Skip to main content

गेम ड्रोम - २

लेखक अद्द्या यांनी मंगळवार, 21/04/2015 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचा प्लान होता चांगला . अगदी माझ्या आवडीचा होता . पण सध्या कशातच मन नवतं . गेल्या २५ वर्षाच्या आयुष्यात फक्त तेच ५-६ दिवस होते . जेव्हा मला पूर्ण हरल्यासारखं वाटत होतं . नापास होणं मोठी गोष्ट नवती . आधी हि मासिक परीक्षेत झालो होतो . पण लगेच पुढच्या परीक्षेत त्याची भरपाई हि केली होती . एक तर पुस्तकि किडा नवतो . जमेल तेवढ्या स्पर्धा आणि खेळ खेळायचो . त्यामुळे मासिक परीक्षा कधीच गृहीत धरली नवती . सहामाही आणि वार्षिक परीक्षेलाच काय तो अभ्यास करायचो .त्यामुळेच कोणत्याही परीक्षेत नापास होण्याने कधीच एवढं वाईट वाटलं नसतं . पण . त्या रात्री आई बाबांना बोलताना ऐकलं मी . बाबा रडत होते . हे मी कधीच बघितलं नवतं . मी नापास होण्याचा दोष ते स्वतः वर घेत होते . त्या येड्या माणसामुळे बाबांच्या डोक्यात हे खूळ आलं होतं . गौरव रोज मला विचारायचा . कि मी काय विचार केलाय . पण काही तरी फालतू कारण देऊन आणि विषय बदलून मी फोन ठेऊन द्यायचो . असेच १-२ आठवडे गेले. . आणि बाबांच्याच एका मित्राच्या मुलाचं लग्नाचं आमंत्रण होतं . तिथे सगळी ओळखीची मंडळी असणार होतीच . मी तिथे जायला कुरकुर करत होतो . तेव्हा बाबा म्हणाले . . "चूक केली आहेस . लोक बोलणारच . ऐकून घे . जो पर्यंत हि चूक सुधारत नाहीस . तो पर्यंत काहीही उत्तर न देत ऐकून घ्यायचं . उलटून उत्तर देऊ नकोस कोणालाही तू . मी बघतो कोण काय बोलतंय ते . तू फक्त पुढे वर्ष भर काय करणार आहेस ते सांग . पुढे शिकणार नसशील तर तसं सांग स्पष्टपणे . बघू आपण काही तरी . पण जे आहे ते निर्णय घे पटकन . आणि त्या निर्णयामागे ठाम राहा . असा बाय्ल्यासारखा रडत बसू नको . परत स्वतःला खोलीत बंद करून घेतलेलं बघितलं तर लाथ मारून घराबाहेर काढेन . . असला रडवा मुलगा नाही गरजेचा मला . आणि हो . यापुढे तू जे काही करशील ते स्वतःच्या हिमतीवर करायचं . आई वडील म्हणून जे काही करायचं होतं ते गेल्या १८-१९ वर्षात आम्ही केलंय . यापुढे तुझा तू मालक . आमची मदत लागली तर सांग . अन नाही लागली तर चांगलीच गोष्ट आहे . " वडील ओरडत असताना वास्तविक वाईट वाटायला हवं . राग यायला हवा . किंवा चेहऱ्यावर कमीत कमी अपराधीपणा तरी दिसायला हवा . . पण मला बरं वाटत होतं . हसू येत होतं मला . एक गोष्ट कळून चुकली होती . कि मी जो काही निर्णय घेईन त्यामागे बाबा उभे असतील खंबीरपणे . आणि मला त्यांनी स्वतःच आयुष्य स्वतः घडवायला सांगितलं होतं . त्यांना मी मित्राचा प्लान सांगितला . त्यांना फारसा पटला नवता . पण तरी त्यांनी होकार दिला होता . पैसे कमावून घरात मदत होणार असेल . तर का नाही म्हणतील . ते पुढे जे काही म्हणाले. ते आयुष्यभर विसरणार नाही मी . . प्रत्येक शब्द कायम कानात फिरत असतो . " जे काही करणार असशील ते कर . पण जे काही कमावशील त्यातलं ६०% आत्ता तुझ्या आईला द्यायचं , आणि नंतर तुझ्या बायकोला . या बायकाच घर चालवतात लक्षात ठेव. आपण फक्त बाहेरून सामान आणून देतो . त्या पैश्याचं ती काय करते हे तू कधी विचारायचं नाही . उरलेल्या पैशाचं काय करतोस हे ती कधी विचारणार नाही . दुसरी गोष्ट . या वयात व्यसनं लागतात . आम्हीही केलीत . मी नाही म्हणणार नाही . अजुनी करतो . दिवसात २-३ पाकिटं संपवलीत सिगारेट ची एके काळी . दर २-३ दिवसांनी दारू पण प्यायचो . पण म्हणून कधी कामावर फरक पडू दिला नाही . आणि जेव्हा वाटलं कि फरक पडतोय कामावर . सोडून दिलं सगळं . तुला जे करायचं ते कर . जसं जगायचं जग . पण ज्याक्षणी वाटेल कि एखाद्या गोष्टीच्या आहारी जतोएस . त्याक्षणी ती गोष्ट सुटली पाहिजे . कुठल्याच गोष्टीची सवय लाऊन घेऊ नको . कधी तरी मजेसाठी ठीक आहे . . तिसरी गोष्ट . परत एकदा सांगतोय . . तुला जे हवं ते कर . पण तुझ्यामुळे कधी परत आम्हाला ऐकून घ्यावं लागलं कोणाकडून , ते मला चालणार नाही . गेल्या ४५ वर्षात कधी एक थेंब आला नवता डोळ्यातून . काल आला. फक्त तुझ्यामुळे . तुझ्या नावामागे जे आडनाव लागलंय त्याला काही बट्ट्या लावलास . त्या दिवशी तू घरातून बाहेर जाशील . " अगदी कमीत कमी शब्दात त्यांनी त्यांच्या अपेक्षा सांगितल्या होत्या . फालतू बंधने घालण्यापेक्षा हे असं सांगितलेलं कायम पटतं मला . त्याच संध्याकाळी गौरव ला तयारी सुरु करायला सांगितली . . प्लान अगदी सोप्पा होता . . त्याच्याकडे पैसे होते . माझ्याकडे अन ऋग्वेदकडे कम्प्युटर चं ज्ञान आणि गेम्स बद्दल वेड होतं . नवीन गोष्टी पटकन शिकायची क्षमता होती . आणि मुख्य म्हणजे . लोकांना बोलण्यात गुंतवून गंडवू शकत होतो दोघे मिळून . तिघांनी मिळून सायबर केफे टाकायचा ठरवला . पैसे अन जागा त्याची . बाकी सांभाळण्याची आणि पुढे वाढवण्याची जबाबदारी आमची . तिघानाही माहिती होतं कि फक्त एवढ्यावरच आम्ही गप्प बसणार नाही . पण आधी सुरुवात . बाकी सगळं नंतर . या एकाच विचारांनी तिघे एकमेकाला शांत करत होतो . अति उत्साह नडतो . तो अजिबात नको होता . हे सगळं होत असतानाच . . लग्नाला जायचा दिवस आला . आणि तिथे हि तो हरामखोर भेटलाच . बाबा अन मी चिकन बिर्याणी ची मजा घेत बसलो होतो . . तेवढ्यात हे साहेब आणि त्यांचा मुलगा आला . आल्या आल्या म्हणाला . "काय रे, वर्ष भर आता कुठल्या दुकानात काम करणार का? मिळतील १-२ हजार . त्यापेक्षा जास्ती तरी काही करू शकणार नाहीस आत्ता . . " त्याचाकडे पूर्ण दुर्लक्ष करत योगेशला विचारलं ( त्यांचा मुलगा ) . अरे तू इंजीनारिंग करत होतास ना क़ाय झालं ? "हो रे . झालं कि पूर्ण . पण दीड वर्ष झालं नोकरी शोधतोय रे . " मी पुढे काही बोलणार तेवढ्यात बाबा त्या काकांना म्हणाले . . " काय मग . पाठवता का याला आदित्य च्या कम्प्युटर दुकानात ? पगार देऊ त्याला २-३ हजार . त्याला कामगार मुलं पाहिजे होतीच तशीही . . " असं वाटलं कि उठून बाबांना मिठीच मारावी . जो चेहरा झाला होता त्या काकांचा . वाह . . या सगळ्यात बिचारा योगेश सापडला . . असो . सुक्याबरोबर ओलं पण जळतं . . पुढे २-३ दिवसात आमचा स्वतःचा सायबर कॅफे सेट झाला होता . गावातल्या २ सायन्स कॉलेज आणि एक इंजिनियरिंग कॉलेज च्या अगदी मधोमध होता . म्हणजे लोकेशन अगदी परफेक्ट होती गौरव ची . बाकी जाहिरात आम्ही केलीच होती . कॉलेज मधील मित्रमंडळी होतीच . सुरुवातीचे ४-५ दिवस मोकळे बसून काढल्या नंतर अक्षरशः जेवायला पण वेळ मिळत नवता . पुढल्या वर्षात " सायबर कॅफे " या साच्यातून बाहेर पडून . इतर हि बरेच छोटे मोठे व्यवसाय जोडले गेले त्यात . आपल्या आवडत्या व्यवसायात उतरलो होतो . आणि सगळे खर्च सोडून आरामात १०-१२ हजार हातात येत होते . . शेवटी व्हायचं तेच झालं . व्यसन लागलं . पण पैसे कमवायचं . त्याचा परिणाम . कॉलेज ला जायचा विचार डोक्यातून काढून टाकला . परत ते क्लासेस आणि घोकंपट्टी करायची इच्छा नवती अजिबात . शिकत गेलो ते कम्प्युटर शी निगडीत गोष्टी . जमतील त्या मार्गाने . घरातले हि खुश होते . नापास झालो म्हणून पडून न राहता काही तरी करत होतो . . पण या कॅफे चालवण्याच्या १-२ वर्षाच्या वेळेत भरपूर गोष्टी शिकायला मिळाल्या . एक . कि काही झालं तरी, जर आई बाबा पाठीशी असतील . तर बाकीचे तेल लावत गेले तरी काही घंटा फरक पडत नाही . . दोन . प्रत्येकाला इंजिनियर होण्याची गरज नाही . पण तरीही जमेल तेवढं शिकायची गरज आहेच . आणि आपल्याला आवडेल आणि शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेला जमेल तेच शिकावं . तीन . ' नातेवाईक' आणि ' आप्त' या नावाखाली जे काही आपल्यात घरात जेवण करत आपल्यालाच ऐकवणारे हरामखोर लोक असतात . त्यांचं ऐकून घेण्याची काही एक गरज नसते . हे गरजेला कधीच उपयोग पडत नाहीत . उपयोगी येतात ते मित्र . आणि शिकत रहा आयुष्यभर . .
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 2824
प्रतिक्रिया 10

प्रतिक्रिया

एक . कि काही झालं तरी, जर आई बाबा पाठीशी असतील . तर बाकीचे तेल लावत गेले तरी काही घंटा फरक पडत नाही . . दोन . प्रत्येकाला इंजिनियर होण्याची गरज नाही . पण तरीही जमेल तेवढं शिकायची गरज आहेच . आणि आपल्याला आवडेल आणि शारीरिक आणि बौद्धिक क्षमतेला जमेल तेच शिकावं . तीन . ' नातेवाईक' आणि ' आप्त' या नावाखाली जे काही आपल्यात घरात जेवण करत आपल्यालाच ऐकवणारे हरामखोर लोक असतात . त्यांचं ऐकून घेण्याची काही एक गरज नसते . हे गरजेला कधीच उपयोग पडत नाहीत . उपयोगी येतात ते मित्र . आणि शिकत रहा आयुष्यभर . .
मस्त!

In reply to by एस

५०००० % सहमत. सख्खे आई-बाप आणि जवळचे जी-मित्र सोडुन चौथ्या कोणालाही महत्त्व देउ नये. स्वानुभव. नातेवाईक मंडळी तर चक्क "सुरक्षित अंतर पाळा" वर ठेवावी. त्यातही जी आगाउ पणा करतीलं त्यांना शिस्तीत तोंडावर फाट्यावर मारावं.

In reply to by कॅप्टन जॅक स्पॅरो

+१०००० हो.. अनुभव असा की त्यांच्यापैकी बर्‍याच जणांची मदत भावनेपेक्षा उपद्रवक्षमताच खूप.. (४ चांगल्या नातेवाइकांसाठी ५० असले सहन करावे लागतात.. :| )

' नातेवाईक' आणि ' आप्त' या नावाखाली जे काही आपल्यात घरात जेवण करत आपल्यालाच ऐकवणारे हरामखोर लोक असतात . त्यांचं ऐकून घेण्याची काही एक गरज नसते .
१००% पटलं

सुपर्ब! असं वाटतय कि माझीच कहाणी मला कोणीतरी सांगतय! सेम टू सेम सी॑क्वेन्स... एक्दम नॉस्टॅलजीक का काय म्हणतात तसे झालेय..