मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पूर्वेच्या समुद्रात -- २

सुबोध खरे · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
आमचे जहाज संध्याकाळी गोव्याच्या आसपास पोहोचले. अर्थात हे फक्त आम्हाला जी पी एस आणि दीप स्तंभांवरून कळत होते. पावसाळी वातावरणामुळे समुद्रकिनारा दिसत नव्हताच. पण गोव्याच्या आसपास पोहोचल्यावर तेथील तट रक्षक दलाच्या मुख्यालयात संपर्क केला असता पुढचे दोन दिवस गोवा ते कारवार अशी गस्त घालण्याचे आदेश मिळाले. म्हणजे सरळ दक्षिणेकडे कूच करायच्या ऐवजी तिथेच खेटे मारत राहायचे होते. आता हे का करायचे तर पावसाळ्यात मासेमारी बंद असते. हा काळ माशांच्या प्रजननाचा असतो त्यामुळे मत्स्यबीज कमी होऊन पुढच्या वर्षभर तुटवडा जाणवू नये म्हणून केलेली बेगमी असते. परंतु या काळात आपल्या देशाऐवजी दुसर्या देशात मासेमारी करता येते म्हणून श्रीलंकेचे किंवा इंडोनेशियाचे मासेमार कारवार गोव्या पर्यंत येतात. त्यांच्यावर लक्ष ठेवणे आणि आपल्या साधन संपत्तीचे रक्षण करणे हा या गस्त घालण्याचा हेतू असतो. तट रक्षकाची पांढरी जहाजे दिसली कि हे मासेमार घाईघाईने परत जातात. अर्थात यासाठी दोन तीन दिवस अशा खवळलेल्या समुद्रात नुसते इकडून तिकडे फिरत राहणे फारच कष्टदायक वाटत होते. मुळात विक्रांतवर २ वर्षे राजासारखे राहिलो होतो. शिवाय ते जहाज वज्रच्या १६ पट मोठे होते. त्यामुळे विक्रांतवर समुद्र/ बोट लागणे हे फारच कमी होत असे. दुसर्या दिवशी सकाळी आमचा अधिकार्यांचा स्वयंपाकी चक्कर येउन पडला म्हणून शुभ बातमी माझ्या सहाय्यकाने दिली. त्याला पहिले तर हा पठ्ठ्या दोन दिवसापासून उपाशीच होता आणि जरा उभा राहिला कि त्याला उलटी येत असे. कसे तरी त्याने रात्रीचे जेवण तयार केले होते. मग मी त्याला माझ्या दवाखान्यात घेऊन आलो. त्याला सलाईन लावले उलटी येऊ नये म्हणून औषधाचे इंजेक्शन ठोकले आणि तेथे झोपवून ठेवले. सकाळी न्याहारीची वेळ झाली तेंव्हा न्याहारीला काहीच नव्हते. मग आम्ही सर्व अधिकार्यांनी सैनिकांच्या मुदपाकखान्यातून मैगीच्या नुडल बनवून आणल्या आणि खाल्या. दुपारच्या जेवणाची काहीच तयारी नव्हती. त्यामुळे दुपारच्या जेवणातसुद्धा मैगीच्या नुडल खाल्या. संध्याकाळी समुद्र जास्तच खवळला होता आणि जहाज फारच वरखाली होत होते. सैनिकांच्या मुदपाकखान्यातून सुरणाची भाजी आणि जाड जाड कमी भाजलेल्या रोट्या (पोळ्या) आणि एक पिवळी दाल आणि फडफडीत भात असा स्वयंपाक आणला होता त्याच्या कडे बघूनच माझी भूक गेली त्यामुळे रात्री मी फक्त थंडा फराळ केला. हा स्वयंपाकी माझ्याच दवाखान्यात आडवा झालेला होता आणि त्याची काही काम करण्याची मुळीच मानसिक स्थिती नव्हती. एक दिवस तर मी त्याला पूर्ण विश्रांती दिली होतीच. पण त्याचा साथीदार सुद्धा फारशा चांगल्या स्थितीत नव्हता.त्यामुळे त्याने अधिकाऱ्यांच्या ऐवजी सैनिकांच्या स्वयंपाकघरात जाऊन तेथील इतर स्वयंपाकि यांच्या मदतीने जे जमेल तसा स्वयंपाक केला होता. या जहाजांमध्ये मुळात बरेचसे तरुण सैनिक असल्यामुळे त्यांना बोट लागणे हे प्रकार जास्त होतात. त्यातून वादळासारखी परिस्थिती असेल तर अजूनच वाईट. त्यामुळे आपल्याला चांगले जेवायला मिळत नाही म्हणून त्याच्या डोक्यावर बसणे मला अमानुष वाटत होते. याचा थोडासा फायदा त्याने दुसर्या दिवशी पण घेतला. दुसर्या दिवशी सकाळी पण आमहाला न्याहारी साठी उकडलेली अंडी किंवा मैगी नुडल यात निवड करायची होती. त्या अंड्यांच्या वासाने मला नकोसे झाले म्हणून मी परत मैगी नुडलच खाल्ल्या. भूक अजिबात नसली तरी काहीतरी पोटात ढकलणे आवश्यक होते. मधल्या काळात मी मधून मधून ब्रिज वर जाऊन काय चालले आहे ते पाहत असे. तेथे रडारवर समुद्रात काहीच हालचाल होताना दिसत नसे. मधूनच एखादा माग(CONTACT) लागला तर तेथे जाऊन पहिले तर एखादे तेलवाहू जहाज आखाताकडून दक्षिणपूर्व आशियाकडे जाताना दिसत असे. कंटाळून मी माझ्या खोलीत आडवा झालो. माझ्याकडे माझ्या बायकोमुलांच्या फोटो चे दोन अल्बम होते ते पाहत राहणे आणी त्यांच्या आठवणीत रमणे हा एक विरंगुळा होता. दुपारच्या जेवणाच्या वेळेस मी झोपलो होतो. त्यामुळे ते जेवण थोड्या वेळाने वाढपी( STEWARD) परत घेऊन गेला. मी उठलो तेंव्हा दुपारी चार वाजले होते आणी आश्चर्य म्हणजे मला भूक लागली होती. अधिकाऱ्यांच्या जेवण घरात(DINING HALL) गेलो तेंव्हा साम्सूम झालेली होती. वाढपी( STEWARD) राहतो तिथे जाऊन पहिले तर तो झोपला होता. आता काय करावे या विचारात होतो. परत जेवणघरात आलो तेथे एका टोपात(CASSEROLE) मध्ये सकाळच्या मैगी नुडल ठेवलेल्या होत्या त्या एका काचेच्या प्लेट मध्ये काढल्या मायक्रो वेव्ह मध्ये गरम केल्या आणी खाल्ल्या. परत तेथेच बसून राहिलो. काय करावे याचा विचार करत? दिवसभर काय करावे हा खरोखरच प्रश्न होता. काही वाचावे तर जहाज सारखे हलत असल्याने थोड्या वेळानं डोळे आणी डोकं दुखू लागतं. पोटात डचमळत असतच. संगीत ऐकावं तर जहाजाच्या यंत्रांचा आवाज त्याला साथ देत असतो. करायला काही नाही बोलायला माणूस नाही अशी डोक्याची वजनरहित अवस्था काय असते हा अनुभव त्या एका वर्षात पुरेपूर घेतला.. मला एक गोष्ट जाणवली कि आपण दोन दिवस फक्त मैगी नुडलवर काढले. यानंतर मैगीच्या मसाला नुडलवरून माझं मनच उडालं कि आता शक्यतो मी कोणत्याच नुडल्स खात नाही पण मसाला तर नाहीच नाही. दोन दिवस कारवार गोवा च्या आसपास समुद्रात भटकत काढल्यावर आम्हाला पुढे कूच करण्याचा हुकुम मिळाला. आणी उद्या कोचीन बंदरात प्रवेश करायचा आहे या आनंदात मी रात्र काढली. तीन चार दिवस अशा खवळलेल्या समुद्रात काढल्यावर मला पण सवय झाली होती त्यामुळे आता पोटात ढवळणे पण कमी झाले होते. रात्रीच्या जेवणाच्या वेळेस मेक आणी इलेक्त्रीकल इंजिनियर आणी EXO असे तिघे हि एकत्र होते. तीन दिवस जहाजाचे व्यवस्थापन लावून ते पण कावले होते. मला त्यांच्या कडे पाहून छान वाटत होते कि आपण फार तर दोन वर्षे अशी काढायची आहेत यांना तर आयुष्यच समुद्रात काढायचे आहे. तेंव्हा एक गोष्ट जाणवली कि आपल्याकडे ज्या गोष्टी आहेत त्यांची आपल्याला किंमत नसते आणी मृगजळाच्या मागे मात्र आपण धावत असतो. तट रक्षक दलात काढलेल्या एका वर्षात मी ज्या गोष्टी शिकलो त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे माणसाला आयुष्यात अमुक एक गोष्ट लागतेच हे असत्य आहे. लोक मला रात्री दही भात "लागतोच " असे म्हणतात. किंवा घरातून गणपती जातात केंव्हा आणि मी दारू पितो किंवा चिकन /मटण केंव्हा खातो असे हि लोक आहेत. असे करणाऱ्या लोकांची मला कीव करावीशी वाटते. मला जेवताना काहीही असेल तरी चालते मग त्यात नुसता ढोकला किंवा फरसाण असेल किंवा दही भात आणि कांदा असेल किंवा नुसती दाल आणि पाव असेल तरीही.नुसती काकडी आणि टोमाटो सुद्धा मीठ लावून असेल तरीही. आठवडाभर चहा नाही प्यायला तरीही चालते. चहा ऐवजी दुध किंवा कॉफी किंवा सरबत किंवा काहीही नसेल तरीही चालते.माझे डोके दुखत नाही कि कोणताही त्रास होत नाही. ( चहा प्यायला नाही तर बायकोचे डोके दुखते). झोपायला गादीच हवी, उशी उंचच हवी, ए सी शिवाय झोपच लागत नाही हे सर्व सुद्धा नखरे आहेत. लोकांना श्रावण आला कि "कसेसे"च होते हे सुद्धा नखरे आहेत असे मला वाटते. आपण कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये हेच खरे. क्रमशः

वाचने 17035 वाचनखूण प्रतिक्रिया 28

कंजूस Fri, 11/28/2014 - 14:31
काय मजा होती तुमची रोज रोज मसाला मैगी! लेखन आवडले. बोटीत, पाळण्यात, घाटातून जातांना उलट्या का होतात? त्यावरचे औषध नक्की काय करते?का फक्त सेडटिव असते?

अर्धवटराव Sat, 11/29/2014 - 00:18
माझे असे नखरे आहेत :( एक तर मी फार कमि बाबतीत नखरे करतो. पण जे करतो ते करतोच. एकवेळचं जरी व्यवस्थीत जेवण मिळालं नाहि तर आपली डोकेदुखी सुरु होते. झोपायला गादी-उशांची अडचण नाहि पण तापमान योग्य नसेल तर चिडचिड होते. जेवण आणि झोप तब्बेतीने झालं तर मात्र काहि विशेष नखरे नाहित :) तुमचे अनुभव जबरी आहेत डॉक्टर.

गजानन५९ Mon, 12/01/2014 - 12:57
डॉक, (लहान तोंडी मोठा घास घेतोय ) नक्की काय लिहायचे आहे ते आधी कागदावर उतरवून वाचून मग इथे टाकले तर लयी बरे होईल कारण काय सांगायचे आहे तेच समजेनासे झालेय.

In reply to by गजानन५९

सुबोध खरे Tue, 12/02/2014 - 20:50
गजानन राव हा लेख मी लिहून मला स्वतःला मेल करून ठेवला होता. दहा दिवस वाट पाहिली विचार करीत होतो टाकावा कि न टाकावा कारण हा फार कंटाळवाणा लेख आहे असे वाटत होते.(म्हणून पहिल्या आणि दुसर्या लेखात एवढा अवधी लागला) पण धीर करून टाकलाच. युद्धस्य कथाः रम्याः हे सत्य असेल तरीही सैनिकांचे आणि अधिकाऱ्यांचे आयुष्य खडतर आणि कंटाळवाणे पण असू शकते एवढेच मला म्हणायचे आहे. मिपाकरानी असाही लेख वाचला याचे आश्चर्य आणि कौतुक वाटत आहे. असो पुढचे भाग थोडे लवकर आणि कमी कंटाळवाणे करण्याचा प्रयत्न करेन. राग नसावा.

समीरसूर Mon, 12/01/2014 - 14:46
झोपायला गादीच हवी, उशी उंचच हवी, ए सी शिवाय झोपच लागत नाही हे सर्व सुद्धा नखरे आहेत. लोकांना श्रावण आला कि "कसेसे"च होते हे सुद्धा नखरे आहेत असे मला वाटते. आपण कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नये हेच खरे. हे आवडलं. माझेही (सुदैवाने आणि अजून तरी) असे कुठलेच नखरे नाहीत. जेवणात काहीही चालते. दिवसभर मी नाश्ता, जेवण, रात्रीचे जेवण यात कुठलीही एकच भाजी आणि पोळी किंवा नुसतीच भाजी खाऊ शकतो. अगदी भोपळ्याची किंवा कार्ल्याची भाजी मी दिवसातून तीन-चार वेळा खाऊ शकतो. कोरडा शिळा ब्रेड आणि थोडीशी कोरडी चटणी खाऊन मी वेळ साजरी केलेली आहे. अजूनही वेळ पडली तर मी नुसत्या ब्रेडवर आणि थोड्या चटणीवर आरामात राहू शकतो. एखादा पदार्थ खूपदा खाऊन जो कंटाळा येतो तसला कंटाळा मला कधीच येत नाही. अमेरिकावास्तव्यात बाहेर जाणे न झाल्याने सलग दोन-तीन दिवस आम्ही वरईचा भात खात होतो. तिन्ही वेळेला वरईचा भात! नंतर एकदा दोन-तीन दिवस फक्त उपमा!!! सलग ७-८ वेळा नुसता उपमा!!! मला वाटले हे पदार्थ आता आपण कधीच खाऊ शकणार नाही; पण नाही, भारतात परत आल्यावर पहिल्याच आठवड्यात आवडीने उपमा आणि वरईचा भात खाल्ला. अजूनही खातो. नो टेंशन!! एकदा खूप भूक लागली होती. घरी एकटाच होतो. कार्यालयातून नुकताच घरी पोहोचलो होतो. काही करून खाण्याचा पेशन्स नव्हता. बाहेर जाण्याचे त्राण नव्हते. फ्रिजमध्ये खिचडी दिसली. त्यात तेल, तिखट, मीठ टाकले आणि कालवून खाऊन टाकली. नंतर कळले की ती दोन दिवसापूर्वीची खिचडी होती. मला शिळ्या खिचडीत तेल, तिखट, मीठ टाकून खायला खूप आवडते. थोडे दही असेल तर चव भन्नाट येते. पानात असलेला कुठलाच पदार्थ मी कधीच टाकून देत नाही. कुठलाच पदार्थ नको असे मी कधीच म्हणत नाही. सगळ्या भाज्या खातो. जे पुढ्यात येईल ते खातो. कार्यालयात डबा नेलेला नसेल तर कँटीनमध्ये जे लगेच मिळेल असे पदार्थ (राईस प्लेट, पोहे, उपमा) असे पदार्थ घेतो. अमुकच एक पदार्थ पाहिजे म्हणून अर्धा-अर्धा तास रांगेत ताटकळत उभे राहणे नामंजूर!!! म्हणून मी कार्यालयातल्या कँटीनमध्ये आतापर्यंत (१०.५ वर्षात) कधीच दोसा, उत्तपा, पिझ्झा वगैरे पदार्थ खाल्लेले नाहीत. :-) नाश्ता मी कधीच करत नाही. त्यामुळे १-२ वेळा कधीतरी पोहे खाल्ले असतील बहुधा. डबा नसेल तर सरळ तयार जेवण घेतो जे ५ मिनिटात मिळते. त्यामुळे कुठेही गेलो तरी माझी खाण्याविषयी कधीच तक्रार नसते. भुकेच्या वेळेला मिळाले की माझ्या अपेक्षा पूर्ण होतात. बाकी कुठलेच नखरे ठेवलेले नाहीयेत. झोपायला पलंगच पाहिजे असे काही नाही. एका सतरंजीवर आरामात झोपू शकतो. अजून बर्‍याचदा मी सतरंजीवर झोपतो. उशी नाहीये? नो प्रॉब्लेम! हात घडी केले की काम फत्ते! पोह्याला मिरच्या, कांदा, कोथिंबीर नाहीये? नो प्रॉब्लेम! टोमॅटो टाका. अजूनही पक्का भारतीय असल्याने भारतीय शौचालयच वापरतो. कमोडशिवाय पर्यायच नसेल तर कमोडही वापरतो. अगदीच काहीही नसेल तर शेतात-झुडूपाआड जाऊन कार्यभाग साधण्यात मला काहीच प्रॉब्लेम येत नाही. :-) जुलै मध्ये आम्ही फक्त मित्र-मित्र मढे घाटात गेलो होतो. पुण्याला परत येतांना काहीतरी गडबड झाली आणि पोटाने आणीबाणी जाहीर केली. नुसत्या अश्रूधुराच्या नळकांड्या फोडून काही साध्य होणार नाही हे ध्यानात आले. दोन्ही बाजूस भाताची शेती. मित्राला म्हटलं थांबव. कारमध्ये एक रिकामी बाटली मिळाली. भात शेतातले साठलेले नितळ पाणी भरून घेतले आणि नंतर जो काय अवर्णनीय आनंद मिळाला म्हणून सांगू. वा वा! मजा आ गया. एकदा एका भक्तनिवासात सकाळी सकाळी सगळी शौचालये हाऊसफुल होती. एक रिकामा होता. गर्दी तुफान. च्यायला म्हटलं हा कसा काय रिकामा! पाहतो तर त्याच्या दरवाजाच्या खालचा भाग गायब होता. आपल्या पोटाने एकदा ठान ली तो ठान ली...मग ते काही कुणाच्या बापचं ऐकत नाही. एक पेपर घेतला आणि एका हाताने दरवाज्याला लावून धरून ठेवला. खल्लास! वाट बघणारे बघत बसले; मी कोलगेट स्माईल घेऊन बाहेर निवांत चहा पीत बसलो. :-) एकदा लक्ष्मीनारायण टॉकीजच्या ड्रेस सर्कलच्या मुतारीत माझी बाईकची किल्ली पडली. ती पार खोल खड्ड्यात जाऊन पडली. रात्रीची ११ वाजताची वेळ. अब क्या करे? सगळे उत्सुकतेने माझ्याकडे बघू लागले. चौकशी केली. कीमेकर त्या वेळेला मिळणं शक्यच नव्हतं. रात्रभर बाईक लक्ष्मीनारायणच्या पार्किंगमध्ये ठेवणं शक्य नव्हतं. मी एक मोठी कॅरीबॅग हाताला वरपर्यंत बांधली आणि किल्ली काढली. त्या परिस्थितीत दुसरा चांगला उपाय नव्हताच हे सगळ्यांच्याच लक्षात आल्याने कुणीच हसलं वगैरे नाही. किल्ली स्वच्छ धुतली. असे दोन अनुभव मला देशी शौचालयाच्या बाबतीत आलेले आहेत. एकदा बंधुराजांनी माझे नवीन घड्याळ शौचालयात पाडले. वसतिगृहाचे शौचालय! आता काय करणार? नवीन होते. आणि समोर दिसत होते. कॅरीबॅग जिंदाबाद! :-) बर्‍याच अनुभवाअंती मी या निष्कर्षाप्रत पोहोचलो आहे की आपण तसे बरेच लवचिक असतो...

पैसा Mon, 12/01/2014 - 23:44
समीरसूर यांची प्रतिक्रियाही आवडली. आपल्याकडे सगळ्याच लोकांना सैन्यात २ वर्षे कम्पल्सरी काढायला लावली पाहिजेत. बरेच नखरे कमी होतील आणि शिस्त येईल.

In reply to by पैसा

मुक्त विहारि Tue, 12/02/2014 - 01:05
आमचे खाण्या-पिण्याचे नखरे बघून घरचे वैतागले आणि आमचे लग्न करून देण्यात आले. आजकाल मी केवळ भोपळ्याची भाजीच नाही तर "दाबेली" पण खावू शकतो.

In reply to by मुक्त विहारि

नाखु Tue, 12/02/2014 - 09:37
याचे थोडेफार श्रेय आपल्या पालकांना देखील असावे. फाजील लाड-स्तोम (आमच्या बाब्याला पोह्यात कांदे चालत नाहीत्-शिळी पोळी खात नाही) असली थेरं अगदी अभिमानाने (?) सांगणार्या पालकांचा एकदातरी सत्कार व्हावा. जाता जाता मुविंसाठी अवांतरः आधी थोडे नखरे कमी केले असते तर एवढी कडक शिक्षा मिळाली नसती (ह्.घ्या)

मुक्त विहारि Tue, 12/02/2014 - 09:54
हं... आता इतक्या उशीरा का होईना, पण पटले बघा तुमचे म्हणणे... म्हणूनच मी मुलांना भोपळ्याच्या भाजीची सवय लागावी म्हणून माझ्या वाटणीची भाजी पण त्यांच्याच पानांत टाकतो, (अर्थात, बायकोची नजर चुकवून)

In reply to by मुक्त विहारि

मुक्त विहारि Tue, 12/02/2014 - 09:58
नादखूळा ह्यांना द्यायचा प्रतिसाद, भलतीकडेच गेला... (निव्वळ वेंधळेपणा हो आमचा, दुसरे काय)

श्रीरंग_जोशी Tue, 12/02/2014 - 21:56
लेखाद्वारे दिलेल्या संदेशाशी सहमत. होस्टेलवर राहिल्यास अन कठिण आर्थिक परिस्थितीमधून गेल्यास माणसाचे अनेक नखरे कमी होतात हा स्वानुभव आहे. समीरसूर यांचा प्रतिसाद भावला.

In reply to by श्रीरंग_जोशी

शिद Wed, 12/10/2014 - 20:18
होस्टेलवर राहिल्यास अन कठिण आर्थिक परिस्थितीमधून गेल्यास माणसाचे अनेक नखरे कमी होतात हा स्वानुभव आहे.
१००० वेळा सहमत. आपला पण अनुभव हेच सांगतो.

कैलासवासी सोन्याबापु गुरुवार, 07/23/2015 - 05:59
आहेत त्यांची आपल्याला किंमत नसते आणी मृगजळाच्या मागे मात्र आपण धावत असतो. तट रक्षक दलात काढलेल्या एका वर्षात मी ज्या गोष्टी शिकलो त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे माणसाला आयुष्यात अमुक एक गोष्ट लागतेच हे असत्य आहे. लोक मला रात्री दही भात "लागतोच " असे म्हणतात.
तुफान निव्वळ तुफान डॉक्टरसाहेब!!! त्या विश्वकर्मा सरांचे खरेच कौतिक वाटले, अन्नग्रहण किंवा पेहेराव ह्याच्या आसक्ति संबंधी वरती आपण बोललेल वाक्य तुफान! आयुष्याला अमुक एक गोष्ट लागतेच हे चुक आहे वाह!!! ह्याचा अनुभव मी २१ दिवसांच्याच् हाई अल्टीट्यूड ड्यूटी रोटेशन मधे घेतला, पूर्वोत्तर राज्यांत होतो तेव्हा (सिक्किम) अन पट्रोलिंग अल्टीट्यूड १६,००० फ़ीट + होते, इतक्या भयानक उंचीवर ऐन जनवरी मधले पट्रोल होते (नवंबर अन डीसेंबर निव्वळ अशक्य असते) तापमान अराउंड गुड़ ऑफ़ -५ ते -२७℃ ह्या रेंज मधले होते, पट्रोल रूट म्हणजे ३ दिवस चढ़ाई मग अमुक एका बीओपी ला १५ दिवस बसुन बॉर्डर बघणे मग ३ दिवस टप्प्या टप्प्या ने उतरणे, ट्रांजिट चे सहा दिवस वास्तव्य टेंट्स ला, इतक्या उंचीवर इतक्या थंडीत इतकी मेहनत झाल्यावर कैलोरीज चा लॉस भयंकर होत असे, सतत हाई अल्टीट्यूड सिकनेस ची भीती, फ्रॉस्ट बाइट्स , स्नो स्टिंग्स ची भीती , ह्या काळी आम्हाला शिजवुन खायची सोय फ़क्त बीओपी ला होती, तिथे लाकडे भरलेली असत चांगल्या सीजन मधे खेचरा वरुन नेऊन तरी जेवणात वैरायटी म्हणजे फ़क्त आलू तला हुआ अन आलू भुना हुआ इतकेच असे आम्हाला बेस कैंप वरुन निघताना ड्राई फ्रूट्स दिले होते, नंतर एक दिवस फूल कोबी अन काजू बादाम हेलीड्रॉप केले होते, १५ दिवस करायला काहीच काम नाही (फ़क्त डोळ्याला दुर्बीण लावुन बसा) अन खायला कोटा अनुसार माणशी दररोज १७५-२२५ ग्राम सुकामेवा (अंजीर बदाम काजू पिस्ते) आम्ही सुरुवातीला जाम खुश कारण नुकतेच अकादमी बाहेर पडलो होतो अन बेस कैंप ला माउंटेनियरिंग केले होते, त्यामुळे खायची ही बादशाही चैन आवडे तूफ़ान आम्हाला , रोटेशन पुर्ण करून जेव्हा बेस ला परत आलो तेव्हा असे वाटत होते २१ दिवस सतत काजू खाऊन मस्त गरगरीत झालो असू तो भ्रम एम आय रूम ला तुटला! रोजचे इतके ड्राई फ्रूट्स खाऊन सुद्धा २१ दिवसात वजन तब्बल ८ किलो कमी झाले होते, कारण विचारता डॉक्टर गुलजार हसत म्हणाला "लेको रोजचे पावशेर ड्राईफ्रूट्स तुमचे वजन वाढायला नाही तर फ़क्त तुमची शरीरे गरम ठेवायला कामी येतात" त्या नंतर ही कधी ड्राईफ्रूट्ससाठी शिसारी ही बसली नाही पण परत कधी वखवख खाल्ले ही नाहीत. कारण काजू बदाम क्या है साहब होंगे तो बढ़िया, न तो जय हिंद हे गृहितक डोक्यात पक्के बसलेले.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

पद्मावति गुरुवार, 07/23/2015 - 16:01
लेख कालच वाचला. तो तर उत्तम आहेच. सोन्याबापु, तुमचा प्रतिसादही खूप आवडला.

In reply to by कैलासवासी सोन्याबापु

समीरसूर Fri, 07/24/2015 - 11:21
जबरदस्त प्रतिसाद! सोन्याबापूंचे अनुभव अद्भुत आहेत. आणि म्हणून लिखाणदेखील कसदार आहे. मजा आ गया...

सुबोध खरे Sun, 07/26/2015 - 20:07
बापूसाहेब आपला अनुभव जबरदस्त आहे. अति उंचीवर कमी ऑक्सिजन आणि अति थंडी मुळे माणूस आपली चयापचय क्रिया बिघडवून बसतो. त्यामुळे माणसाची भूक कमी होते आणि शरीरातून उष्णता वेगाने जात असली तरी त्याची पूर्तता करण्याची क्षमता नाहीशी होऊ शकते. डोके दुखणे, भूक न लागणे, नॉशिया, उलटी होणे, थकवा आणि डोके हलके होणे हि लक्षणे दिसतात. या साठी खात राहणे आणि शरीर गरम ठेवणे हे फार महत्त्वाचे ठरते. यासाठी बदाम पिस्त्यासारखे पौष्टिक आहार पुरवले जातात. https://en.wikipedia.org/wiki/Altitude_sickness आमचे मित्र सांगतात कि सैनिक ते पदार्थ पुरवून पुरवून खात आणि मुला बाळांसाठी घेऊन जायचा प्रयत्न करीत. यासाठी त्यांना बर्याच वेळेस समोर ते पदार्थ खायला लावत असत. माणूस कुठेही असला तरी त्याच्यातील बाप जागा असतो. असे मौल्यवान पदार्थ आपल्या मुलांना खायला मिळावे म्हणून आपल्या पोटाला चिमटा काढून ते असे करीत असत. असे होऊ नये म्हणून काही युनिटच्या कमांडिंग अधिकार्यांनी सुटीवर जाताना सैनिकांना एक सुक्यामेव्याचे पाकीट युनिट वेल्फेअर फंडातून द्यायची पद्धत सुरु केली होती. अर्थात नंतर युनिटनी अतिरिक्त सुकामेवा मागवून तो सैनिकांना देण्यास सुरुवात केली.

In reply to by सुबोध खरे

एक्सक्टली!!! असेच प्रॉब्लम असतातच !!, पण मजा ही खुप असते! इन मीन ३ माणसे पोस्ट वर पणसतत हँसी मजाक सुरु असते, ओआर सोबत जेल अप करायला बेस्ट असते हाई अल्टीट्यूड रोटेशन