मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

घराच्या किंमतीत ३०% घट ? मदत हवी आहे

मीउमेश · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
मी महिन्या पूर्वी ठाण्यात हायलँड हेवन या ठिकाणी वन बीचके बुक केलाय, आता अश्या बातम्या येऊ लागल्यात कि घराच्या किंमती कमी होणार आहेत म्हणून काय करावे सुचत नाही. कृपया तज्ञ मंडळी कडून या विषयावर मदत हवी आहे. . घराची किंमत ५३ लाख + पार्किंग + २ वर्षाचा मेंटेनन्स + क्लब आणि इतर धरून ७४ लाखाला पडलाय. अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, बुकिंग ८०-२० स्कीम मध्ये केलेले आहे. आता १४ लाख सुरुवातीला भरले आहेत. बाकी ६० लाख घर ताब्यात मिळाल्यावर २०१९. अजून बिल्डिंग चे काम सुरु झालेल नाही. काय करणे योग्य ठरेल; कृपया तज्ज्ञ मिपाकरानी आपले बहुमोल मार्गदर्शन करावे. धन्यवाद

वाचने 19919 वाचनखूण प्रतिक्रिया 56

भाते 25/11/2016 - 12:38
तुम्ही बहुदा हि बातमी म्हणताय का? त्यात शेवटच्या परिच्छेदात हे लिहिले आहे.
या निर्णयामुळे घरांचे दर कमी होणार नसले, तरी गृहकर्जावरील व्याजदर कमी होणार आहेत.... गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियातून काही स्वयंघोषित अर्थतज्ञांनी नोटाबंदीच्या निर्णयाने घरांच्या किमती मोठ्या प्रमाणावर घसरतील, असा चुकीचा प्रचार चालवला आहे.
शेवटचा पुर्ण परिच्छेद पुन्हा एकदा नीट वाचा. बाकी, मिपाकर मदत करतीलच.

In reply to by भाते

संजय क्षीरसागर 25/11/2016 - 13:17
ब्लॅक मनी निरुपयोगी झाला आहे. तेवढ्या प्रमाणावर नवा तयार व्हायला प्रचंड वेळ लागेल. शिवाय मोदींनी भ्रष्टाचाराचं उच्चाटन करायचा चंग बांधला आहे. आता बिल्डर्सना फ्लॅट विकायचे असतील तर, झक मारत, रेकनरच्या किंमतीवरच ब्लॅक न घेता विकायला लागतील. हीच परिस्थिती, म्हणजे मोदींची दहशत, कायम राहिली, तर व्हाइट पैसा असलेले लोक, रेकनरपेक्षा कमी किमतीत फ्लॅटची अपेक्षा धरतील. सध्या फक्त रेडी पझेशन फ्लॅट विकले जातायंत. बुकींगची वाट लागली होतीच, ती आता पुरती लागेल. जर रियल इस्टेटमधे कोंडी कायम राहिली तर वास्तविकातच भाव खाली आल्यानं सरकारला रेकनर रेटमधे डाऊनवर्ड रिविजन करायला लागेल. हे करेक्शन झालं तर जेन्युइन बायर्समधे उत्साह संचारेल. मग वाजवी किंमतीत, संपूर्ण व्हाइट मनी घेऊन येणार्‍या बायरची, बिल्डर्स वाट बघतील.

संदीप डांगे 25/11/2016 - 12:45
गेल्या पंधरा दिवसातल्या घडामोडीनुसार प्रॉपर्टी सेक्टर वर फारसा फरक पडणार नाही असे दिसते, छोटी व मध्यम किमतीची घरे यांचे भाव स्थिर राहतील, झालाच तर (ज्याची शक्यता 10 टक्के आहे) अगदी 5 टक्के बदल होईल पण तो फार मोठा बदल नव्हे. कारण इथे ब्लॅक मनी चे व्यवहार फार कमी प्रमाणात होतात, थेट बँकेकडून लोन घेऊन घरे घेतली जातात. व इथली मागणी हि राहण्यासाठी घरे या गरजेवर टिकून आहे व हि मागणी कमी होण्याची चिन्हे नजीकच्या भविष्यात दिसत नाहीत, ज्यांची अशी घरे आहेत त्यांनी अजिबात घाबरून जाऊ नये व अफवांना भुलू नये. किमान पाच वर्षे आपली घरे तातडीची गरज असल्याशिवाय विकू नये. एक कोटींपेक्षा जास्त किंमत असलेल्या घरांच्या किंमतीत मात्र 25 ते 35 टक्के करेक्शन येण्याची शक्यता या क्षेत्रातल्या अनेक तज्ञांनी व्यक्त केली आहे. अशी बहुतांश घरे गुंतवणूक व काळा पैसा जीरवण्याचं साधन म्हणून घेतली जातात, अधिक प्रश्न व शंका असतील तर विचारा, यथाशक्ती उत्तरे देईन. (मी तज्ञ नाही, पण रिअल इस्टेट क्षेत्राशी जवळचा संबंध आहे व गेल्या ६ वर्षापासून नीट लक्ष ठेवून आहे.)

In reply to by संदीप डांगे

ओल्ड मोन्क 25/11/2016 - 15:19
पुणे व पिं.चिंच. भागात गेलया ६ महिन्यांपासून बिल्डर्सनी १५-२०% डिस्काउंट देणं सुरु केलंय कारण बरेच प्रोजेक्ट्स बुकिंग अभावी बांधून रिकामे/अर्धवट अवस्थेत पडून आहेत.यात मुख्यतः छोटे प्रोजेक्ट(स्टॅन्ड अलोन)जे शहरालगतच्या रावेत,सुस,पिरंगुट,नांदे,तळेगाव येथे आहेत.सध्या बाजार बघितला तर सर्व "थांबा आणि पहा" अवस्थेतच आहेत.अजून ६-८ महिने असेच राहील असे वाटते.

In reply to by ओल्ड मोन्क

संदीप डांगे 25/11/2016 - 15:47
तुम्ही जी परिस्थिती सांगत आहात ती गेल्या अडीच-तीन वर्षांपासून स्लो-डाऊन मुळे आलेली आहे. अनेक बिल्डर आयडिया लढवत आहेत पण उठाव नाही. पण बाजारात मागणी कमी आहे काय? तर नाही. कारण फ्लॅटचे भाव व त्याच्या ग्राहकाच्या खिशाचा आकार मॅच होत नाहीये. बाजारात २०१२ साली अत्युच्च पातळी होती. एखादी वास्तू २५ लाख रुपयाला २०१२-१३ मधे असेल तर तीची किंमत २००८ साली ७ ते ९ लाख होती. तीन वर्षात तीची किंमत ३००% वाढली, हे अनैसर्गिक होते. मागील इतिहास पाहिल्यास फारतर दरवर्षी १५-२० % वाढ होणे नैसर्गिक आहे. आता शेवटी २०१२-१३ मधे फुग्यातली हवा हळुहळु निघू लागली व हे २५ लाख रुपयाचे घर आज ४ वर्षांनी ३०-३५ लाख रुपयाला आहे. ही भाववाढ नाही तर हे हळू हळू होत असलेले करेक्शन आहे. गेली दोन वर्षे बिल्डरांनी कोणत्याही प्रकारे आपल्या बाजूने भाव कमी करण्याचा प्रयत्न केला नाही. आता होतंय काय की बाजारात ग्राहक आहेत पण त्यांच्याकडे घरांच्या किंमतीच्या प्रमाणात वाढलेले पगार नाहीत. आज वीस लाखाचा इएमआय साधारण १८ हजार होतो. १८ हजार इएमआय भरायला ग्राहकाचा किमान ५० हजार पगार हवा. आता ज्याचा पन्नास हजार पगार आहे तो २० लाखाच्या घरात राहणार नाही. कारण त्याची लाईफस्टाईल म्याच होत नाही. वीस लाखात चांगली घरे देणे बिल्डरांना परवडत नाही. त्यांच्याकडे ह्या पन्नास हजारवाल्याच्या लाइफस्टाइलला साजेसे असे फ्लॅट आहेत पण ते ४५ लाख पासून पुढे. म्हणजे ग्राहक आहेत पण त्यांना परवडणारी घरे नाहीत व घरे अहेत पण ती परवडणारे ग्राहक नाहीत. किंमतीत डिस्काउंट देणे एक प्रकारची धूळफेक आहे असे मला वैयक्तिकरित्या वाटते. अशा ठिकाणी बुकिंग करतांना नीट चौकशी करुन घ्यावी असा माझा सल्ला राहील. कारण कागदावर-बिल्डरच्या ब्रोशरवर-मीटींगमधे जे कबूल केले जाईल ते मिळेलच अशी कोणतीही खात्री नाही. १५ ते २० % डिस्काउंट साठी बिल्डर बांधकामाचा दर्जा, प्लंबिंग-इलेक्ट्रीकल्स, ड्रेनेज व इतर सोयींमधे आयत्यावेळी धोका देऊ शकतो. ज्या बिल्डरच्या स्वतःच्या मालकीच्या जुन्या जमीनी आहेत त्यांचे ठिक आहे पण ज्यांनी गेल्या दहा वर्षात जमीनी विकत घेऊन प्रोजेक्ट सुरु करायचे ठरवले त्यांचे जरा अवघड आहे (हे कितीही मोठे वा छोटे बिल्डर असले तरी त्यांना नुकसान सोसायलाच लागेल) त्यामुळे आपले नुकसान तेही १५-२०% सोसणे त्यांना शक्य होणार नाही. कारण त्यांच्यावर अवलंबून बॅन्का, पुरवठादार, कंत्राटदार हे लोक आपल्या किंमती कमी करत नाहीत. बिल्डरांचा शुद्ध नफा किती हा वादाचा मुद्दा आहे. पण शुन्य फायद्याची स्किम कोणीच लॉन्च करणार नाही हे ही तितकेच खरे आहे. प्रॉपर्टीच्या धंद्यात केवळ बिल्डर हा एकमेव बंदा नाही त्याच्याशी संबंधित खूप लोकांचे जाळे आहे व त्यांचे भाव वाढलेले आहेत, ते कमी होणे शक्य नाही. ज्यांच्या अगदी जुन्या वडिलोपार्जित जमीनी आहेत त्यांचेच प्रोजेक्ट येत्या काळात उभे राहतील असे वाटते.

In reply to by संदीप डांगे

ओल्ड मोन्क 25/11/2016 - 16:18
"गेली दोन वर्षे बिल्डरांनी कोणत्याही प्रकारे आपल्या बाजूने भाव कमी करण्याचा प्रयत्न केला नाही." मला वाटत कि बिल्डर्स ची होल्डिंग कॅपॅसिटी भरपूर असल्याने(काळ पैसा) असं झालं असावं. आता नोटबंदीचा त्यावर काय परिणाम होतो ते बघायला हवं.जमिनींचे व्यवहार तर निम्म्यावर आलेत. अवांतर : पिंपरी मधील एका खूप मोठ्या बिल्डरचा पडद्या मागील धंदा (खरतर मुख्य धंदा) Money laundering चा आहे. तो एका राजकीय पक्षाचा येत्या महापालिका निवडणुकीचा sponsor आहे. आता त्याला मोठा फटका बसलाय म्हणून १ महिन्यापूर्वी तापलेली निवडणुकीची हवा अचानक थंडावलीये.

In reply to by ओल्ड मोन्क

अप्पा जोगळेकर 25/11/2016 - 15:47
मी पिंचि मध्ये पुनावळे येथे राहतो. या भागातच अंदाजे ३ ते ४ हजार फ्लॅट पडून आहेत. मी राहतो त्या सोसायटीचे पझेशन मिळून ३ वर्षे झाली. इथे सुमारे १५० फ्लॅट पडून आहेत. ऑक्युपन्सी फक्त ५०% च आहे. अशी अवस्था बर्याच ठिकाणी आहे. किमती पडणारच. पडाव्यात. खरोखर गरजू असतील त्यांना घर विकत घेता येईल.

In reply to by नाखु

अप्पा जोगळेकर 25/11/2016 - 16:11
हैला, काय सांगताय नाखुकाका ? वाल्हेकर वाडीत राहता ? तिथपर्यंत तर कित्येकदा मी सकाळी सकाळी पळायला सुद्धा जातो. भेटूच.

In reply to by नि३सोलपुरकर

हतोळकरांचा प्रसाद 25/11/2016 - 21:30
आमी तर चिंचवडला कवाबी तयार! @नाखु : कट्ट्यासाठीचा धागा टाकायचा वाचला! इथेच घोषणा करून टाकू? बोला कवा भेटायचं म्हंता?

मृत्युन्जय 25/11/2016 - 13:45
घरांच्या किंमती हळुहळु कमी होतीलच. किंवा असे म्हणुयात की आता फार वाढणार नाहित. पण त्याचे कारण मोनेटाय्झेशन असेल असे वाटत नाही. त्याचे मुख्य कारण असेल घरांची वाढलेली मागणी. अर्थाशास्त्राचा मूलभुत नियम आहे की मागणीपेक्षा पुरवठा कमी असेल तर किंमती वाढतात. त्या पार्श्वभूमीवर माझे विधान चुकीचे वाटेल. पण असे बघा की गुंतवणुकीसाठी घर घेण्याच्या ट्रेंड मध्ये मोठी वाढ झालेली आहे. पुर्वी उतारवयात आपल्या हक्काचे एक छप्पर विकत घेण्यासाठी लोकांना तोशीस सहन करायला लागायची. घर ही आयुस्।यात एकदाच घ्यायची वस्तु होती. आता उत्पन्न वाढले तसे लोक वयाच्या तिशीच्या आत पहिले घर घेतात आणी मग गुंतवणुक म्हणुन दर ५ - १० वर्षांनी एक एक घर वाढवत जातात. हे असे करणारा एक मोठा वर्ग हळु हळु तयार होतो आहे. एक तर सध्या डबल इंजिन असते. त्यामुळे त्या मानाने उत्पन्न असते त्यामुळे २-३ घरे घेऊ शकणार्‍या वर्गातल्या लोकांची संख्या देखील वाढली आहे. माझ्या माहितीतल्या बर्‍याच लोकांची पाच पेक्षा अधिक घरे आहेत. २ घरे असणारे तर लय लय लोक आहेत. यातुन हे कळते की परिस्थिती बदलते आहे. पुर्वी लोकांकडे एकच घर असायचे आता अधिक असतात. स्वतःचे घर असणार्‍या लोकांची संख्या वाढते आहे. हे कशामुळे होते? तर लोकांची क्रयशक्ती आणी उत्पन्न वाढले. एकुणातच सगळ्यांचेच वाढले. आता या लोकांनी ही गुंतवणूक केली आहे ती या उद्देशाने की भविष्यात चांगले उत्पन्न मिळेल किंवा भाडे मिळेल. पण प्रत्यक्षात परिस्थिइती काय आहे? जर स्वतःचे घर असणार्‍ञा लोकांची संख्या वाढणार असेल तर अर्थातच भाड्याने घर घेणार्‍यांची स़ंख्या कमी होइल. शिवाय मागणी वाढली की पुरवठा देखील वाढेल. किंबहुन वाढलाच आहे. आज पुण्यात बघितले तर नविन उपनगरांमधील कित्येक इमारती ओस पडलेल्या दिसतील. कित्येक घरे विकली गेली नाही आहेत किंवा विकली गेलेली असली तर बंद आहेत कारण तो गुंतवणुकीसाठी म्हणुन घेतलेला फ्लॅट असेल आणि अश्या घरांना एकतर भाडेकरु मिळालेला नसेल (कारण अर्थातच भाड्याने घर घेणार्‍या लोकांची संख्या कमी झाली असेल) किंवा विश्वासु भाडॅकरु शोधायला मालकाला वेळ नसेल किंवा त्याला तशी रिस्कच घ्यायची नसल्याने त्याने भाडेकरु घातलाच नसेल. अर्थात या गुंतवणुकीमुळे त्याला मिळणारे उत्पन्न शुन्य. व्याज मात्र भरायला लागते आहे. अर्थात हळु हळु लोकांना कळेल की अशी जास्तीची घरे घेणे हे काही योग्य परतावा देणारे साधन नाही. दुसरीकडे बिल्डर्स ना दिसत असेल की घरे घेणार्‍यांची संख्या वाढते आहे. त्यामुळे अधिक इमारती बांधल्या जातील. मग त्या विकल्या गेल्या नाहित (कारणे उपरोल्लेखित) की अर्थातच त्यांना भाव कमी करायला लागणार. एव्हाना गुंतवणूक म्हणून घर घेणार्‍यांनी पाठ वळवली असल्याने किंमती अधिकच उतरणार. मग नविन कमी इमारती बांधल्या जातील. त्यानंतर काही वर्षांनी हे सायकल परत रिपीट होइल. आणि मग हे असेच होत राहिल. थोडक्यात थोड्या काळासाठी किंमती कमी होतील. तुम्ही जर आज तिशीचे असाल तर म्हातारपणी तुम्हाला हे घर योग्य तो परतावा देइल. अवांतरः मी काही अर्थतज्ञ नाही. त्यामुळे हा एक केवळ अंदाज आहे. चुकीचाही ठरु शकतो. आपले आर्थिक निर्णय स्वतःच्या जबाबदारीवर घ्यावेत.

In reply to by मृत्युन्जय

कलंत्री 25/11/2016 - 13:59
घराची गरज राहण्यासाठी व्हावी हे रास्तच आहे. घरे बनवुन ती तशीच राहत असतील तर जागा, वाळु, सिंमेट आणि लोखंडाचा वापर होतो आणि अंतिमतः पर्यावरणाच्या विरुद्धच होते. जागा मर्यादित आहेत आणि माणासाची भूक मात्र अमर्यादित. यात पर्यावरण आणि इतर प्राण्यांची ( तेथील राहिवास असणार्‍या) हाणी म्मत्र होते. सर्वांनी यावर विचार करावा.

कलंत्री 25/11/2016 - 13:55
८० लाखाचे घर बघीतले वर्षाला अंदाजे ८% प्रमाणे ६.४ लाख व्याज भरावे लागते किंवा व्याजाचे नुकसान होते. समजा भाड्याने घर घेतले तर १५००० / महिना प्रमाणे १.८० लाख लागतात. घराच्या किंमती किती वाढतील? या सर्वांचा विचार केला तर विकतचे दुखणे का बरे घ्यावे?

In reply to by कलंत्री

संदीप डांगे 25/11/2016 - 14:07
मी पण घर विकत घेऊन राहण्यापेक्षा भाड्याच्या घरांत राहण्याच्या बाजूने आहे. पण भारतीय मानसिकतेत स्वतःचे घर हे कन्सेप्ट फार घट्ट आहे व घरमालक कोणाला दोन टर्मपेक्षा जास्त वेळ ठेवण्यास उत्सुक नसतात. सतत घर बदलत राहणे डोकेदुखी आहे. त्याचमुळे अव्वाच्या सव्वा किंमत मोजून भारीभक्कम इएमआय भरण्यासाठी कुटूंबातल्या आणखी एका व्यक्तीला सक्तीने नोकरी करणे भाग पडते. स्वतःचे घर हे इएमआय वर असले तरी ती डेड इन्वेस्टमेंट आहे कारण ते कुणी विकू शकत नाही नाहीतर राहायला कुठे जाणार? राहत्या घराची किंमत दरवर्षी अमुक एक लाख वाढली हे ऐकून गुदगुल्या होतात पण ती किंमत हवेतल्या गप्पा असतात. भाड्याच्या घरात राहून इएमआय एवढी सेविंग किंवा इन्वेस्टमेंट होत असेल तर भाड्याच्या घरात राहणे स्वतःच्या घरापेक्षा परवडते. भाड्याच्या रुपाने पैसा फक्त जातो असा विचार बरेच लोक करतात. प्रतिसाद विस्कळित आहे, पुढे अजून लिहित राहीन...

In reply to by संदीप डांगे

कलंत्री 25/11/2016 - 14:22
भाड्याच्या किंमती कमी झाल्या आणि कायदा हा खर्‍या अर्थाने दोन्हीबाजूचे रक्षण करणारा असला तर खरेच बरे होईल.

In reply to by संदीप डांगे

ओल्ड मोन्क 25/11/2016 - 15:25
पुढे समजा नोटाबंदीचा परीणाम म्हणून व्याज दर कमी झाले(असं सगळे म्हणतायेत बुआ) तर घर फायद्याचं ठरू शकत.

In reply to by संदीप डांगे

तेजस आठवले 25/11/2016 - 15:27
स्वतःचे घर हे इएमआय वर असले तरी ती डेड इन्वेस्टमेंट आहे कारण ते कुणी विकू शकत नाही नाहीतर राहायला कुठे जाणार? राहत्या घराची किंमत दरवर्षी अमुक एक लाख वाढली हे ऐकून गुदगुल्या होतात पण ती किंमत हवेतल्या गप्पा असतात.
+१ सहमत, परंतु पुष्कळ लोकांना हे समजत नाही.realised प्रॉफिट आणि unrealised प्रॉफिट नीट समजावून सांगण्याची गरज आहे.

In reply to by संदीप डांगे

अप्पा जोगळेकर 25/11/2016 - 15:53
भाडे आणि ईएमाय जवळपास सारखेच पडतात. भाड्याच्या घरासाठी १ बीएचके बघणारे विकत घेताना २ बीह्चके बघतात. त्यामुळे इएमआय मोठा होतो. ते डेड इन्वेस्टमेंत वगैरे काय पटले नाही. आपण स्वतः मशागत केलेल्या राहत्या घराची किंमत करता येत नाही. सगळ्याच गोष्टी पैशात मोजणे चुकीचे आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

संदीप डांगे 25/11/2016 - 16:05
भाडे व इमाय सारखेच पडत असेल तर मालकीचे घर घ्यावे, सिम्पल. पण असे होते आहे काय? ठाण्यात जिथे मी राहत होतो तिथे बारा हजार रुपये भाडे होते त्याच वनबीएचके घराचा इमाय ४० हजार आला असता. आताही तिथे १४ हजार भाडे आहे व इमाय ६० हजारच्या आसपास जाईल. (इमाय किती हे डाउनपेमेंट वर ठरते, मी ८०% लोन अमाउंट कन्सिडर करत आहे.) आता नाशिकमधे मी जिथे राहतो तिथे ७ हजार भाडे आहे व तेच घर मी लोनवर घेतले तर मला किमान २५ हजार इएमाय पडेल. त्यामुळे इएमाय व घरभाडे सारखेच पडेल हे आपले मत पटत नाहीये. तुम्ही डाउनपेमेंट किती करता यावर सर्व अवलंबून असते. ६० टक्क्याच्या वर डाऊन पेमेंट असेल तर ४० लाखाचे घर भाड्यापेक्षा परवडेलच. बाकी स्वतःचे घर ही भावनिक गुंतवणूक असेल तर माझा वरिल 'डेड-इन्वेस्टमेंट'वाला प्रतिसाद लागू होत नाही. आरजू की कोई किमत नही होती.

In reply to by संदीप डांगे

अप्पा जोगळेकर 25/11/2016 - 16:28
घराची किंमत - २४ लाख डाऊन पेमेंत - ८ लाख ईएमआय - १६ हजार जर भाड्याने राहिलो असतो तर त्याच जागेचे भाडे - ९ हजार हे माझ्या राहत्या जागेशी संबंधित आकडे आहेत. जागा बदलण्याचा त्रास, सामानाची हलवाहलव, जर अपत्ये असतील तर त्यांच्या शाळा आणि घरात हव्या तशा सुविधा करुन घेणे इत्यादी पाहता विकत घेणे बरे पडावे. अर्थात हे प्रत्येकाच्या ऐपत आणि लाएबिलिटी वर व्हेरी होऊ शकते.

In reply to by अप्पा जोगळेकर

संदीप डांगे 25/11/2016 - 16:44
तुमच्या प्रतिसादाशी सहमत आहे. पण जर ९ हजार भाडे असेल तर कैच्याकै आहे राव! आमच्या नाशकात अशा घराचे साडेचार ते सहा पर्यंत सरासरी भाडे जाईल. तेही लोकॅलिटीवर अवलंबून. काही ठिकाणी हे ३ ते साडेतीन आहे. मी ज्या रोहाऊसमधे राहतो ते सोळाशे स्क्वेअरफीट टूबीएचके (किंमत ३०-३५ लाख) आहे ज्याचे भाडे आमच्याभागात साडेसहा-सात चालू आहे तर नेमक्या विरुद्ध दिशेच्या नाशकात अशाच रोहाउसला साडेपाच हजारच्या वर भाडं मिळत नाही. बाकी भाडे आणि इमाय यातले अंतर इतके कमी असेल तर नक्की खूप मोठा घोळ आहे, आजूबाजूला ५० टक्के फ्लॅट पडून असतांना इतके भाडे हे जरा आश्चर्यजनक वाटत आहे. परवडणारी घरे ह्या टॉपिकवर जेव्हा विचार केल्या जातो तेव्हा बॅन्कलोन ८०-९० टक्के धरले जाते. बॅन्क एखाद्याच्या पगाराच्या ४० टक्के इमाय येईल इतके लोन मंजूर करते. त्यामुळे मांडणीचा रोख त्याप्रमाणे असतो एखाद्याकडे ४०-८० टक्के डीपी असेल तर तो ह्या टॉपिकमधे कवर होत नाही. कारण कोणाकडे किती गंगाजळी आहे हा केसटूकेस बदलणारा घटक आहे. २४ लाखाचे घराला आपण सुमारे ४० % डीपी केला आहे. तुमच्या केसमधे हे फायदेका सौदा आहे. तुम्ही म्हटल्याप्रमाने हे प्रत्येकाच्या केसमधे वेगवेगळे ठरु शकते.

In reply to by संदीप डांगे

अप्पा जोगळेकर 25/11/2016 - 17:37
बाकी भाडे आणि इमाय यातले अंतर इतके कमी असेल तर नक्की खूप मोठा घोळ आहे, आजूबाजूला ५० टक्के फ्लॅट पडून असतांना इतके भाडे हे जरा आश्चर्यजनक वाटत आहे. नाही. यात आश्चर्य काहीच नाही. येथून उद्योग नगरी अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. पण तरीही आजूबाजूला थोडा गाव भाग आहे, जंगल आहे, शेती वगैरे आहे त्यामुळे नविन घर घ्यायला सहसा धजावत नाहीत. त्यामुळे भाडेकरुच जास्त राहतात. मी बुक केले तेंव्हापासून म्हणजे गेल्या ६ वर्षापासून येथे प्रपोज्ड कचरा डेपोची वदंता आहे. त्यामुळे कदाचित भाडे आणि किंमत यात तफावत असेल. म्हणजे डेपो झाला तर किमती पडतील वगैरे म्हणून लोक घेत नसतील. भाडेकरु कधीही सोडू शकतात.

In reply to by अप्पा जोगळेकर

संदीप डांगे 25/11/2016 - 17:50
तुम्ही बुक केले तेव्हा ची किंमत व तेव्हाचे भाडे आहे काय ते वर नमूद केलेले? घराच्या किंमती ह्या लोकेशनवर अवलंबून असतात, लोकेशनच्या मागणीनुसार दर ठरतात, त्या दरांनुसार भाडे ठरते जसे खाली ग्म्बा यांनी सांगितले (भाडे X ३ = इएमआय) . तुम्ही ज्या भागाबद्दल सांगत आहात ती अपवादात्मक केस आहे असे दिसते. म्हणजे विकतच्या घरांना मागणी नाही पण भाड्याच्या घरांना आहे तर विकत घ्यायच्या घरांच्या किंमती पडल्या आहेत असे म्हणावे लागेल व त्यामुळे भाड्याच्या दरात येणारी तफावत कमी दिसते, अन्यथा डेपोची समस्या नसती तर हे घर आपल्याला पस्तीस ते चाळीस लाखांदरम्यान मिळाले असते असा अंदाज आहे. (नक्की काय हे तुम्हाला जास्त माहिती, माझा आपला आंधळा अंदाज) नवी मुंबईमधे विमानतळाचे प्रपोजल आल्यावर जमीनीच्या, घरांच्या किंमती वाढल्या भरमसाठ पण त्याप्रमाणात भाड्याच्या वाढल्या नव्हत्या. ही तुमच्या इथल्या परिस्थितीच्या उलट परिस्थिती होती,

In reply to by अप्पा जोगळेकर

डॉ सुहास म्हात्रे 25/11/2016 - 21:02
याशिवाय विकत घेतलेले घर इएमआय संपले की आपल्या संपूर्ण मालकीचे होते, कितीही वर्षे राहिले तरी त्यानंतरचा खर्च = ०. वार्षिक फक्त घरपट्टीचाच मुख्य खर्च उरतो. शिवाय घर विकले तर त्याची किंमत आपल्याला मिळते. घरात राहतो तोपर्यंत घरभाडे द्यावे लागेल, त्याला वेळेची सीमा नाही. भाड्याचे घर सोडले की त्याची काही किंमत आपल्याला परत मिळत नाही. हिशेब करताना, हे वरचे फरकही ध्यानात घेणे जरूर आहे.

In reply to by अप्पा जोगळेकर

गंम्बा 25/11/2016 - 17:09
अप्पा : महाराष्ट्रातल्या कुठल्याही शहरात भाड्या पेक्षा इएमाय कमीतकमी तिनपट तरी जास्त असतो. तुम्ही जर इमाअय कव्हर करेल इतके भाडे मिळणारा फ्लॅट मिळवुन देणार असाल तर माझी आत्ता विकत घ्यायची तयारी आहे.

गंम्बा 25/11/2016 - 14:23
अजून रजिस्ट्रेशन झालेलं नाही, बुकिंग ८०-२० स्कीम मध्ये केलेले आहे. आता १४ लाख सुरुवातीला भरले आहेत. बाकी ६० लाख घर ताब्यात मिळाल्यावर २०१९. अजून बिल्डिंग चे काम सुरु झालेल नाही.
ज्या बिल्डींगचे काम अजुन चालू झालेले नाही अश्या स्कीम मधे बुकींग करणे हे खुप रीस्की आहे. अनेक बाबी असतात जसे लिटीगेशन्स, बिल्डरच्या पार्टनर मधे वाद, बिल्डरचा मृत्यू. सरकारी धोरणात बदल. ३ वर्षात काय होइल काही सांगता येत नाही. बिल्डींग चे काम सुरु झाले नाही म्हणजे फायनल प्लॅन पण पास झाला नसणार. त्यात आता हे नोटांचे प्रकरण. बिल्डर ला जर आर्थिक नुकसान होणार असेल तर ही स्कीम नक्की रखडेल. ह्या नंतर मोदी बेनामी मालमत्तेच्या मागे लागणार आहे म्हणे. हा काळ रीअल इस्टेट साठी व्होलाटाइल आहे. जमले तर बुकींग कँसल करा.रीफ्लॅट घ्यायचाच असेल तर रीसेल चा बघा.

In reply to by गंम्बा

संजय क्षीरसागर 25/11/2016 - 14:42
बिल्डर म्हणाला तुमचे ब्लॅकचे दिले तसे परत करतो तर काय करणार त्या नोटा ? शिवाय बिल्डर , आता मार्केटची वाट लागल्यानं ,अॅग्रीमेंट कॅन्सल करणार नाही. केलंच तर बेक्कार कट मारेल . पुन्हा जुन्या नोटांचं लफडं आहेच .

In reply to by संजय क्षीरसागर

गंम्बा 25/11/2016 - 15:03
त्यांनी कुठे लिहीले आहे ब्लॅक नी दिल्याचे जमले तर कँसल करावे असेच म्हणले आहे. पण मला वाटते की ३- ४ लाखाचे जरी नुकसान होत असेल तरी कँसल करावे. ४-५ महिने थांबले तर त्या सारखाच फ्लॅट घेता येइल.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 25/11/2016 - 19:04
80-20 हि ब्लॅक ची स्कीम नाही, 20 टक्के बुकिंग ला आणि 80 टक्के पजेशन ला अशी स्कीम आहे. बांधकामाच्या स्टेजनुसार जी पेमेंट पद्धत असते ते नाहीये इथे.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 26/11/2016 - 00:46
हो. त्यांनीच म्हटलंय तसं. " बुकिंग ८०-२० स्कीम मध्ये केलेले आहे. आता १४ लाख सुरुवातीला भरले आहेत. बाकी ६० लाख घर ताब्यात मिळाल्यावर २०१९"

In reply to by संदीप डांगे

संजय क्षीरसागर 26/11/2016 - 01:01
१) घराची किंमत ५३ लाख .... २) + पार्किंग + २ वर्षाचा मेंटेनन्स + क्लब आणि इतर धरून... ३) ७४ लाखाला पडलाय. म्हणजे २१ लाख वर खर्च? काय ब्रेक-अप आहे?

In reply to by संजय क्षीरसागर

संजय क्षीरसागर 26/11/2016 - 01:13
फ्लॅट ५३ लाख + रजिस्ट्रेशन अँड स्टँप ड्यूटी ३ लाख आणि (पार्कींग, मेंटेनन्स, क्लब हाऊस चार्जेस, एमेसीबी)याचे ४ लाख, असे ६० लाख असणारेत.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 26/11/2016 - 01:16
पार्किंग चे कमीत कमी पाच लाख एकट्याचेच असतील अशी शंका आहे, क्लब चे १ ते २ लाख, मेन्टेनन्स चे ५० हजार एमेसीबी चे माहित नाही. चार लाखात ठाण्यात हे सर्व बसणे शक्यच नाही. ठाण्यात कारपार्किंग इतकं स्वस्त नाही.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 26/11/2016 - 01:13
हा प्रश्न तर मलाही पडलाय... ब्रेक-अप काय ते उमेशभौ सांगु शकतील.. वेबसाईटवर बेस प्राईस ५३.७२ लाख दाखवतंय, रजिस्ट्रेशनचे वेगळे,

In reply to by संदीप डांगे

संजय क्षीरसागर 26/11/2016 - 01:18
म्हणजे ब्लॅकचं शून्य ? यावर तुम्ही 80-20 हि ब्लॅक ची स्कीम नाही, 20 टक्के बुकिंग ला आणि 80 टक्के पजेशन ला अशी स्कीम आहे म्हटलंय.

In reply to by संजय क्षीरसागर

संदीप डांगे 26/11/2016 - 01:31
कसं आहे की फ्लॅट ची मूळ किंमत 54 सांगितली आहे, 'इतर' च्या नावाखाली अनेक खर्च दाखवून 'वरचे पैसे' व्हाइट मध्ये बिल्डर घेऊ शकतो ना? 54 लाख रजिस्ट्रेशन च्या फी कमी पडण्यासाठी असेल, नेमकं ब्रेकप उमेशच सांगू शकतील, ब्लॅक दिलं नाही हा माझा अंदाज, खरी माहिती तर धागाकर्ता देऊ शकतो.

In reply to by संदीप डांगे

संजय क्षीरसागर 26/11/2016 - 01:42
पण तिचा `कमी अ‍ॅग्रीमंट प्राइसशी' काहीएक संबंध नसतो. ती रेकनर प्राईसवर असते. त्यामुळे २१ लाख कोणत्याही हिशेबानं `व्हाइटचे इतर पैसे' होत नाहीत.

In reply to by संजय क्षीरसागर

सुबोध खरे 25/11/2016 - 20:13
साहेब मुलुंडचा पूर्व चा रेडी रेकनर रेट ११५००/ चौ फूट आहे आणि चालू रेट २५०००/- आहे म्हणजे ४६ % पांढरे आणि बाकी ५४ % काळे असेही चालू आहे. बाळकूम ठाणे येथे ७३०० ते ९००० असा रेडी रेकनरच्या रेट आहे.

अमर विश्वास 25/11/2016 - 15:37
उमेश वर बऱ्याच मि पा करांनी सुयोग्य प्रतिसाद आहेतच ... त्यात थोडीशी भर घराचे दर कमी होतील का ? काही प्रमाणात होतील. यायचे मुख्य कारण बँकांची कर्ज देण्याची क्षमता वाढेल व सर्व उद्योगांसाठी पतपुरवठा स्वस्त होईल (ही अपेक्षा आहे .. प्रत्यक्षात काय होईल ते कळलेच ) पण ३०% हे जास्त वाटतात .. ५ ते १०% पर्यंत किमती कमी होऊ शकतील बुक केलेल्या घराचे काय करावे ? यासाठी खालील प्रश्न (स्वतःलाच ) विचार .. उत्तर मिळेल १. हे घर तुमचे asset आहे का liability ? जर हे तुमचे दुसरे घर असेल तर asset पण जर तुम्ही या घरात राहणार असाल तर liability asset असेल तर विकण्याचा विचार करू शकता २. तुमची गुंतवणुक व ROI : सध्या तुमची गुंवणूक १४ लाखाची आहे. तसेच हे घर तुम्हाला ताब्यात मिळायला अजून ३ वर्षे लागतील . त्यामुळे गुणवणुकीचा परतावा ३ वर्ष नंतर मिळणार आहे ,,,, ३. बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्ड : बिल्डरचा ट्रॅक रेकॉर्डवर तुमची इन्व्हेस्टमेंट रिस्क अवलंबून आहे ४. आत्ता बुकिंग कॅन्सल केले तर होणारे नुकसान यामध्ये रेजिस्ट्रेशन फी , रोख दिलेला पैसा व बिल्डरचा सध्या रेट या तीन गोष्टी येतात ५ फ्लॅट विकला (रेजिस्ट्रेशन कॅन्सल केले ) तर माझ्या अंदाजाने तुम्हाला १४ लाखा पैकी १० लाख परत मिळतील .. हे १० लाख तुम्ही ८% नी गुंतवले तर पुढच्य तीन वर्षात २.४ लाख परत मिळवू शकाल तेंव्हा या सगळ्याचा विचार करा .. जर रिस्क खूप जास्त आले (पॉईंट ३) आणि नुकसान (पॉईंट ४ ) कमी असेल तर जरूर विका

पुतळाचैतन्याचा 25/11/2016 - 15:48
माझ्यामते कसलीच गडबड करू नका....घराच्या किमती कुठेही जावोत, ज्यांनी पूर्वी महाग गुंतवणूक करून घरे घेतली आहेत ते काही कमी किमतीला विकणार नाहीत. म्हणजे रिसेल काही स्वस्तात मिळणार नाही. शिवाय अशी परिस्थिती असणारे तुम्ही एकटे नाही. शेवटी बाजारात मास ट्रेंड निर्माण होईल त्या दिशेने तुम्ही जाल. अगदी ३०% किमती उतरल्या तरी ३ वर्षांनी पुन्हा निदान २५% वाढलेल्या असतीलच. म्हणजे तुमचे तसे नुकसान नाही. बाकी बिल्डर च्या क्रेडिबिलिटी आणि क्षमते वर अवलंबून आहे कि काम कधी पूर्ण होणार...नवीन रियल इस्टेट बिल नुसार तुम्हाला वेळेत ताबा द्यावाच लागेल...३ वर्षात कायदा नक्की सक्षम होईल...शिवाय पैसे अडकले आहेत...गरजवंताला अक्कल नसते हे पाहून कोणी फायदा घेणार नाही याची काळजी घ्या. माझा पण फ्लॅट अगदी पझेशन ला आला आहे पण भीती अजिबात वाटत नाही.अनेक शुभेच्छा.

बाजीप्रभू 25/11/2016 - 16:14
तुम्हाला डिमॉरलाईज करायची इच्छा नाहीये. पण हा हायलँडवाला बिल्डर एकदम टुकार आहे. पझेशनसाठी खूप रखडवतो. मी स्वतः बुकिंगसाठी यांच्याकडे गेलो होतो. बुक कारण्याआधी तिथल्या १-२ नातेवाईकांना(जे हायलँडच्या इतर प्रोजेक्ट मधे रहातात) त्यांच्याकडून रिपोर्ट्स मिळाल्यावर इरादा बदलला. २ वर्षापूर्वीची गोष्ट आहे हि. मग दगडापेक्षा विट मऊ असा विचारकरून पुराणिक बिल्डर्सकडे फ्लॅट बुक केला "होम टाऊन" मध्ये. पुराणिकचा अनुभव बरा आहे. कॅन्सल करता आला तर बघा.

सुबोध खरे 25/11/2016 - 18:15
प्रत्यक्ष अनुभव-- गेली दीड वर्षे मी माझे घर भाड्याने देऊन मोठे घर भाड्याने घेऊन राहत आहे. माझे मुलुंड पूर्व येथील १ १/२ बेडरूमचे घर भाड्याने देऊन( भाडे २२०००/-) दीड वर्षांपूर्वी मी ३ बेडरूमच्या घरात भाड्याने राहायला गेलो. दोन्ही मुले मोठी झाली आहेत तेंव्हा त्यांना वेगळी बेडरूम मिळावी या हेतूने. त्या घरासाठी तीन वर्षाचा भाडेकरार केला होता(भाडे ३३,०००/-). भाड्यात दर एक वर्षाने १० % वाढ. परंतु त्या घराचा मालक दुबई येथे राहत होता त्याची नोकरी गेली आणि तेथील व्हिसा नोकरी असेल तरच असतो म्हणून त्याने मला एक वर्षातच घर करण्यास सांगितले. आता मी तेथे जवळच दुसरे घर भाड्याने घेऊन राहत आहे. हिशेब साधा सरळ आहे. माझ्या मूळ घराचा पुनर्विकास होणार आहे त्याचे घोंगडे ५ वर्षे भिजत आहे. शेवटी मी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. माझ्या घराची किंमत १,४०,००,०००/-( एक कोटी चाळीस लाख) २५ हजार रुपये चौ. फुटाला ५६० चौ फूट कार्पेट. भाड्याने घेतलेले घर ८५० चौ. फूट त्याची किंमत होत होती २,१२,००,०००/- (दोन कोटी बारा लाख) यात ५% रजिस्ट्रेशन, मुद्रांक शुल्क चे धरले तर किंमत २ कोटी ३५ लाख होतात. मुलांचे वय २२ आणि १९. माझी गरज पाच वर्षाची आहे. यानंतर मुले कुठे असतील माहित नाही. म्हणून ५० व्हायला कर्ज घेण्यापेक्षा एक कोटी रुपयांचे ६ टक्क्याने सरळ व्याज ५०,०००/- होते. म्हणजे हे ११,०००/- अधिकचे देऊन मी शांतपणे ३ बेडरूंमच्या घराचा आनंद मिळवत आहे. किंवा व्याज इ. न गृहीत धरता. दर वर्षी सव्वा लाख रुपये जास्त टाकून मी आरामात राहत आहे. साधा हिशेब केला तर ५६० चौ फुटाचे माझे घर भाड्याने घेऊन राहिला तर २२,०००/० रुपये येतात आणि १ कोटी चाळीस लाखाचे ६ % व्याजच ७०,०००/- येते. तेंव्हा घर विकत घेणे हा तसा आतबट्ट्याचा व्यवहार आहे. परंतु स्वतःचे हक्काचे घर असणे हि एक फार मोठी मानसिक शांतता आहे. भाड्याच्या घरातून बाहेर काढले तर परत घर शोधणे आणि तिथे घर हलवणे हि कटकटीची गोष्ट आहे. नवीन घरे चकाचक रंगवलेली होती हा एक फायदा. जुने बरेचसे सामान टाकून देता आले. नवीन घरात काही नव्या (अनावश्यक) गोष्टी "हौस" या खातर घेतल्या गेल्या. अर्थात माझे घर आणि दोन्ही भाड्याची घरे हि एकमेकांपासून ३००-४०० मीटर एवढी जवळ आहेत त्यामुळे बाकी कशातच फरक पडला नाही. अगदी मोलकरणी सुद्धा नव्या घरात आल्या. (स्वैपाकीण कटकट करणारी होती तिला काढून टाकणे सोपे गेले. केवळ घर बदलले म्हणून तिने पगार वाढवून मागितला. झाडणे, पुसणे याचा पगार वाढवणे मान्य आहे पण स्वयंपाकाचा पगार वाढवणे अति झाले. एकंदर घराच्या भांड्यातून येणारे उत्पन्न याचा आणि घराच्या किमतीचा अजिबात ताळमेळ बसत नाही कधीही बसणार नाही. कारण मासिक हप्ता जर घराच्या भाड्याच्या निम्म्याच्या वर होणार असेल तर प्रत्येक माणूस स्वतःचे घर घेणे पसंत करतो. घर कितीही मोठे घ्या. काही वर्षांनी बायकांना ते कमी पडू लागते असा सर्वसामान्य अनुभव आहे. लिहिण्यासारखे बरेच आहे पण मूळ धाग्याशी संबंधित नाही म्हणून थांबतो.

नमकिन 25/11/2016 - 18:22
जमीन - आज घेतली व उद्या बांधायला इमारत घेतली असे होत नाहीं, तिथे फायदा होतंच रहातो प्रकल्प संपेस्तोवर. लोखंड - ४०% स्वस्त झालेय, (२-५ वर्ष पाहिलित तर अर्धी झाली किंमत आज. तर पुन्हा फायदाच. तांबे- इथे पण स्वस्ताई अवतरली आहे ३ वर्ष मागील भावात प्लास्टिक - अर्ध्याहुन अधिक उतरलेत भाव (पेट्रोलियम पदार्थ) गृह कर्ज- व्याजदर उतरतायत, चांगले चिन्ह. सातवा वेतन आयोग - उत्पन्न वाढले, म्हणून सरकारी कर्मचारी करिता खास योजना असतात विकासकातर्फे. पतपुरवठा- जोमाने होणार गृहनिर्मान मंत्री - स्वयं एक विकासक आहे विद्यमान सरकारी महाराष्ट्रात. संपूर्ण। CC एकदम मिळणार, मुंबई महापालिकेचा निर्णय. छळणारे राजकारणी- गजाआड होते बरेच दिवस (परमार प्रकरण) असे चहूबाजूंनी हे विकासक फायदा उपटत असताना देखील प्रकल्प लांबवून ग्राहकाला उशीरा ताबा देतात , म्हणजे यांची वृत्ती आहे ओरपण्याची त्याला मोफा पण तोकडा पडलाय. तर विकासक काही बुडत नाहीं, तेव्हा क्षणिक निर्णय न घेता सवरुन घ्या.

वरुण मोहिते 25/11/2016 - 21:01
बाकी खूप मोठा फरक पडणार नाहीये . पण तुमच्या बिल्डर चा नाव इतकं चांगल नाहीये. ठाण्यात कॉसमॉस ला पण माझा फ्लॅट आहे परमार प्रकरणानंतर थोडा वैताग झाला होता . पण त्यांची होल्डिंग कपॅसिटी होती त्यामुळे प्रॉब्लेम झाला नाही . राहत आताच मुलुंड चा घर @२.५ सी.आर . च्या आसपास आहे मुलुंड मध्ये . आता इतके पैसे नवीन लोक का टाकतील माझ्या बऱ्याच मित्रांमध्ये जे आय टी मध्ये आहेत त्यांचा मोठा घर भाड्याने घेऊन राहण्याचा कल आहे सध्या .

कपिलमुनी 26/11/2016 - 00:46
मुंबईचा हिशोब आणि पुण्याचा हिशोब यात फरक आहे. माझा 2bhk ४७ लाखाला मिळाला. त्याचा ३५,००० हप्ता जातो. आणि इथे १०००० -१२००० भाडे आहे .पण बुकिंग ते आजवर किंमत वाढली आहे. अजुन १० वर्षात माझा हप्ता कमी होउन भाडे वाढेल.

नगरीनिरंजन 26/11/2016 - 08:09
उत्तम चर्चा. गुंतवणूक म्हणून घर घेण्यातला मला मुद्दाच कळत नाही. आता हीच केस घ्या. ७४ लाखाचा फ्लॅट घेऊन त्यावर मजिना वीस हजार जरी भाडे धरले तरी वर्षाला फक्त ३.२४% परतावा मिळतो. तेवढे व्याज तर बँजेत नुसते ठेवले तरी मिळते व शिवाय लिक्विडिटी राहते. म्हणजे मग एकच मार्ग उरतो आणि ते म्हणजे प्रॉपर्टीच्या किंमती वाढणे. त्या नेहमीच वाढत राहतात असा लोकांचा समज दिसतो आणि तो भूतकाळावरुन तसा होणे स्वाभाविकच आहे. परंतु भविष्यकाळ भूतकाळासारखाच आएल ह्याची नक्की इतकी खात्री आहे का? मुळात घरांमध्ये गुंतवणूक केली पाहिजे ही जाणीव पूर्वीपेक्षा खूप वाढली आहे त्याचे प्रतिबिंब किंमतींमध्ये पडते. म्हणजे भविष्यातली कल्पित वाढती मागणी आधीच किंमतीत अंतर्भूत आहे असे वाटते. दुसरे म्हणजे १९९१ च्या आर्थिक उदारीकरणानंतर आऊटसोर्सिंग सुरु झाल्याने उत्पन्नात अचानक व कमालिचा फरक पडला व त्यामुळे घरांच्या किंमती झपाट्याने खूप वाढल्या. पुढेही ह्याच वेगाने उत्पन्न वाढत राहिल ह्याची शक्यता आहे काय? इंग्लंड-अमेरिकेत वाहणारे प्रोटेक्शनिझमचे वारे पाहता परदेशी पैशाचा प्रवाह वाढता राहिल असे वाटते का? गेल्या दोन वर्षात रोजगार निर्मिती खूप मंदावली आहे. आयटी वगैरे क्षेत्रातही अगदी सुगीचा काळ आहे असे नाही. नुसती लोकसंख्या भरमसाठ वाढली म्हणून घरांच्या किंमती वाढत राहतील?

कॅप्टन जॅक स्पॅरो 26/11/2016 - 08:20
Even if property prices are dropped by 30%, I don't think it will benefit large masses of people with budget restrictions. This will benefit upper class with white money who already has good amount of white money. This again will create purchases of property as investment trend. Gradually property prices will rise.