मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पुण्यनगरी !

चिनार · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून चांदणी चौकात जायचे होते. एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा." समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?" ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने" आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ? काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या. त्यावेळी तोच मित्र त्यांना म्हणाला," बाई, जरा लवकर येत जा." हे ऐकून त्या तावातावाने म्हणाल्या," मी बाई दिसते होय रे तुला ?" मित्र परत तितक्याच निरागसतेने म्हणाला," तुम्ही बाईचं तर दिसताय. एव्हढं काय झालं?” बाईंचा राग काही शांत होईना. त्या म्हणाल्या," मावशी म्हणायचं. उद्यापासून येणार नाही बाई म्हणणार असशील तर!" मित्र तेंव्हा शांत बसला पण ती घराबाहेर जाताच माझ्यावर उखडला," त्यादिवशी त्या भयकान्याले मामा म्हटलं तं बोंबलला अन इले मावशी काऊन म्हणायचं बे? प्रश्नाचं उत्तर तसं माझ्याजवळ नव्हतं. पण मी वेळ मारून नेण्यासाठी म्हणालो," अबे पुण्यात बाईले 'बाई' नसते म्हणत. मावशी म्हना लागते. बाईचा अर्थ वेगळा होते इथं!" त्यानंतर तो जे बोलला ते इथे सांगण्यासारखं नाही ! ही गोष्ट अधूनमधून मला आठवतंच असते. कारण पुण्यात आल्यापासून आमच्या भाषेचा आणि प्रांताचा उद्धार झाल्याशिवाय एकही दिवस जात नाही. पुढच्या लिखाणात "आम्ही" / "आमचं" वैगेरे शब्द जास्त आढळले तर आश्चर्य वाटू देऊ नका. हे दोन शब्द पुण्यात "मी" / माझं" च्या ऐवजी सर्वनाम म्हणून वापरण्यात येतात. इथेच खरी गम्मत आहे. एरवी चहासुद्धा कोणी शेयर करणार नाही पण "आमचं" वैगेरे शब्द हमखास वापरतील. असो. तर या उद्धार वैगेरे प्रकाराला आता आम्ही चांगलेच सरावलो आहोत. समोरच्याचा उद्धार करायला सुद्धा आता आम्ही मागेपुढे पाहत नाही. तसं वाद घालणं आम्हाला फारसं आवडत नाही. पण परप्रांतात गेल्यावर तिथली भाषा, चालीरीती शिकून घेतल्या पाहिजेत असं म्हणतात. या उद्देशाने पुण्यात आल्यावर आम्ही वाद घालणं शिकून घेतलं. आता वाद कोणत्याही विषयावर होऊ शकतो. आता हेच बघा ना, इथल्या लोकांना आमच्या प्रांताची ओळख म्हणजे "शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रांत" अशी आहे. आणि त्यांच्यासाठी तो चेष्टेचा विषय आहे. "आत्महत्या का करतात रे तुमच्या इथले शेतकरी?", कंपनीतल्या एका बाईंनी( मावशींनी असं वाचा!) मला विचारलं. मला वाटलं त्या गांभीर्याने विचारत असतील. मी म्हणालो," सतत दुष्काळ असतो तिकडे. पीक फारसं येत नाही. पिकलं तर भाव मिळत नाही. कर्जबाजारी होतात बिचारे. दुसरा काही पर्याय दिसत नाही त्यांना. मग करतात आत्महत्या" यावर त्या म्हणाल्या," पुण्यातही घर घेताना कर्जबाजारी व्हावे लागते. म्हणून काय सगळे आत्महत्या करतात का ? मूर्ख आहात तुम्ही लोकं! कधी बाहेरचं जग बघितलेलं नसते." उत्तरादाखल मी त्यांच्यासमोर एका कोऱ्या कागदावर महाराष्ट्राचा नकाशा काढला. आणि त्यांना म्हणालो, " तुम्ही खूप जग बघितलेलं दिसतंय. या नकाशावर पुणं सोडून इतर किमान दहा जिल्हे तरी दाखवा !" थोडा विचार केल्यावर त्यांनी मुंबई दाखवलं. बाकी वाद अजूनही सुरूच आहे. ह्यात त्यांची काहीच चूक नव्हती. कारण पुण्यातल्या लोकांना कधी नकाशा बघण्याची गरजच पडत नाही. त्यांच्या लेखी येरवड्याच्या पलीकडे मराठवाडा आणि हडपसरच्या पलीकडे दक्षिण भारत सुरु होतो ! त्यामुळे नकाशात कशाला पाहायचं? एका सदाशिवपेठी पुणेकराने तर मला सांगितले होते की , अलका चित्रपटगृहाचा चौक, स्वारगेट आणि शनिवारवाडा हे ३ शिरोबिंदू जोडून जो त्रिकोण तयार होतो तेच खरे पुणे. या त्रिकोणाच्या संदर्भात पुण्याच्या सीमारेषा म्हणजे मुठा नदी, लकडी पूल, टिळक रस्ता आणि शिवाजी रस्ता. मी त्यांना म्हटलं," काका ,या हिशोबानी तर पुणे महानगर पालिका भवन सुद्धा पुण्यात येत नाही मग पुण्याला खेडेगाव म्हणून घोषित करून टाका ना!" त्यादिवसापासून ते मला भेटलेच नाहीयेत. आता तुम्ही म्हणाल की पुण्यातले लोकं मुळातच संकुचित विचारांचे आहेत वगैरे वगैरे . पण म्हणतात ना , दिसतं तसं नसतं. संकुचित तर सोडाच पुण्यासारखी खुल्या दिलाची लोकं पृथ्वीच्या पाठीवर कुठेही सापडणार नाहीत. समोरच्याचा अपमान सुद्धा ते खुल्या दिलाने करतात. अपमान करताना मुक्तहस्ताने शब्दांचा वापर करणे तर पुण्यातच शिकावं. आता हेच बघा ना,समजा एखाद्या पुणेकराच्या घरासमोर तुम्ही गाडी पार्क केलीये. तर फक्त चाकातली हवा सोडून तो शांत बसणार नाही. गाडीवर एखादी चिट्ठी लिहून ठेवेल. " पुढल्यावेळी गाडी घरासमोर नव्हे तर समोरील मोकळ्या जागेत पार्क करा अन्यथा चाकातील हवा सोडून जागा मोकळी करण्यात येईल" पुण्यात आल्यावर आणखी काही गोष्टी शिकायला मिळाल्या. एक म्हणजे, विषय कोणताही असो त्याचा शेवट नेहमी "आम्ही" / "आमचं" असं करून स्वत:च कौतुक करून घेणे! जागतिक विषयसुद्धा हे लोकं वैयत्तीक पातळीवर आणू शकतात. उदा. काश्मीर सीमाप्रश्नावर जर चर्चा सुरु असेल तर शेवटी," म्हणूनच घर भाड्यानी देताना आम्ही लेखी करार करून घेतो. उद्या उठून भाडेकरयाने घरावर हक्क सांगायला नको." असं ऐकू येतं. दुसरी म्हणजे , स्वाभिमान या शब्दाच्या अर्थावर पुणेकरांच एकमत आहे. 'दुसर्याशी भांडताना कामात येतो तो स्वाभिमान'. याविषयी एका पुणेरी मित्राने मला सांगितलं होतं,"आम्हाला अन्याय सहन होत नाही रे. आणि तुम्हाला वाटतं आम्ही भांडतोय. जी गोष्ट आमची आहे त्यावर तुम्ही हक्क सांगू नका". आता ही चर्चा कंपनीत मी त्याच्या खुर्चीवर बसलो होतो यावरून सुरु होती. अन्यायाची इतकी व्यापक परिभाषा टिळकांना पण उमगली नसेल!! पुणेकरांच खाद्यप्रेम तर सर्वश्रुत आहेच. पण त्यातही स्वाभिमान डोकावू शकतो. उदा. आम्ही आणलेला आंबा हाच अस्सल हापूस आहे हे सिद्ध केल्याशिवाय त्यांना हापूस गोड लागतंच नाही. कुछ भी करनेका लेकिन इगो हर्ट नही करनेका हा संवाद पुणेरी पगडीतल्या सुपीक डोक्यातुनच आला असेल. काहीही असो. पण आमच्या दोन वेळच्या भाजी - भाकरीची सोय केलेल्या या पुण्यनगरी विषयी आम्हाला अतिशय आदर आहे. आता आम्ही राहतो तो भाग पुण्यात येतो की नाही किंवा भाकरी फक्त पुण्यातच कशी चांगली मिळते हे वादाचे विषय होऊ शकतात. पण त्यासाठी पुणेकर आहेतंच. तूर्तास भाकरी गोड मानून घेणे एवढेच आमच्या हातात आहे!

वाचने 36576 वाचनखूण प्रतिक्रिया 157

विजुभाऊ 12/03/2015 - 12:46
व्वा ! सुंदर लिखाण. शब्दाशब्दाशी सहमत. पुणेकराना संकुचित म्हणताना डिक्षनरी सुद्धा संकोचेल. रच्याकने तुम्ही ज्ञानप्रबोधनी समोरच्या त्रिवार " जिवाला खा " म्हणणार्‍या अनरसेंचे सामोसे खाल्लेत का कधी? एखाद्याला तीन तीन वेळा खा म्हणणारे पुणेकर संकुचित कसे हो? शंका : सामोसेवाले अनरसे "अनरसे" का बनवत नाहीत हो?

In reply to by विजुभाऊ

पुण्यातल्या कारकिर्दीत य वेळा या दुकानावरून जाऊन पण कधी खाणं जमलं नाही… प्रत्येक वेळी दुकानवाले जिवाच्या आकांतानी 'जिवाला खा' असं आग्रहानी ओरडायचे आणि गंमत वाटायची. पुढच्यावेळी पुण्याला गेल्यावर जिवाला खाण्यात येईल :) लेख सुन्दर. बाकी पुणेकर नसूनही पुण्यनगरी मला फार फार आवडते.

कैलासवासी सोन्याबापु 12/03/2015 - 12:55
त्यादिवशी त्या भयकान्याले मामा म्हटलं तं बोंबलला अन इले मावशी काऊन म्हणायचं बे? चिनार भाऊ , मले मायावाले ८ वर्ष आठोले पुण्यातले!!!! बापा काय काय नमूने भेटत एक एक!!! सादा मेस वाला बी सायचा उपकार केल्यावानी जेऊ घालत असे!!! मींन पैल्याच् दिवशी मेस मंदी भेंडी ची रस्सा भाजी खाऊन चिल्लवलो होतो थ्याच्यावरी म्हनले "सायचा शेमडात शिजोली का हे भाशी!!!!" बाकी थुमी कुकल्ड्ले हात?? म्या बी "तुमच्याच् एरियातला" हाव बहुतेक!!!

In reply to by चिनार

कैलासवासी सोन्याबापु 12/03/2015 - 13:57
चिनार भाऊ माया लायन्या काकाचे घर हाय न बापा उमरोती ले , आमचा बुडा बी एचव्हीपीएम् अन ताऊ चा पट्टशिष्य वह्य!!! लै पैले नमुन्यात घर होते इकले ते आमच्या आबाजीनं

In reply to by स्पा

कैलासवासी सोन्याबापु 12/03/2015 - 14:19
अहो स्पा अन्नाला नावे ठेऊ नये ह्या कायद्यात आचारी अन वाढप्यांस शिव्या देता येतील असली कायदेशीर पळवाट असते तीच वापरली !!! ते प्रकरण म्हणजे ओबड़धोबड़ चिरलेली भेंडी नावापुरती हिरवी मिर्ची अन चाळीस पन्नास मुठी साखर घालुन शिजवलेले गरगाट होते!!! आता काय सांगा अजुन!!! जौद्या एक लेखच लिहितो पुण्यातल्या मेस ह्या मामल्यावर

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

स्पा 12/03/2015 - 14:46
जौद्या एक लेखच लिहितो पुण्यातल्या मेस ह्या मामल्यावर
बाकी मेस हा स्वतंत्र PHD करण्याजोगा विषय आहे, पुण्याची असो व मुंबईची लिहा लौकर

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अहो खायच्या गोष्टी त्या … त्यात कसला प्रांत… प्रत्येकाची आपापली खासियत … बर एकतर ती मेस पुणेरी माणसाची कशावरून … म्हणजे तुम्ही म्हणाला तसे जे बाहेरून पुण्यात येउन पुणेरी झाले त्याचीही असू शकते … आणि दुसरे म्हणजे हल्ली पुण्याच्या चौका-चौकात दिसणाऱ्या खानदेशी खानावळीत पण असे संवाद ऐकू येतातच कि …. पुरणपोळी च्या नावाखाली फक्त पुरणच द्यायचे होते तर गोल थापायचा उपद्व्याव कशाला म्हणून

In reply to by कहर

कैलासवासी सोन्याबापु 12/03/2015 - 15:17
अहं ! अहो कहर मालक स्वतः पुण्याचे होते ! म्हणुन सांगितले ! भेंडी ची (जुन झालेल्या भेंडीच्या दाण्याची) आमटी मलाही माहिती आहेच पण ते निगुतीने करायचे प्रकरण झाले मेस मधल्या भुकेल्या पोरांवर करायचे प्रयोग नाही!! म्हणुन जास्त फील झालेले इतकेच

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

होबासराव 12/03/2015 - 17:30
उत्तरादाखल मी त्यांच्यासमोर एका कोऱ्या कागदावर महाराष्ट्राचा नकाशा काढला.. ह्याहिले अकोला म्हंजे धुळे जिल्ह्यात वाट्टे. अन सारा वर्हाड आन विदर्भ म्हन्जे फक्त नक्षल्याइचा भाग वाटते. (ते पानिपत म्ह्णतात ते पुण्यात कुठेशी आल हो :)) बाकि ते भयकान्याच्या ऐवजी भयताड जरा सुट होते ते पाह्यता काय ?

सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला) 12/03/2015 - 13:18
तसही हल्ली पुण्यामध्ये राहताना अस्सल पुणेकर लोकांशी संबंध कमीच येत असेल. बाहेरील लोकांचे प्रदूषण वाढले आहे ना :-) . पूर्वीच्या काळी ( २०-३० वर्षापूर्वी) असेल असे काही तरी पुणेरी स्वाभिमान वगैरे . सध्या लोक पोटापाण्यासाठी पुण्यामध्ये येतात ( जसे भैय्ये मुंबई मध्ये येतात ). दिवस भर काम करतात , मोल मध्ये शॉपिंग करतात ( हो सर्व स्तराममधले) , मल्टीप्लेक्स मध्ये पिक्चर बघतात . आणि इथे कुठेही अस्सल पुणेकर येत नाही :-)

In reply to by सांगलीचा भडंग (verified= न पडताळणी केलेला)

काळा पहाड 12/03/2015 - 13:52
आणि इथले जागांचे भाव पण वाढवतात, गाड्या वाकड्या तिकड्या चालवतात, कुठली तरी विचित्र भाषा बोलतात..

In reply to by काळा पहाड

कैलासवासी सोन्याबापु 12/03/2015 - 14:12
अहो पेठे बाहेर पडायची तयारी नसलेले लोक आहेत म्हणुन कंपन्या आम्हाला ऑफर लेटरे आमच्या (विदर्भातल्या बारेका) कैंपस मधे येऊ येऊ देऊन जातात!!! अन तसेही आम्हाला आदर अन प्रेम उपनगरीय पुण्याचेच जास्त!!! कारण आम्हाला आसरा संधी अन यश इथेच घावले!!! भाषेचे म्हणाल तर बोली भाषेला नाके मुरडून इंग्रज लोकांनी प्रमाणित केलेली भाषा हातच्या अनुस्वारांची खैरात करत शुद्ध शुद्ध म्हणुन नाके उडवत वरतुन "आजकाल मराठी चे दिवस गेले" असे आप्पा बळवंतात उसासे सोडणे असले प्रकार करणाऱ्यांस आम्ही सीरियसली घेत नाही, उरता उरला जागेचा प्रश्न तर मार्केट रेट ने घ्या आधी पूर्ण पुणे विकत!!! मग बघु जागा खाली करायचे!!! ताक :- हीच विचित्र भाषा असलेल्या प्रांतातुन आलेल्या वसंतराव देशपांडे, सुरेश भट, आनंद मोडक, महेश एलकुंचवार अन असल्याच किती तरी दिग्गज लोकांनी गाड्या वेड्यावाकड्या चालवत तथाकथित शुद्ध भाषा वापरत जागेचे भाव वाढवत पुण्याचे नाव रोशन केले!!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

काळा पहाड 12/03/2015 - 14:35
कंपन्या आम्हाला ऑफर लेटरे आमच्या (विदर्भातल्या बारेका) कैंपस मधे येऊ येऊ देऊन जातात!!!
एवढंच आहे तर तिकडे (विदर्भातल्या बरंका) एखाद्या कंपनीत ऑफर लेटरे घेवून चिटकायचं ना! यवढ्या लांब यायचा कशाला त्रास घेतला बरे? त्या दिग्गज लोकांना सांगायचं इथंपण एखादी कंपनी टाका म्हणून.

In reply to by काळा पहाड

कैलासवासी सोन्याबापु 12/03/2015 - 14:40
फुकाचे सल्ले देत "ह्या पुढे अनुयुद्ध टाळायाचा एकच उपाय" वगैरे आम्ही करत नसतो तो पुणेरी बाणा(?) आहे!! मिळेल तिथे भाकरी कमवणे हे सुलभ आहे त्यापेक्षा!! दुर जायला आम्ही घाबरत नाही ! असोच!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

चिनार 12/03/2015 - 14:49
सोन्याबापू , अहो थंड घ्या राजेहो. कायले पालथ्या घड्यावर पाणी ओतू राहिले ? बाकी मिळेल तिथे भाकरी कमवणे हे सुलभ आहे त्यापेक्षा!! दुर जायला आम्ही घाबरत नाही या वाक्याला सलाम !

In reply to by चिनार

कैलासवासी सोन्याबापु 12/03/2015 - 14:55
आपल्या इकळला उन्हाळा अन नसांतली तर्री "थंड" प्रकृती ची नाही रायते न भाऊ!! पर जाऊ द्या तुम्ही म्हनू राहिले त आपुन शांत राहु!!

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

काळा पहाड 12/03/2015 - 15:16
चला काडी टाकायचा परिणाम झाला. :) मी पुण्यातला आहे हे तुम्ही गृहीत धरलंय तर! बाकी पुण्याच्या, मुंबईच्या, कोल्हापूरच्या, मराठवाड्याच्या आणि विदर्भाच्या नसातली तर्री एकच असते. उगीच छाती बाहेर काढून चालू नका. मोठमोठे "गरम" प्रकृतीचे लोक आम्ही असले आम्ही तसले म्हटलं की हसायला येतं. गेले हो ते दिवस तलवारबाजी करायचे.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

अशी लेकरे स्वताच गाव भाकरी साठी सोडतील तर तिकडची परगती कोण करेल बे… मग "माया गावे शेतकरी मरते नि मी इथे ६०० km वर पश्चिम महराष्ट्रात भाकरी खात तयाचीच उनिधुनी काढते"

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पुण्यात बापाला वडील म्हणतात … बुढा नाही … आमच्याकडे बुढा म्हणजे म्हातारा … भाषेवर जाऊ नये

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

शेखरमोघे 14/03/2015 - 23:01
अप्पा बळवन्ताना पुण्याने कधीच हद्दपार करून टाकले आहे. आता सगळ्याना फक्त " ए बी सी" माहीत असते.

In reply to by काळा पहाड

रवीराज 12/03/2015 - 15:37
या कामात परप्रांतिय पुढे आहेत (हे मी पुण्याबाहेरच्यांना म्हणत नाही, महाराष्ट्राबाहेरच्यांना म्हणत आहे, उगा घोळ नको)

In reply to by रवीराज

ओ काय शिस्त वैगरे आहे का नाही? आता कुठे वामकुक्षीतनं जागे होतायेत लोक!! जरा चहा वैगरे होऊ द्या आणि मग या ते "जागे व्हा, जागे व्हा" करत.

In reply to by सूड

बॅटमॅन 12/03/2015 - 18:36
आँ? १ ते ४ च्या पुढेही पुणेरी वामकुक्षी असते हे माहिती नव्हतं. छ्या:! आमच्या वेळचं पौणेर्य राहिलं नाही.

In reply to by बॅटमॅन

सूड 12/03/2015 - 18:46
हो तर!! ही पुण्याबाहेरनं आलेली लोकं शांत झोपून कुठे देतायेत. म्हणून एकदीड तास मागे पुढे होतो एखादवेळेस.

मृत्युन्जय 12/03/2015 - 13:53
अपमान करताना मुक्तहस्ताने शब्दांचा वापर करणे तर पुण्यातच शिकावं. आं????? तुम्ही दगडुशेठ् गणपतीचे पुणेच म्हणताय ना किंवा शनिवारवाड्याचे पुणे? इथे किमान शब्दात कमाल अपमान करतात. शब्दांचा मुक्तहस्ताने वापर करणारे ते तुमचे पुणे कुठलेतरी वेगळे असावे.

गवि 12/03/2015 - 13:59
छान आहे लेख. बादवे..
दोन वेळच्या भाजी - भाकरीची सोय केलेल्या या पुण्यनगरी विषयी आम्हाला अतिशय आदर आहे.
भाजी भाकरी ? आम्ही तर ऐकलं होतं की शिक्रण, मटार उसळ वगैरे...

In reply to by गवि

मृत्युन्जय 12/03/2015 - 14:10
रोज दोन वेळ शिक्रण, मटार उसळ वगैरे????? काय कुबेराने खजिना वगैरे रीता केला की काय? श्रीमंती ओसंडुन वाहते आहे नुसती.

In reply to by मृत्युन्जय

काळा पहाड 12/03/2015 - 14:29
या यशस्वी टोमण्याबद्दल श्री. मृत्युन्जय यांचा प्राध्यापक येरकुंडकरांच्या हस्ते श्रीफळ आणि महावस्त्र देवून शनिवारवाड्यावर सत्कार करण्यात येत आहे.

In reply to by काळा पहाड

प्रोफेसर मृत्युन्जयांचा सत्कार म्हणजे साक्षात विद्वत्तेच्या सूर्याचा सत्कार. आजचा दिवस पुणे महानगराच्या इतिहासात जस्ती अक्षरांनी तरी लिहिला पाहिजे.

In reply to by काळा पहाड

मृत्युन्जय 12/03/2015 - 15:07
आमच्यात श्रीफळ आणि महावस्त्र असे लिहितात. आजकाल पुणेरी पगडी पण असते सत्कारासाठी, ती तेवढ्यापुरतीच उरली आहे आता.

In reply to by अत्रन्गि पाउस

काळा पहाड 12/03/2015 - 19:20
नवीन बंगलाच बांधलाय. "पश्चिमेकडचा वारा, पूर्वेचं ऊन, सगळं आटोम्याटीक" "वरवंटा पण डोक्यात पडायची सोय होतीय.. या बघायला एकदा.. मजा दाखवतो."

In reply to by चिनार

बदलाचा तपशील "संपादक मंडळ" या आयडीला किंवा संपादक मंडळापैकी कोणत्यातरी आयडीला / आयडींना व्यनि करा. किंवा बारीकसा बदल असेल तर इथेच सांगा.

In reply to by गवि

मृत्युन्जय 12/03/2015 - 15:36
आमच्याकडे मेक्सिकोवाडीचे टम्म फुगलेले रुचकर पॉपकॉर्न्स मिळतील (तसेच शेवया, उदबत्त्या, सागरगोटे आणि बारीक दातांच्या फण्या ऑर्डरनुसार रास्त दरात मिळतील) अशी पाटी लिहुन मी स्वतःच कारखाना टाकेन (आणि चालवेन) म्हणतो.

In reply to by मृत्युन्जय

लावाच!! पाचेक महिन्यातनं एकदा तरी हा विषय उचल खातोच. वाया म्हणून जायचं नाही काही. अगदीच नाही तर शाकाहारी-मांसाहारी, लग्नाळू-बिनलग्नाळू, स्त्रीसमानतावादी-द्वेष्टे, मध्यवर्ती-विनामध्यवर्ती ठिकाणे, काटाकिर्र बरी की मामलेदार, ब्राह्मण-ब्राह्मणेतर , सकच्छ-विकच्छ वस्त्रे यासारख्या कुठल्याही विषयावर सहज खप होईल.

In reply to by सूड

हाडक्या 12/03/2015 - 22:46
पुन्हा एखादा पॉपकॉर्नचा टब शोधणे आले.
मागच्या वेळेचा संपला का ? अवांतर : आणि ती टबवाली आहे ना, नै तर तिलाही शोधणे आले.. ;) (तुम्ही विवाहीत असाल तर हे अवांतर तुमच्या भावना दुखावणारे ठरु शकते तेव्हा त्या केसमध्ये अवांतरास इग्नोरणे)

In reply to by हाडक्या

मागच्या वेळचा मागच्या वेळच्या धाग्यावर. आता या धाग्यावर नवीन!! ;) टबवाली पण नवीन आली तरी चालेल. तुम्ही भारीच काळजी करताय ब्वॉ!!

कोकणी पुणेकर 12/03/2015 - 15:19
चिनार भाऊ पुण्यात जर बरीच वर्षे रहताय तर पुणेकरांबद्दल एखादा तरी चांगला अनुभव आला असेलच की, जरा तो पण सांगा.

In reply to by चिनार

कोकणी पुणेकर 12/03/2015 - 16:01
अरेरे.. मला वाटलं गावच्या मातीचा संस्कार विसरला नसाल. जाउद्या पुण्यातल्या प्रदुषणाचा फारच वाईट परीणाम झालेला दिसतोय तुमच्यावर.

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 12/03/2015 - 16:00
मिळेल तिथे भाकरी कमवणे हे सुलभ आहे त्यापेक्षा!! दुर जायला आम्ही घाबरत नाही ! असोच!!
हेच विदर्भातल्या शेतकर्‍यांना पण सांगा. थोड्यातरी आत्महत्या कमी होतील.
मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं
पाऊस पडल्यावर पाणी पडले विदर्भातच म्हणतात ना, अहो प्रत्येक भागाची एक बोलीभाषा असते त्याची टर उडवण्यापेक्षा ती आत्मसात केलेली बरी बाकी कोथरुड्मधे इतके विदर्भ मराठवाडा पब्लिक राहतय की पुढे-मागे विदर्भ वेगळा झालाच तर त्याला कोथरुडपण जोडुन टाका असा प्रस्ताव या धाग्याच्या निमित्ताने मी मांडतो

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

मोदक 12/03/2015 - 16:05
पाऊस पडल्यावर पाणी पडले विदर्भातच म्हणतात ना पाऊस पडला = पाणी आले (नळाला) पाणी आले = नळ आला बरोबर का?

In reply to by मोदक

चिनार 12/03/2015 - 16:41
बरोबर! या शब्दांचा खरा अर्थ विदर्भ -मराठवाड्यात राहिल्यावारच कळेल आणि नळातून पाणी येत असते यावरून विश्वास उडेल !

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

हेच विदर्भातल्या शेतकर्‍यांना पण सांगा. थोड्यातरी आत्महत्या कमी होतील. लेख वास्तववादी आहे हे यावरून सिद्ध झाले !

नाखु 12/03/2015 - 16:12
कढीला ऊत.. असो... शुभेच्छा. पिंचिंकर आम्चे येथे कशाचाही कशासही कसाही कोणताही बिनबुडाचा संबध लावून मिळेल. स्वरक्तवर्ण्सुशेभीत्भडास्विमोचन्रेचक्संग्रीहीत्कुठीत्ल्प्विचारस्वप्रेदश्दुराभिमानीइतरेजन्चाय्कम्पानीस्वप्नरंजन्रेचक केंद्र तर्फे.. आतून साफ तर बाहेरून साफ या योजनेअंतर्गत "ब्लाईंड फ्लु" निवारणार्थ प्रसारीत.

मृत्युन्जय 12/03/2015 - 16:48
४ तास आणी फक्त ५२ प्रतिसाद. ३ तासात ३९ आले होते. बघितले ना मी तासाभरापुर्वी. तासाला १३ हा आकडा तसा वाईट नाही पण पुणे या विषयाचा आवाका लक्षात घेता फारच कमी. कमॉन लोक्स धागाकर्त्याला असे निराश नका करु. हुकुमाचा एक्का वापरुनही जर त्यांच्या धाग्यावर प्रतिक्रिया नाही पडल्या तर त्यांचा किती मोठा हिरमोड होइल याचातरी जरा विचार करा.

In reply to by चिनार

रवीराज 12/03/2015 - 18:27
बाकी ते पुणे,पुणेरी,स्वाभिमान सगळे कसे व्यवस्थित जागेवर आहे, पण तुम्ही लोकांनी कुठे नेउन ठेवलाय महाराष्ट्र माझा.

जे.पी.मॉर्गन 12/03/2015 - 19:05
नेहेमीपेक्षा वेगळे मुद्दे आहेत हे पाहून बरं वाटलं! तेच तेच कौतुक नको वाटतं एरवी. (अट्टल पुणेकर) जे.पी.

हुप्प्या 12/03/2015 - 19:40
मराठीचा जाज्ज्वल्य अभिमान बाळगणार्‍या पुण्यात अर्धवट इंग्रजी व अर्धवट मराठी व अन्य सरमिसळ असणारी जागांची नावे इतकी लोकप्रिय का हे मला न उलगडलेले कोडे आहे. पेरूगेट, स्वारगेट, फूलगेट, म्हसोबा गेट. झालेच तर जिमखाना. लकडी पूल.

In reply to by हुप्प्या

सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला) 12/03/2015 - 19:49
+१ बिबवेवाडी, हिंजवडी, धनकवडी, वाकडेवाडी, खडकी, दापोडी, बोपोडी..... मुंबईत नावांचे वैविध्य मस्तच एक नाव दुसर्‍यासारखे नाही दादर, परळ, बोरीवली, मुलंड, भांडुप, घाटकोपर, जुहु, वांद्रा, सायन, अंधेरी, भायखळा...

In reply to by सौंदाळा (verified= न पडताळणी केलेला)

कपिलमुनी 12/03/2015 - 20:00
बोरीवली कांदीवली डोंबीवली चांदीवली आजच्यापुरते एवढे सामान्यज्ञान पुरे !

In reply to by कपिलमुनी

आजानुकर्ण 12/03/2015 - 20:07
आणि वर निव्वळ यमक साधण्यासाठी यडचाप मुंबैकर माऊंटमेरीचेही मोतमावली करतात

In reply to by आजानुकर्ण

तिमा 14/03/2015 - 10:42
यमकंच जुळवायची असतील तर धारावीचं 'धारावली' करा. म्हणजे एक वेगळंच चित्र उभं राहील. आम्ही मुंबईकर असल्यामुळे 'सात भिकार' म्हणायला तयारच आहोत. बाकी, पुणेकरांना डिवचणं पण एवढं सोपं नाही, हे लक्षांत आलंच असेल.

सिरुसेरि 13/03/2015 - 12:02
आत्ता खरी गरज आहे ती विदर्भ /ग्रामिण भागातील आत्महत्याग्रस्त/ प्रवुत्त शेतकरयांच्या मदतीला धावून जाण्याची . त्यासाठी शहरांचा /पुण्या/मुंबइचा मोह तात्पुरता बाजुला ठेवला पाहिजे .

In reply to by सिरुसेरि

ती विदर्भ /ग्रामिण भागातील आत्महत्याग्रस्त/ प्रवुत्त शेतकरयांच्या मदतीला धावून जाण्याची
म्हणजे नक्की काय करायचं ओक काका?