Skip to main content

भारताबाहेरील हिंदू मंदिरे - भाग २ - हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान)

लेखक विद्यार्थी यांनी शनिवार, 26/03/2016 या दिवशी प्रकाशित केले.
================== भाग १ ================== हिंगलाज माता शक्तीपीठ, बलूचिस्तान (पाकिस्तान) भारतीय उपखंडामध्ये देवी सतीची (पार्वती) ५१ शक्तिपीठे आहेत. हिंगलाज माता शक्तीपीठ (हिंगलाज देवी, हिंगुला देवी) पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतामधील ल्यारी जिल्ह्यातील हिंगलाज या गावात आहे. हिंगोल नदीकाठच्या निसर्गरम्य परिसरातील एका डोंगराच्या गुहेत हे मंदिर आहे. पाकिस्तानातील मुस्लिम लोक या मंदिराला नानी का मंदिर म्हणूनही ओळखतात. हिंदू समजाबरोबराच पाकिस्तानातील अनेक मुस्लिम लोक या मंदिराची वार्षिक यात्रा करतात. ही यात्रा पाकिस्तानात नानी का हज म्हणून प्रसिध्द आहे. भारतीय उपखंडातील देवी सतीची ५२ पीठे शक्तिपीठे हिंगलाज माता मंदिर हिंगलाज माता मंदिर मंदिराचे धार्मिक महत्व आणि इतिहास हिंगलाज माता मंदिराविषयी बऱ्याच आख्यायिका असल्या तरी लोकप्रिय कथेनुसार, प्रजापती दक्षांची कन्या सती आणि भगवान शंकर यांचा विवाह झाला होता. प्रजापती दक्ष यांना शिवशंकर जावई म्हणून अजिबात पसंत नव्हते. त्यामुळे भगवान शंकरांचा अपमान करण्याच्या संधीची ते वाट पाहत होते. प्रजापती दक्षांनी एकदा एक मोठा यज्ञ करण्याचे ठरवले. सर्व देवादिकांना यज्ञाला उपस्थित राहण्याचे आमंत्रण दिले. परंतु भगवान शंकरांना मात्र आमंत्रण दिले नाही. आपल्या पतीचा असा अपमान झालेला पाहून देवी सतीने वडिलांच्या यज्ञकुंडत कुंडात उडी घेतली. आपल्या पत्नीचा मृत्यू झालेला पाहून भगवान शंकर संतापले. त्यांनी आपल्या पत्नीचे मृत शरीर घेऊन आपला तिसरा डोळा उघडला आणि अतिशय विनाशकारी असे तांडव नृत्य करण्यास सुरुवात केली. तिन्ही लोकात हाहाकार माजला. भगवान शंकर शांत झाले नाहीत तर विश्वाचा नाश होईल हे भगवान विष्णूंना कळून चुकले. त्यांनी आपल्या सुदर्शन चक्राने देवी सतीच्या शरीराचे ५१ तुकडे केले आणि ते ५१ निरनिराळ्या ठिकाणी नेउन टाकले. हिंगलाज येथे देवी सतीचे मस्तक येउन पडले. त्यामुळे ५१ पीठांपैकी हिंगलाज हे सर्वात महत्वाचे पीठ मानले जाते. हिंगलाज माता मूर्ती हिंगलाज माता मूर्ती हिंगलाज माता मंदिराचा गाभारा हिंगलाज माता मंदिराचा गाभारा हिंगलाज माता यात्रा पाकिस्तानातील अनेक हिंदू आणि भारतातील (मुख्यत्वे राजस्थान आणि गुजराथमधील) अनेक लोक हिंगलाज मातेला आपली कुलस्वमिनी मानतात. दरवर्षी एप्रिल महिन्यामध्ये ४ दिवसांची हिंगलाज माता यात्रा (नानी का हज) आयोजित केली जाते. पूर्वापार चालत आलेल्या प्रथेनुसार ही यात्रा कराचीमधील नानद पंथी आखाडा येथून सुरु होते. आखाड्यातील एका साधूची यात्रेचा प्रमुख निवड केली जाते आणि त्या साधूच्या मार्गदर्शनाखाली ही यात्रा पार पडते. या यात्रेसाठी भारत आणि पाकिस्तानातून हजारो लोक हिंगलाजला जातात. काही लोक ही यात्रा पायी करण्याचा नवस बोलून या यात्रेचा कराची ते हिंगलाज हा अतिशय खडतर प्रवास पायी करतात. हिंगलाज माता यात्रा हिंगलाज माता यात्रा यात्रेला पायी जाणाऱ्या लोकांसाठी ही यात्रा फारच खडतर आहे. हिंगलाज माता यात्रा हिंगलाज माता यात्रा पाकिस्तानातील हिंदू आणि त्यांच्या मंदिरांची दयनीय अवस्था जनरल झिया उल हक पाकिस्तानी राष्ट्रपती असताना त्यांनी पाकिस्तानचे पद्धतशिरपणे इस्लामीकरण घडवून आणले. अल्पसंख्यक हिंदूंचे धर्मांतर करून त्यांना मुस्लिम होण्यास भाग पाडण्यात आले. त्यांची मंदिरे तोडण्यात आली. याच काळात हिंगलाज माता मंदिराचीसुद्धा फार मोठी दुरवस्था झाली. सध्याचे पाकिस्तानी सरकार मंदिराला कोणतीही सुरक्षा व्यवस्था किंवा इतर मदत देत नाही. हिंगलाज माता मंदिर कमिटी या मंदिराची देखभाल करते. ह्या मंदिरावरसुद्धा पाकिस्तानातील इतर मंदिरांप्रमाणे वेळोवेळी इस्लामी अतिरेक्यांकडून हल्ले होत असतात. बलूच लोकांचा मंदिरासाठीचा त्याग बलूचिस्तानमध्ये गेली अनेक वर्षे पाकिस्तानपासून स्वातंत्र्यासाठी युद्ध सुरु आहे. बहुसंख्य बलूच लोक मुस्लिम असले तरी हिंगलाज माता मंदिराला त्यांच्या संस्कृतीचा भाग मानतात. ही संस्कृती जपण्यासाठी त्यांनी मंदिराच्या रक्षणासाठी बलूच लोकांची खासगी सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून दिली असून त्यांनी कित्येक वेळा मंदिराचे अतिरेकी हल्ल्यांपासून रक्षण केले आहे. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आजही हे मंदिर बलूच लोकांच्या बलिदानामुळे उभे आहे.
लेखनविषय:

वाचने 24193
प्रतिक्रिया 41

प्रतिक्रिया

उत्तम व माहितीपूर्ण लेखमाला. बलुच लोकांचं विशेष कौतुक. अडवाणींनी बहुधा एका पाकिस्तानभेटीत हिंगलज मंदिराला भेट दिली होती. मुशर्रफ यांची हुकूमशाही असताना पाकिस्तानातली मंदिरे त्यामानाने सुरक्षित राहिली. त्या राजवटीनंतर मात्र हिंदू प्रार्थनास्थळांवर होणारे हल्ले वाढले.

In reply to by एस

जसवंत सिंह गेले होते फेब्रुवारी २००६ मध्ये. त्यांची कुलदेवता आहे. ८६ लोकांना घेऊन राजस्थानातून हिंगलाजपर्यंत रस्त्याने प्रवास केला होता त्यांनी. लेखात उल्लेख करावा असे वाटले होते पण ऐन वेळी टाळले.

In reply to by एस

अडवाणींनी २००५ च्या पाकिस्तान भेटीत कटासराज मंदीराला भेट देऊन मंदीराच्या जीर्णोद्धाराचे भूमीपूजन केले होते. विधार्थी - या कटासराज मंदीराविषयी लिहिता येईल का? खालील संकेतस्थळावर पाकिस्तानमधील हिंदू मंदीरांविषयी माहिती दिलेली आहे. http://hindutemplespakistan.blogspot.in/

नेट वर का व्हॉट्सऍप वर एकदा एक माहीती आली होती की, दर वर्षी यात्रेच्या दरम्यान का पुर्ण वर्षभर (नीट आठवत नाही) भारताचा तिरंगा हिंगलाज माता मंदिरासमोर एका ध्वजस्तंभावर फड़कत असतो म्हणे?? ह्याबद्दल काही सांगता येईल का?? मुळात ही बातमी खरी आहे का होक्स आहे इथून सुरुवात आहे माझी तरी, आपण काही सांगू शकाल अशी अपेक्षा.

नानासाहेब, लेखासाठी केलेल्या वाचानादराम्यान भारतीय झेंड्याबद्दल वाचनात काही आले नाही हो. आणि पाकिस्तानात भारताचा झेंडा लावू देतील असे वाटत नाही मला.

हिंगलजा देवीची दखल घेतली गेली हे छान. महाराष्ट्रात हिंगलाज देवीशी जुळणारी गडहिंगलज, हिंगोली, उस्मानाबाद जिल्ह्यात हिंग्लजवाडी नावाचे गाव, शिवाय हिंगण/णा/णी अशी स्थलनामे ही महाराष्ट्रात दिसतात. आता जाहीरात : मराठी विकिपीडियावर हिंगलजा देवी बद्दल एक छोटासा लेख आहे. आता कॉपीराईटः धागा लेखातील एका छायाचित्रावर अगदीच सुस्पष्ट कॉपीराईट सूचना आहे किमान तेवढ्या छायाचित्रकाराच्या इच्छेचा आदर ठेवण्यास काय हरकत आहे ?

In reply to by माहितगार

जळगावमधे जुन्या गावात एक हिंगलाज माता मंदीर आहे. ती भावसार समाजाची इमारत ज्याला भावसार मढी म्हणतात. असे समजते कि हिंगलाज माता हि भावसार समाजाची कुलदैवत आहे. आता भावसार लोकांचा बलुचिस्तानाशी काय आणि कसा संबंध आहे ते माहित नाही.

In reply to by विनय पत्की

असे मानले जाते की भावसार समाज हा बलुचीस्तान व सिंध प्रांतातून migrate होत राजस्तान, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, कर्नाटक आन्द्र मध्ये पोहचला.

या विषयावर माझ्यासारख्या सर्वसाधारण माणसाला सहसा फारसे काही माहित नसते. या लेखमालेमुळे अशी अप्राप्य माहिती मिळतेच आहे, पुढिल भागांची वाट पाहत आहे. शुभेच्छा.

भानुशाली समाजाची कुळदेवता हिंगलाज देवी आहे. किंबहुना पाच सहाशे वर्षांपूर्वी गुजरात किंवा राजस्थानात स्थायीक झालेल्या बर्‍याच समाजाची ही कुलदेवता आहे. अलीबाग चौल रेवदंदा या भागात भानुशालींच्या बर्‍याच जमीनी -वाड्या आहेत.चौलला हिंगलाज देवीची स्थापना या समाजाने केली आहे. आता हे भानुशाली (भन्साळी ?) किनारपट्टीला कसे पोहचले हा आणखी एक वेगळा इतिहास आहे.

In reply to by रामदास

भानुशाली समाज किनारपट्टीवर कसा पोचला याबद्दल एक लेख लिहावा अशी आग्रहाची विनंती रामदास काकांना करतो

या लेखाच्या अनुषंगाने आपल्या इथल्या कोळी समाजाबद्दलही माहिती यायला हवी होती. इथला कोळी समाज हिंगलाज देवीचा भक्त आहे. वेसावकर मंडळींचं एक प्रसिद्ध कोळी गीत आहे. हिंगलाय देवी गो हिंगलाय देवी तू उभी हस वेसावे गावानु ! तुझे पुंजेला जमलाय गो लोक सारा देवलानू !! यातील एका कडव्यानुसार, वेसावे गावाच्या तळ्यात मूर्ती सापडली आहे. मागे लोकप्रभा/चित्रलेखा? मध्ये या देवीच्या भक्तांचे भारतात झालेले स्थलांतराबद्दल चांगली माहिती आली होती.

माहितीसाठी आणखी खोदकाम केले असता राणीवाडा (जलोर राजस्थान), बलोत्रा (बारमेर राजस्थान), मुसाफिरखाना अमेठी उत्तरप्रदेश), हिंगलजगढ (मंडसौर मध्यप्रदेश) या इतर ठिकाणि देवीची हिंगलजा मातेची मंदीरे असल्याचे दिसते. (अर्थात मुळ देवी बलोचीस्तानचीच राहते) विकिमिडीया कॉमन्सवर उपलब्ध झालेली काही छायाचित्रे हिंगलजगढ मध्यप्रदेश hinglaj mata कडसोर छोटीआ गुजराथ hinglajmata

भावसार समाजा विषयी थोडी माहिती त्या समाजाच्या website वरून. History of Bhavsars History or the Past is said to be a Mirror of Present. Our present directly or indirectly depends on our past. History has nothing to do with our present existence, but through someway or other it has played an important role in building our existence. Bhavsar Kshatriya Samaj, as name suggests is a community of Kshatriyas (the warriors). According to the epics and legendary Parshuram who was said to be an Avatar of Lord Vishnu, had vowed a vengeance against a community of warriors, where in the war he had wiped most of the warriors, off the earth.This had worried two young princes Bhavsingh and Sarsingh from Saurashtra who had foreseen their dynasty meeting its end. They had been directed to appeal Goddess Hinglaj at the holy shrine situated on the bank of river Hinghol in Baluchistan near Sindh which is now at Pakistan, where the goddess assured protection to their dynasty by compelling Parshuram to leave them alone, on one condition that none from their community would confront Parshuram. Bhavsar HistoryThe community Bhavsar was named after these two Princes Bhavsingh and Sarsingh. But as the historical period passed away, there was a certain phase of civilization wherein there was a cultural and economic stability in ancient India. In the mean time apart from being at the royal service, few members from the community started developing skills in stitching and dyeing clothes. These skills enabled them to grow as professional artisans and in turn Royal Tailors & Dress Designers. These artisans had to travel a lot as their skills were well known throughout the nation. That was how they settled down across the country adapting to the culture of the area where they settled down, yet maintaining their own. They could flourish just because they could adapt to any kind of situation and adopt the profession that was the need of time
महाराष्ट्रात मुख्यता विर्दभ मराठवाडा व खानदेशात भावसार समाज विखुरला आहे.

हिंगलाज माता शक्तीपीठ (हिंगलाज देवी, हिंगुला देवी) पाकिस्तानातील बलूचिस्तान प्रांतामधील ल्यारी जिल्ह्यातील हिंगलाज या गावात आहे. या देवीच्या बलुचिस्तानातील मंदिराचा पानिपतच्या लढाईत बंदी बनवून बलूचिस्तानात नेलेल्या मराठा सैनिकांशी असू शकेल काय ?

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

या देवीच्या बलुचिस्तानातील मंदिराचा पानिपतच्या लढाईत बंदी बनवून बलूचिस्तानात नेलेल्या मराठा सैनिकांशी असू शकेल काय ?
हे मंदीर कैक कैक शतके आधीचे अगदी भारतीय संस्कृतीतल्या जुन्यातल्या जुन्यात त्याची नोंद व्हावी. हं बंदी बनवून नेल्यानंतर त्यातील काही जणांना त्यांच्या गुलामीतून लपून छपून तेथे दर्शन घेता आले असेल किंवा आजच्याही काळात ते मंदीराचा आदर करत असतील तर तो भाग वेगळा

माहितीपूर्ण लेख. अपवादाने वाचायला मिळणार्‍या विषयावर लेखमालिका सुरु केल्याबद्दल धन्यवाद.

तरिक फतेह या माणसाने बरीच माहिती दिली आहे. ते स्वतः पाकिस्तान चे नागरीक होते. सध्या कॅनडाचे नागरिकत्व घेतले आहे. त्यांच्या मताप्रमाणे बलुचिस्तान हा प्रदेश पाकिस्तान ने बळ वापरून बळकावलेला प्रदेश आहे. त्यांची मते खूप पटण्यासारखी आहेत. मुळातूनच वाचण्यासारखी आहे. लिन्क

पुढिल भागांची वाट पाहत आहे.धन्यवाद

गुजरात-राजस्थान-सिंद मधल्या पांचाल, लोहाणा समाजाची ही कुलदेवता. ह्या देवीच्या स्वातंत्र्यपूर्वकाळातल्या यात्रेचे वर्णन आणि थोडे स्थळवर्णन असलेले 'मरुतीर्थ हिंगलाज' हे पुस्तक एके काळी प्रसिद्ध होते. त्यावर चित्रपटही निघालेला असावा. मला वाटते श्रीपाद जोशी या बहुभाषिक लेखकवर्यांनी (मराठी व्युत्पत्तिकोश पुनर्संपादित करणारे) यावर लिहिले आहे. कराचीतल्या एका मठातून वार्षिक पदयात्रा फाळणी होईपर्यंत निघत होती. हिंगलाजच्या काठी उगवणार्‍या एका वनस्पतीची छडी-मुबारक हातात धरून महंत यात्रा सुरू करून देत. यात्रिक लोक परत येताना नदीकाठावरून स्वतःसाठी या छड्या आणत. वाचताना खूप अद्भुत वाटले होते.

In reply to by राही

कराचीतल्या एका मठातून वार्षिक पदयात्रा फाळणी होईपर्यंत निघत होती. हिंगलाजच्या काठी उगवणार्‍या एका वनस्पतीची छडी-मुबारक हातात धरून महंत यात्रा सुरू करून देत.
अद्यापही ही परंपरा चालू आहे असे वाचल्याचे आठवते

In reply to by राही

सुधारणा : नदीचे नाव हिंगोल आहे. असेही वाचले आहे की येथली थोडी थोडी चिखल माती 'हिंगूळ' म्हणून यात्रिक घरी आणीत. पण हे तितकेसे विश्वासार्ह वाटत नाही. अर्थात मकरान वाळवंटात तप्त चिखल ओकणारे ज्वालामुखी आहेतच.

In reply to by राही

हा लोहाणा समाज सध्या व्यापार उद्योगात खूपच पुढारलेला आहे. पूर्व आफ्रिकेत असणाऱ्या गुजराती भाषिकांमध्ये लोहाणा समाजाचा वरचष्मा आहे. युगांडा देशाच्या वार्षिक महसुलाचा १० टक्के वाटा एकटा माधवानी समूह मिळवून देतो. माधवानी, लाखानी, राजानी अशी 'नी' ने शेवट असणाऱ्या नावांचा या समाजात खूपच बोलबाला आहे.

In reply to by सतीश कुडतरकर

लोहाणा समाज हा गुजराथी समाजाचा भाग असला तरी त्यांची भाषा कच्छी आहे.लोहाणा त्यांच्या रंगावरून आणि नाकावरून ओळखता येतात.लोहाणा आणि भाटीया (कंठी भाटीया) हे पंजाबातून शेकडो वर्षांपासून गुजरातेत स्थायीक झाले आहेत. किराणा भुसार माल -किरकोळ विक्रीची दुकाने हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. त्या सोबतच कोणत्याही देशात स्थायीक होण्याची धडाडी आहे. " बंबईका राजा कौन ? भिकू म्हात्रे हे आताचे उदाहरण झाले पण एके काळी लोहाणा आणि भाटीया हे मुंबईचे राजे होते . उदाहरणार्थ : राजाबाई टोवर बांधणारे प्रेमचंद रायचंद आता मुंबईची सूत्रे केव्हीओंकडे आहेत असे मानण्यास हरकत नसावी. विषयांतर नको. प्रतिसाद संपला.

लेखमाला होत्ये. पुभाप्र.

तेलगु सिनेमा 'साहसम्' हिंदी डबिंग The real jackpot हा या मंदिरावर आधारीत आहे. मुख्य मंदिर बदलून कथेनुसार केल्याचे जानवते. सिनेमा तांत्रिक द्रुष्ट्या बरा आहे. कुठल्यातरी वाहिनीवर सतत दाखविला जातो.

शेवटून दुसरे व तिसरे चित्र हे चन्द्रकुप या 'मड वोल्कॅनो' किंवा कर्दममुखी पर्वताचे आहे. हा प्रदेश भौगोलिक विविधतेच्या दृष्टीने भारतीय उपखंडात महत्वाचा असून केवळ येथेच चिखल ओकणारी अशी विवरे आढळून येतात. चन्द्रकुप हा यातील सर्वात मोठा चिखल ओकणारा पर्वत. (लहान व कमी जागृत विवरे अंदमान येथे आहेत)

हिंगलाज देवी हि भावसार समाजाशी निगडीत आहे. माझे एक मित्र आहेत श्री . सचिन बासुटकर त्यांच्या मते त्यांचे मुल अफगाणिस्थान मध्ये असून तीथे बासुट नावाचे गाव आहे त्यावरून त्यांचे आडनाव त्यांनी बासुटकर ठेवले. ते भावसार समाजाचे असून त्यांच्या समाजाचे काही नेते कराची हून हिंगलाज देवीला गेले होते तिकडून त्यांनी देवीचे मुळ छायाचित्र आणले . पानिपत युद्धात बंदी झालेल्या मराठी लोकांचा ह्याच्याशी संबंध असेल अथवा नसेल काही ठामपणे सांगता येत नाही. जे काही हजारो मराठा सैनिक अब्दालीने आपल्याबरोबर नेले . ते त्याने बलुचीस्थान च्या सरदारास खंडणी म्हणून देवून टाकले. ह्याच्या संबंधीचा एक लेख मागच्या लोकसत्ता दिवाळी अंकात आला होता. तोच मराठी समाज आज स्वतःला मराठा बुग्ती म्हनुवून घेत आहे व हा समाज प्रामुख्याने जमीनदार व प्रशासकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे. त्यांचे बरेच रीतीरिवाज मराठी रीतीला धरून आहेत प्रामुख्याने लग्नातले उदा. लग्नात मुहूर्त मेढ रोवणे आणि बहिणीने दार अडवून होणा-या मुलीची सून म्हणून देशील का अशी मागणी करणे .