Skip to main content

पाककृती - समाजवादी लाडू

लेखक स्वामी संकेतानंद यांनी मंगळवार, 26/04/2016 या दिवशी प्रकाशित केले.
" समाजवादी लाडू" बेसन, तूप, साखर, बेदाणे उत्साहाने आणले जातात. घरी पिंपात भरून ठेवले जातात. सर्व बारक्या सदस्यांना एका खोलीत कोंडून लाडू बनवायला लावायाचे ठरते. सगळ्यांना मेहनताना म्हणून एकेक लाडू द्यायचे ठरते. दरम्यान मोठे सदस्य लाडू बनवावे की न बनवावे, लाडूंचा आकार, रंग ,बेदाण्यांचे प्रमाण यावर बिड्या फुंकत चर्चा करत असतात. चर्चेदरम्यान मतभेद झाल्याने लगेच एक भाऊ घराबाहेर पडण्याचा निर्णय घेतो आणि भाड्याच्या घरात स्वतंत्र संसार मांडतो. पाहुणे येतात, लाड़वांची वाट बघतात. अखेर एक पाहुणा कंटाळून म्हणतो की अहो तुमच्याकडे उत्तम दर्जाचे बेसन आहे, तूप आहे, साखर आहे ,बेदाणे आहेत, एवढे मोठे कुटुंब आहे लाडू वळायला, अजून लाडू कसे बनले नाहीत? म्हातारा सदस्य खेकसतो, " देशात 22 कोटी लोक उपाशीपोटी झोपतात आणि तुम्हाला लाडवांचे सुचते? " पाहुणा म्हणतो, " बरं, आम्ही लाडू वळून देऊ का?" " वा! माल आमचा, तुम्ही लाडू वळणार, तुम्ही आपल्या घरी नेणार! आम्हाला काय मिळणार? चार लाडू? तुमचे कुटील कारस्थान कळते हो आम्हाला. ते काही नाही, चालते व्हा!" पाहुणे पळून जातात. मोठ्यांचे अजून लाडवांच्याबाबत एकमत झालेले नाही. त्यामुळे घरातले बारके सदस्य लाडवांच्या आशेने उपाशी झोपतात. अशाप्रकारे वर्षानुवर्षे त्या घरात लाडू बनतच नाहीत. मग जेव्हा बारके सदस्य मोठे होतात, तेव्हा ते सगळा कच्चा माल ताब्यात घेऊन लाडू वळायला सुरुवात करतात. मोठे एव्हाना चांगलेच म्हातारे झाले आहेत. ते गल्लीत येऊन शेजाऱ्यांना गोळा करून सांगू लागतात, " पहा ह्या कारट्यांनी घर ताब्यात घेऊन घराची कशी वाताहत चालवली आहे.. घरातल्या जिन्नसांची कशी नासधूस चालवली आहे. पहा, हे कसे सगळे लाडू स्वतःच खात आहेत, पहा! " मग ते सगळे एकत्र येऊन "लाडू बचाव संघटना" स्थापन करतात. सायंकाळपर्यंत दोन म्हाताऱ्यांत मतभेद होऊन पुन्हा दोन संघटना बनतात, " लाडू हटाव संघटना" आणि " लाडू दिलाव संघटना." -- स्वामी संकेतानंद
लेखनविषय:

वाचने 4870
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

In reply to by स्वामी संकेतानंद

अरे असं कसं कुटलं असतं? काही अभिव्यक्तीस्वातंत्र्य आहे की नाही. या असहिष्णू वागणुकीबद्दल आम्ही एक पत्रक काढलं असतं. आगामी मिळणार्‍यातल्या पुरस्कारापैकी एखादा परत केला असता.

=)) =)) =)) _/\_ लै भारी पाकृ. या वीकांताला करून बघेन म्हणायची सोय नाही.

जबराट.
मग ते सगळे एकत्र येऊन "लाडू बचाव संघटना" स्थापन करतात. सायंकाळपर्यंत दोन म्हाताऱ्यांत मतभेद होऊन पुन्हा दोन संघटना बनतात, " लाडू हटाव संघटना" आणि " लाडू दिलाव संघटना."
दुसर्‍या दिवशी लाडू बनवायची आपलीच पद्धत कशी अधिक चांगली यावरून "लाडू हटाव संघटना" (लाहसं) आणि "लाडू दिलाव संघटना" (लादिसं) या दोन्ही संघटनांमध्ये तणातणी होते.तिसर्‍या दिवशी "लाडू बनविण्याचे" व्यापक ध्येय लक्षात घेऊन या दोन संघटना एकत्र येण्याच्या दृष्टीने पावले उचलायला लागतात.पण एकत्र आल्यावर संघटनेचा अध्यक्ष कोण बनणार यावर एकमत होत नाही आणि एकत्रीकरणाचा तिढा सुटत नाही.चौथ्या दिवशी प्रस्तावित विलीनीकरणाविरूध्द लादिसं मधील एक गट फुटून आपला "लाडू पाहिजे संघटना" (लापासं) स्थापन करतो. पाचव्या दिवशी असे ठरते की लाहसं आणि लादिसं या दोन संघटनांनी एकत्रीकरण न करता सर्व लाडू आंदोलनांमध्ये एकत्र यावे.सहाव्या दिवशी लादिसंच्या नेत्यांनी लापासंला घरवापसीचे आवाहन केले जाते.पण आपण आपले अस्तित्व एकत्रच ठेवणार यावर लापासं ठाम असतो..... शेवटी इ.स. २०४० मध्ये दैनिक लाडूसाम्राज्य मध्ये बातमी येते की मधल्या काळात लोकांना लाडू सोडून करंज्या खायची सवय लागली असल्यामुळे आपण असेच भांडत राहिलो तर आपले काही खरे नाही असे या तीनही संघटनांच्या नेत्यांना पटते.आणि परत एकदा एकत्रीकरणाच्या वाटाघाटी सुरू होतात. पण तेवढ्यात लापासंचे अध्यक्ष प्रस्तावित आघाडीतून बाहेर पडतात... अ‍ॅन्ड धीस गोज ऑन अ‍ॅन्ड ऑन!!

छान

:)

पाककृती आवडली. नितीश आणि मुलायम दोघांचे स्वप्न पूर्ण होणार नाही शेवटी 'लाडू बेचव होता' असेच म्हंटल्या जाईल.

राजकारण संकेतांचे आणि सं(धी)केतुंचेही. रूपक ज्याम आवडले.