Skip to main content

निरंजनाची कविता

लेखक यशोधरा यांनी रविवार, 28/12/2014 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
झोप येईना येईना, कविता सुचली निरंजना | शब्दापुढे रचणे शब्द, हाचि लागला तया नाद| निरंजनाचा कपडा भगवा, आत निरंजन रे नागवा || कौतुक, स्तुती, वाद- विवाद, उपेक्षा आणि अपेक्षा ह्याहीपलिकडे जाणार्‍या शाश्वत परिमाणाशी नातं जोडू शकणारी रॉय किणीकरांची कविता. गहिर्‍या चिंतनशीलतेशी नातं सांगणारी, अचूक मोजक्या शब्दांच्या सहाय्याने विलक्षण असा कायमस्वरुपी असर मनावर टाकणारी आणि मनाला चुटपूट लावणारी. काही उमजलं आहे, समजलं आहे ही जाणीव होता होता, पार्‍यासारखा निसटून गेला, अशा अर्थांची काहीशी अनुभूती देणारी. गूढ आणि तितकीच मोहिनी घालणारी समर्थ शब्दकळा ल्यायलेली, पण काहीशी अस्थिर वाटणारी. वाचता, वाचता प्रत्येक शब्दामागे अस्वस्थ करुन सोडणारी. तिच्याकडे आयुष्याची एक कणवयुक्त, समंजस अशी समज आहे. अबोल अशी सहनशीलता आहे, तिला ठाऊक आहे की, हा मार्ग कठीण पण आहे रे कनवाळू जरी पायाखाली रुते जराशी वाळू.. एक भंगलेपणाचा, उध्वस्त, तरीही खानदानी असा भाव आपल्या सभोवताली लपेटून आपल्याच नादात शब्दांच्या आधाराने वावरणारी, आणि शब्दांच्या पलिकडे काही अव्यक्त खेद, रुखरुख उराशी जपणारी ही कविता. काजळरेखेवर लिहिले गेले काही मौनाची फुटली अधरावरती शाई.. खेद, विषाद आणि त्यातूनही कधीतरी हळूच डोकावणारा, आयुष्यासंबंधीच्या प्रगल्भ आणि मनस्वी अशा चिंतनातून निर्माण झालेला, स्नेहशील, तरीही थोड्याश्या उदासपणाची झालर असलेला असा मिश्किल भाव ल्यायलेली अशी ही कविता. जीवनातल्या विसंगतींवर, मानभावीपणावर आणि एकूणच आयुष्याच्या क्षणभंगुरतेवर एक प्रकारच्या उदासीन आणि अलिप्त वृत्तीने भाष्य करणारी. कशाला काही शोधायचे? तिला कसलीच अपेक्षा नाही, आशा नाही. सारे काही शेवटी लय पावणार आहे ह्याची एक पक्की खूणगाठ तिने बांधली आहे, पण तरीही, तिच्या वेदनेमध्येच तिच्या बेहोषीची धुंदीदेखील तिने जपली आहे. बघ चाफा सुकला मावळला तो गंध दे सोडून वेड्या शोधायाचा छंद.. ह्या कविता म्हणजे जणू विविध रंगाचे फटकारे. कधी जमलेले, कधी विस्कटलेले, पण तरीही अंगभूत सौंदर्यामुळे ल़क्ष वेधून घेणारे. एकटेपणाची, मृत्यूची जाणीव झालेली, व्यवहारी मानभावीपणाचा उबग आलेली आणि त्या अनुभवांबद्दल कडवट भाष्य करणारी ही कविता. आयुष्य जगताना आलेल्या अनुभवांतून, पाहिलेल्या विसंगती आणि सर्वच बर्‍या वाईट अनुभवांच्या जाणिवा सोबतीला घेऊन आपल्या आयुष्याचा जमाखर्च शब्दकळेतून मांडायला बसलेली आणि तरीही 'लिहिशील किती रे, स्पंदनक्षण श्वासांचे' हे भान बाळगणारीदेखील हीच कविता. तिला मौनाचे सौंदर्य उमजले आहे, मौनातले अर्थ ती उमगून गेली आहे आणि शब्दांचे क्षणभंगुरत्वदेखील. अर्थाला असते बंधन का शब्दांचे कोसळून पडले इमले अक्षरतेचे.. कधीकधी उत्तररात्र वाचताना वाटते, तत्वज्ञान, विज्ञान वा अजून काही, ही कविता काय शोधते आहे? जीवनाचा अर्थ? स्वतःचे अस्तित्व? हरवलेले, शाश्वत असे- निदान तसे भासणारे तरी, प्रेम? गर्दीतही आपला एकलेपणा जपणारी आणि एका विलक्षण धुंदीत त्या एकलेपणाचे सतत राखलेले भान मिरवणारी ही कविता. तिचे प्रेमही असेच आधे- अधुरे, धुंद आहे! सापडता, सापडता कधीतरी हरवलेले, हाती येता येता सुटलेले आणि एका वळणावर जणू मनातल्या सर्व मुलायम, मृदू भावना, संवेदना जपत तसेच गोंधळून दिशाहीन भिरभिरलेले... हाती गवसले नसले तरी तिचे प्रेमाशी राखलेले इमान सुटलेले नाही. जे दिसते नसूनी, असूनी दिसले नाही, अंगाई गाते दिक्कालाची आई.. असे सारे मनातले व्यापताप सहन करुनही मस्त कलंदर असणारी ही कविता. तिच्यापाशी भोग आहे, त्यागही आहे. आसक्तीही आहे आणि वैराग्यही आहे. असह्य अविनाशी वेदनाही आहे आणि समंजस वृत्तीने आलेली निवृत्त वृत्तीही आहे. आता तिला कसलीच वांछा उरलेली नाही. तिच्या मनाची वेदना कोणालाच समजू शकत नाही हे तिचे आर्त तिने आता पक्के स्वीकारुन आपल्या मनाशीच बांधून घेतले आहे. तिचे आयुष्य जगली आहे, तिचे लढे तिने पेलले आहेत आणि पराभवही स्वीकारून पचवले आहेत. आता तिला लागले आहेत ते परतीचे वेध, पण तिची तक्रार नाही, सारे हलाहल पचवूनही आयुष्याच्या सुंदरतेवर तिचा चिरविश्वास आहे, लोभ आहे. तिचे शेवटचे मागणेही अबोल. आर्जवी. आता मिटायचे तर आहे, पण कसे? ये मिटूनी जाऊ दंश जोवरी ओला, मृद्गंध पांघरुन घेऊ चंद्र उशाला.. इतकी स्वप्नवत चिरनिद्रा भंग करण्याचे धारिष्ट्य कोणीही करु नये... साहित्य संस्कृतीच्या ऑक्टोबर- नोव्हेंबर २०१४ च्या अंकात पूर्वप्रकाशित. काही फेरफारांसह.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 13189
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

रॉय किणीकरांची कविता वाचली नाही. पण अतिशय सुंदर अशी ओळख आपण करुन दिली. उच्च लिहिलंय. अजुन काही कविता डकवत्या आल्या असत्या तर, असेही वाटून गेले. पण हेही वाटून गेलं - अर्थाला असते बंधन का शब्दांचे कोसळून पडले इमले अक्षरतेचे.. बघ चाफा सुकला मावळला तो गंध दे सोडून वेड्या शोधायाचा छंद.. अहाहा. क्लास. आता उत्तररात्र वाचलं पाहिजे. धन्स. -दिलीप बिरुटे

किणीकरांची कविता वाचली आहे. तू म्हणतेस तशी पार्‍यासारखा अर्थ हातात येता येता निसटून जातो खरा. पण त्याहीपेक्षा मला त्यांची कविता वाचताना सारखं, एखादी खानदानी स्त्री आत्मसन्मान जपण्यासाठी उरातले शल्य अबोलपणे उरात दडवून स्मित चेहर्‍यावर वागवत वावरते ना तशी वाटते. कोणतातरी मुखवटा घातल्यासारखी. कळतं की जे दिसतं ते खरं नाही आणि खरं आहे ते दिसत नाही. ही आपली माझी समज.. तू खूप छान लिहिलंयस गं. :)

In reply to by मितान

मितान, हे बघ. काहीसं तसंच.
एक भंगलेपणाचा, उद्धवस्त, तरीही खानदानी असा भाव आपल्या सभोवताली लपेटून आपल्याच नादात शब्दांच्या आधाराने वावरणारी, आणि शब्दांच्या पलिकडे काही अव्यक्त खेद, रुखरुख उराशी जपणारी ही कविता.

यशो: फार आवडलं रसग्रहण. "समजलं आहे ही जाणीव होता होता, पार्‍यासारखा निसटून गेला, अशा अर्थांची काहीशी अनुभूती देणारी. गूढ आणि तितकीच मोहिनी घालणारी समर्थ शब्दकळा ल्यायलेली, पण काहीशी अस्थिर वाटणारी. वाचता, वाचता प्रत्येक शब्दामागे अस्वस्थ करुन सोडणारी." हे अगदी चपखल वर्णन आहे. काजळरेखेवर लिहिले गेले काही मौनाची फुटली अधरावरती शाई.. वा! हे वाचून किणीकरांचं आणखी लिखाण वाचलं पाहिजे असं वाटलं. ही कविता मला खूप गेय वाटली, म्हणून हे गाणं म्हणून कुठे उपलब्ध आहे का ते शोधलं पण चटकन काही सापडलं नाही, कुणाला मिळालं तर कृपया द्या. त्या शोधात एक यूट्यूबवरचा ५ भागांचा खजिना सापडला; यात त्यांच्या काव्यवाचनाबरोबरच काही कविता हार्मोनियमच्या साथीत गायलेल्या दिसताहेत (निर्मिती अनिल आणि मीना किणीकरांची आहे, वाचन आणि गाणं त्यांच्या स्वरांत आहे की नाही, ते कळलं नाही), यात ही कविता आहे का ते सर्व भाग ऐकून शोधेन. तोपर्यंत इथल्या वाचकांसाठी: भाग १ भाग २ भाग ३ भाग ४ भाग ५

In reply to by बहुगुणी

बहुगुणीजी, क्या बात है! ५ भाग ऐकायची पर्वणी! हे माहित नव्हते मला. नक्की ऐकते. मनापासून आभार ह्यासाठी :)

रॉय किणीकर हे एक अवलिया व्यक्तीमत्व होते. पुलं नी त्यांच्या " व्यक्तीआणि वल्ली" च्या नव्या आवृत्तीत "तो " या नावाने त्यांच्यावर लिहीलय. रॉयकिणीकरानी केवळ चहा किंवा जेवण किंवा तत्सम बिदागीवर बर्‍याचजणांसाठी घोस्ट रायटिंग केले आहे.

अचूक!
गहिर्‍या चिंतनशीलतेशी नातं सांगणारी, अचूक मोजक्या शब्दांच्या सहाय्याने विलक्षण असा कायमस्वरुपी असर मनावर टाकणारी आणि मनाला चुटपूट लावणारी. काही उमजलं आहे, समजलं आहे ही जाणीव होता होता, पार्‍यासारखा निसटून गेला, अशा अर्थांची काहीशी अनुभूती देणारी. गूढ आणि तितकीच मोहिनी घालणारी समर्थ शब्दकळा ल्यायलेली, पण काहीशी अस्थिर वाटणारी. वाचता, वाचता प्रत्येक शब्दामागे अस्वस्थ करुन सोडणारी. तिच्याकडे आयुष्याची एक कणवयुक्त, समंजस अशी समज आहे. अबोल अशी सहनशीलता आहे,

उत्तम! रसग्रहण आवडले. रॉय किणीकर यांचं व्यक्तिमत्व त्यांच्या कवितेप्रमाणेच गूढ होतं.

खूपच तरलतेने लिहिलंय!

शोधुन वाचावं अशी उर्मी जाणवली वाचताना. खर तर तू आणि मितान ने एक के कविता उलगडली तरी चालेलं अस समग्र लिहीण्याऐवजी.

किणीकरांच्या उत्तररात्रीतल्या रुबाया सलग दोन तीन दिवस वाचत राहिल्या की एक वेगळाच अनुभव येतो.अस्वस्थ,गहिरा.त्या कवितांमध्ये शिरल्यासारखा.मध्येच एखादी नव्याने अर्थ सांगुन जाते.अवघड काम यशो.तू अतिशय सुंदर रसग्रहण केलं आहेस.तुझ्याबरोबर उत्तररात्र घेऊन बसलं पाहिजे एकदा!

सर्व प्रतिसादकांचे आणि वाचकांचे मनापासून आभार. ज्यांनी उत्तररात्र वाचलं आहे, त्यांना उत्तररात्रीची भूल ठाऊकच आहे. ज्यांनी वाचलेलं नाही, त्यांनी जरुर वाचावं, अशी विनंती.

अतिशय सुंदर ! उत्तररात्र वाचायलाच पाहिजे. धन्यवाद या ओळखीसाठी !

सुरेख लेख! किणीकरांवरच्या स्मृतिलेखांचं एक संकलन मागे वाचलं होतं; त्यातून अतिशय हलाखीत जगावं लागूनही नेहमीच्या वागण्यात त्याची कटुता उमटू न देणार्‍या, ह्या आयुष्याचा वैय्यर्थ जाणवूनही 'लावून मुखवटे नवा खेळ चल लावू' म्हणण्याचा उत्साह टिकून असलेल्या कवीचं चित्र त्यातून डोळ्यासमोर उभं राहिलं होतं. या लेखात म्हटल्याप्रमाणे त्यांची कविताही त्याच मनोभूमिकेशी नातं सांगणारी.

नेहमीसारखंच सुंदर लिहिलंय. रॉय किणीकर अजून वाचले नाहीत. आता वाचायला हवे असे वाटत आहे.