Skip to main content

क्लिकक्लिकाट !

लेखक चिनार यांनी सोमवार, 02/03/2015 या दिवशी प्रकाशित केले.
नवरा- बायको रम्य अश्या एखाद्या हिल स्टेशन वर आलेले आहेत. छानशी संध्याकाळ झालेली आहे . गार वारा घोंगावतोय. निसर्ग सौंदर्य अगदी दृष्ट लागण्याइतकं मनमोहक आहे. इतक्या रम्य वातावरणामुळे असेल कदाचित पण नवऱ्याला कधी नव्हे ती बायको सुंदर दिसतेय. अशातच त्याला 'आज मौसम बडा बेईमान हैं' गुणगुणाव वाटतंय. तेवढ्यात ती म्हणते," चल ना फोटो काढू " पुढची पूर्ण संध्याकाळ तो तिचे, स्वत: चे ,त्यांचे फोटो काढतोय. त्या दोघांनी केलेली बेईमानी सहन न होऊन मौसम निसर्गाशी ईमान राखून शांत झालेला आहे ! वरील प्रसंग ओळखीचा वाटतोय का ? या सारखे कितीतरी प्रसंग आजकाल तुम्ही आसपास बघत असाल. आता हेच बघा ना, लग्न लागल्यावर सगळ्यांना वधु - वरांसोबत फोटो काढायचा असतो. ग्रुप फोटोसाठी आधे इधर -आधे उधर असं करून पंधराजण फोटोसाठी वधु-वराजवळ उभे राहतात. समोर मुख्य फोटोग्राफर चा कॅमेरा, घरातला एक कॅमेरा, एका नातेवाईकाने नविनच घेतलेला अत्याधुनिक कॅमेरा, दोन -तीन मोबाईल कॅमेरे असे जवळपास ६-७ कॅमेरे असतात. फोटो निघतो. सगळ्यांना अगदी भरून पावल्यासारखं होतं. फोटोसुद्धा अगदी आरशात बघितल्यासारखा स्वच्छ येतो. फक्त एवढंच होते की फोटोतला प्रत्येकजण वेगवेगळ्या कॅमेराकडे बघत असतो ! किंवा एखाद्या मित्राच्या मुलाचा वाढदिवस असतो. नातेवाईक, मित्र, बालगोपाळ केक भोवती जमतात. तेवढ्यात केकचे फोटो काढण्याची सूचना येते. मोठमोठे मोबाईल खिशातून बाहेर येतात. वेगवेगळ्या कोनातून केकचे फोटो निघतात. मुलगा- आई, मुलगा-बाबा, आई-बाबा, आई-बाबा-मुलगा, मुलगा-केक, आई-बाबा-मुलगा-केक अश्या शक्य असलेल्या सगळ्या जोड्यांचे फोटो निघतात. मग केक कापल्यावर आई मुलाला केक भरवताना, बाबा मुलाला केक भरवताना, आई -बाबा एकमेकांना भरवताना असे फोटो होतात. सगळ्या पाहुण्यांना अगदी अपूर्व सोहळा पाहिल्याचा आनंद होतो. इथपर्यन्त ठीक आहे पण याच्या अगदी विरोधी फोटो सुद्धा तुम्ही सोशल मेडिया वर बघितले असतीलच. रस्त्यावर अपघात होतो. बसने मोटरसायकलला धडक दिलेली असते . मोटरसायकलस्वार जखमेने विव्हळत असतो. काही लोक त्याची गाडी उचलतात, काही त्याला धीर देतात, काही त्याच्या घरी संपर्क करतात, काही नुसतेच बघ्याच्या भूमिकेत असतात.आणि काहीजण खिशातला फोन काढून त्या दृश्याचे फोटो काढतात ! फोटो काढण्याची आणि काढून घेण्याची चढाओढ सुरु झाली आहे. लहानपणी बगीच्यात गेल्यावर पाळण्यावर बसण्यासाठी भलीमोठी रांग असायची. तशी रांग आतासुद्धा असते. पण ती बसून झुलण्यासाठी नाही तर बसून फोटो काढण्यासाठी! बरं, एक फोटो काढून समाधान होत नाही, १५-२० फोटो हवे असतात. मग हाती डीजीकॅम घेतलेले उत्साही नवरे किंवा बाप वेगवेगळ्या कोनातून फोटो काढतात. प्रत्येक माणसात कुठेतरी एक कलाकार दडला असतो असं म्हणतात. डीजीकॅम हातात आल्यावर बऱ्याच लोकांमध्ये 'आपल्यातला कलाकार सापडलाय' अशी भावना बळावत असावी. खरं म्हणजे फोटोग्राफी मध्ये झालेल्या तांत्रिक क्रांतीमुळे या नवक्रांतीकारक फोटोग्राफर्सचा जन्म झालाय. आधी ३६ फोटोंची रीळ वर्षभर पुरवावी लागायची. डिजिटल कॅमेरे आल्यापासून रीळ वैगेरे भानगड उरलीच नाही. एका तासात ३६ फोटो काढायचे. त्यातले २-३ तरी बरे येतातच ! वाट्टेल त्या गोष्टींचे फोटो काढत सुटतात. घरातल्या गॅलरीतून बाहेर उडणाऱ्या पक्षांचे फोटो. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी ! घरातल्या पंख्याचा फोटो. मोशन फोटोग्राफी ! कपात स्थिर झालेल्या चहाचा फोटो. स्टिल फोटोग्राफी ! मस्ती करणाऱ्या स्वत:च्या मुलांचा फोटो. कॅन्डीड फोटोग्राफी ! (माझ्या तीन वर्षाच्या पुतण्याचे हजाराच्या वर फोटो असतील ! माझ्या लहानपणी फोटो काढताना आमच्यासारख्या चिल्ल्यापिल्ल्यांना दूरच ठेवायचे. एखाद्या ग्रुप फोटो मध्ये कोणाच्यातरी कडेवर किंवा खाली जमिनीवर आम्ही बसायचो. किंवा उत्साहाच्या भरात एखाद्या फोटोत कुठूनतरी कोपरयातून डोकं बाहेर काढून आपली हौस भागवून न्यायची. पूर्ण देह दिसेल असे तर फारच कमी फोटो असतील.) पण या सगळ्यात त्या बिचाऱ्या फोटोग्राफरचे फोटो कोणीच काढत नाही. तो स्वत: मोठ्या ऐटीने कॅमेराची किंमत, फीचर्स सगळ्यांना सांगतो. कॅमेराचा कौतुक सोहळा पार पडतो. प्रत्येकजण आपापले फोटो काढून घेतो. त्याचे फोटो काढायला कोणीच उरत नाही. (म्हणूनच मी ठरवलंय आयुष्यात कधी कॅमेरा घ्यायचा नाही. खिशातले पैसे खर्च करून लोकांचे फोटो काढण्याचे धंदे सांगितले कोणी ?) स्वत: चे फोटो काढण्यातली गोची लक्षात आल्यावर एक नवीन प्रकार उदयास आला. सेल्फी !! स्वत: चे फोटो स्वत: काढणे. सेल्फीचं तांत्रिक नाव बहुधा 'उठसूट फोटोग्राफी' असं असावं. कारण सेल्फी काढायला कुठलही कारण किंवा प्रसंग असावा लागत नाही. मनात आलं की मोबाइल हातभर लांब धरायचा आणि क्लिक ! बसमधून फिरताना, जेवतांना,व्यायाम करतांना, पुस्तक वाचतांना सेल्फी कधीही काढता येतो. म्हणूनच सेल्फी काढताना माणसाने कितीही लपवलं तरी फोटोत 'आपण बावळटपणा करतोय' हे भाव दिसल्याशिवाय राहत नाही. जसं फ्लॅशमूळे काही लोकांचे डोळे मिटतात तसं सेल्फी काढताना त्यांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक येते. ती चमक म्हणजेच मेंदूने पाठवलेला 'काय बावळटपणा लावलाय' असा संदेश असतो. फोटोग्राफी ही जर कला असेल तर सेल्फी हे त्या कलेचं विडंबनचं म्हणावं लागेल. खरं म्हणजे कॅमेरा हा मानवी इतिहासात लागलेला एक विलक्षण शोध आहे. घडलेला एखादा प्रसंग कैद करून ठेवता येणे म्हणजे विज्ञानाची देणगीच म्हणावी लागेल. पण इथेच थोडीशी गल्लत झालीये. विज्ञानाची देणगी ही घडणारा प्रत्येक क्षण नव्हे तर 'एखादा' प्रसंग कैद करून ठेवण्यासाठी आहे.कारण घडणारे प्रसंग हे आठवणीत ठेवण्यासाठी असतात, "गॅलरीत" ठेवण्यासाठी नाही ! त्यासाठीच ईश्वराने डोळ्यांसारखा कॅमेरा निर्माण केलाय. ज्याद्वारे असंख्य क्षण स्मृतीच्या गॅलरीत साठवले जातात. आणि स्मृतीपटलावर हवे तेंव्हा बघता येतात.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4347
प्रतिक्रिया 22

प्रतिक्रिया

लोक का एवढ फोटो काढत बसतात काय महित. माझया बर्‍याच मित्रांना खूप आवड आहे याची. संगणक भर्लेत त्यांचे फोटो साठवून, बर निसर्गासौंदर्य बघायला गेलो तर ते सोडून राहा लायनीत उभे आणि दाबा .बटन, कूठे गरम गरम भजी खायला म्हणून बसलो की हान फोटो त भजी गार होतं पण यांचे फोटो काढूनच पोट भरलेले असते. मी तर माझया लग्नात ही फोटोग्राफर ठेवला नव्हता . हिच्याकडचा होता त्याला आदल्या दिवशीच सांगितले बाबा रे कुणाचे डोळे मितूने नाही तर हात कापुदे परत फ्लॅश मारायचा नाही म्हणजे नाही,पटापट उरकायच. एक कला म्हणून सौंदर्यस्तळांचे (सर्व प्रकारचे)फोटो काढण्यास काही हरकत नसवि. बर्‍याचदा नुसत्या डोळ्यांना ठीक. ठाक वाटणारी गोष्ट फोटोत खुलून दिसते,त्यात फोटोग्राफर चे कौशल्य अप्रतिम असते.

त्यासाठीच ईश्वराने डोळ्यांसारखा कॅमेरा निर्माण केलाय. ज्याद्वारे असंख्य क्षण स्मृतीच्या गॅलरीत साठवले जातात. आणि स्मृतीपटलावर हवे तेंव्हा बघता येतात. व्वा!! गेले १५ दिवस हाच अनुभव घेतोय.

आजच आमच्या मित्राने एक फोटो पाठवलेला. राजाराम पुलाजवळ म्हणे बाँबची अफवा होती. त्या नसलेल्या बाँबचे फोटो काढणार्‍यांची ही गर्दी पुलाच्या दोन्ही बाजूंना....(हा आमचा मित्र त्यातला एक नक्कीच नव्हता कारण त्याचा फोकस पब्लिकवर होता हे अगदी स्पष्टच होते.)

अगदी ओळखीचा आहे! असे लोक तो मौसम घरी जाउन फोटोमधूनच बघत असतील.

लेखनाच्या आशयाशी सहमत असलो तरी माझे वर्तन (किमान पर्यटनाच्या वेळी) याविरुद्ध गणता येईल.

नाय हो ! मनातली चित्रं वेळ जातो तशी विरायला लागतात. मग बायकोने "सांगा बघू तेव्हा मी कोणत्या रंगाचा ड्रेस घातला होता ?" असं विचारलं की विकेट जाते (हसण्यावर निभावलं तर ठीक, नायतर पुढे अजून भुर्दंड बसतो !). खूप भटकण्याची सवय असली तर मग काही वर्षांनी जागांची नावे आणि बारकावे पण पटकन आठवत नाहीत तर वर्णन दूरच ! त्यामुळे आम्ही जिकडे तिकडे सज्जड फोटो काढतो. सद्याच्या डिजीटल कॅमेर्‍याच्या कृपेने नंतर नको असलेली प्रकाशचित्रे विनाखर्च काढून टाकता येतात त्यामुळे ते परवडेबलही झाले आहे ! :) शिवाय कोणी हुशार माणसाने म्हटले आहेच की, "एक चित्र हजार शब्दांचे काम करते !" ;)

In reply to by डॉ सुहास म्हात्रे

याला सहमत.... फोटो तर खच्चून काढतोच....!! (अजून तरी एकाच मेमरी स्टीकवर भागतंय..आता लवकरच दोन स्टीका घेऊन फिरणार.)

In reply to by असंका

४, ८, १६ आणि ३२ जीबी च्या मेमरी "ष्टीका" मिळतात हल्ली... योग्य ताकदीची घेतली तर १५-३० दिवसांना एकच पुरून उरते ! जुनी आणीबाणीसाठी राखीव ठेवा. :)

In reply to by असंका

आताच बघितले तर फ्लिपकार्टवर सोनीची मेमरी स्टीक प्रो ड्युओ ३२ जीबी, रु ४४९५ ला (आणि गम्मत म्हणजे १६ जीबी त्यापेक्षा महाग रु ४७८३ ला !). मी तर कॅमेर्‍यात ३२ आणि मोबाईलमध्ये ६४ (जी एका स्कीममध्ये ३००० पेक्षा कमीला मिळाली) ठेवलेय. काय बिशाद की एखादा क्षण मेमरी कमी पडली म्हणून निसटून जाईल ;)

जरा विचार करायला लावणारा आहे हे खरयं, तरीही खासप्रसंगी (लग्न्-बारसे-सहल्-समारंभ) आणी 'उठसूट फोटोग्राफी' एकाच तागड्यात ठेवून केलेला समारोप अन्यायकारक आहे. अगदी कृ-ध- फोटो पाहून स्मृतीपट उलगडून कमी वेळात हरवलेल्या क्षणांची (व्यक्तींचीही) पुनर्भेट करता येते.

चांगला लेख आहे. खर सांगायच तर आपण एखाद्या ठिकाणी निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी गेलो की प्रत्यक्ष निसर्गसौंदर्य कमी बघून जास्त कॅमेर्‍याच्याच डोळ्यातून पाहीले जाते. म्हणून हल्ली आधी मी पुर्ण निसर्गातील सौंदर्याचे निरिक्षण करते मग फोटो काढते.

मोबाइल क्रांतीचा जादा पैलू आहे हा ! वाढदिवस नसून फोटो सेशन आहे असं वाटतं ! निसर्गसौदर्याचा आस्वाद घेण्याऐवजी फोटोग्राफीची हौस भागवायला लोक सहलीला जातात, असं वाटतं. कहर म्हणजे ते फोटो पाठवून इतरांना पण छळ छळ छळतात !

फोटोग्राफर मध्ये "एस एल आर वाले फोटूग्राफर" ही एक नवीन जमात उदयास आली आहे. थोडा बरा जॉब लागला , थोडे पैसे हाती खेळू लागले की काहीजण महागडा एस एल आर कॅमेरा , लेन्स घेतात .. आणि फेसबुकवर aniruddha_joshi_photography किंवा Ruddhas_Angle अशी पाने तयार करतात . या पानांवर आणि स्वतच्या फेसबुक भितीवर हे खोर्‍याने , ढिगाने , पोत्याने , ट्रकाने फोटो ओततात आणि सर्व मित्रांना टॅग करतात . या नवछायाचित्रकारांचे काही पेटंट फोटो असतात मांजराचा क्लोजअप , एखाद्या गरीब वृद्धाचा दाढी वाढलेला क्लोजअप फोटो , समुद्रकिनारी सुर्यास्ताचा फोटो , २- ३ पक्षांचे फोटो एखादा उगीच काढलेला अ‍ॅब्स्त्रॅक्ट आणि मुख्य फोटो म्हणजे डोळ्याला कॅमेरा लावलेला असतानाचा स्वतःचा फोटो .. हा फार महत्वाचा ! कारण याशिवाय तो फोटो ग्राफर आहे हे कळत नाही म्हणून हा हवाच ! प्रत्येक क्षण उपभोगायच्य ऐवजी हे जिथे तिथे कॅमेरा घेउन लुडबुड करत असतात . बटबटीत वॉटरमार्क्स आणि जिलब्या पाडायसारखे काढलेले फोटो असे हे एस एल आर वाले फोटूग्राफर ! वाचव रे देवा !!

In reply to by कपिलमुनी

मागे एक फोटो आंतरजालावर फिरत होता एका माणसाच्या खांद्यावर बसून एक माकड क्यामेरा मधून बघत होता . खाली लिहिलं होतं "Every monkey with SLR camera thinks he is a photographer!"