झोंबी - आनंद यादव

वाचनछंद जनातलं, मनातलं
असचं कधीतरी, कोणीतरी वाचनासाठी सुचवलेलं. वाचायला हातात घेतल आणि मग वाचून पूर्ण होईपर्यंत ध्यासवेडीच होऊन गेले. आनंद यादव या व्यक्तीचे बालपण अतिशय प्रखर परिस्थितीतून गेलेय. हा बालपणी सोसावा लागलेला संघर्ष वाचताना डोळ्य़ातून अश्रूधारा वाहू लागतात. घरची बेताची परिस्थिती, त्यातच जोडीला ९ भावंडे. शाळेला जाण्याचा विचार करणेही जेथे गुन्हा ठरले होते, त्या घरातून एक ध्येयवेडा मुलगा शिक्षण पूर्ण करुन, डॉक्टर आनंद यादव होतो. आन्द्याचे शिक्षण इयत्ता चौथी पूर्ण होताच बंद केले गेले. नंतर त्याला शेतकीच्या कामामधे वडिलांच्या हाताखाली झिजावे लागले. 'झिजावे' हा शब्द अशासाठी वापरलाः त्याचे वडिल काम करण्यात चाल-ढकल करीत, शक्यतो सगळी कामे बायको-मुलांना करायला लावून स्वतः गावभर हिंडत असत. आईलाही दहा पोरांना सांभाळून, घरच-दारच आणि शेतातल काम बघावं लागे. घरात अगदी ३-४ वर्षाच्या मुलांनाही कष्टाची कामे करावी लागत होती. पुरेशा पाण्यआभावी अंघोळसुद्धा रोज करणे शक्य नव्हते. अस्वच्छता अन उपासमार ही रोजचीच जणू. अशा या वातावरणात, चौथी पास झालेला हा मुलगा शिक्षणाच्या ओढीने आत आत झुरत होता. इयत्ता चौथीपर्य्ंत त्याच्या आयुष्यात असे काही शिक्षक आले, ज्यांच्यामुळे त्याला भाषा, इतिहास या विषयांची गोडी लागली. शिक्षणाची ओढ इथेच जागि झाली. मग कसेबसे हाता-पाया पडून, वडिलांचा मार खाऊन पाचवीला प्रवेश घ्यायला परवानगी मिळाली. त्यातही १२ वाजेपर्यंत शेतातली कामे करायची आणि मगच शाळेला जायचे व पाच वाजता शाळा सुटली की लगेचच शेतात कामावर रुजू व्हायचे, या अटीवर शाळेला परवानगि मिळाली. अशा तंग परिस्थितीत, जमेल तेव्हा, जमेल तितकावेळ शाळेत जाऊन ज्ञानाचा थेंब न थेंब आनंदने अगदी चातकासारखा टिपला. शेतातील कामे करता करता अभ्यासाची उजळणी करत होता. घरुन वह्या-पुस्तकांसाठी पैसे मिळणे शक्य नव्हते. तेव्हा इतर काही कामे करुन, शेण्या विकून, गायी-म्हशींसाठी चारा विकून १-१ पै साठवून तो वह्या-पुस्तकांची गरज भागवीत असे. प्रसंगी घरी खोटे बोलून, घरामधे चोरी करुनही त्याने पैसे जमवले. अगदीच पुस्तके घेणे शक्य झाले नाही, तर तो वर्गमित्रांकडून पुस्तके आणून अभ्यास करत असे. प्राथमिक शाळेतील शिक्षकांना त्याच्या परिस्थितीविषयी आणि त्याच्या वडिलांच्या शिक्षणविरोधाविषयी कल्पना होती. त्यामुळे त्याला काही गोष्टींची सवलत मिळाली हेच एक वाईटामधे चांगले होते. कसाबसा अभासाठी वेळ काढून, त्याने सातवीची परीक्षा दिली आणि प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाला. त्यानंतरचे शालेय शिक्षण घेताना तर त्याला आणखीनच अडचणी आल्या. कारण पुढ़े काही कारणाने त्याला फी मधेही सवलत मिळेना झाली. फीसाठी १५ रुपये भरणेही त्याच्यासाठी शक्य नव्हते. अशावेळी त्याने आबाजी या आपाल्या मित्राची शिकवणी घ्यायला सुरुवात केली आणि पैसे जमविले. रोज कामाचा घाणा ओढून, शरीर, मन कितीही थकले तरी अभ्यासाचा कंटाळा केला नाही. वडिलांच्या शिव्या, मार खाऊनही शिक्षणापासून आनंद कधीही बधला नाही. अशातच कविता लिहीण्याचा छंद जडलेला. इथेच कधीतरी त्याच्या साहित्यिक मनाची रुजवण झाली. मॅट्रिकला असताना, शिक्षणासाठी घर सोडावे लागले. ६-७ दिवस केळीची साले खाऊन काढले. त्यानंतर मात्र घरच्यांनी शोधून त्याला परत आणले. या प्रसंगानंतर दहावीच्या शिक्षणासाठी वडिलांनी त्याची फारशी अडवणूक केली नाही. अशा या बिकट परिस्थितीतून वाट काढत आनंद दहावी पास झाला. हे सगळं होत असताना त्याच्या २ भावंडांचे मरणही त्याने पाहिले. कुपोषणाचे बळी असलेली काही भावंडे नाळरोगी होती तर काहींना अन्नआभावी माती खाण्याची सवय लागलेली. झोंबी या शब्दाचा अर्थच 'कुस्ती खेळणे' किंवा 'झगडणे' असा होतो. आईला एका मागोमाग एक मुले होत असल्याने तिची खालावणारी तब्येत, गरीबीमुळे होणारी उपासमार, भावंडांचे होणारे हाल, वडिलांचा अप्पलपोटेपणा, शिक्षणाला असलेला विरोध, आनंदला शाळेत जाण्यआधी आणि शाळेतून आल्यानंतर शेतात जास्तीत जास्त राबवून घेण्याकडे असलेला कल, कधीकधी तर शाळेत जाण्याच्या वेळेत्स मुद्दामच काही कामे काढून त्याची केलेली अडवणूक. या सगळ्या खडतर परिस्थितीवर मात करत, शिक्षणाच्या मार्गावरुन पाय हटू न देता आनंद कसा झगडत रहातो - याचे वर्णन म्हणजे झोंबी! पुस्तक वाचत असताना प्रसंगाची खोली जाणवते. जरुर वाचा.
वर्गीकरण
लेखनप्रकार

5 टिप्पण्या 3,579 दृश्ये

Comments

एस नवीन

थोडक्यात ओळख आवडली. 'झोंबी' अस्वस्थ करतं. तसंच प्रेरणाही देतं. असंच अजून एक आत्मचरित्र म्हणजे 'तराळ-अंतराळ' हे शंकरराव खरात यांचं.

चांदणे संदीप नवीन

In reply to by एस

असंच अजून एक आत्मचरित्र म्हणजे 'तराळ-अंतराळ' हे शंकरराव खरात यांचं.
+१ लेख आवडला! आनंद यादव यांना पुलंचीही बरीच मदत झालेली होती असे वाचल्याचे आठवते! ते वाचून मनात कुठेतरी खोलवर एक वेगळाच आनंद मिळाला. दोघांनाही माझे अभिवादन! ___/\___ Sandy

सिरुसेरि नवीन

+१. आनंद यादव यांनी 'झोंबी' नंतरचा पुढचा जीवनप्रवास "नांगरणी" आणी "घरभिंती" या पुस्तकांमध्ये रेखाटला आहे . यांमध्ये लेखकाची सद्य शहरी जीवनशैली व ग्रामीण भुतकाळ यांमधील कोंडी सांगितली आहे.