मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

मिपाकराशी भेटताना....

अमितसांगली · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
'दोस्त फेल होता है तो दुख होता है, लेकिन जब वो फर्स्ट आता है तो और दुख होता है' असच काहीतरी माझ्या बाबतीत घडत होत. मग त्यातून सुरु झाला सुख,समाधान,अपेक्षा,मागण्या,स्वार्थी मदत,निस्वार्थी मदत यासारख्या शब्दांचा खेळ. पण कळत नकळत भातुकलीच्या या खेळाचे प्रचंड यातनांमध्ये कधी रुपांतर झाले व अपेक्षांच्या ओझ्याची तलवार कधी मानेवर ठेवली ते कळलेच नाही. लहानपणापासून समाजसेवा,संशोधन असले विचार डोक्यात होते. शिक्षण चालू असेपर्यंत त्या दृष्टीने प्रयत्नही करीत होतो. पण नोकरी लागली आणि प्रत्यक्षात GLAMOR या शब्दाचेच आकर्षण वाटू लागले. पैसा येऊ लागला,वाढू लागला पण त्याचबरोबर राहणीमान बदलले. गरजा वाढल्या,त्या भागविण्यासाठी पैसा कमी पडू लागला. तो अजून कसा वाढविता येईल याचा विचार करू लागलो. त्यात कमी पडू लागलो कि काटकसर करू लागलो पण मनाची घुसमट तर होतच होती. आपणच कुठेतरी कमी पडतोय असा समाज करून घेऊ लागलो आणि स्वतालाच कोसू लागलो. इंजिनिअरींगला असताना वाटायचे कोणीतरी महिन्याला २००-३०० रुपये द्यावेत. एम.टेकला असताना पहिल्या वर्षी ८०००/- मिळायचे, त्यावेळी वाटे १८०००/- मिळायला हवेत. दुसऱ्या वर्षी १८०००/- मिळायला लागले तर वाटू लागले किमान ३००००/- मिळायला हवेत. आता ५००००/- मिळतात तर वाटतय ७०-८००००/- मिळायला हवेत. म्हणजे साधी राहणी-उच्च विचारसरणी ऐवजी उच्च राहणी-साधी विचारसरणी असल्या दावणीला आयुष्य बांधले होते. कोणत्या तरी गोष्टीत समाधान मानायला शिकलं पाहिजेल हेच मी विसरून गेलो होतो. एक मात्र नक्की कि पैसा कमविणे हे माझ्या जीवनाचे ध्येय नाही, पैसा म्हणजे सर्वस्व नव्हे असली गुळगुळीत लेबल बोलायला सोपी असली तरी प्रत्यक्षात उतरविणे म्हणजे महाकर्मकठीण आहेत याची जाणीव होत होती पण मन मात्र हे सगळ कबुल करत नव्हत, त्याला संकोच वाटत होता, कुठतरी आत खोलवर स्वताचीच लाज वाटत होती. दुसरीकडे आयुष्यात जी काही स्वप्न बाळगली होती, ध्येय बघितली होती त्याला पण धडधड सुरुंग लागू लागले किंबहुना मी स्वतःहून लावून घेतले. एकदा नोकरी करत आराम करायची सवय लागल्यावर कष्ट करण्याचे शिवधनुष्य कोण उचलणार हाच मुळात यक्षप्रश्न. म्हणजे तेंडल्या तर बनायचे होते पण संगणकावर क्रिकेट खेळून, शास्त्रण्य व्हायचं आहे पण इस्रोने स्वतःहून मला बोलावण धाडलं पाहिजे, समाजसेवा करायचीय पण लगेच बाबा आमटेच व्हायला हवं त्यातलाच एक भाग. स्वप्न उराशी बाळगण हा एक भाग, पण ती पूर्ण करण्यासाठी जीवापाड मेहनत करावी लागते हा विचारच चक्रीवादळात वाहून गेला होता. करायच तर आहे आणि होत पण नाही, मग काय..?? परत स्वतःचा तिरस्कार. मी जी नोकरी करतोय ती फक्त बिनकामाची बाकीचे करतात ते माञ सनी लिओन. मित्राने हॉटेल टाकले कि मला पण तेच करू वाटायचं, मित्र IES झाला कि मला पण त्याची तयारी करू वाटायची, एकाने कंपनी काढली कि मला कंपनी काढायची इच्छा व्हायची आणि हे कालचक्र राहू हात धुवून मागे लागल्यासारखे मी लावून घेतलेले. गेल्या ३-४ वर्षापासून एकट राहत असल्याने कुणाशी तरी बोलून मनमोकळ करण्याऐवजी एकटाच तासनतास घुम्यासारखा न बोलता बसून राही पण हे विचार विक्रमाच्या पाठीवर बसलेल्या वेताळासारख भूत होऊन माझ्या मानगुटी गच्च धरून बसले होते. मग त्यातून सुरु झाला तो निराशेचा खेळ. नको तो पैसा, नको तो संघर्ष, नको ते आयुष्यच. कधी कधी इतका त्रास होऊ लागला कि आत्महत्येचे विचारही येऊ लागले. पण तेही करण्याचे धैर्य नव्हते माझ्याजवळ. मागे आत्महत्येवर लेख लिहिताना मीच लिहिले होते कि आत्महत्या करून आपण आपले प्रश्न सोडवितो पण आपल्या पालकांची जिवंतपणीच हत्या करतो. यशाकडे जाणारा मार्ग खडतर असला म्हणून तो बदलायचा नसतो. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक अवसर दिला आहे असं समजा. आगीतून जायलाच हवं कारण त्याशिवाय कचरा जळून जात नाही. पण उपदेश करणे व कॄती करणे यांच्यातील सीमारेषा किती गडद आहेत हे पहिल्यांदाच अनुभवत होतो. यातून सावरण्यासाठी कुणाच्या तरी सल्ल्याची,मार्गदर्शनाची गरज होती. त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा माझ्यासमोर नाव आले ते मितान यांचे. त्यांची मुलांची मानसिक शेती हि लेखमाला मी वाचली होती त्यामुळे त्या मला यातून बाहेर काढतील अस मनोमन वाटत होत. मग त्यांना ध्वनी करून भेटण्याची वेळ घेतली व गुरुवारी भेटण्याचे निश्चित झाले. पण त्यांना भेटायला जाताना काही काळ मात्र भूतकाळात रमलो. एका मिपाकराला प्रत्यक्षात भेटतोय याची उत्सुकताच काही वेगळी होती. अंगावर रोमांच जरी उभे राहिले नसले तरी एक वेगळीच उर्जा जाणवत होती, मन एकदम हलके व प्रसन्न वाटत होते. ३ वर्षापूर्वी जेव्हा मिपाच सदस्य झालो होतो ते सगळ अगदी काल घडल्यासारख डोळ्यासमोर चित्र उभं राहत होत. नवीन असताना जेव्हा जिलब्या टाकायचा प्रयत्न करी तेव्हा काहीजण जाणूनबुजून लॉलीपॉप दाखवून उकसावयाचे व एखाद्या निरागस बाळाप्रमाणे मीही स्वताचा बकरा बनवून घेई. 'माझ्या राजकारणी व आपण' या जिलबीवर वल्ली आणि कंपनीने माझी प्रचंड मारलेली आठवल कि आजही खूप हसू येत त्या वेळच्या अल्लडपणावर. आता पण नवीन सावज दिसलं कि शिकारी कधी,कसा व कुठ्ल्या जिलबीवर ताव मारणार याचीच उत्सुकता लागून राहिलेली असते. एकप्रकारचे रॅगिंगच. नंतर मात्र अशी खेचाखेची अंगवळणी पडली व थोडा धीर धरून व्यवस्थित बॅटींग करू लागलो व कधी या सगळ्याचा एक भाग झालो ते कळलेच नाही. तशी माझी व्यक्तीशः माझे मिपागुरु (मी मानलेले) वल्ली यांनाच पहिल्यांदा भेटण्याची इच्छा होती. मी त्यांच्याशी संपर्कही साधला होता पण काही कारणाने ते राहून गेलं. मध्यंतरी पत्रकारिकेत शिरण्याची इच्छा होती त्यामुळे श्रामो. यांना ध्वनी करून भेटीची वेळ घेतलेली पण दुर्दैवाने त्यापूर्वीच नियतीने ते आपल्यापासून दुरावले. त्यामुळे कारण काहीही असो मितान यांना पहिल्यांदा भेटण्याचा योग आला. संध्याकाळी ६.४५ च्या सुमारास मी त्यांच्या घराची बेल वाजविली. ओळख परेड झाल्यानंतर गप्पांचा तास सुरु झाला. त्या मिपाच्या स्थापनेपासून सदस्य असल्याने मिपाचा प्रवास, त्यांच्या मिपावरील ओळखी, त्यांचा जीवनसंघर्ष, त्यांचे अनुभव, ज्याच्यासाठी गेलो होतो त्याविषयीचे सल्ले हे सर्व होत असताना आम्ही पहिल्यांदाच भेटतोय अस मला कुठेही जाणवत नव्हत. त्यांच्याशी बोलून, त्यांच्या अनुभवातून एक सकारात्मक उर्जा, जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन, स्वताबद्दलच्या अपेक्षा व त्याची पूर्ती या गोष्टी मिळाल्या असल्या तरी त्यापेक्षा एक सर्वात महत्वाची गोष्ट मला मिळालीय. मला स्वताला ज्या पद्धतीच आयुष्य जगण्याची मनापासून इच्छा आहे अगदी तसच किंबहुना त्याहूनही कितीतरी पटीने अधिक चांगल्या पद्धतीने प्रत्यक्षात ते सर्व अनुभवलंय अशा व्यक्तीशी मी प्रथमच भेटत होतो. कदाचित ज्या गुरूच्या शोधत मी वणवण भटकत होतो तो शोधही संपलाय असाच मला वाटतंय. हेच सुखच गाठोड घेऊन जवळपास २ तासांनी मी परतीच्या प्रवासाला लागलो. त्याचं एक वाक्य मात्र मला कायमच लक्षात राहील.....I am happy because I know what I want. (नक्की काय बोललो त्या दोन तासात ते पुढच्या लेखात ..)

वाचने 8130 वाचनखूण प्रतिक्रिया 45

सस्नेह 05/12/2014 - 21:20
जियो अमित..खूप छान जियो मितान !

अजया 05/12/2014 - 21:30
जियो मिपा!! जियो मितान!! वाचतेय.छान लिहिताय.न जाणो अजून कोणाच्या उपयोगी पडेल आपला अनुभव.

In reply to by अजया

बहुगुणी 05/12/2014 - 22:12
जियो मिपा!! जियो मितान!! आणि अब जियो, अमित! पुढच्या लेखाची खास प्रतीक्षा आहे. आपण नेमकं कशात आनंदी आहोत हे कळणं अति-महत्वाचं आहे, ते कळायला काहींना (मला वाटतं बहुतेकांना, myself included) बरीच वर्षे धापा टाकून उरस्फोड करायला लागते, काहींना तरूण वयातच ते लवकर कळतं. अशाच एका तरुणाकडून ऐकलेलं एक वाक्य फार भावलं होतं: "आपण बरेचदा 'संतुष्ट' असण्याला 'अल्प-संतुष्ट' असणं समजून मृगजळामागे धावतो...आणि मग खूप वर्षांनी समाधानी जागा सापडली की मग जाणवतं की 'अरे, इथे तर आपण फार पूर्वीच पोहोचलो होतो!' "

In reply to by बहुगुणी

बोबो 05/12/2014 - 22:35
"आपण बरेचदा 'संतुष्ट' असण्याला 'अल्प-संतुष्ट' असणं समजून मृगजळामागे धावतो...आणि मग खूप वर्षांनी समाधानी जागा सापडली की मग जाणवतं की 'अरे, इथे तर आपण फार पूर्वीच पोहोचलो होतो!' ">> एकदम पटेश..

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे 05/12/2014 - 21:46
अरे वा ! छान लिहिलंय. मितान दी ग्रेट ! -दिलीप बिरुटे

प्रचेतस 05/12/2014 - 23:34
सुरेख लिहिले आहेस अमित. जुने दिवस आठवतात अजून. मितानताई आणि तूझ्या भेटीबद्दल वाचण्यास उत्सुक.

In reply to by अत्रुप्त आत्मा

प्रचेतस 06/12/2014 - 13:41
तुम्ही पण बदललातच की. आधी किती छान छान कविता, विडंबने टाकायचात आणि आता हल्ली फक्त भावविश्वंच.

सतिश गावडे 05/12/2014 - 23:44
अमित, प्रांजळ कथन आवडले. तुझ्या "जिलब्यांवर" मी ही हात साफ करुन घेत असे. कोदा, यशोधन आणि तू माझे ठरलेले मेंबर होतात. :) असो. पुढील भाग वाचण्यास उत्सुक.

सतिश गावडे 05/12/2014 - 23:54
'माझ्या राजकारणी व आपण' या जिलबीवर वल्ली आणि कंपनीने माझी प्रचंड मारलेली आठवल कि आजही खूप हसू येत त्या वेळच्या अल्लडपणावर.
तू बहुतेक या प्रतिसादाबद्दल बोलत आहेस. :)

राजेंद्र मेहेंदळे 06/12/2014 - 12:45
प्रांजळपणे केलेले वर्णन....बाकी आजकाल सर्वकाही मोकळेपणाने सांगावे असा माणुस भेटणेच कठीण झालेय मिपामुळे तुम्हाला तशी व्यक्ती भेटली हे मिपाचे यश मानावे लागेल.

श्रीरंग_जोशी 07/12/2014 - 10:06
अनुभवकथन आवडले अन स्वतःबद्दल येथे मोकळेपणाने लिहिणे खूप भावले. परंतु (पहिले तीन परिच्छेद) जरा त्रोटक वाटले. कदाचित पुढील भाग चित्र अधिक स्पष्ट करेल.
नेहमी आनंदी राहावे ही इच्छा असेल तर भूतकालाचं भूत झुगारून द्या, फार दुरच्या भविष्याचा विचार करण सोडून द्या.. आणि वर्तमानात जगण्याचा प्रयत्न करावा.

मितान 08/12/2014 - 17:29
काय रे हे ???? सेशनमधले काय नि किती शेअर करायचे हा सर्वस्वी तुझा प्रश्न आहे. कोणाची गुरू वगैरे होण्याची माझी योग्यता नाही याची नम्र जाणीव मला आहे. समुपदेशन हा माझा व्यवसाय आहे. त्यासाठी मी फी घेते. त्यामुळे व्यक्तिगत कौतुक नकोच. मी माझे व्यावसायिक कर्तव्य केले. सेशननंतरची तुझी विचारप्रक्रिया जाणुन घ्यायला आवडेल. इथे असे व्यक्त होण्यात तू कम्फर्टेबल आहेस ही तुझ्या समस्येतून बाहेर पडण्याची मोठीच पायरी आहे हे नक्की. शुभेच्छा.

पैसा 09/12/2014 - 14:51
आपले विचार नेमके ओळखणे आणि कमी आहे त्यासाठी समुपदेशक, मनोरोगतज्ञ यांची मदत घेणे ही पायरी यायलाच बर्‍याचजणांना खूप वेळ लागतो. तुम्ही एवढे मोकळेपणाने लिहीत आहात हेच खूप छान आहे! पुढच्या वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! मितानची मदत तर असेलच!

प्रसाद गोडबोले 09/12/2014 - 15:00
माझे मिपागुरु (मी मानलेले) वल्ली
अमितराव आपली गुरुभक्ती पाहुन गदगद झालो . शिवाय
मिपाकराशी भेटताना
हे व्याकरण पाहुन तर डोळेच भरुन आलेत माझे... अगदी मुसमुसायला होत आहे ( नाक पुसायला रुमाल द्या रे कोणीतरी ) मी ही आता वल्ली ह्यांना गुरु मानावे काय असा विचार करत आहे .

In reply to by प्रसाद गोडबोले

पैसा 09/12/2014 - 21:38
रात्रंदिवस त्याच्याबरोबर दगडगोट्यात भटकत रहावे लागेल. स्वपीडनाची हौस आलीय का तुला? आता एखादा आश्रम बिश्रम काढून त्यात वल्लीबाबांची स्थापना केलीस तर ठीके. मी पण भागीदारीत बिजनेस करायला येते. पाहिजे तर बाबांना डीप फ्रीज पण करून ठेवू.