श्रद्धांजली - ओम पुरी : एक ओरिजिनल कलाकार
लेखनप्रकार
NFDC द्वारे बनवला गेलेला चित्रपट "जाने भी दो यारो" १९८३ मध्ये आला आणि तेंव्हा पासून अजरामर झाला. अतिशय लो बजेट वर बनवला गेलेला चित्रपट आज सुद्धा लोकांच्या मनात एक घर करून आहे. मीडिया, बिल्डर, सरकार ह्यांच्यातील घाणेरडा भ्र्ष्टाचार आणि त्यांत शेवटी विनाकारण फाशीवर जाणारे दोन तरुण आदर्शवादी अश्या कथानकावर आधारलेली हि एक डार्क कॉमेडी होती.
पंकज कपूर, नसिरुद्दीन शाह, रवी वासवानी, भक्ती बर्वे, सतीश शाह आणि ओम पुरी ह्यांच्या मुख्य भूमिका असलेल्या ह्या चित्रपटात अभिनयाची मेजवानी आम्हा प्रेक्षकांना मिळाली. सचिन, राहुल, सौरव, लक्ष्मण, सेहवाग ह्यांनी सर्वानी एकदम फॉर्म मध्ये यावे अश्या प्रकारची हि घटना होती. ह्यातील वस्रहरणाचा सिन तर आज सुद्धा एखाद्या meme प्रमाणे चित्रपट, tv इत्यादींवर डोके वर काढतो.
ओम पुरी ह्यांचा भरदार पुरुषी आवाज अद्वितीय होता. अमरीश पुरी ह्यांचा आवाज ऐकला कि हिंदी चित्रपटातील खतरनाक व्हिलन डोळ्यापुढे येतो. प्रेम चोप्रा ह्यांचा आवाज ऐकला कि स्त्रीलंपट व्हिलन डोळ्यापुढे साकारतो. पण ओम पुरी ह्यांचा आवाज वेगळाच पठडीतील होता. कणखर वाटणाऱ्या त्या आवाजाने अनेक प्रकारच्या भूमिका इतक्या सहज पणे वठवल्या होत्या कि त्याला निव्वळ कठोर भावनेशी संलन्ग करणे मला तरी बरोबर वाटत नाही.
जाने भी ... मधील बिल्डर दारुडा अहुजा जेंव्हा कॉफीनं मधील सतीश शाहच्या शवाला दारुडा समजून त्याच्या कॉफिनला टायर लावतो तेंव्हा त्या विशष्ट आवाजाला कॉमेडीची झालर असते. मिर्च मसाला मधील वृद्ध अबूमियाँ जेंव्हा गावांतील सर्व मर्दाना त्यांची मर्दानगी सुभेदारा पुढे कशी शेपूट खाली घालते ह्याची आठवण करून देतो तेंव्हा त्याच आवाजाला "लास्ट मेन स्टँडिंग" चा दरारा असतो. गोविंद निहलानी ह्यांच्या अर्धसत्य मधील तरुण आणि तडफदार पोलीस ऑफिसरवर तो आवाज शोभून दिसतो पण जसे कथानक पुढे जाते तसे त्याच आवाजातून त्या आदर्शवादी पोलीस ऑफिसरची हतबलता सुद्धा स्पष्ट होत जाते.
एकदा लालू प्रसाद कि कोणी तर बिहार मध्ये प्रचार करत असताना त्यांनी "बिहार मधील रस्ते हेमा मालिनी ह्यांच्या गाला प्रमाणे गुळगुळीत करू" असे शेखी त्यांनी मिरवली होती. हेमा मालिनी त्या काळी राजकारणात उतरली होती. तिने नंतर लालू प्रसाद नि बिहार मधील रस्ते ओम पुरीच्या गाला प्रमाणे करून ठेवले आहेत असे प्रत्युत्तर दिले होते.
भरदार आवाज, खडबडीत चेहरा असलेला हा अभिनेता कदाचित व्हिलन बनून राहील असे कुणाला वाटले नसते तरच नवल होते पण प्रत्यक्षांत ह्या अभिनेत्याने विविध प्रकारच्या भूमिका गाजवल्या. भारतीय चित्रपट सृष्टीत अनेक सुपरस्टार झाले पण निव्वळ "अभिनय" ह्या एका प्रमाणावर त्यांची तुलना करायची झाली तरी श्री ओम पुरी ह्यांचे नाव त्या यादीत फार वर आहे ह्यांत शंका नाही.
त्यांचे काही विशेष चित्रपट
- तमस
- आक्रोश
- आरोहण
- मिर्च मसाला
- जाने भी दो यारों
- अर्धसत्य
- मालामाल विकली
ह्यातील बहुतेक चित्रपटांना स्वातंत्र्यानंतर लोकांना "आता सर्व काही अचानक ठीक होणार" अश्या प्रकारची आशा होती त्या आशेला पडणारे भगदाड हि थीम आहे. त्याकाळांतील लोकांना कदाचित भविष्याबद्दल विशेष आशा वाटत नसावी. सरकार आणि सरकारी कायदे सर्व काही समस्या जादूची कांडी फिरवून नाहीश्या करू शकतात अशी कदाचित लोकांची धारणा होती पण प्रत्यक्षात त्यांचा अनुभव वेगळा येत होता. अर्थांत हा माझा कयास आहे.
आज काल आम्ही कितीही मोठ्या संकटावर मात करून जिंकणाऱ्या महिला पहिलवानावर चित्रपट बनवतो, अब्जावधींचे उद्योग उभारणाऱ्या `गुरु`वर चित्रपट बनवतो, पॅरिस मधील भारतीय तरुणांच्या खाजगी जीवनावर चित्रपट बनवतो, प्रत्यक्ष जीवनाशी बादरायण संबंध नसलेल्या कथानकावर चित्रपट बनवतो (सुलतान इत्यादी). आज आपले मुख्य चित्रपट शेकडो कोटी कमावतात. कलात्मक चित्रपट सुद्धा कोट्यवधी गुंतवून १०x नफा कमावतात. लाखो रुपये खर्चून अभिनयाचे हिरे शोधाच्या एजेन्सीस देशांत आणि विदेशांत भ्रमण करतात. प्रचंड मोठ्या भांडवलावर आधाराती आपली चित्रपट सृष्टी दार वर्षी नवीन नवीन शिवधनुष्ये उचलताच नाही तर त्यावर प्रत्यंचा सुद्धा लावते.
पण त्या काळी तुटपुंज्या भांडवलावर आधारित, सरकारी नियंत्रण आणि मोजक्याच लोकांच्या कृपेवर चालणाऱ्या चित्रपट सृष्टीत ओम पुरी, पंकज कपूर, शबाना आजमी, नासिरुद्दीन शाह, दीप्ती नवल, फारूक शेख, गोविंद निहलानी, हृषीकेश मुखर्जी सारख्या लोकांनी रसिकांना वेगळे असे काही दिले ह्यांत शंका नाही. आपल्या आजीने दिलेल्या जुन्या माळेला कदाचित आमच्या नवीन लखलखत्या सुवर्णहारची चमक नसेल पण एक नॉस्टेल्जियाची भावना आणि प्रचंड भावनिक किंमत मात्र नक्कीच असते त्याच प्रमाणे ओम पुरी सारख्या अभिनेत्यांचे अर्धसत्य सारखे चित्रपट आम्हाला अनेक वर्षे आठवणीत राहतील.
वाचने
2932
वाचनखूण
प्रतिक्रिया
6
चांगला लेख साहनाजी. ओम पुरींनी केलेली वादग्रस्त विधानं सोडून देऊ. पण अभिनेता म्हणून ते जबरदस्त होते यात वादच नाही. त्यांना श्रद्धांजली!
रच्याकने त्यांच्या संस्मरणीय चित्रपटांच्या यादीत ' चायना गेट ' आणि ' देव ' ही नावंही हवीत. चायना गेट मध्ये ते मुख्य नायकच होते असं म्हणायला हरकत नाही. देव मध्ये त्यांनी रंगवलेला पोलिस अधिकारीही तितकाच अविस्मरणीय होता. त्यांची आणि अमिताभ बच्चनची अभिनयाची जुगलबंदी या चित्रपटात पाहायला मिळाली. चाची ४२० मधला त्यांचा सेक्रेटरीही मस्त होता. मकबूल मधला पोलिस अधिकारीही अप्रतिम!
एक सुधारणा - तमस हा चित्रपट नव्हता. ती दूरदर्शन मालिका होती. भीष्म सहानी यांच्या त्याच नावाच्या कादंबरीवर ती आधारित होती.
१००% सहमत. मला कोठेही महाभारतावर आधारीत विनोदी प्रसंग पाहिला की पहिली याचीच आठवण होते. तो प्रसंग बघण्यासाठी खास वेळ काढून पारायण करतो.
त्यांना श्रद्धांजली!
छान लिहिलंय.
ओमपूरी ने लहानपणी अतिशय हलाखी दिवस काढुन चित्रपट सृष्टीत आपले मानाचे स्थान मिळवले.
वर्तमानपत्राच्या माहितीनूसार शेवटी मात्र एकटेपणातच त्यांची अखेर झाली याबद्दल थोडेसे वाईट वाटते. असो.
"भारत एक खोज" मधील ओम पुरींचे narration अप्रतिम होते. त्यामुळेच ती मालिका अजून मनात घर करुन आहे.
आता पुन्हा एकदा पाहिलीच पाहिजे.
कसदार अभिनेत्याचा दुर्दैवी अंत झाला हे खरेच. चांगला लेख.
चांगला लेख साहनाजी. ओम