मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

why is there something rather than nothing???????

टर्बोचार्जड फिलॉसॉफर · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
देव,धर्म,मृत्युनंतरचे जीवन,अमानवी शक्ती व अनेक गोष्टी मानवाला आकर्षीत करत आल्या आहेत.मी ही लहानपणी या गोष्टींवर विश्वास ठेवायचो,त्यांच्यात असलेल्या गूढत्वाच्या वलयात स्वतःला हरवून जाण्यात एक वेगळीच झिंग असते.बहुतांश लोक या नशेतून बाहेर येत नाहीत. आयुष्यभर या नशेत राहण्यामागे उत्क्रांतीवादानुसार काही कारणही असेल .मला याचे विश्लेषण करत बसायचे नाही. काही वर्षांपुर्वी मी आमच्या साताराजवळ असलेल्य महीमानगडावर गेलो होतो.संध्याकाळची वेळ होती,सुर्य मावळूण चंद्र उगवत होता.निरव शांतता होती.अश्या वेळी काही फिलॉसॉफीकल प्रश्न मला पडतात.आणी त्या कातरवेळी तो अचाट प्रश्न माझ्या मनाच्या पटलावर अचानक अवतरला.हे विश्व ,मुर्त अमुर्त जे काही आहे /असेल ते मुळात अस्तित्वात का आहे? आस्तिकांसाठी काही काळ देवाचे अस्तित्व मान्य केले तरी या मुर्त अमुर्तात तोही येतो,हे सगळं काय आहे? .अनेक दिर्घीका आहेत,आकाशगंगा आहेत,त्यात अब्जावधी तारे आहेत.अनेकविश्वे(multiverse) अस्तित्वात असतील तरी मला त्याच्या खोलात जायचे नाही.मला या अस्तित्वाचे मुळ कारण काय या प्रश्नाने विचलीत व्हायला झाले. why is there something rather than nothing???? हा प्रश्न त्यादीवशी ज्या तिव्रतेने माझ्यावर आदळला तसा कुठलाच प्रश्न आजवर माझ्या मनावर आघात करु शकलेला नाही.मग सुरु झाले या प्रश्नाचा मागोवा घेणे.थोडा अभ्यास केल्यावर लक्षात आले की हा प्रश्न सद्य तत्वज्ञातला(contemporary philosophy) सर्वात जटील प्रश्न आहे.भौतिकशास्त्र आणि तत्वज्ञान जिथे एकमेकांना छेदतात तो हा बिंदू आहे.थोड्या वाचनातून हे लक्षात आले की पुर्ण शुन्यावस्था(absolute void)शक्य आहे.absolute voidsकिंवा absolute nothingness म्हणजे काय? तर काहीच नाही,मुर्त अमुर्त संकल्पना ,गणितीय तथ्ये,काहीच अस्तित्वात नसलेलं काहीतरी(?) Not even the concept of nothingness!!! पण काही फिलॉसॉफर्स असे मानतात की पुर्ण शुन्यावस्था ही मुळातच अस्थिर असते,(absolute nothingness is inherently unstable).त्यामुळे त्यांच्यामते हे विश्व शुन्यातून अचानक उगम पावले आहे.महाविस्फोटाचा सिद्धांत(big bang theory)याचे द्योतक आहे. पण कार्यकारण भावाचा आपल्यावर खूप पगडा असल्याने something from nothing हे मान्य होत नाही.देव धर्म ,मृत्युनंतरचे जीवन अश्या थोड्या उथळ प्रश्नापेक्षा या प्रश्नाने मला बरेच वैचारीक मैथुन करायला लावले आहे.कदाचीत why is there something rather than nothing या प्रश्नाचर कधीच सापडणार नाही,की सापडेल? आपल्याला काय वाटते?चर्चा अपेक्षीत आहे. १.why is there something rather than nothing याचे आपल्याकडे काही उत्तर आहे का? २.पुर्ण शुन्यावस्था(absolute void)शक्य आहे असे आपल्याला वाटते का? ३.हा प्रश्न आपल्याला कधी पडला होता का? असल्यास तुमच्या धार्मिक ,निधमी,अध्यात्मीक धारणेवर याचा काय प्रभाव पडला??? धन्यवाद..

वाचने 6786 वाचनखूण प्रतिक्रिया 27

डॉ सुहास म्हात्रे 28/06/2017 - 15:33
जगाला काही खास कारणपरंपरा नाही. ते भौतिक शास्त्राच्या नियमांनी निर्माण झाले आहे, चालले आहे आणि चालू राहील... हाच त्याच कार्यकारण भाव; बाकी सगळ्या मानवी मेंदूच्या करामती. माणुस नाहीसा झाल्यावरही हे जग भौतिशास्त्राच्या नियमांप्रमाणेच चालू राहील. विश्व आणि माणूस असण्यात कोणत्याही बाह्यशक्तिची गरज नाही.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

टर्बोचार्जड फिलॉसॉफर 28/06/2017 - 16:07
काही फिनॉमेनल शक्ती अस्तित्वात नाही हे सत्यच.मीही नस्तिकच आहे. या लेखात मला जे मांडायचे आहे ते थोडे वेगळे आहे.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

मामाजी 28/06/2017 - 18:21
डॉ.साहेब, स्वामि विवेकानंदांनी शिकगोच्या सर्वधर्म परीषदेत सादर केलेल्या "PAPER ON HINDUISM" मधिल काही भाग. The Hindus have received their religion through revelation, the Vedas. They hold that the Vedas are without beginning and without end. It may sound ludicrous to this audience, how a book can be without beginning or end. But by the Vedas no books are meant. They mean the accumulated treasury of spiritual laws discovered by different persons in different times. Just as the law of gravitation existed before its discovery, and would exist if all humanity forgot it, so is it with the laws that govern the spiritual world. The moral, ethical, and spiritual relations between soul and soul and between individual spirits and the Father of all spirits, were there before their discovery, and would remain even if we forgot them. The discoverers of these laws are called Rishis, and we honour them as perfected beings. I am glad to tell this audience that some of the very greatest of them were women. Here it may be said that these laws as laws may be without end, but they must have had a beginning. The Vedas teach us that creation is without beginning or end. Science is said to have proved that the sum total of cosmic energy is always the same. Then, if there was a time when nothing existed, where was all this manifested energy? Some say it was in a potential form in God. In that case God is sometimes potential and sometimes kinetic, which would make Him mutable. Everything mutable is a compound, and everything compound must undergo that change which is called destruction. So God would die, which is absurd. Therefore there never was a time when there was no creation.

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

> ते भौतिक शास्त्राच्या नियमांनी निर्माण झाले आहे, चालले आहे आणि चालू राहील... हे थोडे उलट आहे. जगाच्या नियमांचा अभ्यास करुन ते समजुन घेण्यासाठी व दुसर्‍यांना समजावण्यासाठी भौतिक शास्त्र माणसांनी निर्माण केले. त्याचे नियम हे नविन माहीती व संशोधनांती बदलत रहातात, पण त्यामुळे जग बदलत नाही. त्यामुळे जग भौतिक शास्त्राच्या नियमांनी निर्माण झाले आहे, चालले आहे आणि चालू राहील हे तर्कात बसत नाही.

In reply to by नेत्रेश

डॉ सुहास म्हात्रे 30/06/2017 - 01:55
लेखाचा उद्येश पाहून, वरचे जरासे गमतीनेच लिहिले होते. जरा विस्ताराने लिहितो... जगात जे काय आहे ते मानवाच्या आस्तित्वाच्या तोकड्या (सुमारे २ लाख वर्षांच्या) इतिहासाच्या खूप अगोदरपासूनच आहे आणि ते त्याच्या घटकांमध्ये होत असलेल्या संवादाच्या (interaction) नियमांनीच चालले आहे... मानव फक्त आपल्या बौद्धीक कुवतीने त्यांचा अभ्यास करून त्यांचा अर्थ लावतो, त्यात काही एकवाक्यता शोधून ती गणितात बसवायचा व त्याला नाव (संज्ञा, टर्म) देण्याचा प्रयत्न करतो. थोडक्यात, विश्वात जे आहे आणि ते जसे वागते (बिहेवियर) याच्या अभ्यासाला आणि प्रमाणित दस्तऐवजीकरणाला (study and standardised documentation) आपण 'भौतिक शास्त्र' ही संज्ञा वापरतो. म्हणून, विश्वातील घटकांच्या संवादाच्या (अ) आजच्या शास्त्रिय पद्धतीप्रमाणे आपल्याला बरोबर वाटणार्‍या पण भविष्यात बदल होऊ शकणार्‍या (प्रिझ्युम्ड टू बी साईंटिफिकली करेक्ट बट ओपन फॉर स्क्रुटिनी), (आ) शास्त्रिय प्रयोगाने सिद्ध न झालेल्या पण निरिक्षणात असलेल्या (नोन-अननोन) किंवा (इ) अजून माहीत नसलेल्या व निरिक्षणात न आलेल्या (अननोन-अननोन) नियमांना मी 'भौतिक शास्त्राचे नियम' ही सामायिक संज्ञा वापरली आहेत. त्यांना जर याहून अधिक योग्य संज्ञा असली तर समजून घ्यायला नक्की आवडेल.

मामाजी 28/06/2017 - 17:57
ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥

मामाजी 28/06/2017 - 18:55
संपादकांना विनंती: माझा एकच प्रतिसाद तीनवेळा प्रकाशित झाला आहे (अर्थात माझ्या चूकीमूळे ) कृपया दोन जास्तीचे प्रतिसाद काढून टाकावे.

ज्योति अळवणी 28/06/2017 - 19:34
लेखकांनी मांडलेला प्रश्न मनात अनेकदा येतो. म्हणजे या ब्रह्मांडाच्या असण्याचा कार्यकारण भाव काय? त्याचा उगम किंवा अंत... काय असेल? असे काहीसे प्रश्न मनात येतात अनेकदा. मामाजींनी विवेकानंदांच्या भाषणातील जो भाग उत्तरादाखल दिला आहे तो वाचून काही गोष्टी पटल्या. मुख्य म्हणजे आपलं वाचन खूपच तोकड आहे आणि आपण फक्त प्रश्नच विचारू शकतो असे मनात आलं. (अर्थात आपण म्हणजे मी)

शरद 29/06/2017 - 13:19
नासदीय सूक्त श्री. ट.फि. यांना पडलेला प्रश्न जसाच्या तसा ५०००-६००० वर्षांपूर्वी परमेष्टी प्रजापती या ऋषीलाही पडला होता.त्याला त्यावेळी इन्टरनेटची सुविधा मिळत नव्हती. त्यामुळे त्याचे उत्तर त्याला स्वत:च शोधावयाचे होते. त्याला काय "स्फुरले" ते त्याने ऋग्वेदाच्या १० व्या मंडलात १२९ व्या सूक्तात सांगितले आहे. हेच ते सुप्रसिद्ध " नासदीय सूक्त.". त्याला भारतीय तत्वज्ञानाचे "आदिबीज" म्हणतात. कोणीही एखादे मत मांडले की त्याचे खंडण करणे हा भारतीय पंडितांचा आवडता खेळ. पण नासदीय सूक्ताच्या अढळ स्थानाला कोणीही धक्का लावू शकलेले नाही. आज येथे संपूर्ण सूक्ताची माहिती देण्याची गरज नाही परंतु आजच्या धाग्याच्या संदर्भापुरती परमेष्टीला काय जाणवले ते पाहू.. ... तेव्हा (मुळारंभी) सत् नव्हते, असत् ही नव्हते, नाश पावावयासच काही नव्हते म्हणजे मृत्यूही नव्हता.मृत्यू नाही तर अमृतत्वत्व तरी कोठून असणार ? जल, वायू नव्हतेच पण आकाशही नव्हतेया पैकी काही नव्हते तर ते, जे काही होते ते, आपल्याच शक्तीने, आपल्याच ठायी स्फुरण पावत होते.(हीच तुम्ही म्हणता ती instability). हे एकले एक तत्व चैतन्ययुक्त होते व त्यातून या विश्वाची उत्पत्ती झाली. कशी ? ते आपल्या जाणीवेच्या पलिकडे आहे. आदिपुरुष हिरण्यगर्भ, तो जाणत असेल (किंवा जाणत नसेलही!) (ज्ञानेश्वर म्हणतात "जगचि हे होय जाये! तो शुद्धीही नेणे !!" (५.७९) डॉ. सुहास म्हात्रे म्हणतात "भौतिक शास्त्रांच्या नियमांनी निर्माण झाले " डॉक्टरसाहेब, विषय चालला आहे त्या वेळी भौतिक म्हणावी अशी कुठलीच गोष्ट नव्हती. मग त्यांचे नियम तरी कुठे असणार ?. शरद .. . .. .

संदीप-लेले 29/06/2017 - 14:40
१.why is there something rather than nothing याचे आपल्याकडे काही उत्तर आहे का? आपण पृथ्वीवर ज्या भौतिक परिस्थितीत राहतो ती विश्र्वाच्या सर्वसाधारण परिस्थितीच्या मानाने अतिशय 'abnormal' आहे. उदा. प्रकाशाचा वेग, पृथ्वीचा वेग, विश्र्व प्रसरणाचा वेग, ताऱ्याच्या पृष्ठभागाचे किंवा गाभ्याचे तापमान, अवकाशाचे 2.7 deg K हे तापमान, ई. विश्र्वात सर्वत्र आढळते. मानव यापेक्षा फारच वेगळ्या भौतिक परिस्थितीत उत्क्रांत झाला. इतकेच नाही तर प्रत्यक्ष विश्र्वात ११ मिती असूनही आपल्याला ३ पेक्षा जास्त मिती जाणवत ही नाहीत आणि माहित असल्या तरी कल्पना ही करता येत नाहीत. मानवाची आत्ताची उत्क्रांतीची अवस्था फारच प्राथमिक आहे. वरील गोष्टी आणि म्हणूनच तुमच्या प्रश्नाचे उत्तर आकलन होईल एवढा मानवी मेंदू प्रगत झालेला नाही. त्यामुळे या प्रश्नाचे उत्तर अस्तित्वात असले तरी ते आत्ता आपल्याला समजेल असे वाटत नाही. २.पुर्ण शुन्यावस्था(absolute void)शक्य आहे असे आपल्याला वाटते का? Multiverse ही कल्पना मान्य केली तर त्यातले एखादे विश्र्व किंवा त्या विश्र्वांच्या पलीकडे पूर्ण शून्यावस्था असू शकेल असे वाटते. शात्रज्ञाचें एक भाकीत असे आहे कि Big Bang ही प्रक्रिया अशाच पूर्ण शून्यावस्थेतून सुरु झाली. 3. हा प्रश्न आपल्याला कधी पडला होता का? असल्यास तुमच्या धार्मिक ,निधमी,अध्यात्मीक धारणेवर याचा काय प्रभाव पडला??? हा नेमका प्रश्न कधी पडला नव्हता. पण विश्र्वरचनेविषयी मला प्रचंड कुतूहल आहे. त्यातून या प्रश्नासारखे अनेक प्रश्न खुणावत असतात. त्यातून मी असा निष्कर्ष काढला की ... प्रत्येक गोष्टीला कार्यकारण भाव असायलाच हवा ही मानवी अप्रगत मेंदूची निर्मिती आणि गरज आहे. त्यामुळे देव, जगनियंता, कर्मफळ, ई. आणि इतर अनेक संकल्पना मानवाने निर्माण केल्या. पण हे विश्र्व काही कारणपरंपरे ने न चालता त्यातील बहुतांश घटना निव्वळ probability नुसार घडतात असे मानले तर इतर कोणतीच संकल्पना मनात बाळगण्याची गरज रहात नाही. कारण हा निष्कर्ष बरोबर असो वा चुकीचा, घडेल ते मुकाट्याने सहन करणे / पाहात राहणे या पलीकडे आपण काही करूच शकत नाही. मग हव्यात कशाला त्या निरुपयोगी (की हानिकारक) संकल्पना? आणि त्यातून निर्माण होणारे पेच आणि प्रश्न? साधं, सोपं, सरळ जगाव हेच उत्तम ! अर्थात हे नास्तिक लोकांना पटेल आणि इतरांना नाही. तसेच हे प्रत्यक्षात मनाशी कबुल करणे ही कोणालाच इतके सोपे नाही याची मला कल्पना आहे. पण मला ते जमले आहे असे वाटते.

In reply to by संदीप-लेले

मराठी_माणूस 29/06/2017 - 15:21
११ मिती असूनही आपल्याला ३ पेक्षा जास्त मिती जाणवत ही नाहीत आणि माहित असल्या तरी कल्पना ही करता येत नाहीत.
ह्या ११ मिती कोणत्या ?

In reply to by संदीप-लेले

मराठी_माणूस 29/06/2017 - 15:39
त्या ७ कोणत्या आणि त्या जर सुक्ष्म आहेत (जाणवत नाहीत ) तर त्यांचे ज्ञान आपल्याला कसे झाले.

In reply to by संदीप-लेले

व्यनिने न देता इथेच दिलेत तर इतर सदस्यांनाही त्याचा फायदा होईल. तीन spatial मिती (लांबी, रुंदी आणि उंची) आणि चौथी temporal मिती (काळ) याशिवाय इतर मिळून एकूण दहा मिती अस्तित्त्वात असाव्यात असे string theory मानते, तर एकूण अकरा मिती असतील असे M-theory मानते. परंतु या कुठल्याही इतर मितींच्या अस्तित्त्वाचा प्रत्यक्ष किंवा सबळ पुरावा मिळालेला नाहीये. तेव्हा जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत त्या मिती खरेच असतात की नाही हे समजण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडे नाही.

In reply to by एस

संदीप-लेले 30/06/2017 - 10:18
त्या २ सिद्धांतांचा उल्लेख करून उत्तर तुम्हीच दिलेत. ते सिद्धांत पुर्णपणे सिद्ध झाले नसले तरी त्या प्रकारचे बहुतेक सारे सिद्धांत ३ पेक्षा जास्त मिती आहेत असेच दर्शवतात. आपली समज तोकडी आहे हे विज्ञान मान्य करते. त्यामुळे एखादा वैज्ञानिक सिद्धांत जोपर्यंत चुकीचा सिद्ध होत नाही तोपर्यंतच तो बरोबर आहे असे गृहीत धरले जाते.
तेव्हा जोपर्यंत तो मिळत नाही तोपर्यंत त्या मिती खरेच असतात की नाही हे समजण्याचा कोणताही मार्ग आपल्याकडे नाही.
आपल्याला खात्रीपूर्वक कळू शकेल असा कोणताही मार्ग सध्या तरी नाही हे खरे !

In reply to by संदीप-लेले

सतिश गावडे 29/06/2017 - 23:28
अर्थात हे नास्तिक लोकांना पटेल आणि इतरांना नाही. तसेच हे प्रत्यक्षात मनाशी कबुल करणे ही कोणालाच इतके सोपे नाही याची मला कल्पना आहे. पण मला ते जमले आहे असे वाटते.
कसं जमलं हो तुम्हाला? आम्हालाही सांगा ना.

गामा पैलवान 29/06/2017 - 18:17
टफि, तुम्हाला जो प्रश्न पडला आहे त्यापेक्षा मूलभूत प्रश्न मला पडलाय. नथिंग म्हणजे नक्की काय? नथिंग कुठे दिसतं? एखादं उदाहरण मिळेल काय? आ.न., -गा.पै.

Deserter 30/06/2017 - 11:39
योगनंदाच पुस्तक वाचा समाधान होईल

गामा पैलवान 04/07/2017 - 12:25
टफि, काय झालं माझ्या 'नथिंगनेस म्हणजे काय' या प्रश्नाचं? तुम्ही म्हणता की :
देव धर्म ,मृत्युनंतरचे जीवन अश्या थोड्या उथळ प्रश्नापेक्षा या प्रश्नाने मला बरेच वैचारीक मैथुन करायला लावले आहे.देव धर्म ,मृत्युनंतरचे जीवन अश्या थोड्या उथळ प्रश्नापेक्षा या प्रश्नाने मला बरेच वैचारीक मैथुन करायला लावले आहे.
मग तुमचा नथिंगनेसचा प्रश्नही इतर प्रश्नांइतकाच उथळ का मानू नये? आ.न., -गा.पै.