Skip to main content

शाळा

लेखक जानु यांनी शुक्रवार, 21/08/2015 23:52 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ झाली आज शाळेत जायचा कंटाळा आलेला होता. पण काय करणार कंटाळा करुन जमणार नाही. शाळा उघडणे तर आवश्यक होते. मुले वाट पाहत बसुन असतात. आई वडील शेतात कामाला गेले की त्यांना घरात कोणी राहु देत नाही. कुलुप लावले की मुलांचे व पालकांचे हक्काचे ठिकाण म्हणजे शाळेचे मैदान आणि शाळाच. त्यांचा विचार येताच गणेशने आळस झटकला आणि सकाळची त्याच्या वाटणीची कामे करु लागला. स्वाती आणि गणेश दोघे जिल्हा परिषदेत शिक्षक. दोघांचा सकाळ पासुनचा दिनक्रम हा घड्याळ्याच्या काट्यावर बांधलेला. चुका करण्यास, वेळ वाया घालवण्यास सक्त मनाई. मुलाला शाळेची तयारी करुन पाळणाघरात सोडुन गणेशने एकशिंगी घोड्याचा कान पिळला आणि १५ मिनिटात स्वातीला तिच्या शाळेजवळ सोडले. रस्त्यावर मित्रांमध्ये खाणाखुणा होउन आपल्या नित्याच्या संगमावर भेटण्याचे ठरले. संगमावर ऑगष्टच्या शेवटी होणार्‍या विद्यार्थ्यांच्या चाचणीवर चर्चा सुरु झाली. शासन कसे मुर्खपणा करते ते हे सगळे कसे बरोबर आहे इतपत सगळी मते मांडुन झाल्यावर चहा संपवुन मंडळी आपापल्या संस्थानांकडे रवाना झाली. रस्त्यात एका खाजगी हिंग्लीश शाळेतील टीचरने सरल च्या माहितीतील अडचणी विचारल्या त्यांना मागचीच माहिती देत मनात त्यांच्या प्रशासकीय अशिक्षितपणाचा उध्दार करत शाळा गाठली. शाळेत येताच मुलांनी गाडीला घेरले आणि चाबी मिळालेली मुलगी लढाई जिंकल्याचा आनंद साजरा करत पळाली. पाठीवरचे धोपटे उतरवुन शाळा झाडणे आणि सफाई करे पर्यंत गणेशने सकाळ पासुनचे आलेले संदेश आणि शुभप्रभात पाहुन काऊंट शुन्यावर आणला. परिपाठ झाल्यावर चार वर्गांचा अभ्यास दिला. पाढे, उजळणी, शुध्द्लेखन दिले. पहिलीमधील सुमीत लगेच आला त्याला गणेशने न बघताच अक्षर चांगले काढ म्हणुन परत पाठवले. हजेरी भरताना जोडीदार कधी येणार आणि हा वनवास संपेल असे वाटु लागले. पुन्हा त्याला जोडीदार त्याची सततची गैरहजेरी, गावकर्‍यांची निष्काळजीपणा, प्रशासनातील अधिकार्‍यांचा काम करणारे आणि पैसा देणारे यांच्यातील आपपरभाव बाळगणारी बुध्दी यावर संताप होउ लागला. त्यात मुले बिचारी पाट्या दाखवायला येत होती. गणेश कंटाळवाण्या प्रकारे त्यांच्याशी बोलत होता. त्याला समजत होते की मुलांचा काहीच दोष नाही पण वळत नव्हते. त्यातच एक दोन मुलांना नीट वाचता आले नाही म्हणुन गणेशने छडीच मारली. मुलांचा चेहरा कळवळला. गणेशने स्वतःला प्रश्न विचारला काय करतोस? त्या मुलांचा काय दोष? त्यांच्यामुळे थोडीच तु शाळेवर एकटा आहेस? तुझ्या मुलाला तु लगेच मारतो का? त्याने लगेच स्वताला सावरले. पुन्हा सगळ्याना गोल करुन बसवले स्वतः त्याच्या जवळ जावुन बसला आणि कपाटातील रंगीत दगडांची पिशवी काढुन त्यापासुन अक्षरे बनवुन मुलांशी रममाण झाला. ज्यांना मारले तेही मार विसरुन हसु बोलु लागले गणेशला जरा बरे वाटले. सल थोडी कमी झाली. अर्धा एक तास त्यांना शिकवुन मग गणेशने तिसरीच्या गणिताकडे मोहरा वळविला. पुन्हा जोडीदार आठवला. तिसरीचा वर्ग मागील दोन वर्ष त्याच्या जोडीदारा कडे होता. त्यांना साधे १०० पर्यंत अंकही लिहिता आणि वाचता येत नव्हते. पुन्हा त्यांना सचित्र बालमित्र काढुन अंकओळख लिहायला दिली. परत संताप सोडुन चौथीला शिवरायांचे बालपण व शिक्षण शिकवु लागला. त्यातील नवीन वाक्यरचना वाचुन त्याला त्याच्या बाईंनी चौथीत शिकविलेला ईतिहास आठवला. सध्या सर्वत्र चाललेला महाराष्ट्र भुषण पुरस्कारावरील वाद, बाबासाहेबांचे शिवचरित्र, आव्हाडांचे विचार, मिपावरील वाद आणि चर्चा यांचा डोक्यात कचरा झाला. म्हटला गेले उडत सगळे. धडा शिकवुया. पण वाचताना पुन्हा अडकला. शहाजीं राजेंच्या देखरेखीखाली अनेक शिक्षक रा़जेंना शिक्षण देत होते. हे वाचुन विचारांचा गलका झाला. आपल्या मुलाला कोणता ईतिहास शिकायला मिळेल यावर विचार करु लागला. पुन्हा सगळ झटकुन धडा शिकवला आणि जबाबदारीतुन मुक्त झाल्याचे समाधान करुन घेतले. तितक्यात सैपाकीण बाई आल्या त्यांना त्याची मागील थकबाकी पाहिजे होती. गणेशने ते काम मुख्याध्यापकाचे आहे तो आल्यावर देईल असे सांगुन घोंगडे झटकायचा प्रयत्न केला. बाई म्हणाल्या "तो भाऊ कधी येणार अन पैसे देणार राम जाणे" मग गावाला मिळालेले अगोदरचे शिक्षक आणि मुख्या. यांची तुलना चालली. त्यातच दुपारच्या जेवणाची वेळ झाली. मुले पटापट ताटे घेउन खिचडी खायला रांगेत उभी राहिली. आजही नुसतीच दाळ तांदुळ घातलेली खिचडी. बटाटे नाही की टमाटे नाही. कांदा तर सांगण्याची सोयच नाही. भाज्या टाकायला सांगितले की बाई लगेच सांगते कोण आणणार? रेटायचा प्रयत्न केला की मग नवीन बाई शोधणे आले. गणेशने मुकाट डबा उघडला आणि जेवण करु लागला. ठरवले विचार करायचा नाही. शिक्षक आहेस, आहे त्यात समाधान मान, पोरांकडे बघ, जेवढे होईल तेवढे कर, त्या पोरांना आनंद झाला की बरे वाटते तोच अनुभव पुन्हा घे. गणेशने मनातील निराशेची काजळी पुसली आणि जेवण करुन मुलांच्या गप्पांमध्ये रंगला आणि रमलाही.....
लेखनविषय:

वाचने 7114
प्रतिक्रिया 42

प्रतिक्रिया

:( सुंदर, एका अनोळखी जगाची सफर घडली!!!

In reply to by जानु

बहिण छोट्याशा शाळेत आहे. तिन इतकी सुधारणा केलेली आहे कि गेले ३ वर्ष तालुक्यात तर या वरची जिलह्यात नंबर आला. वस्ती वर शाळा पण मूल जिल्हा स्तरावर चमकतात. चित्र अगदीच वाईट नाही. कित्येकदा स्वतः झळ सोसूनही कामाचा समाधान मिळत

In reply to by सुचेता

सुचेता तुमच्या बहिणीला माझे मनःपुर्वक धन्यवाद सांगा. तुम्ही करत असलेल्या कामाची कदर आहे याची फक्त एक कणभर जाणीव.

In reply to by स्पंदना

सहमत त्यांचे अनुभव-जग त्यांचा आक्षेप व सरकारी पथ्ये पाळून(त्यांना त्रास होणार नाही म्हणून) इथे मांडली तर फार चांगले होईल. मूळ लेख उत्तम . बहुतांश शहरी माणसांनी न पाहिलेले जग.

In reply to by जानु

बहिण छोट्याशा शाळेत आहे. तिन इतकी सुधारणा केलेली आहे कि गेले ३ वर्ष तालुक्यात तर या वरची जिलह्यात नंबर आला. वस्ती वर शाळा पण मूल जिल्हा स्तरावर चमकतात. चित्र अगदीच वाईट नाही. कित्येकदा स्वतः झळ सोसूनही कामाचा समाधान मिळत

छान. जी. प. ची शाळाच आठवली.....

ज्या प्राथमिक शिक्षणाच्या पायावर आपल्या इमारती उभ्या राहत/राहणार आहेत त्याना कसलंच पोषण मिळत नाहीये. ना शारिरीक ना बौद्धीक. शिक्षकांच्या भुमिका आणि त्यांना आवश्यक सर्वांगीण पाठबळ नाही, जे काम करु पाहतात त्यांना नाही, ज्यांना काम करण्याबद्दल प्रेम नाही त्यांच्याबद्दल नकोच बोलायला. भारताचं भवितव्य उज्ज्वल कसं व्हायचं राव?

माझी शाळापण अशीच होती दोन शिक्षक असणारी आणि असेच एक गुरुजी कधी वेळेवर शाळेत न येणारे आणि आले तरी काही शिकवारचे नाहित पण दुसरे खुप जिवापाड शिकवायचे आणि त्यांच्यामुळेच अशी शाळा असून सुध्दा आमचे प्राथमिक शिक्षण चांगल झाल.

तुमचा अनुभव आणि तळमळ दोन्ही जाणवले.

प्रत्यक्ष कामाच्या अनुभवातून आलेले लेखन वाटते. मस्त. (आवांतर : फक्त आयडी तेवढा सूट होत नाही हो पेशाला. आयडी कसा पाय्हजे. मास्तुरे, गुर्जी नं. १, असा कायतरी मिळाला नाही का?)

तसा आय डी वेगळाच आहे. ज्या दिवशी आय डी घेतला त्या दिवशी मला हवे ते नाव मिळत नव्हते त्यामुळे मुलीच्या नावाने प्रयत्न केला व यशस्वी झाला. तोच आय डी चालवावा लागतोय. तसा मी जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. शिक्षण विभागात शिक्षक म्हणुन १७ वर्षापासुन नोकरी करतोय. बरेच अनुभव दप्तरात जपलेत. जमेल तसे लिहीन.

In reply to by जानु

मस्त मस्त सर. असा शिक्षकी अनुभव त्यातल्या त्यात झेडपी म्हणजे लैच संपन्न असतो. येऊद्यात अजून काही अनुभव. भाषाशैली पण अगदी सुरेख आहे. शुभेच्छा. जाता जाता: 'जानुचे पप्पा' असा आयडी घ्यायला हरकत नाही. ;)

हा हिंदी चित्रपट आठवला. आशुतोष राणा ने साकारलेला डॅा आठवला. लहान मुलांना शिक्षक म्हणून सामोरे जाताना कित्येकांचा जीवन नव्याने त्याच्याकडुन शिकल्याचा अनुभव आहे, खरोखर किती निरागस, निष्कपट, ऊत्साही असतात बालके! हेवा वाटतो प्राथमिक शिक्षकांचा.

त्यांच्याशी बोलताना आणि दिवसातले ६-७ तास काढल्यावर अनेक अनुभव येतात. ते अनुभव जीवनाकडे नवीन द्रुष्टीकोन नक्कीच देतात. मला तर अनेक वेळा सायंकाळी घरी निघताना त्यांचा निरोप घेताना आजचा दिवस समाधानाचा होता ते मनात जाणवते. त्यांच्याशी बोलुन आपल्यातील निरागसपणा आणि लहान मुल अजुन जिवंत असल्याचा प्रत्यय येतो. एक दिवस ४ थी मधील बाळासाहेब हा मुलगा गुरुवारच्या बाजारातुन दुपारी ३ वाजता आला. शाळेत येवुन मला एक कागदाची पुडी देउन म्हणाला सर तुमच्यासाठी आणले. मी विचारले काय आहे? तो म्हणाला भेळभत्ता.... मन अगदी भरुन आले. त्याच्या रोजंदारीने शेतात जाणार्‍या वडीलांनी त्याच्यासाठी आणलेल्या आठवड्यातील एका १० रु. च्या खाऊच्या पुडीतुन तो मला थोडा भत्ता देत होता. तीन कि.मी. चालुन देखील त्याने सांभाळुन आणला होता. त्याला अभ्यासात फार गती नव्हती पण समोरच्याला काय होतय ते समजायचे. मला बरे नसेल तर म्हणायचा सर जरा झोपुन घ्या.... त्याच्या साठी आम्ही सर म्हणजे सगळेच.... माझ्या चौथीच्या मुलींनी एकदा माझे नाव रांगोळीवर काढलेले होते. असे किती तरी अनुभव आहेत. आजही मन प्रफुल्लीत करुन जातात.

In reply to by जानु

किती श्रीमंत आहात तुम्ही!! फार छान लिहीताय, त्याही पेक्षा मनाचा कनवाळूपणा फार जाणवतोय!! असाच राखा हा मऊ कोपरा मनाचा! कदाचित व्यवहारी जगात याची किंमत कोणालाच नसेल, पण याची किंमत न जाणणारा मुर्ख आहे हे मनावर ठसवा अन "एकला चलो रे" चालू ठेवा. (एकली चालणारी)

आणि चिरंजीवी सुद्धा . जोवर हे विद्यार्थी तुमची शिकवण जगत राहतील , पुढच्या पिढीत रुजवत राहतील तोवर तुम्ही जग सुंदर करत रहाल . असो . मानाचा मुजरा स्वीकारा गुरुजी .

मुद्दाम लॉगइन करून आवर्जून प्रतिसाद द्यावा असे फार थोडे धागे असतात. हा त्यातला एक. संवेदनशील शिक्षकाच्या नजरेतून वस्तुस्थिती पहायला आवडलं. असेच लिहीत रहा. पुलेशु.

स्पंदना आणि यमन दोघांशीही सहमत, खूप मोलाचे काम करताय... पैशांपेक्षाही महत्वाचे, अमूल्य असे खूप काही मिळवलेत आपण, ते समाधान सगळ्यात महत्वाचं.

जानु चे बाबा, तुमच्या भावना अचुक पोचल्या कारण मी सुद्धा एका शिक्षकाचा मुलगा, वडील आमचे पीटीआय, त्यांच्याकडून खुप काही शिकलोय, शिवाय पीटीआय करायला काही नाही म्हणुन झाले नव्हते, आवड म्हणुन झालेले, तस्मात पोरांत प्रचंड रमत, २००७ ला रिटायर व्हायच्या आधीपर्यंत पोरांत शिरून वॉलीबॉल बास्केटबॉल खोखो फुटबॉल खेळत असत, त्यांचे जवळपास ७० विद्यार्थी (३५ वर्षांच्या सर्विस मधले) आज आर्मी नेवी एयरफोर्स ला आहेत, एकदा त्यांचा नेवी मधला एक शिष्य भेटायला आला तेव्हा येताना अतिशय महाग असे रिबॉक चे जॉगिंग शूज घेऊन आला तेव्हा बाबा गहिवरले होते, कारण विचारता बाबांच्या आधी त्यांचा शिष्य बोलला 'सर आमचे जर कोणच्या पायात शूज नसले तर आपले शूज त्याला घालत शूज मधे कागदाचे बोळे कोंबुन पण पोराला प्रॅक्टीस मधे खंड ही पडू देत नसत अन अनवाणी खेळवत नसत, तुझ्या वडिलांनी माझ्या पायात इतके प्रेम अन बळ ओतले नसते तर मी नॅशनल पर्यंत जाऊन स्पोर्ट्स कोटा चे एक्स्ट्रा मार्क्स घेऊन नेवी ला भर्ती होऊ शकलो नसतो, ही माझी गुरुदक्षिणा आहे' मी निःशब्द होतो तेव्हा

मिपावर स्वागत ! तुमच्या अनुभवाचे बोल तुमच्या शैलीत वाचायला खूप आवडले. माझे आईवडीलही जिल्हा परिषदेत प्राथमिक शिक्षक होते. त्यांच्या वारंवार होणार्‍या बदल्यांबरोबर फिरत फिरत अनेक गावांचे पाणी चाखले आहे आणि शाळा बदलत शिकलो आहे. तुमच्या लेखातल्या राजकारणाचे चटकेही पाहिले आहेत. त्यामुळे हा लेख वाचताना खास आपुलकी वाटली. तुमचे आणखी अनुभव वाचायला आवडतील.

या निमित्तानं आणि उद्याच्या शिक्षकदिनाचं औचित्य साधून सगळ्या शिक्षकांचे आम्ही ऋणी आहोत असं सांगावंसं वाटतं. ऋण कधी फिटत नाही, फिटू नये. (सगळ्या शिक्षकांनी चांगलंच शिकवलं. आमचे दोष आम्ही जोपासलेत त्याचा त्रास त्यांना नको.) सरांचे आणि सोन्याबापूंच्या वडीलांचे अनुभव खुप छान. - माध्यमिक हिंदी शिक्षकांचा मुलगा असलेला

In reply to by प्यारे१

अरी ससुरे तबहु बोले की लल्ला हिंदी ब्रज औरो भोजपुरी कइसन सफाई से बोलत बा!! तुहार बाबुजी ने तुमको 'राष्ट्रभाषा सेवा समिति, वर्धा' की परीक्षाएं दिलवाई रहे या नहीं भैबा?

जानबा,(म्हणजे जानूचे बाबा किंवा ग्यानबा, ज्ञानवंत) खरंच खूप सुंदर. गडद अंधारात एखादी पणती कोनाड्यामध्ये आपल्याच धुंदीत तेवत राहावी तसं वाटलं. आणि गुणवंतराय मेहतांची वाक्यं, जी माझ्यासाठी सुभाषितं बनली आहेत, तीही. "निराशावादी बनवामाटे घणा कारणो छे. पण आशावादी बनवामाटे एकज कारण पुरतुं होय. ते ए कि अंधकारथी दियो बुझाव्यो होय एवुं कदाय थयुं नथी, थतुं नथी"

आपल्याला सांगायला आनंद वाटेल की असे अनेक शिक्षक जिल्हा परिषदेत काम करीत आहेत. त्याचा कोणी विचारही करत नाही पण ते फक्त मुलांनी केलेल्या प्रेमापोटी आणि कौटुंबिक गरजांपोटी बाकी सर्व उपेक्षा सहन करतात. एक उदाहरण सांगतो, ८-१० वर्षापुर्वी आमच्या जवळच्या शाळेवर एक पन्नाशीचे गुरुजी रुजु झाले. छोट्या शाळेवर १-२ री चा वर्ग एकत्र करुन शिकवायला लागले. त्यांचा जोडीदार तरुणच होता पण प्रशासनाशी संबंध ठेउन मजा करणारा होता. या बाबांना तो रजा ही द्यायचा नाही. पण हे बिचारे गुमान नोकरी करत. एक दिड वर्षांनी बाबांची बदली झाली. ते ज्या दिवशी शाळा सोडुन गेले तेव्हा सगळ्या शाळेतील मुले बसपर्यंत त्यांना सोडायला आली. तो गुरुजी आणि ती मुले .....उडत गेला तो पुरस्कार आणि सन्मान तो म्हणाला सर जे सोसले ते या पोरांनी सगळं विसरायला लावलं.