Skip to main content

छि _ _

छि _ _

Published on 10/10/2015 - 17:43 प्रकाशित मुखपृष्ठ
छि _ ल, पचकन थुंकल्यासारखी ती शिवी त्याने दिली, एकदा... दोनदा... अनेकदा... मन भरेपर्यंत. तिथेच उभ्या असलेल्या मला ते ऐकून अंगावरून काहीतरी गिळगिळीत सरपटत गेल्यासारखं वाटत होतं. श्रीगणेश चतुर्थीच्या आदला दिवस. रस्त्यांवर भरपूर ट्रॅफिक, गोंधळ. इतर पर्याय नसल्याने आणि लांब जायचे असल्याने पीएमपीएमएलने प्रवास करावा लागणार होता. मनपाला बसमध्ये चढले, खचाखच गर्दी. आम्ही ४-५ जणी बसच्या डावीकडील बाजूस लेडीजना उभे राहण्यासाठी जागा असते तिथे थांबलो होतो, बस थोडी पुढे गेली असेल तोवर मागून तिघांचं एक टवाळ टोळकं धक्काबुक्की करत पुढे आलं. हिंदी भाषा बोलण्याच्या पध्दतीवरून वरून युपी-बिहारी वाटत होते, त्यातील एकाने भरपूर घेतली होती (सुवास पसरला होता), त्याला धड सरळ उभंही रहता येत नव्हतं, त्याचं विमान टेक-ऑफ करून ढगांपल्याड पोचलेलं सहज कळत होतं. हे लोक सरळ लेडिज जवळ येऊन रेलू लागले, अविर्भाव असा की बसच्या धक्क्यांमुळे चुकून तसं होतंय, आम्ही अजून डावीकडे सरकत होतो पण आता सरकायला जागाच नव्ह्ती. तिथल्या एका मुलीने गोडीत त्यांना पुरूषांच्या रांगेत उभे राहण्यास सांगितले, तेवढयापुरतं सरकल्यासारखं करून पुन्हा त्यांनी तोच प्रकार चालू ठेवला, बळेच धक्के देण्याचा. तो पायलट यात आघाडीवर होता. इतर लोक नेहमीप्रमाणे सोयिस्कररीत्या बघ्याची भूमिका घेऊन गंमत बघत होते. पुढचे एक आजोबा त्याला समज देत होते तर तो त्यांनाच बुढ्ढा क्या बक रहा है इ. अचकट विचकट शेरे मारायला लागला. अशावेळेस स्त्रिया जास्त बोलू शकत नाहीत कारण समोरचा चिडून काय करेल, बोलेल याचा नेम नसतो, त्यामुळे मी दुर्लक्ष करत होते, त्यांच्याकडे पूर्ण पाठ करून मध्ये बॅग घेऊन उभी राहिले होते. कुठे झाशीची राणी बनावं आणि कुठे शांत राहून दुर्लक्ष करावं हेही आपल्याला कळलं पाहिजे असं माझं सरळमार्गी मत. त्या मुलीलाही मी समजावत होते की सांगून सुधारणार्‍यांपैकी ते लोक नाहीत, उगीच नादी लागू नको, पण तीही हट्टाला पेटली होती. बोलता बोलताच तिने ओढणी पूर्ण चेहर्‍याला घट्ट बांधून घेतली होती, माझाही स्कार्फ होताच.( साध्याशा स्कार्फ मुळेही काहीवेळेस किती आश्वासक, सुरक्षित वाटतं ते अशा चेहर्‍यावर स्कार्फ, स्टोल इ. बांधणार्‍या मुलींना नावं ठेवणार्‍यांना कसं कळावं.) तो अजून बरळतच होता, खुदको मिस इंडिया समझती है, ये कोई लडकी है क्या.. काहीही फुटकळ कमेंट्स चालू होते. तीही चिडून त्याला धडा शिकवायच्या इराद्याने काही-बाही सुनावत होती. तेव्हाच कधीतरी डोकं सटकलेला तो शिवी देऊन मोकळा झाला.. छि _ ल, सा _ !! ................ ................ त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या हाताला स्पर्श करू पहात होता. मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभी.. त्यानंतर मात्र सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि कंडक्टरला त्या तिघांना खाली उतरवण्यास भाग पाडले, एवढा वेळ मजा बघणार्‍या पब्लिकनेही आता त्यांना पुढे ढकलून उतरवले, एकदाची बस पुढे निघाली. ती मुलगी शेजारील मुलीला तिने अशा किती लोकांना कसं सरळ केलं त्याचे किस्से सांगू लागली होती. माझ्या कानात मात्र राहून राहून ती शिवी घुमत होती, अंगावर अ‍ॅसिड ओतल्यावर कसं वाटत असेल तसं काहीसं ते शब्द कानावर पडल्यावर वाटलं होतं.. याआधी फक्त चित्रपट, पुस्तके, टिव्ही इ.वर ऐकलेलं एवढया जवळून प्रत्यक्ष ऐकण्याचा अनुभव पहिलाच. इतकी वाईट शिवी देण्यामागे तसंच काही कारण असावं तर तेही नव्हतं.. कोणासाठी होती ती शिवी ? त्याला विरोध करणार्‍या त्या मुलीसाठी, माझ्यासाठी, बसमधील इतर महिलांसाठी ? पूर्ण स्त्रीजाती साठीच कदाचित.. काय नव्हतं त्या शिवीमध्ये ? राग, तिरस्कार, विखार, वासना ? सगळंच, त्याशिवायही अजून काही.. त्याच्यात आणि बाकी लोकांत असणार्‍या सामाजिक, आर्थिक, मानसिक, शैक्षणिक सर्वच बाबतीतील विषमतेमुळे आलेले, वर्षानुवर्षे साठलेले कुठले कुठले गंड त्या एका शिवीतून बाहेर पडले होते. त्या क्षणी मनात चमकून गेलं ते १६ डिसे, निर्भया प्रकरण. त्या घटनेनंतर, एक व्यक्ति दुसर्‍या व्यक्तिशी इतकं निर्दयी, कॄर, भावनाशून्य रित्या कसं वागू शकते हा प्रश्न कायम पडायचा, त्याचं उत्तर थोडंफार मिळाल्यासारखं वाटलं. दोन्ही घटनांमध्ये इतर काहीही समान नाही, फक्त एकच - मनोवृत्ती. वर्षानुवर्षे ठाकून ठोकून डोक्यात फिट्ट बसवलेली तीच ती टिपीकल पुरूषी मनोवृत्ती जी अशा लोकांमधे स्त्रियांबद्दल पराकोटीचा तिरस्कार उत्पन्न करते. स्त्रीयांना कायम तुच्छ, कमी लेखणारी, त्यांनी विरोध केलेला जराही न खपणारी मानसिकता. त्यांनी कायम घराच्या चार भिंतींआड रहावं, सदा सर्वकाळ कामाला जुंपून घ्यावं, काहीही बोललेलं, मारलेलंही चालवून घ्यावं, पुरूषांसमोर आवाज चढवू नये, बाहेर पडू नये, नौकरी करू नये, परपुरूषांशी बोलू नये, जास्त शिकू नये, जास्त बोलू नये, जास्त विचार सुध्दा करू नये.. एक ना दोन हजार बंधन घालणारी मानसिकता. अर्थात हे सरसकटीकरण नाही. समाजातील काही ठराविक वर्गांतील ठराविक लोकांचीच अशी मनोवृत्ती असेल. त्यावेळी मला अशा समाजात राहणार्‍या स्त्रियांसाठी वाईट वाटत होतं ज्यांच्यासाठी या आणि याहून वाईट शिव्या ऐकणे रोजचेच असेल, नेहमीच्याच शिव्या आणि मारहाणीने ज्यांच्या संवेदना बधीर झाल्या असतील. त्याचवेळी या विचाराने हायसं वाटत होतं की सुदैवाने आपला जन्म एका सुशिक्षित, सुसंस्कृत परिवारात झालाय, आपण अशा समाजात वावरतो जिथे साधारणपणे अशी प्रवृत्ती लांबपर्यंत दिसून येत नाही, जिथे आपल्याला हवे तसे जगण्याचे स्वातंत्र्य आहे. जिथे आपल्याला बर्‍यापैकी सन्मान मिळतो, कमी लेखलं जात नाही, जिथे पुरूष स्त्रियांबद्दल टोकाचे वाईट विचार करत नाहीत, जिथे सामान्यतः नवरे-बायकांना, मित्र-मैत्रिणींना, भाऊ-बहिणींना, पुरूष स्त्रियांना रिस्पेक्ट देतात,शिव्या नाही. म्हटलं तर ही एक किरकोळ घटना, पण डोक्यात खूप सारे विचार, त्रास, मनस्ताप देऊन गेली. अर्थात हा काही एकमेव प्रसंग नाही, असे अनेक नकोसे अनुभव येतच असतात, फक्त त्या एका शिवीमुळे हा अनुभव जास्त जिव्हारी लागला, एरवी चुकूनही कधी मनात येत नाही तो एक स्त्री असल्याबद्दलचा पश्चात्ताप एका क्षणापुरतं का होईना, जाणवून गेला.. इतकंच..

याद्या 31365
प्रतिक्रिया 225
खर हाय का ? कपो कल्पीत.? नाय मंजे पुण्यात घडताना,मनपा जवळ,बसमध्ये... पब्लिकने त्याच्या तोंडातुन शिवि येण्याअगोदर मरे पर्यंत मारला असता.

In reply to by जेपी

पुण्यात? शक्यच नाही. पुण्यात बसने प्रवास करणारे लोक शक्य तेवढा लवकर पळ काढतात. एकदा एक कंडक्टर भयानक नजरेने बघत होता तेव्हा मी त्याला जाब विचारला. आणि तेवढ्यात शेवटच्या स्टॉपला गाडी आल्यावर सगळी सुशिक्षित जनता अक्षरश: वाघ मागे लागल्यासारखी उतरली होती. दुसरं, बस मधे चढल्या चढल्या 'तू जोरात ओरडून बस थांबवली' या नांदीने अफाट स्पीडने स्टॉपवर न थांबता जाऊ पाहणाऱ्या एका दारुड्या ड्रायव्हरने माझ्यावर शिव्यांची बरसात केली होती. मनपाजवळच. तेव्हा बसमधले सगळे महाभाग 'जाउद्या ना ताई, आम्हाला उशीर होतोय.' हे पद आळवत होते. ही प्रातिनिधिक उदाहरणं आहेत माझ्या एकटीच्या अनुभवांची.

In reply to by पिशी अबोली

अगदी अगदी. माणूस हा मराठी, बंगाली, भय्या, हिंदू, मुस्लिम असा असू शकतो. पुरूष हा पुरूषच असतो, आणि आपल्या समाजात पुरूषांना माणूस बनवण्याची पद्धत सर्वसामान्यपणे तरी दिसत नाही अद्याप. (असंख्य माननिय अपवाद आहेतच. पण 'सर्वसामान्यपणे' हा की वर्ड आहे.)

मनपा-भोसरी बस, पब्लिक गंमत पहात होती, शिव्या दिल्यानंतरही सगळे साळसूद गपगुमान उभे. तरूण मुलं, स्त्रिया, पुरूष सगळेच..

In reply to by नीलमोहर

त्यानंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या हाताला स्पर्श करू पहात होता. मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभी..
पब्लिक गंमत पहात होती, शिव्या दिल्यानंतरही सगळे साळसूद गपगुमान उभे.
ही दोन्ही वाक्य तुमचीच. तुम्ही स्वत: काय केलत हो ? स्थितप्रज्ञता? का सरळ दोन कानामागे ठेवून दिल्या नाहीत? त्या दुसर्‍या मुलिने प्रयत्न तरी केला, तुम्ही काय केलत? उलट तिलाच शांत केलत? का? तिची काय चूक होती त्यात? की बाईचा जन्म बाई असाच वगैरे? आणि बहुतांशी लोक तर अश्या वेळी असेच वागतात ह्यात नवल काय. पण तुम्हाला एक स्त्री म्हणून तेव्हा झाशी व्हावं नाही वाटलं इन्स्टीड झाशी व्हावं की साळसूदपणा दाखवावा हे विचार करत बसण्यापे़क्षा. ते म्हणतात ना शिवाजी व्हावा पण तो दुसर्‍या घरी.. तसंय ... खाली स्रूजा ह्यांनी म्हंटलय ते फार पटत नाही पण तरीही मान्य की बेटर सेफ दॅन सॉरी पण मग अश्या केस मधे तुम्हाला पब्लिक ला "पब्लिक गंमत पहात होती, शिव्या दिल्यानंतरही सगळे साळसूद गपगुमान उभे." हे म्हणायाचा अधिकार कसा? तुम्ही स्त्री असल्या तरी त्याच पब्लिक चा एक भाग आहातच ना?

In reply to by उदय के'सागर

अश्या केस मधे तुम्हाला पब्लिक ला "पब्लिक गंमत पहात होती, शिव्या दिल्यानंतरही सगळे साळसूद गपगुमान उभे." हे म्हणायाचा अधिकार कसा? तुम्ही स्त्री असल्या तरी त्याच पब्लिक चा एक भाग आहातच ना?
अगदी असेच म्हणतो, स्त्रीत्व आणि समाज याबद्दल टिप्पणी केली की झाले! वैसेभी आवाज उठवला तर योग्य बाजूने मारामारी करण्यातही पुरुषच पुढे येतात नंतर - सबब स्त्रियांना तेही टेन्शन नाही. असे असताना तितकेही करू नये आणि वर असे कमेंटावे याला काय म्हणावे? असोच.

In reply to by बॅटमॅन

वैसेभी आवाज उठवला तर योग्य बाजूने मारामारी करण्यातही पुरुषच पुढे येतात नंतर - सबब स्त्रियांना तेही टेन्शन नाही. असे असताना तितकेही करू नये आणि वर असे कमेंटावे याला काय म्हणावे?
काही विदा यासाठी? तुझा स्वतःचा काही अनुभव? तुझ्यासमोर कुणी स्त्री भांडली आणि तू जाऊन तिला मदत केलीस असं कधी झालंय? मी बोलतेय कारण माझे असे असंख्य अनुभव आहेत जिथे पुरुष लोक पहिले शेपूट घालून बसलेले असतात. त्यांना जाम गंमत वाटते एक मुलगी भांडतेय याची. याचे २ अनुभव तर मी वर दिलेलेही आहेत. लेखातला अनुभवही त्याच प्रकारचा आहे. याला काँट्रेडिक्टरी काही अनुभव असतील तर द्यावेत आणि मग जनरलाय्जेशन करावं असं 'लॉजिकली सुसंगत' वाटतं.

In reply to by पिशी अबोली

काही विदा यासाठी? तुझा स्वतःचा काही अनुभव? तुझ्यासमोर कुणी स्त्री भांडली आणि तू जाऊन तिला मदत केलीस असं कधी झालंय?
केलीय की. तेव्हा इतरांनीही आवाज उठवला. पर्सनल अनुभव थोडे आहेत आणि दुरून पाहिलेलेही थोडे आहेत. अर्थात "माझे असंख्य अनुभव" हेच जागतिक सत्य आहे हे विसरलोच होतो.
मी बोलतेय कारण माझे असे असंख्य अनुभव आहेत जिथे पुरुष लोक पहिले शेपूट घालून बसलेले असतात.
अरेरेरे, हाच का तो आदरभाव आणि हीच का ती लिहिण्याची पद्धत? हाच वाक्प्रचार स्त्रियांबद्दल वापरला तर काय होईल?
याला काँट्रेडिक्टरी काही अनुभव असतील तर द्यावेत आणि मग जनरलाय्जेशन करावं असं 'लॉजिकली सुसंगत' वाटतं.
प्रतिसादांतच असे काही अनुभव आहेत, जिथे स्त्रियांनी तक्रार केल्यावर पुरुषांनी अ‍ॅक्शन घेतलेली आहे. पण डोळ्यांवर झापडे ओढून घेऊन बसणारांना त्याचे काय होय? पण सॉरी, डिफॉल्ट प्रतिसाद "छानच गं / मस्तच गं / हो ना गं" पैकी न दिल्यामुळे दु:ख झाले असेल तरी त्याबद्दल माफी मागतो. तूर्तास तेच एक सुसंगत दिसते आहे.

In reply to by बॅटमॅन

शिवाय "मारामारी" संदर्भात प्रतिसाद होता हे सोयीस्करपणे दुर्लक्षून प्रतिसादजिलब्या पाडण्यात येत आहेत. चालायचंच.

In reply to by बॅटमॅन

पर्सनल अनुभव थोडे आहेत
अच्छा. अशा अनुभवांबद्दल 'लिहिलं' जाईल असं वाटलं होतं. पण 'केलाय की' अशी जनरलाइज्ड स्टेटमेंट्स हेच जागतिक सत्य आहे हे विसरले होते.
अरेरेरे, हाच का तो आदरभाव आणि हीच का ती लिहिण्याची पद्धत? हाच वाक्प्रचार स्त्रियांबद्दल वापरला तर काय होईल?
अच्छा? मला वाटलं अशा प्रकारच्या बोलणार्‍यांची तावातावाने कड घेणार्‍यांना असं बोललेलं कदाचित जाणवणारही नाही. कारण ती तर अगदीच 'नॅचुरल' पद्धत आहे ना बोलण्याची? तरी खुपलं असेल तर माफी मागते. पुढच्या वेळी संपूर्ण स्त्रीजातीबद्दल बोलताना हे खुपणं लक्षात रहावं कदाचित..
प्रतिसादांतच असे काही अनुभव आहेत, जिथे स्त्रियांनी तक्रार केल्यावर पुरुषांनी अ‍ॅक्शन घेतलेली आहे. पण डोळ्यांवर झापडे ओढून घेऊन बसणारांना त्याचे काय होय?
आणि
वैसेभी आवाज उठवला तर योग्य बाजूने मारामारी करण्यातही पुरुषच पुढे येतात नंतर - सबब स्त्रियांना तेही टेन्शन नाही
प्रतिसादांमधे आणि लेखामधे असे अनुभव आहेत जिथे पुरुष गंमत बघत उभे होते. तशा उदाहरणांना सोयीस्कररित्या दुर्लक्षित करण्यात आले आहे असे मज अज्ञमतिला वाटते. तसे नसेल तर माझे अज्ञानतिमिर दूर करावे अशी नम्र विनंती. 'सबब स्त्रियांना तेही टेन्शन नाही' इतक्या सिंप्लिफाइड सरसकटीकरणाने सगळ्या गोष्टीची संभावना करण्याला आक्षेप असल्याचं समजलं असेल अशी किमानच अपेक्षा.
डिफॉल्ट प्रतिसाद "छानच गं / मस्तच गं / हो ना गं" पैकी न दिल्यामुळे दु:ख झाले असेल तरी त्याबद्दल माफी मागतो
हा हा हा... शुभेच्छा.

In reply to by पिशी अबोली

अच्छा? मला वाटलं अशा प्रकारच्या बोलणार्‍यांची तावातावाने कड घेणार्‍यांना असं बोललेलं कदाचित जाणवणारही नाही. कारण ती तर अगदीच 'नॅचुरल' पद्धत आहे ना बोलण्याची? तरी खुपलं असेल तर माफी मागते. पुढच्या वेळी संपूर्ण स्त्रीजातीबद्दल बोलताना हे खुपणं लक्षात रहावं कदाचित..
आम्हांला खुपलं तरी कोण कुत्रं विचारत नाही ओ. मुक्ताफळे प्रसवायचे अधिकार सध्या कुणाकडे आहेत हे सर्वच जाणतात. त्यामुळे चालूद्यात. स्वतःचे ते पोटतिडीकयुक्त प्रतिसाद, दुसर्‍याचे ते सरसकटीकरण. काळजी घ्या ओ.
प्रतिसादांमधे आणि लेखामधे असे अनुभव आहेत जिथे पुरुष गंमत बघत उभे होते. तशा उदाहरणांना सोयीस्कररित्या दुर्लक्षित करण्यात आले आहे असे मज अज्ञमतिला वाटते. तसे नसेल तर माझे अज्ञानतिमिर दूर करावे अशी नम्र विनंती.
बिपिन कार्यकर्ते आणि तर्राट जोकर ही दोन सदस्यनामे प्रतिसादांमध्ये दिसतात का? नसल्यास दृष्टी पुनरेकवार चेकवावी असा एक अनाहूत सल्ला.
'सबब स्त्रियांना तेही टेन्शन नाही' इतक्या सिंप्लिफाइड सरसकटीकरणाने सगळ्या गोष्टीची संभावना करण्याला आक्षेप असल्याचं समजलं असेल अशी किमानच अपेक्षा.
माझा मूळ प्रतिसाद मारामारीबद्दल होता. त्याचे टेन्शन इन जनरल स्त्रियांना नसते. त्यांनी आवाज उठवला तर कैकवेळेस ते काम पुरुषच बजावतात. हे चूक असल्यास सांगावे. बाकी हा मूळ काँटेक्स्ट विसरून तिसर्‍याच मुद्याला झोडपण्याचा सेल्फरायचसपणा सध्या प्रतिष्ठित आहे. बाकी डिफॉल्ट प्रतिसाद मोड ऑन
"छानच गं / मस्तच गं / सहमत गं"
डिफॉल्ट प्रतिसाद मोड ऑफ.

In reply to by बॅटमॅन

तुमची चर्चा चालु देत.. एकच बारिकसा प्रश्न.. अज्ञान समजा.. स्त्रियांना मारामारिचे टेन्शन नसते म्हणजे काय? म्हण्जे समजा उद्या मी कुणी माझ्याशी वावगं वागलं म्हणुन आवाज चढवला, तर "हमखास" पुरुष येऊन त्याला चोपतातच म्हणुन मी टेन्शन फ्री? कारण असं तर होताना दिसत नाही... समजा कुणी आलं नाही, पण ज्यावर मी आवाज चढवलाय, त्यानेच माझ्याशी मारामारी करायची ठरवली तर माझ्यात एका पुरुषाशी मारामारी करण्याची शक्ती आहे म्हणुन मी टेन्शन फ्री? कारण तसं नसतं.. की मीच स्वतःहुन मारामारी सुरु केली तर समोर कुणीही असो, तो मला परतुन मारणारच नाही आणि मारलच तर मी त्याला तिथल्या तिथेच ठेचीन म्हणुन मी टेन्शन फ्री? कारण ते ही शक्य नाही.. ज्या पक्षाला मारामारी करता येत नाही, अनुभवही नाही, सामाजिक पाठबळ नाही, आपण मारु शकतो हा विश्वास नाही आणि नैसर्गिक जडणघडण बघता शक्यतो अंगात ताकद नाहीच.. म्हणजे करायची झालीच तर आपण इतरांवरच "अवलंबुन" आहोत जे मदतीस येतील ह्याची खात्री नाही.... ... त्या पक्षाला मारामारीचे "टेन्शन" नाही असे कसे म्हणतोस तू? प्रामाणिक्पणे... मी जेव्हा कुठे अशी भांडते तेव्हा समोरचा पुरुष मारामारीवर उतरला तर आपल्या अंगात तेवढे बळ आहे की नाही ह्या विचारांमध्ये माझ्या मेंदुचा एक भाग गुंतलेला असतो. अर्थातच आपण पुरे पडणार नाही ह्याचे टेन्शन मला असतेच.

In reply to by पिलीयन रायडर

म्हण्जे समजा उद्या मी कुणी माझ्याशी वावगं वागलं म्हणुन आवाज चढवला, तर "हमखास" पुरुष येऊन त्याला चोपतातच म्हणुन मी टेन्शन फ्री?
हमखास नसले तरी कैकदा असे होते. टेन्शन नसते म्हणजे "मारामारी झाली, सगळं संपलं" म्हणून निश्चिंत राहिलो अशा अर्थी नव्हे, तर मारामारी मोस्टलि स्वतः करावी लागत नाही अशा अर्थी.

In reply to by पिलीयन रायडर

तसे नाही. करता येतच नाही हा चिंतेचा इशय असला तरी बह्वंशी त्याचे सामाजिक औटसोर्सिंग केले जाते पुरुषांकडे, तस्मात जी गोष्ट करता येत नाही ती करण्याची गरजही कैकदा उरत नाही. हा प्लसपॉइंट नव्हे का? (तुका म्हणे त्यातल्या त्यात?)

In reply to by बॅटमॅन

आता काळ्या ढगाला चंदेरी किनार लावायचीच असं ठरवलं असेल तर "समजा आलेच पुरुष मदतीला तर.." आहे बुवा मजा आमची...

In reply to by पिलीयन रायडर

आता काळ्या ढगाला चंदेरी किनार लावायचीच असं ठरवलं असेल तर
असा अट्टाहास करायला मी काय **** नाही. (आपापल्या मगदुराप्रमाणे फुल्यांची संख्या आणि मजकूर भरून घ्यावा, धन्स.) मुद्दा इतकाच आहे की १००% वेळेला नसले तरी अनेकवेळेस असे होते. तुम्हांला नै ना वाटत तसं, राहिलं मग. जोडा मग काळी किनार, हाकानाका. (बादवे कशी मीटर आहे?)

In reply to by बॅटमॅन

मुद्दा इतकाच आहे की १००% वेळेला नसले तरी अनेकवेळेस असे होते.
चला, आजच्या दिवसात तेवढीच आपली अज्ञानात भर..आणि आम्हाला वाटायचे आम्हाला रोज रोज येणारे अनुभव खरे.. बाकी मारामारी हा एकच फॉर्म आहे का फिजिकल अब्युजचा? आम्हाला वाटायचं 'बलात्कार' वगैरेपण होतात. छे छे, अज्ञानच जास्त बुवा.. आत्तापर्यंत एकटी भांडायचे आणि कुणी मदतीला यायचे नाही हा अनुभव होता तीपण माझीच चूक असावी बहुधा.. आजच्या ज्ञानामृतप्राशनानंतर मी तर डोळे झाकून भांडणार बुवा.. पुरुष येतीलच 'शेवटी' मदतीला अनेकवेळेस.. मी कशाला घाबरायचे मग? हा प्रश्न तर केवढा साधा सरळ होता..

In reply to by पिशी अबोली

हा प्रतिसाद पहा. कोमल यांचे अनुभव म्हणजे फेकाफेकीच असावी तुमच्या मताप्रमाणे मग, नाही का? http://www.misalpav.com/comment/754214#comment-754214

In reply to by पिलीयन रायडर

याबाबत पिरा यांच्याशी सहमत. त्यांचा मुद्दा आहे की अंधार नाही म्हणून प्रकाश आहे असा आनंद मानावा का? कायद्याची कठोर अम्मलबजावणी झाली तर स्त्रियांना 'भयमुक्त' (नकारात्मक सूर येतो) नव्हे तर आनंदानं जगता येईल. बाकी अनेक प्रसंगी स्त्रियांना आलेल्या वाईट पूर्वानुभवांमुळे (स्वतःच्या किंवा इतरांच्या) स्त्रिया टोकाची भूमिका घेऊ शकतात हे पाहिलं आहे. कशात काही नसताना उगा बोंब सुद्धा मारली जाते हे देखील पाहिलं आहे. त्यामुळे असोच्च!

In reply to by प्यारे१

कशात काही नसताना उगा बोंब सुद्धा मारली जाते हे देखील पाहिलं आहे. त्यामुळे असोच्च!
वाट पहातच होते की कुणी तरी तर हा मुद्दा काढेलच.. आता कसा धागा बरोब्बर दिशेने घोददौड करेल.. चालु द्यात..

In reply to by पिलीयन रायडर

आणि ह्याहीपुढे... अलिकडे अनेकदा आपण सोशल मीडिया अथवा वर्तमानपत्रांच्या संस्थळांवर (बहुधा सचित्र) संबंधित स्त्रीयांच्या नावांसकट 'तिने त्याला कसे जाहीर कानपटवले' तर्‍हेच्या बातम्या वाचतो/पहातो, तेव्हा मला त्या स्त्रींयांच्या बाबतीत कौतुक वाटते, पण त्याहीपेक्षा त्यांच्या ह्यापूढील सुरक्षिततेबद्द्ल अतिशय काळजी वाटत रहाते. कारण अशी पब्लिसिटी झाल्याने संबंधित पुरुष आणी/अथवा त्याचे 'मित्र' वगैरे त्या स्त्रीचा सूड घेतील तर? खरे तर तसे काही करण्यास उद्युक्त होण्यासाठी वर्तमानपत्रे, टी. व्ही. इत्यादी माध्यमांतून जाहीर पब्लिसिटी होण्याचीही आवश्यकता नाही. नुसते एका स्त्रीने चारचौघांसमोर आपणांस रोखले, इतकी भावनाच अशा काही पुरुषांना काहीही वावगे करण्यास पुरेशी आहे! त्यातून त्या स्त्रीस त्याच मार्गावरून नेहमीच येजा करावयाची असेल तर अजूनच कठीण आहे.

In reply to by पिशी अबोली

अबोली, माझे आहेत असे अनेक अनुभव, जिथे मी आवाज वाढवल्यावर आजूबाजुची ४ टाळकी माझ्या सपोर्ट मध्ये आलेली. १. एका ट्रक ड्रायव्हर सोबत भांडण झालेले. २. बस स्टॉप वर रात्री एका बेवड्याने छेडून तमाशा घातलेला, तेव्हा त्याला चोप देणारी पोरं/काका लोक मी घरून नव्हते घेउन गेले. ३. बस (मनपा) मध्ये पण अशाच खेटणार्‍या पोराचा जोम चेपवण्यात कंडक्टर पासून ड्रायव्हर पर्यंत सगळे आलेले. याचे डिटेल्सही लागणार असतील तर व्यनि करा. टु बी ऑनेस्ट खाली घातलेल्या वादात काय मिळवले हा प्रश्नच आहे. ब्याट्याच्या वाक्यावाक्याला सहमत.

In reply to by कोमल

हा कोमल यांचा कडक षटकार याच्याही वरील प्रतीसादासाठी.. (ह.घ्या.हे.वे.सां.न.ल)
सरसकटीकरण न केल्याबद्दल मंडळ पुनरेकवार आभारी आहे.
फुटकळ चिल्लर शिल्लक खुर्दा नाखुस

In reply to by कोमल

"त्यानंतर मात्र सगळ्यांनी आरडाओरडा सुरू केला आणि कंडक्टरला त्या तिघांना खाली उतरवण्यास भाग पाडले, एवढा वेळ मजा बघणार्‍या पब्लिकनेही आता त्यांना पुढे ढकलून उतरवले, एकदाची बस पुढे निघाली." - लेखात हे वाचलं असेल आपण, वरील अनुभवातही पब्लिकमुळेच त्या लोकांना खाली उतरावे लागले होते, शेवटच्या स्टॉपपर्यंत प्रवास नाही करू शकले ते. पब्लिकबद्दल जे लिहीलं आहे ते सर्वच ठिकाणी सर्वांना अ‍ॅप्लाय होईल असे नाही, पब्लिक सगळीकडे सेम नसतं आणि त्यांची रिअ‍ॅक्शन ही बदलत असते. पब्लिक एवढं सक्रिय असतं तर सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना भोसकण्याचे, अ‍ॅसिड टाकून पळ काढण्याचे, गोळ्या घालण्याचे, जाळण्याचे प्रकार कधीच घडले नसते, "खाली घातलेल्या वादात काय मिळवले हा प्रश्नच आहे." - कोणी काय मिळवले हा प्रश्न मलाही आहे. लोक त्यांना वाचायचं तेवढंच वाचत आहेत आणि त्यांना काढायचे तेच अर्थ काढत आहेत, असो.

In reply to by नीलमोहर

पब्लिकबद्दल जे लिहीलं आहे ते सर्वच ठिकाणी सर्वांना अ‍ॅप्लाय होईल असे नाही, पब्लिक सगळीकडे सेम नसतं आणि त्यांची रिअ‍ॅक्शन ही बदलत असते. पब्लिक एवढं सक्रिय असतं तर सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना भोसकण्याचे, अ‍ॅसिड टाकून पळ काढण्याचे, गोळ्या घालण्याचे, जाळण्याचे प्रकार कधीच घडले नसते,
विषय एक्स्ट्रीम गोष्टींचा चाललेला नाही. तिकडे विषय नेऊन फक्त भरकटवणे साध्य होईल. जसे आमचा प्रतिसाद पिशी अबोली यांनी तिसरीकडेच नेऊन सोडला तसे. तुम्ही इनअ‍ॅक्शनचे समर्थन केलेत आणि त्याला विरुद्ध उदाहरणे आल्यामुळे मुद्दा भरकटवता आहात. हे योग्य नाही.

In reply to by बॅटमॅन

आधीच लोकांना मुद्दे स्पष्ट होत नाहीत, अजून भरकटवण्यासाठी मुळीच वेळ, इच्छाही नाही. पब्लिकच्या भरोशावर राहण्याबद्दल म्हणत आहे मी. लोक कधी मदत करतील, कधी नाही सांगता येत नाही.

In reply to by नीलमोहर

पब्लिक सगळीकडे सेम नसतं आणि त्यांची रिअ‍ॅक्शन ही बदलत असते. पब्लिक एवढं सक्रिय असतं तर सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना भोसकण्याचे, अ‍ॅसिड टाकून पळ काढण्याचे, गोळ्या घालण्याचे, जाळण्याचे प्रकार कधीच घडले नसते, अहो, हे सर्व प्रकार पुरुषाच्या बाबतीत पण घडतात की... यात कुठे स्त्री -पुरुष फ़रक पडतोय ?

In reply to by ब़जरबट्टू

@ बजरबट्टू "हे सर्व प्रकार पुरुषाच्या बाबतीत पण घडतात की... यात कुठे स्त्री -पुरुष फ़रक पडतोय " - विषय स्त्रियांचा चालू होता की नाही आत्ता, म्हणून त्यांच्याबद्दलच बोलले. - पुरूष पुरूषांच्याच मदतीला जात नाहीत.. बाकी अजून बोलायला हवे ??

In reply to by नीलमोहर

जनरलायझेशन होइल कदाचीत, पण
सार्वजनिक ठिकाणी स्त्रियांना भोसकण्याचे, अ‍ॅसिड टाकून पळ काढण्याचे, गोळ्या घालण्याचे, जाळण्याचे प्रकार
अनोळखी स्त्रियांसोबत होत नाहीत. याचेपण विदा देता येतील. पण सध्यातरी आवश्यकता वाटत नाही

In reply to by बॅटमॅन

याचं समर्थन होऊ शकत नाही. चूक ते चूकच. बलात्काराचं समर्थन होत नाही. पचकणारांसाठी: आम्ही चुका केल्या तर मान्य करायची हिंमत ठेवतो. मान्य केल्या देखील आहेत. मात्र चूक केलेली नसली तर थोबाड फोडायला मागेपुढे बघत नाही. इतर इतिहास ठाऊक नसताना बडबड करणारांबद्द्ल विचार करण्याची गरज वाटत नाही.

In reply to by प्यारे१

म्हणजे नक्की काय? ओळखीतले लोक बलात्कार करतात हे विधान ट्रू/फॉल्स या अर्थी चुकीचे आहे की ओळखीतले लोक बलात्कार करतात हे वाक्य राईट / राँग या अर्थी चुकीचे आहे?

In reply to by बॅटमॅन

विदा बरोबर आहे पण मी तुझ्या वाक्याच्या पुढची पायरी सांगतो आहे. बाई/मुलगी एखाद्या कार्यकर्त्याच्या ओळखीतली आहे. काही नैनमटक्का झाला. नंतर कार्यकर्ता प्रेमात वगैरे पडला, आणाभाका झाल्या पण नंतर बाई/मुलगी अंग झटकून मोकळी झाली. आणि म्हणून तिला भोसकलं, मारलं आणखी काही केलं च्या लायनीत बलात्कार केला असं जर असेल तर ते चूक आहे असं म्हणत आहे.

In reply to by प्यारे१

हात्तेरेकी इतकंच होय. हे तर ऑब्व्हिअसच आहे. ओळख असो वा नसो, बलात्कार करणे कधीही चूकच. तो वादाचा विषयच नव्हता कधी.

In reply to by मीता

एखाद्या उदाहरणावरून असा प्रतिवाद करता येईल का? "बहुसंख्य पुरुष गे नसतात." "पण तो क्षयझ गे आहे" ही दोन्ही वाक्ये एकमेकांना विरुद्धार्थी आहेत का हे सांगा. मग पाहू.

In reply to by मीता

मिपावर सांख्यिकीचा क्लास उघडला पाहिजे अता. तुम्ही ०% नैतर १००% असेच का बोलताहात कायम? दोन्हीच्या मध्ये काही आहे की नाही? बाई ओळखीतली असेल किंवा अनोळखी, बलात्कार हे होतातच. त्यांपैकी ओळख असताना बलात्कार होण्याचे % जास्त आहे असे ते विधान होते. त्याचा अर्थ "ओळख नसेल तर बलात्कार होतच नाही" असा तुम्हीच काढू जाणे.

In reply to by मीता

सोडला होता हा धागा. पण ठिकै..... हा घ्या दुवा: According to the National Crime Records Bureau 2013 annual report, 24,923 rape cases were reported across India in 2012. Out of these, 24,470 were committed by someone known to the victim (98% of the cases).

In reply to by पिशी अबोली

आजवरच्या पाहण्यात तरी, अनोळखी स्त्रीला चारचौघात मारायची हिम्मत असलेला पुरुष बघितलेला नाही, तेसुध्दा ती फक्त भांडतेय म्हणून. आणि स्त्रियांना याची ब-यापैकी कल्पना असते.. त्यामुळे या मुद्याबद्दल वटवाघुळपुरुष यांना पुर्ण पाठींबा आहे..

In reply to by उदय के'सागर

"नंतरही अजून काही बोलण्यासाठी, लक्ष वेधून घेण्यासाठी तो माझ्या हाताला स्पर्श करू पहात होता. मी आपल्याच संयमाची परिक्षा पाहत त्याच्याकडे ढुंकूनही न पाहता स्थितप्रज्ञ उभी .... स्थितप्रज्ञता? " - असे रस्त्याने किती लोक शुक शुक करतात, बेकार कमेंट करतात, धक्के मारतात. कोणाकोणाशी किती भांडणार. अशांकडे लक्ष न दिलेले सर्वच अर्थाने परवडते, फुकटचा त्रास होत नाही डोक्याला. तोही तसाच लक्ष वेधून घेण्यासाठी शुक शुक करत होता, त्याला लाख बोलायचं होतं, खोडी काढायची होती, आणि माझ्याकडे दोन पर्याय होते, १. रिस्पाँड करणे जेणेकरून तो अजून काहीतरी फालतूपणा करणार, बोलणार. २. दुर्लक्ष करणे जेणेकरून तो नाद सोडून देईल. अशावेळेस दुर्लक्ष करण्याचा पर्याय मी निवडला. हेही वाचा, http://www.misalpav.com/comment/753859#comment-753859, आणि हो, लेख पुन्हा नीट वाचा मग आपलेही फ्रस्टेशन काढा. ज्या मनोवृत्तीबद्दल लेखात लिहीले आहे तिचाच वास येतोय आपल्या प्रतिसादातून.

In reply to by नीलमोहर

२. दुर्लक्ष करणे जेणेकरून तो नाद सोडून देईल.
नका हो असू बोलू... कुठल्या कुठे गेल्या आहेत आजच्या मुली/महिला किती खंबीर आहेत त्या.. खरंच अभिमान वाटतो त्यांचा. हे असलं गुळचट बोलून नका त्यांचा अपमान करू. हा असला पर्याय इतकी हतबलता खरंच इथला समस्त महिलावर्ग तरी मान्य करेल? मी चूक ही असेन कारण माझ्या ओळखीतल्या तरी कोणी महिला इतक्या हतबल मी कधी पाहिल्या नाहीत. नाही म्हणजे दुर्लक्ष करणे हे ठीकच पण त्याने नाद सोडून द्यावा तोपर्यंत दुर्लक्ष? कमाल आहे. त्या निर्भया प्रकरणात तो आरोपी म्हणाला होता, जर त्या मुलीने आम्हाला उलट उत्तरं दिली नसती, जास्त शहाणपणा केला नसता तर आम्ही इतकं वाईट नसतं केलं तिच्याशी. ह्या त्याच्या स्टेटमेंटला समर्थन देण्यासारखं आहे दुर्लक्ष करणं म्हणजे.
ज्या मनोवृत्तीबद्दल लेखात लिहीले आहे तिचाच वास येतोय आपल्या प्रतिसादातून.
शुभेच्छा इतकच म्हणेन.

In reply to by उदय के'सागर

अधाशी उदय तुमची हतबलतेची व्याख्या काय? अहो, आयुष्यातल्या सगळ्या पब्लिक ट्रान्सपोर्टमधून प्रवास करण्यात घालवलेल्या वेळातला कितीतरी वेळ गेला स्वतःवरच्या आणि इतरांवरच्या अन्यायासाठी भांडण्यात. किती काळ भांडाल? १० वर्षं? २० वर्षं? काही सन्माननीय अपवाद वगळता कुणीही बाजू घेत नाही, एकट्याने भांडावं लागतं, याचा पुन्हा पुन्हा अनुभव घेऊन कधीच इच्छा मरत नाही? अनुभवाने आलेलं शहाणपण हीसुद्धा एक गोष्ट असते. ती मुलगी असेल अजून भांडण्याच्या मोडमधे. मीही आहे, पण एका पॉईंटला या गोष्टींचं नैराश्य येतं ही गोष्ट अगदी समजण्यासारखी वाटते मला.

In reply to by पिशी अबोली

मला एक कळत नाही पण, तुमच्या प्रतिसादात (तुमचा असो किंवा निलमोहोर ह्यांचा) त्यात मी स्त्रीयांच्या विरोधात असल्यासारखा सुर का आहे ? मी ही स्त्रियांवर असल्या ह्या होणार्‍या त्रासाबद्दल किंवा अन्यायाविरुद्धच बोलतोय.

In reply to by उदय के'सागर

माझ्या प्रतिसादात हा सूर कुठे जाणवला हे स्पष्ट कराल का ज़रा? खरंच सांगा. तुम्हाला जी हतबलता वाटते, तिच्यामागे ही कारणे असू शकतात, हे मी सांगायचा प्रयत्न केला. या डिफेन्सिव अप्रोच मागे कारणे असू शकतात, जी त्या स्थितिकडे बाहेरून पाहणार्‍याला कदाचित कळू शकत नाहीत. तुम्हाला हतबल असणं म्हणजे नक्की काय वाटतं हेही जाणून घ्यायचं होतं. कारण मलातरी नीमोताई हतबल वाटल्या नाहीत या प्रसंगात.

ही घटना मी पण पाहिली आहे. ठाण्यात. आपली मराठी मुलंच होती ७-८ काॅलेजची. काय बेक्कार बडबडत होती. रस्त्यावरच्या मुलींना इतकं वाईट अपमानकारक हाका मारत होती. मी व कंडक्टरनी थोडा विरोध केला. आईशप्पथ! इतक्या भयानक कमेंटा चालू केल्या. गप बसलो मग! ६० ६५ लोकं भरलेल्या बसमधे कुणालाच काही देणं घेणं नव्हतं! जौ दे मग! असल्या किडीचा जन्म कुठल्या कारणाने होत असावा? माणसात इतके घाणेरडे गुण पैदा करणारे जीन्स कुठून येत असतील?

In reply to by प्राची अश्विनी

मला नाही वाटत असं. त्या मुलीला त्यांनी अशांच्या नादी लागु नकोस सांगितलं होतंच. ती नाही ऐकत म्हणल्यावर शांत बसण्याशिवाय काय पर्याय होता? आणि अशी लोकं सुधारणार नाहीत च. त्यांना सुधारण्याचा ठेका एका मुलीने घ्यायची काही गरज नाही कारण त्याची तिला भयानक किंमत मोजावी लागु शकते आणि तिच्या बरोबरीने तिचे कुटुंबीय सुद्धा यात होरप़ळतात. बाकीचे लोकं बघे होते आणि ज्याने घेतलेली होती, बरोबर चार तशाच मनोवृत्तीचे गुंड होते त्याचं पारडं जड होतं. हे त्या नालायकाला ही माहिती होतं. अशा वेळी शारिरिक ताकद कमी पडते मुलींची. कातडी बचाऊ विचार आहे हा माझा, प्रश्नच नाही. पण का नाही वाचवायचं निदान स्वतःला? हे सगळं नाटक सिनेमात, पुस्तकांत वाचताना छान वाटतं की ती झुक्ली नाही, तिने तिच्या प्राणांची किंमत दिली वगैरे. पण हे सगळं आफ्टर मॅथ आहे. प्रत्यक्षात जेंव्हा एखादी मुलगी अशी किंमत देत असते तेंव्हा आजु बाजुच्याला एकदाहे वाटत नाही की तिचा जीव, तिचं स्त्रीत्व एवढं पण स्वस्त नाहीये की कुणा गावगुंडाच्या एका बाटलीत त्याची किंमत निघावी. तेंव्हा सगळे बघत बसतात, नंतर तिचा उदो उदो होतो, कँडल मार्च होतो पण ती येते का परत? तिचे कुटुंबीय प्रचंड मोठा सल घेऊन उरलेलं आयुष्य काढतात. हां आता बस मधले बाकीचे थोडे साथ देतायेत म्हणल्यावर या मुलींना पण थोडा आधार मिळाला असता. पण इतर वेळी ज्या गर्दीचा आधार वाटतो तीच गर्दी अशा वेळी प्रचंड पोरकं करुन जाते. सो, बेटर सेफ दॅन सॉरी.

अशी संधी कधीच सोडायची नाही. जर ती कुत्री पिढ्यांपिढ्यांचं मलमूत्र तोंडात घेऊन फिरत असतील तर तुम्हाला ही अशांचे निर्बिजीकरण करायचा पूर्ण हक्क आहे. पब्लिकच्या भरवशावर राहू नये. आप खुद पब्लिक हो. सन्मानाने राहायचे असेल तर भीक मागून नव्हे कानाखाली खेचूनच सन्मान मिळतो. प्रेरणा:

In reply to by तर्राट जोकर

कुत्रे ही शिवी फार सौम्य आहे. कुत्रे असं नक्कीच करणार नाहीत. ही कीड आहे कीड!!! अमरवेलीसारखी!!! आपल्या भीतिवर जगणारी!!! या डुकरांचं निर्बीजीकरणच केलं पाहिजे!!! अगदी सत्य!!! कात्रीत ठेचाव्यात यांच्या गो*!!!

हीच संस्कृती आहे. त्यात जर सदर व्यक्ती अर्धशिक्षित/ अशिक्षित असेल, तरूण असेल (जीवशास्त्रीय भाषेत "माजावर") आणि त्यातून "घेतली" असेल तर काय वर्णावे! धाडसाच्या सर्व पायर्‍या पार करण्यात कोणतीही कसूर ठेवत नाहीत. यांच्यातले "सुशिक्षीत/ उच्चशिक्षीत" हे "संधीसाधू" असल्यानं "संधी" मिळाली तर नक्कीच "साधून" घेतात. अर्थात वरील प्रकारातले मराठी लोक असं करतच नाहीत असं नव्हे, पण "त्यांच्या" तुलनेत "गजबजलेल्या" ठिकाणी असलं डेअरिंग शक्यतो करताना दिसत नाहीत.
त्या घटनेनंतर, एक व्यक्ति दुसर्‍या व्यक्तिशी इतकं निर्दयी, कॄर, भावनाशून्य रित्या कसं वागू शकते हा प्रश्न कायम पडायचा
हे निर्दयी, कॄर, भावनाशून्य रित्या वागणं या लोकांकडूनच अपेक्षिले जाऊ शकतं. अशांना जागीच "ठेचणे" हाच उपाय आहे.

In reply to by हेमंत लाटकर

छेड छाड झाल्यावर बस पोलिस ठाण्यात न्यायची ठरवली तर प्रत्येक बस तिथेच न्यावी लागेल . आजकाल गर्दीत कुठही जायला भीतीच वाटते मला , सतत स्वतःला वाचवत राहायचं फालतू लोकांच्या स्पर्शांपासून आणि चुकून कोणी धक्का मारला गर्दीचा फायदा घेऊन तर दुर्लक्ष करायचं ( चुकून कसले मुद्दामच करतात ) ह्या हतबलतेचा खूप संताप येतो ,भयंकर राग येतो मला स्वतःचाच तिथल्या तिथे थोबाड फोडायची इच्छा असते असल्या लोकांच ,पण सगळा राग गिळायचा आणि दुर्लक्ष करायचं

अश्या वेळी शौर्य दाखवणं खरंच कठिण असतं. शिवाय ते तिघे होते. आणि अख्खी बस म्हणजे एक गपगुमान पुरुष. मदतीला येण्याची काहीच शाश्वती नाही. आणखी काही घाणेरड्या शिव्या दिल्या असत्या तर झालेल्या अपमानाने आणि शरमेने पाणी पाणी झालं असतं. तरीही बघे लोक धावून आले असते याची खात्री नाहीच. वादावादीत कंडक्टरने बस थांबवली तर उशीर होतोय म्हणून त्यालाच शिव्या मिळतात. निर्णय घेणं अवघड. कित्येकदा रस्त्यावरच्या भाजीबाजारात भाजीवाले बायकांना पाहून भाज्यांच्या आकारावरून (वांगी, गाजर वगैरे) भयानक शेरे मारतात. मुलींच्या बाजूने बोलायला गेलं की शेजारचे भय्ये 'छोड दो ना, इनके मुंह नही लगनेका. आप दुसरी जगह भाजी ले लो' अशी वर साळसूदपणे आपली भलाई करतात. शिवाय तो नालायक माणूस 'तुम्हारी कौन लगती है वह' असं विचारायलाही कमी करत नाही. कधी बदलणार हे सारं? लेख आवडला हेवेसांनलगे.

त्यामुळे आजूबाजूच्या लोकांचा(सूज्ञ) तुम्हाला पाठिंबा मिळतो.पण तुम्ही महिला गप्प राहिलात तर आजूबाजूचेही गप्पच राहतील.

मी कॉलेज ला असतांना असा प्रसंग घडला. बस मधून स्टेशन ला निघाले होते, सकाळची गर्दी असल्याने मी लेडीज सीट जवळ उभी होते. माझ्यामागे एक मध्यम वयाचा एक माणूस येउन उभा राहिला. जेव्हा ब्रेक लागायचा तेव्हा तो मुद्दाम जोरात धक्का द्यायचा.त्याला प्रतिकार करण्यात मी कमी पडत होते.(खूप बारीक होते)मी त्याला बाजूला व्हायला सांगितलं तर थंड नजरेने बघितल… मला खूप त्रास झाला.एवढ्यात स्टेशन आलं… मी पटकन उतरायचं ठरवल.बस वळणावर स्लो झाली. ह्या वळणावर सगळे उतरतात. माझ्यापुढे तो माणूस होता. माझ डोक तापल होत,तो उतरणार तेव्हा त्याला जोरात मागून मी धक्का दिला.तो फुटपाथ वर आपटला. पुढे मी उतरले.

थोड हिंस्त्र वाटेल पण.. हातात जे मिळेल त्याने ठोकुन काढायच. आपण पहिला पवित्रा घेतला की बाकीचे लगेच मागे येतात.

In reply to by जेपी

जे पी साहेब आपण पहिला पवित्रा घेतला की बाकीचे लगेच मागे येतात. या बद्दल असहमत. बर्याच वेळेस मी एखादा माणूस स्त्रीला छेडत असेल तर आवाज चढवला आहे. दोन तीन वेळेस त्यःच्या कानाखाली आवाजही काढलेला आहे. परंतु गर्दीतील एखादा पुरुष पुढे येत असेल तर त्याच्या बायकोने, "अहो तुम्ही कशाला लफड्यात पडताय" म्हणून त्याचा पाय ओढण्याची उदाहरणे बरीच पाहिली आहेत. शिवाय प्रत्यक्ष काही कृती करण्याची वेळ आली तर ज्या स्त्रीसाठी पुढे व्हावे ती स्वतः तेथून गायब झालेली आढळली.( यात बर्याचदा तिची अगतिकता हि दिसून आली)जोवर लष्करात होतो तोवर पोलिसांच्या लफड्यात पडणे सोपे होते तुमच्या मागे अक्ख्या सरकारी यंत्रणेचा आधार असतो. परंतु निवृत्त झाल्यावर हा आधार नाही हे लक्षात आले आणि आता अशा उदाहरणा नंतर पुढे जावे कि नाही या बद्दल संदिग्धता येते. एके काळी मी फार गरम डोक्याचा होतो पण आता मी पण थंडावलो ( निर्ढावलो) आहे. मूळ प्रश्न सुटलेला नसून अधिक जटील झाला आहे हे मात्र मान्य करतो.

In reply to by सुबोध खरे

असा पुढाकार, पोलीस, लफडी अन सरकारी यंत्रणा वाचून एक नुकताच घडलेला किस्सा आठवला. यात कोणी अनाहिता नाही(क्षमस्व) लहान गावातून जाणारी एसटी होती. निम्म्यावर रिकामी होती. अगदी मागच्या सीटवर एक अपंग माणूस मोबाईलवर फुल्ल आवाजात गाणी लावून बसलेला होता. गाण्याचा चॉइस अर्थात फालतू. पुढच्या एका सहकुटुंब पुरुषाने त्याला रिक्वेस्ट केली. त्या अपंगाने लिटरली दुर्लक्ष्य केले. त्या स्द्ग्रुहस्थाने कंडक्टरला सांगितल्यावर 'पांगळं हाय. करतय जीवाची करमणूक. करु द्या" हे उत्तर दिले. त्यावर ग्रुहस्थाने पोलीसी भाषेत त्याला दम दिला. मोबाईल काढून घेऊन आवाज बंद करुन परत केला. २० मिनिटात एक लहानसे गाव आले. दणादणा १५ -२० पोरे गाडी थांबवून डायरेक्ट आत घुसली. तो पांगळा आता त्या पोरांना त्या माणसाकडे बोट दाखवून सांगत होता. काहीही न विचारता पोरांनी ग्रुहस्थाला(तो खरेच पोलिस होता) कुत्र्यासारखे मारायला सुरुवात केली. त्याची बायको मध्ये पडत असता तिला बाजूला ढकलून मारले. ५ मिन्टात पोरे गाड्यावरुन पांगळ्याला घेऊन पसार झाली. पोलीसाने उठून फोन लावले. बस पोलीस स्टेशनला न्यायला लावली. तकरार केली. रवाना झाली. सुरंगीताताईच्या लेखाची आठवण झाली. त्याप्रसंगी बसमधल्या कुणालाच काही करता आले नाही. काय होतेय. भांडण कशाचे हे कळेपर्यंत मारुन आडदांड पसार झाले होते. पोलीस त्यांना हुडकतील. करायचे ते करतील. मारामारीचा तर सिंपल रुल. सुरुवातीलाच मारामारी होते, नंतर फक्त मिटवामिटवी अन सारवासारवी. पण साध्य अन सिध्ध काय झाले यातून?

फक्त त्या एका शिवीमुळे हा अनुभव जास्त जिव्हारी लागला, एरवी चुकूनही कधी मनात येत नाही
जिव्ह्रारी हे लागतं हे माहित असतं म्हणूनच वागणार्‍याची भिड चेपते. विषेशतः एखादा कंपु असा त्रास देत असेल तर त्रयस्थ स्त्रिच्या मदतीला नक्कि कसं जावं हे देखील लक्षात येत नाही. कारण सोबत नसताना मधे पडलो तर प्रकरण वाढणार, आणी ते उघड उघड इतकं वाढवं हे खरचं कोणाला अपेक्षीत असते काय ?

मला माहितीये कि आत्ता इथे काही सल्ले देणं म्हणजे उंटावरून शेळ्या हाकनं आहे . . पण स्वानुभवावरून सांगतोय . . अश्या गर्दीत कोणीच पुढे येत नाही . पण फक्त तो पर्यंत जोपर्यंत दुसरा कोणी येत नाही . एकाने लीड घेतली कि सगळे पाठोपाठ मदतीला येतात . प्रश्न फक्त इतकाच असतो . पहिली लाथ कोण घालणार . एकदा सुरुवात झाली कि "गर्दी" ची ताकत खूप असते, आणि अश्या XXXXX लोकांना तेच वठणीवर अनु शकतं . पण असो . असे अनुभव परत तुम्हाला येऊ नयेत . हीच इच्छा :)

किळसवाणा अनुभव. अशा वेळी १०० नंबरला कॉल केला तर काही रिस्पॉन्स मिळू शकेल का?

In reply to by पैसा

कॉल करून तर पहा! नुकताच मी कंट्रोल रूम च्या दिवसभराच्या गमतीशीर किश्श्यांचा एक लेख गुंफला आहे. आज उद्यात टाकीनच! तो वाचल्यावर तुमच्या लक्षात येईल की... नाही नाही त्या कॉल्सना रिस्पॉंड करतात पोलीस, मग एखाद्या गंभीर कॉलला का नाही करणार? धन्यवाद! (घरातच दोन पोलीस असलेला) Sandy

In reply to by पैसा

अशा वेळी १०० नंबरला कॉल केला तर काही रिस्पॉन्स मिळू शकेल का? वाटत नाही काही उपयोग होईल असे..मी एकदा गरजेच्या वेळी सलग १० मिनिटं प्रयत्न करत होतो पण साधा कॉल उचलायची पण तसदी घेतली गेली नव्हती.

लेख पटला. पैतै, १०० चं माहीत नाही. पण वर लिहिलेल्या ड्रायवरच्या अनुभवाच्या वेळी मी मनपा बस स्टैण्डला १० वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते मला ड्रायवरचं नाव द्या नाहीतर तुमचीपण तक्रार करते म्हणून. तर मला त्या कंट्रोल रूम मधे सोडून सगळे निघून गेले भटकायला. १० नंतर पोलीस स्टेशनला जायची माझ्यात एनर्जी नव्हती आणि ते सेफपण वाटलं नाही. किमान माणुसकी हा प्रकारसुद्धा दुर्मिळ आहे. उठसूट अनाहितांना शक्य तिथे शक्य त्या शब्दांत हिणवणार्‍या महाभागांना यातले किती स्ट्रेस डेली बेसिसवर सहन करावे लागतात हे जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by पिशी अबोली

तर हा अनुभव डिटेल लिहा. वाटल्यास बदललेल्या नावाने सगळ्या पेपर्स च्या कार्यालयात देऊन या/पोस्ट करा. द लॉजिकल इंडीयन ला पाठवा, सोशल मिडिया चा वापर करा. असं सुचवेन.

In reply to by पिशी अबोली

" मी मनपा बस स्टैण्डला १० वाजेपर्यंत ठाण मांडून बसले होते मला ड्रायवरचं नाव द्या नाहीतर तुमचीपण तक्रार करते म्हणून. तर मला त्या कंट्रोल रूम मधे सोडून सगळे निघून गेले भटकायला." - अशावेळेस तक्रार करायला गेल्यावर काय होतं ते स्पष्ट करण्यासाठी तुमचा अनुभव प्रातिनिधीक आहे . नंतर तुम्ही तिथून गेल्यावर मनसोक्त टरही उडवली असेल त्या लोकांनी, तेवढंच जमतं त्यांना. " उठसूट अनाहितांना शक्य तिथे शक्य त्या शब्दांत हिणवणार्‍या महाभागांना " - काही गरज नसतांना, संदर्भ नसतांना नुकतेच एका धाग्यात वापरलेले काही शब्द, ट्रोलहिता, कुरणातली टोळधाड, मधमाशा इ. स्त्रियांच्या ग्रूपला हिणवणारे कोण तर पुरूषांचा कंपूच. इथेही तेच चालू आहे.

In reply to by नीलमोहर

- काही गरज नसतांना, संदर्भ नसतांना नुकतेच एका धाग्यात वापरलेले काही शब्द, ट्रोलहिता, कुरणातली टोळधाड, मधमाशा इ.
यातला "मधमाशा" हा शब्द मीच वापरलेला पण त्याचे कारण वेगळे होते....आणि ज्या अर्थाने तुम्ही घेतला ते कारण सर्वस्वी वेगळे आहे....आत्ता वेळ नाहिये....नंतर सविस्तर प्रतिसाद टंकतो (नाही टंकला तर मला आठवण करा)

In reply to by टवाळ कार्टा

आपण आणि अनाहिता मध्ये चेष्टा चालत असते माहित आहे, त्या धाग्यातही आपले प्रतिसाद बर्‍यापैकी रिजनेबल होते. त्यामुळे आपल्याबाबत फारशी तक्रार नाही. मात्र हेच इतरांबद्दल म्हणता येणार नाही.