मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

"मालवून टाक दीप"

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
ती संध्याकाळ मंतरलेली…। या लेखावरून जाग्या झालेल्या आठवणी लिहित आहे. १) "मालवून टाक दीप" हे गाणे तसे लहानपणापासून कधीमधी ऐकायला येत असे. परंतु त्याचा खोल अर्थ केंव्हा कळला ते असे. आमचे लग्न ठरले होते १९९२. तेंव्हा (होणारी) बायकोचे माहेर पनवेलला. ते खरेदी साठी दागिने बनवण्यासाठी पुण्याला येत असत. असे दोन वेळेस ते ५- ५ दिवस पुण्यात आलेले होते. माझी नोकरी चालू होतीच ए एफ एम सी मध्ये आणि एम डी पण चालू होते. तेंव्हा सोलापूर रोड ला मला दीड खोलीचे क्वार्टर्स मिळालेले होते. चार वाजता मी डिपार्टमेंट मधून सुटत असे. चहा घेऊन तयार होऊन सेंट बिंट मारून तयार होत असे. संध्याकाळ झाली कि बरोबर ५ च्या ठोक्याला मी तिच्या मामांकडे पर्वती पायथ्या जवळ तिला घ्यायला जात असे. पाच ते साडे आठ अशी आमची फिरायची वेळ होती. दिवसा ते खरेदी साठी जात असत. एक दिवस संभाजी पार्क, एक दिवस क्याम्पात, एक दिवस वैशालीत असे आम्ही जात होतो. चौथ्या दिवशी तिला मी माझी ब्रम्ह्चार्याची मठी दाखवायला ए एफ एम सी मध्ये घेऊन आलो.निघताना सासुबाई नी काहीतरी खाऊन जा सांगितले. मी त्यांना म्हणालो आम्ही बाहेरच खाऊ. खोलीत माझ्याकडे दोन महिन्याचा पूर्ण पगार टाकून आणलेली फिलिप्स ची सुंदर म्युझिक सिस्टीम आणि दोन मोठे उंच असे उच्च दर्ज्याचे लाकडी स्पीकर्स खोलीच्या दोन कोपर्यात लावलेले होते.तिला पण संगीताची आवड असल्याने तिने माझा संगीताच्या टेप्स चा संग्रह पाहिला( १००च्या आसपास कॅसेटस होत्या) पेरू गेटाजवळ असलेल्या फ्रेंड्स म्युझिक सर्कल मधून मुद्दाम टेप करून घेतलेली जुनी मराठी आणि हिंदी गाणी हे पाहून ती हरखूनच गेली.सुदैवाने आमची गाण्यांची आवड तंतोतंत जुळली. सप्टेम्बरचे दिवस असल्याने साधारण सहा साडे सहाला अंधार पडायला सुरुवात झाली. मग मी म्युझिक सिस्टीमवर गाणी लावली आणि आम्ही माझ्या बेडवर बसलो. एकमेकांच्या जवळ आलो तेंव्हा हे गाणे लागले. आ करून लता दीदींचा पहिला आलाप ऐकला आणि अंगावर शिरशिरी आली. अशा म्युझिक सिस्टीम वर संध्याकाळची वेळ हवेत पुण्याचा सुखद गारवा आणि मिठीत तुमची नव्या नवतीची चि. सौ. कां. पुढे जवळ जवळ दोन तास आम्ही वेगवेगळी गाणीच ऐकत होतो.लता दीदींची स्वरसम्राज्ञी कि कॅसेट यात कशी काळ नागिणी, मावळत्या दिनकरा इ गाणी अशा ताईंची अष्टपैलू गायिका मधील जिवलगा, समईच्या शुभ्र कळ्या,तरुण आहे रात्र अजुनी, येरे घना, गेले द्यायचे ते राहून अशी एका पाठोपाठ गाणी लागत होती. हे एक ऐकून जाऊया असे करत करत सव्वा आठ वाजले. खायची प्यायची शुद्ध नव्हतीच. सव्वा आठला मला लक्षात आले कि तिला मामांकडे सोडायचे आहे. मग तसेच निघालो आणि साडेआठ ला त्यांच्या घरी पोहोचलो.घरी सोडले इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या. आणि निघालो मी तिला सोडून निघणार तो सासूबाईनि विचारले काहि खाल्लेत का? मी सरळ सांगितले काहीही खाल्लेले नाही. आता जाऊन जेवणार. त्यांनी जेवायचा आग्रह केला. नाही तरी मेस मध्ये कोणाला जेवायचे होते? पण संकोच असतो ना ? मग तेथे त्यांच्याकडेच जेवलो आणि हवेत तरंगत परत आलो. आजही मालवून टाक दीप गाणे लागले कि मला सप्टेंबरातील ती संध्याकाळ तशीच्या तशी डोळ्यापुढे उभी राहते. २) यानंतर परत एकदा बर्याच वर्षांनी गोव्याला सरकारी घरात आम्ही (सन २००० च्या) पावसाळ्यात सरकारी घर बदलले अगोदर दोन बेड रूम चे घर होते ते आता मोठे तीन बेडरुमचे घर मिळाले. तेथे मुलांना त्यांची बेडरूम त्यांच्या मनाप्रमाणे सजवून दिली. मुलं शाळेत जाणारी होती. एका रविवारी सकाळपासून गोव्याच्या पाळोले किनार्यावर गेलो होतो. तेथे एक तंबू भाड्याने घेतला. सकाळी सामान तंबूत ठेवून समुद्रात गेलो. जेवून दुपारी आम्ही झोपलो मुले वाळूत खेळत होती. संध्याकाळी कारने घरी परत आलो. रात्री जेवणं होईस्तोवर मुलं पेंगुळलेली झाली होती दुपारी उन्हात खेळण्याचा परिणाम स्पष्ट दिसत होता. त्यांच्या बेडरूम मध्ये गादया घालून दिल्यावर पटकन झोपली. दिवसभर पाण्यात खेळून दमली होती. बाहेर हॉल मध्ये म्युझिक सिस्टीम होती तिथे गालीचा घातलेला होता. मी बायकोला म्हणालो थोडा वेळ गाणी ऐकुया . मग दोन लोड घेतले आम्ही सर्व दिवे बंद करून गालीच्यावर आडवे झालो आणि मी नवीन घेतलेल्या ४.१ ( पाच स्पीकर असलेली) म्युझिक सिस्टीम मध्ये शफल मोड वर गाणी लावली तीन सीडी मधून वेगवेगळ्या क्रमाने गाणी वाजू लागली. एक दोन गाणी होईपर्यंत मूड बनला तोच परत लता दीदींचा आलाप आणि मालवून टाक दीप हे गाणे लागले. सर्व दिवे बंद रात्री साडे दहाला गोव्यासारख्या ठिकाणी चिडीचूप शांतता आणि तुमच्या चारी बाजूला शांतपणे पाझरणारे लता दीदींचे सूर. स्वतःच्या उबदार घरट्यात. बाहेर भुरभुरणारा पाउस. दिवसभर फिरून तृप्त झालेले मन आणि मिठीत तुमची आवडती.यापेक्षा काय हवे. एक एक सूर पाझरत होता आणि मनात खोल उतरत होता. गार गार या हवेत घेउनि मला कवेत मोकळे करून टाक एकवार अंतरंग राजसा किती दिसत लाभला निवांत संग. सुख सुख म्हणतात ते अजून काय असते? ३) २०१५ एप्रिल चा महिना. मी आपल्या बायकोशी कटकट करत होतो कि तू साड्या नेसतच नाहीस. बरेच दिवस झाले रोज तेच तेच ड्रेस घालायचे मग साड्या आणून काय फायदा इ इ. बायको अर्ध मारेथोन धावते. (२१ किमी /३ तासात) एरोबिक्स करते म्हणून सडपातळ आहे. त्यामुळे साडी अजूनही तिला खुलून दिसते. मी आपल्या दवाखान्यात रोज सकाळी साडे आठ वाजता न्याहारी करून जातो. तिचा दवाखाना माझ्या दवाखान्याच्या बाजूच्याच खोलीत आहे. तेंव्हा पेशंट आले तर उत्तम पैसे मिळतात. नाही आले तर वेळ मिळतो गप्पा मारायला. तिची वेळ दहा वाजताची. ती एकतर थर्मास मध्ये कॉफी घेऊन येते. किंवा तिच्या दवाखान्यात कॉफी मेकर आहे त्यात आम्ही बनवतो नाहीतर धंदा मंद असेल तर हॉटेलात बसून कॉफी घेतो. एक वाजता दोघे घरी परत. एक दिवस सोमवार सकाळ -- मी सकाळ पासून रुग्ण बघत बघत कावलो होतो. साडे दहा वाजले होते सकाळपासून दोन तास सतत रुग्ण येतच होते. एवढ्यात तिच्या स्वागत सहायिकेने मला बोलावणे पाठवले, सर म्याडम आल्या आहेत आणि तुम्हाला बोलावत आहेत.मी रुग्ण हातावेगळा केला आणि तीच्या दवाखान्यात दार ढकलून आत गेलो. बघतो तर काय बाईसाहेब झक्क पैकी निळी आणि काळी साडी ( माझ्या चोईसची) साडी त्यावर माचींगचा ब्लाउज गळ्यात मोत्यांची माळ इ इ जामानिमा करून आलेल्या. मी छानपैकी शिटी मारली. बायको लटक्या रागाने म्हणाली अरे हा आपला दवाखाना आहे घर नाही पेशंट काय म्हणतील? . मी म्हणालो पेशंट को मारो गोली. मग काय तिच्या कडे पाहत बसलो. तिने तिच्या छोट्याशा म्युझिक सिस्टम वर गाणी लावली. तर काय गाणे लागले " मालवून टाक दीप" छान पैकी बायको कडे पाहत वातानुकुलीत खोलीत गरम गरम कॉफी चा स्वाद घेत बसलो. आयुष्यात माणसाला आणखी काय हवं असतं?

वाचने 21800 वाचनखूण प्रतिक्रिया 113

मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 00:38
काही-काही गाणी प्रिय व्यक्ती बरोबरच ऐकायची, मालवून टाक दीप. शारद सुंदर चंदेरी राती धुंद एकांत हा येशील, येशील राणी पहाटे पहाटे येशील आणि धुंदीत गंधीत होवुनी सजणा ही अशी गाणी, पावसाळी रात्र आणि सुखात गेलेला, दिवस...बस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स्स... अजून काय हवे?

नंदन Mon, 06/29/2015 - 00:43
मर्यादा न सोडता रसिकतेने कसं लिहावं, याचे धडे डॉक्टरसाहेबांकडून घ्यावेत. रामदासकाकांचा 'कविता: एक लांबचा प्रवास' हा लेख आठवून गेला.

उगा काहितरीच Mon, 06/29/2015 - 07:22
वा डॉक्टरसाहेब नेहमीप्रमाणेच सुंदर ! (जुने गाणे खरंच सुंदर होते , सुधीर फडके , जितेंद्र अभिषेकी, आशाताई, लतादिदी अरूण दाते ही मंडळी दैवी आवाज लाभलेली. त्यात ऋषीच्या तपश्चर्येसारखा रियाज करून एका वेगळ्याच उंचीवर गेलेले.पण आमची व आमच्या नंतरची पिढी या अशा गाण्यांना नाकं मुरडताना पाहून किव येते.)

चांगलं चाल्लय राव तुमचं ! मस्त आठवणी आणि मस्त लिहिलंय. आयुष्यभर असेच सुन्दर जगा. आम्ही पण ऐकतो हं..... कालच भांडनानंतर ती बोलली एफ.एम वर मस्त मराठी गाणी लागली आहेत, ऐक ज़रा, तुझं भांडन नेहमीचच असतं . तेच स्वप्न लोचनात, काटा रुते कुणाला, हे सुरांनो चन्द्र व्हा, झाडांची हलती पाने, हं फरक इतकाच की आम्ही तिला गाणी म्हणायला लावतो. बाकी,साडी आमचाही आवडता विषय आणि ती असते सतत ड्रेस वर....अर्थात चंद्र, चांदण्या, टेकडीवर नभ उतरलेले असले आणि साडी परिधान केलेली असल्यावर मस्त तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकुन डोंगर रांगा पाहण्यातली मजा असतेच आपलीही आवड कोणी जोपासत असतं हा आनंद काही और असतो, नाही का ! आवारतो कॉलेजला जायचं आहे. :) -दिलीप बिरुटे

In reply to by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

सुबोध खरे Tue, 06/30/2015 - 09:57
बिरुटे सर
मस्त तिच्या गळ्यात दोन्ही हात टाकुन डोंगर रांगा पाहण्यातली मजा असतेच
"दोन" हात गळ्यात टाकून डोंगर रांगा कशा पाहता येतात? किंवा "दोन" हात गळ्यात टाकून डोंगर रांगा कशाला पहायच्या? ह. घ्या.

नूतन सावंत Mon, 06/29/2015 - 08:37
हा लेख मिसेस खरेनी इथे टाकण्यापूर्वी वाचलाय का?असल्यास त्यांची प्रतिक्रिया ऐकायला आवडेल.नसल्यास इथे वाचल्यावरची त्यांची प्रतिक्रिया जाणून घ्यायला आवडेल.

In reply to by नूतन सावंत

सुबोध खरे Mon, 06/29/2015 - 09:57
हा लेख इथ टाकण्याच्या अगोदर (म्हणजे शनिवारी) मी तो सौ. ला दाखवला. तिने यात सासूबाईनि पटकन म्हणून खायला तिखट मिठाच्या पुर्या केल्या होत्या हे हि तिला आठवते आहे हे सांगितले. खरं तर मला ते दिवस इतके स्पष्ट पणे आठवतात याचेच तिला कौतुक वाटले.(म्हणजे बरयाच पुरुषांना अशा फालतू(!!!) गोष्टी लक्षात राहत नाहीत असे म्हणतात म्हणून हो. ( अपने मुंह मिया मिठ्ठू होना म्हणतात काय कि). ती एवढेच म्हणाली तू इतक्या खाजगी गोष्टी लिहितो आहेस पण त्यात कुणाला (इन्टरेस्ट) रस आहे? तरीही मी लिहिले आहे.

In reply to by सुबोध खरे

अत्रन्गि पाउस Mon, 06/29/2015 - 15:38
लेख अप्रतिम ... अहो त्यांना म्हणावे तुमच्या लेखाने आमच्या सारख्या किती लोकांना ते दिवस आठवले ...वा बुवा !!

कंजूस Mon, 06/29/2015 - 08:42
असेच राहा शंभर वर्षं. -एक बदलणारा औरंगजेब. "यातलं" ओ का ठो कळत नाही -तीनदा वाचलं. बाकी "कावलो" शब्द सांगलीकडचे मित्र आहेत हे सांगतो.

ब़जरबट्टू Mon, 06/29/2015 - 09:34
लाजवाब साहेब, अप्रतिम लिहले आहे. काही गाण्यांसोबत खरच अश्या सुखद आठवणी जुळल्या असल्यात, की तारा आपोआप झंकारतात... बाकी, काही प्रतिसादात, आमच्या वेळीचे गाणे, गायकांचा रियाज या गोष्टी व चर्चा असल्या की तिडीक येते.. अरे, प्रत्येक पिढीसोबत ही चव बदलणारच आहे. तुम्ही जेव्हढ्या जल्लोषात "मेरी उमर के नौजवानो" ची मजा घेतलीय, तेव्हढीच वा डबल धुंधी आजची पिढी जर हनी सिन्गच्या गाण्यावर घेत असेल, तर कशाला आक्षेप घ्यायचा.. तुमची साडी.. आमची मिडी.. दुसरे काय... :)

In reply to by ब़जरबट्टू

उगा काहितरीच Mon, 06/29/2015 - 11:37
बजरबट्टू साहेब , तुमचा रोख माझ्यावर आहे का ? (नसेल तर पुढचा प्रतिसाद वाचू नका) मी जुन्या पिढीतला नाही आहे. मिही नवीन पिढीतलाच पण मला आवडतात जुनी गाणी . सुधीर फडके , अरूण दाते वगैरे . पण याबरोबरच आवडतात ब्रायन ॲडम्स, ॲकॉन वगैरे, शिवाय शंकर महादेवन , शिल्पा राव हे पण आवडतात. पण काही लोक आमच्याच काळातलं संगीत चांगलं बाकि बकवास असे म्हणतात , ते लोक डोक्यात जातात मग ते १९६० चे असो कि १९९५ चे.

In reply to by उगा काहितरीच

ब़जरबट्टू Mon, 06/29/2015 - 13:31
नाही.. लोक आमच्याच काळातलं संगीत चांगलं बाकि बकवास असे म्हणतात , ते लोक डोक्यात जातात मग ते १९६० चे असो कि १९९५ चे. बस्स...एव्हडेच म्हणायचे होते,.

In reply to by ब़जरबट्टू

सुबोध खरे Mon, 06/29/2015 - 13:53
आजच्या पिढीला जुन्याचे काहीही राहिलेले नाही. जुन्या माणसांची जुन्या संगीताची जुन्या चालीरीतींबद्दल कोणतीही आपुलकी नाही. अर्वाच्च पणा आणी उर्मट पणा वाढला आहे थोरांचे न ऐकणे हि फ्याशन झाली आहे. . . . . . । । असे १७५४ सालच्या फ्रान्स मधील एका लेखात लिहिलेले आढळले ( स्वैर अनुवाद मी लिहित आहे). हा पिढ्यांचा संघर्ष पिढ्यानपिढ्या चालूच राहणार.

In reply to by सुबोध खरे

मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 14:19
काळ बदलला की, समाजाची समीकरणे बदलतात. अगदी ज्ञान, भाषा, राहणीमानापासून ते कौटुंबिक जीवना पर्यंत. आमच्या बाबांच्या मतानुसार, काळाप्रमाणे बदललात, तरच काळ तुम्हाला वाचवेल. आजोबा " मेरी जान, मेरी जान आना संडे के संडे" च्या तालावर नाचायचे, तर पिताश्री "दम मारो दम" किंवा "अय्यया सुकु सुकु" तालावर. आम्ही "ये दिल तो आता है एक दिन जवानी में" किंवा "संमुंदर में नहाके" अथवा "टारझन, ओ माय टारझन." तर पोरगा "वाका वाका" किंवा "केचप" किंवा "व्हेन एवर, व्हेर एव्हर" किंवा "चिकि चिकि" ऐकणार.

नाखु Mon, 06/29/2015 - 09:51
"खरे" अनुभव !! आठवणी वेल्हाळ नाखु

पियुशा Mon, 06/29/2015 - 09:56
एक्दा जोर्दार टाळया होउन जाउ द्या या ल्लेखावर क लिवलय क लिवलय दिन बन गया :) आम्ही पण अशीच वाट पाह्तोय कोन आहे कोण तो राजकुमार ? जो शुभ्र वस्त्र परिधान करुन घोडिवर बसुन कधी येतो कोण जाने :( बाकी आम्ही तेव्हा ऐकायच अन गायच गान ठरवुन ठेवल आहे बर का ;) " तुने मारी एन्ट्री और दिलमे बजी घन्टी और ट्ण ट्ण ट्ण ट्ण ट्ण ट्ण ट्ण ट्ण ट्ण ट्ण;)

In reply to by पियुशा

पैसा Mon, 06/29/2015 - 10:30
राजकुमाराची का घोड्याची? बादवे, म्युझिक सिस्टिम आहे ना? का माझ्याकडे एक जुनी आयवा सिस्टीम आहे ती देऊ तुला गिफ्ट म्हणून?

In reply to by पैसा

इशा१२३ Mon, 06/29/2015 - 13:06
नुसत्या सिस्टिम देउन काय उपयोग सी.डी.नकोत?माझ्या कडे सी.डी.आहेत जुन्या गाण्यांच्या त्या देते. ते तसल टॅण टॅण गाण ऐकुन काय होणारे?

In reply to by सूड

पियुशा Mon, 06/29/2015 - 21:08
@ स्वप्स कित्ती हुशार ओ तुम्ही :) सगळ्यांना माज़ी कित्ती कित्ती काळजी ,सूडा तुला बघू का एखाडी उपवर मुलगी का तू स्वतच शोधून ठेवलिएस:प

In reply to by पियुशा

सदर प्रतिसादामधल्या योग्य जागांमधुन घोडा, तो आणि अति ह्या तीनपैकी दोन शब्द गायब आहेत असं नम्र निरिक्षण नोंदवतो. (पळा मुलांनो पळा)

In reply to by पियुशा

उमा @ मिपा Mon, 06/29/2015 - 11:34
नै गं, वाट नै बघत रहायची, त्यासाठी तुला चार दुकानं फिरावं लागेल, तुझ्या आवडीचा राजकुमार शोधावा लागेल, मग त्याला तुझ्या आवडीने सजवून त्याचं तू केलेलं वर्णन पाठव आम्हाला आणि फोटो पण, आम्ही म्हणू, व्वा, क्या चीज है!

अजया Mon, 06/29/2015 - 10:13
त्याला द्यायचा तुझ्या आवडीचा शरट घेतला आहेस का बाळ पिशवे? मी राजकुमाराबद्दल बोलतेय,घोडा नाही. रच्याकने:तुझ्या घरच्या छान वस्तुंचे फोटो कधी टाकते आहेस?

चिगो Mon, 06/29/2015 - 11:04
आप तो बडे रोमँटीक निकले, डॉक्टरसाहब.. :-) लेख खरंच खुप आवडला.. अत्यंत संयत शब्दांत सुंदर, सुगंधी आठवणी शेअर केल्याबद्दल धन्यवाद..

नूतन Mon, 06/29/2015 - 11:07
'या जन्मावर या जगण्यावर ,शतदा प्रेम करावे' या ओळी सार्थ ठरवणारं हे लतादीदींचे गाणे .त्याच्याशी निगडीत क्षणांचे सुंदर वर्णन

In reply to by अपरिचित मी

सुबोध खरे Mon, 06/29/2015 - 13:03
अगदी खरं आहे. माफ करा पण तुमचा लेख वाचून डोक्यात आलेल्या गोष्टी लगेच टंकायला घेतल्या त्यात विसरलो. खरं तर आमच्या आठवणी जागवल्यात याबद्दल तुमचे शतशः आभार. आणि त्या जागवण्याचे सामर्थ्य तुमच्या लेखनात आहे त्याची पोच देण्यात हलगर्जी पणा झाला याबद्दल परत एकदा क्षमस्व.

नूतन सावंत Mon, 06/29/2015 - 12:22
म्हणजे या आठवणी खाजगी आहेत याची आणि खाजगी गोष्टी इतरांना इंटरेस्ट कशाला घेऊ द्यायचा याचीही हिंट मिसेस खरेनी दिली होती तर तुम्हाला.

In reply to by नूतन सावंत

सुबोध खरे Mon, 06/29/2015 - 13:09
आपण म्हणता आहात ते मान्य आहे परंतु बर्याच लोकांना आपल्या काही खास कुपीतल्या आठवणी लोकांना सांगाव्या असे वाटत असते. पण त्यांना ते संकोचाने करता येत नाही अशा लोकांना प्रोत्साहन म्हणून समजा. मी काही लेखक नाही पण या किंवा अपरिचीत मी यांच्या ती संध्याकाळ मंतरलेली…। या लेखामुळे ( ज्यःच्या वरून मला लिहावेसे वाटले) जर काही सिद्धहस्त लेखक स्फूर्ती घेतील तर त्याचा आपण सर्वाना फायदा होईल असे वाटले म्हणून लिहिले. जाता जाता -- डॉ. सौ. खरेंच्या परवानगीशिवाय आमच्या घरात पानही हलत नाही हो. ( असे बर्याचशा घरात असल्याचे ऐकतो)

In reply to by सुबोध खरे

मुक्त विहारि Mon, 06/29/2015 - 13:17
आमच्या घरात तर आम्हाला, आमच्या सौ.च्या परवानगी शिवाय, कुठल्याही प्रकारच्या पानाचा आस्वाद पण घेता येत नाही. बाबा उवाच, "पुरुषांची जातच मुळात सहनशील." (बाबांची प्रवचने, खंड-१२, अध्याय-१३, पृष्ठ-१२३४, ह्या साहित्यातून साभार)

In reply to by मुक्त विहारि

एस Tue, 06/30/2015 - 12:02
मी बाबांच्या प्रवचनात ऐकलं होतं ते 'नवर्‍यांची जातच मुळात सहनशील'असं होतं. छापताना कदाचित झालं असेल ते! :-)

In reply to by एस

मुक्त विहारि Tue, 06/30/2015 - 13:02
बाबांची आणि माझी सविस्तर चर्चा झाली. त्यामुळे बाबांनी त्या वाक्यात थोडा बदल केला.

मान गये!! परवाच लग्नाचा ११वा वाढदिवस साजरा केला. आमची फेव्हरीट गाणी- गेले द्यायचे राहुनी भय ईथले संपत नाही तु तेव्हा तशी (निवडुंग,जैत रे जैत्,साधी माण्सं मधली सगळीच ) वाट पाहुनी जीव शिणला कधी मूड लागला तर पं.भिमसेन जोशी किंवा जितेंद्र अभिषेकीबुवांची काही गाणी. ग्रेस ,आरती प्रभुंच्या काही कविता असेच आयुष्य तुम्हा आम्हा सर्वान्ना लाभो ही साठा उत्तराची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपुर्ण

In reply to by राजेंद्र मेहेंदळे

पैसा Mon, 06/29/2015 - 15:51
खरे तर बाकीची गाणी वाचून पण मला वेगळेच चित्र डोळ्यासमोर उभे राहिले! =)) आजचा सकाळचा चहा मिळाला का? =))

एस Tue, 06/30/2015 - 00:02
बादवे, डॉक, त्यांनाही मिपासदस्य का नाही बनवून घेत तुम्ही? त्यांचेही अनुभव रोचक असणार यात शंकाच नाही. (की त्या आहेत सदस्य आधीच?)

In reply to by एस

सुबोध खरे Tue, 06/30/2015 - 09:51
अहो त्या मुळात गुजरात मध्ये शिकल्या ते सुद्धा कोनव्हेन्ट मध्ये. ती मराठी वाचते पण लिहिणे कठीण आहे. मुळात दवाखाना, एरोबिक्स,मैरेथॉन, फोन आणि व्हाट्स अप्प आहे त्यात मिपा वर आली तर आमचे जेवायचेच वांधे होतील. (तरी बरं मराठी धारावाहिक पाहत नाही)

In reply to by सुबोध खरे

चिनार Tue, 06/30/2015 - 10:37
(तरी बरं मराठी धारावाहिक पाहत नाही)
डॉक्टर साहेब ..तुम्ही किती नशीबवान आहात याची कल्पना नाहीये तुम्हाला ...हेवा वाटतोय हो.. आमच्या इथे तर श्री नं जान्हवी , जय नं आदिती, खंडोबा नं म्हाळसा नं बानू यांनी उच्छाद मांडलाय नुसता..

मस्त लिहिले आहे डॉ चे वैद्यकीय सल्ले आणि व्यावसायिक अनुभव नेहमीच वाचले आहेत आज हाही अनुभव वाचला , सुख हे मानण्यावर असते हेच खरे

मयुरा गुप्ते Tue, 06/30/2015 - 01:33
डॉक चा हा ही एक पैलु. बहोत खुब! काही काही गाणी कळायला योग्य काळ आणि वेळ जावाच लागतो. त्यात शॉर्ट्कट मारुच शकत नाही तुम्ही. जसं की कुठल्याही नवनीत गाइड मधुन कॉपी करुन शब्दांतले भाव कसे बरं कळावेत.. एक आठवलेला किस्सा.. झी टीव्ही च्या सुरुवातीच्या काळात जेव्हा लहान मुलांचे सा रे ग म चा पहिला सिझन होता (कदाचित थोडं पुढे मागे असु शकेल), देवकी पंडीत व अवधुत गुप्ते परिक्षक होते, त्या मध्ये एकदा कोणीतरी 'का रे दुरावा, का रे अबोला' हे गाणं निवडलं होतं. सगळ्याचं छोट्या गायकांनी खरोखर कमाल गाणी गायली होती, पण त्या मुलांच्या वयासाठी एवढं अयोग्य गाणं ऐकल्यावर बाकी परिक्षकांनाहे राहावलं नव्हतं.. तांत्रिक दृष्ट्या कितीही छान गाउन देखील, त्यातला भावार्थ कसा बरे आणणार.. असो. थोड अवांतर झालं. पण मालवुन टाक दीप -डॉक च्या नजरेतुन सुंदरच. --मयुरा.

द-बाहुबली Tue, 06/30/2015 - 10:06
अरे, वहिनींचा फोटो गायब ? का मलाच दिसतं नाहीये ? गायब केला असेल तर एकदम बेस झालं बघा. काय आहे की... मान्य आहे आपली खाजगी तवानी आठवण आहे. पण जेंव्हा आपले लिखाण इतर वाचतात व ते वाचकांच्या मनाचा ठाव घेत असतं तेंव्हा वाचक त्यात लेखकाचे भाव जरी वाचत असला तरी त्यामधे प्रोजेक्ट केली गेलेली व्यक्ती त्या वाचकाच्या मनातलीच असते... मग त्या व्यक्तीचे वर्णन तुम्ही काहीही कसेही केले वा सत्यानुभव असला तरी वाचक त्यात त्याच्या मनातल्या व्यक्तीलाच नकळत प्रोजेक्ट करतो. लेखकाला अभिप्रेत असलेली व्यक्ती तो करुच शकत नाही जो पर्यंत वाचन चालु आहे. म्हणूनच वाचनाचा आनंद, रसभंग न होता वाढत जातो... अन,अशावेळी शेवटाला जेंव्हा भलत्याच व्यक्तीचा फोटो समोर येतो तेंव्हा... गोंधळायला होतं... हो... की नक्कि काय चाललयं तरी काय... पण फोटॉ काढुन टाकल्याने लेख आता वाचकांसाठी परिपुर्ण झाला आहे. - धन्यवाद.

In reply to by द-बाहुबली

सुबोध खरे Tue, 06/30/2015 - 12:07
फोटो सं म ला सांगून काढून टाकला. मला स्वतःला तो टाकल्यानंतर शंका निर्माण झाली को फोटो येथे अप्रस्तुत/ अप्रासंगिक (INAPPROPRIATE/ OUT OF CONTEXT) आहे काय? यावर मी काही मिपा मित्रांची मदत घेतली आणी लोकांची प्रांजळ मते ऐकून तो काढून टाकावा असेच वाटले म्हणून हा निर्णय घेतला. माझे बरेच फोटो कट्ट्यांवर असल्याने फक्त तिचाच फोटो टाकला होता (आमचा दोघांचा फोटो टाकला नव्हता.). सर्व लोकांना प्रतिसादांबद्दल आणी सल्ल्याबद्दल धन्यवाद.

स्पंदना Tue, 06/30/2015 - 11:49
आता ही आठवण, हे गाण, अस्वादात्मक वाटले. नाहीतर मग बच्चनने रेखाला अस्स बघीतल, अश्या टाइप झाला होता लेख. बऱ्याच जणांनी रामदास काकांच्या लेखाची तुलना केली.किंवा आठवण काढली म्हणा. रामदास काकांच लिखाण एका वेगळ्या पातळीवर पोहोचवत हे नात. त्यात कोठेच् मूर्तता किंवा दृष्टानुभव नाही आहे. मनाच्या अलगद पडणाऱ्या गाठी ,समांतर आयुष्य अन निसर्गाच्या भान हरपवणाऱ्या पार्श्वभूमीवर जोड़ीदाराची जाणीव. अर्थात प्रत्येकाचे लिखाण त्या त्या ठिकाणी उचितच. फ़क्त शब्द चित्र राहावे एवहढीच् विनंती.

पैसा Tue, 06/30/2015 - 12:55
"सुख म्हणजे काय असतं" हे मोजक्या शब्दात लिहिलंत. फोटोबद्दलः फेसबुकवरही फोटो टाकू नका म्हणून इशारे असतात. आपले फोटो कोण पाहू शकेल याची सेटिंग्ज आपण तिथे वेगवेगळी वापरू शकतो. ओपन फोरमवर कोणाच्या फोटोचा कोण कसा वापर करील सांगणे कठीण. त्यातही एखाद्या कट्ट्याला डॉ. सौ. खरे आलेल्या असताना ग्रुपमधे आलेला फोटो देणे वेगळे आणि अशा लिखाणासोबत देणे वेगळे. फोटो काढून टाकलात ते बरंच झालं. "दिला तर काय झालं" म्हणून त्यावर अडून बसला नाहीत. एक स्त्री म्हणून तुम्हाला त्यासाठी मनापासून धन्यवाद!

In reply to by पैसा

अजया Tue, 06/30/2015 - 13:52
प्रांजळपणे फोटो काढुन टाकल्याचे सांगणार्या डाॅक्टरांचे कौतुक वाटून गेले.खरंच खटकत होता तो.वरच्या सुंदर कथानकाला उगाच प्रदर्शनीय जोड लावल्यासारखा वाटून गेला.पण तुमचा असा हेतू नाही हेही माहित होतंच.तुम्ही ते खिलाडुपणे मान्य करुन तुमच्या सुरेख लेखाला चार चाँद लावले. धन्यवाद डाॅक्टर,सर्व स्त्रीयांच्या भावनेचा आदर केल्याबद्दल.

खटपट्या Tue, 06/30/2015 - 17:35
जबरी लेख झालाय डॉक, एकदम द्रुष्ट लागण्यासारखा आहे लेख. कामा निमित्त बरेच दीवस मिपावर येणं झालं नव्हतं. आल्यावर हा लेख वाचून प्रतिक्षेच सार्थक झालं.