मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पूर्वेच्या समुद्रात- ७

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पूर्वेच्या समुद्रात- १ पूर्वेच्या समुद्रात- २ पूर्वेच्या समुद्रात-३ पूर्वेच्या समुद्रात-४ पूर्वेच्या समुद्रात ५ पूर्वेच्या समुद्रात ६ पूर्वेच्या समुद्रात- ७ विशाखापटणमला नव्या घरात स्थिरस्थावर होत होतो.माझे घर पाचव्या मजल्यावर होते घर अतिशय उत्तम होते परंतु बिल्डींग नवीन होती आणी फक्त ६-७ लोक राहायला आले होते. त्यातील एक कॅप्टन राव म्हणून मर्चंट नेव्ही मधून निवृत्त झालेले गृहस्थ तिसर्या मजल्यावर राहत होते होते त्यांना हिंदी किंवा इंग्रजी येत असे. बाकी सर्व जण खालच्या मजल्यांवर राहत आणी जेमतेम हिंदी किंवा इंग्रजी बोलत. हि बिल्डींगमधील घरे बहुसंख्य एन आर आय लोकांनी घेतलेली हाती आणी त्यांचे आई बाप किंवा नातेवाईक तेथे राहत होते त्यामुळे त्यांना मोडके तोडके हिंदी येत असे. ग्यास बदली करून तेथे नाव नोंदवून घेतला, मुलीला शाळेत प्रवेश,स्कूल बसचा पास,तिचे गणवेष, बूट, केबल वाला, वीज बिल, घराचे भाडेकराराचे पंजीकरण एक ना दोन. प्रत्येक वेळेस घर बदलले कि अशा हजार भानगडी निपटायला लागतात. बायकोने घरी शेजार्यांना सांगून कामाला बाई लावली. तिला फक्त तेलगु च येत होते.तिचे कामाचे स्वरूप, पगार किती इ इ शेजारच्या लोकांनी तेलुगूत तिला समजावले. येणाऱ्या कामाच्या बायका गरीब, स्वच्छ आणि सालस होत्या. जितक्या बायका आल्या त्यापैकी कोणालाच हिंदी येत नव्हते. बिचार्या खाणाखुणानीच काय ते सांगत आणी विचारत. त्यातून घर पाचव्या मजल्यावर होते आणी खिडक्यांना गज किंवा जाळी नव्हती फक्त काचा होत्या. त्यामुळे मी नसताना बायकोला खिडक्या कायम बंद ठेवाव्या लागत. (मुलगी ४ वर्षे आणि मुलगा दीड वर्षे वय).घर मालकाच्या मागे लागून मी त्या खिडक्यांना लोखंडी जाळ्य़ा लावून घेतल्या. ( ते त्याने घर घेतानाच करीन असे कबुल केले होते परंतु प्रत्यक्ष काम होई पर्यंत एक महिना गेला.) पण त्या जाळ्य़ा लावेपर्यंत बायकोच्या जीवात जीव नव्हता. घर उघडे ठेवायची भीती वाटे कारण एकदा मुलगा बाहेर जिन्यात गेला आणी तिथल्या लोखंडी बारमधून डोके आत घालून काय आहे ते पाहत होता. तेथून सरळ पाच मजले खालचे दिसे. ते पाहून बायकोने दार कायम बंद ठेवणे पसंत केले. एवढेच होते कि दोन्ही मुलं स्वतःची खेळणी आणी आईबाप जवळ असतील तर स्वतःच्या जगात रमलेली असतात. त्यांच्या कडे पाहून छान वाटते. मी आठवड्यात पाच दिवस ( दिवसा आणी रात्री) बाहेर असल्याने सर्व भर बायकोवर एकटीवर होता. डॉक्टर असूनही तिला मुलांना सोडून कुठेच जाणे शक्य नव्हते. कामाच्या बायका चांगल्या होत्या परंतु भाषेचा फार मोठा अडसर होता. मी सेलिंग हून परत येत असे तेंव्हा आम्ही शहरात फिरायला जात असू. विशाखापटणम शहर फार छान आणी टुमदार होते. अतिशय सुरक्षितहि होते लोक सभ्य आणी सुसंस्कृत आहेत. पण चित्रपटाचे भयंकर वेड. एकदा तेथे शहरात चिरंजीवी आला तर मोठा ट्राफिक जाम झाला. आम्ही हिरो होंडा वर फिरत असू.मुलगी पुढे बसे मुलगा आईच्या कडेवर मागच्या सीट वर. शहरात रहदारी फार नव्हती. असे करता करता एक दिवशी बातमी आली कि आमचे जहाज दोन ते तीन महिने अंदमानच्या समुद्रात पाठवणार. मी त्या दृष्टीने घरात सर्व पदार्थ भरून ठेवण्याच्या तयारीला लागलो. एवढ्यात आमच्या शेजारच्या जहाजावरील( वरद) एक २२ वर्षाचा नौसैनिक पाण्यात बुडून मरण पावला आणी त्याच्या चौकशी आयोगाचा वैद्यकीय सदस्य म्हणून मला नियुक्त केले. काय आणी कोणत्या परिस्थितीत त्याचा मृत्यू झाला आणी त्याला जबाबदार कोण याची हि चौकशी होती. त्यःच्या शव विच्छेदनाचा अहवाल आला. त्यात त्याला स्वरयंत्र बंद झाल्याने( SPASM) घुसमटून मृत्यू असे कारण आले होते. याची मूळ पीठिका अशी आहे तट रक्षक दलात भरती झालेल्या सैनिकाला पहिली बढती मिळण्याच्या अगोदर पोहण्याची चाचणी पास होणे आवश्यक आहे. हा सैनिक पोहण्याचे शिकलेला नव्हता. एकदा त्याला भरती केला कि त्याला पोहणे शिकवणे हि नियमानुसार तटरक्षकदलाची जबाबदारी होते. मुंबईत असताना नौदलाचा तरणतलाव सैनिकांच्या निवास स्थानाजवळच होता. त्यामुळे त्याला शिकवणारे शिक्षक त्याला काम संपल्यावर बोलावून घेत आणी शिकवत असत. हा सैनिक पोहण्याची भीती बसली होती म्हणा पण एक वर्ष झाले तरी ती चाचणी पास होत नव्हता. या चाचणीत आपल्याला पूर्ण शर्ट पैंट आणी बुटा सहित पोहून तरण तलावाची एक फेरी ५० + ५० ( शंभर) मीटर पार करायचे असत. हा सैनिक काही केल्या पास होत नव्हता. आता विशाखापटणमला नौदलाचा तरण तलाव बारा किमी लांब होता. आणी जहाज विशाखापटणमच्या कालव्यात उभे होते. रोज त्याला नियमानुसार सरकारी जीपने १२ किमी घेऊन जायचे एक तास शिकवायचे आणी परत घेऊन यायचे यात त्याचा शिक्षक आणी हा आणी जहाजाची असलेलीं एकमेव जीप दोन ते अडीच तास अडकून पडत असे. यावर तोडगा म्हणून वरद जहाजाच्या कॅप्टनने त्याला त्या विशाखापटणमच्या कालव्यातच पोहायला शिकवा असा आदेश दिला. तीन चार दिवस हे व्यवस्थित चालले पण चौथ्या दिवशी हा पाण्याच्या खाली गेला तो एक मिनिटभर बाहेर येत नाही म्हणून त्यःच्या प्रशिक्षकाने त्याला बाहेर काढले तेंव्हा हा घुसमटला होता. त्याला ताबडतोब त्यांनी जहाजावर आणले. तेथे त्याला ताबडतोब प्रथमोपचारही दिला गेला होता. त्या जहाजाचा डॉक्टरही होता. त्यानेहि पूर्ण प्रयत्न केले. परंतु त्याचा उपयोग न होता त्याचे प्राणोत्क्रमण झाले होते. सर्व चौकशी पुरावे गोळा करून आम्ही आमचा अहवाल सदर केला. त्यात त्या सैनिकाला नियमबाह्य कालव्यात पोहण्यास भाग पडल्याबद्दल वरद जहाजाच्या कमांडिंग अधिकार्याला काही प्रमाणत दोषी धरले होते. त्याचे म्हणणे कितीही पटत असले तरीहि नियमभंग केल्यामुळे असे झाले हे आम्हाला नमूद करणे भाग होते. (हीच गोष्ट नौदलाच्या तरण तलावात झाली असती तर तेथे काही डॉक्टर उपलब्ध झाला नसता पण ते नियमात बसले असते.) आम्ही काही दूरगामी उपायही सुचवले होते कि तटरक्षक दलात भरती होण्यासाठी पोहता येणे हे आवश्यक ठरवा. जसे आर्मी च्या भरतीत उमेदवाराला पंधरा मिनिटात तीन किमी धावता येणे आवश्यक असते. परंतु उत्तर प्रदेश आणी बिहारच्या काही आमदार आणी खासदारांनी हे उत्तर भारतीय लोकांना तटरक्षक दलातून वगळण्याचा डाव आहे म्हणून जोरदार आक्षेप घेतला त्यामुळे तो उपाय बासनात गुंडाळून ठेवला गेला आहे असे कळले. खरं तर गंगेच्या खोर्यात नदीत किंवा कालव्यात पोहण्याच्या भरपूर संधी आहेत पण प्रत्येक बाबतीत राजकारण आणलेच पाहिजे हा आपल्याकडे अलिखित नियम आहे. हि चौकशी पूर्ण होईपर्यंत मला तेथून हलता येणार नव्हते. ते माझ्या पथ्यावरच पडले होते कारण रोज संध्याकाळी मी आपल्या घरी परत येत असे. पण यात तेथील मुख्यालय आणी आमचे जहाज (जे पोर्ट ब्लेअरला पोहोचले होते) यांच्यात मला पोर्ट ब्लेअरला पाठ्वण्यावरून रस्सीखेच चालू होती. कारण तटरक्षक दलाच्या मुख्यालयातील डॉक्टर रजेवर गेला होता त्यामुळे त्यांना डॉक्टरला ( मला पाठवायचे नव्हते) असे करत करत पंधरा दिवस गेले आणी शेवटी त्यांनी मला पोर्ट ब्लेअरला जायला परवानगी दिली. या रस्सीखेच मध्ये मला इंडियन एअर लाईन्सचे तिकीट मिळणे अशक्य होते. मग मी कोरोमांडेल एकस्प्रेस चे चेन्नई चे तिकीट काढले. आणी तेथून वायुसेनेच्या कुरियर विमानाने पोर्ट ब्लेअर ला जायचे होते. हे कुरियर सुलूर -तांबरम -पोर्ट ब्लेअर - निकोबार आणी तसेच उलटे परत असे एक दिवसा आड जात असे. तटरक्षक दलाच्या तेथील प्रमुखांनी मला प्रथम इंडियन एअर लाईन्सचे तिकीट उपलब्ध आहे का ते पाहण्यास सांगितले तेंव्हा मी त्यांना त्यात आणी वायुसेंच्या विमानातील फरक विचारला. ते हसत म्हणाले कि डॉक्टर इंडियन एअर लाईन्स मध्ये वातानुकुलीत खुर्चीवर तुला हवाई सुंदरी हसून चहा नाष्टता देईल आणी वायुसेंनेच्या विमानात तुला बाकड्यावर किंवा भाज्या आणी मटणाच्या ढिगावर बसून जायला लागेल. हवाई सुंदरी किंवा वातानुकुलीत हवा सोडच चहा पाणी सुद्धा कोणी विचारणार नाही.आणी खाली उतरल्यावर तुझ्या गणवेषाला कोथिंबीर पालक किंवा मटणाचा वास सुद्धा येईल. आम्ही दोघे हसलो. लष्कराच्या कोट्यातून मला कोरोमांडेल एक्स्प्रेसचे तिकीट दिवाळीच्या पाडव्याच्या दिवशी सकाळचे मिळाले. बायको थोडीशी नाराज झाली. पण मी तिला समजावले कि हि चौकशी नसती तर मी आत्ता पोर्ट ब्लेअर च्या समुद्रात असतो. निदान दिवाळीचे दोन दिवस तरी मिळत आहेत. सकाळी सात वाजता ती गाडी येणार होती. मी सरकारी जीपने स्टेशनवर पोहोचलो तर ती गाडी आठ तास उशिरा येणार असे कळले. मग मी परत घरी आलो. बायकोला थोडे बरे वाटले. पाडव्याचे अंगाला सुगंधी तेलाचे मालिश वगैरे बायकोकडून करून घेऊन उटण्याने परत अभ्यंग स्नान केले. सकाळची अंघोळ जरा घाई घाईतच झाली होती. दुपारी दोन ला परत निघायचे होते म्हणजे मी जेवायला घरी होतो. ते पाहून बायकोला उत्साह आला. तिने पण स्नान उरकले आणि छान जरीची साडी नेसून ती उत्साहात स्वयंपाकाला लागली. मी जेवायला आहे म्हणून तिने बासुंदी साठी दुध आटबायला घेतले. मला पण आराम होता. मी तिच्याशी गप्पा मारत थोडेसे काम करीत तिच्याकडे पाहत होतो. बाकी नटून, थटून, साडी वगैरे नेसून सालंकृत बायका सुंदर दिसतात. या मुळेच मला दसरा दिवाळी असे सण आवडतात. मस्त पैकी काम करणाऱ्या बायको कडे पाहत बसायला छान वाटते. तिची काहीतरी बडबड चालू होती. मी तिला असा पाहत होतो तेंव्हा तिचे लक्ष गेले.तिने विचारले काय झाले मी तिला म्हणालो बासुंदि. तिने घाईघाईने ग्यास वर पहिले आणि म्हणाली दुध उतू गेलेले नाही. मी तिला म्हणालो "बासुंदी म्हणजे बायको सुंदर दिसते". तर ती झक्कपणे लाजली आणि लटक्या रागाने म्हणाली कि तू इथे बसू नको मला काम सुचत नाही. क्रमशः पूर्वेच्या समुद्रात- ८

वाचने 15875 वाचनखूण प्रतिक्रिया 32

सौंदाळा Tue, 10/06/2015 - 10:42
मस्त कौटुंबिक प्रसंग, नोकरीतील अनुभव, प्रवासवर्णन असे सुंदर कॉकटेल वाटतेय तुमची ही लेखमाला वाचुन

पद्मावति Tue, 10/06/2015 - 11:19
सुंदर लेखमाला. खूप आवडतेय आणि वाचतेय.
कौटुंबिक प्रसंग, नोकरीतील अनुभव, प्रवासवर्णन असे सुंदर कॉकटेल वाटतेय तुमची ही लेखमाला वाचुन
.....अगदी सहमत.

In reply to by टवाळ कार्टा

सुबोध खरे Tue, 10/06/2015 - 11:55
तू पण एका सुंदर मुलीशी लग्न कर म्हणजे हॉटेलात बसून दुसर्यांच्या बायकांना बघायची ( आणि ते पाहून जळजळ होण्याची) वेळ येणार नाही. बघ अनाहिता तर एका पायावर तयार आहेत तुझ्यासाठी सुंदर मुली "बघायला" . सर्वात लाडक्या "टक्कूमक्कूशोनू" साठी

In reply to by सुबोध खरे

टवाळ कार्टा Tue, 10/06/2015 - 12:10
एक करेक्शन....मी दुसर्याच्या बायकांना बघत नै....बाकी अनाहितांची आश्वासने म्हणजे....असो ;)

नाखु Tue, 10/06/2015 - 14:54
कायम फिरस्तीवर (बिर्‍हाडासहीत) असलेल्या लोकांबद्दल कायम कुतुहल आणि नवल वाटत आले आहे. नवीन परिसर्,नवीन मित्र, नवीन शेजारी जरा बस्तान जमत नाही तोच पुन्हा नवीन ठिकाणी...पुनच्स्श हरी ओम. पुलेप्र. गेली २०-२५ वर्षे एकाच जागी पथारी पसरलेला नाखु.

विजुभाऊ Tue, 10/06/2015 - 15:37
नाखु काका. गेली दहा पंध्रा वर्षे मी हेच करतोय. दर वर्ष सहा महिन्यानी समोर भेटलात कीनवे ठिकाण , नवे लोक , नवी चॅलेंजेस. लै एन्जोय करतो. बरेच वर्षे एका ठिकाणी रहाणार्‍या लोकाम्बद्दल जाम कुतुहल वाटते. कंटाळा नाही का हो येत रुटीनचा आणि रोज तेच तेच जगण्याचा?

प्रचेतस Tue, 10/06/2015 - 17:13
हाही लेख खूप आवडला. मध्यंतरी ऑफिसकामासाठी विशाखापट्टणमला जाणे झाले होते. अतिशय सुंदर शहर आहे. फावल्या वेळात एकटाच शहराची भटकंती करुन येत होतो. आरके बीच, यारदा बीच, मत्स्यालय, युद्धनौकेवरील संग्रहालय, रामकृष्ण मठ अशी काही मोजकी ठिकाणे पाहून झाली.

निनाद Sun, 10/18/2015 - 10:24
डॉक्टर साहेब तुमचे लेखन फार आवडते कारण त्यात एक समंजस आणि सारासार विवेकी विचार असतो. दर वेळी प्रतिसाद देत नसलो तरी वाचत असतो. पुढच्या भागाची वाट पाहत आहे...