मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

विश्वाचे आर्त - भाग ७ - 'अ'चेतनापासून 'स'चेतनापर्यंत

राजेश घासकडवी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
'नावात काय आहे? गुलाब कुठल्याही नावाने तितकाच सुंदर दिसेल.' असे शेक्स्पीयर म्हणून गेला आहे. पण नावांमध्ये बरेच काही असते. आपण संकल्पनांना नावे देण्यासाठी शब्द वापरतो. या शब्दांचा आपल्या विचारांवर, त्यांच्या मांडणीवर आणि त्यामुळेच आपल्याला जग कसे दिसते यावर प्रचंड परिणाम होतो. आपल्याला पडणारे प्रश्न आपण भाषेतच मांडतो, आणि त्या प्रश्नांच्या आकलनावर आणि आपल्या उत्तर शोधण्याच्या पद्धतीवर शब्दांच्या मर्यादा पडतात. त्यामुळे अनेक संकल्पना त्यांना दिलेल्या नावांच्या खोक्यांत बंदिस्त होतात. याचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणजे सजीव आणि निर्जीव, किंवा सचेतन आणि अचेतन या कल्पना. सजीवांसारख्या सुंदर, क्लिष्ट, वैविध्यपूर्ण 'रचना' शून्यातून कशा निर्माण होऊ शकतील हा सर्वांनाच प्रश्न पडतो. आणि तसा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे, कारण दगडासारख्या निर्जीव वस्तू या समजायला आणि तयार व्हायला सोप्या असतात. ज्वालामुखीचे उद्रेक, भूकंप, पाऊस-वारा या पंचमहाभूतांना आता आपण सजीव मानत नाही. त्यांतून तयार होणाऱ्या वस्तू आणि घडणारे बदल आपल्याला काहीतरी नियमांनुसार समजून घेता येतात. दगड हे अशाच सर्वसाधारण, नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. पण निर्जीवापासून सजीव नैसर्गिक प्रक्रियेने कसे निर्माण होऊ शकतील? निर्जीव आणि सजीव हे तर परस्परविरोधी शब्द आहेत. त्यांच्या अध्येमध्ये काही नाही. वाळू निर्जीव - कुत्रा सजीव, पाणी निर्जीव - हत्ती सजीव हे इतके सरळसाधे आहे. या दोन काळ्या-पांढऱ्या कल्पनांमध्ये कुठेच राखाडी छटा नाहीत. मग अचेतनापासून सचेतन काहीतरी होईलच कसे तयार? किंबहुना याच ध्रुवीकरणातून 'सजीव हे वेगळ्याच कुठच्यातरी पदार्थाचे बनलेले असतात' किंवा 'त्यांच्यात कार्य करणारी काही एक वेगळीच शक्ती असते' अशा प्रकारचा युक्तिवाद 'प्राणवाद' (व्हायटॅलिझम) म्हणून प्रसिद्ध होता. आता आपल्याला माहीत आहे की आपण सगळेच नैसर्गिक मूलद्रव्ये आणि रेणूंपासून बनलेलो आहोत - बहुतांशी कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून. पण तरीही ही द्वैती विचारसरणी पूर्णपणे टाकून दिलेली नाही. रेने देकार्तचा द्वैतवाद - शरीर व मन हे दोन वेगवेगळे भाग आहेत असे म्हणतो. अजूनही आपण शरीर आणि आत्मा अशी विभागणी करतोच. शरीर म्हणजे अवयव आणि आत्मा हा त्यांचे नियंत्रण करणारा आपला 'स्व'. आपल्या डोळ्यासमोर असलेल्या स्वतःच्या उदाहरणामुळे सजीव हे 'स्व'ची जाणीव असलेले असतात हे कुठेतरी गृहित धरतो. त्यामुळे सजीव आणि निर्जीव यांमध्ये जमीन आस्मानाचं, न ओलांडता येणारे अंतर आहे असे आपल्याला सहज पटते. मग जड, स्थिर पदार्थापासून चालतेबोलते, श्वास घेणारे, विचार करणारे प्राणी तयार होणे शक्यच नाही असे वाटणे साहजिकच आहे. मग या कोड्याचे उत्तर शोधायचे कसे? अचेतनाच्या सपाटीपासून सचेतनाच्या कड्यावर उडी कशी मारायची? निर्जीवतेच्या निबिड काळ्या अंधारापासून सजीवतेच्या प्रकाशापर्यंत पोचायचे कसे? याचे उत्तर शोधण्याआधी प्रथम आपण या प्रश्नाच्या मर्यादा समजून घेऊ. अचेतन आणि सचेतन हे दोन शब्द आपल्या विचारांवर बंधन घालतात. आणि जगात दिसणारी प्रत्येकच वस्तू आपल्याला या दोन खोक्यांपैकी एकात घालायला भाग पाडतात. बदलणारी अक्षरे या चित्रामध्ये दोन अक्षरे "अ" आणि "स" दाखवलेली आहेत. त्यातल्या मधल्या आकृती ह्या अधल्यामधल्या अवस्था आहेत. मुळातच त्या दोन अक्षरांमध्ये साम्य असल्यामुळे ही चित्रे काढणे मला तितके कठीण गेले नाही. अ च्या उजवीकडे गेलो तर पहिल्या काही दोन निश्चितपणे अ वाटतात. मधली आकृती अर्धवट अ वाटते. तसंच स पासून डावीकडे गेलो तर होते पण मधली आकृती अर्धवट स वाटते. बहुतेकांना यात तीन अ, तीन स व एक त्यामधले काहीतरी असे दिसते. (काही लोक तीन अ व चार स म्हणतील) इथे डावीकडून उजवीकडे "अ"पण हळू हळू कमी झालेले आहे व "स"पण वाढलेले आहे या क्रमिक स्वरूपात मांडल्या आहेत. जर तुम्हाला मी या आकृत्या या क्रमाने न दाखवता मधूनच उचलून एक एक करून दिली असती तर तुम्हाला हे लक्षात आला असते का? तुम्हाला हो असे खात्रीने वाटत असेल तर इतर अक्षरे झाकून फक्त डावीकडून दुसर्‍या अक्षराकडे पहा व म्हणा "हा थोडासा स आहे" (१/६ स +५/६ अ)- तुमचे मन त्याला हे बरोबर नाही असे म्हणेल. आपण प्रत्येक आकृतीसाठी आपण अ आहे का? स आहे का? या प्रश्नाची हो किंवा नाही अशी डिजिटल उत्तरे शोधतो. आणि त्यांचे दोन गठ्ठे करून ते दोन खोक्यात भरतो. या खोक्यांच्या द्वारे विचार केल्यामुळे आपल्याला हळुवार फरक दिसत नाही. या खोक्यांमधून आपण जेव्हा सजीवांचा विचार करतो तेव्हा आपल्या डोळ्यासमोर आपल्या आसपास दिसणारे कुत्रा, मांजर, गायी, बैल, हत्ती, वनस्पती असतात. किडे-मुंग्यांनाही आपण सजीव म्हणतो. पण हे झाले आपल्या डोळ्यांसमोर दिसणाऱ्या सृष्टीबद्दल. जीवाणू सजीव आहेत का? अमीबा सजीव आहे का? अमीबा निदान एक पेशी तरी आहे - आणि आपल्याला माहीत असते की इतर सजीवही पेशींनी बनलेले असतात. मग निव्वळ काही हजार अणूंचा समूह असलेल्या विषाणूंचे काय? त्यांना आपण सजीव म्हणावे का? त्यांना सजीव म्हटले तर पंचाइत येते, कारण प्रयोगशाळेत असे विषाणू तयार केले गेले आहेत. ते जर योग्य पेशींमध्ये सोडले तर आपल्या प्रतिकृती तयार करतात - म्हणजेच सजीवांप्रमाणे कार्य करतात. मग सचेतन आणि अचेतनात नक्की फरक काय? माणूस-कुत्रा वगैरेंसारखे बुद्धिमान जीव, किडे-मुंग्यांसारखे काहीसे यांत्रिक जीव, वनस्पतींसारखे मेंदूही नसलेले जीव, ऑक्सिजनशिवाय जगणारे जीव अशा सर्व सजीवांना सामावून घेऊ शकेल अशी नक्की व्याख्या काय? हालचाल करणे, श्वास घेणे, विचार करणे, पाहाणे या सजीवांच्या क्रिया असतात. पण यातले नक्की एक काहीतरी बोट ठेवून खात्रीने म्हणता येत नाही की हे सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण. हालचाल यंत्र करतात, काही सजीव श्वासोच्छ्वास करत नाहीत, अनेक सजीवांना अवयव नसतात. पण एक गोष्ट सर्व सजीव निश्चित करतात. ती म्हणजे पुनरुत्पादन. अनुकुल परिस्थिती मिळाली तर परिसरातून कच्चा माल मिळवून आपल्यासारखीच दुसरी प्रतिकृती करण्याची क्षमता असणाऱ्यांना आपण सजीव म्हणतो. पुनरुत्पादन हेच सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. एकदा पुनरुत्पादनावर लक्ष केंद्रित केले की मग आपल्याला अचेतन आणि सचेतन यांच्यातली दरी नाहीशी करता येते. कारण या प्रकारचे 'पुनरुत्पादन' अगदी सोप्या स्वरूपात आपल्याला निर्जीवांमध्येही दिसते. उदाहरणार्थ मीठ. मीठाचा एक रेणू म्हणजे सोडियम आणि क्लोरीनचे एकमेकांना चिकटलेले अणू. जेव्हा मिठाचे द्रावण सुकते, तसतसे सोडियम आणि क्लोरीनचे पाण्यात विरघळलेले आयन एकत्र येतात. इतर तसेच आयन त्यांना चिकटत जातात. आणि हळूहळू मिठाचा स्फटिक वाढत जातो. याला अर्थातच आपण रूढ अर्थाने पुनरुत्पादन म्हणणार नाही. कारण नवीन तयार झालेली प्रतिकृती तिथेच चिकटून राहाते. आणि ती नवीन प्रतिकृती तयार करते. म्हणजे मिठाला मेंदू आहे, आणि ते ठरवून तशा प्रतिकृती तयार करते असा अर्थ नाही. किंबहुना पुनरुत्पादनाची ही अत्यंत सोपी, जुजबी अवस्था आहे. मिठाऐवजी आपल्याला जर वेगळ्या प्रकारच्या रेणूची कल्पना करता येईल. यात, प्रतिकृती तयार झाल्यावर ती मूळ 'पालका'पासून सुटी होते. आता बाहेरचे रेणू घेऊन हे दोन्ही रेणू प्रतिकृती तयार करू शकतात. आता एकाचे दोन, दोनाचे चार असे करत संपूर्ण क्षेत्र त्याच रेणूने व्यापले जाऊ शकेल. आता काही कारणाने या रेणूंभोवती एक साधंसे कवचसदृश काही तयार झालं, तर आपल्याला पहिली जुजबी पेशी मिळेल. ही प्रक्रिया जर काही कारणाने अधिकाधिक क्लिष्ट झाली तर आपल्याला सजीव आणि निर्जीव; सचेतन आणि अचेतन अशी काळ्यापांढऱ्या स्वरूपाची विभागणी टाळून अचेतनाच्या अ पासून ते सचेतनाच्या स पर्यंत चढत्या भाजणीने जाणारी मालिका दिसेल. आणि मग आपल्याला एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंतचा प्रवास होऊ शकतो ही कल्पनातरी करता येईल. थोडक्यात, ज्या संकल्पनांचा विचार आपण "असते/नसते" अशा काळ्या पांढऱ्या स्वरूपात करतो त्या बऱ्याच वेळा मधल्या अवस्थांना नाव न दिल्याने आपण या किंवा त्या खोक्यात टाकलेल्या असतात. हे चुकीचे आहे असे नाही - कारण तशी वर्गवारी करणे उपयुक्त असते. फक्त आपण ते करतो आहोत याचे भान विसरता कामा नये. कारण जेव्हा एका स्थितीचा दुसऱ्या स्थितीत बदल होतो तेव्हा त्या मधल्या अवस्थांचाच विचार करावा लागतो. साध्या रेणूंपासून ते विचार करणाऱ्या जीवांपर्यंतचा प्रवास बघायचा असेल, तर मधल्या अवस्था महत्त्वाच्या ठरतात. "जडतेला मना मनाचा पोत" कसा आला हे पाहायचा असेल तर... "अ"चेतनाचा "स"चेतन कसा झाला हे जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला हे निरुपयोगी खोके तोडून टाकले पाहिजेत व खोक्याच्या बाहेर जाऊन विचार केला पाहिजे. (मी मराठी लाइव्हवर पूर्वप्रकाशित)

वाचने 17951 वाचनखूण प्रतिक्रिया 53

संदीप डांगे Sat, 12/19/2015 - 21:38
जसजशी मालिका पुढे जात आहे तसतशी ती अधिकाधिक रिकामी होत जात आहे. रिकामी म्हणजे (आम्हाला वादाला विषय, मुद्दा सापडत नाही आहे असे नसून) उत्क्रांतीच्या दृष्टीने काही विशेष भर पडल्याचे जाणवत नाही. कदाचित तुम्हाला जे सांगायचे आहे ते समजायला तेवढा आइन्स्टाईन मेंदू मजकडे नसेल... ;-)

In reply to by संदीप डांगे

राजेश घासकडवी Sat, 12/19/2015 - 21:51
उत्क्रांतीची संकल्पना समजावून घेणं तितकं कठीण नाही. मात्र ती मनात पक्की ठसण्यासाठी काही दृष्टिकोनातले बदल आवश्यक आहेत. 'निर्जीवापासून सजीव निर्माण होऊच शकत नाही' - हा दृष्टिकोन काळ्या पांढऱ्या मांडणीतून येतो. असा काळा-पांढरा फरक नसून हळुवार, टप्प्याटप्प्यांनी होणारा बदल आहे हे सांगणं महत्त्वाचं आहे. तेवढंच या लेखात सांगितलेलं आहे. वर्तमानपत्रासाठी मर्यादित शब्द उपलब्ध असल्यामुळे एका लेखात एक लहानशी संकल्पनाच मांडणं शक्य आहे. मग कधी ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेविषयी माहिती असेल, किंवा असा दृष्टिकोनातला फरक सांगणं असेल. त्यामुळे संपूर्ण चित्र निर्माण व्हायला वेळ लागेल. तुम्ही जर हे पुस्तक म्हणून वाचत असता, तर आत्ता फक्त पंचवीसेक पानांचा ऐवज झालेला आहे. तेव्हा सगळ्या संकल्पना, सगळी उत्तरं मिळायला वेळ लागणारच.

विवेक ठाकूर Sat, 12/19/2015 - 23:16
काय बोलताय! चेतना हे सर्व सजीवाचं एकमेव व्यवच्छेदक लक्षण आहे. आणि पुनरूत्पादनाची क्षमता केवळ चेतन सजीवांकडे आहे. दगड आपल्यासारखा दगड निर्माण करू शकत नाही. 'पुनरुत्पादन' अगदी सोप्या स्वरूपात आपल्याला निर्जीवांमध्येही दिसते. निर्जीव घटकांच्या तुम्ही वर्णन केलेल्या वेगवेगळ्या प्रतिकृती म्हणजे पुनरूत्पादन नव्हे.

In reply to by विवेक ठाकूर

म्हसोबा Sat, 12/19/2015 - 23:23
उत्क्रांती ज्या अवकाशात होते ते अवकाश त्यांना कळले आहे असे वाटत नाही. म्हणूनच ते असे काहीबाही लिहित आहेत. एकदा तुम्ही त्यांना ते अवकाश समजावून सांगा ना. एकदा ते अवकाश त्यांना कळले की ते शुन्यावस्थेत जातील आणि असले लेख लिहिण्याची त्यांना गरजच भासणार नाही.

In reply to by म्हसोबा

विवेक ठाकूर Sat, 12/19/2015 - 23:44
ते डोळ्यासमोर असून दिसत नाही कारण ज्ञानेंद्रियांचे म्यूटेशन झाल्याशिवाय त्याचा बोध होत नाही. जे लोक माहिती गोळा करण्याच्या मागे आहेत त्यांना अवकाशाचा उलगडा अशक्य आहे.

In reply to by विवेक ठाकूर

म्हसोबा Sun, 12/20/2015 - 00:15
अवकाशाचा बोध होण्यासाठी हयात घालवावी लागते
खरं आहे. प्रणाम स्विकारा. __/\__
ते डोळ्यासमोर असून दिसत नाही कारण ज्ञानेंद्रियांचे म्यूटेशन झाल्याशिवाय त्याचा बोध होत नाही. जे लोक माहिती गोळा करण्याच्या मागे आहेत त्यांना अवकाशाचा उलगडा अशक्य आहे.
अगदी अगदी. कुठे आपल्यासारखे ज्ञानसंपन्न "स्व" गवसलेले अधिकारी पुरुष आणि कुठे डार्विन आणि डॉकिन्सची पुस्तके वाचून आपल्याला उत्क्रांती कळल्याचा अविर्भाव आणणारे "विदागारी" पुरुष. मृत्यूशय्येवर असताना यांचा डार्विन देवाला शरण गेला होता. उत्क्रांतीच्या बापानेच आपल्या तिला अंतःकाळी वार्‍यावर सोडले. तीच गत त्या डॉकिन्सची. "नास्तिकांचा शिरोमणी" असा त्याचा उल्लेख त्याचे चमचे करतात. मात्र तोच म्हणतो की "देव अस्तित्वात नाही असे मी ठामपणाने म्हणू शकत नाही".

म्हसोबा Sat, 12/19/2015 - 23:26
संदिप डांगेंशी सहमत. हा लेख खुपच उथळ वाटला. लेखकाचे या विषयाचे आकलन कदाचित चांगले असेलही; मात्र इथे शब्दांत व्यक्त करताना तो कमी पडला आहे असे खेदाने म्हणावेसे वाटते.

विवेक ठाकूर Sat, 12/19/2015 - 23:36
शरीर म्हणजे अवयव आणि आत्मा हा त्यांचे नियंत्रण करणारा आपला 'स्व'. आपल्या डोळ्यासमोर असलेल्या स्वतःच्या उदाहरणामुळे सजीव हे 'स्व'ची जाणीव असलेले असतात हे कुठेतरी गृहित धरतो. हे तर भयानक विधान आहे आणि खरं तर त्यामुळेच सचेतन आणि अचेतनात घोळ झाला आहे. `स्व' ची जाणिव (मी आहे) फक्त मानवाला आहे. आणि त्यामुळेच तर `मी कोण?' असा आध्यात्मिक प्रश्न निर्माण होतो. इतर कोणत्याही सजीवाला `मी आहे' अशी जाणिव नसते. त्यामुळेच तर त्यांना `मी नसेन' अशी भीती नसते किंवा मृत्यू ही कल्पना करता येत नाही. आणि मृत्यूच्या रहस्याचा उलगडाच तर अमृताचा शोध घेण्याचा ध्यास आहे. आणि तोच तर आध्यात्माचा केंद्रबिंदू आहे.

In reply to by विवेक ठाकूर

म्हसोबा Sun, 12/20/2015 - 00:20
विठासर, "मी कोण आहे?" या प्रश्नाचं उत्तर मिपा-नास्तिक शिरोमणी यांच्या एका लेखात वाचले होते. अतिशय गमतीशीर असे ते उत्तर होते. त्यांच्या म्हणण्यानूसार "मी कोण आहे" या प्रश्नाचं उत्तर आपल्या पॅन कार्डवर किंवा पासपोर्टवर असते. आता पॅन कार्डवर किंवा पासपोर्टवर असणारे नाव ही त्या देहाची ओळख आहे; "स्व"ची ओळख वेगळी असते हे यांना कोण समजावणार.

In reply to by म्हसोबा

संदीप डांगे Sun, 12/20/2015 - 00:35
तिथेच आम्ही हाही प्रश्न विचारला होता की ज्याचा पासपोर्ट नाही, आई-बाप माहित नाही त्याची ओळख काय बॉ...? यनावाला काही उत्तर देईनात. त्या प्रश्नाचा मागोवा घेत ही मालिका आली आहे. बघूया ती शोधमोहिम पासपोर्ट पर्यंत कशी जाते ती.

In reply to by विवेक ठाकूर

मार्मिक गोडसे Sun, 12/20/2015 - 11:55
इतर कोणत्याही सजीवाला `मी आहे' अशी जाणिव नसते. त्यामुळेच तर त्यांना `मी नसेन' अशी भीती नसते किंवा मृत्यू ही कल्पना करता येत नाही.
वाघ मागे लागल्यावर हरीण का पळते? कोंबडी आपल्या पिलांपासून फार दूर का जात नाही?

In reply to by मार्मिक गोडसे

आनन्दा Sun, 12/20/2015 - 12:27
अगदी हाच प्रश्न विचारायला आलो होतो. किंबहुना आमची आजी तर सांगायची की तो रस्त्यातल्या दगडाला सुद्धा आत्मा आहे, आणि त्याला पण तुम्ही उगीच पाय लावलात तर दु:ख होते. बाकी माझ्या माहितीनुसार
इतर कोणत्याही सजीवाला `मी आहे' अशी जाणिव नसते. त्यामुळेच तर त्यांना `मी नसेन' अशी भीती नसते किंवा मृत्यू ही कल्पना करता येत नाही.
ही धारणादेखील एका मध्यपूर्वेतील पंथात आहे खरी. पण तो वेदांतप्रणित धर्म नव्हे.

In reply to by आनन्दा

विवेक ठाकूर Mon, 12/21/2015 - 09:42
इतर कोणत्याही सजीवाला `मी आहे' अशी जाणिव नसते. म्हणजे मी इतरांपेक्षा किंवा निसर्गापेक्षा वेगळा आहे अशी जाणिव नसते. त्यामुळेच तर त्यांना `मी नसेन' अशी भीती नसते किंवा मृत्यू ही कल्पना करता येत नाही. सर्व सजीवांमधे नैसर्गिक प्रेरणा सक्रिय असते त्यामुळे, तहान-भूक लागणे, स्वतःचा जीव वाचवणे वगैरे क्रिया आपसूक घडतात. उदा. कोणताही दिशादर्शक नसतांना, भूक लागल्यावर प्राणी भक्ष्य किंवा खाद्य शोधतो, दिगंत आकाशात उडणारा पक्षी पुन्हा स्वतःच्या घरट्यात येतो; त्यासाठी `मी आहे' अशी जाणिव असावी लागत नाही. अचेतनात मात्र अशा कोणत्याही क्रिया घडत नाहीत. किंबहुना आमची आजी तर सांगायची की तो रस्त्यातल्या दगडाला सुद्धा आत्मा आहे, आणि त्याला पण तुम्ही उगीच पाय लावलात तर दु:ख होते. आत्मा या शब्दाचा आध्यात्मिक अर्थ आकाश असा आहे. ते सर्वव्यापी असल्यानं प्रत्येक अणू-रेणूला अंतर्बाह्य व्यापून आहे. दगडात प्राण नसल्यानं त्याला भावना नसतात. तरीही आपण सर्वांप्रती संवेदनाशिल असावे असा आजीच्या बोलण्याचा अर्थ आहे.

In reply to by विवेक ठाकूर

मार्मिक गोडसे Mon, 12/21/2015 - 11:53
स्वतःचा जीव वाचवणे वगैरे क्रिया आपसूक घडतात
स्वतःचा? म्हणजे कोणाचा? प्राण्यांमध्ये स्वतःचा जीव वाचवायचा इन्नेट बिहॅविअर कसा काय आला? कोंबडी आपल्याच पिलांना वाचवायचा का प्रयत्न करते? पक्षी आपल्याच घरट्यात का येतात ?

In reply to by मार्मिक गोडसे

विवेक ठाकूर Mon, 12/21/2015 - 16:14
इतर सजीवांमधे `मी' नाही म्हणून `माझा' सुद्धा नाही, त्यामुळे निर्वैयक्तिपणे नुसतं `जीव' असं म्हणायला हवं. थोडक्यात, सर्व सजीव सृष्टीत निसर्गच कार्यरत आहे आणि निसर्ग ही सेल्फ सपोर्टींग, सेल्फ बॅलन्सींग आणि त्यातल्या सर्व घटकांच्या इंटरडिपेंडसवर आधारलेली एक ऑरगॅनिक सिस्टम आहे. त्यामुळे किती पाऊस पाडायचा, कुठे भूकंप घडवायचा, कुठले जीव निर्माण करायचे आणि कुठले लयाला न्यायचे असे अनंत आणि अगम्य निर्णय निसर्ग क्षणोक्षणी आणि सायमल्टेनीयसली घेत असतो. अवकाशाच्या अथांग पोकळीत निसर्ग आपल्या पुनरावृत्ती, स्थिती आणि लयीची योजना स्वतःच करतो. तस्मात `कोंबडी आपल्याच पिलांना वाचवायचा का प्रयत्न करते?' याचं उत्तर कोंबडीच्या माध्यमातून निसर्ग पिल्लं वाचवण्याचा निर्णय घेतो. आणि पक्षी आपल्याच घरट्यात येतो कारण निसर्गाला त्या पक्षाच्या अस्तित्त्वाची गरज असते. आणि `प्राण्यांमध्ये स्वतःचा जीव वाचवायचा इन्नेट बिहॅविअर कसा काय आला?' याचं ही उत्तर निसर्गाला त्यांचा जीव वाचावासा वाटतो म्हणून असं आहे. आता तुमच्या लक्षात येईल की `सध्या आपला श्वास का चालू आहे? ' तर निसर्गाला या क्षणी त्या देहाची गरज आहे म्हणून !

In reply to by विवेक ठाकूर

मार्मिक गोडसे Mon, 12/21/2015 - 18:38
'जीव' म्हणजे काय? तो कोठे असतो?
अवकाशाच्या अथांग पोकळीत निसर्ग आपल्या पुनरावृत्ती, स्थिती आणि लयीची योजना स्वतःच करतो.
निसर्ग म्हणजे कोण? असा असमतोल का करतो व समतोल साधण्याचा प्रयत्न 'का' व कोणासाठी केला जातो?
याचं उत्तर कोंबडीच्या माध्यमातून निसर्ग पिल्लं वाचवण्याचा निर्णय घेतो.
ही कोंबडी मृत पावल्यास दुसरी कोंबडी त्या अनाथ पिलांचे स्वतःहून संगोपन का करत नाही? ही पिल्लं मरणार असतील तर त्यांना जन्मालाच 'का' घातले जाते?
`सध्या आपला श्वास का चालू आहे? ' तर निसर्गाला या क्षणी त्या देहाची गरज आहे म्हणून !
श्वासाचा देहाशी काय संबंध? श्वास न घेताही काही प्राणी जगतातच की.

In reply to by मार्मिक गोडसे

विवेक ठाकूर Mon, 12/21/2015 - 21:26
'जीव' म्हणजे काय? तो कोठे असतो? जीव कसा जातो याचं उत्तर सापडलं की वरच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल. निसर्ग म्हणजे कोण? असा असमतोल का करतो व समतोल साधण्याचा प्रयत्न 'का' व कोणासाठी केला जातो? निसर्ग म्हणजे कोण याची माहिती झाल्यावर तो कायम संतुलनातच असतो हे लक्षात येईल. ही कोंबडी मृत पावल्यास दुसरी कोंबडी त्या अनाथ पिलांचे स्वतःहून संगोपन का करत नाही? ही पिल्लं मरणार असतील तर त्यांना जन्मालाच 'का' घातले जाते? याचं उत्तर निसर्गाला विचारलं तर मिळू शकेल. श्वासाचा देहाशी काय संबंध? श्वास दिर्घ काळ बंद केल्यास तो कळेल. श्वास न घेताही काही प्राणी जगतातच की. याबाबत पुढील माहिती लेखकाला विचारावी.

In reply to by विवेक ठाकूर

मार्मिक गोडसे Tue, 12/22/2015 - 10:06
जीव कसा जातो याचं उत्तर सापडलं की वरच्या प्रश्नाचं उत्तर देता येईल
हेवन रिटर्न व्यक्तीला ह्याचे उत्तर माहीत नसेल ह्यावर माझा विश्वास बसत नाही.
श्वास दिर्घ काळ बंद केल्यास तो कळेल.
तुम्हाला कळला का?
याबाबत पुढील माहिती लेखकाला विचारावी.
तुम्हाला इतर जीवांना 'स्व' ची जाणीव व मृत्युची कल्पना नसते ह्याचे ज्ञान आहे मग इथेच का तुमचे ज्ञान अपुरे पडते. अहो ह्या प्रश्नाचे उत्तर एखादा शाळकरी विद्यार्थीही देऊ शकेल. बरोबरच आहे म्हणा एखाद्या अध्यात्मिक विश्वातील जंताला विज्ञानाच्या विश्वातील काय माहीती असणार? आणी हो सदर लेखकाची लेखमाला अजून संपलेली नाही. अर्धवट माहीतीवर शंका काढणे मला योग्य वाटत नाही,लेखमाला संपेपर्यंत मी धीर धरू शकतो.

In reply to by मार्मिक गोडसे

विवेक ठाकूर Tue, 12/22/2015 - 10:53
हेवन रिटर्न व्यक्तीला ह्याचे उत्तर माहीत नसेल ह्यावर माझा विश्वास बसत नाही. हेवन इथेच आहे हे समजलेली व्यक्ती फालतू प्रश्नात पडत नाही. श्वास दिर्घ काळ बंद केल्यास तो कळेल. श्वासाचा आणि देहाचा संबंध तुम्हाला जाणून घ्यायचा आहे. मग इथेच का तुमचे ज्ञान अपुरे पडते श्वास आणि देहाचा संबंध काय ? इतका आगाध प्रश्न पडलेल्या विद्वानाला काय समजणार!

In reply to by विवेक ठाकूर

मार्मिक गोडसे Tue, 12/22/2015 - 11:43
जंताच्या देहाला श्वासाची गरज लागत नाही. आणी हो, जंताला मेदूही नसतो बरं का, त्यामुळे त्याला फालतू प्रश्नही पडत नाही.

निव्वळ अप्रतिम लेख ! बारावीत अभासलेला https://en.wikipedia.org/wiki/Miller%E2%80%93Urey_experiment मिलर एक्क्ष्पेरिमेन्ट आठवला ! miller - अवांतर : बाकी रेने देकार्तसरांचा उल्लेख उगाचच वाटला , इथे अगदीच इर्रीलेवंट , असो , त्यांच्या लेखनाविषयी एकदा आपल्याशी सविस्तर चर्चा करायची आहे

कवितानागेश Sun, 12/20/2015 - 05:31
हां भाग अतिशय आवडला. याबद्दलच मी प्रश्न विचारणारहोते, की रेणू ना आपल्यासारखेच इतर रेणू अवति भवति असण्याची गरज का निर्माण होते? हां नक्की कुठला निसर्गनियम आहे? याच्यानंतर खरे तर पुढे कवच कसे तयार झाले हे बीअघण्यापेक्षा, नियम समजून घेण्यासाठी अजून सूक्ष्म स्तरावर जाणे आवश्यक आहे. कारण सजीव निर्जीव हां आपण आपल्या समजूतीप्रमाणे सोयीप्रमाणे केलेला भेद आहे. शरीरातल्या आणि बाहेराच्याही ऑक्सीजन साठी नियम तेच राहणार. तेंव्हा रेणूनचा हां गुण लक्षात आल्यावर खरे तर हे बघायला हवे की असाच गुण अणूंमध्ये दिसतो का? एका प्रकारचा अणू सोबतीसाठी तसाच दूसरा अणू अवकाशात शोधतो का? (सॉरी फॉर कर्तरी प्रयोग! :) ) त्यापेक्षा सूक्ष्म कणांचे काय? मूलकाणांपासून हायड्रोजन कसा तयार झाला हे एकवेळ कळेल, ( आत्ताच क्वार्क्स पर्यन्त जात नाही.)पण पुढच्या सगळ्यांचे काय? इतक्या जास्त जास्त प्रमाणात एकसारखे मूलकण एकत्र येउन एक एक अणू सिस्टम तयार का होते? यामागे काही नियम आहेत का? एंट्रॉपी चा इथे काही संबंध आहे का? असे सगळे प्रश्न तयार होतात... अजूनही बरेच काही....

In reply to by कवितानागेश

आनन्दा Sun, 12/20/2015 - 12:30
तेंव्हा रेणूनचा हां गुण लक्षात आल्यावर खरे तर हे बघायला हवे की असाच गुण अणूंमध्ये दिसतो का? एका प्रकारचा अणू सोबतीसाठी तसाच दूसरा अणू अवकाशात शोधतो का? (सॉरी फॉर कर्तरी प्रयोग! :) )
एक अणु याचे उत्तर आहेच की. हे सगळे रेणू एक अणु स्थिर राहत नाही म्हणूनच तर तयार होतात. का? - त्याचे उत्तर त्यांच्या अ‍ॅटोमिक वेट मध्ये असते.

In reply to by कवितानागेश

राजेश घासकडवी Sun, 12/20/2015 - 19:23
रेणू ना आपल्यासारखेच इतर रेणू अवति भवति असण्याची गरज का निर्माण होते?
गरज शब्द योग्य नाही, कारण त्यात इच्छा, इच्छापूर्ती अध्याहृत आहेत. मात्र मिठाचं उदाहरण पाहिलं त्यात सोडियम आयन आणि क्लोराइड आयन एकत्र येतातच. असे घटक अणू, आयन्स एकत्र येऊन मिठावर मिठाचे थर जमा होतात. आणि मिठाचं उदाहरण अगदी साधं झालं - डीएनए आणि आरएनए हे रेणू रेण्वीय यंत्रं वापरून अक्षरशः स्वतःची कॉपी मॅन्युफॅक्चर करतात. तो प्रचंड भन्नाट विषय आहे.
एका प्रकारचा अणू सोबतीसाठी तसाच दूसरा अणू अवकाशात शोधतो का? (सॉरी फॉर कर्तरी प्रयोग! :) )
हो, त्याची उदाहरणंही दिसतात की. आता हायड्रोजनचा अणू हा एकटा सापडत नाही. तो दुसऱ्या हायड्रोजन अणूबरोबर संलग्नच सापडतो.
इतक्या जास्त जास्त प्रमाणात एकसारखे मूलकण एकत्र येउन एक एक अणू सिस्टम तयार का होते?
हायड्रोजन आणि हेलियम बिग बॅंगनंतर अगदी थोड्या काळात तयार झाले. मात्र इतर अणू ताऱ्यांमध्ये तयार झाले. अणू म्हणजे शेवटी मूलभूत कणांची एक स्टेबल रचना आहे. ती तयार करायला प्रचंड ऊर्जा लागते. ती ताऱ्यांमध्ये असते.

अर्धवटराव Sun, 12/20/2015 - 12:28
'अ' ते 'स' चा प्रवास म्हणजे 'अ' ची फोलपटं उतरुन 'स' रुप धारणे म्हणावं काय? तसं असेल तर 'अ' मधे 'स' अगोदरपासुन होताच. 'स' अवतरायला कुठल्याची क्लीष्ट रासायनीक प्रक्रीयेची गरजच नाहि. बाकी गुर्जी... तुम्ही पण 'आध्यात्म - विज्ञान समन्वयाच्या' वाटेला लागला कि काय ?? ;) म्हणजे बघा, 'अ' मधे 'स' नेहमीच वीरजमान असतो, केवळ त्याचं रूप बदलतं हे म्हणजे सर्वत्र चैतन्यरूप ब्रह्म ओतप्रेत भरले आहे केवळ देहाचा पसारा बदलतो, या टाईपचं वाटलं :प. या विषयी मिपावर एक अत्यंत टुकार लेख येऊन गेला नुकताच. तिथे लेखकाला आध्यात्म आणि विज्ञान, दोन्हिबद्दल किमान योग्य माहिती आहे कि नाहि हा प्रश्न पडला होता. असो.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा Sun, 12/20/2015 - 12:34
पण मुळात उत्क्रांतीवाद तर हेच सांगतो. फक्त त्यामध्ये कोणी कर्ता (देव) नसून हे सगळे निसर्गाच्या नियमांनुसार आपोआप होत आहे असे म्हणतो.
'अ' ते 'स' चा प्रवास म्हणजे 'अ' ची फोलपटं उतरुन 'स' रुप धारणे म्हणावं काय? तसं असेल तर 'अ' मधे 'स' अगोदरपासुन होताच. 'स' अवतरायला कुठल्याची क्लीष्ट रासायनीक प्रक्रीयेची गरजच नाहि.
बाकी याचा अर्थ कळला नाही. प्रक्रियाच नाही असे म्हणायचे आहे का? तर ते चूक आहे. आणि प्रकिया आहे हे एकदा मान्य केले की ती क्लिष्ट आहे की नाही याला अर्थ नाही. माकडाचा माणूस होणे आणि "अ" चा "स" होणे हे दोन्ही आपला सारखेच क्लिष्ट वाटते का?

In reply to by आनन्दा

अर्धवटराव Sun, 12/20/2015 - 12:58
उत्क्रांतीवाद शरीररचनेची, जडण-घडणेची एक तार्कीक श्रुंखला मांडतो. त्यात देव-दैव वादाचा काहि स्कोपच दिसत नाहि. ते राहु दे.
प्रक्रियाच नाही असे म्हणायचे आहे का?
मलाही तोच प्रश्न पडलाय. 'अ' पासुन 'स' एखाद्या प्रक्रियेने निर्माण होत नाहि तर 'स' आगोदरपासुन असतोच, केवळ 'अ'ची सालपटं उतरुन तो दृगोच्चर होतो असं काहिसं वाटतय लेखावरुन.
माकडाचा माणूस होणे आणि "अ" चा "स" होणे हे दोन्ही आपला सारखेच क्लिष्ट वाटते का?
'अ' चा 'स' होणे आणि माकडाचा माणुस होणे या भिन्न गोष्टी वाटतात मला. आणि त्या समानार्थी तर अजीबात वाटत नाहित. 'अ->'स'->माकड->माणुस या संपूर्ण प्रवासात सजीवत्व कायम आहे, केवळ शरीर बदलतय असा काहिसा अर्थ वाटतोय लेखाचा.

In reply to by अर्धवटराव

आनन्दा Sun, 12/20/2015 - 14:50
तसे नाहीये हो. एकदा सगळा पसारा अणु रेणूंचा बनलाय आणि जगात रासायनिक अभिक्रियांव्यतिरिक्त इतर काही शिल्लक नाही हे मान्य केले की मग झाले नाही का? अ चा स होणे किंवा माकडाचा माणूस होणे या दोघांमध्ये दीर्घकाळ चालणारी रासायनिक अभिक्रियांची एक साखळी हा समान धागा आहे. बदल जेव्हढा मोठा, तेव्हढी ही दीर्घ काळ चालणारी आणि क्लिष्ट क्रिया एव्हढेच. अ मध्ये स अस्तित्वात होता असे नाही. किंबहुना अ आणि स मध्ये वस्तुतः काहीच वेगळे नाही.. मूलकण तेच आहेत, फक्त वस्तुंची मांडणी बदलली म्हणून पदार्थाचे रेप्रेसेंटेशन बदलले, आणि ते कसे हळूहळू बदलले हे त्यांनी त्या चित्रांमधून दाखवले. इतकेच.

In reply to by आनन्दा

अर्धवटराव Mon, 12/21/2015 - 13:02
रेणूंच्या संयोगातुन, किंवा कुठल्याही रासायनीक प्रक्रियेतुन फ्री वील कसं उत्क्रांत होतं हे बघायचं होतं. इथुन तिथपर्यंत केवळ रासायनीक प्रक्रियाच आहे म्हटल कि सर्व काहि पुर्व नियोजीत असल्यासारखं झालं... म्हणजे दुसर्‍या शब्दात निव्वळ दैववाद. किंवा सचेतन आणि अचेतन हे एकाच सामायीक प्रक्रियेचे भाग आहेत म्हटलं तर आध्यात्म काय वेगळं सांगतं हा प्रश्न आला. म्हणजे आम्हि वाट बघतोय अच्छे दिन येण्याची.. आणि हे मागच्या ५० वर्षांचा हिशोब सांगताहेत असं झालं ;)

In reply to by अर्धवटराव

राजेश घासकडवी Mon, 12/21/2015 - 19:43
रेणूंच्या संयोगातुन, किंवा कुठल्याही रासायनीक प्रक्रियेतुन फ्री वील कसं उत्क्रांत होतं हे बघायचं होतं.
कॉन्शसनेस, स्वची जाणीव, फ्री विल वगैरे विषय फारच पुढचे झाले. एवढ्यात तरी मी त्यांच्यावर चर्चा करू इच्छित नाही. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी या पृथ्वीवर काहीही सृष्टी नव्हती. तेव्हापासून ते आत्तापर्यंत जो सजीव सृष्टीच्या उत्पत्तीचा प्रवास झाला त्याचा आढावा घेणं हे या लेखमालेचं प्राथमिक उद्दिष्ट आहे.
रासायनीक प्रक्रियाच आहे म्हटल कि सर्व काहि पुर्व नियोजीत असल्यासारखं झालं...
पूर्वनियोजितपणा बिलकुल नाही. उलट कुठच्या घटना घडतील हे सांगता येत नाही, त्या निसर्गनियमाने घडत राहातात. साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जी महाप्रचंड उल्का पृथ्वीवर आपटली - जीमुळे डायनोसॉर्सचा नाश झाला - ती पूर्वनियोजित होती का?
सचेतन आणि अचेतन हे एकाच सामायीक प्रक्रियेचे भाग आहेत म्हटलं तर आध्यात्म काय वेगळं सांगतं हा प्रश्न आला.
सामायिक प्रक्रियेचा भाग असं नाही, तर सचेतन आणि अचेतन यांच्यात फक्त रचनेच्या क्लिष्टतेचा फरक आहे. हा बदल कसा घडला याबद्दलच्या प्रक्रियेबद्दल विज्ञान सांगतं.

In reply to by राजेश घासकडवी

अर्धवटराव Tue, 12/22/2015 - 03:02
साडेसहा कोटी वर्षांपूर्वी जी महाप्रचंड उल्का पृथ्वीवर आपटली - जीमुळे डायनोसॉर्सचा नाश झाला - ती पूर्वनियोजित होती का?
जर हा उल्कापात एक भौतीकी-रासायनीक क्रीया असेल तर ति १००% पूर्वनियोजीत होती.

In reply to by अर्धवटराव

राजेश घासकडवी Tue, 12/22/2015 - 03:48
हे या लेखावर कदाचित अवांतर आहे, पण तुम्ही पूर्वनियोजित या शब्दाचा अर्थ 'भाकित करता येण्याजोगी' या अर्थाने वापरत आहात. ते इतकं सोपं नाही. एके काळी म्हणजे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी भौतिकशास्त्रज्ञांना असं वाटत होतं की एकदा विश्वातल्या प्रत्येक पार्टिकलची स्थिती (वेग, वस्तुमान आणि जागा - किंवा पोझिशन) कळली की पुढचं सगळ्या स्थिती प्रेडिक्ट करता येतात. या विचारसरणीला धक्का बसला तो क्वांटम मेकॅनिक्सच्या अनसर्टनटी प्रिन्सिपलने. एकाच वेळी वस्तुचा वेग आणि जागा शोधून काढता येत नाही. या अनसर्टनटी प्रिन्सिपलमधून तसंच ऊर्जा - वस्तुमान कॉंझर्व्हेशनच्या नियमातून जागोजागी रॅंडम रीतीने इलेक्ट्रॉन पॉझिट्रॉन जोड्या आपोआप तयार होतात आणि लयाला जातात. त्यामुळे 'कोणीतरी ठरवून ठेवलेली' या स्ट्रॉंग अर्थाने तर जावोच, 'भाकित करता येण्याजोगी' या साध्या अर्थानेही काही पूर्वनियोजित नसतं.

In reply to by राजेश घासकडवी

अर्धवटराव Tue, 12/22/2015 - 06:31
हे जे अन्सर्टीनीटीत्व आहे ते आपल्या गणिती लॉजीकच्या मर्यादेमुळे आलं आहे. एकाच वेळी वस्तुचा वेग आणि जागा शोधुन काढता येत नाहि, पण अ‍ॅट एनी गिव्हन टाईम वस्तुचा वेग आणि जागा ठरावीकच असतात ना. आपण ज्याला अन्सर्टीनीटी म्हणतो ते खरच अन्सर्टन आहे कि आपल्याला अज्ञात आहे? तसच, कान्सर्व्हेशन ऑफ एनर्जीच्या मागे जर 'लॉ' आहे तर त्यात रॅण्डमनेस येऊ शकत नाहि.

In reply to by अर्धवटराव

राजेश घासकडवी Tue, 12/22/2015 - 07:32
एकाच वेळी वस्तुचा वेग आणि जागा शोधुन काढता येत नाहि, पण अ‍ॅट एनी गिव्हन टाईम वस्तुचा वेग आणि जागा ठरावीकच असतात ना.
त्याचंच उत्तर नाही असं आहे. तुम्ही म्हणता तो ऑब्झर्व्हर इफेक्ट. पण अनसर्टन्टी प्रिन्सिपल हे आपल्या विश्वाचा अविभाज्य भाग आहे. हा विषय खरोखऱच या लेखावर अतिअवांतर आहे. पण इथे https://en.wikipedia.org/wiki/Uncertainty_principle बरीच माहिती सापडेल. It has since become clear, however, that the uncertainty principle is inherent in the properties of all wave-like systems,[7] and that it arises in quantum mechanics simply due to the matter wave nature of all quantum objects. Thus, the uncertainty principle actually states a fundamental property of quantum systems, and is not a statement about the observational success of current technology.
कान्सर्व्हेशन ऑफ एनर्जीच्या मागे जर 'लॉ' आहे तर त्यात रॅण्डमनेस येऊ शकत नाहि.
कॉन्झर्व्हेशन ऑफ मास-एनर्जी हे अन्सर्टन्टी प्रिन्सिपलबरोबर जोडल्यावर अनेक चमत्कारिक परिणाम दिसतात. म्हणजे डेल्टा एनर्जी गुणिले डेल्टा टाइम हे विशिष्ट मर्यादेपेक्षा कमी असू शकत नाहीत. याचा अर्थ डेल्टा टाइम जर पुरेसा लहान असेल तर त्यावेळपुरतं डेल्टा एनर्जी प्रचंड असू शकते. आणि त्याचं मासमध्ये कन्व्हर्जन होऊन आपल्याला दोन अॅंटीपार्टिकल्स जन्मून एकमेकांत विरून गेलेली दिसू शकतात. म्हणून एकंदरीतच प्रेडिक्टेबिलिटी किंवा पूर्वनियोजन या कल्पना फार उपयोगी पडत नाहीत. असो. हा फार गहन विषय आहे. मला जमेल तेव्हा याविषयी लिहिण्याचा विचार आहे. पण यापुढची चर्चा खवमध्ये किंवा व्यनितूनच झालेली बरी.

In reply to by राजेश घासकडवी

कवितानागेश Tue, 12/22/2015 - 20:17
अनसरटेनिटी प्रिंसिपल नक्की उत्तर देत नसले तरी प्रोबेबिलिटी सांगतच. निदान प्लांकच्या स्थिरांकापर्यंत. हां नियमच झाला. रॅंडम नेस नाही. आणि ऑब्जर्वर प्रमाणे वॅल्यू बदलेल असे मला वाटतंय, ऑब्जर्वर प्रमाणे नियम बदलणार नाही.

In reply to by कवितानागेश

पॉइंट ब्लँक गुरुवार, 12/24/2015 - 06:35
ऑब्जर्वर प्रमाणे वॅल्यू बदलेल असे मला वाटतंय, ऑब्जर्वर प्रमाणे नियम बदलणार नाही.
+१०००

In reply to by कवितानागेश

राजेश घासकडवी गुरुवार, 12/24/2015 - 08:08
अनसरटेनिटी प्रिंसिपल नक्की उत्तर देत नसले तरी प्रोबेबिलिटी सांगतच.
तुम्ही एखाद्या पार्टिकलचं वेव्ह फंक्शन मांडलंत की त्यातून प्रोबॅबिलिटी सांगता येते. अन्सर्टन्टी प्रिन्सिपलचा प्रोबॅबिलिटीशी संबंध नाही.
आणि ऑब्जर्वर प्रमाणे वॅल्यू बदलेल असे मला वाटतंय, ऑब्जर्वर प्रमाणे नियम बदलणार नाही.
हे क्वांटम मेकॅनिक्सचं तत्त्व नसून रिलेटिव्हिटीचं तत्त्व आहे. प्रकाशाचा वेग, मॅक्सवेलची समीकरणं ही कुठल्याही फ्रेम ऑफ रेफरन्समध्ये तीच असतात. मग त्यासाठी वस्तुमान, अंतर आणि काळाच्या किमती बदलतात. पण कुठच्याच घटनांमधला कार्यकारणभाव बदलत नाही.

आनन्दा Sun, 12/20/2015 - 12:38
ही दोन विधाने परस्पर विरोधी आहेत..
पुनरुत्पादन हेच सजीवांचे व्यवच्छेदक लक्षण आहे.
ते जर योग्य पेशींमध्ये सोडले तर आपल्या प्रतिकृती तयार करतात
अर्थात हा विषाणूंबद्दलचा प्रोब्लेम आहे खरा. किंबहुना हे विषाणू मरत पण नाहीत म्हणे. ज्यांना मुळात जीवनच नाही त्यांना कसला आलाय मृत्यू म्हणा? पण हा वादाचा विषय आहे खरा.

In reply to by आनन्दा

आनन्दा Sun, 12/20/2015 - 12:44
लेख आवडला हे सांगायचे राहून गेले. लेख आवडला, पण खूप त्रोटकनापासूनाअचेतनापासून सचेतनापर्यंतच्या प्रवासाचा अजून काय अभ्यास झाला आहे, काहे प्रयोग, त्यांचे निष्कर्ष वगैरे काही माहिती असेल तर ती पण सांगितलीत तर बरे होईल. मला व्यक्तिशः विंग्रजीमधून वाचायचा कंटाळा येतो म्हणून तुम्हाला विनंती करतोय. धन्यवात.

In reply to by एस

राजेश घासकडवी Mon, 12/21/2015 - 19:13
बरोबर. पण नुसतं तेवढंच नाही, तर ते कंटिन्यूअस फंक्शन आहे, स्टेप फंक्शन नाही हा अधिक महत्त्वाचा मुद्दा आहे. किंबहुना चैतन्य हा गुणधर्म कंटिन्यअस, कमी-अधिक होणारा, अॅनालॉग प्रकारचा आहे हे लक्षात घेतलं की कणांच्या रचनांची क्लिष्टता वाढवत नेली की सजीवसृष्टी दिसायला लागते. सध्या दिसणारी क्लिष्टता प्रचंड आहे. एके काळी ती नव्हती. या वाढत जाण्याच्या प्रक्रियेलाच उत्क्रांती म्हणतात. आणि ही वाढ होते ती नैसर्गिक निवडीतून. हे समजून घेतलं की सजीव आणि निर्जीव असं द्वैत नाही, अणुरेणूंच्या रचनांचे ते आविष्कार आहेत हे लक्षात येतं.

In reply to by राजेश घासकडवी

संदीप डांगे Mon, 12/21/2015 - 19:26
सजीव आणि निर्जीव असं द्वैत नाही, अणुरेणूंच्या रचनांचे ते आविष्कार आहेत.
जेव्हा आध्यात्म हेच म्हणतं तेव्हा मात्र मान्य होणं कठीण असतं. असो.

In reply to by संदीप डांगे

राजेश घासकडवी Mon, 12/21/2015 - 19:52
अद्वैतवादात सांगितलेलं एकपण हे आत्मा आणि ब्रह्म या आध्यात्मिक संकल्पनांविषयी आहे. विज्ञानात अणूरेणू आणि भौतिक नियमांतून शरीरं कशी निर्माण होतात याविषयी चर्चा आहे. शरीराच्या रचनेपलिकडे असलेला हा आत्मा नक्की काय करतो, तो कसा तपासून पाहावा याबद्दल आध्यात्म काही बोलत नाही. अणूरेणूंमधूनच केवळ शरीरं निर्माण होतात, आणि केवळ भौतिक प्रक्रियांतूनच उत्क्रांती घडते, जीवसृष्टी निर्माण होते असं विज्ञान सांगतं. या दोनमध्ये नक्की काय साम्य आहे ते कळत नाही. त्यामुळे 'आध्यात्मदेखील हेच म्हणतं की!' असं विधान करण्याला नक्की आधार काय आहे?

In reply to by राजेश घासकडवी

विवेक ठाकूर Mon, 12/21/2015 - 22:56
अद्वैतवादात सांगितलेलं एकपण हे आत्मा आणि ब्रह्म या आध्यात्मिक संकल्पनांविषयी आहे. अजिबात नाही. आत्मा आणि ब्रह्म एकच आहे. विज्ञानात अणूरेणू आणि भौतिक नियमांतून शरीरं कशी निर्माण होतात याविषयी चर्चा आहे. अणू-रेणूत प्राण कुठून येतो ते सांगा, म्हणजे तुम्ही सुद्धा भींत चालवू शकाल. शरीराच्या रचनेपलिकडे असलेला हा आत्मा नक्की काय करतो, तो कसा तपासून पाहावा याबद्दल आध्यात्म काही बोलत नाही काय सांगता ? सगळं आध्यात्म आत्म्याचीच तर चर्चा आहे. अणूरेणूंमधूनच केवळ शरीरं निर्माण होतात, आणि केवळ भौतिक प्रक्रियांतूनच उत्क्रांती घडते, जीवसृष्टी निर्माण होते असं विज्ञान सांगतं. शरीरात जीव कुठून येतो हा मूळ प्रश्न आहे. कारण तोच सचेतन आणि अचेतनातला फरक आहे. आणि ते या लेखाचं शीर्षक आहे. या दोनमध्ये नक्की काय साम्य आहे ते कळत नाही. त्यामुळे 'आध्यात्मदेखील हेच म्हणतं की!' असं विधान करण्याला नक्की आधार काय आहे? आध्यात्म आणि विज्ञान यात काही साम्य स्थळं आहेत पण मूळ फरक आत्मतत्त्वाचा आहे, जो या लेखाचा विषय नाही.

sagarpdy Mon, 12/21/2015 - 12:32
Everything should be made as simple as possible, but not simpler. - Einstein
या वाक्याची आठवण होऊ लागली आहे.

In reply to by sagarpdy

राजेश घासकडवी Tue, 12/22/2015 - 10:13
आइन्स्टाइनने हे कुठे म्हटल्याचा उल्लेख नाही. त्याने म्हटलेलं जवळातलं जवळचं विधान असं आहे It can scarcely be denied that the supreme goal of all theory is to make the irreducible basic elements as simple and as few as possible without having to surrender the adequate representation of a single datum of experience. त्याच्या या विधानात अर्थातच ऑक्कॅमचा रेझर अपेक्षित आहे. ते रॉजर सेशन्स नावाच्या एका कंपोझरने 'सिंपल' करून everything should be as simple as possible, but not simpler असं म्हटलं :) संदर्भ - http://quoteinvestigator.com/2011/05/13/einstein-simple/. पण लोकांना हे सिंपलर व्हर्जनच आवडतं बहुतेक.

नगरीनिरंजन Tue, 12/22/2015 - 05:29
स्वत:च्या अस्तित्वाची काळजी घेणारे व त्यासाठी आवश्यक ते करणारे (त्यात स्वत:च्या बुद्धीची फसवणूकही आली) जीवच नैसर्गिक निवडीत टिकतात. त्यामुळे बहुतेक डिनायल मोड मधल्या किंवा माणसाचं अस्तित्व काहीतरी विशेष आहे असे दामटून सांगणाऱया प्रतिक्रिया पाहून आश्चर्य वाटले नाही. ऊर्जेचा पुरवठा वाढता राहिला नाहीतर यीस्ट सारखीच मानवी नागरसंस्कृतीची अवस्था होते आणि होणार या साध्या तत्त्वाच्या डिनायलमागेही हेच कारण आहे.