Skip to main content

'पुरुष' ... हवा आहे पण कशाला !

Published on बुधवार, 13/04/2016
पुरुषाचा नराचा खरंच काय उपयोग असतो पुरुषाचा उपयोग काय तर फक्त मुलांना जन्म देण्यापुरताच... एका अभिनेत्रीचे वाक्य ऐकले. मोठी गंभीरपणे घेण्याजोगी ही गोष्ट आहे. आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने वावरते आहे. काही ठिकाणी तर पुढेही गेलेली आहे. आजच कशाला जुन्या काळीही झाशीच्या राणीने उत्तम युद्ध नेतृत्त्व करून दाखवले होते. तिच्या सैन्यात अनेक स्त्रिया लढत होत्या. अशी अनेक उदाहरणे दाखवून देता येतील. कुठलेही क्षेत्र स्त्रीने सोडलेले नाही. पोलिसात ती आहे. विज्ञानात ती आहे. ती डॉक्टर आहे. ती इंजिनीयर आहे. ती सॉफ्टवेयर मधे आहे. तिथे 'ती' 'त्या'ची बॉसही आहे. या जगाचे पुरुषावाचून फारसे काहीही अडत नाही. याला कारणेही असंख्य आहेत. स्त्रीकडे मूळात सर्व क्षमता आहेत. आजवर केवळ त्याला वाव दिला गेलेला नव्हता. पण स्वतःच्या अंगभूत दुर्गुणांमुळेही पुरुष मागे पडतो आहे किंवा नाकारला जातो आहे. गाडी चालवणे हे आजवर मुख्यतः पुरुषाचे काम होते. प्रवासी वाहतूक असेल नाहीतर शाळकरी मुलामुलींची ने-आण करणारे व्हॅन काका असतील हे काम आजवर पुरुषच करीत होते. पण या सगळ्याला पुरुषाने आपल्या दुर्गुणांची जोड दिली. कॉल-सेंटरच्या गाड्यांच्या ड्रायव्हरचे किस्से तर भारतभर अगणित आहेत. प्रवासी बसमधल्या महिलांशीही गैर वर्तनाच्या घटना घडल्या. स्कूलबसमधल्या लहान मुलींशीही गैर वर्तनाच्या बातम्या आल्या. पुरुष गाडीचालकावर असलेला विश्वास मग कमी होवू लागला. कॉल-सेंटरच्या गाडीमधे महीला कर्मचारी असेल तर तिचा शेवटचा ड्रॉप असता कामा नये. असा नियम करण्यात आला. गाडीचालक पुरुषावर दाखवलेला हा अविश्वासच होता. यावर एक उपाय म्हणून स्कूलबसमधे एक स्त्री कंडक्टर नेमली जाऊ लागली. निदान तिच्या उपस्थितीमुळे तरी गाडीचालकामधला पुरुष नियंत्रणात राहील आणि शाळकरी मुली सुरक्षित राहतील. असा पालकांचा अंदाज होता. पण एक अधिक कर्मचारी नेमण्यामुळे खर्चही वाढू लागला. त्यामुळे काही ठिकाणी याला पुन्हा काट देण्यात आली. यामुळे पालक अस्वस्थच राहीले. यातही एक उपाय पुढे आला आणि स्कूलबसवर स्त्री ड्रायवर नेमली जाऊ लागली. पालक निर्धास्त झाले. शाळेला जाणार्‍या आपल्या मुली आता सुरक्षित. या पलिकडचाही एक वेगळा मुद्दा लक्षात घेतला पाहीजे. असंख्य अडचणींना तोंड देत शेतकरी शेती करतो. कधी कधी या अडचणी वाढतात. शेती तोट्याचा व्यवहार ठरते. मग तणाव असह्य होवून तो आत्महत्या करतो. मागे राहीलेल्या त्याच्या कुटूंबाचा गाडा त्याची पत्नी हाकायला सुरुवात करते. ती मात्र या सगळ्या तणावांचा व्यवस्थितरित्या सामना करते असे दिसून आले आहे. अनेकदा तर असेही पहायला मिळाले आहे की जेव्हा तोटा होतो तेव्हा पुरुष शेतकरी तोट्यामधे सगळ्या कुटूंबाला सामील करून घेतो पण फायदा झाला तर मात्र तो उधळपट्टी करतो. चैन करतो. घरातली माणसे मात्र फाटकीच राहतात. कधी कधी तर याही पुढचे पाऊल म्हणजे तो दारुच्या आहारी जातो, घरच्या लक्ष्मीला बडवतो. कुटूंबाच्या अशांततेला कारण ठरतो. शेतकर्‍याचे दारुच्या आहारी जाणे सरसकट नाही पण काही ठिकाणी पहायला मिळते. पती काहीही काम करत नाही. उलट व्यसने मात्र करतो. अशा वेळी घराची जबाबदारी घरातल्या स्त्रीला उचलावी लागते. असे दारुडे पुरुष कुटूंबावर भार ठरतात. त्यांचे खाणे पिणे आणि दारु याचा खर्च घरच्या स्त्रीच्या कष्टातून भागवला जातो. व्यसने करून स्वतःची तब्येत बिघडवलेला पुरुष जर मरण पावला तर कुटूंब सुटकेचा निश्वास टाकते. याबाबतचे एक उदाहरण सांगण्यासारखे आहे. ते पुढे चर्चेच्या ओघात येइलच. काही शेतीसंपन्न राज्यांमधे पुरुष फक्त बाजेवर पडून ऐष आराम करतो. स्त्रीया मात्र शेतीची सर्व कामे पार पाडतात. झालंच तर हा पुरुष कुठल्या तरी मुद्यावर आंदोलन करतो. झुंडशाहीने सगळ्या राज्याला वेठीला धरतो. जोडीला स्त्रियांवर अत्याचारही करतो. व्हिडियोमुळे देशाला हे माहीत होते. मनुष्य प्राणी जाऊ द्या. सगळ्याच जीव सृष्टीमधे हेच दिसते का. एकटी स्त्रीच पुरेशी असते आणि जीवसृष्टीचे पुरुषावाचून फारसे काही अडत नाही. असाच निष्कर्श काढायचा का ! मधमाशांचे उदाहरणही आपण पाहूया... चर्चेच्या ओघात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचन संख्या 20884
प्रतिक्रिया 78

प्रतिक्रिया

पुरुषाचा उपयोग काय तर फक्त मुलांना जन्म देण्यापुरताच.. पेक्षा जड़ ओझी उचलणे, डब्याचं पक्क् लागलेलं झाकण उघडण्यासाठी, बायकांची बोलणी पुरुषांना आवडतात, ती खाण्यासाठी पुरुषच हवा असे मला वाटते. -दिलीप बिरुटे

स्त्रीयानी स्त्रीसत्ताक पद्धत आणावी व पुरुषाना स्वतःच्या घरात नांदायला न्यावे.. पुरुश। मुलं संभाळतील . ब्यायकानी करियर करावे. ... मै गजानन माधुरी दिक्षित बनना चाहता हूं

हम्म...........धाग्याचा विषय म्हटला तर गंभीर, म्हटला तर दंग्याचा होऊ शकेल. जर समजूतदार पुरुष आयुष्यात असेल तर त्यांना नाकारणं पटत नाही. हे आपलं लैच्च साधं मत झालं पण महिला त्यांना आलेल्या अनुभवानुसार बोलत असतात. त्यांचे अनुभव नाकारणे माझ्याकडून होणार नाही पण सुदैवाने चांगले पुरुषही असतात म्हणून १०० टक्के खरं आहे असं म्हणवत नाही. प्राडॉ. म्हणतात त्यानुसार जड वस्तू उचलणे, डब्याचे घट्ट बसलेले झाकण काढून देणे, एवढे करूनही बायकोने मारलेले टोमणे सहन करणे यासाठी निसर्गाने पुरुषांची खास नेमणूक केलेली असते. खरं आहे. नवर्‍याचेही ठाम मत आहे की माझे आईवडील माझ्या स्वभावाला कंटाळल्याने त्यांनी झटपट लग्न याच्याशी करून दिले आहे. सतीसावित्री क्याट्यागरीत मोडत असल्याने मी त्याच्याशी सहमत आहे.

In reply to by रेवती

बायकोने मारलेले टोमणे सहन करणे यासाठी निसर्गाने पुरुषांची खास नेमणूक केलेली असते.
हे तर आहेच. पण त्या व्यतीरीक्त, वड्याचे तेल वांग्यावर कारण्यासाठी आम्ही हवेच असतो. बायकोला भांडणाची खुमखूमी आल्यावर, जिंकत असतानाही हरलो असे जाहीर करण्यासाठी आम्ही हवेच असतो. खरेदीला गेल्यावर फुकटचा हमाल म्हणून बाळगायला आम्ही हवेच असतो. दुचाकी कशीही चालवायची, बीघडली की तीचे काय करायचे ते ठरवायला आम्ही हवेच असतो. सजून तयार झाल्यावर, कशी दीसते? याचे होकारात्मक उत्तर द्यायला आम्ही हवेच असतो. नवीन पदार्थ केल्यावर चाखून बघायला आम्ही हवेच असतो. शेवटी आम्ही पंचीग बॅगच हो...

In reply to by खटपट्या

बरे झाले बुवा! टंकनश्रम वाचवलेत. धन्यवाद. तुम्ही म्हणताय तसेच म्हणायचे होते. स्वगत: आता माझ्या नवर्‍याला या प्रतिसादाचा पुरावा देते आणि सांगते की सग्गळ्या बायका अशाच असतात, उगीच मलाच नावे ठेवू नकोस म्हणून!

In reply to by रेवती

सग्गळ्या बायका अशाच असतात, उगीच मलाच नावे ठेवू नकोस म्हणून! +१ रेवती, कसं काय बुवा तुला सगळ्या गोष्टीत काहितरी चांगल शोधता येतं.

असंख्य अडचणींना तोंड देत शेतकरी शेती करतो. कधी कधी या अडचणी वाढतात. शेती तोट्याचा व्यवहार ठरते. मग तणाव असह्य होवून तो आत्महत्या करतो. मागे राहीलेल्या त्याच्या कुटूंबाचा गाडा त्याची पत्नी हाकायला सुरुवात करते. ती मात्र या सगळ्या तणावांचा व्यवस्थितरित्या सामना करते असे दिसून आले आहे.
Women farmers are dying too

काही प्रमाणात अतिशयोक्ती आणि सरसकटीकरण टाळता आले तर लेखाचा आशय बरोबर आहे. क्लोनिंग केल्यास मूल होण्यासाठी पुरुषाची आवश्यकता पडते किंवा कसे याबद्दल वाचायला आवडेल.

In reply to by पैसा

इथेही पुरुषांची गरज भविष्यात लागणार नाही. IVF तंत्रज्ञान अजून प्रगत झाले की XY किंवा XX असे सिलेक्शन करता येउन Y ला एलिमिनेट करणे सहज शक्य आहे. पण अर्थात हे प्रयोग शाळेतून.

In reply to by विजय पुरोहित

काळजी करु नका हो ! त्यासाठी करोडोत खर्च येईल.. त्यापेक्षा लग्नाचा सर्व खर्च बाईनेच केला तरी परवडेल.

आज जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात स्त्री पुरुषाच्या बरोबरीने वावरते आहे
मला पुढच्या आठवड्यात प्लंबर आणि इलेक्ट्रिशियनची गरज पडणार आहे.. आहे का कोणी स्त्रिया ?
कॉल-सेंटरच्या गाडीमधे महीला कर्मचारी असेल तर तिचा शेवटचा ड्रॉप असता कामा नये. असा नियम करण्यात आला. गाडीचालक पुरुषावर दाखवलेला हा अविश्वासच होता.
पण म्हणजे तिचा ड्रॉप सुखरुप व्हावा यासाठी पुरुष सहकार्‍यावरच विश्वास दाखवला गेला ना ? शिवाय त्याकरिता कदाचित त्याचा ड्रॉप फिरुन उशिरानेही होत असेल तर तो आपल्या स्त्री सहकारीकरीता त्याग करतोय असं म्हणायला हरकत नसावी.
अनेकदा तर असेही पहायला मिळाले आहे की जेव्हा तोटा होतो तेव्हा पुरुष शेतकरी तोट्यामधे सगळ्या कुटूंबाला सामील करून घेतो पण फायदा झाला तर मात्र तो उधळपट्टी करतो. चैन करतो. घरातली माणसे मात्र फाटकीच राहतात. कधी कधी तर याही पुढचे पाऊल म्हणजे तो दारुच्या आहारी जातो, घरच्या लक्ष्मीला बडवतो. कुटूंबाच्या अशांततेला कारण ठरतो. शेतकर्‍याचे दारुच्या आहारी जाणे सरसकट नाही पण काही ठिकाणी पहायला मिळते.
बा़की पुरुष इतके वाईट्ट असतात तर मग आतापर्यंत जग कसे चालले हो ?
त्यांचे खाणे पिणे आणि दारु याचा खर्च घरच्या स्त्रीच्या कष्टातून भागवला जातो.
मान्य की काही पुरुष दारुच्या आहारी जातात पण मग हातभट्टी चालवीणार्‍या बायकांबद्दल काय मत आहे ?

In reply to by मराठी कथालेखक

पण म्हणजे तिचा ड्रॉप सुखरुप व्हावा यासाठी पुरुष सहकार्‍यावरच विश्वास दाखवला गेला ना ? शिवाय त्याकरिता कदाचित त्याचा ड्रॉप फिरुन उशिरानेही होत असेल तर तो आपल्या स्त्री सहकारीकरीता त्याग करतोय असं म्हणायला हरकत नसावी. मग काय तर राव. माझ्या एका सहकारी स्त्रीसाठी माझा पुर्ण पाऊण तास जास्त जायचा. माझ्या व तिच्या निवासस्थानात दहा किमी चे अंतर. जातांना माझ्या अगदी घरापासून गाडी जायची, मग तिला घरी सोडून मी परत घरी. रोज पाउण वाजता घरी पोचणारा मी, दिड वाजायचा. तिला म्हटले तू एकटीच ह्या भागात राहते. शिफ्ट चेंज करुन घेतली तर सगळ्यांना सोयीचे होईल. कंपनीचा तसा काय इशु नव्हता. तिला सहज शीफ्ट बदलुन मिळाली असती. पण तीने माझीच तक्रार व्यवस्थापनाकडे केली की मी तिच्यावर दबाव आणतोय. कंपनीने मलाच चार गोष्टी सुनावल्या. मी म्हटले राव, मी इथे कंपनीत मला नेमुन दिलेली कामे करायला येतो की तुमच्या स्त्री कामगारांचा सुरक्षारक्षक म्हणून? तसे असेल तर मला डबल पगार द्या, आणि बोनस वाढवा. एक्स्ट्रा कामाचा भत्ताही द्या. बराच खडाजंगी झाल्यावर तीची शिफ्ट बदलली, नंतर अशा शेवटी एकट्या राहणार्‍या स्त्रीयांसाठी खास सुरक्षारक्षक धाडले जाऊ लागले. पण तेही पुरुषच होतेना शेवटी. समस्या समजून घेतली नाही तर कसे फालतू उपाय सुचतात ह्याचे हे उत्तम उदाहरण. वाहनचालकच नीट बघून ठेवलेत तर इतक्या झमेल्यांची गरजच काय?

विनोदी लेख,जगातले यच्चयावत सगळे शोध पुरुषांनी लावले आहेत, धर्म ,विज्ञान ,तंत्रज्ञान हि खास पुरुषांची क्षेत्रे.बायकांनी एकच शोध लावला आहे,दुचाकी थांबवताना विमानाची चाके लॅण्ड होताना जशी खाली येतात तसे दोन्ही पाय खाली सोडायचे व गाडी थांबवायची.

In reply to by चंद्रनील मुल्हेरकर

बायकांनी एकच शोध लावला आहे,दुचाकी थांबवताना विमानाची चाके लॅण्ड होताना जशी खाली येतात तसे दोन्ही पाय खाली सोडायचे व गाडी थांबवायची. महालोल प्रतिसाद...

शीर्षकचं सांगते पुरुष "हवा" आहे येणार आणि जाणार इकडून तिकडे त्याला एका जागी थांबवण्य्साठी आणि त्याच्या उर्जेचा उपयुक्त उपयोग होण्यासाठी तर वसुंधरा (स्त्री) आहे. हा का ना का. हवामहल वाला नाखु

स्त्रिया कष्ट करतात हे खरंय! पण नवर्यावर आरडाआेरडा करणे व टाेचून बोलण्याची गरज काय? सिरियल मधल्या जान्हवी सारखी गोड बोलणारी, एकत्र कुंटुंबात राहणारी, सर्वांना सांभाळून घेणारी बायको दुर्मिळच.

In reply to by पैसा

=)))

In reply to by अजया

तसे वागतोय असे दाखवायचे पैसे मिळतात हे लक्ष्यात ठेवा. वास्तवी नाखु

मेनीनिस्ट meninist नावाचं एक फेसबुकवर पेज आहे. तिथे भंकसबाजी चालतेच पण गंभीर मुद्यांवरही चर्चा होत असते. पाहा नजर फिरवून.

पुरुषाचा उपयोग मुलांना जन्मदेण्यापुरता असतो हे खरंय पण बायांचा उपयोग तरी जन्म देण्याशिवाय इतर कोणत्या गोष्टीला असतो? सगळ्याच सजीवांचे अस्तित्व पुनरुत्पादनामुळे आणि पुनरुत्पादनासाठीच आहे. हे पुनरुत्पादनसुद्धा पूर्णतः निरर्थक आहे आणि बाकीचा तर निव्वळ टैमपास आहे. पण माणसाच्या दुर्बळ मनाच्या समाधानासाठी उगीच त्याला भलभलती लेबलं चिकटवायची. बायांना विशेषतः ह्यात फार रस असतो. खूपच त्रास झाल्याशिवाय बाई कधी विरक्त झालेली पाहिली आहे का? बर्‍याच पुरुषांना उगीच घराचा रंग, पडदे, उशांचे अभ्रे बदलणे यात रस नसतो. बर्‍याच बायांचा हा आवडता उद्योग असतो. दुर्दैवाने संवेदनशीलतेच्या नावाखाली पुरुषही स्वप्रवृत्तीविरुद्ध असल्या फालतू गोष्टी करताना दिसतात. बर्‍याच बाया मात्र पुरुष कसे गबाळे,निरुपयोगी आणि परावलंबी आहेत असा प्रचार करताना दिसतात. प्रत्यक्ष जोडीदार निवडताना मात्र स्वतःपेक्षा श्रेष्ठ, शक्तिशाली आणि भरपूर समृद्धी असलेला निवडण्याकडे कल असतो म्हणजे तो पोषण करेल. गरीब व परिस्थितीने गांजलेल्या वर्गातली भडक उदाहरणे घेऊन थेट पुरुषांची उपयुक्तता ठरवायचा प्रयत्न फारसा टिकणारा नाही. सर्व सोयी व स्वातंत्र्य असूनही करिअर करायचे सोडून सासरच्यांशी क्षुल्लक गोष्टींवरुन भांडत बसणार्‍या व कांगावा करणार्‍या स्त्रियांची उदाहरणे कमी नाहीत; पण म्हणून स्त्रीचा उपयोग काय असा प्रश्न पुरुषांना पडत नाही.

In reply to by नगरीनिरंजन

'पुरुषाचा नराचा खरंच काय उपयोग असतो' - लेखातील पहिले वाक्य.. तरी बरं प्रश्न एका पुरूषालाच पडलाय.. स्त्रियांच्या डोक्यात असले विचार येत नाहीत.

In reply to by नीलमोहर

स्त्रियांच्या डोक्यात असले विचार येत नाहीत.>>>> प्रियांका चोप्रा ह्या स्त्री नाहीत हे आजच कळले. धन्यवाद!

सर्वच जनावरांचा एकमेव उद्धेश असतो तो म्हणजे पुनरुत्पादन. इतर सगळ्या गोष्टी शून्य. अक्खी पृथ्वी जरी जळून सगळे मेले तरी विश्वाला काडीचाही फरक पडत नाही. प्रियांकाचे म्हणणे मला पटते. आपल्या कडे भरपूर पैसा असेल, प्रसिद्धी, समाधान इत्यादी असेल तर उगंच लग्न करून गळ्यांत बांधून गेह्ण्यात काहीही अर्थ नाही. पण सर्वच मंडळीना ते जमते असे नाही. पण ते दोन्ही दृष्टीने applicable आहे. उलट पुरुषांना स्त्रियांची कमी गरज असते असे म्हणणे बरोबर आहे.

बरं झालं आपलं घरी बसून नरड्याला येईस्तूर हादडायला मिळणार.

In reply to by दत्ताभाऊ गोंदीकर

शंतनुबरोबर काही वर्षे नांदून गंगामैय्या मुलासह गायब झाली. अटीचा भंग झाला म्हणुन उर्वशी पुरुरव्याला टाकून गेली. विश्वामित्राशी चार दिवसाचा संसार करुन मुलगी शकुंतला (?) हिला टाकून मेनका नाचकाम करायला निघून गेली. पुर्वीपासुन हे आहेच की. यात नवीन काय आहे ?

In reply to by mugdhagode

काहीच नाही. आधी खोटे खोटे मग हळूच पोटे, मग भीड चेपीन, बनेल मी सचीन, तरी कुणाही फिर्याद देणार का याद रेफर ! या अवतारी मी दादरेकर ! फिरुन नव्याने जन्म ठाकला संभाळून सोगा , दारात पुन्हा साळ्सूद मोगा ! अता परत माघारी, मिळता जोडे, नव्याने आल्या मुग्धा गोडे !!! कवी आपले नेहमीचेच...

ज्या प्रमाणे एखाद्या पुरुषाला आपल्यावर स्त्री अवलंबुन असेल तरी चालते. पण आपल्यावर अवलंबुन असणारे पुरुष स्त्रियांना चालत नाहित.

काही ठिकाणी मात्र पुरुषाची आवश्यकता असते. ती म्हणजे सुरक्षिततेसाठी. स्त्रीला रक्षणकर्ता म्हणून कुणी हवा असतो. पण रक्षण तरी कुणा पासून. दुसर्‍या कुणा पुरुषापासून. म्हणजे दुसरा कुणी त्रासदायक पुरुष नसेल तर तीही आवश्यकता उरणार नाही.

In reply to by नर्मदेतला गोटा

मधमाशांना हे पक्के ठाऊक असते की वंशवृद्धीसाठी नराची आवश्यकता आहे. राणीमाशी आपले कामकाज सुरु करण्यापूर्वी पोळ्याबाहेर येते. मग अनेक नर तिच्याशी समागम करतात(एका वेळी एक) त्याच्याकडून आवश्यक ते द्रव्य तिच्या पिशवीत साठवले जाते पण नंतर तो मरण पावतो. नराकडून मिळालेली द्रव्ये तिला भविष्यात उपयोगी पडतात आणि ती आपली प्रजा पुढील काही वर्षे जन्माला घालत राहते. म्हणजे माशीच्या जन्मापासून संगोपनापर्यंत आणि पोळ्याला लागणारी पुढील सर्व कामेही नराविनाच पार पडतात. इतर वेळी नर शिल्लक असला तर त्याचा काहीच उपयोग नसतो. त्यामुळे नरांना हाकलून तरी दिले जाते किंवा ठार तरी मारले जाते.

In reply to by नर्मदेतला गोटा

ह्याच्या अगदी उलट घटनाही निसर्गात घडतात न.गो. अनेक प्रजातींमधे प्रजोत्पादनात व संगोपनात मादीपेक्षा नर जास्त भूमिका बजावतात. जसे पेंग्विन व समुद्रीघोडा.

In reply to by नर्मदेतला गोटा

पेंग्विन. मागे नॅटजिओवर अमिताभ बच्चनच्या आवाजात पेंग्विनवरची डॉक्युमेंटरी बघितलेली. त्यात सविस्तर वर्णन होते. अंडी घातलेल्यावर मादी शिकारीला निघून जाते,ती परत येइस्तोवर, ज्याला कित्येक दिवस ते कित्येक आठवडे लागू शकतात, चोविसतास ते अंडं नराला आपल्या पोटाशी, पायाच्या वर धरुन ठेवायला लागतं. बर्फाळ जमिनिशी अजिबात संपर्क होउ दिला जात नाही, अन्यथा थंडी बाधून अंड्यातला जीव जातो. साहजिक हे नर फक्त उभे असतात, फिरणेही शक्य नसते. खाणेपिणे तर दूर. दोन पाय आणि पोटाच्या मधे भयानक थंडीत असं दिवसेंदिवस बाळ धरुन राहणं चॅलेंजिंग आहे. कदाचित ते आपल्या मुलांना मोठं झाल्यावर 'दोन पायात धरुन उपाशी उभं राहिलोय तुझ्यासाठी' असा डायलॉग मारत असावेत. समुद्री घोडा: समुद्री घोड्याची मादी आपली अंड्यांची पिशवी पाण्यात सोडते ती नर अलगद स्वतःच्या पोटात घेतो. पुर्ण वाढ झाली की नराच्या पोटातून एक एक करुन सटासट पिल्लं बाहेर येतात. अगदी शेकड्यात. आणखी नरांबद्दल माहिती हवी असेल तर खालील दुवा जरुर वाचा, सोप्या इंग्रजीत महत्त्वाची माहिती आहे. http://www.livescience.com/14651-animal-kingdom-devoted-dads.html https://www.nwf.org/News-and-Magazines/National-Wildlife/Animals/Archives/1996/A-Fathers-Day-Top-Ten-Animal-Fathers.aspx

In reply to by नर्मदेतला गोटा

खरय राव म्हणण तुमच.मधमाशांना पुरुशांची गरज नाही.आजच्या जगात स्त्रि स्वातंत्र्याचे वारे खुप जोरात आहे त्यामूळे संसारात पुरुषांची गरज कमीच उरलीय हे खरच.त्यांच्यावरही हिच वेळ येत आहे.कारण शेतकरयांच्या आत्महत्येपेक्षा स्त्रियांच्या आत्महत्या जास्त आहेत व स्त्तियांपेक्षा पुरुषांच्या आत्महत्या जास्त आहेत.( भारत सरकारच्या आकडेवारीप्रमाणे १ महिन्यापुर्वीची ). घरात अतिशय किरकोळ कारणांवरुन प्रचंड मोठी भांडणे होत आहेत.त्याचा परिणाम लहान मुलांवर होत आहेत.खास करुन घरातील लहान मुलगीही खुपच AGGRESSIVE होत आहे व ती सुध्दा आईचीच बाजु घेतांना दिसते.माझ्यासमोर अशी अनेक उदाहरणे आहेत.त्यामुळे पुरुषांना घरात रहाणे अवघड होते व त्याची भावनिक गरज पुर्ण होत नसल्याने,मानसिक आधार स्त्रियांपेक्षा कमी असल्याने (बर्याच केसेसमध्ये त्याचे माहेर तुटलेले असते), खुलेआम रडता येत नसल्याने,त्याचे मानसिक खच्चीकरण होते व तो मग दारु,जुगार्,दुसरी बाई, घ्ररात चिडचिड्,मारहाण (प्रत्येकावरची reaction वेगवेगळी होते) किंवा इतर वाईट गोष्टींना बळी पडतो व दुसरीकडुन बघा तो दारु पितो असाही प्रचार होतो व शेवटी तोच बदनाम होतो. व गोष्टी हाताबाहेर जायला लागतात.त्यामुळे आता भारतीय कायदेसुध्दा पुरुषांच्या बाजुने होत आहेत.नुकतेच काही निकाल पुरुषांच्या बाजुने लागले आहेत. दुसरा मुद्दा -- पूरुषांबरोबरच त्याच्यातील बापालाही मारले जातेय जे मुलांच्या द्रुष्टीने खुपच घातक आहे.त्यालाही Emotional Blackmailing केले जाते. (नवराबायकोच्या भांडणात मुलांना गुंतवले जाते.) त्यामुळे Save Father ! Save Family !! असे म्हणण्याची गरज आहे.त्यामुळे बाप या मुद्द्यावरही चर्चा झाली पाहिजे.

In reply to by मी कोण

अवश्य. आम्हाला काही असले ज्वलंत विषय सुचत नाहीत तेंव्हा अशा धाग्याना प्रतिसाद देण्यासाठीच आम्ही इथे आहोत.

In reply to by मी कोण

इथे तुम्ही दमलेल्या बाबाची कहाणी मांडताय का . . . मला ते अजिबात अपेक्षित नाही. जीव सृष्टीमधला नर अपेक्षित आहे

In reply to by नर्मदेतला गोटा

असे एका नराने दुसर्‍याला हतोत्साहित करण्याने प्रश्न सुटणार आहेत का? वाचा तरी त्यांच्या काय समस्या आहेत. बाबांचे सोडा, सगळे दमलेलेच आहेत आता. नव्याना प्रोत्साहन द्या.

पुरुषाचा उपयोग काय तर फक्त मुलांना जन्म देण्यापुरताच
अहो .. मुलं ही त्या क्रीयेची बायप्रॉडक्ट्स असतात.. मुलं झाल्यावर ती क्रीया थांबते का??

मनुष्य प्राणी जाऊ द्या. सगळ्याच जीव सृष्टीमधे हेच दिसते का. एकटी स्त्रीच पुरेशी असते आणि जीवसृष्टीचे पुरुषावाचून फारसे काही अडत नाही.
बरोबर. आणि थोडं पुढे जावून स्त्रीवाचूनही सजीव सृष्टीचं काही अडत नाही (अमिबा वगैरे आहेतच ना) सजीव सृष्टीवाचून पृथ्वीचं काही अडत नाही पृथ्वीवाचून सूर्याचंही काही अडत नाही सूर्यावाचून आकाशगंगेचंही काही अडत नाही आकाशगंगेवाचून विश्वाचंही काही अडत नाही विश्वावाचूनही कुणाचंच काही अडत नाही असो :)

काहीही. स्त्रियांना बॉयटॉय म्हणूनच पुरुष हवे असतात. बाकी पिशव्या उचलणं, झाकणं उघडणं वगैरे सेकंडरी सगळं.

कृपया नेहमीच्या स्त्री पुरुष आणि तेच तेच खटकेबाज संवाद या पद्धतीने हा विषय करू नये पुरुष हा नर या अर्थाने घेतला पाहिजे केवळ माणूस नव्हे तर सगळी सजीव सृष्टी अपेक्षित आहे

जैविक वैविध्य( BIOLOGICAL DIVERSITY) यासाठी नाते नसलेले नर आणि मादी यांचा संबंध येतो. त्यातून निर्माण झालेली संतती हि काळाच्या ओघात टिकून राहण्यासाठी जास्त योग्य असते अन्यथा खालच्या प्राण्यात अलैंगिक पुनरुज्जीवन होतच असते. (PARTHENOGENESIS)https://en.wikipedia.org/wiki/Parthenogenesis पण यात स्त्री अपत्य जन्मास येते त्यात आणि आईमध्ये गुणसूत्रात काहीच वैविध्य नसल्याने त्यांची वंश वृद्धी चांगल्या तर्हेने होत नाही. सस्तन प्राण्यांमध्येही अशा तर्हेने अलैंगिक संततीनिर्माण करण्यात अली परंतु त्यात बहुसंख्य वेळेस बरेच गंभीर दोष आढळून आले. Induced parthenogenesis in mice and monkeys often results in abnormal development. This is because mammals have imprinted genetic regions, where either the maternal or the paternal chromosome is inactivated in the offspring in order for development to proceed normally. A mammal created by parthenogenesis would have double doses of maternally imprinted genes and lack paternally imprinted genes, leading to developmental abnormalities. It has been suggested that defects in placental folding or interdigitation are one cause of swine parthenote abortive development.

विषय चांगला आहे. २१व्या शतकाच्या उत्तरार्धात नवीन कायदे नक्कीच निर्माण होतील...थोडेबहुत पुरुषांच्या बाजूने! स्त्रीसक्षमीकरणाची चळवळ जवळून अनुभवली... आणि त्याला पूर्णत: पाठींबा आहे. पण आसपासच्या मित्रांना जेंव्हा भयानक मानसिक आणि घरगुती हिंसाचाराला सामोरे जावे लागले तेंव्हा त्यांना ना सामाजिक आधार मिळू शकला ना कायदेशीर!!! (पुरुषांवर अत्याचार होतो हेच मुळात विनोदाने घेतले जाते ...) संवेदनशील पुरुषांच्या वाट्याला असे दु:खं यावे याचे वाईट वाटते आणि केवळ समुपदेशन एव्हडाच पर्याय शिल्लक राहतो. १०० मधील ५ घटनेत ९५ घटना स्त्री अत्याचाराच्या आहेत हे मान्य करूनही ५ पुरूषांवरील अत्याचाराच्या घटना कमी निंदनीय आहेत असे मुळीच नाही. संवेदनशील माणसाच्या वाट्याला असंवेदनशील सहचारी ही नैसर्गिक रचना आहे का!!! पुरुषांनी बदलणे खूपच आवश्यक आहे. आदर्श पुरुष म्हणून मला नेहमीच महात्मा फुलेचे स्मरण होईल. त्यामुळे "...कशाला" पेक्षा "...कसा" पुरुष हवा हे महत्त्वाचे!!!