणाकडे धनयाचना करून दुसरे लग्न केले तर त्यासा फक्त संभोगसुख मिळाले असेच म्हणावे लागेल कारण झालेले संतान धन देणार्‍याचेच असते, जो माणुस आपल्या कुटुंबाला दु:खात टाकून, समाजात प्रतिष्ठा मिळावी म्हणून दानधर्म करतो त्याला पहिल्यांदी समाजात मान मिळाला म्हणून आनंद झाला तरी शेवटी नरकात जाऊन दु:खच मिळते. वृद्ध माता-पिता, पतिव्रता स्त्री व अजाण बालक यांचे पालनपोषण करण्याकरिता अगणित अकार्ये करावी लागली तरी करावित. अपुरा राहिलेला यज्ञ पूरा करण्यासाठी लागणार्‍या वस्तु धनवान वैश्याकदून बळजबरीने घेण्यास हरकत नाही. ते शक्य नसेल तर शूद्राकडूनही त्या मिळवाव्यात. ज्याला तीन दिवसरात्र जेवावयास मिळालेले नाही अशाने शक्य असूनही जेवण न देणार्‍या माणसाकडून चोरी करूनसुद्धा अन्न मिळवावे. अशाच परिस्थितीत क्षत्रियाने यज्ञ, वेदाध्यायन इ.न करणारर्‍या ब्राह्मणाच्या घरी चोरी करून अन्न मिळवावयास हरकत नाही. यज्ञ करण्यासाठी शूद्राकडून धनाची याचना कारणारा ब्राह्मण मरणानंतर चांडाळ होतो. यज्ञ करण्यासाठी शूद्राने दिलेले धन घेऊ नये. क्षत्रियानी आपल्या बाहूबलाने, वैश्य व शूद्र यांनी आप्ल्या धनाने व ब्राह्मणाने आपल्या जप-होम यांच्या सामर्थ्याने आलेल्या आपत्तीचे निवारण करावे. ब्रह्महत्या, मद्यपान, चोरी व गुरूपत्नीशी व्यभिचार ही महापातके आहेत. उपपातके, मलिनीकरण इत्यादींचे वर्णन पुढील श्लोकात आहे. (१२) अध्याय १२ (श्लोक १२६) मनुष्याची कायिक, वाचिक आणि मानसिक कर्मे त्याला शुभाशुभ फळे देतात. त्या प्रमाणे त्याला उत्तम (देव), मध्यम (मनुष्य) किंवा अधम (तिर्यक) गति (जन्म) प्राप्त होतात. दुसर्‍याचे धन अन्यायाने मिळव्ण्याची इच्छा करणे, ब्रह्महत्यादी निषिद्ध कामे करण्याची इच्छा करणे, परलोक वगैरे काही नाही, देह हाच आत्मा असे विचार म्हणजे मानसिक कुकर्मे कडवट बोलणे, खोटॆ बोलणे, पाठीमागे कोणाचे दोष सांगणे, निष्प्रयोजन भांडत बसणे ही वाचिक कुकर्मे. आपल्याला न दिलेल्या गोष्टी घेणे, शास्त्रवर्जित हिंसा करणे, परस्त्रीशी संभोग करणे ही कायिक कुकर्मे. या दहा अशुभ कर्मांपासून दूर रहावे. शुभ कर्मांने देवयोनी, मिश्र कर्मांनी मनुष्य व अशुभ कर्मांनी तिर्यग (पशु, पक्षी, वृक्ष) जन्म प्राप्त होतो. मौन हा वाग्दण्ड, उपवास हा मनोदण्ड व प्राणायाम हा शरीरदंण्ड होय. अरक्षित वाग्दण्ड विज्ञानाला, मनोदण्ड परमगतीला व शरीरदण्ड तिन्ही लोकांना नष्ट करतो. ज्याच्या बुद्धीत वाग्दण्ड, मनोदण्ड आणि शरीरदण्ड दमन केलेले आहेत तो खरा त्रिदण्डी सन्यासी. वस्तूचे यथार्थ ज्ञान हा सत्वगुण, रागद्वेष हा रजोगुण व यांच्या विपरित तो तनोगुण. तप, ज्ञान, शुचिता, इंद्रियनिग्रह, धर्मक्रिया, आत्मचिंतन ही सत्वगुणलक्षणे आहेत. आरंभी रुची पण नंतर धैर्य गळणे, निषिध्द कर्मात रुची आणि निरंतर विषयोपभोग ही रजोगुणलक्षणे आहेत. लोभ, अधिरता, कृरता,नास्तिकता, याचना, कर्र्तव्यभ्रष्टता ही तमोगुणलक्षणे आहेत. तमोगुणाचे लक्षण काम, रजोगुणाचे लक्षण अर्थ आणि सत्वगुणाचे लक्षण धर्म ग्रंथ न वाचणार्‍यापेक्षा वाचणारा, वाचणार्‍यापेक्षा पाठांतर करणारा, पाठांतर करणार्‍यापेक्षा अर्थ जाणणारा,व अर्थज्ञानापेक्षा अनुष्ठान व आचार करणारा श्रेष्ठ होय. धर्म तत्व जाणण्यासाठी प्रत्यक्ष, अनुमान आणि विधिशास्त्र यांना आपण जाणोन घेतले पाहिजे. इति. इथे मनुस्मृति समाप्त होते. २६८४ श्लोकांतून निवड करणे ही वैयक्तिक बाब आहे. चुका होणे शक्य आहे, नव्हे तसे होणारच, काही महत्वाचे गळले गेले असेल तर काही अनावष्यक आले असेल. शेवटी माझा अभ्यास तो किती असणार ? पण निदान ह्या महान ग्रंथाचा परिचय करून द्यावा एवढीच इच्छा होती. असो. या दोन लेखात त्याज्य काही सापडणार नाही. मग तो जाळावा असे कां वाटले असावे ? शेवटच्या तिसर्‍या भागात त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करणार आहे. शरद

वाचने 10814 वाचनखूण प्रतिक्रिया 20

माहितगार Mon, 07/31/2017 - 08:18
१)
शूद्राला न्यायाधिश करू नये. शूद्र न्यायाधिश असलेले राज्य चिखलात अडकलेल्या गायीप्रमाणे बुडते. ??
२)
जे ब्राह्मण गुरे पाळतात, व्यापार करतात, कारू (कामगार) आहेत, नट किंवा गायक आहेत त्यांना शूद्र समजावे. ??
३)
..व्यभिचाराची इतकी दखल घेण्याचे कारण वर्णसंकर व त्यामुले निर्माण होणार्‍या निरनिराळ्या जाती. हा प्रकार समाजाच्या मुळावरच घाव घालणारा होतो. ??
४)
...धौम्य ऋषी त्याला म्हणतात "हे अनुचित आहे, तिला न्यावयाचे असेल तर पांडवांशी युद्ध करून, त्यांना जिंकून मग तू द्रौपदीला ने". लक्षात घ्या, पतीला जिंकून, विवाहित स्त्रीला पळवून नेण्यास हरकत नव्हती. प्रसंगावधानाचा वेगळा सोईस्कर अर्थ ??
शौद्र .... धनावर त्यांचा अधिकार नाही. ??
पाखंडी, अधार्मिक इत्यादींना राजाने देशाबाहेर हाकलून द्यावे. ??
...त्रिवर्णाची सेवा हे शूद्राचे काम. ??
पुढील बरेच श्लोक हे प्रतिलोम-अनुलोम विवाहामुळे निर्माण होणार्‍या जाती संबंचित आहेत. ??
अपुरा राहिलेला यज्ञ पूरा करण्यासाठी लागणार्‍या वस्तु धनवान वैश्याकदून बळजबरीने घेण्यास हरकत नाही. ते शक्य नसेल तर शूद्राकडूनही त्या मिळवाव्यात. ??
यज्ञ करण्यासाठी शूद्राकडून धनाची याचना कारणारा ब्राह्मण मरणानंतर चांडाळ होतो. यज्ञ करण्यासाठी शूद्राने दिलेले धन घेऊ नये. ??
ब्राह्मणाने आपल्या जप-होम यांच्या सामर्थ्याने आलेल्या आपत्तीचे निवारण करावे. !!
मी मनुस्मृतीची भलावण करत नाही. ..............या दोन लेखात त्याज्य काही सापडणार नाही. ?? :)

In reply to by माहितगार

अत्रे Mon, 07/31/2017 - 08:26
+१ एकूणच "यात काहीही त्याज्य नाही" हे वाक्य हास्यास्पद आहे. लेखकाने पुन्हा विचार करावा.

In reply to by अत्रे

शब्दबम्बाळ Mon, 07/31/2017 - 09:34
दोन्ही प्रतिसादांशी सहमत! लेखकाला वरील गोष्टींमध्ये काहीच "त्याज्य" वाटत नसेल तर अवघड आहे! स्पष्टीकरण दिल्यास बरे होईल. तसेच हे "सिलेक्टिव्ह" भाषांतर कशासाठी हा मुद्दा देखील उत्पन्न करणारे आहे... अनेक गोष्टी तर स्त्रियांना वस्तू मानून त्यांच्यावर हक्क कोणाचा असे दर्शवणाऱ्या वाटल्या... जर कडक नियम वगैरे करायचेच होते तर ते संतुलित पण करता आलेच असते केवळ परिस्थिती तशी होती म्हणून त्याने असे लिहिले वगैरे पटत नाही! लिहिणार्याचे विचारही तसेच असू शकतात! नाहीतर मग नियम बनवायचेच कशाला ना?
जर एक मुलगी दाखवून, लग्नाच्या वेळी दुसरीच मुलगी उभी केली तर खर्च केलेल्या पैशात नवरा दोघींशीही कग्न करू शकतो. (एकीशी लग्न करा, दुसरी मोफ़त)
हिंदू धर्म अशा गोष्टीतून बाहेर पडत आहे हीच अभिनंदनीय गोष्ट आहे पण कृपया हि लेखमाला जर चुकीचा संदेश पसरवणारी असेल तर संम नी लक्ष घालावे हि विनंती!

In reply to by माहितगार

शरद Tue, 08/01/2017 - 07:18
चूक कबूल सुरवातीला मी लिहले आहे की लेख तीन भागात आहे. तिसरा भाग हा शूद्राबद्दल मनूचे विचार व तो का जाळला गेला/जातो या संबंधित असेल. त्यामुळे पहिल्या दोन भागात "शूद्र" विचार टाळावयाचे ठरविले होते. परंतु लिहण्याच्या भरात लेखात काही तसे श्लोक आले, चुकून आले. तेवढे सोडले तर मला इतर भागात त्याज्य काही वाटत नाही, हे झाले माझे मत. मी माहिती म्हणून जेव्हा लिहतो तेव्हा माझे मत देण्याचे टाळतो मी नरहर कुरुंदकर नव्हे वा लक्षणशास्त्री जोशीही नव्हे एवढे मला नक्कीच माहीत आहे. इथे ती गफलत झाली. आता एवढे श्लोक वगळून, त्या कालानुसार त्याज्य काही नाही हे माझे मत जर कोणाला मान्य नसेल तर ते त्यांचे मत झाले. एखाद्या श्लोकाबद्दल मला " हा विचार त्याज्य का नाही" असे कोणी विचारले तर मी ते सांगण्याचा प्रयत्न करीन. पण तो लेखाचा भागही नव्हे व उद्देशही नव्हे. असो. मोठे लेख लिहतांना जास्त जागरुक राहिले पाहिजे हे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करीन

पुंबा Mon, 07/31/2017 - 12:20
या दोन लेखात त्याज्य काही सापडणार नाही. मग तो जाळावा असे कां वाटले असावे ?
हे धक्कादायक विधान आहे. त्याज्ज्यच नव्हे तर घृणास्पद आहेत कित्येक गोष्टी..

In reply to by पुंबा

पुंबा Mon, 07/31/2017 - 14:45
1. जे ब्राह्मण गुरे पाळतात, व्यापार करतात, कारू (कामगार) आहेत, नट किंवा गायक आहेत त्यांना शूद्र समजावे. 2. जर एक मुलगी दाखवून, लग्नाच्या वेळी दुसरीच मुलगी उभी केली तर खर्च केलेल्या पैशात नवरा दोघींशीही कग्न करू शकतो. (एकीशी लग्न करा, दुसरी मोफ़त) 3. यामुळे त्यानी व्यभिचाराची व्याख्या करतांना अयोग्य ठिकाणी ( गाल, स्थन, जंघा इ.) स्पर्श करणे, एका मंचकावर बसणे एकांतात परस्त्रीशी बोलणे, इत्यादीलाही व्यभिचार असे संबोधिले असून त्याकरिता आर्थिक दंड, कान-नाक कापणे ते वध अशा निरनिराळ्या शिक्षा सांगितल्या आहेत. केवळ पुरुषांनाच नव्हेत तर स्त्रीयांनाही दंड आहे.. 4. मद्यपान, दुर्जनसंगत, पतीपासून वेगळे रहाणे, अकारण फिरणे, अकाली झोपणे व दुसर्‍याच्या घरी मुक्काम करणे हे सहा स्त्रीयांचे दोष होत. 5. त्रिवर्णाची सेवा हे शूद्राचे काम. 6. यज्ञ करण्यासाठी शूद्राकडून धनाची याचना कारणारा ब्राह्मण मरणानंतर चांडाळ होतो. यज्ञ करण्यासाठी शूद्राने दिलेले धन घेऊ नये. 7.पतिसेवा हाच स्त्रीसाठी गुरूकुलवास असून उत्तम रीतीने गृहकृत्ये करणे हाच साय़ंप्रातर्होम होय. 8.मुलीने, तरुणीने वा वृद्धेने आपल्या घरातही काहीही स्वेच्छेने करू नये. 9. बाल्यावस्थेत पिता, तारुण्यात पति वार्धक्यात मुलगा असे स्त्रीचे तीन आश्रय असतात. म्हणून स्त्रीने स्वतंत्र राहू नये. पिता, भर्ता वा पुत्रापासून अलग झालेल्या स्त्रीची निंदा होते. पतिसेवेतच स्त्रीची सर्व व्रते, उपवास, यज्ञ समाविष्ट आहे. मन, वाणी व देह यांने पतीला दु:ख न देणारी स्त्री उत्तम लोकाला जाते. 10.ब्राह्मणाने मानसन्मान विषवत् टाळावे व अपमानची अमृतवत् इच्छा करावी, तात्पर्य त्याने निर्द्वंद्व व्हावे.
ह्यातले काय त्याज्य नाही ते सांगाच..

In reply to by पुंबा

शरद Tue, 08/01/2017 - 08:11
1. जे ब्राह्मण गुरे पाळतात, व्यापार करतात, कारू (कामगार) आहेत, नट किंवा गायक आहेत त्यांना शूद्र समजावे. (त्या काळात) ब्राह्मणाला उपजिविका चालवण्यासाठी धन फक्त तीन मार्गाने मिळवण्याची परवानगी होती. (१) यज्ञात मिळणारी दक्षिणा; (२) शिष्यांना शिकविल्यानंतर मिळणारी गुरूदक्षिणा व (३) क्षत्रिय-वैश्य यानी प्रसंगानुसार दिलेले दान. कठीण दिसते नाही ? "शापादपि शरादपि " नैपुण्य प्राप्त झालेल्या द्रोणाचार्य़ांवर आपल्या लहान मुलाला दूध देता येऊ नये अशीही परिस्थिती ओढविली होती ! अशा खडतर स्थितीत जे ब्राह्मण यजन-याजनादी षटकर्मे करत त्यांना आणि फक्त त्यांनाच विशेष अधिकार दिले आहेत. जर ब्राह्मण उपजिविकेसाठी इतर व्यवसाय (इथे गुरे पाळणे) करीत असेल तर त्याला वैश्य नव्हे शूद्रच म्हणावे असे मनु म्हणतो. फार कठोर दंड झाला नाही ? पण यात त्याज्य काय ?

In reply to by पुंबा

स्वधर्म Mon, 07/31/2017 - 17:56
हे लेख मी उशीरा वाचले. पहिला भाग वाचताच, प्रतिसादात शरदजींना त्यांची भूमिका विचारली अाहे. ती भलामण करण्याची नाही, असे म्हणणे कठीण अाहे.

श्रीगुरुजी Tue, 08/01/2017 - 15:54
मी आधीच लिहिल्याप्रमाणे मी मनुस्मृती वाचलेली नाही व त्यामुळे त्यानुसार आचरण करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. २१ व्या शतकात मनुस्मृतीची अजिबात गरज नाही. मला एक आश्चर्य वाटते. मनुस्मृतीमध्ये स्त्रिया किंवा इतरांबद्दल वाईट, अन्यायकारक लिहिले असेल तर त्यावर टीका करणे योग्यच आहे. परंतु २१ व्या शतकात भारतातील किती जण मनुस्मृतीनुसार आचरण करतात? मनुस्मृतीसारखेच एक दुसरे बरेच जुने पुस्तक आहे. त्या पुस्तकाला पवित्र ग्रंथ असे संबोधण्यात येते व २१ व्या शतकात सुद्धा त्यातील आज्ञांचे अनेक जण शब्दशः पालन करतात. त्या पुस्तकात स्त्रियांवर व इतरांवर अन्याय करण्याविषयीची अनेक कवने आहेत व त्यानुसार अजूनही स्त्रियांवर पुस्तकात लिहिल्याप्रमाणे अन्याय सुरू आहे. परंतु ते पुस्तक जाळावे, ते त्याज्य आहे, ते फेकून द्यावे, त्यात जे लिहिले आहे ते अन्यायकारक आहे व त्याचे अजिबात पालन करू नये असे कोणीही बोलण्याचे धाडस करू शकत नाही. त्याऐवजी त्या पुस्तकाला 'पवित्र ग्रंथ' असे संबोधले जाते. खरं तर या पुस्तकाची २१ व्या शतकात अजिबात गरज नाही. परंतु ते अजूनही वापरले जाते. समान अन्यायकारक गोष्टी सांगणार्‍या दोन पुस्तकांना वेगवेगळा न्याय का असावा?

In reply to by श्रीगुरुजी

शब्दबम्बाळ Tue, 08/01/2017 - 16:00
सहमत! याचसाठी हिंदू धर्म हा अभिनंदनास पात्र ठरतो कारण नको असलेल्या गोष्टी टाकून देण्याची सुरु झालेली चळवळ हि अजूनही चालू आहे. बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या जात आहेत काही ठिकाणी अजूनही संघर्ष आहे पण समाज सुधारणावादी झालेला आहे. तुम्ही बहुदा कुराण बद्दल बोलत आहात, पण मग संदिग्ध का बोलायचं? त्यातही जे चुकीचं आहे ते लोकांनी सोडून दिलेच पाहिजे. पण त्यासाठी लोकशिक्षण आणि चळवळीची गरज लागेल ते कोणी करायचं हा मोठा प्रश्न झालेला आहे!

In reply to by श्रीगुरुजी

पुंबा Tue, 08/01/2017 - 17:23
त्यात जे लिहिले आहे ते अन्यायकारक आहे व त्याचे अजिबात पालन करू नये असे कोणीही बोलण्याचे धाडस करू शकत नाही.
हे असं म्हणत नाहीत ते नालायकच म्हटले पाहिजेत.. उगाच अन्यायकारक गोष्टींना त्यात थोडं कुठं काही चांगलं आहे म्हणून त्यांची भलामण करणारे मुर्खच म्हणावे लागतील. दोन्ही पुस्तके अनुकरणिय नाहीतच पण तत्कालिन समाजव्यवस्था समजून घेण्यासाठी उपयुक्त आहेत. बाकी, मुस्लिमांमध्ये पुस्तकनिष्ठांची मांदियाळी भरभरून आहे, त्यांना 'आता हे पुस्तक कालबाह्य झाले आहे' हे पटवून दिलेच पाहिजे.

गामा पैलवान Wed, 08/02/2017 - 20:39
हाहाहा श्रीगुरुजी! कसं पकडलं तुम्हांस. :विकटहास्य करणारा राक्षसी बाहुला:
२१ व्या शतकात मनुस्मृतीची अजिबात गरज नाही.
ह्या एकविसाव्या शतकाची भानगड नक्की काय आहे? २०१७ वर्षांपूर्वी कोणी प्रेषित जन्माला आला होता, हे तुम्हाला मान्य आहे का? आ.न., -गा.पै.

गामा पैलवान गुरुवार, 08/03/2017 - 01:40
माहितगार, मला उलगडलेला अर्थ सांगतो. १)
शूद्राला न्यायाधिश करू नये. शूद्र न्यायाधिश असलेले राज्य चिखलात अडकलेल्या गायीप्रमाणे बुडते. ??
आज या क्षणी लाचखाऊ न्यायाधीश भारतीय न्यायव्यवस्थेस गाळांत रुतवत आहेत. पॉल डॅनियल दिनकरन, कर्णन वगैरे काही गाळीव गणंग आहेत. हे शूद्र नाहीत काय? २)
जे ब्राह्मण गुरे पाळतात, व्यापार करतात, कारू (कामगार) आहेत, नट किंवा गायक आहेत त्यांना शूद्र समजावे. ??
यांत आक्षेपार्ह काय आहे? मी माझी विद्या विकायला काढली तर मला लोकं शूद्रच म्हणणार ना? ३)
..व्यभिचाराची इतकी दखल घेण्याचे कारण वर्णसंकर व त्यामुले निर्माण होणार्‍या निरनिराळ्या जाती. हा प्रकार समाजाच्या मुळावरच घाव घालणारा होतो. ??
लैंगिक क्रांती (= सेक्शुअल रेव्होल्युशन) द्वारे व्यभिचार हाच शिष्टाचार ठरवल्याने पाश्चात्य देशांत आज विवाह आणि कुटुंब व्यवस्था मोडकळीस आलेल्या आहेत. यांतून काही शिकायला नको का आपण? ४)
...धौम्य ऋषी त्याला म्हणतात "हे अनुचित आहे, तिला न्यावयाचे असेल तर पांडवांशी युद्ध करून, त्यांना जिंकून मग तू द्रौपदीला ने". लक्षात घ्या, पतीला जिंकून, विवाहित स्त्रीला पळवून नेण्यास हरकत नव्हती. प्रसंगावधानाचा वेगळा सोईस्कर अर्थ ??
हे धौम्य ऋषींचं मत त्याकाळच्या नीतीनुसार आहे. नीतीच्या कल्पना नेहमीच बदलत्या राहिल्या आहेत. ५.
शौद्र .... धनावर त्यांचा अधिकार नाही. ??
एखाद्या शूद्र स्त्रीस उच्चवर्णीय ब्राह्मणापासून संतानप्राप्ती करवून घ्यायची असेल तर त्यास हरकत नाही. अशा प्रसंगी बापाच्या धनावर शौद्राचा अधिकार नसला तरी आईच्या धनावर आहे. ६.
पाखंडी, अधार्मिक इत्यादींना राजाने देशाबाहेर हाकलून द्यावे. ??
दुर्योधन अधार्मिक होता. त्याला धृतराष्ट्रानं बाहेर न हाकलल्याने काय हानी झाली ती सर्वश्रुत आहे. ७.
...त्रिवर्णाची सेवा हे शूद्राचे काम. ??
आजही हेच चालू असतं. तुम्ही ज्या आंतरजालावरून हा लेख व प्रतिक्रिया वाचताहात ते अमेरिकेच्या संरक्षण खात्याने सुरू केलेल्या बालजालाचा विस्तार आहे. या ना त्या प्रकारे आपण सगळे शूद्र असून सत्ताधारी वर्गाची सेवाच करंत असतो. ८.
पुढील बरेच श्लोक हे प्रतिलोम-अनुलोम विवाहामुळे निर्माण होणार्‍या जाती संबंचित आहेत. ??
वर्गवारीची काहीतरी पद्धती पाहिजे ना. का सगळेच शूद्र म्हणायचे? मग सगळेच ब्राह्मण का नको! ९.
अपुरा राहिलेला यज्ञ पूरा करण्यासाठी लागणार्‍या वस्तु धनवान वैश्याकदून बळजबरीने घेण्यास हरकत नाही. ते शक्य नसेल तर शूद्राकडूनही त्या मिळवाव्यात. ??
यात चुकीचं काय? मिळेल त्या मार्गाने कार्य साधून घेण्यास काय हरकत आहे? शिवाय शूद्राकडून बळजोरीने घ्यायचं म्हंटलं नाहीये. अतिरिक्त धनाचा साठा असलेल्या वैश्यावरंच आवश्यकता पडल्यास बलप्रयोग करावा. १०.
यज्ञ करण्यासाठी शूद्राकडून धनाची याचना कारणारा ब्राह्मण मरणानंतर चांडाळ होतो. यज्ञ करण्यासाठी शूद्राने दिलेले धन घेऊ नये. ??
बरोबर आहे. धनाची याचना करणारा ब्राह्मणच नव्हे. ११.
ब्राह्मणाने आपल्या जप-होम यांच्या सामर्थ्याने आलेल्या आपत्तीचे निवारण करावे. !!
आजही मानवी उपाय थकल्यावर दैवी उपाय करतातच ना लोकं? ब्राह्मणाने अगोदर करावे, इतकाच मथितार्थ. तसंही पाहता क्षत्रिय सजग असतील तर ब्राह्मणावर संकट यायलाच नको. आ.न., -गा.पै.