मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

रोगग्रहणशक्ती आणि समांतर चिकित्सा - १

आनन्दा · · जनातलं, मनातलं
लेखनप्रकार
सामान्यपणे आपण सर्वत्र रोगप्रतिकारशक्ती ही संज्ञा सर्वत्र ऐकत असतो. परंतु रोगग्रहणशक्ती ही देखील अशीच एक संज्ञा आहे की जी समांतर थेरपी म्हणजे होमिओपॅथी, अयुर्वेद यांच्याकडून वापरली जाते. परवा तो थंड आणि उष्ण हा विषय आला म्हणून त्यावर विचार करून आणि त्यातल्या तज्ज्ञांशी बोलल्यावर ही संज्ञा माझ्या ध्यानात आली. प्रथम आपण रोगप्रतिकारशक्ती म्हणजे काय ते पाहू - आपल्या शरीरात अनेक विजातीय घटत कायम येत असतात. अनेक अनावश्यक गोष्टी चयापचय क्रियांमधून साठत असतात, या विजातीय गोष्टी अनेक प्रकारच्या असू शकतात.. बक्टेरिया, किंवा इतर एकपेशीय जीव, विषद्रव्ये जसे की शिसे वगैरे. अगदी शरीरात विनाकारण साठणारी चरबी देखील याच विजातीय द्रव्यांमध्ये येते. शरीरामध्ये नेहमी ही विजातीय द्रव्ये शोधून बाहेर टाकण्याचे काम चालू असते. मोडर्न मेडिसिनच्या दृष्टीने रोगप्रतिकारक शक्ती म्हणजे रोगजंतूंसोबत लढण्यची शरीराची शक्ती. एक प्रकारे ते बरोबरच आहे. कारण ते देखील एक विजातीय द्रव्यच आहे, आणि शरीर देखील त्याच्याबरोबर लढाच करत असते. आणि त्यामध्ये शरीरातील अनेक यंत्रणा कार्यरत असतात. रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली की रोग होतो एव्हढेच मोडर्न मेडिसीन म्हणते. आरोग्याच्या समांतर शाखांचा दृष्टीकोन मात्र थोडा वेगळा आहे. होमिओपॅथी मध्ये रोगग्रहणक्षमता (susceptibility - संवेदनशीलता) अशी एक संज्ञा आहे. माझ्यादृष्टीने त्याची व्याख्या म्हणजे रोग वेळेवर ओळखण्यची क्षमता. आपण लहानपणी शिकलो त्याप्रमाणे आजारांचे २ प्रकार असतात. (मॉडर्न मेडिसीनप्रमाणे) १. रोग - जो रोगजंतूंमुळे होतो - उदा. न्युमोनिया, टायफॉईड, इ. २. विकार - जे शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे होतात. समांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. त्यामुळे उपाय पण त्यावरच केला जातो. कमिंग बॅक टू रोगग्रहणशक्ती - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे शरीराची विजातीय द्रव्ये योग्यवेळी शोधून बाहेर टाकण्याची क्षमता कमी होते, याचाच परिणाम शरीरात रोग निर्माण होण्यात होतो. आयुर्वेद म्हणतो अयोग्य आहार-विहारांमुळे शरीरात दोष वाढीस लागतात. हे वाढलेले दोष बाहेर टाकण्यासाऱही स्थिती जर शरीराकडे नसेल - म्हणजे १. अशक्तपणा - पोटात अपचन झालेले अन्न आहे, पण जुलाब करून ते बाहेर टाकण्याची शक्ती शरीराकडे नाही. २. आत्यंतिक प्रमाणात बिघडलेले राहणीमान - यांमध्ये पहिले दोष बाहेर काढण्यापूर्वीच नवीन पुन्हा शरीरात तयार होतात - जसे की रोज जागरण करणे - जागरणामुळे शरीरात पित्त निर्माण होते. म्हणजेच विजातीय द्रव्ये. ही द्रव्ये शरीरातून बाहेर टाकण्याचे काम पूर्ण होण्यापूर्वीच पुन्हा जागरण झाले तर मग शरीरात पुन्हा पित्त निर्माण होईल. मग हे पित्त त्याच जुन्या साठ्यात साठवले जाईल. किंवा ईतरही काही कारणे असतील. आता गम्मत अशी आहे की केव्हा ना केव्हा तरी शरीराची म्हणजे त्या दोषाच्या शरीरगत स्थानाची(जसे की पित्ताशय) साठवणक्षमता संपणारच. मग अश्यावेळेस शरीरासमोर २ पर्याय शिल्लक राहतात - १- तीव्र शाररीक क्रिया - जसे की उलटी द्वारे हे पित्त बाहेर फेकून देणे २. - जर पर्याय १ काही कारणाने शक्य नसेल, काही कारणाने उदा. एखादा माणूस माझ्यासारखा उलटी होऊच देत नाही, तेव्हा मग ते शरीरातच कुठेतरी स्थानबद्ध करणे. (पुन्हा एकदा सांगतो - मी आयुर्वेदाच्या दॄष्टीकोनातून पित्त म्हणतोय. त्यामागे कोणती केमिकल असतात ते मला माहीत नाहीत, पण कोणतीतरी असतात हे नक्की) शरीर हा दोष स्थानबद्ध करायला निघाले आहे, याचाच अर्थ माझी या दोषाबद्दलची संवेदशीलता आता कमी होत चालली आहे. आता हे साठवायचे कुठे असा प्रश्न आहे - त्याचे उत्तर शरीराच्या बाबतीत सोपे आहे. असा दोष साठवण्याचे २ निकष आहेत १. शरीराच्या त्या भागाची तो दोष साठवण्याची क्षमता असली पाहिजे. २. शरीराच्या त्या अवयवाकडे त्या दोषाबद्दल कमी संवेदनशीलता असली पाहिजे - म्हणजे शरीराने पुन्हा सांगेपर्यंत त्या अवयवाने तो दोष बाहेर टाकण्याचा प्रयत्न करता नये. याचे उत्तम उदाहरण म्हणजे पोटावर साठवली जाणारी चरबी. परंतु इथेच तर सारी मेख आहे - कारण शरीराच्या कोणत्याही अवयवाची असा दोष साठवण्याची क्षमता अमर्यादित नसते, केव्हातरी त्या स्थानावरचा घडा भरतोच, आणि मग शरीराचा तो अवयव असहकार पुकारतो. उदा. डोकेदुखी - डोके किंवा त्याचे नियंत्रण करणारे स्थान, जिथे हे पित्त साठलेले आहे, ते शरीराला सांगते की माझी क्षमता संपली. एकतर हे पित्त बाहेर टाका, किंवा दुसरीकडे हलवा. शरीर त्याप्रमाणे काहीतरी कृती करते आणि मग डोकेदुखी थांबते. म्हणूनच आयुर्वेदाकडे २ प्रकारच्या चिकित्सा आहेत. १ शमन - यामध्ये हा तात्कालिक प्रकारचा दोष शांत केला जातो. काही प्रकारची औषधे घेऊन, जसे की पित्ताची मात्रा, हा दोष तात्पुरत्या स्वरूपात मलमपट्टी करून शांत केला जातो. २. उत्सर्जनः- यामध्ये असा दोष शरीरातून त्याच्या मूळ स्थानी आणून मग उस्तर्जन केला जातो. उदा - पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे. मूलतः या उत्सर्जन चिकित्सेमध्ये औषधोपचारांनी विजातीय द्रव्ये बाहेर टाकली जातात. सामान्यपणे अशी अपेक्षा असते की अश्या प्रकारे शरीरेशुद्धी झाल्यावर शरीराची संवेदनशीलता पुन्हा पूर्ववत होईल आणि त्यामुळे शरीराचे काम सुरळीत चालू लागेल. तसे झाले नाही तर बहुधा पुन्हा पंचकर्म चिकित्सा करतात. या सर्व विवेचनामध्ये एक गोष्ट अजून आलेली नाही, ती म्हणजे रोगग्रहणशक्ती - रोगग्रहणशक्तीची माझ्यापुरती व्यख्या अशी, की विजातीय द्रव्य तत्काळ बाहेर टाकण्याच्या शरीरात असलेल्या यंत्रणेत झालेला बिघाड. आता आपण रोगजंतुजन्य रोगांकडे येउ - प्रत्येक रोगजंतुचे आपले असे स्थान असते, तो रोगजंतु फक्त त्याच अवयवाला संसर्ग करू शकतो. मग होते असे, की जर एखादा दोष जर त्या स्थानात अगोदरच ठाण मांडून बसला असेल, तर त्या रोगजंतुला आयतेच निमंत्रण दिल्यासारखे होते. जसे की घश्याला होणारा संसर्ग - वातपित्तकर खाण्यामुळे जर घसा दूषित झाला असेल, तर त्याला व्हायरल इन्फेक्शनसाठी आयतेच निमंत्रण दिल्यासारखे होते. म्हणजे असे बघा, पोटात बाहेरून खाण्यापोटातकोणता तरी जीवाणू आला, जर शरीराची संवेदनशीलता चांगली असेल, तर शरीराला जो जीवाणू लगेच कळेल, आणि तत्काळ शरीर कृती करून तो जीवाणू बाहेर फेकेल. पण तसे जर झाले नाही, शरीराची तेव्हाची संवेदनशीलता जर कमी असेल, तर मग तो जीवाणू शरीरात कुठेतरी स्थानबद्ध केला जाईल. स्थानबद्ध केलेला जीवाणू कालांतराने आपली संख्या वाढवून पुन्हा शरीराला अपायकारक होतोच, आणि त्यावेळी तो जास्त संख्येने असल्यामुळे त्याचा प्रतिकार करणे देखील कठीण जाते. आणि मग अश्या वेळेस शमन चिकित्सा करून तो बरा करावा लागतो. जसे की - उदाहरण आपण टायफोईड चे घेउ - टायफोईड हा आतड्यांमध्ये वाढणारा जीवाणू आहे. त्याला वाढीसाठी जडान्न, किंवा पोटात दीर्घकाळ साठून राहिलेले अन्न उपयोगी पडते. जेव्हा टायफोईड्चा जंतू शरीरात प्रवेश करतो तेव्हा हर आपण आपण मिताहारी, आणि हलका, सुपाच्य आहार घेत असू, आणि आपली संवेदनशीलता जागृत असेल, तर त्यावर वेळीच उपाय होईल, आणि त्या जंतूंना वाढीस संधी मिळणार नाही. परंतु तसे जर झाले नाही तर, जर त्या जंतूंना बाहेर टाकले गेले नाही, तर मग ते त्यांच्या स्थानात, म्हणजे आतड्यात स्थानबद्ध होतात. पोटात त्या जंतूंना वाढीस अनुकूल स्थिती मिळाली, तर मात्र ते जोमाने वाढीस लागतात. अश्या वेळेस शरीरची स्थिती देखील त्या जंतूंना बाहेर टाकण्याला अनुकूल नसते, त्यामुळे शमन चिकित्सा करावी लागते. (याचे उत्तम उदाहरण म्हणजे टायफॉईड चा उलटणारा ताप. ताप बरा होता होता जर काही कुपथ्य झाले, तर मग टायफॉईड चा दुप्पट जोमाने उलटतो, आणि मग त्याला आवर घालणे कठीण होते. ) आता आयुर्वेदानुसार याची चिकित्सा कशी होते ते पाहू, शरीरातून रोग बाहेर टाकणे शक्य नाही, म्हणजे मग तो शरीरातच संपवला पाहिजे. तो कसा संपवणार? आयुर्वेद म्हणतो, की रोग संपवायचा असेल, तर त्याचे शरीरातील स्थान नष्ट करा, म्हणजे आतडी काढून टाकायची की काय? :) तर तसे नव्हे. शरीरात जे त्रिदोषांच्या असमानतेमुळे रोगाला अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे ते पुन्हा समस्थितीत आणून त्या रोगाचे स्थान उद्वस्त करणे. उदा. टायफॉईडच बघू, त्याचे स्थान आहे आतड्यातले न पचलेले अन्न - या परिस्थितीत खालील उपाय संभवतात - १. लंघन - शरीराला कमीत कमी - अगदी गरजेपुरतेच अन्न द्यायचे, ते देखील अतिशय हलके, सुपाच्य. त्यालाच पथ्य म्हणतात. प्रत्येक आजाराप्रमाणे त्याचे पथ्य बदलू शकते. २. पाचन - शरीरातील न पचलेले अन्न पचन करून ते बाहेर टाकणे,आणि रोगात निर्माण विजातीय द्रव्यांचे शमन करणे यासाठी वेगवेगळी औषधे, काढे वगैरे दिले जातात. या दोन उपायांनी शरीरातील रोगाचे स्थानच उध्वस्त झाल्यावर रोग तिथे फार काळ राहू शकत नाही. आयुर्वेदाने तापाची चिकित्सा करण्यासाठी एक सोपा मार्ग सांगितला आहे - ज्वरादौ लंघनं कार्यम्, ज्वरमध्ये तु पाचनं | ज्वरान्ते दीपनं प्रोक्तं, ज्वरमुक्ते विरेचनं | बहुतांश ज्वर या सूत्राने आटोक्यात येतात. तुम्हाला आठवत असेल, की लहानपणी जर ताप आल, तर तुम्हाला सरळ लंघन घातले जायचे, त्याचे मूळ इथे आहे. तर ही झाली संवेदनशीलता, रोगग्रहणशक्ती, आणि,आयुर्वेदाची पद्धती/ तत्वज्ञान.. पुढील भागात होमिऑपॅथी, आणि योगोपचारांकडे आणि इतर बाजूंकडे एक नजर टाकू. =============================================================================== डिस्क्लेमर - मी काही वैद्यकीय तज्ज्ञ नाही, पण घरात तसे वातावरण असल्यामुळे थोडाफार अभ्यास आहे, त्यामुळे यात त्रुटी नक्कीच राहू शकतात. जाणकारांनी त्या दूर कराव्यात, अशी त्यांना विनंती. =============================================================================== मी मॉडर्न सायन्सेसचा प्रतिवाद करण्याऐवजी समांतर चिकित्सापद्धती मांडण्याचा मार्ग स्वीकारला आहे, या चिकित्सापद्धतींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही, पण या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत आहे. चु. भु. दे. घे. (क्रमशः)

वाचने 8896 वाचनखूण प्रतिक्रिया 36

विलासराव Sat, 09/13/2014 - 13:29
आयुर्वेदाने तापाची चिकित्सा करण्यासाठी एक सोपा मार्ग सांगितला आहे - ज्वरादौ लंघनं कार्यम्, ज्वरमध्ये तु पाचनं | ज्वरान्ते दीपनं प्रोक्तं, ज्वरमुक्ते विरेचनं | बहुतांश ज्वर या सूत्राने आटोक्यात येतात. तुम्हाला आठवत असेल, की लहानपणी जर ताप आल, तर तुम्हाला सरळ लंघन घातले जायचे, त्याचे मूळ इथे आहे. मी तर आजही हाच उपाय करतो. त्याचा फायदा आजवर १००% झालाय.

आयुर्हित Sun, 09/14/2014 - 13:39
अतिशय सुंदर विवेचन! प्रत्येक माणसाला विचार करण्यास भाग पाडुन त्याला जाणकार बनवण्याचा अतिशय चांगला प्रयत्न! पथ्य पाळले तर रोगच होत नाही हा माझा स्वतःचा अनूभव आहे. या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत करण्यापेक्षा, अशा आधुनिक तर्‍हेने या चिकित्सापद्धतीं सर्व लोकांपर्यत पोचवणे महत्त्वाचे झाले आहे. सर्वांनी आपआपल्या परीने हे काम केले तर सर्वांचाच फायदा आहे. मनापासुन धन्यवाद.

In reply to by आयुर्हित

आनन्दा Mon, 09/15/2014 - 11:55
या चिकित्सापद्धतींचा आधुनिक शाखांमध्ये संशोधनासाठी विचार होत नाही ही एक खंत करण्यापेक्षा, अशा आधुनिक तर्‍हेने या चिकित्सापद्धतीं सर्व लोकांपर्यत पोचवणे महत्त्वाचे झाले आहे.
असहमत. कार्य असेल तर कारण असलेच पाहिजे, आणि कारण + कार्य असेल तर ते आजच्या वैज्ञानिक परिभाषेत मांडता आलेच पाहिजे असे माझे मत आहे. फक्त त्यासाठी संशोधनाची गरज असते. आणि ते त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञच करू शकतात. सर्वच शास्त्रांमध्ये अनेक नवीन संकल्पना येत असतात, जुन्या रद्द होत असतात. फक्त त्यासाठी गरज असते ती डोळे उघडे ठेवण्याची. एक साधे उदाहरण घेउ - तुमच्याकडे जर एखादा रक्तदाब वाढलेला रुग्ण आला, तर तुम्ही काय कराल? त्याला मॉडर्न मेडिसिन द्याल की आयुर्वेदिक चिकित्सा करत बसाल? शेवटी रुग्णाचे प्राण वाचणे महत्वाचे असते. त्यामुळे माझ्या दृष्टीने होलिस्टिक अप्रोच हाच योग्य आहे. आणिबाणीची स्थिती तुम्ही आयुरवेदाच्या सहाय्याने हाताळू शकाल असा तुम्हाला पूर्ण विश्वास आहे का? माझ्यामते केवळ आधुनिक शास्त्रांना ही पारंपरिक शास्त्रे रिप्लेस करू शकत नाहीत, पण ही सारी शास्त्रे एकत्र येऊन नक्कीच चांगले फळ देउ शकतात, पण त्यासाठी गरज आहे ती त्या क्षेत्रातील तज्ज्ञ / अभ्यासकांनी आपले मेंटल बॅरिअर्स तोडण्याची. बाकी माझ्या या शास्त्राचा अनुभवांबद्दल नंतर लिहेनच.

सुबोध खरे Sun, 09/14/2014 - 14:56
(susceptibility - संवेदनशीलता) हे एक आधुनिक शास्त्रात मान्यता पावलेले तत्व आहे. उदा. दमट खोलीत गेल्यावर ज्या माणसाला दमा आहे त्याला लगेच धाप लागते आणि आपल्या सारक्या माणसाला काही त्रास होत नाही. किंवा आपण पाणी पुरी/ झणझणीत मिसळ खाल्ली तर काही होत नाही पण (अति) संवेदनशील माणसाना ताबडतोब लोटा परेड करावी लागते.( काही उष्ण प्रकृती माणसाना नुसत्या विचारानेच बहिर्दिशेची भावना होते. "समांतर शास्त्रांमध्ये सारे रोग हे एकाच कारणामुळे होतात - शरीराचे संतुलन बिघडल्यामुळे. " नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो? आईच्या शरीराचे असंतुलन हा एक साधारण घेतलेला बचाव आहे पण आईला क्षयरोग/ कर्करोग असताना हि मुल उत्तम प्रकृतीचे असते हे कसे? वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. आपले शरीर संपूर्णपणे संतुलित असेल तर आपल्याला रोग होणारच नाही असे छातीठोकपणे सांगता येईल काय? अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच. अगदी निरोगी माणूस असेल तरीही जर मोठ्या प्रमाणात जंतुसंसर्ग झाल्यास त्या माणसाला विषमज्वर(टाय फोईड) होणारच. तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.( अजीर्णामुळे ताप आला असेल तर गोष्ट वेगळी) उलट तापामुळे आपल्या शरीरात चयापचय रासायनिक क्रिया वाढल्याने( तापमान वाढले कि रासायनिक क्रिया वेगाने होतात हे अगदी बाळबोध रसायन शास्त्रातील तत्व आहे) आणि आपले शरीर गरम ठेवण्यास लागणारी उर्जा शरीरातून गेल्याने उलट अशक्तपणा येतो आणि अशात लंघन केल्यास अशक्तपणा भरून येण्यास जास्तच वेळ लागतो. माझ्या सारख्या बारीक प्रकृतीच्या माणसाना विचारून पहा लहानपणी तापामुळे अशक्तपणा आणि चक्कर कशी येत असे ते. बरेच लोक आपल्याला हा अनुभव सांगतील. पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे. पित्ताशय कोणताही तेलकट पदार्थ खाल्ला कि रिकामे होते. मी सोनोग्राफी मध्ये पित्ताशय काम करते कि नाही हे पाहण्यासाठी रुग्णाला दोन सामोसे किंवा बटाटे वाडे खाऊन येण्यास सांगतो आणि एक तासाने परत सोनोग्राफी केल्यावर पित्ताशय( काम करीत असेल तर)रिकामे झालेले दिसते. आपले विवेचन हे फारच जनरलायझेशन आहे. वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब. मी गेली ३१ वर्षे शिकतो आहे अजून पलीकडचा काठहि नजरेस आलेला नाही. तेथवर पोहोचणे याच नव्हे तर पुढच्या सात आयुष्यात सुद्धा शक्य होणार नाही.

In reply to by सुबोध खरे

आनन्दा Sun, 09/14/2014 - 23:38
सुबोधसर प्रतिसादाबद्दल धन्यवाद. आपण एक एक गोष्टींचा विचार करू
नवजात बालकाला/ जन्म न झालेल्या झालेला कर्करोग हा कोणत्या असंतुलनामुळे होतो?
माझ्यामते आयुर्वेदामध्ये गर्भाधान + गर्भसंस्कार हा एक संपूर्ण वेगळा विभाग आहे, त्यामध्ये बहुधा यातल्या बर्‍याच गोष्टी असाव्यात. (म्हणजे बाळाला कर्करोग कश्यामुळे होतो असे नव्हे, पण ढोबळमानाने आईच्या आहारविहाराचा बाळावर काय परिणाम होतो वगैरे. ) बाकी - माणूस जन्माला येताना संतुलित प्रकृती घेऊन येतो असे आयुर्वेद कधीच म्हणत नाही. तसा आपला समज असल्यास कृपया दूर करावा. किंबहुना आयुर्वेदानुसार गर्भधारणेपूर्वीपासून पती पत्नींनी पाळायचे नियम आहेत, म्हणजेच केवळ स्त्रीच नव्हे, तर उत्तम संतती निर्माण होण्यात पुरूषबीजाचा देखील तेव्हढाच वाटा आहे हे आयुर्वेद मान्य करतो.
अशा संपूर्णपणे संतुलित माणसाला एच आय व्हीचे विषाणू टोचले तर त्याला कालांतराने एड्स होणारच.
या गोष्टीबद्दल मी आता भष्य करू इच्छित नाही, कारण त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. सध्या एव्हढेच म्हणतो ज्या वानरांपासून एडस संक्रमित झाला आहे त्यांच्यामध्ये या रोगासाठी प्रतिकारशक्ती आहे. (मी माकड आणि माणसांना एका पातळीवर आणत नाहिये, पण प्राणिजगतामध्ये एड्स हा अजेय आहे असे नाही. याविषयी सविस्तर मी शिवांबुबद्दल लिहिताना बोलेन.
तापात लंघन केल्याने कोणताही फायदा होतो असे आढळलेले नाही.
यामागची भूमिका कळली नाही - लंघन म्हणजे आपल्याला काय अपेक्षित आहे? लंघनामध्ये कडकडीत उपास करावा असे मला तरी कुठे ऐकलेले आठवत नाही. आम्हाला लण्घन म्हणजे कण्हेरी/ भाताची पेज देत असत. त्यामागची भूमिका स्पष्ट आहे - तापामुळे इतर सार्‍या शरीरयंत्रणांबरोबर अग्नी पण मंद झालेला असतो. अश्या वेळी जडान्न घेऊन उगीचच त्यवर्‍ आणखी भार टाकणे म्हणजे इतर आजारांना निमंत्रण देण्यासारखे आहे. त्याऐवजी हलका/ सुपाच्य पण पुरेश्या क्यालरीझ देणारा आहार असावा अशी आयुर्वेदाची भूमिका आहे. अर्थात विषमज्वरासारख्या काही आजारांमध्ये मात्र रुग्णाला केवळ पेय पदार्थांवरच ठेवले जाते बहुधा. पण ते मला नक्की माहीत नाही, त्यामुळे त्यावर मतप्रदर्शन टाळतो. आणि महत्वाचे म्हणजे, जर तुम्ही प्रतिजैविके घेत असाल, तर तुम्ही लंघन करणे मुळीच अपेक्षित नाही, कारण (१)जड आहारामुळे जे जीवाणुजन्य रोग होऊ शकतात, ते प्रतिजैविके चालू असताना होउ शकत नाहीत. (२)प्रतिजैविकांमुळे जंतूंबरोबर शरीरातील इतर पेशी देखील मरत असतात. त्यामुळे जर तुम्ही काहीच खाल्ले नाही, तर शरीरावर कल्पनातीत लोड येउ शकतो, त्यामुळे माझ्या माहितीप्रमाणे काही औषधे अशी देखील आहेत की जी केवळ खाल्यावरच घ्यायची असतात.
पित्ताचे मूळ स्थान आहे पित्ताशय, मग शरीरातील पित्त तेथे आणून मग विरेचनाद्वारे ते शरीराबाहेर टाकणे.
याबाबतीत मला पुरेसे ज्ञान नाही, मिपावरील जाणकारांच्या प्रतीक्षेत. कदाचित शारीरशास्त्रातील पित्तशय आणि आयुर्वेदानुसार पित्ताशय या दोन वेगळ्या एंटिटी असतील. बाकी -
वैद्यक शास्त्र इतके साधे आणि सोपे नाही साहेब.
याच्यामागचा हेतू समजू शकलो नाही. तसा सूर माझ्या लेखातून ध्वनित होत असल्यास क्षमस्व. एका लेखात डोक्टर होता येईल एव्हढे वैद्यकशास्त्र नक्कीच सोपे नाही, नाहीतर मी नोकरी सोडून मेडिकल प्रॅक्टिसच नसती का सुरू केली? या लेखामागचा माझा हेतू मॉडर्न मेडिसीन वगळता इतर समांतर चिकित्सापद्धतींची थोडक्यात तोंडओळख करून देणे, त्यांचे पायाभूत तत्वज्ञान (जसे आणि जेव्हढे मला समजले आहे तसे आणि तेव्हढे) लोकांपर्यंत पोचवणे, आणि या सर्व चिकित्सप्रणालींच्या अभ्यास/ संशोधनासाठी शक्य झाल्यास थोडी उत्सुकता निर्माण करणे इतकाच आहे. कोणाला आयुर्वेद शिकवणे, किंवा माझी जाहिरात करणे हा नाही. (कारण मुळात मी डॉक्टरच नाही, आणि ते मी वर स्पष्ट लिहिले आहे.) त्यामुळे तुमची पर्सनल वाक्ये मला लागू होत नाहीत असे समजतो. या चिकित्साप्रणालींच्या विश्वासार्हतेबद्दल माझ्या मनात शंका नाही, कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत. बाकी या क्षेत्रात असणर्‍या समस्यांविषयी पुढे सविस्तर लिहेनच, त्यामुळे आता इथेच थांबतो.

बाबा पाटील Mon, 09/15/2014 - 13:14
खुपच चांगला आढावा घेतला आहे. वाचकांना विनंती कृपया दोन्ही शास्त्रांची चुकीची तुलना करु नका,विरेचनामध्ये पित्ताशयातले नव्हेच तर ग्रहणी या अवयवा मधले म्हणजे आमाशय व पक्वाशयस्थ पित्त बाहेर काढले जाते. तसेच पुर्वीच सांगितल्या प्रमाणे कृपया आयुर्वेदाला एलोपॅथीची चड्डी घालु नका.पहिला आयुर्वेद समजावुन घ्या मग विवेचन अथवा टीका करा.

In reply to by बाबा पाटील

आनन्दा Mon, 09/15/2014 - 13:57
विरेचनामध्ये पित्ताशयातले नव्हेच तर ग्रहणी या अवयवा मधले म्हणजे आमाशय व पक्वाशयस्थ पित्त बाहेर काढले जाते.
सुधारणेसाठी धन्यवाद.

प्रसाद१९७१ Mon, 09/15/2014 - 13:14
कारण मला आजपर्यंत झालेले बहुतांश आजार(काही अपवद वगळता) मी याच औषधांच्या सहाय्याने बरे केलेले आहेत.
@ आनंदा - हे तुम्ही बरे केलेले आजार काहीही उपचार न करता बरे होणारे होते का हे आधी तपासुन बघितलेत का? सर्वसामान्य पणे होणारे आजार ( सर्दी, ताप, खोकला, अपचन ) काही विषेश उपचार नाही केले तरी बरे होतातच.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 09/15/2014 - 14:28
मोडर्न मेडिसिन न वापरता पण मलेरिया झालेला कळू शकतो. फक्त त्यासाठी पॅथोलोजी लॅबमध्ये जावे लागते.

In reply to by आनन्दा

प्रसाद१९७१ Mon, 09/15/2014 - 14:51
पॅथोलोजी लॅबमध्ये जावे लागते.>> ह्या टेस्ट हा मॉडर्न मेडीसीन चा भाग आहे. समांतर पॅथी वाल्यांनी असल्या टेस्ट तरी कशाला कराव्यात आणि मलेरीया वगैरे शब्द वापरणे सुद्धा तात्विक दृष्ट्या चूक आहे.

In reply to by प्रसाद१९७१

आनन्दा Mon, 09/15/2014 - 16:12
हो खरे म्हणजे जायची गरज नव्हती. पण मी पुण्यात, आणि आमचे डॉ. कोकणात, अशी स्थिती असल्यामुळे जाऊन बघून आलो. रच्याकने, टेस्ट हा मोडर्न मेडिसिनचा भाग नाही, मॉडर्न चिकित्सेचा भाग आहे. पण असो. बाकी अवांतर - मी कधीच मोडर्न मेडिसिन विरोधात भूमिका घेतलेली नाही. माझा विरोध तथाकथित मोडर्न मेडिसिनच्या समर्थकांच्या अभिनिवेशाला. आम्हीच तेव्हढे शहाणे या भूमिकेला. हवे तर मी वर काय लिहिलेले आहे ते वाचा. प्रत्येकाला आपल्या मर्यादा आहेत. त्यामुळे आपल्या मर्यादेपलिकडे जे काही आहे तेथे दुसरी चिकित्सापद्धती जर काही काम करत असेल तर पूर्वग्रहमुक्त दृष्टीकोनातून त्याचादेखील अभ्यास व्हावा. आणि केवळ परिणामांना मोडर्न सायन्सेसच्या परिभाषेत न बसवता त्या तत्वज्ञानाचा देखील अभ्यास व्हावा, त्या तत्वज्ञानातून देखील काही मिळतेय का ते पहावे असा माझा हेतू आहे. कारण मी अनेक आजार या समांतर चिकित्सेने बरे होताना पाहिले आहेत.

In reply to by आनन्दा

मराठी_माणूस गुरुवार, 12/18/2014 - 15:30
मी कधीच मोडर्न मेडिसिन विरोधात भूमिका घेतलेली नाही. माझा विरोध तथाकथित मोडर्न मेडिसिनच्या समर्थकांच्या अभिनिवेशाला. आम्हीच तेव्हढे शहाणे या भूमिकेला.
अतिशय समर्पक प्रतिसाद. (अवांतरःआज पर्यंत अशा चर्चां मधे मोडर्न मेडिसिनवाल्यांचे प्रतिसाद बघता "अभिनिवेश" ह्या श्ब्दाला "आक्रस्ताळेपणा" हा शब्द सुचवावासा वाटतो.

सुहास.. Mon, 09/15/2014 - 20:30
माहीतीपर लेख आवडला , बाबा पाटलांच्या सुचनेला अनुमोदन ! पहिलाच भाग आहे दुसर्‍या भागाच्या प्रतीक्षेत सुपाच्य = याचा अर्थ काय ? मेडिसिन पेक्षा पथ्य पाळण्यावर विश्वास असलेला . वाश्या

वेल्लाभट Sun, 12/14/2014 - 14:06
वारंवार पित्ताचा त्रास होत असल्यास काय उपाय करावा? पित्त अंगावर उठते, खाज सुटते, चेहरा, ओठ सुजल्यासारखे होतात. विशेष एक काही खाल्याने नाही. कधीही. मग ते थांबेस्तोवर नाकी नऊ येतात. शेवटी इन्सिडाल किंवा तत्सम गोळ्यांनी आवर बसतो. ज्यांना माहित आहेत त्यांनी कृपया यावर उपाय सुचवावेत अशी विनंती.

In reply to by वेल्लाभट

टवाळ कार्टा Sun, 12/14/2014 - 17:05
भरपूर पाणी प्यावे....दारू वर्ज्य...पित्ताला साबण लावून धुवावे...मन आवडत्या गोष्टींत रमवावे माझ्यासाठी हा उपाय काम करतो

In reply to by वेल्लाभट

पैसा Sun, 12/14/2014 - 20:17
मला वाटतं ही अ‍ॅलर्जी असावी. ती काही खाल्ल्यामुळे येते असं नाही. कपडे, सेंट, पावडर, क्रीम्स, हवेतली धूळ, परागकण, डास/कीटक चावल्यामुळे किंवा हवेत अचानक झालेला बदल यामुळे असं होऊ शकतं. माझ्या एका मैत्रिणीला थंडी पडली की असा पित्त उठण्याचा त्रास व्हायचा. सकाळच्या कोवळ्या उन्हात उभे राहिले की आपोआप या पित्ताच्या गांधी निघून जायच्या. आमसुले या गांधींवर चोळणे, आमसुले भिजत घालून त्याचे पाणी पिणे असे घरगुती उपाय यावर काही प्रमाणात उपयोगी पडतात. मात्र नेमकी कशामुळे अ‍ॅलर्जी आहे याचा शोध घेणे आणि ती बरी होण्यासाठी स्किन स्पेशालिस्टकडून ट्रीटमेंट घेणे चांगले असे वाटते.

In reply to by पैसा

सविता००१ Tue, 12/16/2014 - 12:35
मला धुळीची, डास चावणे आणि काही वासांची अ‍ॅलर्जी आहे. मला तुझ्या मैत्रिणीला जसा त्रास व्हायचा तसाच होत असे. पण ती कळाली खूप उशीरा. म्हण्जे मी डॉ. कडे लगेच गेले होते. पण नाही कळू शकली लवकर. शेवटी डॉ. बदलले आणि लगेच निदान झालं. व्यवस्थित २ महिन्यांचा कोर्स घ्यावा लागला आणि आता जिथे धूळ, धुर असेल, डास असतील तिथे जाणे टाळणे हेच औषध.

In reply to by पैसा

बॅटमॅन गुरुवार, 12/18/2014 - 16:13
एक अवांतर/अज्ञानी शंका. आमसुले आंबट, मग पित्ताला आंबट कसं काय चालतं बॉ? पित्त म्ह. अ‍ॅसिडिटी आणि आंबट म्हणजे अ‍ॅसिडवालेच पदार्थ. मग कसं काय शमतं ते?

In reply to by बॅटमॅन

पैसा Fri, 12/19/2014 - 12:14
कसं ते म्हैत नै. पण आमसुलाचे पाणी/सरबत, लिंबू सरबत प्यायले तर पित्त्/अ‍ॅसिडिटी कमी होते खरे. डॉक्टर्/वैद्य लोकांनी कृपया प्रकाष पाडावा ही विनंती.

In reply to by पैसा

आयुर्हित Sat, 12/20/2014 - 06:52
अजून एक प्रकार: मेंढीच्या केसांपासून बनवलेल्या कांबळे/घोंगडीवर झोपल्यानेही काहीजणांचा पित्ताचा त्रास गेलेला मी पाहिला आहे. अशाच प्रकारे भरपूर गोष्टी/ उपचार पद्धती पूर्वापार सुरु आहेत. याला wisdom (what they dont teach you in medical college) म्हणायला हरकत नाही!

In reply to by वेल्लाभट

वेल्लाभट गुरुवार, 12/18/2014 - 14:20
पैसा ताई, सविता००१, टका, प्यारे सगळ्यांचे धन्यवाद... आमसूल पाण्यात भिजवून सकाळी पिण्याचा उपाय चालू आहे सद्ध्या. आणि हो हा त्रास मला नाही. एका दुस-या व्यक्तीला आहे मी माहितीदाखल प्रश्न विचारला.

आयुर्हित Sun, 12/14/2014 - 14:18
सर्वप्रथम गोळ्या खाणे बंद करावे. आपण म्हणाल हा काय उपाय झाला? पण आता हा मार्ग अवलंबवावा लागला तर काय मार्ग उरतो ... त्या साठी व्य नि केलाय

In reply to by तुषार काळभोर

आयुर्हित Mon, 12/15/2014 - 11:44
एका धाग्याची लिंक, दुसऱ्या धाग्यातील संदर्भ भलत्याच (तिसऱ्या) धाग्यावर लिहिण्यापेक्षा मोठ्ठी विसंगती काय असु शकते? चालू द्या!