Skip to main content

संघर्षाचे दिवस

लेखक जयनीत यांनी शुक्रवार, 31/07/2015 या दिवशी प्रकाशित केले.
अखेर अनेक वर्षांच्या अथक परीश्रमांना नंतर जादुगाराचे नविन जादुंचे प्रयोग पुर्णत्वास पोहचले अन त्याने समाधानाचा सुस्कारा सोडला. " आहेस कुठे? दिवस फिरलेत बघ आपले. हे झोपडं मोडुन मजल्याच घर बांधु आपण. पक्कं! दागदागिन्यांनी मढवतोच की नाही तुला बघच तू " जादुगार उत्साहाने बायकोला म्हणाला. " अहो नाद सोडा ह्या भिकारड्या धंद्याचा. लोक टाळ्या खुप वाजवतात पण कितीही बाबा पुता करा पैसा सुटतो का त्यांच्या हातुन सांगा? तिथं तुमच्या जादुची मात्रा नाहीना चालत? चिल्या पिल्यांच्या खपाटीला गेलेल्या पोटा कडे बघा जरा अन दुसरा काहीतरी कामधंदा बघा " आत्यंतीक निराशेने जादुगाराची बायको म्हणाली. " बघ तर! असल्या भारी जादू बनवल्या आहेत की लोकांच बोट तोंडात गेलं नाही तर नाव दुसरं! एक दाखवली की म्हणीन टाका पैसे तर दुसरी जादु दाखवतो आता बाबा नाय का पुता नाय " जादुगार उत्साहाचे भरते आले होते. नविन जादू बघुन जादुगाराच्या बायकोच्या डोळ्यात विश्वास तरळला " असच होउ दे बाप्पा " आकाशाकडे बघुन तीने हात जोडले. " माझं एक ऐका. पहिले आपल्या कुलदैवतेचा आशिर्वाद घेउन या एकदा. मग कसं सगळं मनासारखं होईल बघा " जादुगाराची बायको म्हणाली. जादुगाराने खुशीत मान डोलावली. कुल दैवतेच्या दर्शनावरुन परततांना त्याची गाठ एका स्वामी महाराजांशी पडली. घोर तपश्चर्येचा स्वामीजींचा दावा होता. असल्या सिद्ध पुरुषाचा आशिर्वाद असावा ह्या लालसेने जादुगाराने त्यांची चरण धुळ घेतली अन कामना व्यक्त केली. स्वामीजी आपल्या गोड वाणीने जादुगाराच्या पोटात शिरले अन सारी रहस्ये घेउनच बाहेर पडले. जादुगार अन त्याच्या स्वप्नांचे पुढे काय झाले ते ठाउक नाही. आज तो कुणाच्या खिजगणतीतही नाही. पण स्वामीजींनी जादू मधे देव धर्माचा रंग मिसळला अन मग चमत्कार झाला. त्यांचे संघर्षाचे दिवस एकदाचे संपले. नशीब जोरदार फळफळले. साथ सोडुन गेलेले निराश भक्त परतले. नव्या जोमाने कामाला लागले. बघता बघता स्वामीजींच्या दर्शनाला अपार गर्दी लोटु लागली. आता ते सोन्याच्या सिंहासनावर आरुढ असतात. जगात सर्वदूर पसरलेले त्यांचे भव्यदीव्य आश्रम डोळे दीपवुन टाकतात. अन त्यांच्या अथांग संपत्तीची कथा काय वर्णावी? तीची गणना आजवर तरी कुणाला शक्य झालेली नाही.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2057
प्रतिक्रिया 7

प्रतिक्रिया

या कथेद्वारे भाष्य एकदम आर पार केले आहे.

एक दोन स्वामी महाराजांच्या बद्दल अशाच स्वरुपाच्या गोष्टी ऐकायला मिळाल्या होत्या. खर्‍या आहेत की नाहीत ते स्वामी स्वतः आणि (असलाच तर) तो परमेश्वर जाणे!

स्वामींची कथा !!!! फक्त मुवींप्रणीत म्हारांजाच्या आणि शास्त्रींच्या प्रवचनांचा पंखा नाखु