मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

बाबासाहेब पुरंदरे "महाराष्ट्र भूषण" यांचे अभिनंदन

शीतल जोशी · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
काही व्यक्ती या आयुष्यभर एक वेड घेऊन जगतात. त्यांचे सारे आयुष्याच जणू भारलेले असते. तसाच एक अवलिया महाराष्ट्रात जन्माला आला यांचा आम्हाला अभिमान वाटतो . तुम्हाला प्रत्यक्ष पाहण्याचा योग दोन वेळा आला आणि ऐकतानाचा योग प्रत्यक्ष एकदा आणि दूरचित्रवाणी आणि अन्य मार्गांनी अनेकदा आला. तुमच्या वाणी तून केवळ आणि केवळ राजे आमच्या समोर उभेच राहतात असे नाही पण त्या महान योद्ध्याचा आणि राजाचा, उभा जीवन पटच डोळ्या समोरून सरकत जातो. पंढरीचे भक्त ज्या भक्तिभावाने दर वर्षी वारी चालत जातात, त्याच भक्तिभावाने आपण शिवाजी महाराजांना गड किल्ल्यांवर भेटण्यासाठी जाता. महाराजांचे कार्य, पराक्रम आणि स्वराज्याचा अभिमान हा आपण घराघरात पोचवला, लहान मुलांपासून ते थोरांपर्यंत, आपण ही मशाल धगधगत ठेवलीत. आपले सारे आयुष्य आपण इतिहासातही वेचलेत आणि हा वर्तमानकाळात आम्हाला आमच्या भूतकाळाची जाणीव जीवनात ठेवायला भाग पडलात. तुम्ही आयुष्यभर आपल्या राजांवर प्रेम केलेत आणि त्यातच जीवनाचे सार्थक मानलात. राजे प्रत्येक घरात रुजावेत हीच तुमची इच्छा होती आणि आम्हाला वाटते की ती पूर्ण झाली आहे. कित्येक तरुण वर्गातील मुले-मुली किल्ले आणि गड यांच्या संवर्धनासाठी मोहीम करतात, हेरिटेज वॉक करतात आणि आजही जाणता राजा चे प्रयोग होणार असतील तर त्याला लहान थोरांची गर्दी होईल कारण आमचा राजा कसा होता हे आमच्या भावी पिढ्यांना कळायला हवंच. राजा शिवछत्रपतीची जुनी प्रत आणि नवीन बांधणीतली प्रत घरात जपून ठेवणारे, किती तरी लोक आजही सापडतील. तुम्ही ही देशप्रेमाची आणि राजांच्याबद्दल ची अभिमानाची ज्योत आमच्या मनात तेवत ठेवलीत हे आणि एवढंच सत्य आहे. तुम्ही शिवछत्रपतींवर अपार प्रेम केलं, श्रद्धा ठेवली आणि त्यांच्या कर्तृत्वाचा अभिमान उरात बाळगला, आणि जनमानसात तो अभिमान जागृत ठेवलात त्याबद्दल आम्ही तुमचे ऋणी आहोत. तुम्ही किती मोठे आहात हे कोणालाही समजावून देण्याची आम्हांस गरज वाटत नाही, कारण तुमचे मोठे पण हे तुमच्या थोर कर्तृत्वाने आपल्या पाशी चालून आले आहे. आपले काम निरपेक्ष होते आणि आहे हे समाजास ठाऊक आहे. आपण वेळोवेळी आपल्या कृतीतून हे दाखवून दिले आहे. एकीकडे पुरोगामी म्हणणाऱ्या महाराष्ट्रात आपल्या सारख्या ऋषितुल्य माणसाचा अवमान होतो हे शल्य मनातून जाणार नाही, पण काही अंशी का होईना आपण केलेल्या कार्याचा गौरव, आज महाराष्ट्र सरकारने केला आहे. माझ्या पिढीची आणि माझ्या आधीच्या पिढ्यांच्या मनातही आपणाबद्दल केवळ आदर आणि प्रेम आहे. आणि हे आणि हेच सत्य आहे. आपण जेवढे राजांवर प्रेम केलेत आणि त्यांचे चरित्र घराघरात पोचवलेत तितके अन्य कुणी विरळाच केले असेल. आपले पुन्हा एकदा अभिनंदन आणि आपणांस दीर्घायू लाभो हीच सदिच्छा!!!! - शीतल

वाचने 1518 वाचनखूण प्रतिक्रिया 2

एक एकटा एकटाच 23/08/2015 - 09:16
पण कॅप्टन यांनी दिलेली सुचना योग्य आहे. तुमच्या लेखांमध्ये किमान २-३ दिवसांचे अंतर ठेवा. जेणेकरुन इतर लेखकांचे लिखाणही वाचण्यास उपलब्ध राहील. पुढिल लिखाणास शुभेच्छा.