Skip to main content

हॉस्टेलः एक लढा!

लेखक संदीप डांगे यांनी बुधवार, 10/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
"सुंदर भाषण" ह्या स्पाबंधोंच्या टिप्पणीने आम्हाला जरा अकरा-बारा वर्ष मागे नेले... जेजेत असतांना होस्टेलवर राहायला होतो. तिथेही असेच एक 'सुंदर भाषण' केले होते. त्या भाषणाची कारणे व परिणाम सांगायचा हा प्रपंच, ग्वाड मानून घ्या. जरी मी अकोल्यासारख्या शहरातून मुंबईत आलो असलो तरी मुंबईच्यासमोर अकोला म्हणजे सुमो रेसलरसमोर नुकतंच रांगायला लागलेलं पोर! मुंबैचा एक दबाव येतोच इथे येणार्‍या बाहेरगावच्या मुलांना - अपवाद पुण्याची मुले. आम्ही अकोला अमरावतीतून बारा जण आलो होतो. एकाच वर्गात होतो. होस्टेल अजुन मिळायचे होते. दोन-दोन, एक-एक जण असा आपआपल्या आमदाराच्या आमदारनिवासाच्या खोलीत वास्तव्य करुन होता. सुमारे दिड महिना लागला होस्टेलचा प्रवेश मिळायला. जेजेचं होस्टेल म्हणजे देशोदेशीच्या (म्हणजे आपल्याच देशाच्या कानाकोपर्‍यातल्या) कल्लाकार मंडळींसोबत खाना-पिना-रहना-सोना-पढना-सबकुछ!! होस्टेलला प्रवेश मिळाला, चाळीस मुले प्रथम वर्षाला होती. जास्तीत जास्त महाराष्ट्रतलीच, एक दोघं पार दिल्ली-कश्मिर-बंगाल तर साउथमधलीही. ही चाळीस मुले चाळीसबायचाळीसच्या डायनिंगहॉलमधे पंधरा दिवस राहत होती. कारण रुम अलॉट होत नव्हत्या. 'सरकारी काम सहा महिने थांब' हे ब्रिदवाक्य पावलापावलावर ऐकायला मिळे. चाळीस मुले मिळून सहा टॉयलेट बाथरुम. सगळ्यांच्या कॉलेजची वेळ एकच! ते पंधरा दिवस, तेही पावसाळ्याचे पंधरा दिवस, तेही मुंबईतल्या पावसाळ्याचे पंधरा दिवस!! चौथ्या दिवशी भयंकर कुजलेल्या, कुबट वासाने तो हॉल भरुन गेला.. असे पुढचे दहा दिवस काढले. काय करणार? गावातून आलेली गरिब मुले नक्की काय करणार? मी तरी काय करणार? काहीच केले नाही, करु शकलो नाही, माहित नव्हते काय करायचे. एकच माहित होते. गप्प बसा आणि पुढे चला. आयुष्यभर हेच शिकवलेले व्यवस्थेने. मग यथावकाश रुम्स मिळाल्या, कॉट्स मिळाले. राहण्याची सोय उत्तम झाली. तीन मुलांना मिळून एक रुम, ती मात्र ऐसपैस. ज्याने कोणी डिझाईन केलंय त्याने कलाकारांच्या गरजा ओळखून सगळं फर्निचर उत्तम डिजाईन केलंय. योग्य उंचीचे पलंग, लाकडी खुर्ची आणि आटोपशीर टेबल. काही डोकेबाज इंटेरीयर डिझायनर विद्यार्थ्यांनी त्यांच्या रुम्स नीट प्लान करुन उपलब्ध जागेचा मस्त वापर केलेला. त्या सिनियर्सचे बघून मग आम्हीही तसेच फॉलो केले. समस्या खूप होत्या हॉस्टेलमधे. बेसिक सुविधांची बोंबाबोंब होती. म्हणजे प्यायला पाणी होते पण फिल्टर नव्हते. वरच्या टाक्यातून थेट ग्लासात घ्या आणि देवावर हवाला ठेऊन प्या! संडास-बाथरुम नीट धुतले जात नव्हते. आठ दिवसाने सफाई व्हायची. पाण्याचे पाईप फुटलेले, गंज गेलेले. आवार मोठे होते, खेळायची मैदाने आखलेली होती. पण वापर व निगा नसल्याने सगळी बकाल वस्ती होती, झाडे कशीही वाढलेली! नवनियुक्त माळी सकाळी आठला यायचा. अर्धातास टंगळमंगळ करुन साडेआठ नऊला झोपुन घ्यायचा ते थेट दुपारी दोन ला उठायचा, जेवायचा, इकडे तिकडे फिरायचा आणि परत दोन तास वॉचमन्शी गप्पा मारुन घरी जायचा. वॉचमन दोन होते. एक खुप जुना होता, वीस वर्षे जुना. एक चारपाच वर्षे जुना. जुना वॉचमन आपण त्याला वागळे म्हणूया. वागळे म्हणजे हॉस्टेलचा अनिभिषिक्त सम्राट. त्याचा आवाजच दरारा भरलेला होता. एकदम सनी देओल आणि अमरिश पुरी एकत्र! बिशाद कोणा पोराची त्याला वाकडं जायची. प्रस्थापित अगदी चपराशी असला तरी नवीन रंगरुट घाबरुनच राहतो. नाड्या प्रस्थापिताच्या हातात आहेत असं भासवलं की झालं. वागळे ह्यात तरबेज होता. हा वॉचमन पोरांना होटलमधून चहा, नाश्ता घेउन यायला लावायचा. बाकी माणूस पाहूनच वागायचा हेही खरे!! अशीच दोन वर्षे काढली. मी जरा जरा निर्ढावल्यासारखा झालो. तिसर्‍या वर्षी जरा शिंगं फुटायला लागली. त्या शिंगाचे प्रताप दिसत होतेच. कै नै. होस्टेलला कम्पुटर वापरायची, आणायची बंदी होती. लाईटबिलावर नियंत्रण होते म्हणून. सरकारी आदेश होता. मागच्या वर्षाच्या बिलापेक्षा ह्यावर्षीचं बिल वीस टक्क्यांनी कमी आलं पाहिजे. त्यामुळे ट्युब्स, फ्यान सोडले तर कुठलेही उपकरण वापरायची बंदी होती. काही लोक चोरुन हिटर वापरायचेच. मला गरम पाण्याची नव्हे तर क्म्प्युटरची गरज होती. कारण क्म्प्युटर काळाची गरज होती. पण हे सरकारी टेबलाला समजणे शक्य नसते. माझ्या एका मित्राचा अमरावतीला घरी कम्प्युटर होता. त्याला तो आणायला सांगितला. आणि कोणालाही न समजता तो भला थोरला डेस्कटोप-सीआरटी मोणिटर वाला कॉम्प थेट रुममधे आणला आणि खुबीने स्टडीटेबलच्या खाली दडवला. त्यावर रात्री आम्हा पाच-सहा जणांच्या कोरल-फोटोशॉपच्या प्रॅक्टीसेस चालत. (खरंच! पोर्न बघायला वेळ नव्हता, संगणक जेवढा वेळ मिळेल तेवढा शिकण्यात घालवणे जास्त महत्त्वाचे होते. आमच्यातली चार-पाच मुले ह्या जाचक नियमांमुळे हॉस्टेल सोडून गेली. आम्हाला शक्य नव्हते. एका कम्प्युटरवर तेही चोरुन फार दिवस चालणे शक्य नव्हते, तरी आम्ही तिसरे वर्षे कसेबसे काढले. आणि चौथ्या वर्षी आमची ब्याच सिनियर झाली. आणि मी होस्टेलचा लीडर!!! मी रेक्टरनियुक्त व सर्वसंमतीने लिडर झालो असलो तरी सर्वांचीच मनापासून तशी तयारी नव्हती. खासकरुन ज्युनियर्सची. ते काही वेगळे विषय. एकदा तर थर्ड यिअर आणि फोर्थ यिअरची चांगलीच हाणामारी ही झाली. कडक वितुष्ट आले. पुढे आम्ही प्रयत्न करुन चार संगणकांसाठी संचालनालयाकडून परवानगी मिळवली. ती मिळवता मिळवता किती हातापाया पडावे लागले, नाही नाही ते बाबु लोकांकडून ऐकून घ्यावे लागले. पण परवानगी मिळवलीच. लपवलेला संगणक सन्मानाने कंप्युटर रुममध्ये विराजमान झाला. तीन सिनियर्सचे आणि एक ज्युनिअरचा असे चार संगणक. लॅपटोप अजून बरेच महाग होते, दिड लाखाच्या रेंजमधे होते. चार संगणकांवर परत चाळीस मुले (दोन्ही-तीन्ही वर्षांची) अभ्यास करु लागली. साहजिकच वेळ कमी पडे. कारण लाईट्स रात्री दहाला बंद करावे असा आदेश वागळेमामा काटेकोर पाळत. रुम बंद करुन चावी त्यांच्याकडे असे. ही व्यवस्था चीड आणणारीच होती. पण कोणीही बोलत नव्हते. काहीही अर्थ नव्हता. मला काहीतरी करणे गरजेचे होते. ह्या सर्वाला ठिणगी पडली ते ज्युनियर मुलांना सबमिशन करायचे होते तेव्हा. अर्धवट कामे चालु असतांना अचानक वागळेने कम्प्युटररुमची विज खंडीत केली. भयंकर तमाशा झाला. मी पुढे होऊन मुलांसाठी वागळेशी भांडलो, त्याच्या अख्ख्या आयुष्यात त्याला कोणी ज्या भाषेत बोलले नसेल तसे बोललो. त्याला म्हटलं वॉचमन आहेस, औकात मधे राहा. इथे मुले तुला मामा, मामा करतात तर लै स्वत:ला हुकुमशाह समजू नकोस. पण तो ढिम्म. नियमावर बोट ठेवे. मी मुलांना म्हटलं, हा नियमावर बोट ठेवतो ना तर तुम्हीही उद्यापासून नियमावर बोट ठेवून कामे सुरु करा. झालं, दुसर्‍या दिवसापासून धूळ खात पडलेली तक्रारवही -जीच्यात रहिवासी विद्यार्थ्यांना येणार्‍या समस्यांबद्दल तक्रार करायची असते- ती बाहेर पडली. कुणालाच अशी काही वही असते ह्याची खबरबात नव्हती. मी मुलांना म्हटले, तुम्हाला इथे राहण्यासाठी कित्येक अटींचे पालन करावे लागते पण नियम कधीच वन-वे ट्रॅफिक नसतात हे लक्षात ठेवा. धडाधड रोज मुले निरनिराळ्या तक्रारी लिहून वहीची पानेच्या पाने भरायला लागली. रेक्टरला ह्या तक्रारींची कायदेशीररित्या जबाबदारी घेऊन निराकरण करावे लागे. सर्वात आधी सफाई कामगार सरळ आले. रोज सगळी सफाई व्हायला लागली. मी जातीने लक्ष द्यायला लागलो. अनेक वर्ष नीट घासले नाही तर एक चिकट काळपट थर टाइल्सला चढतो. वरवर पाणी टाकून पावडरने घासून तो जात नाही. सफाई कामगारांना त्यांच्या वेळेतच ते काम पूर्ण करायला लावून सगळी बाथरुम्स चमकवली. मग माळ्याची पाळी. एक दिवस सगळ्या मुलांनी श्रमदान करुन अख्खं होस्टेल स्वच्छ केलं, झाडे साफ केली, गवत काढलं, कुंड्यामधे माती भरुन रोपं नीट केली, सुशोभीकरण केलं आणि माळ्याला ताकिद दिली की आता ह्यातलं एक पान जरी वाकडं झालं तर तुझी खैर नाही. त्याने झोपणे सोडून दिले. असं करता करता एक दिवस खूप पाऊस झाला आणि काही ज्युनियर्सनी तक्रार केली की त्यांच्या खोल्यांमधे खूप पाणी साचले आहे, झोपायला जागा नाही म्हणुन इतरांच्या खोल्यांमधे जात आहेत. मी जरा पाहणी केली तर बर्‍याच ठिकाणी गळती होती, हॉस्टेलची शेवटची डागडुजी कधी केली होती देवजाणे! मी शेवटी एक मीटींग घेतली. साठ मुलांची. तोवर संगणक आणि वागळे प्रकरणामुळे माझ्याबद्दलचे गैरसमज दूर होऊन मी फक्त विद्यार्थ्यांच्या हिताचाच विचार करतो हे समजल्याने मुलांमधे चांगलीच एकजूट झाली होती. आणि तिथे मी 'एक सुंदर भाषण' केले. हॉस्टेलमधे भेडसावत असलेल्या समस्या आणि त्यावरचे उपाय यावर मी भाष्य केले. विद्यार्थ्यांनी एकजूटीने केले तर नक्की बदल घडेल असा विश्वास दिला. मी एक सात पानी अर्ज लिहला होता, त्यात हॉस्टेलच्या सर्व समस्यांचा उल्लेख व त्यावर शासनाने काय उपाययोजना करणे आवश्यक आहे ह्याबद्दलही लिहले. तसेच ह्या मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषणाची तयारी असल्याचे सूचित केले. ह्याच्या चार प्रती बनवून संचलनालय, शिक्षणमंत्री, मुख्यमंत्री व मिडिया कडे पाठवण्याची तयारी केली. साठ मुलांनी त्यावर सह्या केल्या. इतकं सोप्पं होतं? नाही ना! --------------------------------------------------------- क्रमशः
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 18305
प्रतिक्रिया 58

प्रतिक्रिया

छान,
खरंच! पोर्न बघायला वेळ नव्हता, संगणक जेवढा वेळ मिळेल तेवढा शिकण्यात घालवणे जास्त महत्त्वाचे होते.
कीत्ती तो निरागसपणा :)

In reply to by खटपट्या

तुम्ही हसालच हो ,) विंजीनियर आणि आर्टीस्ट लोकांच्यात कै फरक असंल का नै?

In reply to by खटपट्या

ओ, मीही गमतीतच दिला प्रतिसाद. पण परिस्थिती खरंच तशी होती. आम्हाला असाईनमेण्ट दर आठवड्याला, दर दिवसाला असतात, अनेक मुलांनी एकाच पिसीवर काम करणे आणि मनोरंजनासाठी वेळ काढणे शक्य नव्हते तेव्हा. सगळ्यांचे स्वत:चे संगणक आले ते हॉस्टेल सोडल्यावरच. त्यानंतरच काय ती मौजमजा. (लेखाचे गांभिर्य हरवु नये म्हणून थोडा खवचट प्रतिसाद दिला इतकेच, नथिंग सिरियस. हलके घ्या ही विनंती, काही चुकले असल्यास माफी असावी.)

In reply to by संदीप डांगे

मस्त रे, ह्यांना एक दिवस अनोटोमीला नायतर लाईफला तरी बसवाया पायजे. बाकी हॉस्टेल भारी. ते नमुने पाह्यलेत, राहलोय, आवडले होते हॉस्टेल.

In reply to by खटपट्या

=)))

वाचतोय.... सर्व चित्र डोळ्यासमोर उभे राहिले. अर्थातच आपली लेखनशैली जबरदस्त.... पुलेशु

जबरी सुरुवात. सालं हॉस्टेल लाईफ कधीही अनुभवलं नाही.

In reply to by प्रचेतस

सालं हॉस्टेल लाईफ कधीही अनुभवलं नाही.
मी तर असं ऐकलेलं की, तुम्ही व गुर्जी, हॉस्टेलवर असतानाचे रूम पार्टनर होते म्हणे .....

In reply to by अभ्या..

नाय ओ अभ्याभॊ, गुर्जी व प्रचेतस रूम पार्टनर होते, पांडू व गुर्जीमधे, बादली कॉमनमधी होती (तांब्या गुर्जीचांच होता निर्विवादपणे), अंघोळ करताना तो तांब्या, पाण्याने भरलेल्या बादलीत, गुर्जी बुचकळायचे तेव्हा, "पांडुब्बा" असा असा आवाज यायचा म्हणे....

In reply to by पगला गजोधर

अच्छा जव्हेरगंज ह्यांचे ते "बादलीयुद्ध" अन ते कोण ते पांडू अन आत्मुबुआ हे "बादलीबद्ध" होय! खूब भालो!

डांगेबुवांचे लिहिल्या बद्दल आभार अन स्पा भाऊंचे त्या खवट कॉमेंटसाठी आभार! =)) बाकी लवकर लवकर लिहाच हो बुवा! "बाहेरच्यांनी" घाण केली गटाला किमान "बाहेरचे" जगायला कसे झांबलतात ते तरी कळू देत(च)

डांगेंचे प्रतिसाद भारी, डांगेंची भांग भारी, डांगेंचं भाषण भारी च्यामारी डांगेच लै भारी (हलकं घ्या ओ)

आपल्याला आवडली ही उरकणे शैली. यालाच क्युबिझम म्हणत असावेत।उगाच ती वळणदार नक्षीदार बरुक शैली जाम डोक्यात जाते.तिनताडखालीपाड झिपझॅपझूम.ज्याना रंगवायचं,रेखाटायचं असेल त्यानी आपल्या संगणकावर टेबलाखाली ठेवून कॅडवर करावं.जय महाराष्ट्र.कलानगरच्या जवळ आहे म्हणून.

छान!

ह्या देशावरुन विश्वास उडालेली माणसं 'अधिक घाण' करायला नकोतच इथे. परिस्थिती आहे ती आहेच, पण विश्वास उडालेल्या माणसांकडून काही विधायक होण्याची शक्यता अजिबात नसते. मी जेव्हा जेव्हा समाजासमोर हरल्याचा विचार करतो, काहीच बदलू शकत नाही असे वाटायला लागते तेव्हा तेव्हा मला तीन माणसे नेहमीच लख्खकन आठवतात. पहिले शिवाजी महाराज, दुसरे बाबासाहेब आंबेडकर आणि तिसरे महात्मा फुले. ह्या तिघांनी ज्या परिस्थितीत व्यवस्था एकशे ऐंशी अंशात फिरवली ते बघता समाजासमोर, देशाच्या विदारक समस्यांसमोर हतबल होऊन विश्वास उडणे ह्या सारख्या भावना मनाला दुरुन देखील हुंगत नाहीत. त्या तिघांनी 'ह्या देशाचे काही होऊ शकत नाही' असा विचार केला असता तर...? (असे आणखी हजारो आहेत. मला नेहमी हे तिघे आठवतात इतकेच.) अधिक घाण बद्दल: अधिक घाण म्हणजे अशी विश्वास उडालेली माणसे जिथे तिथे करवादत अधिकाधिक अविश्वासाचं वातावरण निर्माण करुन तसा दॄष्टीकोन बनवण्यास, तशी जीवनशैली बनवण्यास हातभार लावत असतात. मानसिक खच्चिकरण झाले तर कितीही ताकद असो काहीच विधायक घडणे शक्य नसते. विश्वास नसेल तर फक्त ४८० सैनिक ९१ हजारांना शरणागती घेण्यास भाग पाडू शकत नाही, कोणी मांझी भलाथोरला पर्वत कापून रस्ता करु शकत नाही. चांगले काही घडतंच नाही, निव्वळ वाईटच घडते अशी मानसिकता पसरत जाणे देशाच्या समस्यांमधे अधिकची वाढ करणे हेही आहे. ज्याप्रमाणे असामाजिक घटक समस्या वाढवतात तर त्या समस्या वाढवायला लागणारे उचित वातावरण अशी हतबल झालेली, करवादणारी माणसे तयार करत असतात हे विसरु नये.
१++ मला पण ह्या अश्या रडक्या / व्हिक्टीम मेन्टॅलिटी लोकांचा लै राग यायचा, यायचा म्हणजे अजूनही येतोच. पण त्यांना शक्यतो टाळतो मी. हि अशी लोकं म्हणजे ब्लॅकहोल, कुठे गेली कि लगेच, त्या ठिकाणचा चांगुलपणा सकारात्मकता लगेच शोषून घेऊन तिथं मृत निर्वात पोकळी करतात, प्राण पी जाते है. ह्यांची उपस्थिती ही ह्यांच्या अनुपस्थितीने निदर्शनास येते (ऑक्सीमोरांन). अश्या लोकांपाई स्वतःचे रक्त आटवु नका.

जे तुम्ही होस्टेल मध्ये मॉबच्या संगतीने करून दाखवले, तेच आता तुम्ही रहात असाल, तिथल्या सरकारी अधिकार्‍यांना आणि नगरसेवकांना पण वठणीवर आणून, जनतेला मोकळा श्र्वास घ्यायला देणार, अशी आशा मी तरी ठेवायला हरकत नाही.

सगळ्यांना वठणीवर आणलात म्हणायचे, खूप छान

अनुभव कथन. पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

तुम्ही काय किंवा तिकडे ते जव्हेरगंज काय, तुम्हा लोकांचे लेख वाचुन हॉस्टेल नावाची काही तरी महा भारी गोष्ट मिस झालीये आयुष्यातली असं वाटायला लागलंय.. पहिला भाग वाचुन अगदी "जैसा फिल्मो में होता है.. हो रहा है हुबहु" वाटायला लागलंय, पण नक्कीच गाडी जमिनीवर येणारे असंही वाटतय! इतकं सगळं चांगलं चांगलं होऊच शकत नसतं! =))

__/\__ डांगे साहेब,परिस्थितीशी लढणाऱ्या तुमच्यातील वीराचा संघर्ष अनुभवण्यास उत्सुक, लवकर पुढील भाग येऊदेत.

बर्याच दिवसा नंतर छान वाचायला मिळाले. मी हाॅस्टेलवर नाही पण काॅट बेसिसवर पुण्याला २ वर्ष शिक्षणासाठी राहत होतो.

प्रस्थापित व्यवस्थेबद्दल लढा नेहेमीच रोमहर्षक होतो. पटापट टाका पुढचे भाग.

In reply to by अभिजीत अवलिया

संदर्भ पुरेसा स्पष्ट नसल्याने आपणास ते खटकने साहजिक आहे, आता कल्पना करा, तुमच्या सोसायटीचा वोचमन तुम्ही घरी कधी यावे, कधी जावे, काय खावे, कधी झोपावे, कुठे उभे राहावे, काय करावे, ह्याबद्दल हुकूमशाही गाजवायला लागला तर आपण नक्की कोणत्या भाषेत त्याच्याशी बोलणार? एखाद्याने आपल्या पदाचा गैरवापर करणे हे औकातच्या बाहेर आहे असे मी समजतो. तसेच हॉस्टेल मध्ये भाषा याहूनही फार घाणेरडी असते याची अनुभविना जाण असेलच!

ओ.के. मग ठीक आहे. हॉस्टेल मध्ये राहण्याचा एक वर्षांचा अनुभव आहे. त्या वेळच्या वॉर्डनच्या कृष्णकृत्यांवर एक चित्रपट होईल.