Skip to main content

एक होते कारतुस.......योद्धयाची गाथा !

लेखक कैलासवासी सोन्याबापु यांनी शुक्रवार, 05/08/2016 या दिवशी प्रकाशित केले.
"कारतुस" साहेबांची गाथा स्वतःच्या अपंगत्वावर मात करत आयुष्यात हुकुमी एक्के होणारी माणसे मला तुफान आवडतात, कारण त्यांच्यात ठासून भरलेले असते एक रसायन, त्याचे नाव म्हणजे "फायटिंग स्पिरिट", स्टीफन हॉकिंग ते ऑस्कर पिस्टोरीअस, ते अनाम असे भारतीय पॅराऑलिम्पिक खेळाडू, हे योद्धे चहूबाजूला दिसतात, पण आज आपण एका वेगळ्याच क्षेत्रात चमकलेल्या हिऱ्याची गाथा पाहणार आहोत, क्षेत्रही साधेसुधे नाही, तर भयानक जास्त शारीरिक कष्ट ही गरज असलेले, म्हणजेच आपले थलसैन्य उर्फ इंडियन आर्मी. समजा जर तुम्हाला म्हणले की एक पाय नसलेला माणूस आर्मी मध्ये होता अन मोठ्या हुद्यावर होता तर आपली प्रतिक्रिया काय असेल? साहजिक रित्या प्रथम विचार हाच येईल की हा अधिकारी फायटिंग फोर्स किंवा स्ट्राईक कोरला नसून आर्मी सर्विस कोर किंवा ईएमइ (इंजिनीरिंग कोर) ला असेल, पण नाही आपला कथा नायक नुसता फायटिंग कोर मध्ये अधिकारीच नव्हता, तर चक्क पायदळ उर्फ इनफंट्रीच्या एका ब्रिगेडचा कमांडर होता, अस्सल मराठमोळ्या अन कमालीचे फायटिंग स्पिरिट असलेल्या ह्या मुंबईकर अधिकाऱ्याचे नाव म्हणजे मेजर जनरल (RETD) इयान कॉर्डोझ,AVSM,SM. आजपासून 45 वर्षे अगोदर, तेव्हा एक तरुण धडधाकट मेजर असलेले कॉर्डोझ साहेब, वेलिंग्टन तामिळनाडू मध्ये डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजला पोस्टेड होते, त्याचवेळी त्यांची प्यारी 4/5 गोरखा बटालियन बांगलादेश युद्ध लढत होती, बटालियनचा 2IC (सेकंड इन कमांड) हुतात्मा झाला होता, अन एक दिवस तरण्याबांड इयानला बटालियन ने साद घातली, गडबडीत दिल्लीला जाताना त्यांना आपल्या परिवाराला (पत्नी अन तीन मुलगे) घरी सोडायची खास परवानगी मिळाली होती, ह्यातला एक मुलगा पुढे आर्मी मधेच कमीशंड झाला होता अन त्याच्या लग्नाच्या अगोदर तो कारगिल/सियाचीन मध्ये आहे हे सांगताना इयान सरांचे डोळे खासे लकाकत असत. तर, 3 डिसेंबर 1971ला इयान सर दिल्लीला पोचताच त्यांना पूर्वोत्तर आघाडीला कूच करायचे आदेश मिळाले, पण नेमका तेव्हा दिल्लीत ब्लॅकआऊट होता, कुठलेही विमान उडू शकत नव्हते, उडलेच असते तर ते सहज आसामच्या बाजूला टार्गेट झाले असते. धावत पळत इयान सर रेल्वे स्टेशनला पोचले अन अक्षरशः चेनपुलिंग करून कसेबसे रेल्वेत चढले, वाटेत त्यांना त्यांच्यासमोरील चॅलेंजची कल्पना तेव्हा आली जेव्हा त्यांनी फ्रंटहुन परतणारी हॉस्पिटल ट्रेन पाहिली. पहाटे 3ला इयान सरांनी आपल्या बटालियनसोबत लिंकअप केले, एकदाचे मेजर साहेब आपल्या लाडक्या जॉनी (गोरखा) लोकांत पोचले होते, तेव्हाच त्यांना सांगितले गेले की त्यांना दुपारी 1430ला ऑपेशनवर जायचे आहे, भारतीय सैन्य आपल्या इतिहासात प्रथमच एक हेलीबॉर्न ऑपेशन करणार होती, सहसा असे ऑपेशन करायला ऐरफोर्स अन आर्मीची अधिकारी मंडळी तासंतास वेळ घालवून छोट्यात छोटे डिटेल्स ठरवत असतात पण ही वेळ निकडीची होती, टास्क कठीण होता, एका बटालियन ने दुसऱ्या बटालियनला काबीज करायचे होते, हीच ती सुप्रसिद्ध अतग्रामची लढाई होय, रात्रभर माजलेल्या रणकंदना नंतर अतग्राम आपल्या बहाद्दर जॉनीज ने काबीज केले, अन सकाळी परत बेसला येताच त्यांना नवी ऑर्डर मिळाली, गाझीपुरला जायची, बटालियनच्या सीओ ने त्याचा मुद्दा मांडला की त्याचे जवान थकलेले आहेत, पण त्यांना कळले की तिथे आधी 2 बटालियन फेल गेल्यात अन आता 4/5 गोरखालाच ते काम फत्ते करावे लागणार आहे, कारण प्लॅन चेंज झाला होता, आता भारताने थेट ढाका पर्यंत मुसंडी मारायचा चंग बांधला होता. गाझीपुरकडे टेहळणी उर्फ रेकी करायला गेलेल्या हेलिकॉप्टरला विशेष विरोध झाला नाही अन मुक्तीबाहिनीनुसार तिकडे फक्त 300-400 रझाकार मात्र होते. अश्यातच जेव्हा आपल्या जवानांची मोव्हमेंट सुरु झाली तेव्हा मात्र पलीकडून आगीचा भडीमार सुरु झाला , नंतर कळले की पाकिस्तानी आर्मी ने मुक्तीबाहिनीला फसवले होते, तिथे रझाकार सोडा, बटालियन सोडा, पाक आर्मीची अख्खी ब्रिगेड होती, आता लढा विषम होता, 480 लोकांची आधीच थकलेली गोरखा बटालियन विरुद्ध आराम खाऊन तयार असलेली पाकिस्तानी ब्रिगेड,पण पाकिस्तानी ब्रिगेडला तरी कुठे कल्पना होती की भारतीय हेलिकॉप्टर्स मधून अर्धीमुर्धी 480 लोकांची गोरखा बटालियन उतरली आहे रेजिमेंट नाही ;). त्याकाळी बीबीसी कडे खूप कार्यक्षम असे युद्ध वार्ताहर असत अन आकाशवाणी सोबत ते सुद्धा युद्ध कव्हर करत असत, साहजिक पाकिस्तानी जनरल्स आकाशवाणीवर तर विश्वास ठेवणार नव्हते, त्यामुळे पाकिस्तानकडे काय मानसिकता असेल हे लक्षात घ्यायला आपले लोक सुद्धा लक्ष देऊन बीबीसी ऐकत असत. अश्यातच बीबीसी न बातमी दिली की गाझीपुरकडे एक पूर्ण गोरखा रेजिमेंट उतरली आहे :D . इकडे हेलिकॉप्टर मधून उतरलेले कॉर्डोझ साहेब बघूनच त्यांची भोळी गोरखा पोरे जल्लोष करू लागली होती, प्रत्येकाच्या मुखी एकच वाक्य, "कारतुस साहिब आ गये है, अब हमको कोई डर नही है" :) आता 5व्या गोरखा समोर एक बिलंदर प्लॅन होता, तो म्हणजे आपली अर्धी बटालियन एक ब्रिगेड म्हणून प्रेसेंट करणे, पहिल्याच दिवशी आपल्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करून एक किमी बाय दीड किमीचा एक पट्टा हस्तगत केला होता, आता त्याच पट्ट्यात 480 लोक अश्या खुबीने पसरले गेले की ती पूर्ण फळी एका ब्रिगेडची वाटावी, त्याच दिवशी रात्री एक पाकिस्तानी पॅट्रोल पार्टी ambush करून गोरखा जवानांनी त्यांना अक्षरशः नुसत्या खुकुरीनेच सद्गती नजर केली. पण ह्याच्यामुळे एक नुकसान झाले,ते म्हणजे पाकिस्तानी बाजू इरेला पेटली, अन काय होईल ते पाहू म्हणून त्यांनी आपली एक पुरी नफरी बटालियन (जवळपास 750 माणसे) थेट आपल्या विरळ फळीच्या मधोमध घुसवली, त्याकाळी सेक्रेसी maintain करायला भारतीय आर्मी रेडिओवरील संभाषण अस्खलित तामिळ भाषेत करत असे, तेव्हा 5व्या गोरखाच्या सीओ ने आपली उरलेली माणसे (480) एकत्र गोळा केली अन काय होईल ते होवो म्हणून थेट पाकिस्तानी फॉर्मशनच्या उरावर घातली, एकच हलकल्लोळ उडाला अन नंतर शांतता प्रास्थापित झाली, दोन दिवस अशीच लठ्ठालठ्ठी चालली, अन 15 डिसेंबरला फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ ह्यांनी पाकिस्तानला निर्वाणीचा इशारा दिला, "शरण या नाहीतर धुळीत मिळवू" त्याच्या दुसऱ्या दिवशी जवळपास 1500 पाकिस्तानी जवान शरणागती पत्कारायला 5व्या गोरखाकडे आले. आता गोरखाचा सीओ पेचात पडला, शरणागती घ्यावी अन ह्यांना कळले की आपण फक्त अर्धी बटालियन आहोत तर बिलामत यायची, म्हणून त्याने शरणागती पत्कारायला साफ नकार दिला अन सांगितले की आम्हाला शरणागती घ्यायच्या ऑर्डर्स नाहीत, पण पाकिस्तानी आर्मीचं मानसिक खच्चीकरण इतके झाले होते की ते शरणागती घेण्यावर अडून होते, शेवटी 5 गोरखाच्या सीओ त्यांना "उद्या या सोय करून ठेवतो" म्हणून बोळवण केली त्यांची, इकडे रेडिओ वर खबर गेली (अर्थातच तामिळ मध्ये) की लगेच एक ब्रिगेड कमांडर पाठवा शरणागती घ्यायला, दुसऱ्या दिवशी 5व्या गोरखाकडे एक ब्रिगेड कमांडर लगेच धाडण्यात आले, त्यांना अन 5व्या च्या सीओला वाटत होते की 1500 च्या आसपास जवान असतील, पण त्यांच्या विस्मयला पुरून उरतील अश्या 2 पाकिस्तानी ब्रिगेड म्हणजेच तीन ब्रिगेडियर, एक कर्नल, 107 अधिकारी, 219 जेसीओ, and 7,000 जवान, अशी सणसणीत शरणागती आली होती. अन हे सगळे करणारे 480 जवान अर्धपोटी, खायला प्रत्येकी 2 मुठी शंकरपाळी, पायाला धड बूट नाहीत, झोपायला फक्त एक ताडपत्रीची बरसाती, इतका ऐवज असणारी होती. ह्या शरणगातीच्या वेळचा एक किस्सा खूप जबरी आहे, शरणागती घेऊन 7000 जवान अन अधिकाऱ्यांची सोय लावल्यावर इयान सरांनी एका पाकिस्तानी जेसीओला पाचारण केले, त्यांनी त्याला विचारले "साहेब, आपके स्टोअर्स मे कंबल है क्या? अगर है तो हमारे जवानों मे बटवा देना, मै आपको रसीद दे दूंगा" "सर आप बिना कंबल के आ गये?" "जनाब हम सोने नही आपको बरबाद करने आये थे" हे तो पाकिस्तानी जेसीओ पचवत असतानाच सर पुढे म्हणाले "अगर कंबल बच जाते है तो हमारे अफसरो को भी दे देना" "अफसर लोग भी बिना कंबल के?" "अब अगर जवानों के पास कंबल नही है तो अफसरो के पास कैसे हो सकते है जनाब?" हैराण झालेला तो पाकी जेसीओ इयान सरांना कडक सॅल्यूट करून म्हणाला "आपके जैसे कुछ अफसर हमारे होते तो ये दिन ना देखना पडता हमे" शरणागती पुढे सुरु होती तेव्हा बीएसएफच्या एका कमांडरचा शरणागतीत मदत करायला म्हणून मॅसेज आला, त्याला उत्तर द्यायला निघाले असता ती वेळ आली अन अनावधानाने इयानसरांनी एका भूसुरुंगावर पाय दिला, त्या स्फोटात त्यांचा पाय दुरुस्ती पलीकडे जायबंदी झाला, त्यांच्या सोबत असलेल्या मुक्तीबाहिनीच्या कार्यकर्त्याने त्यांना लगबगीने परत बटालियन हेडक्वार्टरला परत आणले, तिथे डॉक्टर ने त्यांना मॉर्फिन नसल्याची माहिती दिली तसे त्यांनी एका गोरखा जवानाला आपला पोटरीपासून खालचा पाय कापून टाकायला सांगितले, भोळ्या अन प्रेमळ अश्या त्या गोरखा जवानाने साहजिकच त्याला नकार दिला, तेव्हा त्यांनी स्वतःच स्वतःच्या खुकुरीने तो पाय छाटून टाकला अन तो मोडका पाय दूर कुठेतरी नेऊन पुरायला सांगितला. त्यांना पहायला आलेल्या बटालियनच्या सीओ ने त्यांना शरणागतीत आलेल्या मंडळीत एक पाकिस्तानी सर्जन असून त्याच्याकडून इलाज करवून घ्यायला सुचवले असता इयान सरांनी त्यास खासा नकार दिलाच. शेवटी सीओला त्यांनी 2 विनंत्या केल्या 1 काहीही झाले तरी मला पाकिस्तानी रक्त द्यायचे नाही 2 ऑपेशन होताना खुद्द सीओ तिथे हजर असावेत (टॉर्चरची शक्यता टाळायला) हे सगळे मान्य झाले अन शेवटी पाकिस्तानी सर्जन मेजर मोहम्मद बशीर ह्यांनी मेजर साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया केली, ह्या सर्जरी नंतर आपल्याला मेजर बशीर ह्यांना थँक्स म्हणायचा चान्सच मिळाला नाही ह्याची सल मात्र इयान सरांना जाणवत असे. पाय गमवल्यावर आता इयान सर अजून एका युद्धाकरता सज्ज झाले, ते युद्ध होते व्यवस्थे विरुद्ध, एक पाय नसलेला अधिकारी "पायदळात" कसा चालणार? त्यामुळे साहिजकच मेजर इयान कॉर्डोझ ह्यांना वॉर्ड ऑफ करायचे जवळपास नक्की झाले होते, पण शिपाईगिरी सोडून इतरकाही स्वप्नातही न पाहिलेल्या मेजर साहेबांना ते कसे रुचावे? त्यांनी पूर्ण रीहॅब घेऊनही परत वार्षिक तंदुरुस्ती चाचणीला हजेरी लावलीच, चाचणी घेणार अधिकारी त्यांना नकार देऊन म्हणाला की जर तुम्ही जबरदस्ती टेस्ट दिलीत तर मी एमपीज ना बोलवून तुम्हाला अटक करेल सर, तेव्हा मेजर साहेब उत्तरले "अटक गुन्हा केल्यावरच करणार ना?" त्या टेस्ट मध्ये कृत्रिम पाय लावलेले मेजर इयान कॉर्डोझ नुसते पासच झाले नाहीत तर धडधाकट अश्या 7 इतर अधिकाऱ्यांना पछाडून आले, पुढे आर्मी हेडक्वार्टरचे खेटे घालणे सुरु झाले, ह्यांची मागणी एकच, मला माझ्या बटालियनची कमांड द्या,शेवटी प्रकरण पोचले व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ समोर, ते म्हणाले "कॉर्डोझ मी जरा कामाने जम्मूला जातोय, चला माझ्या सोबत" जम्मूला व्हाईसचीफ ज्या हेलिपॅडवरून परतणार होते तिथवर इयानसर डोंगर तुडवून अगदी वेळेत पोचले!, परत वरात दिल्लीला आली, आता थेट चीफ ऑफ आर्मी स्टाफ टी एन रैना साहेबांसमोर, त्यांनीही म्हणले "कॉर्डोझ जरा कामाने लद्दाखला जातोय, चला माझ्या सोबत" मग काय? परत एकदा लद्दाख मध्ये मजेत धावणे चालणे चढणे झाले, ह्यावेळी मात्र परत आल्याबरोबर चीफ ऑफ आर्मी स्टाफ ने थेट एक आदेश काढला, "मेजर कॉर्डोझ अन त्यांच्या सारखे आपल्या जखमांच्यामागे न लपणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांना सन्मानाने काम अन कमांड द्या" पुढे चालून चक्क 2 पाय गमावलेले लेफ्टनंट जनरल ओबेरॉय व्हाईस चीफ ऑफ आर्मी स्टाफ पर्यंत पोचले होते, पुढे ब्रिगेड कमांडर पद भूषवून मेजर जनरल इयान कॉर्डोझ सन्मानाने रिटायर झाले , सध्या बहुदा इयान सर अन मिसेस प्रिसिला इयान हे दिल्लीत स्थाईक असून सध्या त्यांची तीनही मुले आर्मी मध्ये आहेत, निवृत्त जीवनात मे. ज. (री) इयान कॉर्डोझ, एव्हीएसएम, एसएम सध्या दिल्लीतच एका युद्धात जखमी झालेल्या फौजी लोकांसाठी काम करणाऱ्या "वॉर वुनडेड फौंडेशन ऑफ इंडिया" नामक गैर सरकारी संस्थेचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. मेजर जनरल इयान "कारतुस" कॉर्डोझ, ह्यांच्या काही छबी . . (पत्नी प्रिसिला ह्यांच्या सह) . (तरुण मेजर इयान कॉर्डोझ) .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 27204
प्रतिक्रिया 101

प्रतिक्रिया

खरेच असे लोक आहेत म्हणून आम्ही या देशात सुखाने राहत आहोत आणि फालतू गोष्टींवर वेळ , ऊर्जा, पैसा घालवत आहोत

In reply to by सामान्य वाचक

अशीच एक कहाणी अलेक्सेई मेरेस्येव या रशियन योद्ध्याची होती. तो दोन्ही पाय अँप्यूट केल्यानम्तरही फायटर विमान चालवत असे. याच्या वर "एका अस्सल माणसाची गोष्ट" नावाचे पुस्तक आहे

In reply to by लालगरूड

उलट जास्तच वाटते... खरे तर व्यर्थ न हो बलीदान, असे वाटायला पाहिजे पण....... घूसखोर बांगलादेशीय आणि त्यांना पाठीमागे घालणारे राजकीय नेते बघीतले की वाटते, हा देश अजून किती दिवस हा त्रास सहन करणार?

In reply to by मुक्त विहारि

एक चळवळ उभारावी. बारीक सुरुवात असली तरी हरकत नाही. मी भ्रष्टाचार करणार नाही, लाच घेणार नाही एवढं बास आहे 'प्रत्येकानं' ठरवलं तर.

In reply to by मुक्त विहारि

ज्या दिवशी आपण नेत्यांवर खापर फोडणे बंद करु तो सुदिन, नेते किंवा सैनिक तरी, कोणामधून येतात?

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पुरवणी : नेते ज्यांच्यातून येतात त्यातले ९९% पेक्षा जास्त लोक मिपावर नाहीत. ते ६०-७०% फेसबुक(उदा.) वर सुद्धा नसतील. ग्राउंड रिऍलिटी बघायला हवी

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ह्या पेक्षा पण "ज्या दिवशी नेते सामान्य जनतेला विश्र्वासात घेवून, सामान्य जनतेसाठी, भ्रष्टाचार न करता, कामे करतील तो सुदिन." असे आमचे मत. सैन्याधिकारी आधी सैनिकांची सोय बघतो आणि मग स्वतःची. तर, आमचे सायकलवरून मते मागत फिरणारे नगरसेवक नेते, आमदार झाले की स्कॉर्पिओ घेवून फिरायला लागतात.सामान्य जनता तशीच रस्त्यावर. सैनिक नक्कीच सामान्य माणसां मधूनच येतात पण आजकालचे नेते घराणेशाहीतूनच येतात (एखाद दुसरा अपवाद असेलही) मग ते आदित्य ठाकरे असोत किंवा ज्योतीरादित्य माधवराव शिंदे, राहूल गांधी असोत किंवा जय जयललिता. डाय हार्ड फोर मधील जॉन मॅक्लेनचे एक अतिशय सुंदर वाक्य आहे... "माझे हे जबाबदारीचे काम करायला, दुसरे कुणी तयार असते, तर हे काम मी केले नसते." त्यावर तो मुलगा जे वाक्य म्हणतो तेच तुम्हा सैनिकांबाबतीत म्हणावेसे वाटत होते, आहे आणि असेल. म्हणूनच तर तुम्ही लोक नायक आहात. जावू द्या हो बापू.

In reply to by मुक्त विहारि

John McClane: You know what you get for being a hero? Nothin'. You get shot at. You get a little pat on the back, blah, blah, blah, attaboy. You get divorced. Your wife can't remember your last name. Your kids don't want to talk to you. You get to eat a lot of meals by yourself. Trust me, kid, nobody wants to be that guy. Matt Farrell: Then why you doing this? John McClane: Because there's no body else to do it right now, that's why. Believe me, if there were somebody else to do it, I'd let them do it, but there's not. So we're doing it. Matt Farrell: Ah. That's what makes you that guy.

In reply to by मुक्त विहारि

हा इकडे तर खूप आहे.आणि ह्यांना कागदपत्राशिवाय आधारकार्ड दिले आहे 500 रूपयांमध्ये.

आपल्या सैन्याचे शौर्य आणि मुत्सद्दीपणा पाहून प्रचंड अभिमान वाटला. काय परिस्थितीत तिथे ते लढले हे वाचून तर खरंच डोळे ओलावले. कारतुससाहेबांच्या जिद्दीला तर सलामच.

वाचनखूण! नेहेमीप्रमाणेच जबरदस्त!

_/\_

अवांतर: तरुणपणीच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोत इयान सर, जेम्स बॉण्ड सुद्धा फिका पडेल एवढे डॅशिंग दिसत आहेत त्या दाढी मुळे :)

सलाम !!! त्रिवार सलाम.

ह्ये जिगर, हीच जिगर भई, हेच फायटिंग स्पिरिट. फिदा. बापू भावा कशे आभार मानू रे?

In reply to by अभ्या..

माझे कश्याला आभार भावा! मी तो लेखक फक्त, ह्यापुढे कधीही "कसे करावे?" क्षण आला की जनरल साहेब आठव म्हणजे माझे लेखन सायास भरून पावले म्हणेल मी :)

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

होय बापू. युद्धस्य कथा रम्य:म्हणतात खरे पण त्या अनाम वीरांनी प्राणाची कुरवंडी देशासाठी करायची तयारी दाखवली त्यांना प्रकाशात तू आणतोस. करायलाच पाहिजे सॅल्यूट तुलाही आणि कारतूससाबना पण.

In reply to by अभ्या..

आणि मुख्य म्हणजे रियल हॅण्डसम काय असतो ते दिसला फोटोत. वाढलेली दाढी, मळलेले जॅकेट, कानटोपी पण रौनक काये चेहऱ्यावर. आपल्या कर्तव्यावर प्रेम करणारा माणूस हॅण्डसमच दिसतो ऑल्वेज.

In reply to by अभ्या..

अभ्या भौ के साथ सहमत और बापु साहब आपका अंदाज-ए-बयाँ भि तो खास अहमियत रखता है.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

ह्यापुढे कधीही "कसे करावे?" क्षण आला की जनरल साहेब आठव
ह्या वाक्यासाठी सलाम तुम्हाला बाप्पू. आणि हे तुम्ही लिहु शकलात म्हणुन उयान साहेबांना शेकडो सलाम.

मेजर जनरल इयान साहेबांच्या बद्दल ह्या आधी वाचलं होतं पण तुमच्या शब्दात वाचण्याची मजा काही औरच.. सुंदर लेख

एका बहादूर जिगरबाज अधिकार्याची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद !!

जबरदस्त आणि तितकेच रोमांचकारी ! आमचा कडल सलाम दोघांनाही.... मुर्दाड सिव्हीलीयन आणि घोरआळश्या नाखु

+१ तेच म्हणतो. सलाम _/\_ त्या विराला आणि बापु तुम्हाला. आणि अजुन असे कीती तरी मेजर इयान कॉर्डोझ असतील आर्मी मध्ये ज्यांची जगाला ओळख नाहीये.

In reply to by प्रमोद देर्देकर

कोणती बरं मोड? **** मोड ऑन काय उपकार केले का? त्यांना आमच्या कराच्या पैशातून पोसले जाते ना? मग? काय काडतूस काडतूस लावलाय? पाय मोडल्यावरही आर्मीने पोसले ना? **** मोड ऑफ

सॅल्यूट!! देशात सगळ्यांना किमान एक वर्ष मिलिटरी सर्विस कम्पलसरी करायला हवी असं पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं.

काय जबरदस्त माणुस आहे हा? रियल लाईफ हिरो. कधी चान्स मिळाला तर भेटले पाहिजे यांना. बापु तुम्हाला मनःपूर्वक धन्यवाद पैजारबुवा,

आवडली... पण..... एखादा सैनिक किंवा एखादा पोलीस देशाचे रक्षण करतो, तर त्याच देशाचा एखादा राजकीय नेता, त्यांच्या कर्तव्य बुद्धीचा अपमान करतो. असो, तुमच्या आशावादी लेखाला, आमच्या हल्लीच्या निराशाजनक वस्तुस्थितीचे गालबोट लागायला नको.

च्यायला काय डेंजर माणूस आहे. अश्या भन्न्नाट माणसाला काही आम्ही कदाचित भेटु शकणार नाही. पण पुढच्या भेटीत आमच्यातर्फे एक साष्टांग नमस्कार घाला त्यांना.

_/\_

बापू... जब्बरदस्त ओळख करून दिलीत.. __/\__ आता इथेच थांबू नका. आणखी असे अनेक हिरे आहेत, त्यांना तुमच्या लेखणीतून झळाळी मिळवून द्या.

खरोखर इंस्पायरिंग कथा.

त्यांच्या अतुल शौ-याला सलाम !!

सॅल्युट

__/\__ ह्यापुढे जेव्हा केव्हा अशी परिस्थिती येईल कारतुस साहेबांना डोळ्यासमोर नक्की आणेन आणि संकटांना सामोरी जाईन

In reply to by प्रीत-मोहर

यापुढे जेव्हा केव्हा अशी परिस्थिती येईल
@प्रीत-मोहर - आपणही सैन्यद्लात आहात का ?

In reply to by पगला गजोधर

सैन्याचं बरं असतंय, शत्रू माहिती असतो. सामान्य माणसाला नक्की कुणाशी लढायचंय तेच ठाऊक नसतं. बाकी सगळे संदर्भ सैन्यात काम करणारांशीच लागू पडतात का पगला भो?

In reply to by पगला गजोधर

सैन्याचं बरं असतंय, शत्रू माहिती असतो. सामान्य माणसाला नक्की कुणाशी लढायचंय तेच ठाऊक नसतं. बाकी सगळे संदर्भ सैन्यात काम करणारांशीच लागू पडतात का पगला भो?

In reply to by उडन खटोला

अहो सर, असंच जरा टवाळकी करत होतो हो. शिरेस नका होऊ
सैन्याचं बरं असतंय, शत्रू माहिती असतो. सामान्य माणसाला नक्की कुणाशी लढायचंय तेच ठाऊक नसतं.
बरोबर आहे.

In reply to by पगला गजोधर

नाही हो. मी सामान्य मुलगी. इतकी नसली तरी कधी काळी काय करु अशी परिस्थिती येतेच की समोर. आणि मी हसत पाय गाळते. सध्या वेळेस यापुढे कारतुस साहेब येतील डोळ्यासमोर यापुढे अस म्हणायचय

In reply to by पगला गजोधर

नाही हो. मी सामान्य मुलगी. इतकी नसली तरी कधी काळी काय करु अशी परिस्थिती येतेच की समोर. आणि मी हसत पाय गाळते. सध्या वेळेस यापुढे कारतुस साहेब येतील डोळ्यासमोर यापुढे अस म्हणायचय

__/\__

काय ग्रेट, अफाट माणूस आहे, धन्य __/\__ फोटोतूनच व्यक्तिमत्व कळून येतेय. simple yet stern, strict yet sweet.

सोन्याबापू, खऱ्या जवानाची ओळख खऱ्या जवानाकडून होणे हा दुग्धशर्करायोग आहे. बाकी, कारतूस साहेबांबद्दल मी बापडा काय बोलणार. सिर्फ नाम ही काफी है. त्यांनी जसा स्वत:चा पाय स्वत:च कापून काढला त्यावरून आपण स्वत:चे दुर्गुण स्वत:च कापून काढायची प्रेरणा घ्यायला हवी. आ.न., -गा.पै.

सलाम.

कारतुस साहेबांना माझ्याकडून एक कडक सॅल्यूट!! त्यांच्यासारखे अनेक वीर आज सैन्यात होते, आहेत म्हणून देशातल्या सामान्य जनतेला सुरक्षित वातवरणात जगता येतंय. 'जब देश मे थी दिवाली, वो खेल रहें थे होली' हे ऐकतांना काळजात चर्र होतं. माझ्या, माझ्या कुटुंबाच्या, माझ्या देशाच्या सुरक्षिततेकरता स्वतःचे कुटुंब वार्‍यावर सोडून प्राणाचे बलिदान देणार्‍या सैन्याचा माझ्याकडून कधीही अपमान न होवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!

भारतिय सैन्यातिल एका बहादूर जिगरबाज अधिकार्‍याला कडक सॅल्युट ! आणि त्यांची ओळख करुन दिल्याबद्दल सोन्याबापूसाहेबांना धन्यवाद !

एक कडक सलाम, एक चित्तथरारक चित्रपट निघेल अशी कथा आहे.

In reply to by खटपट्या

मस्त लेख बापू अती आळशी, मी-सौरभ

ह्ये बापू कधी भेटलं कि किती पार्ट्या उकलणार आहे देव जाणे , प्रत्येक लेखा साठी एक =]]

इन्स्पायरिंग लेख! स्वाती

बापू, तुमचे लेख वाचून स्फुरण चढतं! जबरदस्त व्यक्तीची ओळख करून दिलीत, धन्यवाद! तो तरुणपणातला फोटो कसला क्लासिक आहे!

In reply to by स्वीट टॉकर

स्वीट टॉकर, तारुण्यातली तर बातंच नको. वार्धक्यातही बघा, इयन महाशय कसले देखणे दिसताहेत ते ! :-) आ.न., -गा.पै.

क्या बात है बापू! जियो! आणि एक सलाम मेजर जनरल इयन कॉर्डोझ सरांना!

सॅल्यूट !!!

रोमांचकारी कथा आणी प्रेरणादायी व्यक्तीमत्वाची ओळख करून दिल्याबद्दल शतशः धन्यवाद. _/\_