Skip to main content

मस्तानी-बाजीरावांचे वंशज

प्रकाशित मुखपृष्ठ
मस्तानी-बाजीरावांचे वंशज अजून आहेत याची गेल्या काही क्षणांपर्यत कल्पनाच नव्हती. फार-फार तर मस्तानी-बाजीरावांचा मुलगा शमशेर बहादूर-१ (कृष्णराव) पानिपतच्या तिसर्‍या युद्धात कामी आला एवढेच सर्वसाधारणपणे माहित असते. शमशेर बहादूर-१ हा बहुधा रघुनाथराव पेशव्यांचा समवयस्क आणि मस्तानी-बाजीराव या आपल्या पालकांच्या मृत्यू समयी जेमतेम सहा वर्षांचा असेल, त्याचे बालपण बहुधा शनिवारवाड्यावरच गेले असावे पुढे उत्तरप्रदेशातील बांदा येथील नवाबीयत त्याच्या नावावर करुन दिली गेली. त्याचा मुलगा अलिबहादूर (कृष्णसिंह) आणि त्याचा मुलगा शमशेर बहादूर-२ मराठासाम्राज्याच्या बाजूने इंग्रजांषी लढलेच, त्याच्या पुढच्या पिढीतील नवाबाली बहादूर झाशीच्या राणीच्या राखी येताच १८५७ मध्ये इंग्रजांशी कोणतीही तडजोड नकरता इंग्रजांच्या विरुद्ध लढला, इंग्रजांनी त्यांचे कुटूंब गाव न सोडण्याचे बंधन घालून इंदोरला हद्दपार केले इतके की १९४७ पर्यंत व्हॉइसरॉयच्या पुर्वपरवानगी शिवाय त्या कुटूंबीयांना इंदोर सोडण्यास परवानगी नव्हती. १९४७ नंतर कुटूंब मध्यप्रदेशातील सेहोर येथे स्थलांतरीत झाले, कुटूंबाचा इतिहास जपून असावेत असे वृत्तांवरून दिसते. संदर्भ: १) इंग्रजी विकिपीडिया :२) १९७४ पर्यंतची ऑनलाइन वंशावळ :३) आणि अधिक वाचन : मिरर वृत्तपत्रातील वृत्त

याद्या 13241
प्रतिक्रिया 33

बाजीराव आणि मस्तानीचे वंशज आहे हे या आधी वाचले होते आता या केसमुळे ते आणखीन प्रसिद्धिस आले. त्या वृत्तांत म्हटल्याप्रमाणे ज्यांनी ज्यांनी इंग्रजांशी जुळवुन घेतले त्यांची संपत्ती टिकली आणि आजही श्रीमंतीत आहे जे १८५७ च्या उठावात इंग्रजांविरुद्ध लढले ते उध्वस्त झाले यात पेशवे, राणी लक्ष्मीबाई आले. अजून एक अनुत्तरीत प्रश्न म्हणजे मस्तानीचा मृत्यु कसा आणि कधी झाला

In reply to by मित्रहो

दुसरा बाजीराव इंग्रजांविरुद्ध हरल्याने पेशवाई इंग्रजांच्या ताब्यात गेली. पण पेशव्याला ८ लाख रु पेन्शन मिळत होती. त्यावर दुसरा बाजीराव मनसोक्त जगला. वारसासाठी दोन चार लग्ने केली . पण अपयश आल्याने एक दत्तक मुलगा घेतला. नानासाहेब . राणे लक्ष्मीबाईचे इंग्रजांशी पेन्शन , कर्जे व दत्तक वारस यातून वाद होते. म्हणून झाशी पूर्णपणे इंग्रजांच्या ताब्यात गेली. झाशीचा राजा ( म्हणजे राणीचा सासरा ) पूर्वीच इंग्रजांचा मांडलिक झालेला होता. झाशी इंग्रजांचीच होती. स्वातंत्रासाठी लढले म्हणे ! मग यात पेन्शनचा मुद्दा कुठुन आला म्हणे ?

आई हिंदू आणि वडील मुस्लिम असतील तर मुलगा मुस्लिम हे एकवेळ समजू शकतो. पण आई (बहुधा) मुस्लिम आणि वडील हिंदू तरीही मुलगा मुस्लिम कसा काय हे नाही कळाले.

In reply to by उगा काहितरीच

ह्या सगळ्या वादांच्या गदारोळात तुम्ही फार महत्त्वाचा आणि उपयुक्त प्रश्न विचारला आहे. मलाही याचे उत्तर मिळावे असे वाटत आहे.

In reply to by विवेकपटाईत

मुसलमान स्रीच्या संततीस कोणत्या जातीत घालणार? ब्राह्मण करून घेणे तर शक्य नव्हते. :-) आता त्याच विद्वान ब्राह्मणांचे वंशज हिंदुत्वाच्या नावाने गळे काढत असतील ही गोष्ट वेगळी.

In reply to by नगरीनिरंजन

तशी ती संतती बाजीरावाचीही होती. आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती. वारसाहक्काने पद मागू नये म्हणून काहीतरी झोलझाल केलेला दिसतोय. वरून विरोध करणारे कोणी नसतील.

In reply to by संदीप डांगे

वारसाहक्काने मोठ्या मुलासच गादी मिळते. तसेही इतर पद मागण्यासाठी धर्माचा अडसर नसावा.

इतिहास काय सांगतो याच्याशी बय्राच लोकांना काही देणंघेणं नसतं केवळ त्याना उपयोगी पडणाय्रा घटनांचे राजकारण कसे करता येईल याची विवंचना असते.तसेच यांच्याकडे बराच मोठा अनुयायी गट असल्याने एकटा दुकटा जाणकार गप्प राहणे पसंत करतो.ऐतिहासिक वैर अथवा मोठ्या लढाया झालेले देशही आता गळेपडू मित्र झालेले दिसताहेत.१६३०,१८५७,१९४७वगैरेतील घटना वेगळ्या जोडून काहीतरी निष्कर्ष आज २०१५ ला काढून वाद का घालतात?पेशवे अथवा कुणाही मोठ्या घराण्यातला पहिला राजा कसा झाला हा प्रश्न इतिहासाच्या पानांतून वाचून पहा मग कळेल आपण ठिती निरर्थक वाद घालत आहोत. लेखाचा हेतू कळला नाही.

In reply to by कंजूस

लेखाचा हेतू कळला नाही.
प्रसंगपरत्वे माझ्या वाचनात आलेली माहिती इतरांसोबत शेअर करणे एवढाच उद्देश. वाद घालण्या करता इतर मंडळी आहेतच, चित्रपट विषयक वाद विषय सध्यातरी मुकपणे वाचतो आहे.

मिपाकर राजघराणं यांनी त्यांच्या चेपूवर थोरल्या बाजीराव व मस्तानी यांच्या थेट वंशजांमधील एक सदस्य नवाब जुल्फिकार बहादूर यांचा संदर्भ दिला आहे. लेखाच्या शेवटी दिलेला मिरर वृत्तपत्राचा दुवा माहितीपूर्ण आहे.

In reply to by आदूबाळ

माझ्या माहितीप्रमाणे ते बांदा कोल्हापूर जिल्ह्यात आहे. चंद्रपूर ते कोल्हापूर जिल्ह्यातले एक टोक असं महाराष्ट्राचं भौगोलिक वर्णन केल्या जातं.

In reply to by श्रीरंग_जोशी

मला वाटते गोवा-महाराष्ट्र सीमेवर एक बांदा(बांदे) गाव आहे. महाराष्ट्राच्या अगदी टोकाला. चांदा-बांदामधले बांदे ते हेच असावे.

In reply to by शैलेन्द्र

होय. मस्तानीच्या वंशजांचे बांदा बुंदेलखंडातले. पण चांद्यापासून बांद्यापर्यंतमधले बांदा हे अगदी टोकाचे गोव्याचे सीमावर्ती बांदासुद्धा असू शकेल. कारण चांद्यासारखे हे बांदादेखील महाराष्ट्राचे एक टोक आहे. जाता जाता : चंद्रपूर जिल्ह्याचे नाव प्रथम चांदा असेच होते. चांदा-भंडारा अशी जोडओळख होती या प्रदेशाची.

In reply to by राही

चंद्रपूर त्व कोल्हापूर ही मराठी हद्द सांगताना चांदा ते बांदा म्हणतात. बांदा हे गाव सावंतवाडी तालुक्यात आहे. तिथुय्न गोवा व कर्नाटक जवळ आहे. मोरुची मावशी नाटकात कांदा संस्थानची राणी बोलते ... इकडे चांदा तिकडे बांदा. मध्ये आमचं कांदा !

महाराष्ट्रात अलीकडच्या काळात मस्तानीला प्रकाशात आणले ते चित्रकार-समीक्षक-साहित्यिक श्री. द.ग.गोडसे यांनी. चाळीसपन्नास वर्षांपूर्वीच्या त्यांच्या समन्दे-तलाश(तर्काचा घोडा) या लेखसंग्रहात मस्तानीवर एक अप्रतिम लेख आहे. त्यात मस्तानीची तोपर्यंत मानल्या गेलेल्या बाजूपेक्षा अगदी वेगळी बाजू अत्यंत सहृदयतेने आणि उपलब्ध इतिहासाचा शोध घेऊन मांडली आहे. हा लेख अतिशय गाजला. त्याचा संदर्भ पुढील काळातल्या मस्तानीवरच्या ललितलेखनात अनेकदा घेतला गेला. या लेखामुळे मस्तानीला तर न्याय मिळालाच पण थोरल्या बाजीरावांचीही प्रतिमा अधिक उजळली, ती वर्तमानकाळाशी सुसंगत म्हणजे जातपात, धर्म याला फार महत्त्व न देणारी पुरोगामी, विधायक अशी झाली. प्रत्येकाने जरूर वाचावा असा हा लेख आहे. सध्या बाजीरावाचा विषय पुढे आलाच आहे

In reply to by राही

प्रतिसादातले शेवटचे वाक्य 'सध्या बाजीरावाचा विषय पुढे आलाच आहे' हे डिलीट करायचे राहून गेले आहे. ते अनावश्यक आहे.

माहितीपूर्ण दुवे आहेत. मस्तीनीची आई मुस्लिम असल्याने वडील छत्रसाल असले तरी तिला मुस्लिम समजले गेले, तसेच ती कृष्णभक्त असून तिच्या मुला नातवालाही हिंदू नाव दिले तरी नंतर मुस्लिमांत गणले गेले असे दिसते आहे. मात्र तिच्या आणि बाजीरावाच्या वंशजांनी कटुता न ठेवता आपले वागणे आदर्श ठेवले आहे. वाचून खूप छान वाटलं. आतातरी बाजीरावाचे वंशज म्हणून त्यांची अधिकृतपणे दखल घेतली जावी असे वाटते. तरच त्यांच्या पूर्वजांवर झालेल्या अन्यायाचे काही प्रमाणात परिमार्जन होईल.

In reply to by पैसा

सहमत... झालेच तर त्यांना हिंदूधर्मात परत घेता येईल काय हे ही बघता आले तर बरे. पण आता इतका वंश संकर झाल्यावर त्याला काही अर्थ राहिल काय असाही प्रश्न आहेच.

In reply to by पैसा

बाजीरावाच्या वंशजांनी कटुता न ठेवता आपले वागणे आदर्श ठेवले आहे. वाचून खूप छान वाटलं.
जर वंश दत्तक मुलाकडुन पुढे चालत असेल तर त्यांना बाजीरावाचे वंशज कसे म्हणता येइल? असाच प्रश्न मला शिवाजी महाराजांच्या वंशजांबद्दल पण आहे.

In reply to by संदीप डांगे

मस्तानीकडून असलेला वंशपट अखंडित आहे ना?
मस्तानीचा वंशपट आहे हो. मी त्या बद्दल नव्हतो म्हणत. जे सध्याला पेशवे आणि शिवाजी महाराजांचे वंशज म्हणत आहेत त्यांच्या बद्दल माझा प्रश्न होता. माझ्या माहीतीत कोल्हापूर गादी वर सुद्धा दत्तक मुलगाच बसला होता, सातारच्या गादीचे नक्की माहीती नाही. इथे वर १८५७ फेम नानासाहेब पेशवे सुद्धा दत्तक च होते असे म्हणले आहे. असे जर असेल तर सध्या जे शिवाजी आणि पेशव्यांचे वंशज म्हणुन वावरत आहेत, ते कीती रास्त आहे?

In reply to by प्रसाद१९७१

राघोबादादाने नारायणरावांचा खून करवला. त्याचे भूत राघोबादादाच्या मुलाला म्हणजे दुसर्‍या बाजीरावाला छळायचे ... तुझे राज्य बुडेल , घर जळेल , वंश संपेल असे ते बोलायचे. दुसर्‍या बाजीरावाने पंढरपुरात जावून देवधर्म केले. तॅ भूत शांत झाले होते म्हणे. १८१८ ला पेशवाई बुडाली. इंग्रजानी पेशव्याला दूर कुठेतरी ठेवले. ते भूत पुन्हा येऊ लागले. दुसरा बाजीराव निर्वंश झाला. नानासाहेब हा दत्तकपुत्र. पुढे १८५७ च्या उठावात इंग्रजानी बाजीराव रहात असलेले घरही जाळून टाकले. भुताचे तीन्ही शाप खरे ठरले म्हणे. .... भोसले व पेशवे गमिनांचे उच्चाटन करणार होते म्हणे... दोघांचेही वंश दत्तकपुत्र चालवत आ।हेत , असे ऐकुन आहे. सध्या आस्तित्वात असलेला पेशव्यांचा एकमेव वारसवंश मुसलमान आहे .

In reply to by प्रसाद१९७१

तिच्या आणि बाजीरावाच्या वंशजांनी
मला बांद्याच्या नवाबांबद्दलच बोलायचे होते. त्यांनी पानिपतच्या युद्धात आणि नंतर १८५७ मध्येही मराठ्यांचीच बाजू घेतली होती आणि लेखातले दुवे वाचलेत तर अगदी अलिकडच्या वंशजांबद्दलही फक्त कौतुकच वाटेल.