Skip to main content

एक न पाहिलेली सुखदा ..........!

लेखक झंडुबाम
मंगळवार, 04/08/2015 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी फेसबुक वर एक पोस्ट पाहिली, एका 6 महिन्याच्या मुलीचा फोटो , इतकी सुंदर ,गुटगुटीत आणि खूप बोलके डोळे. मला एकदम माझी पुतणी लहान असताना अगदी अशीच दिसायची . पण खालची पोस्ट पूर्ण वाचल्यानंतर मन भरून आलं , अलिबाग मधील वात्सल्य नावाच्या अनाथाश्रामातली मुलगी होती खाली तिथला नंबर दिला होता . मी फोन केला आणि चौकशी केली पत्ता घेतला आणि जायचं ठरवलं . एक गोष्ट समजली ,तिचं नाव सुखदा . सुखदा काही डोक्यातून जात नव्हती . शनिवारी सकाळीच तिथे पोहोचलो . बाहेरचा बोर्ड वाचून आत शिरलो , तिथल्या madam नि आत घेतले . मी चौकशी चालू केली . तर त्यांच्या म्हणण्यानुसार त्या ठिकाणी असलेली सगळी मुलं कुठे ना कुठे सापडलेली आहेत . कुणी रस्त्यावर,कुणी स्टॉप वर कुणी कचरा पेटी जवळ .…. कुणी कापडात गुंडाळलेला ,कुणी असाच ठेवलेला . मी तसाच ऐकत बसलो होतो खुर्चीला घट्ट पकडून . बाजूलाच लहान मुलांचे फोटो लावले होते … कसतरीच वाटलं सगळं ऐकून आपलं स्वतःच मुल असं सोडून द्यायचं? इतकी मानसिक तयारी कशी करत असेल कोणी ? मी विचारलं सुखदा आहे का? मी भेटू शकतो? madam :- नाही तिला दत्तक घेण्यात आलं २ आठवडे आधीच . फारच वाईट वाटलं ऐकून कि तिला भेटण जमलं नाही मी विचारलं :- मला मुलांना भेटता येईल का ? madam :- हो ,वरती पहिल्या माळ्यावर आहेत इथून जा मी वर गेलो आणि समोरच एक बाळ पाळण्यात गाढ झोपलेल दिसलं ,एकदम निष्पाप ,निरागस खूप वाईट वाटलं पाहून . व पुं नी लिहिलेलं आठवलं ."कुणाचा मुलगा होण टाळता येत नसेल पण कुणाचा तरी बाप होण टाळता येत " कुणाची कशी मजबुरी असेल माहित नाही पण यांच्या नशिबी जन्मतःच परकेपण .कुणाच्यातरी चुकांची भरपाई यांच्या नशिबी लिहून ठेवली आहे . अजून एक बाळ कोपऱ्यात झोपून होतं आणि झोपेतच हसत होतं . आणि अजून शेजारी २ मुली आशेने पाहत होत्या मी एकीला उचलून घेतलं . ती तरीपण पाहत होती माझ्याकडे एकटक कुणास ठावूक काय पहात होती . तिने हळूच हात फिरवला माझ्या चेहऱ्यावरून . मला खूप भरून आलं . मी थोडा वेळ खेळत राहिलो तिच्याशी . मी तिचं नाव विचारलं सेविकेला . तिचं नाव होतं 'स्वरा' . आपल्या पोटचा गोळा असा निर्दय पणे सोडून देण कस जमत असेल . तिथून कसाबसा निघालो . madam कडे आलो . madam दत्तक घेण्याची process समजावून सांगत होत्या दत्तक घेण्यासाठी २ वर्षांचा वेटिंग लागतो अस त्या म्हणाल्या . त्या नंतर जर मुल आवडलं तर प्रोसेस पुढे जाते . वरती पाहिलेला एक ५-६ वर्षांचा मुलगा मला आठवला ,दिसायला साधा , बारीक अंगकाठी . मी त्या मुलाबद्दल विचारलं तेव्हा त्या म्हणाल्या त्याला अजून कोणी दत्तक नाही घेतलं . माझा सहज प्रश्न का? madam म्हणाल्या दत्तक जाणारं मुल पालकांना आवडायला हवं', पर्यंत ते पसंद पडत नाही तो पर्यंत काही नाही करता येत … म्हणजे जर जन्माला यायचं असेल तर सुंदर रुपडं घेऊन जन्माला यावं . या जगात दिसणं खूप महत्वाचं आहे , आपण आणि आपली प्रत्येक गोष्ट सुंदर असावी हा अट्टाहास , आपण सुंदर , आपले कपडे चांगले , आपली गाडी चांगली इतकच काय घरातली देवाची मूर्ती पण सुंदर आणि रेखीव लागते आपल्याला … तसाच उद्विग्न होऊन तिथून निघालो . गाडी सुरु केली समोरचं सगळं धुसर दिसत होतं म्हणून वायपर चालू केले . वायपर फिरत होते पण तरीही समोरचं सगळं तसच धुसर दिसत होतं जाता जाता एक न पाहिलेली सुखदा एक वेगळाच अनुभव देऊन गेली
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4231
प्रतिक्रिया 29

प्रतिक्रिया

In reply to by बहुगुणी

भारतामधे नाही. पुण्यामधल्या काही संस्थांमधे ६-८ महिने लागु शकतात.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

नाही हो.. माझ्या माहिती प्रमाणे लागतात २-३ वर्ष.. मुलगी मिळायला तर जास्त वेटींग आहे म्हणतात. माझ्या बहीणीने मागच्या वर्षी घेतलय पिल्लु दत्तक.. म्हणजे पिल्लानी आम्हाला परवानगी दिली स्वतःला दत्तक घ्यायला असं म्हणुया असला टेरर आहे तिचा!! तेव्हा चर्चेतुन कळालेली माहिती.

अतिशय वेगळा विषय मांडलात. आवडलं तरी कसं म्हणू. देवाला एवढीच प्रार्थना करेन की बाबा, या अशा निष्पाप जिवांना सोडून देणार्यांना थोडीतरी सद्बुद्धी दे.

अनुभवकथन खूप भावलं पण अस्वस्थ करून गेलं. काहीच दिवसांपूर्वी कुणीतरी फेसबुकवर मुलीला दत्तक घेतल्यावर लोकांच्या मिळालेल्या प्रतिक्रियांबाबतचं कुणाचं तरी अनुभवकथन शेअर केलं होतं. ते देखील असंच अस्वस्थ करून गेलं.

मनाला भिडणारं लेखन. >>>म्हणजे जर जन्माला यायचं असेल तर सुंदर रुपडं घेऊन जन्माला यावं . या जगात दिसणं खूप महत्वाचं आहे , आपण आणि आपली प्रत्येक गोष्ट सुंदर असावी हा अट्टाहास , आपण सुंदर , आपले कपडे चांगले , आपली गाडी चांगली इतकच काय घरातली देवाची मूर्ती पण सुंदर आणि रेखीव लागते आपल्याला … मनातलं बोललात. फारच अस्वस्थ करून जाणारी कथा.

मी देखील तो फोटो बघितलाय. माझ्याच एका मित्राने तो पोस्ट केला होता फेसबूक वर. तेव्हा पासून अस्वस्थ झालेय मी. खरच असे कसे सोडून देऊ शकतात लोक आपल्या बाळांना. 'देवाला एवढीच प्रार्थना करेन की बाबा, या अशा निष्पाप जिवांना सोडून देणार्यांना थोडीतरी सद्बुद्धी दे.'' हेच म्हणेन

आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. मला माझ्या सद्य परिस्थितीत जे अधिक श्रेयस्कर आणि आवडीचं तेच सगळ्यात जास्त प्रिय!

एका सहकारीची गोष्ट :पहाटे लहान मुलाच्या रडण्याने जाग येते.बघतात तर बाहेरून आवाज येत होता.दरवाजात पायपुसण्यावर कोणीतरी नवजात अर्भक सोडून गेलो होते. त्या मुलीला दुध पाजून सकाळी पोलिस स्टेशनला सांगून आले एक मुल मिळालय कोणी आले तर पाठवा. कोणी येणार नव्हतेच.याला चार मुली ,हिलाही संभाळेल या विचारानेच कोणीतरी दाराशी ठेवून गेलेले होते.यांचीच मुलगी म्हणून वाढली. पुढे मेरिटमध्ये येऊन डॅाक्टरही झाली.

लेख आवडला. आत काहीतरी तुटल्या सारखं वाटतं ह्या मुलांना पाहिल्यावर. अवांतरः- विषय निघाला आहे म्हणुन सांगते. कदाचित ह्यातुन कुणाला अशा मुलांसाठी आपण काय करु शकतो ह्या साठी अजुन कल्पना सुचतील... दरवर्षी सोसायटीतल्या मुलांना अबीरच्या वाढदिवसाला बोलावतो. तेव्हा मुलं रिट्र्न गिफ्ट बघुन जशा प्रतिक्रिया देतात, पानात टाकुन देतात, ते पाहुन फार वाईट वाटात्यचं. म्हणुन यंदा माझ्या मुलाचा वाढदिवस सोफोश (ससुनचे अनाथालय - श्रीवत्स) मध्ये साजरा केला. माझं टोटल बजेट ५ हजार होतं. पैकी १.५ हजाराची खेळणी , १.५ हजाराचे कपडे आणि १.५ हजाराचा खाऊ असं साधारण ठरवलं होतं. बफर धरुन ५ हजार. ह्यात सगळं मस्त बसलं. खाऊ म्हणुन शिजवलेले अन्न चालत नसल्याने आम्हीही पैसा वस्तुंमध्ये जास्त घालायचं ठरवलं. केक, वेफर्स, बाखरवडी आणि केळ असा मेनु होता. ३.३० च्या सुमारास जाऊन आम्ही तिथे फुगे फुगवले, ते कुठेही बांधणं अलाऊड नसल्याने जमिनीवर सोडून दिले. आणलेली खेळणी आणि कपडे ऑफिसमध्ये दिले. त्यांनी अंदाजे त्यांच्या किंमतीची पावतीही दिली (खाऊची सुद्धा). केक आणला, मग त्यांनी अबीरला औक्षण केलं. गिफ्ट दिलं. सगळ्या मुलांनी मिळुन केक कापला. मुलांना नुकतच दुध पाजल्याने त्यांना खायला देऊ नका म्हणाल्या त्या. तरी त्यांना केक दिला. सगळ्या मावशा, सिस्टर्सना डिश दिल्या. खाउन पिऊन मज्जा करुन ५ ला निघालो. हे काही फोटोज SOFOSH Cake 1 1

In reply to by पिलीयन रायडर

श्रीवत्समधे मुलांना खरोखर चांगल्या पद्धतीनी वाढवलं जातं. बाकी अश्या नवजात बालकांना वार्‍यावर सोडुन जाणार्‍या आईबापा सैतानांविषयी काय बोलणार?

पिलियन रायडर तुमची कल्पना खूप छान आहे. पण फोटो पाहून खरतर मन तुटल. देव करो आणि सगळी लहान मुले सुखात राहोत हीच ईश्वरचरणी प्राथना.

लेख वाचुन खरेच कसेतरी झाले. पिराने फोटो दिले आहेत त्या श्रीवत्स मध्ये तरी परिस्थिती चांगली दिसते आहे इतर ठिकाणी मुलांचे किती हाल होतात ते वाचतोच आपण अधुन मधुन. देवाने कुणालाही अनाथ करु नये. सध्या परिस्थिती खूप बिकट आहे. इथे मोठ्या प्रमाणावर लोक व्यंधत्वाची शिकार होत आहेत आणि दुसरीकडे मोठ्या प्रमाणावर मुले टाकुन देण्याचे प्रकार वाढत आहेत. अनाथ मुलांना आईबाप मिळावेत हीच देवाकडे प्रार्थना.

लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. त्या काळात आमचा गट वृद्धाश्रम, अनाथालये यांना भेट देऊन विचारपूस, आर्थिक मदत, आश्रमवासीयांशी संवाद, त्यांना वाचून दाखवणे, मुलांशी खेळणे, गप्पा अशी फुटकळ कामे करायचा. तेव्हा पुण्यातल्या एका अनाथालयात ही मुले कशी आणि कुठे सापडतात याची हृदयद्रावक माहिती व्यवस्थापिकाबाई सांगत होत्या. त्यातली एक गोष्ट अजूनही लक्षात आहे. एक अगदी नुकतेच जन्मलेले मूल त्याची प्राथमिक स्वच्छताही न करता रक्तमय दुपट्यात गुंडाळून उकिरड्यावर टाकले होते आणि रक्ताच्या वासाने कुत्रे हुंगत होते. शरीराचे लचकेही तोडले गेले होते. अर्धमेल्या स्थितीत ते बाळ आश्रमात पोचले आणि निगा म्हणा किंवा त्या सोनुल्याची दुर्दम्य जीवनेच्छा म्हणून ते जगले. आणखी एका अनाथालयात एका मोठ्या हॉलमध्ये पन्नासेक पाळणे होते आणि त्यातली मुले हूं की चूं न करता शांतपणे आपल्याच हातापायांशी खेळत होती. आम्ही त्या दरवाज्यात उभे राहिलो मात्र, कवायतीत पीछे मुड अशी आज्ञा द्यावी त्याप्रमाणे गर्र्कन त्या इवल्याश्या पन्नास माना आणि शंभर डोळे आमच्याकडे वळले. अगदी पार टोकाच्या कोपर्‍यातले मूलही मान ताणून ताणून आमच्याकडे पाहात होते. हे इतके अनपेक्षित की काय केल्याने, कोणाकडे गेल्याने त्यांना आनंद होईल तेच सुचेना. ते शंभर डोळे एक टक आम्हांला न्याहाळत होते. आवाज नाही, याचना नाही, अपेक्षा नाही. फक्त कुतूहल. आश्रमाबाहेरच्या जगातला एक कवडसा त्यांच्यापर्यंत पोचला त्याविषयी कुतूहल. बस्स. आम्ही सुन्न होऊन खाली उतरलो.

जर कुणाचे स्वतःचे मूल समजा काळे-सावळे, सुंदर नसलेले- किंवा फॉर दॅट मॅटर कुरूप म्हणू- असेल तर ते 'आपलं' असतं. त्यामुळे बाय डिफॉल्ट ते चांगलं वाटतं. (आपला तो बाब्या, दुसर्‍याचं ते कार्टं). आता दत्तक घेताना जे मूल 'आपलं' नाही, ते जसं असेल तसं स्वीकारलं जाणं प्रत्येकाला शक्य नसतं. शिवाय एक पुर्णपणे अज्ञात मूल स्वीकारताना त्याचं बाह्यरूप सोडून काय बघणार? वधू परीक्षणावेळी १०-२०-३० मिनिटांमध्ये रुप-शिक्षण-कुटुंब-नोकरी अशा गोष्टी पाहिल्या जातात. दत्तक मूल घेताना (०-५ वय असलेले) काय पाहणार बाह्यरूप सोडून? स्वतःशी प्रामाणिक राहून सांगा, किती जण असे 'रिजेक्टेड' मूल दत्तक घेतील?

अशी वार्‍यावर सोडणारा माणुस हा एकमात्र उत्क्रांती झालेला प्राणी असावा. आणी अशी सामाजीक व्यवस्था का म्हणून प्रगत मानायची ?

डोळ्यात पाणी आले. पिरा, तुमचे मनापासून अभिनंदन.क्खरंच खूप चांगले वाटले तुमचा अनुभव वाचून....

अस्वस्थ करणारं लेखन . माझ्या मनात हा विचार खूप वेळा येतो . सुरवातीला आलेलं 'इतकी सुंदर ,गुटगुटीत आणि खूप बोलके डोळे' हे वाक्य वचनाच मनात विचार चमकला . पोर कीडमिड, काळं , बोलक्या डोळ्यांचं नसेल तर समाजाला एवढी कणव वाटत नाही . बजरंगी भाईजान मधली ती पोरगी अशी गोरीगोमटी , गोंडस नसती तर ? तिच्यासाठी एवढेच कष्ट घेतले असते का ?टी वी, मासिकं , पेपर मधल्या जाहिरातीत गोरीगोमट्या , घाऱ्या डोळ्यांच्या परदेशी पोरांना का दाखवलं जातं ? अगदी सकाळ पेपर च्या फमिली डॉक्टर नावाच्या पुरवणीत गर्भसंस्कार च्या लेखांत सुधा हि परदेशी मुलं ?

बर्याच वेळेस अल्पवयीन मुली(१६-१७ वर्षे) नैसर्गिक आकर्षणामुळे कुणातरी मुलाच्या प्रेम संबंधात पडतात.मुळात त्या वयात पाळी अनियमित असल्याने गरोदर आहे हे समजेपर्यंतच दोन तीन महिने जातात. त्यातून पाळी चुकली तरी आईला सांगणे भितीमुळे होत नाही. जोवर सांगतात तोवर वेळ निघून गेलेली असते. २० आठवड्यानंतर गर्भपात बेकायदेशीर आहे. आईला वाढलेले पोट दिसेपर्यंत हि वेळ निघून गेलेली असते. यानंतर डॉक्टर कडे गेले असता ते गर्भपात करायला नकार देतात. मग हे मुल गुपचूप कुठेतरी घरातल्या घरात जन्माला येते आणि शेवटी अनाथालयाच्या वाटेने जाते. अशा असंख्य केसेस मी गेले कित्येक वर्षे पाहत आलो आहे. गरीब घरात स्वतः अल्पवयीन असलेल्या एकट्या आईने असे मुल वाढवणे हि अशक्य गोष्ट आहे. मूल निष्पाप असते पण आईवडिलांच्या चुकांची फार मोठी किंमत त्यांना मोजावी लागते.याला उत्तर काय हे समाजाने ठरवणे आवश्यक आहे.

इथल्या प्रतिक्रियांसाठीही आणि लेख आवडला म्हणूनही वाखुसाआ. पिराताईंचे कौतुक वाटले. राही ह्यांचा अनुभव कसेसेच करुन गेला. इतरही प्रतिसाद संवेदनशील आहेत.

लेखन हळवं करून गेलं. 'वात्सल्य' संस्थेची स्थापना झाली, तेव्हाचा काळ आठवला. काही ओळखीचे लोक या संस्थेशी निगडीत आहे. त्यांना कितीतरी कटकटीना सांभाळून हे काम करावं लागतं. रात्री-अपरात्री पोलीस स्टेशनमधून मूल सापडल्याचा येणारा फोन, त्यानंतर शासकीय रुग्ण्यालयात बालकाची तपासणी, डॉक्टर तपासणी करून वय सांगतात, तब्येत उत्तम असेल तर संस्थेकडे लगेच सोपवलं जातं. त्यानंतर अशा मुलांना वयानुसार वरचं अन्न खाऊ घालणं, स्वच्छता, शी-शु, आजार, कर्मचारीवर्ग एक ना अनेक गोष्टी. त्यात समाज कल्याण विभागाची कडक नजर. एकदा या संस्थेत मुलगी आली. कचराकुंडीत सापडलेली. सावळा रंग, पण गुटगुटीत होती. तिला दत्तक घेण्यासाठी कुणीही तयार होत नव्हतं. सहा-आठ महिन्यांची असेल. मुंबईहून एक जोडपं मुलांना बघण्यासाठी आलं. ते दरवाजात असताना ही त्यांच्याकडे बघून गोड हसली, त्यांच्याकडे झेपावली. त्यांनी इतर मुलांना न बघता हिलाच दत्तक घेण्याचं निश्चित केलं. असे काही सुखद अनुभवही असतात.

लेख आवडला. फार पुर्वी माझी आई अनाथ मुलांसंबंधी काही काम करायची. अशी सापडलेली लहान मुलं घेऊन जेव्हा जेव्हा लोक यायचे, तेव्हा भयंकर जीव तुटायचा. वर राही यांच्या प्रतिसादात आले तसेच एकेक अनुभव, पोटचा गोळा कुठेही फेकुन दिलेला. किती तो निर्दयीपणा. एकदा तर एका मंदिरात सापडलेला ४-६ महिन्यांचा मुलगा होता, तो ज्यांना दिसला त्या जोडप्याला मुल नव्हते आणि त्यांनी ते बाळ दिसल्याक्षणापासुन त्याला आपले मानले होते आणि आम्हाला हेच मुल हवे म्हणुन दोघांचीही इच्छा होती. पण आधी ते बाळ अनाथाश्रमात जाऊन मग सगळ्या रीतसर फॉर्मॅलिटीज झाल्याशिवाय हे शक्य नव्हते आणि तोवर त्यांना थांबावे लागणार होते. तेव्हा आमच्या गावात अनाथाश्रम नसल्याने ते दुसर्‍या ठिकाणी पाठवल्यानंतर माहिती नाही. पण आजही त्या बाळाला सोडुन जाणारे आईवडील आणि एकीकडे दोन क्षणात त्याला आपलेसे म्हणणारे ते जोडपे आठवले की काय बोलावे काही कळत नाही.

अस्वस्थ करुन गेला. डाॅ.ख-यांशी पूर्णपणे सहमत. अशा मुलांना आईवडील वा-यावर सोडतात कारण समाज काय म्हणेल याची त्यांना भीती असते. आणि आपल्या समाजाबद्दल काय बोलावं? पोर्नोग्राफीवर बंदी आणल्यावर आपल्या हक्कांची पायमल्ली झाली असं मानणारा आणि बलात्कारित स्त्रीला वाळीत टाकणारा असा तर समाज आहे आपला. त्याबद्दल जेवढं बोलू तेवढं कमीच आहे.