मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

काकांना जेव्हा राग येतो...

फटू · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
रात्री नऊ साडे नऊची वेळ असावी. नुकतीच जेवणं झाली होती. जुनी जाणती माणसं निवांत बसली होती. अशातच बाल गोपाळ मंडळी आजी भोवती गोळा होऊन, "ए आज्जे आज्जे, आम्हाला गोष्ट सांग ना" असं म्हणून आपल्या आजीकडे हट्ट करू लागली. तेव्हा आजीनेही "बरं ठीक आहे बाळांनो" असं म्हणून गोष्ट सांगायला सुरुवात केली... एक होते काका. एक होता पुतण्या. काका होते भारताच्या पुर्वेकडच्या देशात. तर पुतण्या तिकडे साता-समुद्रापलिकडे पश्चिमेकडे सिलिकॉन व्हॅलीत... काका काय करतात हे तसं फार जणांना माहिती नव्ह्तं. पण त्यांचं व्यक्तीमत्व अगदी भारदस्त होतं. छान मिशा, चश्मा, टोपी... पुतण्या सिलिकॉन व्हॅलीत होता म्हणजे संगणक अभियंता असणार हे सांगायची गरज नाही. नुकतंच कॉलेज संपलेलं. त्यामुळे अगदी शाळकरी वाटायचा. तर हे काका पुतण्या दोघेही मराठी संस्थळांवर लेखन करायचे. काकांचं लेखन तसं काही खास न्हवतं. उगाच आपलं इकडचं तिकडचं काही तरी खरडायचे. आणि दोन चार मराठी संस्थळांवर टाकायचे. आणि पुतण्याही प्रतिभावंत होता असंही काही नाही. तोही असाच. र ला र आणि ट ला ट जोडून चारोळ्या पाडायचा. पण एकाच संस्थळावर टाकायचा. प्रामाणिक होता बिचारा. तो चारोळ्या "पाडतो" हे कबुल करायचा. उगाच महाकाव्य प्रसवल्याचा तो कधीही आव आणत नसायचा. तर एकदा काय झालं, काकांनी चारोळी लिहिणा-यांची खिल्ली उडवणारं काव्य लिहिलं आणि ते एका संस्थळावर टाकलं. हे तेच संस्थळ होतं जे पुतण्याला खुप आवडायचं... ज्याच्यावर पुतण्या आपलं लेखन टाकायचा... पुतण्याने काकांचं "चारोळी खिल्ली काव्य" वाचलं. त्याला ते आवडलं. कारण काकांनी वस्तूस्थितीचं वर्णन करणारं काव्य पाडलं होतं. पुतण्याने अगदी साधेपणाने "काकांच्या" काव्याला प्रतिक्रिया लिहिली आणि नंतर ते विसरुन गेला. या पुतण्याला अजून एक वाईट सवय होती. तो जालावर अनुदिनीही लिहायचा. आणि स्वता जाल विकासक असल्यामुळे आपल्या संगणकीय ज्ञानाचा वापर करुन, आपल्या अनुदिनीवर कोण कुठून येतं, किती वेळ थांबतं यावरही लक्ष ठेवून असायचा. तर त्या दिवशी काय झालं, पुतण्याच्या लक्षात आलं की त्याच्या आवडत्या संस्थळाच्या एका विशिष्ट पानावरुन खुप जाल मुशाफिर त्याच्या अनुदिनीकडे येत होते. पुतण्याने लगेच त्या पानाला भेट दिली आणि तो आश्चर्यचकीत झाला. हे तर तेच पान होतं ज्याच्यावर काकांनी ते "चारोळी खिल्ली काव्य" टाकलं होतं. याच काकांच्या काव्याला त्याने प्रतिक्रिया दिली होती. अरेच्चा त्याच्या प्रतिक्रियेला काकांनीही प्रतिक्रिया दिली होती. पण हे काय, काकांनी चक्क काळजात काटा बोचवल्याच्या गोष्टी केल्या होत्या. आणि म्हणूनच जाल मुशाफीर संस्थळावरून लगेच पुतण्याच्या अनुदिनीचा दुवा वापरून तो कोण आहे हे पाहण्यासाठी त्याच्या अनुदिनीवर जात होते. आणि कहर म्हणजे त्या प्रतिक्रियेमधला जसाच्या तसा मजकूर काकांनी पुतण्याला खाजगी संदेशातही पाठवला होता... (बहुतेक काका शाळेमध्ये "डेटा रीडंडन्सी" शिकलेले नसावेत ) पुतण्या हैराण. विचार करुन करुन परेशान. काकांना "काका" म्हटलं यात आपलं काय चुकलं हे त्या बिच्या-याच्या लक्षात येईना... कुठून अवदसा आठवली आणि "पिकल्या पानाला" काका म्हटलं असं त्याला वाटू लागलं. पुतण्या बिचारा अगदी सरळ साधा होता. त्याने काकांच्या प्रतिक्रियेला प्रतिक्रिया लिहिली आणि त्याने काकांची त्यांचं "नाव घेऊन" माफी मागितली. अगदी त्या खाजगी संदेशालाही माफी मागणारं प्रत्त्युत्तर दिलं (नाही तर काकांना पुन्हा राग यायचा. काकांना थोडी ना "डेटा रीडंडन्सी" कळते) ... आणि असं म्हणून आजीने आपली गोष्ट संपवली आणि त्या बाळ गोपाळांना विचारलं, "बाळांनो, या गोष्टीतून तुम्ही काय शिकलात ?" "ए आज्जे, मी सांगू ?" एक छोटी तत्परतेने म्हणाली. आणि आजीने हो म्हणताच त्या छोटीने गोष्टीचं तात्पर्य सांगितलं, "माणूस कितीही वयस्कर असला, टोपीवाला, मिशीवाला आणि चश्मावाला असला तरीही त्याला आदराने "काका" म्हणू नये. त्याचा त्याच्या नावानेच उद्धार करावा"

वाचने 3862 वाचनखूण प्रतिक्रिया 9

अनिल हटेला Tue, 09/16/2008 - 17:34
फटूचा कुठल्या तरी काका बरोबर पंगा झालाये अस वाटतये? काय रे बरोबर का? हे हे हे !! बैलोबा चायनीजकर !!! माणसात आणी गाढवात फरक काय ? माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..

आंबोळी Tue, 09/16/2008 - 17:50
हम्म्म! अजुन एक काका-पुतण्या वादाचे नक्षत्र आंतरजालावर उगवले.... वास्तविक इतिहासाला काका-पुतण्या वाद नविन नाही. महाभारतापासून लॉयन्-किंग पर्यन्त आणि पेशवाई पासून मिसळपाव पर्यन्त अनेक काका पुतणे वाद दीर्घकाळ सुरू आहे. या संदर्भात दोन्ही बाजूनी आरोपप्रत्यारोपाच्या ज्या दुगाण्या झाडल्या जातिल त्याला साहित्यिक दर्जा मिळावा असे वाटते. या अनुशंगाने "काका-पुतण्या वाद" असा नविन साहित्यिक प्रकार रुजू व्हावा आणि त्या विषयीचा ठराव अमेरिकेत होउ घातलेल्या साहित्यसम्मेलनात मांडून संमत करुन घ्यावा अशी मी संबंधीताना विनंती करतो. आंबोळी

In reply to by आंबोळी

सर्किट Tue, 09/16/2008 - 21:56
या अनुशंगाने "काका-पुतण्या वाद" असा नविन साहित्यिक प्रकार रुजू व्हावा आणि त्या विषयीचा ठराव अमेरिकेत होउ घातलेल्या साहित्यसम्मेलनात मांडून संमत करुन घ्यावा अशी मी संबंधीताना विनंती करतो. सहमत आहे. प्रस्ताव चांगला आहे. ह्या निमित्ताने "काका रुते कुणाला, आक्रंदतात कोणी" ह्या गाण्याचे गायन रावळे साहेब करतील. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)

विसोबा खेचर Wed, 09/17/2008 - 01:24
गावडेकाका, मस्तच लिहिलंय! :) या पुतण्याला अजून एक वाईट सवय होती. तो जालावर अनुदिनीही लिहायचा. हे बाकी क्लासच..! :) तात्या.

In reply to by विसोबा खेचर

सर्किट Wed, 09/17/2008 - 02:45
तात्या, तुमचा गैरसमज होतोय. हे नेहमीचे प्रकरण नाही, नवीन आहे. काका होते भारताच्या पुर्वेकडच्या देशात. म्हणजे सिंगापूर, बरे का ? आता खुलासा होईल. -- सर्किट (जालकवींच्या कविता:http://www.misalpav.com/node/2901)