गँगस्टर

जव्हेरगंज जनातलं, मनातलं
गँगस्टर काल पक्याला पोलिसांनी ठोकला. विक्रोळी स्टेशनच्या बाहेर माचीस मागत असतानाच ठोकला. सोबतचे चारजण पण पकडले गेले आहेत म्हणे. आम्ही सध्या टेन्शनमध्ये आहोत. हा आमच्यासाठी फार मोठा धक्का आहे. सुलेमानभाईचा फोन बंद आहे. साहजिकच आहे म्हणा. आमची चौदा पोरांची गँग आहे. त्यातल्या प्रत्येकाला फोन करून मी मुंबई सोडण्याचे आदेश दिले आहेत. रात्री मी माझ्या खोलीऐवजी याकूबच्या खोलीत झोपलो. याकूब बायकापोरांसोबत राहत होता. कालची खबर मिळताच कोणालाही न सांगता त्याने इथून पोबारा केला. त्याच्या कुंद खोलीत मच्छर फार होते. साधारण तीन दिवस मी त्या खोलीत झोपून होतो. या दरम्यान मी माझ्या खोलीकडे जायचे कटाक्षाने टाळले होते. तो एक कठिण काळ होता. झावरी बारमध्ये परवेशचा मर्डर केल्यावर असेच एकट्याने राजस्थानमध्ये महिनाभर फिरत होतो. पण त्यावेळी पोलिसांचा ससेमिरा नव्हता. अब्दुल गँग मागावर होती. शेवटी दुबईवरून सुत्रं हलली तेव्हा कुठं मुंबईला परतलो होतो. या चार भिंतींच्या अंधारात वेड्यासारखे पडून राहणे हे जिकीरीचे काम होते. पण माझ्यापुढे दुसरा काही पर्यायही नव्हता. आणि अश्यातच माझा दरवाजा 'धाड धाड धाड' आवाजाने वाजला. खूण ओळखीची होती. तरीही गावठी पिस्तुल हातात लपवून मी तो आरामात उघडला. "अबे सत्या, कबसे ढुंढरेला तुझे" फुटपाथवर भीक मागणारा आमचा एक खबरी कचरू खोलीत शिरत म्हणाला. जागोजागी असे भिकारी सुलेमानभाईनं हेरून ठेवले आहेत. "ये फोन दियेला है तेरेको. भाईको फोन कर. और वो पुराना नंबर फेंक दे" एवढ्या तणावात मी माझा फोन बंद करायचं विसरूनच गेलो होतो. मी तातडीने फोन बंद करुन बॅटरी बाहेर काढली. फोनचे दोन तुकडे करून त्याला देत म्हणालो. "ठिक है, अब तू जा, और इसे किसी गटर मे फेंक दे". "ये रोकडा तो ले. पचास है" खिशातलं पुडकं माझ्याकडं देत तो म्हणाला. काहितरी काम असणार याशिवाय हा रोकडा आलेला नाही. "पक्याकी खबर सुनके बहुत बुरा लगा मेरेको. कोईतो च्युx है यहापे. सालेको छोडना नही." कचरूसारख्या लंगड्या माणसालापण असेच वाटत होते. पक्या आपला जिगरी दोस्त. त्यानेच तर या धंद्यात मला आणले. त्याची डेडबॉडीपण दोन दिवस कोणी क्लेम केली नाही. सुलेमानभाईचा राईट हँड! जो आता या जगात नाही. सुलेमानभाईला टाईम नसतो. बराच काळ मुंबईत काढून तो आता दुबईत जाऊन बसलाय. प्रत्येक वेळेला त्याला फोन करताना मला धडकी भरते. कचरू निघून गेल्यावर मी नंबर डायल केला, "जी भाई, सत्या बात कर रहा हू" "आंटी पे जरा नजर रखना. मुझे डाऊट है. तुझे चार दिन बाद फोन करता हू" एवढेच बोलून सुलेमानभाईनं फोन कट केला. क्रमश:
वर्गीकरण
लेखनप्रकार

5 टिप्पण्या 6,316 दृश्ये

Comments

डॉ सुहास म्हात्रे नवीन

मस्तं सुरुवात ! नेहमीच्या माहीत असलेल्या प्रतिसादांच्या मारामारीपेक्षा हे लई ब्येस्ट ! होऊन जाऊंद्या जोमाने !!