मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पूर्वेच्या समुद्रात ६

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
महाबली पूरम ला जातानाचा पूर्व किनारा रस्ता (EAST COAST ROAD) यावर तेथल्या राजकारणी आणी चित्रपट अभिनेते यांचे प्रासादतुल्य बंगले त्याच्या बाजूच्या मोठ्या मोठ्या बागा त्यातील हिरवळी हे पाहून आपण भारतात आहोत कि एखाद्या परदेशात असा संभ्रम पडेल. रस्त्यात मध्ये मगरींचे संग्रहालय पाहिले.वेगवेगळ्या मगरी सुसरी घडीयाल कासवे ई सरीसृप जातीचे प्राण्यांचे जतन केंद्र तेथे आहे. तेथे तमिळनाडूतील इरुला या( गारुडी सारख्या) भटक्या जमातीच्या सहकारी सोसायटीचे सर्प पालन केंद्र हि होते. येथे नाग, नागराज, मण्यार, घोणस आणी फुरसे या जातीचे साप ठेवलेले होते या सापांचे विष काढून ते शीत तापमानात निर्जलीकरण करून ठेवले जात असे. हे निर्जलीकरण केलेले सर्प विष विविध प्रयोगशाळा आणी औषध कंपन्यांना सर्प विष प्रतिबंधक तयार करण्यासाठी विकले जाते आणी यातून मिळणारा पैसा त्या जमातीच्या लोकांचा चरितार्थ आणी त्यांच्या विकासासाठी वापरला जातो. हि सोसायटी प्रसिद्ध सर्पतज्ञ रोम्युलस व्हाईटेकर यांनी स्थापन केलेली आहे. पुढे महाबलीपुरमला तेथे असलेली मंदिरे आणी भव्य शिल्पे पाहून दृष्टी निवली. त्यातून युनेस्कोची हेरीटेज साईट म्हणून अनुदान मिळत असल्याने त्याची निगा सुद्धा व्यवस्थित ठेवलेली आहे. जाला वर त्याची अनेक चित्रे आणी माहिती उपलब्ध आहेच. दुपारी तिथेच हॉटेलात जेवलो आणी परतीच्या रस्त्याला लागलो. अशा कोणत्याही उत्तम पर्यटन स्थळाला जाऊन परत येताना मन नेहमी उदास होते कि आता परत रोजच्या कामावर जावे लागणार म्हणून.तरीही डॉक्टर महापात्राच्या कृपेने दिवस तरी चांगला गेला होता. सय्योनी गाणे केवळ मलाच नाही तर इतर तिघानाही फारच आवडलेले असावे कारण ते गाणे आम्ही कमीत कमी पाच सहा वेळा तरी ऐकले. संध्याकाळी परत येताना मरीना बीच वर थांबलो. तेथे मसाला छोले, काकडी असे सटर फटर पदार्थ खाल्ले नारळाचे पाणी प्यायलो. मी सूर्यास्ताची वाट पाहत होतो तेंव्हा लक्षात आले कि आपण पूर्व किनार्यावर आहोत आणी येथे समुद्रकिनार्यावरून सूर्यास्त दिसत नाही. ( हा अनुभव आत्तापर्यंत कधीच आला नव्हता कारण आत्तापर्यंत पहिलेले सर्व समुद्रकिनारे पश्चिम किनार्यावरीलच होते) त्याने अजूनच उदास झाले. शेवटी महापात्राने मद्रास च्या बंदराच्या बाहेर सोडले तेथून कोळशाच्या ओल्या काळ्या पुडीतून चालत जहाज गाठले. तेथे एक बातमी वाट पाहत होती. आपले संरक्षण मंत्री श्री जॉर्ज फर्नांडीस मद्रास ला ( बहुधा कल्पक्कम अणुकेंद्र आणी वीजकेंद्राला) भेट देणार आहेत तर त्यांच्या साठी एक पार्टी तटरक्षक दलाने चार दिवसांनी ठेवली आहे. आणी त्यासाठी आपल्या जहाजाच्या मागच्या भागाची( QUARTER DECK) निवड करण्यात आलेली आहे. झालं. म्हणजे आता जहाजाला परत रंगरंगोटी करा सजवा आणी वेळेत विशाखापटणमला( जेथे आमचे जहाज आपला तळ हलवणार होते) पोहोचण्याचे स्वप्न धुळीस मिळाले. परत आलो ती वार्ता कमांडिंग अधिकार्याला कळली. त्याने आपल्या केबिनमध्ये बोलावून घेतले. त्याना भेटलो तेंव्हा ते म्हणाले डॉक्टर आपल्या मुद्पाक खान्यात फार झुरळं झाली आहेत काही तरी कर. मी वैतागून म्हणालो मी काय करू? तुम्ही पेस्ट कंट्रोल वाल्यांना बोलवा. त्यावर ते म्हणाले डॉक्टर संरक्षण मंत्री येथे जेवायला येणार त्याबरोबर संरक्षण सचिव, तट रक्षक दलाचे महानिदेशक आणी तामिळनाडू सरकारच्या इतर अतिमहत्त्वाच्या व्यक्ती येणार. आपल्या इज्जतीचा कचरा व्हायला नको. त्याला मी विक्रांत मध्ये केलेला कीटकनाश माहित होता. मी त्याना म्हणालो सर ते काम DRDO ने येऊन केले आहे आता एवढ्या कमी वेळात त्यांना बोलावून काहीही करणे शक्य नाही. त्यावर ते म्हणाले डॉक्टर काहीतरी करायलाच पाहिजे. मी त्यांना एक उपाय सुचवला कि मुंबईतून एक धूर करणारे संयंत्र मागवता येईल का? सुदैवाने आमचा एक अधिकारी कोची हूनच काही कामासाठी मुंबईला गेला होता. त्याला मी फोन लावला. आणी मरीनलाइन्स स्टेशनच्या जवळ प्रिन्सेस स्ट्रीटला एक व्होरा केमिस्ट आहे त्याच्या कडून CANON SMOKE INSECTICIDE घेऊन यायला सांगितले. http://mumbai.all.biz/canon-smoke-insecticide-g342557#.VgZVStKqqko हे छोट्या डब्यासारखे असते. दुसर्या दिवशी रात्री(सोमवारी) तो अधिकारी विमानाने आला तेंव्हा ते घेऊन आला.मंगळवारी सकाळी न्याहारी नंतर सगळ्या अधिकारी आणी सैनिकांना बाजूच्या विक्रम या तट रक्षक दलाच्या जहाजावर पाठविले आणी फक्त अग्निशमनाचे काम करणाऱ्या चार कर्मचार्यांना मी बरोबर ठेवले. ते CANON चे डबे मुदपाकखान्यात एक आणी एक जेवायच्या हॉल मध्ये ठेवले. तो डबा फोडून त्यात जळती काडी टाकायची आणी खोली बंद करायची. आतल्या धुराने सगळे कीटक घुसमटून बाहेर येतात आणी बाहेर मरतात.एक दीड तासाने खोली उघडली आणि तेथे गेलो तर भरपूर झुरळे आणी माश्या मरून पडलेले होते. ती पाहून कमांडिंग अधिकारी खुश झाला आणी म्हणाला, "डॉक, तुमने तो कमाल कर दिया!" मी त्यांना म्हणालो सर जॉर्ज साहेब यायच्या आदल्या दिवशी एकदा परत एकदा मोर्टीनचे स्प्रे मारायला हवेत. या परमेथ्रीन असलेल्या स्प्रेचा वास रेंगाळत राहत नाही त्यामुळे आदल्या दिवशी रात्री याचे फवारा मारून ठेवू म्हणजे उरली सुरली झुरळे माश्या आणी इतर किडे मरतील. निदान पार्टी तरी व्यवस्थित पार पडेल. असा फवारा मी आदल्या दिवशी रात्री कुक आणी स्टेवर्ड कडून मारून घेतला. इतर नौसैनिकांनी एखाद्या लग्नाच्या मांडवासारखे जहाज सजवले होते. आतून बाहेरून पांढरा स्वच्छ रंग मारला होता. दुसर्या दिवशी दुपारी बातमी आली जॉर्ज साहेबांचा कार्यक्रम बदलला आहे तेंव्हा ते कल्पक्कम वरून थेट विमानतळावर जाणार असून तेथून दिल्लीला रवाना होतील. हे म्हणजे एखाद्या मुलीने "दाखवायच्या" कार्यक्रमासाठी पूर्ण जामा निमा करायचा आणी मुलाच्या आईचे पोट बिघडले म्हणून कार्यक्रम रद्द असा निरोप यावा असे झाले. पण सांगता कुणाला? त्याच बरोबर आम्हाला विशाखापटणमला कूच करायचाही हुकुम मिळाला. आता त्यांची (स्थानीक तट रक्षक मुख्यालयाची) गरज संपली होती. आम्ही सुद्धा घाई घाईने मद्रास बंदर सोडले कारण जास्त वेळ तिथे रेंगाळले असतो तर फुकट नवीन काम (पाल्क च्या सामुद्रधुनीत गस्त घालणे इ) गळ्यात पडण्याची शक्यता होती. जहाजावर प्रत्येकाला आपला तळ हलवून आपला बाड बिस्तरा घेऊन आपल्या कुटुंबाला विशाखापटणमला हलवायचे होते. मुलांच्या शाळा सुरु झाल्या होत्या. त्यांना इकडच्या शाळेत प्रवेश घ्यायचे होते. दुसर्या दिवशी संध्याकाळी आम्ही विशाखापटणमला पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर मला एक सुवार्ता कळली ती म्हणजे माझे डेप्युटेशन तटरक्षक दलात असल्याने मला नौदलात घर मिळणार नव्हते आणि तटरक्षक दलाकडे घरे नव्हतीच. म्हणजे मला शहरात कुठेतरी घर शोधायला लागणार होते. एक तर मी स्वतः नौदलात अधिकारी असताना मला घर मिळणार नाही हि गोष्टच माझ्या पचनी पडत नव्हती त्यातून मी जहाजात काम संपले कि विशाखापटणमच्या रुग्णालयात काम करायचे असे माझ्या बदलीच्या हुकुमत लिहिलेले होते. म्हणजे कामाला मी नौदल आणि तट रक्षक दलात दोन्ही कडे आणि सुविधांसाठी कुणाचाच नाही.अंगाचा अगदी तिळपापड झाला होता. परंतु मी पहिल्यांदा शहरात घर शोधायला सुरुवात केली. नौदल तळाजवळ घरे नव्हती. शहरात असा भाग शोधायचा होता जो नेव्हल पब्लिक स्कूल च्या जवळ आहे किंवा जिथे त्यांची बस येते म्हणजे माझ्या मुलीला के जी मध्ये प्रवेश घेणे सोपे झाले असते. रोज संध्याकाळी आपली मोटार सायकल घेऊन मी घरे शोधाच्या मोहिमेवर निघायचो. एच आर ए (घरभाडे भत्ता) जास्तीत जास्त १५०० रुपये मिळणार होता. तेवढ्या पैश्यात मी विशाखापटणमला तीन बेडरूमचे प्रशस्त घर भाड्याने घेतले. हे शहरापासून लांब होते परंतु नेव्हल के जी ला तेथून बस होती. घर भाड्याने घेतले आणि आता कुटुंब तेथे आणण्याची तजवीज करायला लागलो. परंतु तटरक्षक दलाने आम्हाला उसंत दिली नाही. दर दोन दिवसानी आम्हाला चार पाच दिवस सेलिंग ला जायला लागायचे. म्हणजे पाच दिवस समुद्रावर काढले कि उरलेल्या दोन दिवसात सकाळी मी तिथल्या रुग्णालयात काम करायला जात असे आणि संध्याकाळी मुंबईत फोन करून सामान हलवायचे कुटुंबाला कसे इकडे आणायचे याचे बेत ठरवत असे.प्रत्येक बेत ढासळत असे कारण आम्हाला समुद्रावर पाठवत.जहाजावर मी एकटाच डॉक्टर असल्याने मला सुटी सुद्धा मिळत नव्हती. कारण जहाजावर हेलीकॉप्टर असेल तर डॉक्टर असणे आवश्यक होते. असा एक महिना गेल्यावर शेवटी माझे वडील माझ्या बायको मुलांना( मुलगी ४ वर्षे आणि मुलगा दीड वर्षे वय ) घेऊन विमानाने विशाखापटणमला आले आणि भावाने माझे सामान एका ट्रक मध्ये विशाखापटणमला पाठवून दिले. विशाखापटणमला एका वर्षात मी चार घरे बदलली.आणि माझ्या मुलीने दीड वर्षात पाच शाळात प्रवेश घेतला. त्याची कहाणी पुढे येईलच. यातच माझ्या पुढील संघर्षाची बीजे पेरली गेली. क्रमशः

वाचने 14802 वाचनखूण प्रतिक्रिया 27

खेडूत Mon, 09/28/2015 - 13:30
वाचतोय! सतत गावं बदलण्याचा त्रास होत असणार. पण मुलांना कदाचित अनुभवानं सम्रुद्ध व्हायला उपयोग होत असेल. पुभाप्र..

In reply to by खेडूत

रेवती Mon, 09/28/2015 - 18:09
नेहमीच अनुभवसमृद्ध होता येते असे नसते. नुकसान होते ते कोणाला दिसत नाही आणि मुलांना वय लहान असल्यामुळे फारसे सांगता येत नाही, अर्थात हे मोठे झाल्यावर कळते.

In reply to by रेवती

मुक्त विहारि Mon, 09/28/2015 - 18:26
थोडे वेगळे मत व्यक्त करतो. अनुभव दोन प्रकारचे असतात, चांगले (फायदा देणारे) आणि वाईट (नुकसान देणारे) आणि प्रत्येक व्यक्तीला दोन्ही प्रकारचे अनुभव येत असतातच. आणि ह्या दोघांपैकी "नुकसान देणारे अनुभव माणसाला, मानसिक दृष्ट्या, जास्त कणखर बनवतात." असा माझा वैयक्तिक अनुभव आहे. वारंवार शाळा बदलणे हे कदाचित नुकसान दायक असेलही पण, आपण आहे त्या परिस्थितीला तोंड देवू शकतो, हा एक प्रकारचा आत्मविश्र्वास पण येवू शकतो. तुमची वैचारिक भुमिका नेहमीच, "वादे वादे जायती संवाद:" अशी असल्याने मत प्रदर्शन करत आहे.राग मानू नये.

In reply to by मुक्त विहारि

रेवती Mon, 09/28/2015 - 19:39
छे हो, राग कसला त्यात! आता एकटीने राहताना मला काही प्रश्न येत नाही हा मोठा फायदाच! घरातील सामान प्याकिंगची सवय आता स्थिर झाल्यावरही जात नाही. ;) जीवनशाळेत हेच अनुभव कामी येतात. पण याच सिस्टीममध्ये अभ्यासातील मार्कांनाही महत्व दिले जाते त्याला काय करणार? व दर काही महिन्यांनी शाळा बदलत राहिल्यास तिथे गणित चुकते व बालकांची अभ्यासाची ताकद आजमावण्यापेक्षा मानसिक ताकद बदलांशी जमवून घेताना खर्ची पडते. ते त्या वयात झेपत नाही पण सांगण्याइतकी शब्दसंपत्ती, धाडस नसते. मित्रमंडळ दर काही महिन्यांनी दुरावते म्हणून त्यादृष्टीने एकटेपणा येतो. आधी मला वाटायचे की मलाच असे होतेय, कारण सगळ्यांना मित्र जमवायला प्रश्न येतोच असे नाही. पण काही लोक गेल्या दोन तीन वर्षात भेटले की सततच्या अशा परिस्थितीने आता मित्र जोडण्याची क्षमता कमी होत गेल्याचे म्हणतात. उदाहरण, आता प्रतिसादात कितीही टंकले तरी समोर मनुष्य आल्यावर गप्प बसते. मग लोकांचा गैरसमज होतो की ही बया मिपावर बडबड करते तर आता गप्प आहे याचा अर्थ काय घ्यायचा? ;) सुदैवाने आमचे जे काय होते ते महाराष्ट्रातच! येथे काही लोकांचे भारतभर, काहीजणांचे अनेक देशांमध्येही बदलीमुळे फिरणे झालेय. आता १९ वेळा इकडे तिकडे फिरून मी गप्प बसलिये.

मुक्त विहारि Mon, 09/28/2015 - 13:36
आणि माझ्या मुलीने दीड वर्षात पाच शाळात प्रवेश घेतला." घर बदलण्याचा आणि शाळा बदलण्याचा अनुभव असल्याने, ह्या दोन्ही गोष्टींसाठी किती त्रास होतो, त्याची कल्पना आहे.

मांत्रिक Mon, 09/28/2015 - 18:15
आज पहिल्यांदाच वाचतोय. मस्त आहे डाॅक्टरसाहेब अनुभवकथन. पूर्ण वेगळं जग पहायला मिळतंय. विशाखापटणमला एका वर्षात मी चार घरे बदलली.आणि माझ्या मुलीने दीड वर्षात पाच शाळात प्रवेश घेतला. त्याची कहाणी पुढे येईलच. यातच माझ्या पुढील संघर्षाची बीजे पेरली गेली. हे अगदी वाईट आहे. किमान संरक्षण क्षेत्रात तरी असं नको व्हायला.

In reply to by मांत्रिक

मुक्त विहारि Mon, 09/28/2015 - 18:38
पण हे असे सगळी कडेच होते. "गरज सरो अन वैद्य मरो आणि दोन्ही घरचा पाहूणा उपाशी" ह्या दोन्ही म्हणी बर्‍याच आस्थापनांत सहज आढळू शकतात. एकाच कंपनीत असलेला, मूळचा मुंबईचा कामगार, डेप्युटेशनवर, त्याच कंपनीच्या बेंगलोर्/चेनै/दिल्ली वगैरे कुठल्याही बाहेरच्या शाखेत गेला तर, त्या व्यक्तीला पण असेच अनुभव येवू शकतात. (डेप्युटेशनचे दोन्ही प्रकारचे अनुभव घेतलेला) मुवि

मस्त चालली आहे लेखमाला ! खूप वेळ लावला या भागाला. आईवडिलांची बदलीवाली नोकरी होती, त्यामुळे होणार्‍या तारांबळीची आणि वैतागवाडीची कल्पना आहे. मात्र, त्या अनुभवांचा खूप उपयोग पुढे "बारा गावांचं पाणी पिताना" झाला ! :)

सुबोध खरे Mon, 09/28/2015 - 19:24
बदलीची नोकरी असेल तर मुलं वेगवेगळ्या वातावरणाशी जुळवून घ्यायला शिकतात हि गोष्ट सत्य असली तरीही त्याचा त्यांना त्रास होतोच. दुर्दैवाने मुलांना होणारा त्रास ती बोलून दाखवू शकत नाहीत. अनुभव वेळेच्या अगोदर आले तर मुले आपले बाल्य लवकर हरवून बसतात आणि अकाली प्रौढ होतात. झोपडपट्टीत राहणारी मुलं पहिली तर त्यांचे व्यवहार ज्ञान आपल्याला चकित करेल असे असते परंतु त्यांचा निरागसपणा फार लवकर कोळपतो. पुढे काही वर्षांनी हाच मुद्दा एका लष्करी अधिकार्याने माझ्या मुदतपूर्व निवृत्तीच्या वेळेस बोलून दाखवला कि दर दोन वर्षांनी शाळा बदलली तर मुलं स्मार्ट होतात. मी त्याला शांतपणे म्हणालो कि होय मी पण आता मुंबईत गेल्यावर दर दोन वर्षांनी मुलांची शाळा बदलायचा विचार करतो आहे. ते ऐकून त्याला आपल्या विधानातील फोलपणा लक्षात आला.

In reply to by सुबोध खरे

रेवती Mon, 09/28/2015 - 19:48
अगदी! अभ्यासाचे नुकसान मात्र कोणीही समजून घ्यायला तयार होत नाही हा त्यातील दुर्दैवी भाग बनतो. अमक्या तमक्याला मित्र/मैत्रिणी जमवायला, अबक कॉलेजमध्ये अ‍ॅडमिशन मिळायला काही त्रास नाही तुम्हालाच बरे असले त्रास होतात? या प्रश्नाचे उत्तर देता न आल्याने कितीतरी वर्षे माझी मानसिक दमछाक झाली होती.

च्यायला डेपुटेशन असलीच कटकट असते डॉक! आमची तर जिंदगीच डेपुटेशन वर आहे! लै कुटाने होतात, पेरेंट यूनिट चा एडम स्टाफ हरामी कामचोर असतो (बहुतेक एडम स्टाफ ला सगळे lethargic लोक भरणे कंपल्सरी असेल) ते डेप्यूटेड डिपार्टमेंट ला आपण जाऊन जॉइन झालो तरी आपले एलपीसी (लास्ट पे सर्टिफिकेट) जनरेट करत नाहीत केले तरी नव्या जागी पठवत नाहीत, मग नवा एडम स्टाफ म्हणतो की एलपीसी नाही तोवर पे ऑर्डर कशी काढणार? म्हणजे बेस यूनिट चे ढीले एडम लास्ट पे सर्ट पाठवे पर्यंत जो नवीन जागी महत्वाचा खर्च असतो (अगदी घर भाड्याने घेण्यापासुन ते एडमिशन गॅस कनेक्शन पार महिन्याचा किराणा) तो सगळा पदरमोड करुन घ्या! परत बिले टाकली की एंटाइटलमेंट चा बड़गा असतोच!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

सुबोध खरे Tue, 09/29/2015 - 13:59
बापूसाहेब सुदैवाने नौदलाचे वेतन कार्यालय( मुंबईतील) हे अतिशय कार्यक्षम आहे. त्यामुळे मी भारतात कुठेही गेलो तरीही माझा पगार एक तारखेला माझ्या बँक खात्यात जमा होत असे. इतकेच नव्हे तर मला माझ्या बदलीचे( tranfer grant) अग्रिम( advance) पैसे पाहिजे असतील तर एका दिवसात ८० % पैसे हातात पडत असत. घरासाठी पैसे पाहिजे होते तेंव्हा माझ्या संतोष निधीतून( provident fund) ९० % पैसे एक दिवसात हातात (चेक) आले. (यावेळेस मी एकदा इलाज केलेल्या कारकून स्त्रीने स्वतः कागदी कारवाई केली होती आणि तो चेक माझ्या हातात ठेवला) इतकेच नव्हे तर १६ एप्रिल २००६ ला मी मुदतपूर्व निवृत्त झालो आणि ०२ मे २००६ ला माझे provident fund चे पैसे व्याजासकट माझ्या खात्यात जमा झालेले होते.कधी काळी केलेल्या चांगल्या कामाचे/ प्रामाणिक पणाचे फळ ही मला मिळाले. मी पुण्याहून निवृत्त होऊन परत आलो तेंव्हा माझ्या पूर्ण सामानाच्या ट्रकचे बिल रुपये २३००/- याचा क्लेम मी टाकला होता. कार मी चालवत आणली होती त्यामुळे त्याचे पैसे मी लावले नव्हते. तेंव्हा नौदल वेतन कार्यालयातील अज्ञात कर्मचार्याने एक पत्र लिहून मला कळवले कि सर तुमच्या निवृत्ती च्या वेळेस तुम्हाला एक महिन्याचा पगार( बेसिक)मिळतो. (मुदतपूर्व असेल तरीही) मी तो क्लेम पेन्सिलने लिहून पाठवला आहे तो फ़ेअर करून पेनने लिहून पाठवा. मी तसे केल्यानंतर मला ३९०००/- रुपये खात्यात जमा झाले. (हे काम कुणी केले तेही मला माहित नाही) त्यामुळे सुदैवाने नौदलात असताना अशा तर्हेच्या आर्थिक तंगीला सामोरे जायची पाळी आली नाही.

पैसा Tue, 09/29/2015 - 14:04
सैनिक लोकांना प्रत्यक्ष लढाया कराव्या लागतात त्यापेक्षा असल्या रोजच्या लढाया जास्त दमवणार्‍या ठरत असतील. सोन्याबापूच पगार उशीरा काढण्याचा अनुभव तर अतिशय दुर्दैवी आहे. देशसेवा वगैरे सगळं ग्लोरिफाय करायचं ठीक आहे. ते प्रत्यक्ष करणार्‍यांना वेळच्या वेळी पगार सुद्धा मिळू नये? फील्ड मार्शल सॅम बहादूर माणेकशांना १५०० रुपये फील्ड मार्शलचा पगार म्हणून कित्येक वर्षे मिळत होते, ते वाजपेयींच्या काळात बहुधा योग्य तेवढे केले गेले. मात्र त्यानंतर ते माणेकशा फार वर्षे राहिले नाहीत याची आठवण आली. एक रँक एक पेन्शन साठीही निवृत्त सैनिकांना आंदोलन करावे लागणे हे फार अपमानास्पद वाटते.